Wednesday, September 30, 2020

मुस्लीम महानुभाव संत शहामुनींची दुर्लक्षीत समाधी


उरूस, 30 सप्टेंबर 2020 

भारतीय संस्कृती ही एक खरेच अजब असे मिश्रण आहे. आपला जन्म कुठे/ कुठल्या धर्मात पंथांत होतो हे आपल्या हातात नसते. पण आपली श्रद्धा अभ्यास यातून काही माणसं वेगळाच मार्ग निवडतात. शाहगड (ता. अंबड जि. जालना) येथील महानुभावी संत शहामुनी यांची कथा अशीच काहीशी आहे. 

औरंगाबाद-सोलापुर या राष्ट्रीय महामार्गावर गोदावरी नदीवर प्रचंड मोठा पुल आहे. हा पुल ज्या गावात आहे ते गाव म्हणजे शहागड. नविन झालेल्या पुलाखालून गावात शिरलो की उजव्या बाजूला एक रस्ता सरळ चिंचोळा होत नदीच्या दिशेने जात राहतो. त्याच्या टोकाशी नदीच्या काठावर जूना प्राचीन किल्ला आहे. किल्ल्याचे अगदीच थोडे अवशेष आता शिल्लक आहेत. एक भव्य पण काहीशी पडझड झालेली कमान आहे. या कमानीतून आत गेलो की भाजलेल्या वीटांच्या कमानी आणि एक दीपमाळ लागते. हे म्हणजे पुराण्या समाधी मंदिराचे अवशेष आहेत. आता नविन बांधलेले एक सभागृह आहे. यातच आहे शाहमुनींची समाधी. यालाच शाह रूस्तूम दर्गा असे पण संबोधले जाते.

लेखाच्या सुरवातीला वापरलेले छायाचित्र त्याच सुंदर कमानीचे आहे. 


शहामुनींनी त्यांच्या सिद्धांतबोध ग्रंथात आपल्या कुळाची माहिती दिली आहे. आपल्या घराण्यात चार पिढ्यांपासून हिंदू देवी देवतांची पुजा अर्चना होत असल्याची माहिती स्वत: शहामुनींनीच लिहून ठेवली आहे. त्यांचे पंणजोबा प्रयाग येथे होते. पत्नी अमिना हीला घेवून ते तेथून उज्जयिनी येथे आले. शहामुनींचे पणजोबा मराठी आणि फारसी भाषेचे तज्ज्ञ होते.  शहामुनींच्या आजोबांचे नाव जनाजी. जनाजी विष्णुभक्त होते. जनाजी हे सिद्धटेक (ता. कर्जत. जि. नगर) येथे स्थलांतरीत झाले. जनाजीच्या मुलाचे नाव मनसिंग. हे मनसिंग म्हणजेच शहामुनींचे वडिल. मनसिंग सिद्धटेकला असल्याने असेल कदाचित पण त्यांना गणेशभक्तीचा छंद लागला. मनसिंगांच्या पत्नीचे नाव अमाई. याच जोडप्याच्या पोटी शके 1670 (इ.स. 1748) मध्ये पेडगांव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथे शहामुनींचा जन्म झाला. काशी येथे  मुनींद्रस्वामी यांच्याकडून त्यांना गुरूमंत्र प्राप्त झाला. सातारा जिल्ह्यात त्यांनी सिद्धांतबोध ग्रंथाची रचना केली. यांनी शके 1730 (इ.स.1808) मध्ये शहागडला त्यांनी समाधी घेतली. 

शहाबाबा असे त्यांचे जन्मनाव. त्यांना मुनी ही उपाधी लावली जाते ती संत असल्यामुळे नव्हे. त्यांच्या गुरूंचे नाव मुनींद्रस्वामी होते. म्हणून शहाबाबा यांनी आपल्या नावापुढे मुनी जोडून आपले नाव ‘शाहमुनी’ असे केले. जसे की 'एकाजनार्दनी'. शहामुनींची गुरूपरंपरा त्यांच्याच पुस्तकांत दिल्याप्रमाणे दत्तात्रेय-मुनींद्रस्वामी-शहामुनी अशी सिद्ध  होते.

शहामुनींचे मोठेपण हे की त्यांनी आपल्या मुस्लीम धर्मातील विद्धंसकारी शक्तींची कडक निंदा आपल्या ग्रंथात करून ठेवली आहे. त्याकाळी हे मोठेच धाडस म्हणावे लागेल. आजही सुधारणावादी मुसलमान व्यक्तींना प्रचंड रोषाला सामोरे जावे लागते. इतकेच नव्हे तर त्याला मारूनही टाकले जाते. अशा वेळी शाहमुनी लिहीतात

नव्हे यातीचा ब्राह्मण । क्षत्रिय वैश्य नोहे जाण ।

शुद्रापरीस हीन वर्ण । अविंधवंशी जन्मलो ॥

ज्यांचा शास्त्रमार्ग उफराटा । म्हणती महाराष्ट्रधर्म खोटा ।

शिवालये मूर्ति भंगिती हटा । देवद्रोही हिंसाचारी ॥

जयांच्या सणाच्या दिवशी । वधिता गो उल्हास मानसी ।

वेदशास्त्र पुराणांसी । हेळसिती उद्धट ॥

ऐसे खाणींत जन्मलो । श्रीकृष्णभक्तीसी लागलो ।

तुम्हां संतांचे पदरी पडलो । अंगीकारावे उचित ॥

शहामुनींची समाधी आज दुर्लक्षीत आहे. खरं तर समाधीचा परिसर हा नदीकाठी अतिशय रम्य असा आहे. प्राचीन किल्ल्याचे अवशेष इथे आहेत. हा सगळा परिसर विकसित झाला पाहिजे. किमान येथील झाडी झुडपे काढून स्वच्छता झाली पाहिजे. प्राचीन सुंदर कमानीची दुरूस्ती झाली पाहिजे. 


शहामुनींचे वंशज असलेली 5 घराणी आजही या परिसरांत नांदत आहेत. या समाधीची देखभाल हीच मंडळी करतात. मुसलमान असूनही हे शहामुनींच्या उपदेशाप्रमाणे मांसाहार न करणे पाळतात. चैत्री पौर्णिमेला इथे मोठी जत्रा भरते (जयंतीची तिथी चैत्र वद्य अष्टमी आहे). तो उत्सव ही मंडळी साजरा करतात. एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ म्हणून याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. 

केवळ ही समाधीच नव्हे तर शहागड परिसरात जून्या मुर्ती आजही सापडतात. जून्या वाड्यांमधून अप्रतिम असे नक्षीकाम केलेले सागवानी खांब आहेत. याच परिसरांत सापडलेली विष्णुची प्राचीन मुर्ती एका साध्या खोलीत ठेवलेली आहे. ओंकारेश्वर मंदिर परिसरांत तर बर्‍याच मुर्ती मांडून ठेवलेल्या आहेत. दोन मुर्ती तर परिसरांत मातीत पडलेल्या आमच्या सोबतच्या फ्रेंच मित्राच्या दृष्टीस पडल्या. दोन जणांनी मिळून त्या उचलून मंदिराच्या भिंतीला लावून ठेवल्या. पाण्याने स्वच्छ धुतल्या. त्यावर रंगांचे डाग पडले आहेत. इतकी आपली अनास्था आहे प्राचीन ठेव्यांबाबत. 

स्थानिक लोकांनी आता पुढाकार घेतला आहे. मुर्तींची स्वच्छता करून मंदिरात आणून ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे. शिवाय अजून काही अवशेष सापडले तर नोंद करण्याचे मनावर घेतले आहे. 

शहामुनींचे समाधी स्थळ एक धार्मिक सलोख्याचे विशेष ठिकाण म्हणून विकसित केल्या गेल्या पाहिजे. मंत्री राजेश टोपे यांच्या मतदार संघातील हे गाव आहे. त्यांनी या प्रकरणांत लक्ष घालावे असे सर्वसामान्य इतिहाप्रेमींच्या वतीने विनंती आम्ही करत आहोत.  

(शहामुनींच्या बाबतीत सविस्तर माहिती रा.चिं.ढेरे यांच्या ‘मुसलमान मराठी संतकवी’ या पुस्तकांत दिली आहे. प्रकाशक पद्मगंधा प्रकाशन पुणे.)  (छायाचित्र सौजन्य Akvin Tourism)

       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Monday, September 28, 2020

शाश्‍वत पर्यटन : काळाची गरज


दै. सामना वर्धापन दिन विशेष पुरवणी २७ सप्टेंबर २०२० 

२७ सप्टेंबर  हा जागतिक पर्यटन दिन. कोरोना काळात पूर्वीच्या खुप संकल्पना बदलून गेल्या आहेत. पर्यटनातही आता वेगळा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. शाश्‍वत पर्यटन (सस्टेनेबल टूरिझम) ही संकल्पना जास्त करून समोर आली युरोपातून. आपला देश, आपली संस्कृती, चालिरीती, रितीरिवाज, संगीत, खाद्य पदार्थ यांबाबत त्यांना जास्त आस्था राहिलेली आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर जगात व्यापाराला आणि त्या सोबतच पर्यटनाला विशेष गती मिळाली. या पर्यटनाचा एक वेगळा आविष्कार म्हणजे शाश्‍वत पर्यटन. त्यात या स्थानिक मुद्द्यांना विशेष महत्त्व दिले जाते. 

