Saturday, October 10, 2020

‘अर्बन नक्षलीं’च्या गळ्याशी कायद्याचा फास !

  


उरूस, 10 ऑक्टोबर 2020 

 भीमा कोरेगांव दंगल प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) तपास करत आहे. काल या तपासात आठ नक्षलींविरोधी आरोप पत्र दाखल करण्यात आले. आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, स्टॅन स्वामी, रमेश गायचोर, ज्योती जगताप, हॅनी बाबू, सागर गोरखे आणि मिलींद तेलतुंबडे ही ती आठ नावे आहेत.

नोव्हेंबर 2018 पासून आनंद तेलतुंबडे न्यायालयीन खेळ करत आपली अटक चुकवत होते. त्यांना शेवटी सर्वौच्च न्यायालयाने फटकारले. त्यांचा जामिन नाकारून शरणागती पत्करण्यास सांगितले. त्यांनी बरोबर 14 एप्रिल 2020 हाच दिवस शरणागतीसाठी निवडला. ही संधी साधत सगळ्या पुरोगाम्यांनी तेंव्हा अशी बोंब केली की आनंद तेलतुंबडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातजावाई (प्रकाश आंबेडकर यांच्या बहिणीचे पती) असून त्यांना बाबासाहेबांच्या जयंतीलाच कशी अटक केली?

वारंवार हे पुरोगामी अशा देशविघातक शक्तींच्याच बाजूने कसे उभे राहतात? वारंवार यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची उबळ देशविरोधी बाबींतच कशी येते? आनंद तेलतुंबडे हे जसे बाबासाहेबांचे नातजावाई आहेत तसेच ते मिलींद तेलतुंबडे या फरार नक्षलवाद्याचे सख्खे भाऊ आहेत हे का नाही सांगितले जात? त्यांना सर्व कायदेशीर संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. आपली बाजू न्यायालयासमोर मांडण्याची संपूर्ण मुभा दिली होती. दीड वर्ष त्यांना अटकेपासून पळता आले. असे असूनही त्यांना पोलिसांना शरण यावं लागलं आणि अटक व्हावं लागलं की लगेच ओरड सुरू होते.

आता रितसर त्यांच्यासह इतर आठ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. कायदा त्याचे काम करतो आहे. मग असं असताना त्यात अडथळा आणण्याचे काय काम? 

मुळात भिमा कोरेगांव हे प्रकरण काय आहे? ब्रिटीशांसाठी लढलेल्या महार रेजिमेंटच्या सैन्याची गौरवगाथा ही अस्सल भारतीयांसाठी अभिमानाचा विषय कसा काय होवू शकते? याचे कारण काय दिले तर ही लढाई पेशव्यां विरूद्ध म्हणजेच ब्राह्मणशाही मनुवादी यांच्या विरोधात होती. यातही पुन्हा एक बौद्धिक भ्रष्टाचार हे शाहू फुले आंबेडकरांची जपमाळ ओढणारे पुरोगामी विचारंवत करत असतात. पेशवे हे सातारच्या छत्रपतींचे वजीर म्हणजेच पंतप्रधान होते. छत्रपतींच्या वतीने ते राज्यकारभार पहात होते. युद्ध करत होते. मग हे सैन्य पेशव्यांचे कसे ठरते? अगदी पानिपतची लढाई असो की दिल्ली जिंकून त्या तख्तावर मोगल वंशाच्या व्यक्तीस बसवून त्याच्या बादशाहीस मान्यता देणे असो ही सगळी कामं पेशव्यांनी केली ती कुणाच्या आदेशाने? छत्रपतींच्याच आदेशाने आणि नावाने केले ना? पेशवाईची वस्त्रे सातार्‍यातूनच येत होती ना. मग असे असताना या सैन्याला पेशव्यांचे सैन्य असे अभ्यासक विचारवंतांनी म्हणायचे काय कारण? बोलीभाषेत ‘पेशवाई’ हा शब्द रूढ होता हे एकवेळ ठीक आहे. प्रत्यक्षात शिक्का चालत होता तो छत्रपतींचाच. 

स.गो.सरदेसाई यांनी जी रियासत लिहीली आहे त्याचे नाव ‘मराठी रियासत’ असेच आहे. हीची सुरवात शिवाजी महाराजांपासून होते आणि 1818 मध्ये पेशव्यांच्या पराभवापाशी संपते. याला वेगळे ‘पेशवे रियासत’ असे नाव दिले नाही. मग वैचारिक पातळीवर पेशवाई हा शब्द का वापरल्या जातो? 

भीमा कोरेगांवच्या लढाईत ब्रिटीशांकडून जे काही दलित लढले गेले होते ते पोटार्थी सैनिक म्हणून लढले होते. जसे ते ब्रिटीशांकडून लढले हा त्यांचा दोष नाहीच तसेच त्यांनी काही मनुवादाविरूद्ध ब्राह्मणशाही विरूद्ध लढा दिला असेही नाही.  मग हा विषय का उकरून काढला जातो? 

स्वत: बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात भीमा कोरेगांव येथे काही एक उत्सव दरवर्षी सुरू केला का? प्रकाश आंबेडकर आणि आनंद तेलतुंबडे यांनीही जानेवारी 2018 च्या पूर्वी भीमा कोरेगांव म्हणजे दलित अस्मितेचे स्मारक आहे असे काही कधी कुठे लिहीले भाषण केले तशी मांडणी केली आहे? मग भीमा कोरंगांव म्हणजे मनुवादा विरूद्धची लढाई आहे ही मांडणी कुठल्या वैचारिक आधारावर केली जाते? त्यासाठी कसला पुरावा आहे? राजकारण करण्यासाठी राजकीय नेते काहीही करतात याचा अनुभव आपण घेतो. पण विचारवंत कशाच्या आधारावर ही मांडणी करतात? 

बुद्धीभेद करण्याची विचारवंतांची खोडी अगदी सर्वौच्च न्यायालयात नुकत्याला लागलेल्या राम जन्मभुमी प्रकरणांतील निकालांतूनही ही बाब समोर आली आहे. रोमिला थापर आणि इरफान हबीब सारखे इतिहासकार यांनी खोटी शपथपत्रं देवून सांगितले होते की बाबरी मस्जिद ही समतल जागेवर उभारल्या गेली होती. तेथे कुठलेही मंदिर पूर्वी नव्हते. जे की उत्खननात खोटे सिद्ध झाले. 

त्याच प्रमाणे भीमा कोरेगांवचा स्तंभ हा या लढाईत मृत्यू पावलेल्या दलित सैनिकांचे (त्यात इतरही नावे आहेत) स्मारक आहे इतपत ठीक आहे. पण त्याला चातुर्वर्ण्याविरूद्धच्या लढाईचे प्रतिक बनवून जो गौरव केला गेला आणि त्यासाठी एक वैचारिक मांडणी केल्या गेली हा शुद्ध वैचारिक भ्रष्टाचार आहे. 

एल्गार परिषदेत एकावर एक चार मडके ठेवण्यात आले होते. हे म्हणजे चातुर्वण्याचे प्रतिक असे सांगण्यात आले. परिषदेची सुरवात हे मडके फोडून करण्यात आली. सर्वात वरचे मडके म्हणजे ब्राह्मण म्हणून त्यावर काठी मारताना खालची मडकी पण फुटली. म्हणजे चारही वर्णांवर आघात झाला. आता हे नेमके कशाचे प्रतिक झाले? वर्ण्य व्यवस्था नाकारायची  आपण म्हणतो ती तर तशी कायद्याने नाकारली आहेच. घटना स्विकारली तेंव्हाच हा विषय कागदोपत्री संपला.

पेशवाई विरोधात जो काही संताप व्यक्त करायचा असेल तो जरूर करावा, त्यासाठी पेशव्यांनी केलेले अपराध साधार समोर आणावेत. त्यावर वैचारिक मंथन करावे. पण त्यासोबतच सातारचेआणि कोल्हापुरचे छत्रपतीं पण त्याला जबाबदार धरावे लागतील. शाहू महाराजांचे नाव घेत पेशवाईवर आघात असला ढोंगीपणा चालणार नाही. केवळ पेशवेच नाहीत तर गायकवाड, होळकर, शिंदे, पवार हे सगळे प्रमुख सरदार/संस्थानिक यासाठी जबाबदार धरावे लागतील. 

