Saturday, May 30, 2015

नेमाडेंच्या खासगी ज्ञानपीठाचे सरकारी कौतुक कशासाठी?

उरूस, दैनिक पुण्य नगरी,  रविवार 31 मे 2015 

ज्येष्ठ मराठी साहित्यीक डॉ. भालचंद्र नेमाडे यांना 2014 साठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आणि समस्त मराठी वाचकांना आनंद झाला. तो तसा होणे स्वाभाविकच होते. आत्तापर्यंत चार मराठी लेखकांना हा पुरस्कार मिळाला आहे. नेमाडे यांचे अभिनंदन विविध संस्था व्यक्ती यांनी केले. त्यांचे सत्कार सोहळे सुद्धा झाले आणि पुढेही होतील. आणि झालेही पाहिजेत.
7 ते रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘‘गौरव ज्ञानपीठ विजेत्यांचा, गौरव मराठी भाषेचा !’’ असा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आणि पहिल्यांदा प्रश्न निर्माण झाला की शासनाने असा कार्यक्रम का करावा? बहुतेक जणांचा असा समज आहे की ‘‘ज्ञानपीठ’’ पुरस्कार भारत सरकाराचा कुठला तरी सर्वोच्च साहित्यीक पुरस्कार आहे. केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी सर्व भाषांत मिळून एका साहित्यीकाला सन्मानित करण्यात येते. त्यामुळे जेंव्हा मराठीला हा पुरस्कार भारतीय पातळीवर मिळाला तर आनंद साजरा केलाच पाहिजे. 

सगळ्यात पहिले हे समजून घेतले पाहिजे की ज्ञानपीठ हा सर्वथा खासगी संस्थेद्वारे देण्यात येणारा पुरस्कार आहे. त्याचा शासनाशी काहीही संबंध नाही. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्र समुहाचे सर्वेसर्वा श्री. साहु शांतीप्रसाद जैन यांच्या 50 व्या वाढदिवशी 21मे 1961 रोजी त्यांच्या कुटूंबियांना असे वाटले की भारतीय पातळीवर साहित्यीकांचा गौरव केला गेला पाहिजे. विविध भारतीय भाषांमधील  महत्त्वाचे लेखन हिंदीत भाषांतरीत होवून ते सर्वांपर्यंत पोचले पाहिजे. त्यासाठी ज्ञानपीठ याच नावाने प्रकाशनही सुरू करण्यात आले. ‘नया ज्ञानोदय’ नावाने एक हिंदी मासिकही गेली 12 वर्षे या संस्थेद्वारे प्रकाशीत केले जाते.
भारतातील विविध भाषेमधील 300 विद्वान साहित्यीकांशी संपर्क करून चर्चा करून ज्ञानपीठ पुरस्काराची योजना ठरविल्या गेली. 1965 मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम लेखक जी. शंकर कुरूप यांना प्रदान करण्यात आला. तेंव्हा त्याची रक्कम 1 लाख रूपये होती. आता त्याची रक्कम 10 लाख करण्यात आली आहे. 1982 पर्यंत हा पुरस्कार लेखकाला एखाद्या साहित्यकृतीसाठी देण्यात येत असे. मराठीला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तो वि.स.खांडेकर यांना त्यांच्या ‘ययाती’ या कादंबरीसाठी.
1983 पासून मात्र हा पुरस्कार एखाद्या साहित्यकृतीला न देता एकूण साहित्यीक कारकीर्द लक्षात घेवून प्रदान करण्यात येतो. म्हणजे मराठीपुरते बोलायचे तर कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे यांच्या एखाद्या पुस्तकाला हा पुरस्कार न देता त्यांची एकूण साहित्यीक कारकीर्द लक्षात घेवून देण्यात आला आहे. हा पुरस्कार हिंदीला 10 वेळा, कन्नडाला 8 वेळा, बंगाली व मल्याळमला 5 वेळा, उडिया-उर्दू-मराठीला प्रत्येकी 4 वेळा व इतर भाषांना यापेक्षा कमी वेळा मिळाला आहे.
1992 पासून एक वेगळीच अट या पुरस्कारासाठी घालण्यात आली. ज्या वर्षी हा पुरस्कार घोषित केला जातो ते वर्ष सोडून त्या साहित्यीकाची त्यापूर्वीची 20 वर्षांची साहित्यीक कारकीर्द लक्षात घेतली जावी. नेमाडे यांना हा पुरस्कार घोषित झाला 2014 मध्ये. म्हणजे आधीची 20 वर्षांची साहित्यीक कारकीर्द लक्षात घेता ‘हिंदू’ ही एकमेव महत्त्वाची कलाकृती नेमाडेंची या काळातील आहे. त्यांची भाषणे, त्यांच्या मुलाखती अशी पुस्तके या काळात आली. पण त्यांच्या कोसला, बिढार, झुल, हूल, जरीला या पाचही कादंबर्‍या आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त टिकास्वयंवर हे समीक्षेचे पुस्तक हे त्यापूर्वीचे आहे.
तांंत्रिक बाबी सोडा, कारण नेमाडे महत्त्वाचे लेखक आहेतच. त्यांना उशीरा का होईना पुरस्कार मिळाला हे चांगलेच झाले. प्रश्न इतकाच की यात शासनाचा काय संबंध? 

हा पुरस्कार एका खासगी संस्थेने दिला आहे. त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात ती संस्था यशस्वी झाली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्र्याला आनंद झाला तर त्यांनी तो नेमाडे यांच्या घरी जावून त्यांचा सत्कार करून व्यक्त करावा. यासाठी महाराष्ट्र शासनाने 1 कोटी रूपये खर्च करून सोहळा साजरा करण्याचे काय कारण?
ज्ञानपीठ पुरस्कारात विविध प्रकारचे राजकारण चालते अशी टीका बर्‍याच जणांनी केली.  स्वत: नेमाडे यांनीच पूर्वीच्या ज्ञानपीठ विजेत्यांच्या साहित्यीक दर्जाबाबत वाईट टिका टिप्पणी केली आहे. आपल्या कादंबर्‍यांमधुनही उपहास केला आहे.
या पुरस्काराला पर्याय म्हणून के.के. बिर्ला प्रतिष्ठानने 1991 मध्ये ‘सरस्वती सन्मान’ पुरस्काराची सुरवात केली. या पुरस्कार प्राप्त लेखकांची नुसती यादी जरी पाहिली तरी लक्षात येते की ज्यांना ज्ञानपीठ मिळाले नाही किंवा मिळू दिले गेले नाही त्यांच्यासाठी ही सोय आहे. किंवा उलट म्हणून या. ज्यांना ज्यांना सरस्वती सन्मान प्राप्त होतो त्यांना कधीही ज्ञानपीठ मिळत नाही. 1991ते 2014 पर्यंत 24 वेळा हे दोन्ही पुरस्कार देण्यात आले. या यादीत एकही नाव समाईक नाही.
मराठी पुरते बोलायचे झाले तर आजपर्यंत विजय तेंडूलकर व महेश एलकुंचवार या दोघांना सरस्वती सन्मान देण्यात आला. तेंडुलकर हयात नाहीत. महेश एलकुंचवार यांचा ज्ञानपीठचा रस्ता बंद झाला हे नक्की.
शासन हे सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी म्हणून काम करत असते. त्याने सर्वसामान्यांचे जगणे सुखकारक होईल एवढे पहावे. त्यांना जिवनावश्यक सुविधा पहिले मिळतील याकडे लक्ष पुरवावे. विविध पुरस्कार देणे हे त्याचे काम नाही. पण तरी शासन स्वत: विविध पुरस्कार देते. साहित्याच्या क्षेत्रात ‘साहित्य अकादमी’ हा सर्वोच्च पुरस्कार शासनाकडून देण्यात येतो. साहित्य अकादमी ही स्वायत्त संस्था असली तरी तिला सर्व निधी शासनाकडून मिळतो. तसेच तिचे संचालन भारतीय प्रशासन सेवेतील अधिकार्‍यांकडूनच होत असते. शिवाय पद्म पुरस्कारही शासन देते. तेंव्हा शासनाला फारच साहित्यीकांचा कळवळा असेल तर अजून एक भारतीय पातळीवरील सर्वोच्च सन्मान शासनाने सुरू करावा. हे म्हणजे असे झाले. चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार शासन देते. पण त्याने फिल्मफेअर पुरस्कार मिळाला म्हणून कुणाचा लाखो रूपये खर्च करून जाहिर सत्कार करावा.  
एकीकडे विनोद तावडे जागतिक मराठी साहित्य संमेलनासाठी पैसे देणार नाहीत म्हणून सांगतात. आणि दुसरीकडे नेमाडे यांना ज्ञानपीठ हा खासगी पुरस्कार मिळाला की त्यांच्या सत्कार सोहळ्यावर एक कोटी रूपये खर्च करतात याचा अर्थ काय काढायचा?
महाराष्ट्र शासनाच्या वतीने उत्कृष्ठ वाङ्मय निर्मिती पुरस्कार दिले जातात. गेल्यावर्षी पासून त्यांची रक्कम वाढवून एकूण पुरस्काराची संख्या कमी केली गेली. म्हणजे जास्त लोकांना कमी पैशाचे पुरस्कार देण्याऐवजी कमी लोकांना जास्त पैसे मिळावे असे धोरण ठरले. जितकी रक्कम पुरस्कारासाठी वाटप केल्या गेली त्याच्या चौपट रक्कम प्रवासखर्च, प्रशासनिक खर्च, हॉटेलचा खर्च, खाण्याचा खर्च यावर उधळल्या गेली. त्याबाबत कोणी काहीच बोलले नाही.
एक कोटी रूपये खर्च करून नेमाडे यांचा आणि एकूणच ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांचा गौरव केल्या गेला. पण त्या सोहळ्यात नेमाडे यांना भाषणच करू दिले गेले नाही. त्यांच्या जून्या भाषणाची चित्रफित दाखविल्या गेली. गेट वे ऑफ इंडिया पाशी झालेला हा सगळा सोहळा म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या घशात एक कोटी रूपये घालणे इतकेच सिद्ध झाले. असे करणे म्हणजे या शासनाचे सांस्कृतिक धोरण आहे का?
घुमान येथे साहित्य संमेलन पार पडले. संत नामदेवांच्या नावाचा उदोउदो करण्यात आला. साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने प्रकाशीत झालेली नामदेव गाथा गेली 5 वर्षे उपलब्ध नाही. याकडे लक्ष देण्यास विनोद तावडे यांना वेळ मिळाला नाही. महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक धोरण म्हणजे शालेय स्नेहसंमेलनासारखे भगवे फेटे घालायचे, धोतरं नेसायचे, नऊ वारी साड्या नेसायच्या, नाकात नथ घालायची आणि गर्जा महाराष्ट्र म्हणायचे असे आहे की काय?
एक तर शासनाने न पेलणारा साहित्य संस्कृतीचा उठारेठा करूच नये. आपल्याकडे काहीही घडले की रडत बसायचे आणि अशा रडणार्‍याला कडेवर घेवून शासनाने चॉकलेट खाऊ घालायचे, विमान दाखवायचे, त्याच्या हातात फुगा द्यायचा  ही प्रथाच पडली आहे. त्या रडणार्‍याची खरी गरज अन्नाची आहे. त्याला सकस अन्न खाऊ घालायला आम्ही तयार नाही. त्याला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करायला आम्ही तयार नाही.
साहित्य संमेलनाचे 25 लाख असो की नेमाडे यांच्या सत्कारावर खर्च झालेले 1 कोटी असो. ही रक्कम तरी लहानच आहे. एका मराठी चित्रपटाला 25 लाख असे किमान एका वर्षाला 10 कोटी रूपये हे शासन नाहक उधळत आहे. आणि इतकं करूनही मराठी सिनेमा काही चालायला तयार नाही. जे सिनेमे धंदा करत आहेत त्यांची व्यवसायीक गणितं वेगळीच आहेत. त्याचा शासनाशी काही संबंध नाही.
महाराष्ट्रातल्या 12 हजार सार्वजनिक ग्रंथालयाचे प्रश्न भिजत पडले आहेत. शालेय ग्रंथालये मरणासन्न नव्हे तर पूर्णपणे मरूनच गेली आहेत. शासनाची प्रकाशनं जवळजवळ ठप्प पडली आहे. आंबेडकरांच्या साहित्याच्या नावाने लाखो रूपये खर्च करणारे शासन अजूनही त्यांची सर्व पुस्तके उपलब्ध करून देत नाही. पुढच्या वर्षी बाबासाहेबांच्या निर्वाणाला 60 वर्षे पुर्ण होत आहेत. जानेवारी 17 पासून बाबासाहेबांच्या लिखाणाचे सर्व हक्क खुले होत आहेत. मग शासनाच्या पुस्तकाला काळं कुत्रं तरी विचारील का?
नेमाडेंच्या सत्कारावर 1 कोटीची उधळपट्टी करणारे याचे उत्तर देतील का? 
    