कोरोना आपत्तीनंतर भारतात आणि महाराष्ट्रातील पर्यटनाचाही आपण या दृष्टीने वेगळा विचार करू शकतो. आत्तापर्यंत पर्यटन म्हणजे उंची महागडे हॉटेल्स, खाण्यापिण्याची मौजमजा आणि यासोबतच जरा जमले तर बाहेर फिरणे. गोव्या सारख्या प्रदेशाने मौजमजेलाच पर्यटन म्हणा असा गैरसमज पसरवला. पण आता सगळीकडेच पैशाच्या अडचणी जाणवू लागल्या आहेत. याचा आघात पर्यटनावरही पडत आहे. मग यातून पर्याय काय? तर शाश्‍वत पर्यटन एक चांगला पर्याय समोर येतो आहे.

1. वेगळी ठिकाणे :

जी अतिशय प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळं आहेत त्यांचा विचार आपण बाजूला ठेवू. तसेही त्यांच्याकडे पर्यटक येत असतातच. अतिशय उत्तम पण पर्यटकांना ज्ञात नसलेली स्थळं शोधून पर्यटकांसमोर असे पर्याय ठेवता येतील. त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था मुद्दाम वेगळी न करता आधीच अस्तित्वात असलेल्या घरांमधून शक्य आहे.  ज्या गावांमधून जूने वाडे आहेत त्यांची जराशी डागडुजी करून घेतली तर पर्यटक विशेषत: परदेशी पर्यटक अशा जागी मुद्दाम रहायला जातात. पर्यटन स्थळाजवळ स्थानिक लोकांना हाताशी धरून अशा सोयी करता येणे सहज शक्य आहे. त्यांनाही रोजगार मिळेल, पर्यटकांचे पैसेही कमी खर्च होतील आणि यातून एका वेगळ्या व्यवसायाला चालना मिळेल. 

उदा. म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील दोन किल्ल्यांचा आपण विचार करू. गौताळा अभयारण्याजवळ अंतुरचा किल्ला आहे. तसेच अजिंठा लेणी जवळ हळदा घाटात वेताळ वाडीचा किल्ला आहे. वाडीच्या किल्ल्या पर्यंत जाण्यासाठी उत्तम रस्ता आहे. अंतुर किल्ल्यासाठी मुख्य सडकेपासून 6 किमी. कच्या खराब रस्त्याने जावे लागते. या ठिकाणी राहण्याची खाण्याची कसलीही व्यवस्था नाही. स्थानिक गावकर्‍यांशी बोलून खाण्यापिण्याची व्यवस्था करता येते. (असा अनुभव आम्ही वाडिच्या किल्ल्या जवळ घेतला आहे. अगदी शेतात बसून जेवण केले आहे.) परदेशी पर्यटक असा अनुभव घेण्यासाठी मुद्दाम तयार असतात. या किल्ल्यांवर साहसी पर्यटकांना चांगली संधी आहे. 

काही अतिशय चांगली मंदिरे दुर्गम ठिकाणी आहेत ज्यांची माहिती लोकांना नाही. काही मंदिरे अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आहेत. त्यांचीही माहिती होत नाही. पाटणादेवी सारखे ठिकाण गौताळा अभयारण्यात आहे. घाटात आहे. तिथे चांगला धबधबा आहे. बीड जिल्ह्यात गेवराई तालूक्यात तलवाडा गावात छोट्याशा टेकडीवर त्वरिता देवीचे मंदिर आहे.  हे मंदिर शिवकालीन असून उत्तम दगडी बांधणीचे आहे. टेकडीवर असल्याने येथे निसर्गसौंदर्याचा आनंदही घेता येतो. तसेच अंबडच्या जवळ जामखेड म्हणून गाव आहे. येथील टेकडीवर असलेले जांबुवंताचे मंदिरही असेच उत्तम पर्यटन स्थळ आहे. अशा कितीतरी जागा महाराष्ट्रभर शोधता येतील. या ठिकाणी पर्यटनाच्या उत्तम संधी आहेत. गड किल्ले लेण्या जून्या वास्तू येथे पर्यटनास चालना देणे सहज शक्य आहे. जी ठिकाणं चांगल्या स्थितीत आहेत तेथे पर्यटन वाढू शकते. 

शाश्‍वत पर्यटनातील पहिला मुद्दा येतो तो अशा फारशा परिचित नसलेल्या स्थळांबाबत. शिवाय काही निसर्गरम्य ठिकाणं शोधून तिथेही पर्यटनाला चालना देता येते.

2. स्थानिक अन्न : 

दुसरा मुद्दा यात पुढे येतो तो अन्नाचा. आपण पर्यटकांचा विचार करताना त्यांना जे पदार्थ खायला देतो ते त्यांच्या आवडीनिवडी प्रमाणे असावेत असा विचार केला जातो. पण स्थानिक जे पदार्थ आहेत, जे अन्नधान्य आहे त्याचा विचार होताना दिसत नाही. आपण जिथे जातो आहोत तेथील धान्य आणि तेथील पदार्थ यांचा अनुभव घेतला पाहिजे. त्यांच्या चवी समजून घेतल्या पाहिजेत. नसता कुठेही जावून आपण तंदूर रोटी आणि दाख मखनी पनीरच खाणार असू तर त्याचा काय उपयोग?  बारीपाडा हे गाव महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर धुळे जिल्ह्यात आहे. या गावात दरवर्षी रानभाज्यांची स्पर्धा भरते. या गावाने स्वत:चे जंगल राखले आहे. निसर्ग पर्यटन आणि या रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी आपण जावू शकतो. पर्यटनांत अशा ठिकाणांचाही विचार झाला पाहिजे.

विविध पदार्थ करण्याची पण एक प्रत्येक प्रदेशातील एक पद्धत असते.  तिचा अनुभव घेतला पाहिजे. अशामुळे स्थानिक आचार्‍यांना एक संधी उपलब्ध होते. त्यासाठी बाहेरून माणसे आणायची गरज उरत नाही. अगदी जेवणासाठी त्या त्या भागात मिळणारी केळीची पानं, पळसाच्या पत्रावळी यांचा उपयोग झाला पाहिजे. तोही एक वेगळा अनुभव असतो. हैदराबादी पदार्थात ‘पत्थर का गोश’ म्हणून जो मांसाहारी पदार्थ खाल्ल्या जातो तो खाताना कसे बसावे कसे खावे याचेही नियम आहेत. अशा रितीने पर्यटनाच्या एका वेगळ्या पैलूचा विचार यात केला जातो.

3. लोककला, जत्रा, उत्सव : 

खाण्यापिण्या सोबतच अजून एक मुद्दा शाश्‍वत पर्यटनात येतो. तो म्हणजे त्या त्या प्रदेशातील संगीत, रितीरिवाज, सण समारंभ, जत्रा, उत्सव, उरुस. आपल्याकडे देवस्थानच्या जत्रा असतात. त्यांचा एक विशिष्ट काळ ठरलेला असतो. त्याच काळात तिथे जाण्यात एक वेगळा आनंद असतो. उदा. अंबडच्या मत्स्योदरी मातेच्या मंदिरात कार्तिक पौर्णिमेला दिपोत्सव साजरा केला जातो. मंदिराच्या दगडी पायर्‍यांवर हजारो दिवे लावले जातात. (मागील वर्षी सात हजार दिवे लावले होते.) हा दिपोत्सव पाहणे एक नयनरम्य सोहळा असतो. काही ठिकाणी रावण दहन केले जाते दसर्‍याच्या दिवशी. त्याही प्रसंगी पूर्व कल्पना दिली तर पर्यटक येवू शकतात. गणपतीच्या काळात नवरात्रीच्या काळात पर्यटनात वाढ झालेली दिसून येते. हा एक वेगळा पैलू आहे. शिवरात्र आणि श्रावणातील सोमवारी बहुतांश महादेव मंदिरात मोठ्या प्रमाणात भक्त जमा होतात. शिवरात्रीला रात्रभर भजन चालते. हे दिवस ओळखून त्या प्रमाणे पर्यटकांच्या सहली आयोजीत करता येतात. 

नवरात्रीत बहुतांश देवी मंदिरांत गर्दी होते. निसर्गरम्य असलेली ठिकाणं निवडुन अशा ज़त्रांच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते तिथे पर्यटकांना आवर्जून बोलावता येवू शकते. 

काही दर्ग्यांमधून उरूस भरतात. उरूस म्हणजे त्या सुफी संताची पुण्यतिथी. अशा वेळी कव्वाल्यांचा कार्यक्रम आयोजीत केलेला असतो. त्यासाठी पर्यटकांना पूर्वकल्पना असेल तर तेही येवू शकतात. (खुलताबाद येथील दर्ग्यात अशा कव्वालीसाठी आम्ही परदेशी पर्यटकांना घेवून गेलो आहोत. तो अनुभव अतिशय आगळा वेगळा आहे.)

कोजागिरी पौर्णिमेला देवीच्या मंदिरात उत्सव साजरा केला जातो. रात्रीची जागरणं अशावेळी केली जातात. त्या जागी काही सांस्कृतिक सांगितीक कार्यक्रम करणे सहज शक्य आहे. अशा निमित्तानेही पर्यटकांना आणता येवू शकते. 

4. पर्यटन वाढीसाठी संगीत महोत्सव/ सांस्कृतिक कला महोत्सव :

ऐतिहासिक वास्तुंच्या परिसरांत संगीत महोत्सव आयोजीत करण्यासाठी शासकिय पातळीवर काही वर्षांपूर्वी प्रयत्न केले जायचे. लालफितीच्या कारभारामुळे ते जवळपास सगळे बंद पडले. या शिवाय काही मंदिरे आणि मठ, दर्गे यांच्या संस्था यासाठी सहकार्य करण्यास तयार असतील तर त्यांच्या परिसरांत संगीत महोत्सव छोट्या प्रमाणात घेणे सहज शक्य आहेे. यामुळे पर्यटनाचा एक वेगळा पैलू समोर येवू शकतो. शाश्‍वत पर्यटनात याचाही विचार केला जातो.