मुळात भीमा कोरेगांव हा एक मोठा वैचारिक भ्रष्टाचार आहे. या विचारवंतांनी जो नैतिक पाठिंबा या प्रकरणाला दिला त्याचा फायदा घेत नक्षलवाद्यांनी यात घुसून हिंसाचार केला. 

रानावनातला नक्षलवाद त्यांच्या विरूद्धच्या कडक पोलिस कारवायांमुळे आटलेल्या जनसमथर्सनामुळे जेरीस आलेला होता. गेली 20 वर्षे हा नक्षलवाद शहरात शिरला फोफावला. त्याला विचारवंत लेखक पत्रकार कलाकार यांनी आश्रय दिला. ‘शहरी नक्षलवाद’ हा शब्दप्रयोग कॉंग्रेसच्याच काळात केल्या गेला. पी. चिदंबरम, शिवराज पाटील चाकुकर हे गृहमंत्री असताना त्यांची संसदेतील वक्तव्ये तपासा. या शहरी नक्षलींवर वारंवार कारवायी होत आलेली आहे. हे काही आत्ता घडले असे नाही. शाहिनबाग आंदोलनातीही नक्षलवादी सक्रिय राहिले आहेत.  देशभरात कुठेही कोणत्याही कारणाने अस्वस्थता पसरत असेल तर त्यात तेल ओतायचे काम नक्षलवादी करत आहेत. अर्बन नक्षली आपले काम शहरी भागात लिखाण, पत्रकारिता, सामाजिक चळवळी, कला या माध्यमांतून करत आहेत. याचा अतिशय बारकाईने तपास पोलिस यंत्रणा करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या आठ अर्बन नक्षलींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल होत नाहीत मग कसे काय आरोप करता? अशी ओरड करणार्‍या पुरोगाम्यांचा गळा आता बसला आहे.  

पाक धार्जिणे आतंकवादी, नक्षलवादी, चीनचे समर्थन करणारे देशविरोधी डावे आणि इतर पुरोगामी यांची सगळ्यांची मिळून तयार झालेली ‘तुकडे तुकडे गँग’ आता कायद्याच्या जाळ्यात पुरती अडकत चालली आहे. ज्या बाबासाहेबांचे नाव हे उठता बसता घेतात त्यांना बाबासाहेबांच्याच लोकशाहीवादी स्वतंत्रताप्रिय संविधानाने अडकवून टाकले आहे.     

 

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Friday, October 9, 2020

राहूल है के मानता नही !


 उरूस, 9 ऑक्टोबर 2020 

 ‘समजावून सांगितल्यावर ज्याला कळते ते मुल, समजावून सांगूनही ज्याला कळत नाही तो राहूल’ 

अशी एक  दोनोळी व्हाटसअपवर सध्या फिरत आहे. चीनप्रश्‍नावर राहूल गांधी यांनी केलेले वक्तव्य पाहून या दोनोळीचा नेमकेपणा माझ्या लक्षात आला.

एक प्रचार सभेत भाषण करताना राहूल गांधी यांनी नेहमीप्रमाणे बौद्धिकतारे तोडले. त्यांच्या बोलण्याकडे आता तसं कुणी फारसं लक्ष देत नाही. हे एक बरं आहे. पण त्यातील देशाच्या संरक्षणासंबंधी विषय गंभीर आहे म्हणून त्याची त्यादृष्टीने दखल घेणं भाग आहे. 

एक तर 1962 च्या चीन युद्धात आपल्या भूमीचा एक भाग चीनने बळकावला आहे हे विदारक कटू सत्य आहे. त्यावेळेस झालेल्या करारात जैसे थे परिस्थिती ठेवण्यात यावी असे ठरले. प्रत्यक्ष ज्याच्या ताब्यात जो प्रदेश आहे तो सध्यातरी तसाच राहिल असे ठरले. अर्थात हे अंतिम नाही. अंतिम निर्णय सवडीने ठरविण्यात येईल (यावर तज्ज्ञांनी सविस्तर लिहीलं आहे. जिज्ञासुंनी ते जरूर वाचावे). ही ताबा रेषा म्हणजेच लाईन ऑफ ऍक्चुअल कंट्रोल म्हणजेच एलएसी. यातही परत एक गुंता आहे. भारत आणि चीन यांच्या ताबा रेषात परत एक नो मेन्स लँड अशी भूमी आहे. त्या ठिकाणी दोन्ही देशांना केवळ पहारा देण्यासाठी अथवा टेहेळणीसाठी फिरण्याची गस्त घालण्याची मुभा आहे. 

पण हे काहीच राहूल गांधी यांना समजून घ्यायचे नाही. खरं तर त्यांना जाणीवपूर्वकच असा धूराळा उडवून द्यायचा आहे. चौकीदार चोर है या प्रकरणांत सर्वौच्च न्यायालयाने कान उपटल्यावरही ते सुधरायला तयार नाहीत. याचा अर्थ स्पष्टच होतो तो म्हणजे हे सर्व ठरवून ठरवूनच चालू आहे. 

आपण संविधान पाळणारे लोक आहोत. आपली घटनात्मक लोकशाही आहे. यात संसद सर्वौच्च आहे. मग हेच राहूल गांधी त्यांचे जे काही प्रश्‍न/शंका होत्या त्या घेवून आत्ता चालू असलेल्या लोकसभेच्या सत्रात का नाही सामील झाले? त्यांनी संसदेच्या पटलावर हे प्रश्‍न का नाही उपस्थित केले? कोरोना संकटकाळात सर्व खबरदारीचे उपाय घेवून कठीण परिस्थितीतही हे अधिवेशन बोलावण्यात आले होते. तेंव्हा राहूल गांधी यांची जबाबदारी होती की त्यांनी या अधिवेशनाला उपस्थित राहूल सरकारला खडे प्रश्‍न विचारायला हवे होते. पण हे नेमके त्याच काळात परदेशी पळून गेले. (मी जाणीपूर्वक असा शब्द वापरत आहे. कारण वारंवार राहूल गांधी यांनी संसद अधिवेशनांकडे पाठ फिरवली आहे. ते संसदीय लोकशाहीत विस्तृत नेमके मुद्दे उपस्थित करून प्रश्‍न विचारून सरकारला कोंडित पकडणे टाळत आले आहेत.)

आपल्या बेताल बडबडीत राहूल गांधी यांनी असेही एक विधान केले की केवळ 15 मिनीटांत चीनला उचलून 100 किमी दूर फेकणे शक्य आहे. त्यांचे सरकार असले असते तर त्यांनी फेकले असते. 

2004 ते 2014 या काळात राहूल गांधी हे 34 ते 44 वर्षे अशा प्रौढ वयात होते. शिवाय कॉंग्रेस पक्षाच्या  सर्वेसर्वा त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी याच होत्या. राहूल गांधी हे प्रत्यक्ष लोकसभेत खासदार म्हणून याच काळात निवडूनही आले होते. त्यांच्याकडे काय आणि किती अधिकार आहेत याचा पुरावा त्यांनी सगळ्या जगाला पत्रकार परिषदेत सरकारचा अध्यादेश फाडून दिला होता. मग याच राहूल गांधी यांना 2004 ते 2014 या संपूर्ण 10 वर्षांच्या कालखंडात चीनला 100 किमी दूर फेकण्यासाठीची 10 मिनीटे मिळाली नाहीत का? का त्या काळात अशी 15 मिनीटे आलीच नाहीत?

नरेंद्र मोदी या व्यक्तीवर टीका करणे ही एक वेगळी बाब आहे. पण हेच नरेंद्र मोदी जेंव्हा देशाचे पंतप्रधान असतात तेंव्हा ते एका सर्वौच्च अशा संविधानिक पदावर बसलेले असतात. अशावेळी त्यांच्यावर चीनसारख्या नाजूक संवेदनशील लष्करीदृष्ट्या अतिशय गुंतागुंतीच्या अशा आंतरराष्ट्रीय विषयावर इतकी बालीश टीका करणे योग्य आहे का? 