   
 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, May 26, 2015

जनावरे घेवून शेतकरी। न्यायालयाच्या दारी ॥

उरूस, दैनिक पुण्य नगरी,  रविवार 24 मे 2015 

ज्यांनी कधी गाय पाळली नाही, गायीचे दुध, शेण, मुत याचा उठारेठा केला नाही ते छाती पुढे करून ‘गोवंश हत्या बंदी’ विधेयकाची पाठराखण करताना आढळतात. उलट ज्यांच्याकडे जनावरे आहेत असा कोणीही शेतकरी शासनाच्या गोवंश हत्या बंदीच्या बाजूने उभं राहिल्याचे चित्र नाही. शेतकर्‍यांची ही नाराजी कायद्याच्या भाषेत एका शेतकर्‍याने हिंमत करून न्यायालयापुढे आणून पहिल्यांदाच या विधेयकाला मोठे कायदेशीर आव्हान उभे केले आहे. आजपर्यंत शेतकरी केवळ खाली मान घालून शासनाचे सर्व शेतीविरोधी धोरणं सहन करत आला. पण आता गोवंश हत्याबंदीबाबत मात्र दोन शेतकर्‍यांनी हिंमत केली आणि औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल केली. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे अतिशय महत्त्वाचे असल्याने न्यायालयाने त्यांचा दावा दाखल करून घेतला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील बोकुड जळगावचे शेतकरी हाशिम उस्मानी आणि राजेंद्र किसन भालकर यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. 

हिंदू मुसलमानात दुही निर्माण करण्यासाठी असे चित्र उभे करण्यात आले होते की मुसलमान हे गायी कापून खाण्याच्या बाजूने आहेत. हाशिम उस्मानी यांनी आपल्या याचिकेत सगळ्यात पहिल्यांदा हिंदू बांधवांच्या भावना लक्षात घेवून अगदी  बाबर, सम्राट अकबर, बहादूरशहा जफर यांच्यापर्यंत सर्वांनी गोहत्या बंदीबाबत जे हुकूम काढले त्यांचे समर्थन केले आहे. गायीची हत्या केली जावू नये याबाबत तमाम हिंदूच्या भावनाशी आपण सहमत आहोत. आक्षेप आहे तो बैल, वळू किंवा गोर्‍हे यां सर्वांना एकत्र करून गायीसोबत जोडले आणि समग्र असे ‘गो-वंश हत्या बंदी’ विधेयक आणले याला या शेतकर्‍यांचा विरोध आहे. हा मुद्दा सर्वांनी सोयीस्कर रित्या बाजूला ठेवला होता. गाय आणि गो-वंश यात फरक असून त्यांना एकाच तराजूत मोजता येणार नाही. 

गो-वंश हत्या बंदी विधेयक कशासाठी? तर त्याची चार कारणे सरकारकडून दिल्या गेली आहेत.1. दुध उत्पादन 2. जनावरांची पैदास 3. ओझ्याची वाहतूक 4. शेतीची कामे. 

दुधासाठी भारतात मोठ्या प्रमाणात म्हशीचा वापर होतो. म्हशीची दुध देण्याची क्षमताही जास्त आहे शिवाय त्यातील फॅटचे प्रमाणही गायीच्या दुप्पट असते. त्यामुळे दुध उत्पादनासाठी हा कायदा करायचा आहे हा मुद्दा अडगळीत पडतो. जनावरांची पैदास आता कृत्रीम रेतन केंद्रात जतन केलेल्या वीर्यातील शुक्राणुंंपासून होते. त्यासाठी प्रत्यक्ष मोठ्या संख्येने वळू पोसायची गरज नाही. काही मोजके वळू संगोपन केंद्रात सांभाळून त्यांचे वीर्य गोळा करून त्याची साठवणूक केली जाते. जगभर हीच पद्धत अवलंबिली जाते. त्यामुळे हाही मुद्दा गैरलागू ठरतो. ओझ्याची वाहतूक करण्यासाठी गाय वापरली जात नाही. पाच वर्षांचा झाल्यावर बैल शेतीच्या कामासाठी वापरायचा झाल्यास त्याचे खच्चीकरण करावे लागते. (ग्रामीण भाषेत बैल ठेचल्या जातो.) मग हा बैल शेतीच्या वापराचा होतो. आणि तो जेंव्हा शेतीच्या कामाचा उरत नाही तेंव्हा तो ओझी वाहण्याच्या कामासही येत नाही. मग ओझी वाहण्यासाठी गो-वंशाचा वापर केंव्हा होतो? तर केवळ तो शेतीत कामाचा असतो तेंव्हाच. तेंव्हा तर शेतीची इतर कामे महत्त्वाची असतात. मग हाही मुद्दा निकालात निघतो. 

शेवटचा मुद्दा शासनाने पुढे केला तो म्हणजे शेतीची कामे. शेतीच्या कामासाठी हा बैल साधारणत: वयाच्या पाचव्या वर्षापासून ते 12 ते 13 वर्षांपर्यंत वापरात येतो. म्हणजे 1 ते 5 ही वर्षे त्याला सांभाळावे लागते. पुढे तो म्हातारा झाल्यावर कामाला येत नाही. असा बैल 20 वर्षापर्यंत म्हणजे 7 वर्षे रिकामा सांभाळावा लागतो. त्याला पोसण्यासाठी दिवसाला किमान 150 रूपयांचा चारा पाणी लागते. म्हणजे महिन्याला चार ते पाच हजार रूपये खर्च त्या बैलावर तो कामातून गेल्यावर करावा लागतो. वर्षाला असा बैल पन्नास हजार रूपये खातो. आता काहीच काम न करणारा बैल पन्नास हजार रूपये देवून गरीब शेतकर्‍याने मरेपर्यंत पोसायचा कसा? 

