Thursday, July 2, 2020

या फोटोला पुलित्झर देणार का?


उरूस, 2 जूलै 2020 

हा फोटो देण्याची माझी जराही इच्छा नव्हती. विवेक बुद्धी असलेल्या माणसाने असे करू नये हे पण मला पूर्ण कळते. पण काल सकाळी ही घटना कश्मिरात घडली आणि त्यावरून जी भयानक चर्चा जमात-ए-पुरोगामींनी केली त्यामुळे माझा नाईलाज होतो आहे. नारायण कुलकर्णी कवठेकर यांनी आपल्या एका कवितेत असं लिहीलं आहे ‘गाढवांच्या गर्दीत घोड्यांनी काय करावे? अपवाद म्हणून का होईना पण एक सणसणीत लाथ घातली पाहिजे.

पण यावर जेवढा विचार
कराल तेवढा थोडा आहे
शेवटी गाढवांना किमान एवढे
कळले तरी पुरे
की हे गाढव नसून
हा घोडा ताहे

-नारायण कुलकर्णी कवठेकर (मागील पानावरून पुढे चालू, मौज प्रकाशन, मुंबई)

त्या कवितेप्रमाणे एक लाथ घालण्याची वेळ आली आहे असे प्रकर्षाने वाटले.

कश्मिरात दोन आतंकवादी एका मस्जिदीत लपले असल्याची खबर सुरक्षा दलाच्या सैनिकांना लागली. त्यांना घेरण्यात आले. या आतंकवाद्यांनी त्यांच्याबाजूने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यात एका 65 वर्षांच्या सामान्य कश्मिरी नागरिकाचा बळी गेला. (मी मुद्दाम त्याचे नाव सांगत नाही. बघु वाचणारे पुरोगामी काय प्रतिक्रिया देतात.) या वृद्ध कश्मिरी नागरिकाचा 3 वर्षांचा छोटा नातू त्या प्रेतावर बसून रडतो आहे असा हा हृदयद्रावक फोटो आहे.

सुरक्षा दलाच्या जवानांनी त्या मुलाला वाचविण्यासाठी प्राण पणाला लावले. या गोंडस बाळाला बाजूला सरक अशी खुण करणारा फोटो आज इंडियन एक्स्प्रेसने अगदी पहिल्या पानावर छापला आहे. (सोबत हा फोटो पण देत आहे.)


शेवटी या छोट्या बाळाला वाचविण्यात सुरक्षा दलाला यश आले. ज्या सुरक्षा अधिकार्‍याने या मुलाला पटकन कडेवर उचलून घेतले (त्याचेही नाव सांगत नाही. बघु पुरोगामी काय अंदाज बांधतात तो). त्याला गाडीत बसवून बिस्कीट चॉकलेट देतो म्हणूत त्याचे मन गुंतविण्याचा प्रयत्न केला. पण तो मुलगा आईचे नाव काढून मुसमुसत होता. त्याच्या तोंडून बाकी शब्दच फुटत नव्हते. या गोड बाळाला त्याच्या कुटूंबात सुरक्षीत पोचविण्यात आले.
खरं तर या घटनेवर कुठलेच आणि कसल्याच प्रकारचे राजकारण करण्याची काहीच गरज नव्हती. पण या नागरिकाचा मृत्यू सुरक्षा रक्षाकांच्या गोळीनेच झाला असला अश्लाघ्य दावा पुरोगाम्यांनी केला. वास्तविक माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षा सैनिकांनी सविस्तर माहिती नंतर दिली. अगदी किती गोळ्या झाडल्या त्या जागा दाखवल्या. समोरच्या बंद दुकानाच्या शटरवर त्या गोळ्यांच्या निशाण्या आहेत. रस्त्यावर सांडलेले रक्त दाखवले. गोळ्या मस्जिदीच्या दिशेने आल्या ते पण अगदी सहज तपासता येते.

असा सगळा ‘हा सुर्य हा जयद्रथ’ पुरावा असतानाही सुरक्षा दल सामान्य नागरिकांवर कसा अन्याय करतो आहे, सामान्य कश्मिरींचा जीव यांच्या गोळ्यांनी घेतला जातो आहे असा पाक धार्जिणा घाणेरडा देशद्रोही प्रचार केला जातो आहे तेंव्हा अपरिहार्यपणे हा फोटो शेअर करावा लागला.

(पुरोगाम्यांच्या देशविरोधी प्रचाराचा पुरावाही काही वेळातच समोर आला.आतंकवाद्यांच्या पाकिस्तानी ट्विटरवर याबाबत मेसेजही सापडला. हा मृत्यू सुरक्षा दलानेच केला असा प्रचार लगेच चालू करा. कारण आपली बदनामी होते आहे असा हा मजकूर आहे. टाईम्स नाऊ या वाहिनीवर याबाबत सविस्तर चर्चा बुधवार 1 जूलै 2020 ला करण्यात आली. ऑप इंडिया या यु ट्यूब वरही याबाबत माहिती उपलब्ध आहे.)