याबाबतीत माध्यमांची पण कमाल आहे. ही माध्यमे राहूल गांधी किंवा त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते यांना याबाबत जाब का विचारत नाहीत? देशाच्या सुरक्षेशी संबंधीत हा गंभीर प्रश्‍न आहे. ही काही केवळ राजकीय टीका म्हणून सोडून द्यायची गोष्ट नाही. 

मनाली-लदाख प्रदेशातील अतिशय महत्त्वाच्या  ‘अटल टनल’ बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात आणि नेमके तेंव्हाच अगदी बरोबर वेळ साधत राहूल गांधी हे विधान करतात. यात काही एक आंतरराष्ट्रीय कट आहे अशी शंका येत राहते. अर्थात असे कट कुमार केतकरांना आता दिसत नाहीत. त्यांना मुळात भारताने अटल टनेल बांधून आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत केली हाच एक आंतरराष्ट्रीय कट वाटू शकतो. भारत ज्या जोरकसपणे लदाख मध्ये लष्करी कारवाया सुलभ जाव्यात म्हणून सीमेवर रस्ते पुल यांची कामं करत आहे हे मुळीच रूचलेले नसणार.

या नविन बोगद्यामुळे लष्कराच्या हालचाली सुलभ गतीमान होणार आहेत. पण या सोबतच त्या भागातील नागरिक जे वर्षानुवर्षे मुख्य भूमीपासून तुटलेले होते. त्यांना संपर्काच्या अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत होते ते मुख्य भूमीशी जोडले जातील आणि भारताच्या मुख्य भूमीतील नागरिकही या प्रदेशाशी जोडले जातील. हे फार महत्वाचे आहे. राहूल गांधीं पुरेपुर मनापासून आत्तापासूनच प्रयत्न करत आहेत की 2024 च्या निवडणुकांत भाजपला 350 ते 400 जागा मिळाव्यात. राहूल गांधी यांच्या या प्रयत्नाला मनापासून शुभेच्छा. कॉंग्रेसचा अवतार संपविण्याचे जे व्रत त्यांनी हाती घेतले आहे ते लवकरात लवकर पूर्णत्वास जावो.   

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Thursday, October 8, 2020

शाहीनबाग : सर्वोच्च न्यायालयाची थप्पड कुणाच्या गालावर?


उरूस, 8 ऑक्टोबर 2020 

 7 ऑक्टोबर 2020 ला सर्वौच्च न्यायालयाने शाहिनबाग प्रकरणांत स्पष्ट निकाल देत अशा प्रकारे आंदोलन करणे संपूर्णत: चुक असल्याचे सांगितले. या निकालाने बर्‍याच जणांच्या गालावर थप्पड बसली आहे. 

15 डिसेंबर 2019 रोजी सीएए च्या विरोधात दिल्लीच्या शाहिनबाग परिसरांत मुस्लीम महिलांना समोर करून रस्ता रोको आंदोलन सुरू झाले. खरे तर या महिलांना वारंवार विचारले गेले होते की तुमच्यावर नेमका कोणता अन्याय झाला? तूम्ही हे आंदोलन कशाकरता करत आहात? याचे कुठलेही संयुक्तीक उत्तर या दादी नानी देवू शकल्या नाहीत.

वारंवार सगळे कायदेतज्ज्ञ सांगत होते की सीएए चा कुठल्याही भारतीयाच्या नागरिकत्वाशी काहीही संबंध नाही. त्यात भारतीय मुसलमानही आलेच. मुळात हे विधेयकच धार्मिक अत्याचाराला बळी पडलेल्या पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानच्या असहाय्य नागरिकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यासाठीचे आहे. कुणाचे नागरिकत्व हरण करण्यासाठी नव्हे. पण मुसलमानांचा जाणीवपूर्वक गैरसमज करून दिल्या गेला. या गैरसमजाचा अग्नी सगळ्यांनी मिळून प्रज्ज्वलीत केला. आणि दिल्लीचा एक महत्त्वाचा रस्ता 100 दिवस अडवल्या गेला. शाहिनबाग परिसरांतील दोन तीन लाख नागरिकांना त्रास झाला, या भागातील दुकाने बंद राहिली. पुढे करोना आला आणि त्यांना परत बंदीचा त्रास भोगावा लागला. अशा प्रकारे आपल्या हक्कासाठी निदर्शने करत आहोत असा आव आणत इतर नागरिकांच्या मुलभूत अशा संचार स्वातंत्र्यावर गदा आणल्या गेली.

शाहिनबागचा विषय इतकाच मर्यादीत नाही. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा भारतात दौरा होता तेंव्हा या शाहिनबागेच्या निमित्ताने देशभर दंगे उसळविण्याचा एक कट होता हे पण आता समोर आले आहे. दिल्लीत तर प्रत्यक्ष दंगे उसळलेही. त्यात 53 निरपराध नागरिकांचा बळीही गेला. आता यावर कारवाई होउन उमर खालीद, सफुरा झरगर, नताशा नरवाल, देवांगना कालीता सारख्या विद्यार्थी म्हणवून घेणार्‍यांना तुरूंगवासही झाला आहे. ताहिर हुसेन आणि खालिद सैफी हे दंग्याचे मुख्य सुत्रधारही म्हणून समोर आले आहेत.

सर्वौच्च न्यायालयाने आपल्या निकालाने या आंदोलनाचे समर्थन करणारे पुरोगामी होते त्यांच्यावरही थप्पड लगावली आहे. हे लोक आंदोलनाचे समर्थन करताना रस्ता रोको हा कसा मुलभूत आधिकार आहे असेही सांगत होते. पण याने सामान्य नागरिकांचे संचार स्वातंत्र्य धोक्यात आले हे ते लपवून ठेवत होते. इतकेच नाही तर देशभरात विविध ठिकाणी शाहिन बाग आंदोलन चालवताना मुख्य रस्ते कसे अडचणीत सापडतील अशीच योजना होती. पण प्रशासनाने ती हाणून पाडली. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथेच आंदोलन करण्यासाठी हे सर्व आग्रही होते. यांना आंदोलनासाठी पर्यायी जागा आझाद मैदानावर दिली तर लगेच एक दिवसांत आंदोलन गुंडाळून सर्व घरी बसले. 

सर्वौच्च न्यायालयाने अशा प्रकारे दुसर्‍यांच्या अधिकारावर आक्रमण करून आंदोलन करता येणार नाही हे स्पष्ट करून  पुरोगाम्यांना निरूत्तर केले आहे. पोलिस यंत्रणांना असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत की अशा प्रकारे कुठलेही आंदोलन रस्ते अडवून कुणी चालवत असेल तर त्याचा तातडीने निपटारा करा. त्यासाठी न्यायालयाच्या निर्देशाची वाट पाहू नका. पोलिसांचे हे कामच आहे. त्यासाठी कुणाच्या हुकुमाची आदेशाची वाट पहाण्याची गरज नाही. 

म्हणजे शाहिनबागचे समर्थक जे स्वत:ला संविधानवादी म्हणवून घेत होते, बाबासाहेबांच्या शपथा घेत होते, संविधान हातात घेवून या दादी नानींसमोर भाषणे करत होते त्या सगळ्यांना तुम्ही संविधानाचा अपमान करत अहात असे खडे बोल  न्यायालयाने सुनावले आहेत. 

आंदोलनाचा राजकीय पैलू जरा बाजूला ठेवू. यातील धार्मिक पैलूही जरा बाजूला ठेवू. आंदोलनाला पैसा कुणी पुरवला, या महिलांना खावू पिउ कोण घालत होते हा पण विषय खुप चर्चिला गेला आहे. पण स्वत:ला बुद्धिवान म्हणविणारे पत्रकार लेखक विचारवंत यांना कोणता विंचू चावला होता? यांच्या विचारात हे संविधान विरोधी विष कोणी पेरले? यांनी काय म्हणून या आंदोलनातील रस्ता आडविण्याचेही समर्थन केले? 