डंगरा बैल विकून त्या किमतीत कामाचा नवा बैल शेतकरी खरेदी करतो. पण जर हा डंगरा बैल विकू दिला नाही तर मग त्याचा खाण्याचा खर्च तर आहेच शिवाय कामाला नविन बैल घ्यायला परत पैसाही नाही. आधीच शेतीचे हाल चालू आहेत. वर या डंगर्‍या बैलांचे ओझे.
भाकड झालेल्या गायी आणि डंगरे बैलं यांचे करायचे काय? याचे उत्तर शासनाला देता आलेले नाही. या गायी बैलांच्या शेणाचे, मुताचे उत्पन्न शेतकर्‍याला मिळते असे प्रतिपादन गुजरात मधील न्यायालयांच्या एका निकालात न्या. लाहोटी यांनी केले होते. ते खोडून हाशिम उस्मानी यांनी दाखवून दिले आहे की पंचेविस हजार रूपये खर्च करून सहा महिने डंगरा बैल पोसल्यावर जितके शेण मिळते त्या शेणाच्या गाडीला मिळणारी किंमत ही फक्त बाराशे रूपये आहे. मग हा घाट्याचा धंदा करायचा कोणी?
उस्मानी यांनी पुढे आणलेला अजून एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. दुष्काळात शेतकरी पहिल्यांदा बैल विकतो. कारण गायीशी त्याची भावना गुंतलेली असते. जमिन लगेच विकता येत नाही. बाकी काही मालमत्ता त्याकडे विक्रीयोग्य नसतेच. मग एका अर्थाने बैल हे त्याचे बचत खाते आहे. यात गुंतवलेला पैसा त्याला विक्रीकरून मिळतो. त्याचा वापर करून तो दुष्काळातून कुटूंब सावरतो. पुढे पैसे हाताशी आल्यावर शेतात पिक उभे राहिल्यावर तो परत बैल विकत घेवून आपले काम करतो. म्हणजे एका अर्थाने बैल हे शेतकर्‍याचे चलन आहे. आता या चलनाच्या वापरावरच जर बंदी आणली तर शेतकर्‍यांचे अर्थकारण चालणार कसे?
आपल्याकडे शेतीचे तुकडे पडून एकराची शेती आता गुंठ्यावर आली आहे. छोट्या शेतीत ट्रॅक्टर परवडत नाही. शिवाय शेतात पीक उभे असताना बैल त्यात काम करून शकतो. ट्रॅक्टर करू शकत नाही. मग जर बैलाच्या विक्रीवर बंधनं आली तर शेतकरी बैल पोसणारच नाही. मग त्याच्या शेतीच्या कामाचे कसे?
बैल हा उपयुक्त पशु असे म्हटले आहे. जगात कुठल्याही उपयुक्त पशुला संरक्षीत पशु म्हणून जतन करण्याचा कायदा कोणीही कधीही केला नाही. उलट उपयुक्त असल्यामुळे त्याची काळजी अधिकच घेतली जाते. भाकड डंगरे जनावरे मारल्याशिवाय धडधाकट बळकट जास्त काम करणारे जनावरे सांभाळता येत नाहीत. हे आर्थिक व्यवहारीक सत्य शासन नजरेआड करते आहे.
गायीशी हिंदूंच्या भावना जोडल्या गेल्या आहेत हे लक्षात घेवून उस्मानी यांनी  स्वत:चा अनुभव सांगितला की आम्ही आत्तापर्यंत एकही गाय कधी विकली नाही. उलट शेजार पाजारच्या गरीब शेतकर्‍यांच्या गायी आम्ही दुष्काळात सांभाळल्या आहेत. उस्मानी यांनी हेही नमूद केले की हिंदू बांधवांच्या भावना लक्षात घेता बहुतांश मुस्लीम गायीचे मांस खात नाहीत. खाटिकांनी आपल्या दुकानात गायीचे धड दर्शनी भागात टांगून ठेवू नये अशी एक मोहिम उस्मानी यांनी राबविली होती. तर खाटिकांनी सांगितलेला अनुभव अतिशय दाहक होता. खाटिक  म्हणाले भैय्या, आम्ही कोणतेही मांस विकले तरी हे पोलिस आम्हाला गोमांस विकले म्हणूनच दमदाटी करतात व आमच्याकडून हप्ते वसूल करून घेतात. उलट पोलिसांना गायीचे मांस विकले काय किंवा नाही काय याच्याशी काहीच घेणे देणे नाही. त्यांना त्यांच्या हप्त्याशी घेणे देणे आहे.
उस्मानी आणि भालकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर आता न्यायालयात येत्या 10 जूनला सुनावणी होणार आहे. असंख्य शेतकर्‍यांनी या खटल्यात आम्हालाही सामावून घ्या म्हणून उस्मानी यांच्याकडे विनंती केली आहे.
कोणाला वाटेल खटला दाखल करणारा हा कोणी कट्टर धार्मिक पांढरी जाळीची टोपी घालणारा वेडा मुसलमान असेल.  हाशिम उस्मानी उच्चशिक्षीत (एमबीए) आहेत. त्यांच्या मातोश्री राणा हैदरी आंबेडकर विद्यापीठात उर्दू विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे आजोबा याकुब उस्मानी हे आंबेडकरांचे जवळचे स्नेही होते. मिलींद परिसरात बाबासाहेब यायचे तेंव्हा ते याकुब साहेबांना आवर्जून भेटायचे.
उस्मानी यांच्या घरात सरस्वतीचा फोटो दर्शनी भागातच टेबलावर मांडून ठेवला आहे. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेने आपल्या हिरक महोत्सवी वर्षात याकुब उस्मानी यांना स्मृतीचिन्ह देवून गौरविले होते. स्वत: हाशिम उस्मानी यांनी गेली तीन वर्षे औरंगाबाद परिसरातील शेतकर्‍यांसाठी दुष्काळी चारा छावण्या उघडून फार महत्त्वाचे काम केले आहे.
गोवंश हत्या बंदी विधेयकामागचे शेतीविरोधी धोरण या याचिकेमुळे कायदेशीर भाषेत समोर आणण्याचे काम हाशिम उस्मानी यांनी केले आहे. याला हिंदू विरोधी रंग देण्याचे काम सुरू आहे. हे कारस्थान हाणून पाडून समस्त शेतकर्‍यांनी ज्यांची जात केवळ आणि केवळ शेतकरी हीच आहे धर्म शेती हाच आहे गोत्र काळी आई हेच आहे त्यांनी या याचिकाकर्त्याच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे. 
   