लोककला नृत्य लोकसंगीत यांचा अतिशय चांगला वापर पर्यटनाच्या वाढीसाठी करता येवू शकतो. शिवाय या कलांना प्रोत्साहन देण्याचेही काम यातून होवू शकते. तेलंगणात दलित किन्नरी वादक कलाकारांना शासन स्वत: प्रोत्साहन देवून विविध ठिकाणी पाठवते. त्यांचा कलाविष्कार लोकांच्या समोर यावा म्हणून धडपड करते. अशा काही योजनांतून पर्यटनाला चालना मिळू शकते. 

शाश्‍वत पर्यटनात हस्तकलांचाही विचार केला जातो. हातमागावर कापड विणणारे, हॅण्डमेड कागदवाले, धातूवर कोरिवकाम करणारे (बिदरी कला), मातीची/लाकडाची खेळणी तयार करणारे असे कितीतरी कलाकार आपल्या जवळपास असतात. यात परदेशी पर्यटकांना विशेष रस असतो. समोर बसून चित्र काढून देणारे. किंवा एखाद्या ऐतिहासिक स्थळी तिथेच बसून त्या जागेचे चित्र काढणारे यांचाही विचार शाश्‍वत पर्यटनांत केला जातो. त्या त्या जागची चित्रे काढून त्याचे प्रदर्शन भरवता येवू शकते. त्या त्या भागातील वस्त्र विणण्याची परंपरा हा पण एक महत्त्वाचा विषय आहे. अशा वस्त्रांचे प्रदर्शन भरवता येवू शकते. उदा. पैठणी, हिमरू, महेश्वरी, पाटण पटोला, कांचीपुरम, बालुचेरी, बनारसी इ.इ.

 5. घरगुती राहण्याची व्यवस्था (होम स्टे) : 

  प्रसिद्ध अशा पर्यटन स्थळी जाताना वाटेत घरगुती राहण्याची खाण्याची व्यवस्था होणार असेल तर बर्‍याच जणांना ते हवे असते.  कोकणात तर मुद्दाम समुद्रकिनार्‍या जवळ घरांत जावून राहणे पर्यटक आजकाल पसंद करत आहेत. कर्नाटकांत हंम्पी हे गांव असे आहे की तिथे एक पन्नास शंभर घरांचे खेडेच संपूर्णत: पर्यटन व्यवसायावर चालते. तुंगभद्रा नदीच्या काठी छोट्या घरांतून लोक राहतात. तिथेच जेवायची चहापाण्याची व्यवस्था केली असते. काही परदेशी पर्यटक तर तिथे केवळ शांततेसाठी येवून राहतात. 

काही दिवसांनी जंगलात, दूरवरच्या खेड्यात, एखाद्या तळ्याच्या काठी जावून आठ दिवस राहणे  हा प्रकारही लोकप्रिय होत चाललेला आपल्याला दिसेल. निसर्गरम्य वातावरण, शांतता, पक्ष्यांचे मधुर आवाज, चुलीवरचे जेवण, जवळपासच्या शेतांत डोंगरात फेरफटका, रात्री खुल्यावर बसून चांदण्याचा आनंद घेणे अशा गोष्टी लोक आवर्जून करताना दिसून येतील. 

6. उपसंहार :

शाश्‍वत पर्यटनांत सगळ्यांत महत्त्वाचा मुद्दा असतो तो आहे ती संसाधने आहे ते मनुष्यबळ याचा सुयोग्य उपयोग करून घेण्यावर भर दिला जातो. तेथील लोककलाकार, कारागिर यांचाही विचार यात केला जातो. तिथील जनजिवनाशी जूळवून घेण्यावर भर दिला जातो. अन्यथा इतर वेळी आपण पर्यटक म्हणून आपल्या आवडीनिवडी त्या प्रदेशावर तेथल्या माणसांवर लादत असतो. तेथील निसर्गाची हानी करत असतो. 

कोरोना आपत्तीमधुन एक आर्थिक पेच समोर आला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी काटकसरीने सर्व काही करण्यावर भर द्यावा लागणार आहे. यासाठी स्थानिकांना संधी, स्थानिक संसाधनांचा वापर यामुळे बचतही होवू शकते व रोजगाराच्या वेगळ्या संधीही निर्माण होवू शकतात. 

याची सुरवात म्हणून प्रत्येकाने आपल्या जवळच्या अशा एखाद्या कधी न गेलेल्या थोडेफार माहिती असलेल्या ठिकाणी  गेलं पाहिजे. तेथील अनुभव इतरांना सांगितला पाहिजे. सध्या समाज माध्यमे (सोशल मिडिया) अतिशय प्रभावी पद्धतीनं काम करत आहे. त्यावरून हे अनुभव इतरांना समोर आले तर या पर्यटनाला चालना मिळू शकते. सहजपणे अर्थकारणाला गती येवू शकते.       

(लेखात सुरवातीला वापरलेले छायाचित्र अजिंठा डोंगरातील वाडीच्या किल्ल्यावरील हवा महालाच्या कमानीचे आहे. ता. सिल्लोड जि औरंगाबाद सौजन्य : AKVIN Tourism) 

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    


Friday, September 25, 2020

जागतिक पर्यटन दिनाचे विनम्र ‘चॅलेंज’

  


उरूस, 25 सप्टेंबर 2020 

 समाज माध्यमांवर (सोशल मिडिया) विविध चॅलेंज दिली जातात. सध्या कपल चॅलेंज म्हणजेच बायको सोबत फोटो टाकण्याचे चॅलेंज दिल्या गेले आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने (27 सप्टेंबर, रविवार) सर्वांना मी एक विनम्रपणे चॅलेंज देतो आहे. कृपया त्याचा स्विकार करावा. 

सध्या कोरोना आपत्तीमुळे फिरण्यावर बंदी आलेली आहे. अतिशय प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळे बंदच आहेत. गर्दीची ठिकाणं तर टाळायलाच हवी. आपली आणि आपल्या कुटूंबाची काळजी घ्यायला हवी. या सगळ्यांतून व्यवहार्य मार्ग  काढत जागतिक पर्यटन दिन (27 सप्टेंबर) कसा साजरा करावयाचा?

आपल्या आजूबाजूला गावातून बाहेर पडल्यावर अगदी 50 किलोमिटरच्या परिसरांत दूर्लक्षीत असलेली खुप अशी सुंदर ठिकाणं असतात. पण आपलं तिकडे लक्ष गेलेलं नसतं. ही ठिकाणं पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येत नाहीत. यांची फारशी माहिती पण उपलब्ध नसते. स्थानिक पातळीवर थोडीबहुत माहिती कुणाला असते. 

जूनी मंदिरे, गढ्या, भक्कम सागवानी वाडे, काही दुर्लक्षीत दर्गे, मकबरे, धबधबे, नदीचे घाट, दर्‍या, डोंगर  आपल्या परिसरांत आहेत. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने यांना भेटी देवून ते फोटो व माहिती समाज माध्यमांवर टाकण्याचे ‘चॅलेंज’ विनम्रपणे सर्वांसमोर ठेवतो आहे. 

परभणी जवळच्या जाम गावच्या महादेव मंदिराचे उदा. म्हणून समोर ठेवतो. हे मंदिर मुळचे विष्णु किंवा लक्ष्मी मंदिर असावे. अकराव्या शतकातील हे मंदिर अभ्यासकांकडून दुर्लक्षीत राहिले. या मंदिरावरील अप्रतिम शिल्पकाम अजूनही शाबूत आहे. मंदिराचे प्रवेशद्वार, त्यावरील नक्षीकाम, गाभारा, सभामंडप सर्वच सुरक्षीत आहे. याची कुठे नोंद नाही. जागतिक पर्यटनाच्या निमित्ताने या मंदिराला भेट देता येईल. 

पळशी (ता. पारनेर, जि.नगर) येथील सरदार पळशीकरांचा लाकडावरील अप्रतिम कोरीव काम असलेला वाडा आवर्जून भेट द्यावा असा आहे. समाज माध्यमांवर नुकतेच त्याचे फोटो काही हौशी पर्यटकांनी टाकलेले आहेत. त्यावर एक छोटासा व्हिडिओही आता सर्वत्र फिरत आहे. याच गावांत होळकर काळांतील सुंदर असे विठ्ठल मंदिर आहे. मंदिराला किल्ल्यासारखी तटबंदी आहे बुरूज आहे. ही ठिकाणं पर्यटकांकडून दुर्लक्षीत राहिलेली आहेत.

औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिर औंढा(जि. हिंगोली) येथे आहे. त्याचा सर्वांना परिचय आहे. पण याच औंढ्यापासून हिंगोलीच्या दिशेने जाताना मुख्य रस्त्यापासून डाव्या बाजूला जरासे आत गेल्यावर राजापूर नावाचे गाव आहे. या गावात एका साध्या मंदिरात तीन अप्रतिम अशा मुर्ती ठेवलेल्या आहेत. 