हे आंदोलन पोलिसांनी दिलेल्या जागेवर शांतपणे चालू राहिले असते तर त्याला एक नैतिक आधार तरी राहिला असता.  या निमित्ताने उपोषण केले गेले, निदर्शने झाली, काळ्या फिती लावल्या, मेणबत्या पेटवल्या तर समजून घेता आले असते. पण तसे झाले नाही. आंदोलन चालविणार्‍यांचे उद्देश काहीही असोत पण त्याला समर्थन देणार्‍यांनी आपली नैतिकता कुठे गहाण टाकली होती? 

24 मार्चला पहाटे आंदोलन स्थळ पोलिसांनी बुलडोझर फिरवून रिकामे केले. रस्ता मोकळा झाला. त्याचे फोटो जेंव्हा समाजमाध्यमांवर आले तेंव्हा तातडीने ते शेअर करत मी लिहीले होते, ‘शाहिनबाग तमाशा उठला, धन्यवाद कोरोना’. यावर मला वैयक्तिक पातळीवर प्रचंड प्रमाणात ट्रोल केल्या गेले. शिवीगाळ झाली. अगदी सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या कानावर याची तक्रार घालावी लागली. त्यातील अनोळखी अपरिचित लोकांबद्दल माझी तशी काहीच तक्रार नाही. त्यांना मी ब्लॉकही केले. पण माझ्या अगदी परिचित असलेले लेखक विचारवंत पत्रकार मित्र मैत्रिणींचे आश्चर्य वाटते. शाहिनबाग आंदोलनाने रस्ता आडवून तमाशाच केला होता यावर आता सर्वौच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले. ही मंडळी आपली बुद्धी गहाण ठेवून का बसली होती? रस्ता अडवणे हे चुक आहे. शिवाय हे आंदोलन कशासाठी? याचे कसलेच उत्तर ही बुद्धीवादी पुरोगामी मंडळी देत नव्हती. आजही देवू शकत नाहीत. सामान्य माणसांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवुन उत्तर दिले होतेच. आता न्यायालयाने अधिकृतरित्या आंदोलन चुक ठरवून याची बाजू घेणार्‍यांच्या नैतिकतेवर प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. आता मात्र हे कोणीच पुढे येवून आमचे चुकले असे म्हणणार नाहीत. कारण तेवढा वैचारिक निर्लज्जपणा यांनी अंगी बाणला आहे. 

       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Wednesday, October 7, 2020

माणकेश्वर मंदिरावरील अप्रतिम शिल्पाविष्कार


उरूस, 7 ऑक्टोबर 2020 

 महाराष्ट्रातील अगदी प्राचीन उत्तम शिल्पाविष्कारांनी नटलेली मंदिरे मोजायची झाल्यास एका हताची पाच बोटेही पुरेशी आहेत. अंबरनाथ बदलापुरचे शिवमंदिर, खिद्रापुरचे कोपेश्वर मंदिर, औंढ्याचे नागनाथ मंदिर, अन्व्याचे मंदिर आणि पाचवे नाव घ्यावे लागते ते माणकेश्वर (ता. परंडा  जि. उस्मानाबाद) च्या मंदिराचेच.हीच नावं का घ्यायची तर या मंदिरांच्या बाह्य भिंतींवरील (जंघा) अप्रतिम असा शिल्पाविष्कार. आणि दुसरं म्हणजे यांचे प्राचीनत्व. 

माणकेश्वर मंदिर बाराव्या शतकांतील आहे. औरंगाबाद उस्मानाबाद रस्त्यावर कुंथलगिरीपासून उजव्या हाताच्या रस्त्याला वळलो की डोंगररांगांतून एक छानसा रस्ता जातो. टेकड्या हिरवळ तळे असा निसर्गसुंदर परिसर. या रस्त्याने भूम पर्यंत गेल्यावर तेथून 11 किमी दक्षिणेला माणकेश्वर गाव आहे. विश्वकर्मा नदीच्या चंद्राकृती वळणावरची नयनरम्य जागा शोधून या मंदिराची उभारणी केल्या गेली आहे.


एका उंचपीठावर तारकाकृती अशी मंदिराची रचना आहे. पायर्‍या चढून मुखमंडपाकडे गेल्यावर तेथून संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा पथ आहे. मंदिराच्या मुखमंडपातून आत शिरल्यावर मुख्यमंडप लागतो. त्याच्या मध्याशी चौकोनी अशी रंगशीळा आहे. या मंडपाला 20 सुंदर स्तंभांनी तोलले आहे. यातील चार प्रमुख स्तंभांवर अप्रतिम असे कोरीवकाम आढळते. होयसळेश्वर मंदिरावर आढळून येणारे अतिशय बारीक असे कोरीवकाम या स्तंभांवर आहे. सोन्याच्या बांगड्यांवर ज्या पद्धतीने नक्षीकाम केलेले आजकाल दिसून येते त्याचे नमुने माणकेश्वर मंदिरावरच्या खांबांवर आढळून येतात. यातील  नक्षीकामात कोरलेले मणी तर इतके बारीक आणि सुंदर आहेत ते दगडाचे आहेत म्हणून नसता मोत्याचेच वाटावेत असे सुबक आणि सुंदर आहेत. 


माणकेश्वर मंदिराचे सगळ्यात मोठे आणि वेगळेपण त्याच्या गर्भगृहाच्या द्वारशाखेत आहे. डॉ. गो.ब.देगलुरकरांसारख्या अभ्यासकांने हे वेगळेपण नोंदवून ठेवले आहे. गर्भगृहाच्या चौकटीवर कोरीवकाम केलेली पट्टी असते. ही सहसा तीन किंवा चार या प्रमाणात असते. म्हणजे एक पट्टी फुलांची नक्षीची, त्यामागे दुसरी पट्टी पानांची, तिसरी पट्टी नृत्य करणार्‍या स्त्री पुरूषांची. पण हे एकमेव असे मंदिर महाराष्ट्रात आढळले आहे जिथे एक दोन नव्हे तर सात द्वारशाखा आहेत. 

मंदिराचा बाह्यभाग अप्रतिम अशा सुरसुंदरींच्या शिल्पांनी व इतर देवतांच्या शिल्पांनी नटलेला आहे. सगळ्यात खालचा नक्षीचा थर हा गजथर आहे. याच्यावरती नरथर म्हणजेच स्त्री पुरूषांचा गायन वादन करणार्‍यांचा आहे. 


मंदिरावर बाह्य भागात एकूण 109 सुंदर मुर्ती आहेत. आतील मुर्तींची संख्या गृहीत धरल्यास एकूण 347 मुर्ती अभ्यासकांनी नोंदवल्या आहेत. वीणा वादन करणारी सरस्वती, बासरी वाजविणारा कृष्ण, मृदंग वाजविणारी सुंदरी, चतुर्भज दोन हातात घंटा असलेली नृत्य मुर्ती, तंतुवाद्य वाजविणारी सुंदरी, डमरुधारी शिव असे संगीतविषयक संदर्भ असलेली शिल्पे या मंदिराचे वैशिष्ट्य मानले जातात. केवल शिव, ऐरावतधारी इंद्र, ब्रह्मदेव, लक्ष्मी या मुर्तीही मंदिराचे वैशिष्ट्य आहे. हरिहर म्हणजेच विष्णु आणि शिव यांची संयुक्त मुर्ती. अशी मुर्ती माणकेश्वर मंदिरावर आढळून आली आहे.


मंदिराच्या समोर एका मंडपाचा चौथरा दिसून येतो. त्यावरचा अप्रतिम असा गजथर अजूनही शाबुत आहे. पण बाकी मंडप कोसळलेला आहे. इथे सध्या एक नंदी ठेवलेला आढळतो. मंदिराला मकरप्रणाल (गाभार्‍यातील अभिषेकाचे पाणी बाहेर जाण्याची जागा) आहे. त्यावर दोन निष्कर्ष निघतात. एक तर या मंदिराचा कालाखंड मध्ययुगाच्या मागे जातो. दुसरं म्हणजे हे शिव मंदिर नसून विष्णु मंदिर असण्याची जास्त शक्यता आहे. कारण शिवमंदिराला गोमुख असते. (अर्थात या सगळ्यांना अपवाद आहेत. यावर विविध तज्ज्ञांनी आपली मते नोंदवून ठेवली आहेत.) 