 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Monday, May 18, 2015

गुर्जर, आम्ही तूमच्या पाठीशी आहोत

उरूस, पुण्य नगरी रविवार 17 मे 2015 

कोण हे गुर्जर? वसंत दत्तात्रय गुर्जर हे कवी आहेत हेच बर्‍याच वाचकांना माहित नाही. ‘गांधी मला भेटला’ या कवितेवर अश्लिलतेचा व महात्मा गांधीसारख्या महापुरूषाच्या बदनामीचा खटला भरला गेला. तब्बल 20 वर्षांनंतर याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. प्रकाशक व मुद्रक यांनी माफी मागितली. त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आता महापुरूषाची बदनामी झाली नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने कवी वसंत दत्तात्रय गुर्जर यांच्यावर सोपविली आहे. हा खटला परत लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात चालणार आहे.
आपल्याकडे एक ढोंगीपणा सर्वत्र आढळतो. सगळ्यांना एखादी गोष्ट माहित असते. पण तीचा उल्लेख करायचा नाही असा अलिखित नियम असतो. कोणी त्याबद्दल काही बोलले की मग मात्र सगळे असा काही आव आणतात की बाप रे! हे काय! किती हे गच्चाळ! अश्लिल! बिभत्स!! आपण नाही बाबा असलं काही खपवून घेणार. हा आमच्या संस्कृतीवर हल्ला आहे. म्हणजे हे सारे आपल्याकडे आहे याचे आम्हाला काहीच वाटत नाही. फक्त याचा कोणी उल्लेख केला की मग मात्र सर्वांची डोकी फिरतात. सर्वांना संस्कृती रक्षणाची जाग येते.
वसंत गुर्जर यांची ही कविता 1984 मध्ये प्रास प्रकाशनाने प्रसिद्ध केली. तेंव्हापासून दहा वर्षे ती कित्येकांच्या वाचनात आली. पण कोणालाही त्यावर काही आक्षेप घ्यावा असे वाटले नाही. ही कविता 1994 मध्ये  बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघटनेच्या वार्तापत्रात छापण्यात आली. साहित्याची पुस्तके कधीही न वाचणार्यानी हे वार्तापत्रही वाचले असेल याची शक्यता नाही. पण कोणीतरी कर्मचार्‍याने हे बघितले. त्याच्या डोळ्यात बाकी सगळी कविता सोडून, ‘गांधी मला भेटला, हेमामालिनीच्या नावाने ***** करताना’ ही ओळ नेमकी भरली. झाले लगेच यांची संस्कृती रक्षणाची उर्मी उसळून आली. एरव्ही गांधी कोण हे माहित नसलेले लगेच गांधी प्रेमाने पेटून उठले.
‘अखेर कमाई’ या  कुसूमाग्रजांच्या कवितेत फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्याशी  संवाद करताना गांधी म्हणतात,
तरी तूम्ही भाग्यवान 
एकेक जातजमात तरी 
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र 
फक्त सरकारी कचेर्‍यातील भिंती !
(मुक्तायन, पृ.109,पॉप्युलर प्रकाशन)
एरव्ही सरकारी कार्यालयांच्या भिंती पाठीशी असलेल्या गांधींच्या पाठीशी विचारांनी पतित झालेले पावन लोक उभे राहिले. त्यांनी खटला दाखल केला.
सलमान खानला दोन तासात बेल देणार्‍या आपल्या महान न्यायव्यवस्थेने अतिशय गतीने तत्परतेने फक्त 20 वर्षे घेत या खटल्याचा अर्धवट निकाल दिला. आता कवी वसंत दत्तात्रय गुर्जर यांना हे सिद्ध करावयाचे आहे की या ओळींमधून महात्मा गांधींची कुठलीही बदनामी होत नाही.
आपल्याकडे बहुतांश जून्या मंदिरांवर संभोग शिल्पं आहेत. आपल्या भाषेत असंख्य शिव्या आहेत. तुकारामा सारख्या संतांनी त्यांचा भरपूर वापर आपल्या अभंगांमध्ये केला आहे. वामाचारी शाक्त पंथियांचे कित्येक विधी अतिशय बिभत्स आहेत. हे सगळं आपल्याकडे शेकडो वर्षांपासून चालत आले आहे. पण यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या वगैरे असे काही घडले नाही. या गोष्टी चालत राहणार म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. बापाने पोराला सांगितलं नाही किंवा कळू दिलं नाही म्हणून काही पोराला अश्लिल गोष्टी माहीत होत नाहीत असे नाही. फक्त ते आपण संकेत म्हणून बोलत नाही. कामशास्त्र लिहून ठेवणारी आपली उदार खुली भारतीय परंपरा केवळ अशा एखाद्या कविच्या शब्दाने अपमानित होते? आपल्या राज्यकर्त्यांनी किती बायका केल्या, किती नाटकशाळा सांभाळल्या, त्यांच्या पदरी किती किन्नर होते (तृतीयपंथी) यांच्या लिखीत नोंदी सापडलेल्या आहेत. पेशवाईच्या काळात 13 वर्षांच्या कोवळ्या पोरी पुरवाव्यात असे आदेश दिलेले आहेत. इतकंच काय मराठी नाटकाच्या सुरवातीच्या काळात काही नाटककार हे समलिंगी कसे होते. त्यांना संभोगासाठी कोवळी तरूण मुलं कशी लागायची. आणि ही एक मराठी नाट्यसृष्टीची वेगळीच समस्या कशी होवून बसली आहे असे उल्लेख आहेत. हे सगळं आपल्याकडे आहे ही तक्रार नसते. तर ते केवळ कोणी शब्दांत मांडला, चित्र काढले, चित्रपट काढला, सुरात गुंफून गाणे केले की लगेच बोंब मारायला सुरवात. हे काय ढोंग आहे?  
पु.ल.देशपांडे यांनी या सगळ्याबाबत अतिशय साध्या सौम्य शब्दांत पण फार मार्मिकपणे लिहून ठेवलं आहे. ‘महाराष्ट्र कधी चाळामुळे बिघडला नाही आणि टाळामुळे सुधरला नाही.’ चाळ म्हणजे तमाशा आणि टाळ म्हणजे पंढरीची वारी असा सुंदर श्लेष पु.लं.नी केला होता. 
ज्यांनी गुर्जरांच्या कवितेवर आक्षेप घेतला ते कायदेशीर दृष्ट्या बरोबरच आहेत. पण त्यांचे हेतू शुद्ध नाहीत. आणि जर असे आक्षेप घ्यायचे म्हटलं तर आपल्या संतांनी जे जे लिहून ठेवलंय त्याचे काय करायचे? फक्त अश्लिलता जावू द्या. पण संत साहित्यात दलित जातींबद्दल अतिशय वाईट शब्द वापरले गेले आहेत. त्याचे काय करायचे? असे एका एका ओळींवर शब्दांवर खटले भरायचे तर पुढची 100 वर्षे बाकी सारे सोडून हेच काम न्यायव्यवस्थेला करत बसावे लागेल. आणि तरीही ते पूर्ण होणार नाही.
जे कोणी जाणीवपूर्वक असे अश्लिल उल्लेख करतात, ज्यांचे हेतू वाईट असतात, समाजात तेढ निर्माण करणारे असतात त्यांना समाज त्याच्या पद्धतीने शिक्षा देतच असतो. अश्लिलतेचे आता फारसे काही कोणाला उरले नाही.  साध्या शब्दांची चर्चा चालू आहे, कवीला दोषी गृहीत धरल्या जातंय पण तिकडे माहाजालावर (इंटरनेट) सगळ्या प्रकारचे वासनेचे खेळ सगळ्यांना पाहण्यासाठी खुले आहेत. कुठल्याही वयाची पोरं वाट्टेल ते सहज पाहू शकतात. आधी आंबट शौकिनांसाठी पिवळी मासिकं असायची. प्लेबॉय, पुसीकॅट अशी त्यांची नावं असायची. ब्लुफिल्म पाहण्यासाठी आंबट शौकिन मोठी धडपड करून त्या  व्हिडीओ कॅसेट मिळवायचे. हे सगळे आता खूप कमी झाले आहे. कारण असं काही करायची कोणाला गरजच उरली नाही. ज्याला हवे आहे त्याच्यासाठी हे सगळं मोफत सहज उपलब्ध आहेत.
असं घडलं म्हणून समाजातले बलात्कार वाढले का? आईसलँड/तैवान सारख्या देशात नग्नता हा गुन्हा नाही तिथे जगातील सर्वात जास्त बलात्कार होतात का? उलट असे काही होत नाही हेच सिद्ध झाले आहे. आईसलँड हा तर महिलांसाठी सर्वात सुरक्षित देश समजल्या जातो. बंदी घातली की अशा भावना जास्तच उचंबळून येतात. नैतिकता ही सामान्य लोकांच्या मनात असते यावर विश्वास ठेवला पाहिजे. उलट सर्व लोक अनैतिकच आहेत असं गृहीत धरून आपल्याकडे कायदा आणि सुव्यवस्था वागते. त्यामुळे या यंत्रणेवरचा ताण उगीचच वाढतो.
ज्ञानेश्वरांनी ‘जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ॥ असे म्हटले आहे. म्हणजे वाईट विचार वासना कमी होवेा आणि चांगले विचार वाढो. म्हणजेच माणसाच्या मनात हे सगळे असतेच. चांगूलपणा जो आहेच तो वाढो. निर्माण होवो असे ज्ञानेश्वरांनी म्हटले नाही.
वसंत दत्तात्रय गुर्जर एक गंभीर आणि महत्त्वाचे कवी आहेत. त्यांनी जी कविता लिहीली तिचा वाङमयीन दर्जा अतिशय वरचा आहे. कोणीही ही कविता वाचल्यास त्यांचा उद्देश काय आहे हे सहज कळू शकते. त्यासाठी कुठल्याही तज्ज्ञाचे मत विचारायची, न्यायालयाचा अमूल्य वेळ खर्च करायची गरज नाही. ज्यांना हे आवडत नाही त्यांनी हे वाचू नये. नाही तरी ही कविता कालचा निकाल येईपर्यंत किती जणांना माहित होती? 1984 ची कविता 1994 पर्यंत आक्षेप घेणार्‍यांनी तरी कुठे वाचली होती.  या पुढची जी न्यायालयीन लढाई वसंत दत्तात्रय गुर्जर यांना लढायची आहे त्यांच्या पाठीशी सर्व साहित्यीक, चित्रकार, कलाकारांनी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणार्‍यांनी ठामपणे उभे रहावे. कायदा मोडणार्‍या सलमानसाठी रस्त्यावर उतरणार्‍या ढोंगी लोकांपेक्षा ही कृती निश्चितच लोकशाही ला प्रगल्भ करणारी आहे.
गुर्जर आम्ही तुमच्या सोबत, तूमच्या पाठीशी आहोत ! आम्ही अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या बाजूने आहोत.    
 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575




गांधी मला भेटला

गांधी मला
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या 10 बाय 12 च्या खोलीत
6 बाय अडीचच्या बाजल्यावर
भारतीय जनतेच्या प्रतीकांत भेटला
तेंव्हा तो म्हणाला-
सत्यापासुन सौंदर्य वेगळे असू शकत नाही
सत्य हेच सौंदर्य आहे,
त्या सत्याच्याद्वारा मी सौंदर्य पाहतो
सत्याचा आग्रह ठेवल्यामुळेच तडजोड करण्यात
असलेल्या सौंदर्याचे मोल जाणता येते
सत्य हे वज्राहूनि कठोर आणि
कुसूमाहूनहि कोमल आहे

गांधी मला आकाशवाणी मुंबई ब केंद्राच्या
537.6 किलोसायकलवर
गांधीवंदना या कार्यक्रमात भेटला
तेंव्हा तो बोलला-
महात्म्याचे वचनदेखील बुद्धीच्या
कसोटीवर घासून घ्या
आणि ते कसास न उतरल्यास
त्याचा त्याग करा
आकाशवाणीच्या निविदेकेनं सांगितलं
गांधीवंदना हा कार्यक्रम आपण
5 वाजून 55 मिनीटं ते 6 वाजून 2 मिनीटांपर्यंत
तांत्रिक बिघाडामुळे ऐकू शकला नाहीत
त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत

गांधी मला चार्तुवर्ण्याच्या देवळात भेटला
तेंव्हा तो बनियाच्या धर्माला अनुसरून
पैशाची मोजदाद करत होता
(कुणाचं लक्ष नाही असं पाहून त्यानं
कनवटीला निळी लावली)
गांधी मला
बौद्ध मठांत भेटला
तेव्हा तो बीफचिली ओरपत होता

गांधी मला
चर्चमध्ये भेटला
दर आठवड्याला क्षमा करणार्‍या येशूपुढे
तो गुडघे टेकून उभा होता

गांधी
चुकला (नंगा) फकीर
मला मशिदीत भेटला
तेव्हा तो धर्मांतर करत होता

गांधी मला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
प्रबुद्ध भारतात भेटला
तेव्हा तो म्हणाला-
हरिजनांची सेवा माझ्या जीवनाचा
प्राणवायू आहे
मला पुनर्जन्म नको आहे
पण येणारच असेल तर अस्पृश्याचा यावा
म्हणजे येणारी दु:खं, यातना, अपमान
यांचा मला अनुभव येईल
अस्पृश्यता जिवंत राहण्यापेक्षा
अस्पृश्यता असलेला हिंदुधर्म
मेलेला मला चालेल
असं बोलून तो तडक
भारतमातेच्या मंदिरात आंघोळ करून
गंगेच्या पात्रात उतरला

गांधी मला
सानेगुरूजींच्या आंतरभारती  शाळेत
आयला झवून बापाला सलाम करणार्‍या
धडपडणार्‍या मुलांना
श्यामच्या गोड गोष्टी सांगताना भेटला
तेंव्हा श्यामची आई त्याला म्हणाली-
निरोध वापरा बिनविरोध

गांधी मला
भर रस्त्यात हेमालिनीच नावानं
हस्तमैथून करतांना दिसला
देशांतला हा पहिलाच स्ट्रीट प्ले
अहिंसेचा हाहि एक प्रयो

गांधी मला
टागोरांच्या गीतांजलीत भेटला
तेव्हा तो गोलपिठ्यावर
कविता लिहीत होता

गांधी मला
बाबा आमट्यांच्या एकात्म भारतांत
अपंगांच्या महोत्सवात भेटला
तेव्हा तो म्हणाला-
हात हे याचनेसाठी दुसर्‍यापुढे
पसरण्यासाठी नसतात
आणि दान हे माणसाला नादान बनवते
असं म्हणून
त्यानं अमंरिकन डॉलरचा चेक
ऍक्सेप्ट केला

गांधी मला आचार्य रजनीशांकडे
ध्यानधारणेत
संभोगातून समाधीकडे म्हणत
शेळीकडे वळताना दिसला

गांधी मला
मार्क्सच्या टॉऍटोमधून ड्रायव्ह इन
थिएटरमध्ये
जगातील कामगारांनो एक व्हा
हा पिक्चर पहात
टाइम किल करताना भेटला

गांधी मला
माओच्या लॉंगमार्च मध्ये भेटला
तेव्हा तो शेतकर्‍यांच्या वेषांत
खेड्यातून शहरांत स्थायिक व्हायला
निघाला होता

गांधी मला
डांग्यांच्या गिरणीची भिंत
चढून जाताना दिसता
तेव्हा तो ओरडला-
बिर्लाबावटे की जय

गांधी मला
काळा गांधीच्या दवाखान्यात
सावरकरांना
सँपलची बाटली विकताना भेटला
गांधी मला
अटलबिहारी वाजपेयींच्या
पेशवाईत भेटला
तेंव्हा तो गांधीवादी समाजवादाची
जपमाळ ओढत होता.