यातील सरस्वतीच्या अप्रतिम मुर्तीचे छायाचित्र (सौजन्य श्रीकृष्ण उमरीकर) लेखाच्या सुरवातीला दिले आहे. सरस्वतीच्या हाती एकतारीसारखी दिसणारी वीणा, पुस्तक आहे. मुर्तीच्या मागची प्रभावळ सुंदर आहे. चेहर्‍यावरील शांत सात्विक भाव विलक्षण आहेत. उभी असलेली सरस्वतीची सुडौल मुर्ती सहसा आढळत नाही. सरस्वती बसलेली जास्त करून दाखवलेली असते.

याच मंदिरात ठेवलेली दुसरी मुर्ती ही नरसिंहाची आहे. सहसा दोन प्रकारच्या नरसिंह मुर्ती मंदिरातून पुजल्या जातात. एक असतो तो लक्ष्मी नरसिंह. ज्याला भोग नरसिंह असेही म्हणतात. ज्याच्या डाव्या बाजूला लक्ष्मी असते म्हणून तो लक्ष्मी नरसिंह. या मुर्तीच्या चेहर्‍यावरी भाव प्रसन्न असतात. दुसरा असतो तो उग्र नरसिंह. अर्थातच याच्या चेहर्‍यावरील भाव उग्र असतात. मांडीवर हिरण्यकशपू असून त्याचे पोट नखांनी फाडणारा असा हा उग्र नरसिंह. हळेबिडूच्यामंदिरावर उग्र नरसिंहाची एक अतिशय अप्रतिम मुर्ती आहे. त्यात हिरण्यकशपुचे आतडेही बाहेर आलेले दाखवलेले आहेत. इतके बारकावे शिल्पात अचुकपणे आले आहेत. औंढ्या जवळच्या राजापुरमध्ये असलेली नरसिंह मुर्ती मात्र अतिशय वेगळी आहे. हा योग नरसिंह आहे. अशी सर्वात भव्य नरसिंह मुर्ती हंपीला आहे. मांडी घातलेल्या या नरसिंहाच्या पायांना योगपट्टा वेढलेला आहे. औंढ्याजवळच्या राजापुरी येथील नरसिंह जरा याहून वेगळा आहे. ही मुर्ती अर्धसिद्धासनातील आहे. चेहर्‍यावरील भाव अतिशय शांत आहे.


तिसरी जी मुर्ती आहे ती अतिशय वेगळी दुर्मिळ अशी अर्धनारेश्वराची मुर्ती आहे. शिव पार्वती असे दोन एकाच मुर्तीत दाखविण्यात आले आहे. मुर्तीचे उजवे अर्धे अंग म्हणजे शिव आहे. त्याच्या हातात त्रिशूळ आहे. दुसरे डावीकडचे अर्धे अंग म्हणजे पार्वती आहे. तिच्या हातात नाजूकपणे कलश धरलेला आहे. हा कलश धरतानाच्या तीच्या बोटांचा नाजूकपणा व दुसरीकडे त्रिशुळ धरतानाच्या शिवाच्या बोटांची ताकद यातून या अनामिक शिल्पकाराच्या प्रतिभा दिसून येते. गळ्यात एक सुंदर अशी माळ आहे. पार्वतीच्या बाजूंनी ही माळ वक्ररेषांची असून माळेच्या बाहेर गोल पताका लोंबाव्यात अशी नक्षी आहे. आणि तीच माळ शिवाच्या बाजूने सरळ आणि तिच्यातील मण्यांची रचना ठसठशीत ढोबळ बनून जाते. हे सौंदर्य खरेच अदभूत आहे. (नृसिंह व अर्धनारेश्वर छायाचित्र सौजन्य अनिल स्वामी जिंतूर)

अंबाजोगाईच्या जवळ धर्मापुरी म्हणून गाव आहे. तिथे केदारेश्वर महादेवाचे मंदिर आहे. पडझड झालेल्या या मंदिराचा जिर्णोद्धार पुरातत्व खात्याने अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे. हे मंदिर आवर्जून पहा. मंदिराच्या बाह्य भागावरील मुर्तीकाम फारच अप्रतिम आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 68 मुर्ती कोरलेल्या आहेत.

नाशिक जवळ सिन्नर मध्ये गोंदेश्वराचे मंदिर अतिशय सुंदर आहे. या परिसरांतच काही भग्न मंदिरांचे अवशेष आढळून येतात. नांदूर माधमेश्वर जवळच्या एका अशा मंदिराचे फोटो समाज माध्यमांवर नितीन बोडखे या इतिहास प्रेमी मित्राने टाकले. त्याच्याशी संपर्क साधून मी तेथली माहिती घेतली. आता त्या परिसराला भेट देण्याचे नियोजन केले आहे. 




महाराष्ट्रभर अशी कितीतरी ठिकाणं आहेत जी काहीशी दुर्लक्षीत राहिलेली आहे. नदीचे सुंदर घाट आहेत (कृष्णा नदी वाई). मुदगल येथील पाण्यातील महादेवाचे व गणपतीचे मंदिर पाहण्यासारखे आहे. सध्या गोदावरील पुर आल्याने तिथे जाता येत नाही. मंदिर बुडून जावे इतके पाणी सध्या पात्रातून वहात आहे. पश्चिम महाराष्ट्रात शिवकालीन कितीतरी ठिकाणं अतिशय उत्तम निगा राखलेली अशी आहेत. पण त्यांची माहिती स्थानिकांशिवाय इतरांना फारशी होत नाही. नगर जिल्ह्यात अकोले गावात गंगाधरेश्वराचे अप्रतिम अगदी संपूर्ण चांगल्या स्थितीतले मंदिर आहे. बडोड्याच्या गायकवाडांचे  कोषाधिकारी पोतनिस  यांनी हे मंदिर बांधले. या मंदिराच्या बांधकामाला तेंव्हा इ.स. 1782 मध्ये 4 लाख रूपयांचे खर्च झाल्याची नोंद आहे. याच गावात अतिशय पुरातन असे सिद्धेश्वराचे मंदिर आहे. 

अकोला (विदर्भ) जिल्ह्यात बाळापुर येथे मिर्झा राजे जयसिंह यांची अतिशय देखणी सुबक राजस्थानी शैलीतील छत्री आहे. अमरावती जवळ मातापुरला सात मजली पुरातन बारव आहे. अशी कितीतरी फारशी परिचित नसलेली ठिकाणं सांगता येतील. बरिच ठिकाणं अस्वच्छ बकाल झाली आहेत. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने मी विनम्र आवाहन करतो की अशा आपल्या जवळच्या ठिकाणांना भेटी द्या. स्थानिक प्रशासन आणि गावकर्‍यांच्या सहकार्याने तेथे साफसफाई करता आली तर जरूर प्रयत्न करा. या ठिकाणाची माहिती गोळा करा. अशा ठिकाणांचे फोटो व माहिती आपल्या आपल्या प्रोफाईलवर टाका.

27 सप्टेंबरला आपण सर्वांनी जवळपासच्या रम्य पुरातन ठिकाणांना नैसर्गिक सौंदर्य स्थळांना किल्ल्यांना वाड्यांना गढ्यांना भेटी देवून त्याचे फोटो व माहिती सोमवार 28 सप्टेंबर रोजी समाज माध्यमांवर द्यावी अशी विनंती आहे.


मित्रांनो मैत्रिणींनो इतिहास प्रेमींनो कृपया हे ‘चॅलेंज’ स्वीकारा. अगदी फारही दूर जायची गरज नाही. परभणी ला माझा जन्म गेला. पण तिथे क्रांती चौकात टाकळकर कुटूंबियांच्या राम मंदिरात असलेली शेषशायी विष्णुची मुर्ती माझ्या पाहण्यात आली नाही. तिचा उल्लेख बारव स्थापत्यावरील आपल्या ग्रंथात डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी केला तेंव्हाच आमचे डोळे उघडले. कृपया तूम्ही तूमचे डोळे झाकून घेवू नका. आपल्या जवळपासच्या स्थळांबाबत मुर्तींबाबत लिहा. माहिती घ्या. फोटो काढा. संस्कृती जागृती अभियानात सक्रिय व्हा.         

(शेषशायी विष्णू मूर्ती छायाचित्र सौजन्य डॉ. संजय टाकळकर नांदूर मधमेश्वर छायाचित्र सौजन्य नितीन बोडखे)   


      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Wednesday, September 23, 2020

‘हमी’ भाव म्हणजेच ‘कमी’ भाव!


उरूस, 23 सप्टेंबर 2020 

कृषी विषयक तीन विधेयके संसदेत मंजूर झाली. पण या निमित्ताने जो अभूतपूर्व गोंधळ संसदेत घालण्यात आला तो पाहता विरोधी पक्ष शेतकर्‍यांच्या किती विरोधी आहेत हेच सिद्ध होते. 

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी विधेयकांवर दुरूस्ती सुचवलेली आहे. या दुरूस्त्या केल्या गेल्या तरच कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्ष आपला बहिष्कार उठवतील अन्यथा आम्ही संसदेत येणारच नाही असा पवित्रा घेतला आहे. या दूरूस्त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो शेतमालाच्या हमी भावाचा. म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राईस (एम.एस.पी.) म्हणजेच किमान आधारभूत किंमत. 

बाजार समित्यांसारखेच किमान किंमतीची हमी दिली तर शेतकर्‍याचे भलेच होणार आहे असा बर्‍याच जणांचा भ्रम आहे. हमी भावाच्या खाली खासगी व्यापार्‍यांनी खरेदी करू नये असा कायदा करण्याची मागणी करण्यात आली आहे. अगदी सरकारनेही हमी भावानेच खरेदी करावी अशीही मागणी या दुरूस्त्यांत करण्यात आली आहे. 