नुकतेच कश्मिरातील असे फोटो निवडून केल्या गेलेल्या फोटो पत्रकारितेला ‘पुलित्झर’ पुरस्काराने सन्मानिल्या गेले. आता या फोटोला पुरस्कार देणार अहात का? भाजप प्रवक्त संबित पात्रा यांनी हा फोटो आपल्या ट्विटरवर शेअर करून पुरोगाम्यांना कोंडित पकडले.

ज्या ज्या कुणी पुलित्झर पुरस्कारांचे कौतूक केले आहे त्या सर्वांना माझे आवाहन आहे त्यांनी आता या फोटोवर आपली प्रतिक्रिया द्यावी.

तामिळनाडूमध्ये दोन जणांना (वडिल आणि मुलगा) लॉकडाउनमध्ये ठरलेल्या वेळेपेक्षा उशीरा दुकान उघडे ठेवले या क्ष्ाुल्लक कारणाने पोलिसांनी पकडून नेले. कोठडीत मारहाणीत या दोघांचा मृत्यू झाला. अमेरिकेतील गुन्हेगार असलेल्या जॉर्ज फ्लॉईडचे जे बोंबले आहेत त्यांचा आवाज आता कुठे गप्प झाला आहे? ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ म्हणणार्‍यांना आपल्याच देशातील सामान्य निर्दोेष माणसांचा मृत्यू पोलिस कोठडीत झाला तर त्याची वेदना जाणवत नाही का? तेंव्हा यांची कातडी गेंड्याची होते का?

एक वगळेच युद्ध देशात सुरू झाले आहे. काहीही घडले तरी एक देशविरोधी टोळी सक्रिय होते आणि आरडा ओरड सुरू करते. कश्मिरातील हे निरागस बालक तूमच्या राजकारणाचा विषय का बनते? याच्या आजोबांचा बळी घेणार्‍या आतंकवाद्यांना कुणी प्रोत्साहन दिले आहे?

हुरियत कॉन्फरन्सचे सय्यद अली शहा जिलानी यांना हुरियतच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागतो. परदेशांतील आपल्या मुला बाळांकडे उर्वरीत आयुष्य काढण्यासाठी देश सोडून जाण्याची वेळ येते हा आपल्या कश्मिर विषयक कडक धोरणाचा परिपाक आहे. गेल्या 6 महिन्यात 119 आतंकवाद्यांचा खात्मा केला जातो. एक एक आतंकवादी हुडकून त्यांचा समूळ नायनाट करण्याची मोठी मोहिम 370 कलम हटविल्यापासून जोमाने सुरू आहे.

370 कलम हटवताच लेह लदाख मध्ये सैन्याच्या हालचालींना गती मिळाली. सीमाभागात रस्ते, नदीवरील पुल यांची कामे जोरात सुरू झाली. सर्वात उंचीवरील विमानतळाची धावपट्टीची डागडुजी होवून तिचा वापर सुरू होतो. याचाच परिणाम म्हणजे चीनने केलेली गलवान मधील धुसफुस.

हे सगळं माहित असताना, चीनसोबत एकाच वेळी विविध पातळीवर संघर्ष सुरू असताना, तिकडे पाकिस्तानलाही सडेतोड जबाब दिला जात असताना हे पुरोगामी नेमकी देशविरोधी भूमिका का घेत आहेत?
सैन्याचे सर्वोच्य अधिकारी लदाखमध्ये जखमी सैनिकांची विचारपुस करायला जातीनं जात आहेत. एकाचवेळी मुत्सेद्दीगिरी, प्रत्यक्ष लष्करी हल्ल्याची पूर्ण तयारी, शस्त्र न वापरता साध्या साधनांनी हल्ले, आर्थिक पातळीवर बहिष्कार, चीनी ऍपवर बंदी असे सगळेच मार्ग अवलंबिले जात आहेत. आणि सर्व पुरोगामी मात्र, ‘हा भारताचा पराभव आहे, आपल्या 20 सैनिकांचे बळी घेणारे हे सरकार नामर्द आहे, आपल्या भूमीवर चीनने आक्रमण केले आहे, ऍप वर बंदीने काय होणार मॅप बदलला जातो आहे’ अशी ओरड का करत आहेत?

राजकारण राजकारणाच्या पातळीवर चालत राहिल. अधिकारी पातळीवर चर्चा चालू राहिल. सैनिक त्यांच्या पातळीवर संपूर्ण संघर्षासाठी सज्ज आहेतच.  असल्या ‘पुलित्झारी’ पुरस्काराच्या जहरी प्रचाराचे विष तूमच्या मनात पेरले जात आहे ते केवळ आणि केवळ तूमचे मनोधैर्य खचावे म्हणून. हेच आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात केल्या गेले. कॉंग्रेस सारखा सर्वात जूना पक्षच या प्रचाराचे कंत्राट घेवून देशद्रोह करताना दिसत आहे. एक सच्चा देशप्रेमी नागरिक म्हणून तूम्ही या अपप्रचाराला बळी पडू नका ही हात जोडून विनंती.