अणदुरच्या शिलालेखात या मंदिराला अनुदान दिल्याचा संदर्भ सापडलेला आहे. त्यावरून याचा कालखंड 12 व्या शतकातला असल्याचे सिद्ध होते. 

मंदिर त्रिदल पद्धतीचे (तीन गर्भगृह असलेले) आहे. ही पद्धत मराठवाड्यात मंदिर शैलीतील विकसित अशा कालखंडातील मानली जाते. 

या सुंदर प्राचीन अद्वितीय शिल्पसौंदर्याने नटलेल्या मंदिराच्या बाजूलाच नविन झालेले सटवाईचे मंदिर आहे. इथे लहान मुलाचे जावळं काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. मंदिराच्या परिसरांतच बोकड कापल्या जातो. सगळा परिसर त्याने अस्वच्छ होतो. माणकेश्वर मंदिराच्या परिसरांत प्राचीन मुर्तींचे अवशेष आढळून येतात. मंदिरासमोरचा सभामंडप आहे तेथे मोठा शिल्पाविष्कार एकेकाळी असावा. त्याचे अवशेष अजूनही आजूबाजूला सापडतात. तेंव्हा हा सगळा परिसर संरक्षीत करण्याची नितांत गरज आहे.

बाजूच्या सटवाई मंदिराला वेगळी संरक्षक भिंत करून त्याचा परिसर वेगळा केला पाहिजे. नदीच्या काठावर सुंदरसा घाट बांधून या परिसराला रम्य बनवता येईल. आम्ही जेंव्हा सुदाम पाटील, सरपंच विशाल अंधारे,  भाजप जिल्हाध्यक्ष माझे मित्र नितीन काळे  या प्रतिष्ठीत लोकांशी बोललो तेंव्हा त्यांनी यासाठी अनुकुलता दाखवली. अशी पुरातन मंदिरे हा फार मोठा ऐतिहासिक मोलाचा ठेवा आहे. तो आपण जतन करायला पाहिजे. अशी मंदिरे आज बांधता येत नाहीत. तर निदान त्यांचे जतन तरी काळजीपूर्वक केले पाहिजे.

(या लिखाणासाठी माया पाटील शहापुरकर, डाॅ. गो.ब. देगलुरकर, डाॅ. प्रभाकर देव यांच्या पुस्तकांतून संदर्भ घेतले आहेत. त्यांचे आभार)

(छायाचित्रे सौजन्य Akvin Tourism) 

    

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Monday, October 5, 2020

सिमेंटने गिळले अंभईचे प्राचीन मंदिर


उरूस, 5 ऑक्टोबर 2020 

जून्या मंदिरांबाबत दोन मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. एक तर उद्ध्वस्त प्राचीन मंदिरांचे अवशेष इततस्त: विखुरलेले असतात. यातील काही दगड लोकांनी सरळ उचलून नेले आणि त्यांचा वापर घरगुती कामांसाठी (धुणे धुण्यासाठी) केला किंवा बिनधास्तपणे बांधकामांसाठी त्यांचा वापर केलेला दिसून येतो. तर काही ठिकाणचे दगड दुसर्‍याच मंदिराच्या बांधकामासाठी वापरले (बीडच्या कंकालेश्वराचे मोठे ठळक उदाहरण आहे).

दुसरी विचित्र अडचण अशी आहे की जिर्णोद्धार करण्याच्या नावाखाली अशा मंदिरांची नविन पद्धतीने सिमेंट वीटांत बांधणी केली जाते. त्यात पुरातन अवशेष नष्ट होतात. त्यांची हेळसांड होते. सौंदर्यदृष्ट्याही हा जोड विजोडच ठरतो. महत्त्वाचे म्हणजे मंदिरांवरची नक्षी छोटी शिल्पे त्या द्वारे सांगितलेली गोष्ट त्यातील गुढ अर्थ याची अपरिमित हानी होते. काही ठिकाणी जून्या दगडी मंदिराला रंग/वॉर्निश फासून विद्रूपता आणली गेली आहे. 

अंभई (ता. सिल्लोड. जि. औरंगाबाद) येथील प्राचीन वडेश्वर शिव मंदिराबाबत दुसर्‍या प्रकारची अडचण आहे. 

डॉ. देगलुरकर, डॉ. प्रभाकर देव सारख्या विद्वानांनी या प्राचीन मंदिराचे महत्त्व आपल्या ग्रंथांत संशोधन प्रकल्पांत नमुद केले आहे. यावर सविस्तर लिहून ठेवले आहे. हे मंदिर बहुतांश उद्ध्वस्त झाले होते. मुळ पाया मातीत बुजून गेलेला होता. मुखमंडप आणि मुख्य मंडप कधीच नष्ट झाले होते. तिन गर्भगृहे आणि त्यांच्या बाह्य भिंती तेवढ्या शाबुत होत्या. शिखरेही ढासळलेली होती. गावकर्‍यांनी मंदिराचा जिर्णाद्धार करताना सिमेंटचे बंदिस्त सभागृह समोर बांधले. त्यांचा हेतू आणि तळमळ गैर नव्हती. पण त्यामुळे मंदिराचे मुळ रूपच नष्ट झाले. 

मराठवाड्यात एक गर्भगृह असलेली मंदिरे अकराव्या शतकातील अगदी मोजकीच अशी आहेत. त्यानंतर तिन गर्भगृह असलेली त्रिदल मंदिर शैली विकसीत झाली. अशा दुर्मिळ प्राचीन मंदिरापैकी एक म्हणजे वडेश्वरचे हे शिव मंदिर. 


मंदिराच्या तिन्ही गर्भगृहांवर अप्रतिम असे कोरीव काम आहे. मुख्य गर्भगृहात महादेवाची पिंड आहे. चार पद्धतीच्या द्वारशाखा आढळून येतात. मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर किर्तीमुख आहे. ललाटबिंबावर गणेशाची मुर्ती कोरलेली आहे. चालुक्य शैलीचे या गर्भगृहाचे छत आहे. गर्भगृहाच्या अंतराळात देवकोष्टके आहेत. (अंतराळ म्हणजे मुख्य मंडप आणि गर्भगृह यांना जोडणारी जागा.) यात ब्राह्मी, सरस्वती, वैष्णवी यांच्या मुर्ती आहेत. हे मंदिर बाराव्या शतकातील आहे. 


डॉ. देगलुरकरांनी यातील एका विष्णु मुर्तीचा विशेष असा उल्लेख केला आहे. विष्णुची जी विविध नावे आहेत त्याप्रमाणे त्या त्या पद्धतीच्या मुर्ती मंदिरावर कोरलेल्या असतात. यातील उपेंद्र नावाने ओळखली जाणारी अतिशय दुर्मिळ अशी मुर्ती या मंदिरावर आढळून आली आहे. मुख्य गर्भगृहाच्या ललाटबिंबाच्या वर मध्यभागी ही उपेंद्र विष्णुची मुर्ती आहे. उपेंद्र मुर्तीची वैशिष्ट्य म्हणजे वरच्या उजव्या हातात गदा, खालचा उजवा हात वरदमुद्रेत, वरच्या डाव्या हातात चक्र आणि खालच्या डाव्या हातात पद्म असते. 


या मंदिरातील काही मिथून शिल्पे परिसरात मातीत पडली आहेत. मुख्यमंडपाचे काही अवशेषही तसेच इतस्तत: विखुरले आहेत. मुख्य गर्भगृहासमोर नंदी नाही. तो मंदिराबाहेर एका वेगळ्याच चौथर्‍यावर दिसतो आहे. लक्षात असे येते की हे मंदिर मुलत: शिवाचे असण्याची शक्यता नाही. ते देवीचे असावे किंवा विष्णुचे. (असे बहुतांश मंदिरांच्या बाबत झाले आहे. आक्रमणाच्या भितीने मुख्य मुर्ती हलवल्या गेली. कालांतराने तेथे घडविण्यास सोपी असलेली महादेवाची पिंड बसविण्यात आली.)   