गांधी मला
चारु मजुमदारच्या नक्षलबाडीत भेटला
तेव्हा तो घोषणा देत होता-
आमारबाडी तोमार बाडी
सकलबाडी नक्षलबाडी
लालकिलेपे लाल निशान
मॉंग रहा है हिंदुस्थान

गांधी मला
क्रेमलिनमध्ये ब्रेझनेवच्या हस्ते
शांततेचे नोबेल पारितोषिक
घेतांना भेटला
गांधी मला
रेगनच्या व्हाईट हाऊसमध्ये
रेगनच्या न्यूट्रॉनची कळ दाबताना भेटला
माणसं मेलेल्या जगांतली
स्थावरजंगम मालमत्ता दाखवून
गांधी रेगनचं सांत्वन करत होता

गांधी मला
छत्रपतीशिवाजी विडीचे झुरके घेत
फोरासरोडला 580 नंबरच्या कमर्‍यांत
रंगरंगोटी केलेल्या लोकशाही नांवाच्या
रांडेकडे भेटला
तेंव्हा ती म्हणाली-
तू कुठली चिकित्सा करणार आहेस?
तू कुठला प्रयोग करणार आहेस?
तू कुठला प्रकाश दाखवणार आहेस?

गांधी मला
परम पूजनीय सरसंघचालक
बाळासाहेब देवरसांच्या संघस्थानावर
अखंड हिंदुस्थानच्या जाघोषात
अर्धी चड्डी सावरत 61-62 उठाबशा
काढत घोषणा देतांना दिसला
मी हिंदू आहे आणि त्याचा मला
अभिमान आहे
वंदे मातरम्
कॉंन्व्हेंटमध्ये शिशूंना शिकवून
इंग्लंड-अमेरिकेत स्थायिक करीन.

गांधी मला
जमाते इस्लामच्या घोगारी मोहल्ल्यात
पेट्रोडॉलरच्या थ्री-इन-वनमध्ये
पाकिस्तानविरूद्ध हिंदुस्थान क्रिकेट
कॉमेंट्री ऐकताना दिसला
पाकिस्तानचा हिंदुस्थानवर
2 गडी राखून विजय
हे ऐकताच तो नमाज पढला
मोहोल्ला मोहोल्ल्यांत जावून त्यानं
ग्रीनबोर्डाला हार घातला

गांधी मला
सदाशिवपेठेतल्या ना.ग.गोर्‍यांच्या
वाड्यांत भेटला
तेंव्हा तो म्हणाला
स्वातंत्र्याला इतकी वर्षे झाली तरी
आम्हाला
भारत माझा देश आहे
या देशावर माझे प्रेम आहे
इथला विविधतेने नटलेल्या समृद्ध
परंपरांचा मला अभिमान आहे
मी माणसांचा मान ठेवीन
मी माझ्या देशाशी निष्ठा ठेवीन
असं म्हणावं लागतं याची मला खंत वाटते
असं मला लंडनच्या
टेम्स नदीच्या तीरावर सुचलं

गांधी मला
आयर्विनच्या व्हाइसरॉय हाउसमध्ये
भेटला
तेंव्हा तो स्वातंत्र्य सैनिकांच्या
पेन्शनीचा हिशेब करत होता.

गांधी मला
स्वयंघोषित नेताजी राजनारायणच्या
कुटुंबकल्याणकेंद्रात भेटला
तेंव्हा उघडाबंब गाद्यागिरद्यांवर लोळत
मालिश करून घेत
बदामपिस्ते मिठाई खात
भारत मे समाजवाद क्यों नही आता
ह्यावर तो पत्रकार परिषद घेत होता

गांधी मला
अखिल भारती हिजड्यांच्या संमेलनात
कुटुंबनियोजनावर भाषण करताना दिसला
तेंव्हा आशाळभूतपणे चव्हाण
रिकाम्या असलेल्या खुर्चीवर लक्ष ठेवून
संपूर्ण बेरजेचं राजकारण शिजवत होता

गांधी मला
आम जनताकी संपत्ती असलेल्या पृथ्वीवर
बेवारस मुलांच्यात नवरस-बायकोचा खेळ
करताना भेटला
तेंव्हा तो म्हणाला
निधर्मी देश की क्या पहचान
छोडो चड्डी मारो गांड

गांधी मला
हाजी मस्तानच्या साम्राज्यात दिसला
तेंव्हा त्यानं चक्क पंजा सोडला
त्याच्या पंच्यावर मी कधीच गेलो नाही
पंचा काय धोतर काय नि पटलून काय
सत्याचे प्रयोग कशांतूनहि होतात
हो अगदी कवितेतूनसुद्धा

गांधी मला
बाटाच्या कारखान्यांत
बुटाला शिलाई मारतांना दिसला
तेंव्हा बाबूजी गांधींना म्हणला
इस देश मे चमार कभी प्राइम मिनिस्टर
नही हो सकता

गांधी मला
मोरारजींच्या ओशियानात भेटला
शिवाम्बूच्या तारेत तो म्हणाला
स्त्रिया ह्या मूर्ख आणि विवेकशुन्य असतात
मी हे कोणाच्या संदर्भात म्हटलं-
हे आपल्या लक्षात आलं असेलच

गांधी मला
नियतीशी संकेत करताना
नेहरूंच्या तीन मुर्तीत भेटला
तुम्ही आमच्या विश्वासातले
गादी नंतर इंदिरेच्या हवाली करा

गांधी मला
चरणसिंगांच्या सुरजकुंडात भेटला
तेंव्हा तो राष्ट्राला उद्देशून म्हणाला
मेरे जिंदगीकी तमन्ना पुरी हो गयी

गांधी मला कमलेश्वरच्या
परिक्रमात दिसला
तेव्हा तो म्हणाला-
मनोरंजनाची ए यु साधनं
तळागाळातल्या जनतेपर्यंत पोचवायचं
माझं स्वप्न साकार झालं
(कॅमेरामननं कॅमेरा त्याचा आडपंचा
आणि काठी यावर केंद्रीत केला होता)

गांधी मला
रतन खत्रीच्या अड्ड्यावर दिसला
तेंव्हा तो मटक्यातून
राष्ट्रीय एकात्मतेची तीन पानं काढत होता

गांधी मला
सर्व भूमि गोपालकी म्हणणार्‍या
विनोबांच्या धारावीत
टिनपाट घेवून हायवेच्या रांगेत
कुश्चेव्हला
गार्ड ऑफ ऑनर देतांना दिसला

गांधी मला
इंदिरा गांधींच्या 1 सफदरजंग
कारस्थानात भेटला
धटिंगण आयम-माय कार्यकर्त्यानं
त्याच्या गांडीवर लाथ मारली
तेव्हा तो ओरडला-
देश की नेता इंदिरा गांधी
युवको का नेता संजय गांधी
बच्चों का नेता वरूण गांधी
भाड मे गया महात्मा गांधी

गांधी मला
अजितनाथ रेच्या न्यायालयात
आरोपीच्या पिंजर्‍यात दिसला
सत्याचे प्रयोग करून
देश धोक्यात आणल्याबद्दल
राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली
त्याला फांशी दिला

गांधी मला
अत्र्यांच्या शिवशक्तीत
गांधीवर अग्रलेख लिहितांना दिसला
गांधीत आम्ही ईश्वराचे दर्शन घेतले
धन्य झालो
अब्जावधी वर्षांत आता
ईश्वर पृथ्वीवर येणार नाही
स्वदेशी रहा- स्वदेशी बना
असं म्हणून त्यांनी देशीला जवळ केलं

गांधीबाबा राजघाटावर
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या
खांद्यावर हाथ ठेवून म्हणाला-
देव मेला आहे देवमाणूसही मेला आहे
आता सैतानाच्या विश्वात
मेलेल्या देवाला मुक्ती नाही
आणि देवमाणसाला तर नाहीच नाही
-आणि क्षणार्धात तो समाधीत गेला

-वसंत दत्तात्रेय गुर्जर.






Tuesday, May 12, 2015

बालकवींची आठवण कोणाला आहे का?...














उरूस, दैनिक पुण्य नगरी, रविवार 10 मे 2015 

पाच मे 1918 ची गोष्ट आहे. अठ्ठावीस वर्षे वयाचा एक तरूण आपल्या धुंदीत चालला होता. जवळची वाट पकडायची म्हणून तो रेल्वेचे रूळ ओलांडून जाणार्‍या छोट्या पायवाटेने निघाला. दोन रूळ एकत्र येवून पुढे जाणार्‍या ठिकाणी तो उभा होता. तेवढ्यात त्याला मालगाडीची शिट्टी एैकू आली. ही गाडी दुसर्‍या रूळावरून जाईन असा अंदाज होता पण ती नेमकी तो चालला होता त्याच रूळावर आली. घाईघाईत रूळ ओलांडताना त्याची चप्पल तारेत आडकली. ती सोडवण्यासाठी तो खाली झुकला. तोपर्यंत मालगाडी त्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून निघून गेली. 

एरव्ही ही घटना पोलीसांच्या नोंदीत अपघात म्हणून जमा झाली असती. पण हा तरूण म्हणजे कोणी सामान्य इसम नव्हता. मराठी कवितेत ‘बालकवी’ म्हणून अजरामर ठरलेल्या त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची ही गोष्ट आहे. जळगांव जिल्ह्यातील भादली या रेल्वेस्टेशनवर हा अपघात घडला. पाच मे 2015 ही बालकवींची 97 वी पुण्यतिथी. किती जणांना आठवण आहे या कवीची?