मुळात हमी भाव म्हणजे काय? सरकार 22 धान्ये/कडधान्याचे दरवर्षी हंगामात भाव जाहिर करते. हे भाव जाहिर केल्यावर त्याची खरेदी सरकारने केली असे कधीही घडले नाही. या भावापेक्षा नेहमीच बाजार खालच्या पातळीवर किंवा त्याच्या आसपास स्थिरावतो. म्हणजे उलट हमी भाव म्हणजे शेतमालाच्या किंमतीवर ठोकलेला खिळाच आहे. याच्या वर किंमत जाणारच नाही याचीच ही ‘हमी’ आहे. तेंव्हा हमी भाव हा वस्तूत: ‘कमी’ भाव आहे हे पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजे. 

नेहमी चढलेले भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आतोनात उचापती केल्या आहेत. पण भाव जेंव्हा पडतात, माल रस्त्यावर फेकुन द्यायची वेळ येते तेंव्हा शेतकर्‍याला वार्‍यावर सोडून दिलेले आढळून येते. 

उदा. म्हणून 2016 साली डाळीचे भाव आतोनात कोसळले. आधी दोनशे रूपयांच्या पूढे गेलेली तूर डाळ घसरून अगदी 40 रूपयांपर्यंत आली. तेंव्हा शासनाने 55 रूपये हमी भाव जाहिर केला. साहजिकच सरकारने खरेदी करावी म्हणून शेतकर्‍यांनी रांगा लावल्या. या सरकारी खरेदीत किती आणि कसा भ्रष्टाचार झाला ते वेगळे सांगायची गरज नाही. नडलेल्या शेतकर्‍यांकडून व्यापार्‍यांनी राजकीय नेत्यांशी संगमनत करून अगदी 35 रूपये पर्यंत तूर खरेदी केली. हीच तूर त्याच शेतकर्‍याचा सातबारा वापरून सरकारला 55 रूपयांनी विकली. हा मधला 20 रूपयांचा नफा व्यापारी-दलाल-नेते यांच्या  साखळीने खावून टाकला. इतकं होवूनही सरकारी खरेदी संपूर्ण झालीच नाही. म्हणजेच शेतकर्‍याचे तर नुकसान झालेच पण सरकारचा प्रचंड पैसा यात वाया गेला. त्या अर्थाने परत सामान्य जनतेच्या खिशालाच कर रूपाने चाट बसली. 

मग या हमी भावाची गरजच काय? भारत सरकारच नव्हे तर जगातील कुठलेही सरकार आपल्या देशात तयार झालेला सगळा शेतमाल खरेदी करू शकत नाही. व्यापार करणे हे सरकारचे काम नाही. व्यापारावर नियंत्रण ठेवणे हे पण सरकारचे काम नाही. ही व्यवस्था सुरळीत चालावी, त्यासाठी जर काही कर सरकार लावणार असेल तर तो सरकारनी चोखपणे जमा करावा इतकंच सरकारचे काम आहे. 

कॅगने जो अहवाल कृषी उत्पन्न बाजार समित्यांबाबत दिला होता (इ.स. 2014) त्यात असे स्पष्टपणे नोंदवले होते की 60 टक्के इतके शेतमालाचे व्यवहार नोंदवलेच गेले नाहीत. परिणामी हा सगळा महसुल सरकारचा बुडाला. आणि हे सगळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा एकाधिकार चालू असतानाची गोष्ट आहे. बाजार समितीचे संचालक सुभाष माने यांनीच याविरूद्ध तेंव्हा आवाज उठवला होता. 

गुलाम नबी आझाद यांनी आधी हे सांगावे की ज्यांचे हमी भाव जाहिर केले जात नाहीत त्या शेतमालाचा व्यापार इतकी वर्ष कसा चालू आहे? 

फळे भाजीपाला फुले यांच्या शिवाय इतरही जो शेतमाल आहे त्यांचे सौदे कुठलीही हमी किंमत जाहिर न होता चालू आहे. हे भाव निर्धारण कसे काय होते? तर बाजारात विकणारा आणि विकत घेणारा यांच्या सहमतीने हे होत आलेले आहे. यातही शेतमाल खरेदीसाठी परवाने मोजक्याच लोकांना दिल्या गेल्याने त्यांची एकाधिकारशाही निर्माण झाली. यावर तोडगा काढण्यासाठीच नियमन मुक्ती करण्यात आली आहे. बाजार समितीचा एकाधिकार मोडण्यात आला आहे. आता खुल्या बाजारात स्पर्धा निर्माण होवून शेतकर्‍याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.  असे असताना हमी भावाची मागणी कशासाठी? खुला बाजार मागत असताना परत हमी भावाच्या बेड्या कुठला शेतकरी अडकवून घेणार आहे? 

स्वामीनाथन आयोगाने उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा अशी एक मागणी आपल्या अहवालात केली आहे. आर्थिक दृष्ट्या कुठल्याच पातळीवर ही मांडणी योग्य ठरत नाही. 50 टक्के नफ्याची हमी मिळणार असेल तर जगातील सर्वच उद्योगपती इथेच येतील आणि हाच धंदा करतील.आणि उत्पादन खर्च काढणार कोण? आणि कसा? वातानुकुलीत दालनात बसलेले नोकरशहा उत्पादन खर्च ठरवणार की काय? स्वामीनाथन आयोगाची ही मागणी अव्यवहार्य आणि हास्यास्पद आहे. तुरीची खरेदी हमी भावाने करायची वेळ आली तर सरकारच्या तोंडाला फेस आला. सगळा शेतमाल खरेदी करून त्याचे पैसे द्यायचे म्हटले तर सरकार दिवाळखोर बनून जाईल. आणि जर खासगी व्यापार्‍याला त्याला न परवडणार्‍या दराने खरेदी करायचा आग्रह केला तर तो दुकानदारीच बंद करून टाकेल. मग हे चालणार कसे? स्वामीनाथन आयोगाची शिफारस पुढे रेटणारे मुर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत. त्यांना अर्थशास्त्रातले ‘अ’ही कळत नाही. 

मुळ मागणी ही शेतमाल बाजार मुक्त करण्याची आहे. एकदा मुक्त बाजाराची मागणी केल्यावर परत हमी भाव मागायचा नसतो. आणि तो जाहिर करून काही फायदाही होत नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे. 

शेतमाला शिवाय इतर जी उत्पादने आहेत ती खुल्या बाजारात सामान्य ग्राहकाला उपलब्ध असतात. त्यांचे व्यापारी ग्राहकाला लूटत असतात का? किंवा उत्पादकाला हा व्यापारी लूटत असतो का? हा बाजार चालतो कसा? साधे उदाहरण मोबाईलचे आहे. एकातरी मोबाईल कंपनीने असा दावा केला आहे का की दुकानदार आम्हाला लुटतो म्हणून शासनाने मोबाईलचे हमी भाव जाहिर करावेत. मोटार सायकलच्या एका तरी उत्पादकाने असा दावा केला की गावोगाव पसरलेली शोरूम्स आहेत त्या आम्हाला लुबाडतात. एखाद्या मोटारसायकलचे भाव अचानक वाढले असे काही कुठे आढळून आले का? औद्योगिक उत्पादनांच्या किंमती बाजारात कशा काय आपोआप स्थिर होतात? 

प्रत्यक्ष शेतीतले उत्पादन नाही पण शेतकर्‍याच्या आवारात तयार होणारी अंडी, कोंबड्या, शेळ्या, बकर्‍या यांच्या भावासाठी कुणी आंदोलन केले आहे का? याचे हमी भाव कधी जाहिर झाले आहेत का? यांचे भाव अचानक वाढले असे कधी घडले का? अंडे तर नाशवंत पदार्थ. पण त्याची खरेदी विक्री वाहतूक साठवणुक सारं सारं सरकारी हस्तक्षेपाशिवाय सुरळीत होत आलेलं आहे. या अंड्यापासून खाद्य पदार्थ तयार करण्याचे छोटे उद्योग कुठेही गाड्यांच्या रूपाने हजारो लाखोंच्या संख्येने उभे राहिले. प्रचंड रोजगार तयार झाला. यासाठी सरकारी नियम करण्याची आवश्यकता निर्माण झाली नाही. अंड्याचे ऑम्लेटचे भुर्जीचे भाव रोखण्यासाठी काही करण्याची गरज अजून तरी निर्माण झालेली नाही. 

हमी भाव प्रत्यक्षात कमी भाव असतात. ही एक बौद्धीक धुळफेक आहे. शेतमालाचा बाजार मुक्त करा इतकीच एक कलमी मागणी शेतकर्‍यांची आहे. शेतकर्‍यांसाठी काहीच करू नका. फक्त शेतकर्‍याच्या छातीवरून उठा हे शरद जोशी म्हणत होते तितकेच झाले तरी सध्या पुरे. बाकी शेतकरी त्याचं तो बघुन घेईल. शरद जोशींची जयंती याच महिन्यात 3 सप्टेंबरला होती. त्याच महिन्यात ही विधेयके मंजूर करून सरकारने शरद जोंशींना विनम्र अभिवादन केले आहे. े      

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Monday, September 21, 2020

उद्ध्वस्त प्राचीन केशव मंदिर (माजलगांव-केसापुरी)!


उरूस, 21 सप्टेंबर 2020 

माजलगांव शहराच्या पश्चिमेला अगदी लागूनच केसापुरी गावात उत्तर बाजूला तळ्याच्या काठी शिवारात जीर्ण मंदिराचे अवशेष दिसून येतात. हे मंदिर आहे अकराव्या शतकांतील एकेकाळी शिल्पसौंदर्यदृष्ट्या अप्रतिम असे प्राचीन केशव मंदिर. मंदिरापर्यंत जाण्यासाठी साधा रस्ताही आता शिल्लक नाही. जंगली झाडोर्‍याने परिसर वेढला गेला आहे. गुप्तधनाच्या मोहात मंदिरात खोदाखोद केल्याने कोरीव दगडी चिरे ढासळले आहेत.