मंदिराचा परिसर गावकर्‍यांनी स्वच्छ ठेवला आहे. मंदिरासमोर आणि बाजूला पेव्हर्स ब्लॉक बसवून त्यांनी जमिन समतल केली आहे. पण मागचा भाग व आपण प्रवेश करतो त्याची विरूद्ध बाजू मात्र अजूनही खराबच आहे. त्याच ठिकाणी शिल्पं विखुरलेली आहेत. 


जून्या मंदिरांचे जतन चांगल्या पद्धतीने कसे करता येवू शकते याचे तीन नमुने याच मराठवाड्यात समोर आहेत. अन्वा  (ता. भोकरदन जि. जालना) येथील मंदिराचा जिर्णोद्धार पुरातत्त्व विभागाने चांगल्या पद्धतीने केला आहे. सर्व परिसरांत दगडी फरशी बसवली आहे. आधारासाठी लोखंडी खांब उभे केले आहेत. निखळलेले दगड नीट बसवले आहेत. जिथले दगड सापडत नाहीत तिथे त्याच आकारात नविन दगड तासून बसवलेले आहेत. (पुरातत्त्व खात्यानेच गडचिरोली येथील मार्कंडा मंदिराचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालविले आहे. अंबाजोगाई जवळ धर्मापुरी येथील मंदिराचे कामही याच खात्याने चांगले केले आहे.)

दुसरे अतिशय चांगले काम इंटॅक्ट या देश पातळीवरील नावाजलेल्या संस्थेने होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथे केले आहेत. दोन मंदिरांचा जिर्णोद्धार अतिशय शास्त्रीय पद्धतीने एक एक दगड हुडकून त्याची जागा शोधून तिथे तो बसवून करून दाखवला आहे. 

तिसरे काम जामखेड (ता. अंबड, जि. जालना) येथील खडकेश्वर शिव मंदिराबाबत गावकर्‍यांनी करून दाखवले आहे. साध्या दगडी घोटीव दगडांव बाह्य भिंत उभारून मंदिर सावरून धरले आहे. 

कुठल्याही जून्या मंदिराचे काम करावयाचे असल्यास कृपया त्या विषयातील तज्ज्ञांना विचारून करा. सिमेंट वीटांचा वापर करून रसायनिक रंग दगडांना फासुन विद्रुप करू नका. काहीच जमणार नसेल तर जसे आहे तसेच ठेवून किमान जागेची स्वच्छता आणि जवळपास विखुरलेले दगड शिल्पं एका ठिकाणी आणून ठेवले तरी पुरे. जनावरे येवू नयेत म्हणून जागेला संरक्षक असे तारेचे कुंपण घालण्यात यावे. तातडीने इतके तरी काम करा. शिवाय गावात इतरत्र आढळून येणारी शिल्पे कोरीव दगड मंदिर परिसरांत आणून ठेवा. 

दृश्य स्वरूपात जी मंदिरे किमान अस्तित्वात आहेत ज्यांचा अभ्यास झाला आहे अशा 11 व्या ते 14 व्या शतकांतील महाराष्ट्रातील 93 मंदिरांची यादी डॉ. गो.ब. देगलुरकरांनी आपल्या ग्रंथात दिली आहे. या शिवाय मराठवाड्यातील अगदी किमान अवशेष सापडले अशी ठिकाणे शोधून त्यांची एक यादी डॉ. प्रभाकर देव यांनी दिली आहे. अशी 114 ठिकाणं/ मंदिरे आहेत. आपआपल्या गावांत अशी पुरातन मंदिरे अवशेष कोरीव दगड वीरगळ, सतीचे दगड काही आढळूनआले तर आम्हाला जरूर कळवा. त्यांची छायाचित्रे पाठवा. संपूर्ण महाराष्ट्रातील मंदिरांचा कोश तयार करण्याची गरज आहे. या कामासाठी सहकार्य करण्याचे विविध संस्था/ व्यक्तींनी मान्य केले आहे. त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू या. हे काम संपूर्ण महाराष्ट्रात करावयाचे आहे. माझ्या स्वत:च्या मर्यादांमुळे सध्या मी मराठवाड्यात फिरतो आहे. पण तशी प्रदेशाची मर्यादा या कामाला नाही.    

(छायाचित्र सौजन्य Akvin Tourism)

    

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Saturday, October 3, 2020

बाबरा प्राण तळमळला -भाग २


 उरूस, 3 ऑक्टोबर 2020 

 30 सप्टेंबरला सीबीआय विशेष न्यायालयाचा निकाल आला. बाबरी मस्जिद पाडण्याचा कट रचला होता का? हे शोधण्यासाठी हा खटला होता. एकूण 48 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. बाळासाहेब ठाकरेंसह इतर 15 आरोपी आता हयात नाहीत. जिवित असलेल्या 32 जणांवर हा खटला चालू होता. या सर्वांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. आणि नेमके हेच बहुतांश पुरोगाम्यांना आवडले नाही. त्यांच्या मनासारखा न्याय आला नाही म्हणून लगेच छाती बडवून देशात आणिबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वधर्मसमभाव आता संपून गेला आहे. काळेकुट्ट पर्व देशाच्या इतिहासात चालू झाले आहे. आता एका धर्माचीच हुकुमशाही प्रस्थापित होणार वगैरे वगैरे बडबड नेहमीप्रमाणे सुरू झाली आहे.

5 ऑगस्टला राम मंदिराचे भुमीपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल तेंव्हा खा.असदुद्दीन ओवैसी यांनी सेक्युलर देशाचा पंतप्रधान मंदिराच्या भुमिपुजनाला जातोच कसा म्हणून मुक्ताफळे उधळले होती. त्यावर ‘बाबरा प्राण तळमळला’ असा एक लेख मी लिहीला होता. आता त्याच लेखाचा हा दुसरा भाग म्हणावा लागेल. 

पुरोगामी का तळमळत आहेत? मुळात खटला हा बाबरी मस्जिद कुणी पाडली यासाठी नव्हता. कायदेतज्ज्ञांनी पण असा निर्वाळा दिला आहे की मुख्य खटला निकालात निघाल्यानंतर या खटल्याला तसा काहीच अर्थ शिल्लक राहिला नव्हता. कट सिद्ध करणारे पुरावे समोर आले नाहीत तेंव्हा न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. आता ओरड करणारे पुरोगामी असे म्हणत आहेत जर सगळेच निर्दोष असतील तर बाबरी काय आपोआप पडली का? 

सत्य सगळ्यांनाच माहित आहे. हजारो वर्षांपासून आपली मंदिरे मुर्त्या यांचा नाश हिंदू समाज सहन करत आला आहे. त्याचा एक संताप त्याच्या मनात साठलेला होता. त्याची एक प्रतिक्रिया म्हणून राम जन्मभुमीचे आंदोलन उभे राहिले. तो खटला लवकरात लवकर निकाली निघाला असता तर हा विषय इतका देशव्यापी झालाच नसता. पण तेंव्हाच्या सरकारांनी आणि आपल्या न्यायव्यवस्थेने यात सातत्याने चालढकल केली. याचा परिणाम म्हणजे सहिष्णू असलेल्या हिंदूंचा कडेलोट झाला व 6 डिसेंबर 1992 ला बाबरी पडली. 