जागतिक हास्य दिवस मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. या वर्षी हा दिवस 3 मे रोजी साजरा झाला. जगभरात विविध उपक्रम हाती घेतले गेले. भारतात पण कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातही उत्साही लोकांनी हा दिवस साजरा केला. पण 5 मे रोजी ज्यांची पुण्यतिथी होती त्या बालकवींनी 

आनंदी आनंद गडे
इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे
वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला
दिशांत फिरला
जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे
आनंदी आनंद गडे !

अशी सुंदर आनंदावरची कविता लिहीली त्यांची आठवण हा जागतिक हास्य दिवस साजरा करणार्‍यांना झाली नाही. आनंदाचे तत्त्वज्ञान अतिशय साध्या सोप्या भाषेत लिहीणारा हा कवी ज्यानं आनंदाची केलेली व्याख्या किती साधी सोपी आणि मार्मिक आहे

स्वार्थाच्या बाजारात
किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो
सोडुनी तो स्वार्था जातो
द्वेष संपला  
मत्सर गेला  
आता उरला
इकडे तिकडे चोहिकडे
आनंदी आनंद गडे

बालकवींचा जन्म 13 ऑगस्ट 1890 रोजी धरणगाव (जि. जळगांव) इथे झाला. केवळ 28 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या कवीने अतिशय मोजक्या पण नितांत सुंदर आणि नितळ भावना व्यक्त करणार्‍या कविता लिहून मराठी वाचकांवर मोठे गारूड करून ठेवले आहे.

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, 
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी उन पडे 

किंवा 

हिरवे हिरवे गार गालीचे 
हरित तृणाच्या मखमालीचे 
त्या सुंदर मखमालीवरती 
फुलराणीही खेळत होती

या सारखी गोड रचना असो. आपल्या साध्या सुंदर शब्दकळेने बालकवी वाचकाच्या मनात घर करून राहतात. अशा सुंदर साध्या गोड कविता लिहीणार्‍याला आपण विसरून जातो. त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आमच्या लक्षातही राहत नाहीत. अजून तीन वर्षांनी त्यांची स्मृती शताब्दि येते आहे. गावोगावच्या साहित्य संस्था कित्येक उपक्रम सतत करत असतात. तेंव्हा ज्यांची जन्मशताब्दि होवून गेली आहे अशा मराठी कविंवर काहीतरी कार्यक्रम करावे असे का बरे कोणाच्या डोक्यात येत नाही? एक साहित्य संमेलन केवळ शताब्दि साहित्य संमेलन म्हणून नाही का साजरे करता येणार? केशवसुत, बालकवी पासून ते कुसूमाग्रज, मर्ढेकर, अनिल, इंदिरा संत, ना.घ.देशपांडे, बा.भ.बोरकर, वा.रा.कांत, ग.ल.ठोकळ, ग.ह.पाटील अशी कितीतरी नावे आहेत. शंभरी पार केल्यावरही टिकून राहणार्‍यांची आठवण न काढणे हा आपलाच करंटेपणा आहे.

या जून्या कविंची आठवण का काढायची? कोणाला वाटेल कशाला हे सगळे उकरून काढायचे. पण जर जूनी कविता आपण विसरलो तर पुढच्या कवितेची वाटचाल सोपी रहात नाही. बा.भ.बोरकर लिहून जातात

तू नसताना या जागेवर चिमणी देखील नच फिरके
कसे अचानक झाले मजला जग सगळे परके परके

आणि पन्नास साठ वर्षे उलटल्यावर संदिप खरे सारखा आजचा कवी लिहीतो

नसतेच घरी तू जेंव्हा जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे तुटती धागे संसार फाटका होतो

आजचा कवी काळाच्या किती मागे किंवा पुढे आहे हे समजण्यासाठी जूने कवी वाचावे लागतात. त्यांची कविता समजून घ्यावी लागते. जी कविता काळावर टिकली आहे निदान तेवढी तरी कविता आपण वाचणार की नाही? आणि ती नाही वाचली तर मराठी कवितेचेच नुकसान होते.

आजकाला सर्वच गोष्टींना जातीचा रंग चढवला जातो. मग बालकवी म्हणजे त्यांची जात कोणती? त्याचा काय फायदा आहे? त्याप्रमाणे त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करायची की नाही ते ठरते. कुठलाही खरा प्रतिभावंत नेहमीच जातीपाती, देश, काळ याच्या सीमा ओलांडून आपली निर्मिती करत असतो. 

बालकवींच्याच आयुष्यातील एक काळीज हेलावून टाकणारा प्रसंग आहे. त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे  त्यांचे स्नेही आप्पा सोनाळकर पोत्यात भरत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू खळाखळा वहात होते. बालकवींच्या सदर्‍याकडे हात जाताच आप्पांच्या लक्षात आले की आत घड्याळ आहे आणि ते अजूनही चालूच आहे. बालकवींची एक अप्रकाशित कविता आहे

घड्याळांतला चिमणा काटा
टिक_ टिक् बोलत गोल फिरे
हे धडपडते काळिज उडते
विचित्र चंचल चक्र खरे!
घड्याळातला चिमणा काटा
त्याच घरावर पुन्हा पुन्हा
किति हौसेने उडत चालला
स्वल्प खिन्नता नसे मना!

काळावर इतकी सुंदर कविता लिहीणारा हा कवी आपण कशासाठी जातीपातीच्या चौकटीत, नफा नुकसानीच्या हिशोबात मोजायचा?

शंभर वर्षांपूर्वी होवून गेलेला हा कवि आनंदाचे उत्साहाचे कारंजे आपल्यापुढे कवितेत ठेवून गेला आहे. त्याच्या डोळ्यापुढचे त्याच्या स्वप्नातले जग कसे होते?

सूर्यकिरण सोनेरी हे 
कौमुदि ही हंसते आहे
खुलली संध्या प्रेमाने
आनंदे गाते गाणे
मेघ रंगले
चित्त दंगले
गान स्फुरले
इकडे तिकडे चोहिंकडे 
आनंदी आनंद गडे !

बालकवींना 97 व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !
     
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, May 5, 2015

बाबासाहेबांच्या नजरेतून तथागत गौतम बुद्ध


दैनिक पुण्य  नगरी, उरूस, रविवार 3 मे 2015 

सोमवारी बुद्ध पौर्णिमा आहे. वैशाखातील ही पौर्णिमा भगवान गौतम बुद्धांचा जन्मदिवस (इ.स.पूर्व 563) जातक कथेत बुद्ध जन्माची जी कथा सांगितली आहे ती अशी आहे.  महामायेच्या स्वप्नात चार दिशापुरूषांनी तिला ती झोपेत असताना हिमालयाच्या माथ्यावर नेवून ठेवले. मानसरोवरापाशी तिला स्त्रियांनी स्नान घातले. सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्यासमोर येवून म्हणाला, ‘‘माझा शेवटचा जन्म मी पृथ्वीवर घेण्याचे ठरवले आहे. तू माझी माता होशील का?’’ महामायेनं मोठ्या आनंदानं त्याला होकार दिला. तिच्या ह्या स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी शुद्धोदन राजानं आठ ब्राह्मणांना बोलावून घेतलं. त्यांनी या स्वप्नाचा अर्थ असा सांगितला, ‘‘ राजा, तुला असा एक पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर सार्वभौम सम्राट होईल आणि जर त्याने संसारत्याग केला तर संन्यासी होऊन तो विश्वातील अंधार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल.’’

बाबासाहेब आंबेडकर हे विद्वान होते. त्यांनी पुराणातील किंवा जातकातील अशा कथांवर विश्वास ठेवून बौद्ध धम्म नाही स्विकारला. अतिशय चिकित्सक पद्धतीनं त्यांनी भारतीय आणि पाश्चात्य धर्मांचा दर्शनांचा अभ्यास केला. आणि विचारपुर्वक बौद्ध धम्म स्विकारला. भारतीय परंपरेत एकूण 9 दर्शनं सांगितली आहेत. त्यातील सहा दर्शनं ज्यांना षड् दर्शनं असं म्हणतात जी वैदिक आहेत (न्याय, योग, सांख्य, वैशेषिक, पुर्व मिमांसा, उत्तर मिमांसा) त्यांना आस्तिक म्हणतात. म्हणजे या दर्शनांना वेद मान्य आहेत. म्हणजे ते वेदप्रामाण्य मानतात. तर इतर तीन दर्शनं जी आहेत (लोकायत, जैन, बौद्ध) ही नास्तिक आहेत म्हणजेत ते वेद मानत नाहीत. आपण चुकून देव मानणे आणि न मानणे याला आस्तिक किंवा नास्तिक असे म्हणतो.

बुद्ध दर्शनात देव न मानणार्‍या  कपिलमुनींच्या सांख्य दर्शनाचा आधार घेतला आहे. बाबासाहेबांनीही त्याची नोंद आपल्या पुस्तकात केली आहे. बौद्ध धम्म स्विकारताना तो संपूर्णत: बाबासाहेबांनी स्विकारला नाही. विशेषत: कर्म आणि पुनर्जन्म या संकल्पना ज्या की बौद्ध धम्मातही आहेत त्यांच्यावर बाबासाहेबांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 

बाबासाहेब नोंदवून ठेवतात, ‘‘बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व नाकारले आहे; पण त्याने कर्म आणि पुनर्जन्म ह्यांबद्दलची तत्त्वे दृढतया प्रतिपादन केली आहेत असे सांगितले जाते. मग लगेच प्रश्न उपस्थित होतो. जर आत्मा नाही तर कर्म कसे असू शकेल? जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकेल? हे गोंधळ निर्माण करणारे प्रश्न आहेत. बुद्धाने कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द कोणत्या अर्थाने वापरले आहेत? त्या काळी ब्राह्मण वापरत त्यापेक्षा निराळ्या अर्थी हे शब्द त्याने वापरले काय? असे असेल तर आत्म्याचा अस्वीकार आणि कर्म व पुनर्जन्म ह्यांदे दृढ प्रतिपादन ही भयानक विसंगती नाही काय? ही विसंगती उकलण्याची आवश्यकता आहे. ’’ (भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, आवृत्ती 19 वी)

राजपुत्र गौतमाची भगवान बुद्ध बनण्याची प्रक्रियाही बाबासाहेबांनी अतिशय सोप्या आणि वस्तूनिष्ठ पद्धतीने एखाद्या वकिलाने आपले म्हणणे मुद्देसूद मांडावे अशी मांडली आहे. 