मंदिराचा मुख्य मंडप अजून बर्‍यापैकी शिल्लक आहे. मंडपाच्या छताला चौरसाकृती चौंकटीत कोरीव दगडांत नरसिंहाची मुर्ती कोरलेली आहे. त्याच्या बाजूलाच शिव गणेश कार्तिकेय यांच्या मुर्ती आहेत.


 मंदिराच्या बाह्य अंगावर अतिशय सुंदर अशा सुरसुंदरिंच्या मुर्ती होत्या. त्यातील दोन अजूनही शिल्लक आहेत. इतरत्रही कुठे परिसरांत शोध घेतल्यास या मुर्ती विखुरलेल्या मातीत आढळून येतीलही. मंदिराचे कोरीव खांब सुंदर आहेत. सध्या शिल्लक जे खांब आहेत त्यांच्यावरची नक्षी उत्तम अवस्थेत आहे. गाभारा पूर्णत: ढासळलेला आहे. 

बाराव्या शतकात मंदिर शैली विकसित होवून त्रिदल पद्धतीची (तीन गाभारे असलेली) मंदिरे बांधली गेली. लक्षणीय अशी सहा मंदिरे मराठवाड्यात आहेत. केशव मंदिर हे त्यातीलच एक. 


या मंदिरात विष्णुची अतिशय देखणी अशी मूर्ती होती. दीडएकशे वर्षांपूर्वी ही मुर्ती गुराख्यांना सापडली. मुर्ती आता गावातील केशवराज मंदिरात विराजमान आहे. हे मंदिरही अहिल्याबाईंच्या काळातील उत्तम दगडी बांधणीचे भक्कम कमानींचे असे आहे. मुळ मंदिराच्या गर्भगृहाच्या द्वारशाखा उचलून इथे नव्याने दरवाजाला लावण्यात आल्या आहेत. मुळ मंदिराचे खांबही काही नविन मंदिरात बसवण्यात आले आहेत.  ब्रह्मदेवाचीही एक अतिशय सुरेख मुर्ती विष्णुच्या मुर्तीशेजारीच ठेवण्यात आली आहे. 

महादेव मंदिराच्या गाभार्‍याबाहेर गोमुख असते. त्यातून अभिषेकाचे पाणी बाहेर येते. त्याप्रमाणे विष्णुचे जे अवतार आहेत त्या मंदिरांच्या गाभार्‍यांतून पाणी बाहेर जाण्यासाठी मकर प्रणाली कोरल्या जातात. केसापुरीच्या मंदिराला अतिशय देखणी अशी मकर प्रणाली आहे. ही आता नविन मंदिरात प्रवेशद्वाराजवळच्या ओट्याला बसवली आहे. 


आज केसापुरीचे मुळ केशव मंदिर अतिशय वाईट अवस्थेत आहे. स्थानिक प्रशासनातील लोकप्रतिनिधींनी या परिसरांची दुरूस्ती करण्याची तयारी दर्शविली आहे. नविन मंदिराच्या विश्वस्तांनी सर्व सहकार्य करण्यास हात पुढे केला आहे. 


आता गरज आहे इतिहासप्रेमी, पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक/ विद्यार्थी यांनी पुढे येवून या मंदिराचा जिर्णाद्धार कसा होवू शकतो यासाठी प्रयत्न करण्याची. अशा मंदिरांचा जिर्णाद्धार शास्त्रशुद्ध पद्धतीने होट्टल येथे करण्यात आला आहे. ते एक अतिशय चांगले उदाहरण समोर आहे. विदर्भातील मार्कंडा मंदिराचा जिर्णाद्धार अशाच पद्धतीनं पुरातत्त्व खात्याच्या वतीने चालू आहे. सर्वच कामे पुरातत्त्व विभागाकडून होतील असे नाही. होट्टलचे काम इंटॅक या संस्थेने केले आहे. आता केसापुरीच्या कामासाठी इतर संस्था व्यक्तींनी पुढाकार घ्यावा. 

गोदावरी खोर्‍यात विष्णुमुर्ती मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मंदिरे पडली आणि मुर्ती मात्र शिल्लक असाही प्रकार दिसून येतो. गोदावरीला काठावरच पार्थपुरी येथे भगवान पुरूषोत्तमाचे म्हणजेच विष्णुचे मंदिर आहे. आता अधिक मासात तिथे मोठी जत्रा भरते. सध्या कोरोनामुळे हे मंदिर बंद आहे.

महाविष्णु शेळगांव (ता. सोनपेठ, जि. परभणी) हे गांवच विष्णुमंदिरामुळे ओळखले जाते. धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिर अकराव्या शतकांतील अतिशय महत्त्वाचे असे मंदिर आहे. या मंदिरात पूर्वी असलेली विष्णुमूर्ती आता गावातच दुसर्‍या मंदिरात विराजमान आहे. सेलू जवळ ढेंगळी पिंपळगांव येथेही हेमाडपंथी महादेव मंदिर आहे. आश्वर्य म्हणजे गावातच दुसर्‍या मंदिरात बालाजीची अशीच प्राचीन देखणी मुर्ती आहे. परभणीला वडगल्लीच्या जबरेश्वर महादेव मंदिरात विष्णुच्या दोन प्राचीन मुर्ती नंदीजवळ ठेवलेल्या आहेत.  

गोदावरी काठी गंगाखेड या प्रसिद्ध तीर्थस्थळी बालाजीचे मंदिर आहे. चारठाणा येथील नृसिंह तीर्थ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मंदिरात नृसिंहाची मुर्ती नाही. ती गावात देवीच्या मंदिरात एका भिंतीवर आढळते.  जिंतूरला नृसिंह मंदिर आहे. नांदेड जिल्ह्यात गोदावरी काठी राहेर येथील नृसिंह मंदिर तेराव्या शतकांतील अतिशय चांगल्या अवस्थेत आहे. पोखर्णी (जि. परभणी) येथे नृसिंह मंदिर आहे.  

खामनदीच्या काठी शेंदूरवादा (ता. बीडकीन जि. औरंगाबाद) येथे शिवकालीन सुंदर विठ्ठल मुर्ती आहे. विठ्ठलाला विष्णुचा अवतार मानला गेला आहे. पानगांव (ता. परळी जि. बीड) येथील विठ्ठल मंदिर अकराव्या शतकांतील प्रसिद्ध असे मंदिर आहे. ही विठ्ठलाची मुर्तीही देखणी आहे.  औंढा नागनाथ या ज्यांतिर्लिंग मंदिरात तळ्यात सापडलेली अप्रतिम अशी विष्णुमूर्ती काचेत ठेवलेली आढळून येते. मराठावाड्यात अशा पद्धतीनं विष्णुमुर्ती आढळून येतात.

पूर्वीच्या काळी आक्रमणाच्या भितीने मंदिरातील मुर्ती तळ्यात विहिरीत लादणींत लपवून ठेवल्या गेल्या. मग कालांतराने भिती ओसरल्यावर संकट टळल्यावर या मंदिरात घडविण्यास सोपी म्हणून महादेवाची पिंड ठेवल्या गेली. अभ्यासकांनी अशी मंदिरे शोधून त्यावरच्या मुर्तींचा अभ्यास करून माहिती लिहून ठेवली आहे. अजून बर्‍याच मंदिरांचा अभ्यास होण्याची गरज आहे. 

मुळात सगळ्यात पहिल्यांदा सामान्य माणसांची प्राचीन मंदिरं- बारवा-लेण्या-गढ्या-किल्ले-दर्गे यांच्याबाबतची अनास्था दूर होण्याची नितांत आवश्यकता आहे. मगच हा विषय ऐरणीवर येईल आणि काहीतरी मार्ग सापडेल.(जून्या दर्ग्यांचा मकबर्‍यांचा विषय निघाला की काही जण झटकून टाकतात. याचा आपला काहीच संबंध नाही असे म्हणतात. पण या वास्तू भारतीय परंपरेतील आहेत याचा त्यांना विसर पडतो. मूळात समाधी स्थळे बांधणे आणि त्यांची पूजा करणे ही आपलीच परंपरा आहे). 

देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही संस्कृती जागृती अभियान राबवितो आहोत. तूमच्या परिसरांतील जूनी मंदिरे, मुर्ती, जून्या वास्तू, गढी, वाडे, दर्गे-मकबरे यांची माहिती जरूर कळवा. व्हॉटसअप वर त्याचे फोटो पाठवा. स्थानिक सहकार्य करू इच्छिणार्‍यांची नावेही पाठवा. 

चारठाणा येथे संस्कृती संवर्धनाच्या अभियानात स्थानिक लोकांनी मोठी चळवळ चालवली आहे. त्यांनी एक आदर्श मराठवाड्यात आपल्या कृतीने  समोर ठेवला आहे.याप्रमाणे इतरत्रही काम सुरू झाले पाहिजे.

(या विषयात रस आसणार्‍यांसाठी खाली मंदिरांची यादी परत एकदा देत आहे.)          