इतिहासातील एक उदाहरण या संदर्भात पाहण्यासारखे आहे. शिवाजी महाराजांच्या काळात परिस्थिती अतिशय प्रतिकुल होती. राज्य करणारे जुलमी मुसलमान राज्यकर्ते तर सोडाच पण स्वकीय असलेले वतनदारही सामान्य रयतेला लुटत होते.  अतिशय वाईट असा तो काळ होता. शिवाजी महाराजांनी शर्थीने स्वराज्य निर्माण केले. पण महाराजांनाही आपली कोंडी केल्या गेल्याचे पाहून सुरतेवर हल्ला करावा लागला. खरे तर त्या काळातील नियम असा होता की जी जहागीर स्त्रीच्या नावाने असते त्यावर कुणीच हल्ला करायचा नाही. याच कारणाने जिजाउ मांसाहेब या शिवनेरी किल्ल्यावर बाळंतपणासाठी जावून राहिल्या होत्या. कारण ती जहागीर त्यांच्या नावाने होती. त्यामुळे आपण सुरक्षीत असू याची त्यांना खात्री होती. तसेच सुरत ही औरंगजेबाच्या बहिणीच्या नावाने असलेली जहागीर होती. तेंव्हा त्यावर आक्रमण होणार नाही याची सर्वांना खात्री होती. पुढे अशीच स्थिती अहिल्याबाई होळकरांची होती. महेश्वर ही त्यांच्या सासुच्या नावाने असलेली जहागीर. म्हणून त्यांनी आपली राजधानी महेश्वर बनवली.

शिवाजी महाराजांनी नियम मोडून सुरतेवर हल्ला केला. महाराष्ट्राबाहेरच्या कितीतरी इतिहास लेखकांनी शिवाजी महाराजांना लुटारू संबोधले होते. अगदी पंडित नेहरूंच्या पुस्तकांतील संदर्भ पण तपासून पहा. पण महाराजांच्या सुरत लुटीचा अर्थ आपण काय लावतो? ही कृती नियम मोडून त्यांना का करावी लागली?

बाबरी पाडणे ही कृती हिंदूंनी हजारो वर्षांच्या संतापातून उत्स्फुर्तपणे केली होती. तेही पन्नास वर्षे त्या खटल्याचा निकाल लागत नाही म्हणून केली होती. आणि हे जागा रामजन्मभुमी होती म्हणून त्यावरचे बाबराचे अतिक्रमण लोकांनी पाडले. कुठली मस्जिद स्वत:च्या जागेवर उभी असलेली कधीच पाडली नाही. एकही दाखला नाही की मुळ मस्जिद पाडून मंदिर उभे केल्याचा. पण हे समजून न घेता आजही त्यावर आगपाखड करण्यात पुरोगामी धन्यता मानतात.

ज्यांच्यावर आरोप दाखल करण्यात आले ते केवळ हिंदूंच्या या भावनेला शब्दरूप देत होते इतकेच. पण मुळात ही भावना निर्माणच का झाली? बाबरी मस्जिद पाडल्यानंतर इतर कुठल्या मस्जिदीला धक्का दिला का? 

ज्या गुजरात दंगलीं बाबत वारंवार ओरड आजही पुरोगामी करतात ते आधी साबरमती एक्स्प्रेस जाळली ते का सांगत नाहीत? हे केवळ भारतातच घडले असे नाही. बामियानाच्या अप्रतिम उत्तुंग बुद्धमुर्ती पाडण्यात आल्या. तालिबान्यांच्या या कृत्याबद्दल कुठलाही पुरोगामी का काही बोलत नाही?

अजून एक दुसरा संदर्भ सावरकरांचा देता येईल. गांधी हत्या कटात सावरकरांन गोवण्यात आले. तसा रितसर खटला दाखल झाला. त्यातून सावरकर निर्दोष सुटले. आता ज्यांना सावरकर दोषी आहेतच असा विश्वास होता त्यांनी या खटल्यावर वरच्या न्यायालयात का अपील केले नाही? पण तसे न करता केवळ सावरकरांवर शिंतोडे उडविण्यात आजही पुरोगामी धन्यता मानतात.

गांधी हत्येच्या कटाची माहिती सरकारला होती का? याची चौकशी करण्यासाठी कपुर आयोग नेमण्यात आला. या कपुर आयोगाचे संशोधन करून अशी माहिती सरकारला नव्हती हे सत्य समोर आणले. खरं तर आयोगाची व्याप्ती केवळ कटाची माहिती सरकारला आहे का? याचे संशोधन करण्यापुरतीच होती. पण कपुर आयोगाने कारण नसताना आपल्या अहवालात सावरकरांवर काही परिच्छेद लिहीले. आणि त्याचाच आधार घेवून ए.जी.नुरानी सारखे लेखक सावरकर दोषी आहेतच असा हट्ट आपल्याा लिखाणातून करायला लागले. आजही बहुतांश पुरोगामी नुरानींच्या पुस्तकाचा संदर्भ देत सावरकर दोषीच आहेत असा आग्रही दावा करतात. वस्तूत: सावरकर दोषी आहेत का नाहीत याचा निर्वाळा न्यायालयात झाला होता. पण तो मानायचाच नाही असा एक पुरोगामी खाक्या आहे.

आज कपुर आयोगाच्या ऐवजी सीबीआय न्यायालय आले आहे. (बाबरी मस्जिद प्रकरणी एक लिबरहम आयोग स्थापन झाला होता. त्याने १९ वर्ष लावले अहवाल सादर करायला). कपुर आयोगा सारखे आपल्या कक्षेबाहेरचा विषय घेवून त्यावर टिपणी न्यायालयाने केलेली नाही. उलट सर्व आरोपींना निर्दोष सोडून खटला निकाली काढला आहे. पण त्यावर समाधान न मानता उच्च न्यायालयात जाणार असल्याचे फिर्यादींनी सांगितले आहे. म्हणजे याचाच अर्थ हा विषय यांनाच जिवंत ठेवायचा आहे.

विरोधक असेच बिनमहत्त्वाचे मुद्दे उगाळत राहिले तर त्याचा फायदा परत भाजपला  होणार आहे. काहीच न बोलता भाजपला त्यांचा हिंदूत्वाचा मुद्दा पुढे चालवता येणार आहे. भाउ तोरसेकर म्हणतात तसे मोदींच्या जाळ्यात विरोधक आपणहुन फसत आहेत. त्याला कोण काय करणार?

ने मजसी ने परत सत्ता भुमीला 

बाबरा प्राण तळमळला 

हे गीत गात कॉंग्रेस सारखे विरोधक तळमळत राहताना दिसत आहेत.     

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Friday, October 2, 2020

गावकर्‍यांनी जिर्णाद्धार केलेले प्राचीन शिवमंदिर जामखेड (ता. अंबड जि. जालना)


 उरूस, 2 ऑक्टोबर 2020 

 हजार वर्षांचे एक प्राचीन शिवमंदिर जामखेड (ता. अंबड जि. जालना) या गावात आहे. एकेकाळी बाहेरून पूर्णत: ढासळलेले हे मंदिर गाभारा, गर्भगृह, मुखमंडप व 20 कोरीव खांब असे संपूर्ण सुरक्षीत होते. परिसरांत बाभळी व काटेरी झुडूपे वाढली होती. मंदिराला अर्धचंद्राकार वेढा घातलेली घामवती नदी सहसा कोरडीच असायची. गावकर्‍यांनी या परिसराची स्वच्छता व मंदिराची दुरूस्ती करण्याचे मनावर घेतले. आज हे मंदिर अतिशय चांगल्या अवस्थेत उभे आहे. सर्व परिसर समतल करण्यात आला आहे. मंदिरासमोर पिंपळाचे मोठे झाड आहे. त्याची सावली संपूर्ण परिसराला आल्हाददायक बनविते. 

जामखेडचे हे शिवमंदिर खडकेश्वर महादेव म्हणून ओळखले जाते. जामखेड या गावाबद्दल पौराणिक आख्यायिका आहे. जाबुवंत आणि हनुमानाची लढाई याच गावात झाल्याचे सांगितले जाते. गावजवळच्या टेकडीवर जाबुवंताचे मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे डोंगरातील कपारीत कोरलेली एक गुहाच आहे. इथे लेणी कोरण्याचा प्रयास झाला होता. पण दगड ठिसुळ असल्याने हे काम अर्धवट सोडण्यात आले. याच जागी आता जांबुवंताचे मंदिर आहे. या परिसरांतील 12 गावांमध्ये हनुमानाचे मंदिर आढळत नाही. नसता मारूतीचे मंदिर नाही असे एकही गाव नसते. पण हा परिसर याला अपवाद आहे. जांबुवंत व हनुमानाच्या लढाईत जाबुवंताचा घाम गळाला म्हणून या गावच्या नदीचे नावच ‘घामवती’ असे आहे. 