मूळात पहिला प्रश्न बाबासाहेब अतिशय महत्त्वाचा असा उपस्थित करतात की भगवान बुद्धांनी परिव्रज्या(संन्यास) का ग्रहण केली?  राजपुत्र गौतमाला मृत देह, रूग्ण व जराजर्जर मनुष्य यांचे दर्शन झाले व तो उदास बनला असे एक पारंपरिक मत आहे. बाबासाहेबांनी हे सपशेल नाकारले आहे. गौतमाने वयाच्या 29 व्या वर्षी परिव्रज्या ग्रहण केली मग तोपर्यंत हे काय त्याच्या दृष्टीस कधी पडलेच नव्हते?

बाबासाहेबांनी केलेली मांडणी अशी. तेंव्हाच्या शाक्य राज्यात एक संघ होता. वयाची वीस वर्षे पुर्ण केलेल्या प्रत्येक शाक्य तरूणाला त्या संघात दाखल होवून संघाची दीक्षा घ्यावी लागे. त्याप्रमाणे गौतमाने घेतली. संघाचा सभासद झाल्यापासून आठ वर्षे राजपुत्र गौतम या संघात नियमित जात होता. कामकाजात भाग घेत होता. आठव्या वर्षी जी घटना घडली त्याने एका वेगळ्या दु:खांतिकेला सुरवात झाली. 

रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य व बाजूच्या कोलिय राज्यात झगडा उत्पन्न झाला. दोन्ही बाजूच्या लोकांना या भांडणात दुखापती झाल्या. शाक्यांच्या सेनापतीने कोलियांवर चढाई करून त्यांना नेस्तनाबूत करावे असा ठराव मांडला. दोष शाक्यांचाही असल्याचे लक्षात आल्यावर गौतमाने या ठरावास विरोध केला. शाक्य संघात हा ठराव गौतमाच्या मताविरूद्ध बहुमतांनी पारित झाला. आता सर्वांना संघाच्या नियमानुसार सैन्यात सामील होऊन युद्ध करणे भाग होते. मात्र गौतमाच्या सद्सद् विवेक बुद्धीला बहुमताचा हा प्रस्ताव मंजूर झाला नाही. त्याच्यापुढे तीन पर्याय होते

1. सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे. 
2. देहांत शासन अथवा देशत्याग 
3. आपल्या कुटूंबियांवर सामाजिक बहिष्कार आढवून घेणे किंवा त्यांच्या मामत्तेची जप्ती होवू देणे. 


पहिला आणि तिसरा पर्याय त्याला स्विकारणे शक्य नव्हते. त्याला दुसरा पर्याय योग्य वाटला. सेनापतीने शंका व्यक्त केली. ‘‘तू देहांतशासन किंवा देशत्याग करायला स्वेच्छेने करायला जरी तयार असशील तरी कोशलाधिपती जे आमचे वरिष्ठ आहेत त्यांना वाटणार की आम्हीच तूझ्यावर अन्याय केला. ते संघाला जाब विचारतील.’’

अशा आणिबाणीच्या परिस्थितीत सर्वांचीच सुटका करण्यासाठी आपल्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून राजपुत्र गौतम म्हणाला की, ‘‘मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देशत्यागच होय.’’

बाबासाहेबांनी अतिशय विचारपूर्वक मानवी पातळीवर विचार करून बुद्धाच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या प्रसंगाचे विश्लेषण करून दाखवले आहे. पुढचा इतिहास सर्वांना विदीत आहे. बारा वर्षे ज्ञानप्राप्तीसाठी भगवान बुद्धांनी कशी भटकंती केली, किती सायास केले, काय काय सोसले हे सारे सोप्या भाषेत बाबासाहेबांनी सांगितले आहे. 

पुढचा एक प्रसंग तर फार विलक्षण आहे. गौतमाने परिव्रज्या स्विकारल्यानंतर इकडे शाक्य व कोलिय यांच्यात मोठी खळबळ उडाली. त्यांच्यातील युद्धाचा जोर ओसरून शांततेसाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले.  झगडा शांततेने मिटविल्या गेला. जेंव्हा सिद्धार्थाला हे विचारल्या गेले की, ‘‘आता तर झगडा मिटला आहे. आता तुम्ही परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुंटूंबाबरोबर का राहत नाही?’’ याला भगवान बुद्धांनी दिलेले उत्तर मोठे महत्त्वाचे आहे, 

‘‘युद्धामुळे मी घर सोडले हे खरे. पण शाक्य व कोलिय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की, माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे. या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे.’’

पुढे भगवान बुद्धांनी केलेली ज्ञानसाधना, बौद्ध दर्शनाची केलेली मांडणी, त्याची व्यापकता, देशातच नव्हे तर तेंव्हाच्या  शेजारच्या इतर देशांतही त्याचा वाढत गेलेला प्रभाव हे सगळे सर्वांना माहित आहे. 

आजही जेंव्हा आंबेडकर जयंती असो की बुद्ध जयंती ज्या पद्धतीने बुद्ध आणि आंबेडकरांचे दैवतीकरण त्यातून दिसून येते ते मोठे विचित्र आहे. काहीच विचार न करता आम्ही बाबासाहेबांनाही आता देव करण्यास निघालो आहोत. स्वत: बाबासाहेबांनीच नोंदवून ठेवले आहे ‘बुद्ध होण्यासाठी बोधिसत्त्व आवश्यक अशा दहा जीवनवस्थांतूनच गेला पाहिजे या सिद्धांताला दुसर्‍या कोणत्याही धर्मावर तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही.’ आपल्या धर्मसंस्थापकाचीही कसोटी पाहणारा धर्म आता कोणा भक्तांच्या हाती आहे? 

आपल्या सारासार विचार शक्तीवर आधारलेला बौद्ध धम्म बाबासाहेबांना हवा होता. भगव्या, हिरव्या, पांढर्‍या रंगात माखलेल्या इतर धर्मासारखा एक नवा निळा बौद्ध धम्म नको होता. पण हे कोण लक्षात घेते? आम्हाला मेंदू बाजूला ठेवून डिजेच्या तालावर भन्नाट नाचायचे आहे. त्याला बाबासाहेब आणि भगवान गौतम बुद्ध तरी काय करणार ! 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

Sunday, May 3, 2015

दासू : दोन अक्षरात न मावणारा कविमित्र



(दासू वैद्य यांना  यावर्षीचा केशवराव कोठावळे पुरस्कार ‘तत्पूर्वी’ या कवितासंग्रहासाठी जाहिर झाला असून याचे वितरण दिगंबर पाध्ये यांच्या हस्ते दि. 5 मे रोजी मुंबईत होत आहे. या निमित्ताने दैनिक लोकसत्ता च्या लोकरंग पुरवणीत लिहिलेला लेख दि. ३ मे २०१५ )

एखाद्या माणसाची आपली पहिली भेट होते आणि पुढे त्याच्याशी मैत्री वाढत जाते. पण एखाद्याच्याबाबतीत मात्र असे होते की पहिल्याभेटीतच आपली पूर्वीपासूनची मैत्री आहे असे वाटत राहते. जवळपास पंचेवीस वर्षांपूर्वी औरंगपुर्‍यात सरस्वती भुवन महाविद्यालया जवळच्या चहाच्या टपरीवर कुण्या मित्रानं ‘हा दासू!’ अशी माझी ओळख करून दिली. तेंव्हा ‘हो मी याला ओळखतो’ अशा आशयाची मान हलवत मी त्याच्याशी हात मिळवला. दासूनेही पूर्वीचीच मैत्री असल्याची खुण आपल्या डोळ्यातून दिली.  ‘दासू’ इतकी छोटी ओळख करून देवून चटकन मैत्रीची सलगी साधण्याची किमया दासूने साधली आणि तेंव्हापासून त्याच्याशी मैत्री दाट होत गेली.

अंबाजोगाई हे दासूचे मूळ गाव. पुढे त्याचे आजोबा नांदेडला गेले. नामंकित वैद्य म्हणून नांदेड व परिसरात ते प्रसिद्ध होते. महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील सरस्वती देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेलं गोदावरी काठच्या बासर गवात त्यांना इनाम जमिन मिळाली. त्यांच्या कुटूंबाचा मोठा वाडा तिथे होता.  दासूचे वडिल शिक्षक होते. वडिलांच्या बदलीनिमित्ताने हे कुटूंब नांदेडजवळ मुदखेड या गावी स्थायिक झाले. दासूचे शालेय शिक्षण याच गावात झाले. या छोट्या गावचे, तिथल्या रिती रिवाज परंपरांचे मोठे संस्कार त्याच्या कवितेवर आणि एकूणच लिखाणावर उमटले.

पुढे अंबाजोगाई आणि औरंगाबाद येथे शिक्षणासाठी त्याचे वास्तव्य होते. औरंगाबाद सारख्या महानगरात आता कायमचे वास्तव्य असले तरी गावाकडचा एक मोकळेपणा, नाते जोडण्याची आसोशी, बोलण्यातली अनौपचारिकता त्याच्या स्वभावात टिकून राहिली आहे.

वीस वर्षांपूर्वी मराठीच्या प्राध्यापकासाठी एम.ए. एम.फिल. पुरेसे असायचे. त्या काळातही दासूने नेटची परिक्षा उत्तीर्ण केली. जालन्याच्या बारवाले महाविद्यालयात मराठी विभागात प्राध्यापक म्हणून त्याची निवडही झाली. पुढे त्याने पी.एचडी. केले. त्याच्या संशोधनाचा विषय भारत सासणे या गंभीर प्रवृत्तीच्या लेखकाचे लिखाण हा होता. पण असं सगळं असूनही त्याची ओळख मा.प्रा.डॉ. दा.ह.वैद्य अशी मात्र बनली नाही. किंबहूना त्याने ती बनू दिली नाही. अजूनही त्याची ओळख ‘दासू’ अशीच आणि इतकीच आहे.