(इ.स. 1000 ते इ.स. 1100 काळातील मराठवाड्यातील सुंदर मंदिरे - 1. खडकेश्वर मंदिर जामखेड, ता. अंबड जि. जालना, 2. केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी, ता, अंबाजोगाई जि. बीड, 3. सिद्धेश्वर मंदिर होट्टल, ता. देगलूर जि. नांदेड, 4. सोमेश्वर मंदिर, होट्टल 5. विठ्ठल मंदिर पानगांव, ता. परळी, जि. बीड 6. नागनाथ मंदिर, औंढा, जि. हिंगोली 7. गुप्तेश्वर मंदिर, धारासूर ता. गंगाखेड, जि. परभणी.8. अन्वा शिव मंदिर ता. भोकरदन जि. जालना.)

(इ.स. 1100 ते 1200 या काळातील त्रिदल मंदिरे 1. निळकंठेश्वर मंदिर निलंगा, जि. लातूर, 2. कंकाळेश्वर मंदिर बीड, 3. शिवमंदिर उमरगा, जि. उस्मानाबाद 4. महादेव मंदिर माणकेश्वर, ता. परंडा, जि. उस्मानाबाद 5. वडेश्वर मंदिर, अंभई, ता.सिल्लोड, जि. औरंगाबाद 6. केशव मंदिर, केसापुरी ता. माजलगांव जि. बीड)

(इ.स. 1200 ते 1300 या काळातील उत्तर यादव कालीन मंदिरे. 1. अमलेश्वर मंदिर 2. सकलेश्वर मंदिर 3. खोलेश्वर मंदिर -तिन्ही मंदिरे अंबाजोगाई येथील 4. नरसिंह मंदिर राहेर जि. नांदेड 5. शिवमंदिर येळूंब जि. बीड 6. नरसिंह मंदिर-चारठाणा ता. जिंतूर जि. परभणी (येथे अजूनही 5 मंदिरे आहेत) 7. नागनाथ मंदिर-पाली जि. बीड) 

(या लेखासाठी डॉ. प्रभाकर देव यांच्या ‘मराठवाड्यातील प्राचीन मंदिर स्थापत्य शिल्पाविष्कार’- अनुवाद सौ. कल्पना रायरीकर यांच्या पुस्तकाचा आधार घेतला आहे).    

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Saturday, September 19, 2020

अन्वा महादेव मंदिर : देखणा शिल्पाविष्कार!

 

उरूस, 19 सप्टेंबर 2020 

अजिंठा डोंगररांगा आणि परिसरांत अतिशय अप्रतिम असे निसर्गसौंदर्य आहे, कातळात कोरलेल्या लेण्या आहेत. या शिवाय दोन अतिशय प्राचीन अशी मंदिरे आहेत. ही मंदिरे महाराष्ट्राच्या एकुणच मंदिर स्थापत्य शैलीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मानली जातात. यातील जंजाळा किल्ल्या जवळचे अंभईचे वडेश्वर मंदिर हे त्रिदल पद्धतीचे पण त्याची बरीच पडझड झालेली आहे. नविन बांधकाम करताना जून्या बर्‍याच गोष्टी नाहिशा झाल्या. 

पण दूसरे जे मंदिर वडेश्वरापेक्षा प्राचीन आणि अतिशय महत्त्वाचे आहे ते म्हणजे अन्वा येथील शिव मंदिर. हे मंदिर अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. इ.स. 1000 ते 1100 या काळातील आठ महत्त्वाची मंदिरे मराठवाड्यात आहेत.    त्यापैकी हे एक अतिशय सुंदर सुबक असा शिल्पाविष्कार असलेले मंदिर.

औरंगाबाद अजिंठा मार्गावर अजिंठ्याच्या अलीकडे गोळेगांव वरून डाव्या बाजूला जो रस्ता आत जातो त्याच रस्त्यावर 8 कि.मी. अंतरावरील अन्वा गावात हे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरांची अतिशच चांगली बांधबंदिस्ती दुरूस्ती पुरातत्व खात्याने केली आहे. मंदिराची संरक्षक भिंत उभारल्या गेली आहे. संपूर्ण परिसरांत दगडी फरशी बसवली आहे. मंदिराचीही डागडुजी करण्यात आली आहे. मंदिराला लोखंडी खांबांचा आधार देवून पुढील पडझड होण्यापासून वाचवले आहे. 


हे मंदिर उत्तर चालूक्यांच्या काळातील आहे. याला लागूनच भोकरदन ही एकेकाळची राष्ट्रकुटाची राजधानी असलेले गाव आहे. राष्ट्रकुटांची सत्ता लयाला गेल्यावर या परिसरावर उत्तर चालुक्यांची सत्ता होती. त्या काळातील हे मंदिर आहे.

अन्व्याच्या तूल्यबळ त्याकाळातील फारच थोडी मंदिरे महाराष्ट्रात आहेत. बदलापुर अंबरनाथचे शिवमंदिर, कोल्हापूरजवळील खिद्रापूरचे कोपेश्वर शिवमंदिर शिवाय विदर्भातील काही मंदिरे या काळातील आहेत.

अतिशय देखणे असे कोरीव स्तंभ हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. पाच सहा फुटी उंच पीठावर हे मंदिर विराजमान आहे. मंदिर पूर्वाभिमुखी असून त्याला दक्षिण आणि उत्तर दिशेनेही पायर्‍या आहेत. तिन्ही बाजूच्या पायर्‍यांवरून आपण प्रदक्षिणापथावर येतो. पण मंदिरात प्रवेश मात्र फक्त पूर्व दिशेनेच ठेवलेला आहे. 

एक दोन नाही तर तब्बल 50 कोरीव देखण्या स्तंभावर हे मंदिर तोलल्या गेलेले आहे. मंदिराच्या बाह्यभागावर अतिशय सुंदर नाजूक असे मुर्तीकाम केलेले आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे विष्णूच्या शक्ती रूपातील म्हणजेच स्त्रीरूपातील मुर्ती. अशा मुर्ती फारशा कुठे आढळून आल्याची नोंद नाही. विष्णूची शंख, चक्र, गदा व पद्म ही चारही चिन्हे या मुर्तींच्या चार हातात आहेत. त्या स्त्रीरूपात दाखविल्या म्हणजे त्या मूर्ती लक्ष्मीच्या नाहीत. यांना विष्णूची शक्ती असे संबोधले गेलीे आहे. 


गर्भगृहाचे द्वार अतिशय कोरीव कामगिरीने नटलेले आहे. एकानंतर एक अशा चार द्वारशाखा या ठिकाणी आढळून येतात. गर्भगृहात मध्यावर महादेवाची पिंड आहे. 

मंदिराच्या मंडप छताला मध्यभागी अर्धवट उमलते खाली लोबलेले फुल कोरलेले आहे. त्याच्या भोवती आठ दिशांना म्हणून आठ फुले कोरलेली आहेत. ही सर्व रचना एक चौरस दगडी चौकटीत  बसवलेली आहे. मंडपाच्या जमिनीवर वर्तूळाकार असे उंचावलेले पीठ आहे. त्यावर नंदी बसवलेला आहे. तिन्ही बाजूला बसण्यासाठी ओटे आहेत. खांबांची रचना अशी आहे की कुठेही बसले तरी सभामंडपाच्या मध्यभागी आपण पाहू शकतो. एकही खांब मध्ये येत नाही. यावर हा अंदाज लावता येतो की या ठिकाणी नृत्य, संगीत सेवा अर्पण केली जात असावी. आणि त्यासाठी गर्भगृहाची दिशा सोडून इतर तिनही ठिकाणी लोक बसून त्याचा आनंद घेत असावेत.


भारतीय परंपरेत पुजेचे दोन प्रकार सांगितले आहेत. एक म्हणजे रंगभोग आणि दुसरा अंगभोग. धुप दिप वस्त्र फुले गंध अक्षता या सगळ्याला अंगभोग म्हणतात. तर रंगभोग म्हणजे गायन वादन नृत्य. मंडपाच्या रचनेवरून येथे रंगभोग पद्धतीने पुजा होत असावी. याला पुरावा म्हणजे गायन वादन करणारे भक्त या मंदिरावर कोरलेल्या शिल्पांमधून दिसून येतात. अशीच शिल्पे होट्टल आणि धर्मापुरी येथेही आढळून आलेले आहेत.  

मंदिराच्या बाह्यभागात गजलक्ष्मी आणि नृसिंह शिल्पे देवकोष्टकांत बसवलेली आहे. ती खुप देखणी आहेत. मंदिराच्या  बाह्य भागात हंसपट्टीका, सिंहपट्टीका आढळून येतात. 

अन्व्याच्या मंदिराचा परिसर आता स्वच्छ करण्यात आला आहे. पण मंदिर संरक्षक भिंतीच्या बाहेरील परिसरांत मात्र घाण बकालीचा अनुभव येतो. ग्रामपंचायतीने याची जबाबदारी घेवून मंदिरालगतचा भाग स्वच्छ चांगला केला तर मंदिराचे सौंदर्य वाढेल. पर्यटकांना इथपर्यंत आणता येईल पण परिसराची बकाली पाहून तो परत येण्याची शक्यता नाही.

हे मंदिर पूर्वी विष्णुचे अथवा लक्ष्मीचे असावे असा अंदाज बाहेरील शिल्पांवरून वर्तवल्या जातो. पण अर्थात हा अभ्यासकांचा विषय आहे. सामान्य दर्शकाला शिल्पांचे सौंदर्य न्याहाळायचे असते. हे शिल्पसौंदर्य पाहून तो विस्मयचकित होतो. एक हजार वर्षांपूर्वी हा प्रदेश कलात्मकदृष्ट्या किती संपन्न होता याचा पुरावाच या मंदिरावरील अप्रतिम कोरीवकामातून मिळतो.