याच घामवती नदीच्या काठावर खडकेश्वर महादेवाचे हे प्राचीन मंदिर उभे आहे. या गावात नदीला पाणी आले असे म्हणत नाहीत. तर घाम आला असे म्हणतात. 

मराठवाड्यात अकराव्या शतकांतील आठ मंदिरे नोंदवल्या गेली आहेत. खडकेश्वराचे मंदिर हे त्यातीलच एक. (याच ब्लॉगमधील पूर्वीच्या लेखात अशा मंदिरांची यादीच दिली आहे.) मूळचे मंदिर भक्कम उंच चौथर्‍यावर बांधल्या गेले असावे. आज हा चौथरा मातीत बुजला असून जमिन सपाटीवर आता मंदिराचा मुखमंडप आलेला आहे. 

मुखमंडपाला चार देखणे कोरीव अर्धस्तंभ आहेत. हे स्तंभ चार फुट भिंतीवर उभारलेले असून त्यांनी छत तोलून धरले आहे. मंडपालाआठ कोरीव स्तंभ असून अष्टकोनी रंगपीठावर हा मंडप उभा आहे. या स्तंभांवर सुंदर असे कोरीव शिल्पकाम केले आहे. हत्तीवर बसून लढणार्‍या स्त्रीयोद्धा, शेषशायी विष्णू,  नृत्यांगना अगदी हनुमान व जांबुवंत यांच्या लढाईचे पण शिल्प या स्तंभांवर कोरलेले आहे. मंदिराला एकूण 20 नक्षीदार स्तंभ आहेत. 


मंदिराच्या बाह्य अंगावर अप्रतिम असे शिल्पकाम असावे असा अंदाज आहे. कारण मुखमंडपाच्या बाहेरच्या भागातील काही शिल्पे आजही चांगल्या अवस्थेत दिसून येतात. बाहेरचा भाग संपूर्णच ढासळलेला होता. तेंव्हा तो घडीव दगडांनी लिंपून घेत बाह्य भिंत उभारल्या गेली आहे. तेंव्हा आता इथे एकही शिल्प दिसत नाही. 

मंदिराला मुख्य गर्भगृह आणि दोन उपगृहे वाटाव्यात अशा रचना आढळून येतात. डॉ. प्रभाकर देव यांनी आपल्या पुस्तकांत असे नोंदवले आहे की 11 व्या शतकांतील मंदिर शैली विकसित पावून 12 व्या शतकांत त्रिदल पद्धतीची मंदिरे मराठवाड्यात उभारल्या जावू लागली. हा जो मंदिर शैलीचा सांधा आहे त्याचा पुरावा या जामखेडच्या मंदिरात आढळून येतो. एकल गर्भगृह असलेले अन्वा (ता. भोकरदन जि. जालना) आणि त्रिदल पद्धतीतील आता उद्ध्वस्त असलेले केसापुरी (ता. माजलगांव, जि. बीड) या दोन मदिरांच्या अंतराच्या दृष्टीने अगदी मध्ये खडकेश्वर महादेव मंदिर आहे. आणि नेमके शैलीच्या दृष्टीनेही हे मंदिर मध्यभागी आहे. हा एक विलक्षण योगायोग आहे. 

खडकेश्वर मंदिराच्या गर्भगृहाला चार द्वारशाखा आहेत. या द्वारशाखांच्या पायाशी शैव द्वारपाल आहेत. मंदिरातील देवकोष्टकांत एका ठिकाणी गणेशाची मुर्ती आहे. दुसर्‍यात विष्णुची वराह अवतारातील मुर्ती आहे. उमा महेश्वराची पण मुर्ती आढळून येते. 


मंदिराच्या बाहेर परिसरांत दोन भग्न मुर्ती आणि भव्य नंदीचे अवशेष आढळून येतात. हे जर मंदिरातील असतील तर मुळ मंदिर अतिशय भव्य असावे असा अंदाज बांधावा लागतो. सध्या जो नंदी आहे तो लहान आहे. नंदीला स्वतंत्र असा मंडप आहे. या मंडपाचेही छत ढासळले होते. गावकर्‍यांनी मंदिर दुरूस्त करताना नंदी मंडपाचेही छत दुरूस्त केले. चार खांबांवर हा छोटासा देखणा नंदीमंडप मंदिराच्या समोर उभारलेला आहे. खडकेश्वर मंदिर पश्चिममुखी आहे.


या परिसरांत पर्णकुटी बांधून सच्चीदानंद श्रीधर स्वामी कावसानकर (नाना काका महाराज) यांनी वास्तव्य केले. शिवस्वरूप वैकुंठवासी विनोदबाबा दाणे यांनीही या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम मनावर घेतले. या दोन सत्पुरूषांची प्रेरणा मिळाल्यावर गावकर्‍यांनी उत्साहाने कामाला सुरवात केली.  


गावकर्‍यांची या मंदिरावर श्रद्धा असल्याने त्यांनी उत्स्फुर्तपणे वर्गणी गोळा करून मंदिराचा जिर्णाद्धार केला. दगडूअप्पा सांगोळे आणि अशोक जाधव यांच्यासारखी मंडळी आजही तळमळीने मंदिरासाठी झटत आहेत. या मंदिराची नोंद पुरातत्त्व विभागाकडे आहे. पण कुठलाही निधी याला मिळालेला नाही. एकीकडे आपल्याकडे प्राचीन मंदिरांची दूरावस्था आढळून येते आणि दुसरीकडे जामखेडची मंडळी स्वयंस्फुर्तपणे काम करत आहेत तर त्याकडेही आपण लक्ष द्यायला तयार नाहीत. ही एक शोकांतिकाच आहे. 

जामखेडच्या खडकेश्वर महादेव मंदिराकडे अभ्यासकांचे लक्ष्य जाण्याची गरज आहे. यातील शिल्पांवर अजून बारकाईने अभ्यास व्हायला हवा. डॉ. प्रभाकर देव, डॉ. देगलुरकर, डॉ. अरूणचंद्र पाठक यांनी मंदिराची दखल आपल्या पुस्तकांत घेतली आहे. त्यामुळेच या मंदिराचे महत्त्व समोर आले. मंदिर परिसरांत उत्खनन केल्यास मंदिराचा विस्तारीत पाया सापडू शकतो. मंदिर एका उंच चौथर्‍यावर उभे असण्याची शक्यता आहे. संपूर्ण उत्खनन झाल्यास मंदिराचा तलविन्यास संपूर्णपणे लक्षात येईल. हे मंदिर अगदी प्राचीन मंदिरांपैकी एक असल्याने त्याचे महत्त्व फार मोठे आहे.

औरंगाबाद बीड रस्त्यावर अडूळच्या अलीकडे जामखेडकडे जाणारा फाटा फुटतो. मुख्य रस्त्यापासून आत वळल्यावर अगदी चार किमी अंतरावर हे गाव आहे. गावापर्यंत अगदी चांगला रस्ता आता तयार झाला आहे. मंदिर स्थापत्याच्या अभ्यासकांनी, इतिहासप्रेमींनी, हौशी पर्यटकांनी या मंदिराला जरूर भेट द्यावी. आतापर्यंत कुणाच्या लक्षात आले नसेल असे काही पैलू समोर आणावेत.

(जामखेड मंदिरा संबंधी काही माहिती हवी असल्यास अशोक जाधव 9763892727 यांच्याशी संपर्क करावा.)

(देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्राचीन मंदिरे मुर्ती वास्तू समाध्या मकबरे गढी वाडे यांच्या संवर्धन जतन संरक्षणासाठी अभियान राबविले जात आहे. आपल्या गावच्या अशा स्थळांबाबत माहिती आमच्यापर्यंत पोचवा. आमच्या अभियानात आपण सहभागी व्हा आणि आपल्याही गावच्या अशा कामासाठी आम्हाला सांगा.) (छायाचित्र सौजन्य Akvin Tourism)

            श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575