बारवाले महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत असताना महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची जबाबदारी त्याच्याकडे आली. हे आपल्या प्रकृतीशी जूळणारे नाही हे दासू पूर्ण जाणून होता. त्याने हे पद नाकारले. पण तांत्रिकदृष्ट्या काही दिवस तरी प्राचार्याचा कार्यभार सांभाळणे भाग होते. या कविमित्राने एका सच्च्या कविला शोभावे अशी कृती केली. त्याने प्राचार्यांच्या प्रचंड मोठ्या खुर्चीच्या बाजूला एक साधी प्लॅस्टिकची खुर्ची ठेवली. कार्यभाराचा कालावधी संपेपर्यंत त्या छोट्या खुर्चीवर बसून काम केले. त्या पदास पात्र दुसरा उमेदवार रूजू होताच प्राचार्यांचे दालन आणि नि:श्‍वास सोबतच सोडला.

दासूला फार लवकर चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमधून गीतलेखनाचे काम मिळाले आणि गीतकार म्हणून प्रसिद्धीही मिळाली. यातून दोन धोके संभवत होते. एक तर प्रसिद्धीमूळे हवा डोक्यात जाणे आणि गीत लेखनामूळे गंभीर काव्य लेखनावर परिणाम होणे.

हे दोन्ही घडले नाही याचे ठळक पुरावेच माझ्याजवळ आहेत. 93-94 साली अजिंठ्याच्या डोगरात वसलेल्या उंडणगाव या छोट्या गावात एका कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या गावात कित्येक वर्षांपासून गणपतीच्या काळात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिक करण्याची चांगली परंपरा आहे. इथल्या रसिकांची तिसरी तरूण पिढी आता या आयोजनात हिरीरीने पुढे आली आहे. त्यांच्या आयोजनास मी कित्येक वर्षांपासून मदत करतो. त्यांनी त्या वर्षी दासूला आमंत्रित केले होते. नेमके त्याच दिवशी औरंगाबादला प्रसिद्ध नट दिग्दर्शक अमोल पालेकर यांची मुलाखत दासू वैद्य व चंद्रकांत कुलकर्णी घेणार होते. तशा बातम्याही वर्तमानपत्रांतून झळकल्या होत्या. उंडणगावच्या कार्यकर्त्यांनी दासू  येणार नाही हे गृहीत धरले. प्रत्यक्ष कार्यक्रमाची वेळ झाली आणि कविसंमेलन सुरू होण्याच्या आधी बरोबर दासू तिथे हजर झाला. मला आश्चर्य वाटले. मी त्याला तसे विचारलेही. त्याने दिलेले उत्तर मोठे सुंदर मार्मिक आणि त्याची मानसिकता दर्शविणारे होते. ‘श्रीकांत तो झगमगाटी कार्यक्रम होता. माझे नाव त्यांनी परस्परच छापले. मी या लोकांना आधीच शब्द दिला होता. कवितेसाठी इतक्या प्रामाणिकपणे काम करणारी ही माणसं मला जास्त मोलाची आहेत. माझ्या कवितेला इथे खरी दाद मिळणार आहे. म्हणून मी तो कार्यक्रम सोडून इथे आलो.’

चित्रपट व मालिकांसाठी गीतलेखन करताना गंभीर काव्यलेखनावर परिणाम होतो असा समज आहे. तो बर्‍याच कवींच्या बाबत खराही आहे. पण अलिकडच्या काळात किशोर कदम (सौमित्र) आणि दासू वैद्य (दासू) हे दोन कवी याला अपवाद आहेत. गीतकार व कवी अशी कसरत त्यांनी मोठ्या कौशल्याने सांभाळली. दासूचा पहिला कविता संग्रह ‘तूर्तास’ आणि ज्याला आत्ता कोठावळे पुरस्कार जाहिर झाला आहे तो ‘तत्पूर्वी’ हे दोन्ही संग्रह पॉप्युलर सारख्या मान्यवर प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहेत. अनेक मानाचे पुरस्कार पहिल्या कवितासंग्रहाला मिळाले असून मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही त्याचा समावेश झाला आहे. दुसर्‍या कवितासंग्रहावरही आता पुरस्काराची मोहर उमटली आहे. ललितच्या जानेवारी 2015 च्या अंकात दशकातील साहित्यीक म्हणून प्रा. मधु जामकर यांनी दासूच्या एकूणच लिखाणावर दीर्घ लेख लिहून त्याची दखल घेतली आहे.

नाटक हे दासूचे आवडीचे क्षेत्र राहिले आहे. त्याच्या एकांकिका खुप गाजल्या. ‘देता आधार की करू अंधार’ सारख्या एकांकिकेतून मकरंद अनासपुरे सारखा नट चित्रपट सृष्टीला मिळाला. त्याच्या ‘रिअल इस्टेट’ या दीर्घांकास मागच्याच वर्षी लिखाणाचे पहिले पारितोषिक मिळाले. पण अजून आपल्या हातून तीन अंकी नाटक लिहून झाले नाही याची खंत त्याला जाणवते.  

बहुतांश साहित्यीक कलाकार हे आपल्या काचेरी महालात बंदिस्त राहतात. त्यांचा समाजाशी संबंध येत नाही असा एक सार्वत्रिक आरोप होतो. दासू त्याला अपवाद राहिला आहे. मी पंधरा वर्षांपूर्वी परभणीला एक सामाजिक संस्था स्थापन करून आरोग्य चळवळ, मराठी शाळा अशी कामं सुरू केली होती. आम्ही या संस्थेसाठी मदतीचे आव्हान केले तेंव्हा तातडीने आम्हाला धनादेश पाठवून त्याने देणगी दिली होती. दासू आपल्या मुलीचा वाढदिवस अनाथाश्रमात जावून त्या मुलांना खेळणी, खाऊ, कपडे वाटून साजरा करतो हे आमच्या सारख्या अगदी जवळच्या मित्रांनाही आत्ता आत्तापर्यंत माहित नव्हते.

औरंगाबादला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी विभागात दासू प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. ह्या विद्यापीठाचे नामांतर झाले तेंव्हा या प्रदेशातील बहुतांश दलित विद्यार्थ्यांना या विद्यापीठाबद्दल आस्था निर्माण झाली. दासूचा विद्यार्थी असलेल्या एका दलित मुलाने एक आठवण मला सांगितली आणि दासूचा एक वेगळाच पैलू नजरेसमोर आला. या विद्यार्थ्याला शासनाकडून मिळणार्‍या शिष्यवृत्तीप्रकरणात दलित प्राध्यापकांकडूनच अडथळा येत होता. या विद्यार्थ्याने दासूकडे नोंदणी केली त्याचे एकमेव कारण म्हणजे विद्यार्थ्यांना आणि विशेषत: दलित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दासूकडून मिळणारी सन्मानाची वागणूक, अडीअडणीला त्यांना मदत करण्याची वृत्ती.

आंबेडकरांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात महात्मा गांधी यांच्या नावाने असलेल्या अध्यासनासाठी काम करण्यास कोणीच तयार नव्हते. प्रा. जयदेव डोळे यांनी या अध्यासनाचे काम सांभाळले. त्यांच्यानंतर सगळ्यांना नकोशी वाटणारी ही खुर्ची दासूने स्विकारली. गांधी विचारांवर विद्यार्थ्यांनी लिहीलेले निबंध एकत्रित करून त्याचे पुस्तक प्रकाशीत करून या अध्यासनाच्या माध्यमातून एक वेगळेच काम करून दाखवले. औरंगाबाद जवळच्या तंटामुक्त गावाच्या सरपंचांना बोलावून त्यांचा सत्कार घडवून आणला. स्वच्छता अभियानात उत्कृष्ठ कामगिरी करणार्‍या गावकर्‍यांना विद्यापीठात बोलावून त्यांचा सन्मान या अध्यासनाद्वारे केला.

तुकाराम चित्रपटाची गाणी दासूने लिहीली आहेत. दासूतील गीतकाराला आणि कविला अभिमान वाटावा अशी एक गोष्ट या चित्रपटात घडली. चित्रपटाचा शेवट कसा असावा यावार दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी विचार करत होता. तुकारामांच्यावह्या नदीत बुडतात. त्यासाठी तुकाराम महाराज नदीकाठी उपोषणाला बसले आहेत. हळू हळू आजूबाजूला लोक जमा होत जातात. लोकांच्या तोंडी तुकारामाचे अभंग येवू लागतात. कारण लोकांना ते पाठच असतात. अशा पद्धतीने लोकगंगेतून वह्या तरल्या हा आशय दिग्दर्शकाला पोचवायचा होता. या पार्श्वभूमिवर दासूने गीत लिहीले

जगण्याचा पाया । चालण्याचे बळ । 
विचारांची कळ । तुकाराम ॥
खोल पसरतो । पुन्हा उगवतो । 
सांगून उरतो । तुकाराम ॥
या गाण्याचे चित्रण इतके प्रभावी झाले की ठरलेला शेवट बदलून याच प्रसंगावर आणि गाण्यावर चित्रपटाचा शेवट करण्याचा निर्णय चंद्रकांत कुलकर्णीने घेतला. तुकारामावर एक चांगली कविता लिहीली जावी, त्याचे सुंदर गाणे बनावे आणि तो प्रसंग चित्रपटाचा कळस ठरावा ही दासूसाठी फार समाधानाची कुठल्याही पुरस्काराहून मोठी गोष्ट आहे.

गीतकार श्रेष्ठ का कवी असा एक वाद आपल्याकडे केला जातो. त्यावर काहीही न बोलता एक सुंदरशी कविता लिहून दासूने पडदा टाकला आहे.

गाणं म्हणजे असते काय?
शब्दावरची ओली साय !!

कोठावळे पुरस्कारासाठी या कविमित्राला लाख लाख शुभेच्छा !

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.
9422878575