हा प्राचीन वारसा फार महत्त्वाचा आहे. आपल्या अगदी जवळच हे ठिकाण आहे. किमान एकदा तरी हे मंदिर नजरेखालून घातले पाहिजे.   

(अन्व्या शिवायची इ.स. 1000 ते इ.स. 1100 काळातील मराठवाड्यातील महत्वाची सुंदस मंदिरे - 1. खडकेश्वर मंदिर जामखेड, ता. अंबड जि. जालना, 2. केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी, ता, अंबाजोगाई जि. बीड, 3. सिद्धेश्वर मंदिर होट्टल, ता. देगलूर जि. नांदेड, 4. सोमेश्वर मंदिर, होट्टल 5. विठ्ठल मंदिर पानगांव, ता. परळी, जि. बीड 6. नागनाथ मंदिर, औंढा, जि. हिंगोली 7. गुप्तेश्वर मंदिर, धारासूर ता. गंगाखेड, जि. परभणी.)

(इ.स. 1100 ते 1200 या काळातील त्रिदल पद्धतीची मंदिर शैली विकसित झाली. अशी सहा मंदिरे मरावाड्यात आहेत. 1. निळकंठेश्वर मंदिर निलंगा, जि. लातूर, 2. कंकाळेश्वर मंदिर बीड, 3. शिवमंदिर उमरगा, जि. उस्मानाबाद 4. महादेव मंदिर माणकेश्वर, ता. परंडा, जि. उस्मानाबाद 5. वडेश्वर मंदिर, अंभई, ता.सिल्लोड, जि. औरंगाबाद 6. केशव मंदिर, केसापुरी ता. माजलगांव जि. बीड) 

(या लेखासाठी डॉ. प्रभाकर देव यांच्या ‘मराठवाड्यातील प्राचीन मंदिर स्थापत्य शिल्पाविष्कार’- अनुवाद सौ. कल्पना रायरीकर यांच्या पुस्तकाचा आधार घेतला आहे).  

(फोटो सौजन्य AKVIN tourism)  

  

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Friday, September 18, 2020

खालीद उमर - कायद्याने तोडली कमर!


उरूस, 18 सप्टेंबर 2020 

शर्जिल इमाम याच्यावर गुन्हा दाखल करून तुरूंगात टाकण्यात आले तेंव्हा मी शिर्षक दिले होते, ‘शर्जिल इमाम-कायद्याने केले काम तमाम’. काही दिवसांत असाच मथळा परत वापरायची वेळ येईल याची  खात्री होतीच. यावेळी पाळी आली आहे उमर खालीदची. 

तुकडे तुकडे गँगचा पोस्टर बॉय असलेला उमर खालीद कधी ना कधी तपास यंत्रणेच्या हाती लागणार यात काही शंकाच नव्हती. त्याला पूर्वीही अटक झाली होती. तेंव्हा जामिन मिळाला. सुटका झाली. पण त्याच्या पुढील काळातील कारवाया पाहात हा परत अडकणार हे स्पष्ट दिसतच होते. 

1960 नंतर भारतात दोन प्रकारची आंदोलने भारतीय लोकशाहीला आतून पोखरून टाकत होती. एक होता नक्षलबारी गावातून सुरू झालेला नक्षलवाद. आणि दुसरा होता पाकिस्तान प्रेरीत कश्मीरमुद्द्यावरून सुरू झालेला इस्लामी आतंकवाद. या दोन्हीवर विविध मार्गांनी सतत कारवाया झाल्या आहेत. त्या अपुर्‍या होत्या किंवा कायद्यातील पळवाटा त्यांना वाचवत होत्या, डावे पुरोगामी बुद्धीवंत त्यांना पाठिंबा देत होते, कायदेतज्ज्ञ असलेली वकिल मंडळी त्यांना न्यायालयात सोडवत होती. माध्यमांतून डावी विचारसरणी आणि कश्मीरमधील फुटीर यांना मोठी सहानुभूती मिळत होती. 

उमर खालीद हा दिल्ली दंग्यांमध्ये, शाहिन बाग आंदोलन हिंसक बनविण्यात सहभागी होता याचे सकृतदर्शनी पुरावे समोर आले आहेत. आणि त्यांच्याच आधारावर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

दिल्ली दंग्यांचा सुत्रधार ‘आप’चा नगरसेवक ताहिर हुसेन, आणि दुसरा आरोपी खालीद सैफी यांच्यातील दूवा उमर खालीद होता. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप भारतात येतील तेंव्हा भारतात अस्वस्थता निर्माण करण्याचा एक डाव होता. हे समोर आलं आहे. 

या विषयाला वेगळं वळण देण्यासाठी म्हणून हिंदू मुसलमान किंवा भाजप संघ विरूद्ध इतर असे सांगितल्या जाते. खरं तर नक्षलवाद आणि इस्लामिक विविध गटांच्या कारवाया यांचा इतिहास वर सांगितल्याप्रमाणे किमान पन्नास वर्षांचा आहे. त्यात कुठले एक सरकार आणि कुठली एक विचारसरणी यांच्यावर टीका करून मुळ प्रश्‍न सुटणार नाही. 

मोदी पंतप्रधान होण्या अगोदर सर्वच सरकारांनी हा धोका ओळखला होता पण त्यावर कडक कारवायी करण्याचे टाळले होते. पोलिस यंत्रणा न्यायालयात होणार्‍या निर्णयांनी हतबल झाली होती. कायदेतज्ज्ञ म्हणवून घेणारे अशा गुन्हेगारांना लिलया सोडवून आणत होते. 

दुसरीकडून सरकार नावाची यंत्रणा पोलिसांनी केलेल्या मेहनतीवर पाणी फिरवत होती. म्हणजे तेच अधिकारी, तेच पोलिस, त्यांचे तेच खबरे पण यांनी नक्षलवाद व इस्लामिक आतंकवादी संघटना यांच्यावर केलेल्या कारवाया फलद्रूप होताना दिसत नव्हत्या. 

मोदी पंतप्रधान झाल्यापासून या दोन्ही बाबत एक निश्चित कडक धोरण ठरविण्यात आले. आणि त्याची कठोर अंमलबजावणी केली जावी अशा सुचना सर्व यंत्रणांना मिळाल्या. याचाच परिणाम म्हणून आता या अटका होताना दिसत आहेत. 

उमर खालीदला अटक झाली त्या सोबतच दूसरी एक अतिशय मोलाची बाब घडत आहे. सर्वसामान्य जनतेतून यांना असलेली मान्यता/ पाठिंबा संपून जाताना आढळून येतो आहे. जे पत्रकार यांच्यावर आधी स्तूती सुमने उधळत होते तेच आता यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्या बाबतचे छोटे मोठे पुरावे समोर आणत आहेत. समाज माध्यमांनी एक मोठी ताकद सिद्ध केली आहे. शर्जिल इमामची वक्तव्ये, फोटो तसेच आता उमर खालीदचे व्हिडिओही समाज माध्यमांवर फिरत आहे. त्यातील जे निखालस खोटे आहेत ते बाजूला ठेवू. पण जी वक्तव्यं खरंच त्यांनी केली आहेत त्यांचा प्रसार फार मोठ्या प्रमाणावर झाल्याने यांच्याबाबत समाजमन विरोधात जाताना दिसून येते आहे.

कायदा त्याचे काम करतो आहे पण सोबतच समाजमाध्यमांची ही भूमिका पण याला फार पोषक राहिली आहे. 

तिसरी आघाडी आता डाव्या विचारवंतांच्या बाबतीत उभी राहिलेली दिसून येते आहे. अगदी आत्ता आत्तापर्यंत खोट्या गोष्टी अगदी रेटून नेलेल्या आपल्याला दिसून येतील. पण कायद्याने केलेली कारवाई, समाजमाध्यमांची भूमिका यामुळे या डाव्या पुरोगामी विचारवंतांना आता उमर खालीद, शेहला राशीद, शर्जिल इमाम, जिग्नेश मेवाणी यांच्या देशविरोधी चुक भूमिकांचे समर्थन करणे अवघड होवून बसले आहे. तात्काळ यावर प्रचंड अशा प्रतिक्रिया उमटू लागतात. 

न्यायालयात जेंव्हा निकाल लागायचा तेंव्हा लागो पण समाजमाध्यमांवर उथळपणे काम करणारे वगळले तर गंभीर पण खुप लोक आहेत. ते या खोटेपणाचा बुरखा लगेच फाडत आहेत. 

राम मंदिर प्रकरणात  मस्जिदीखाली सापडलेल्या अवशेषांवरून पुरोगाम्यांची वाचाच बंद झाली. रोमिला थापर व इरफान हबीब सारख्यांनी जो खोटा प्रचार चालवला होता त्याला लगेच चाप बसवला गेला. हे करण्यात समाजमाध्यमांचा मोठा वाटा आहे. वैचारिक खोटा प्रचार हाणून पाडल्या जातो आहे. 

अटक झालेल्या सफुरा झरगर, शर्जिल इमाम, देवांगना कालिता, नताशा नरवाल या नावांत आता उमर खालीद हे नाव पण सामील झाले आहे. लवकरच कन्हैया कुमारचे पण नाव यात येण्याची शक्यता आहे. 

संविधान बचाव म्हणत संविधान न मानणाऱ्यांच्या आता कायद्याने मुसक्या आवळ्या चालल्या आहेत. आता यांना पाठिंबा देणारी फळी मोडून काढण्याची गरज आहे.  हे कामही होताना दिसून येते आहे. हा लोकशाहीसाठी शुभशकून आहे.   

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575