आतंकवाद्यांच्या गोळीला बळी पडलेल्या त्या भारतीय नागरिकाला माझी विनम्र श्रद्धांजली.

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, June 29, 2020

कॉंग्रसचे गांधीवादी चौधरी विरूद्ध नेहरूवादी केतकर


उरूस, 29 जून 2020 

कॉंग्रेस ‘महात्मा गांधीं’ नावाचे चलनी नाणे आपल्या हक्काचे म्हणून आपल्या सोयीने वापरत आली आहे. अगदी कॉंग्रेस नेतृत्वाने महात्मा गांधींचे आडनावही वापरले. आता तर प्रियंका यांचा मुलगा रेहान हा पण वाड्रा हे आडनाव न लावता गांधी आडनाव लावतो आहे. (पाकिस्तानात असिफ अली झरदारी यांचा मुलगा बिलावल याने आपल्या आईचे आडनाव भुट्टो लावले कारण त्यात एक मोठी राजकीय सोय आहे.)

कॉंग्रेस मध्ये गांधीवाद विरूद्ध नेहरूवाद असा काही संघर्ष होता का? का उगाच आज काहीतरी शब्दचमत्कृती म्हणून वरील शीर्षक वापरतो आहे?

हा वाद आधीपासून होता याचा पुरावा स्वत: महात्मा गांधी यांनीच दिलेला आहे. पत्रकारांनी त्यांना नेहरूं सोबत तूमचे नेमके कोणते वैचारिक मतभेद आहेत असे विचारले असता गांधींनी स्वच्छपणे साध्या सोप्या शब्दांत उत्तर दिले, ‘इंग्रज भारतात राहिले तरी मला चालतील पण त्यांची धोरणे मात्र गेलीच पाहिजे हा माझा आग्रह आहे. उलट जवाहर मात्र इंग्रज जावा यासाठी आग्रही आहे इंग्रजांची धोरणं राहिली तरी चालतील या मताचा आहे.’

महात्मा गांधींच्या हत्येनंतर पुढे कॉंग्रेसचा सत्तातूर सत्तालंपट इतिहास सर्वांसमोर आहे. गांधींच्या शरिराची हत्या जरी नथुराम गोडसेंनी केली तरी विचारांची हत्या मात्र नेहरू आणि पुढे इंदिरा-राजीव गांधी यांच्या कॉंग्रेसनेच केली.

विश्वंभर चौधरी हे गांधी मानणार्‍या, पदाची अपेक्षा न बाळगणार्‍या सच्च्या सेवादली कॉंग्रेसी कार्यकर्त्याचे प्रतिनिधी आहेत. (कॉंग्रेसचा पण सेवादल होता हे बहुतांश लोकांना माहितही नसेल). त्यांनी आपली व्यथा 27 जूनला समाजमाध्यमांत फेसबुक पोस्टवरून व्यक्त केली. आण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मिडियाने ‘हाईप’ केलेले आंदोलन म्हणून हिणवल्या गेले. शिवाय अण्णा हे संघी आहेत असा आरोपही केला गेला. वारंवार होणार्‍या या आरोपांनी व्यथित होवून विश्वंभर यांनी लिहीले.

नेमके त्याच काळात 20 जूनच्या साप्ताहिक साधनाच्या अंकात कॉंग्रेस खासदार कुमार केतकर यांनी ‘कॉंग्रेस विरोध म्हणजे नेहरू विचार विरोध..’ असा लेख लिहिला. यात त्यांनी भाजप-संघेतर पुरोगामी पक्षही कसे नेहरूंच्या विचारांना विरोध करत राहिले. कॉंग्रेस विरोधी राजकीय शक्तींना याच पुरोगाम्यांनी ताकद पुरवली. कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या लोकांना या पुरोगामी पक्षांनी कशी मदत केली. परिणामी हे सगळे नेहरू विचार विरोधी आहेत.

केतकरांनी ही मांडणी केवळ पत्रकार विचारवंत अभ्यासक म्हणून केली असती तर तीचा वेगळा विचार झाला असता. पण आता केतकर काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आहेत. पक्षासमोर भीषण राजकीय संकट उभे आहे. अशावेळी भाजपेतर इतर पुरोगामी पक्षांना विरोध करायचे काय कारण? बरं ते भलावण कुणाची करतात? सेानिया-राहूल-प्रियंका या नकली गांधींची. ज्यांनी अस्सल सच्च्या कॉंग्रेसी कार्यकर्त्यांची वाट लावली आहे.

यातही परत एक वैचारिक जमालगोटा केतकरांनी देवून ठेवला आहे. महात्मा गांधींची हत्या झाली आणि त्यानंतरही पुढे 16 वर्षे नेहरू कसे पंतप्रधान होते असं लिहीताना केतकर राजरोसपणे गांधींचा वारसा नेहरू कसे पुढे चालवित होते हे सांगू पहात आहेत. प्रत्यक्षात नेहरूंची धोरणे गांधीवादी नव्हती. नेहरू नियोजनाचे पुरस्कर्ते, गांधी विकेंद्रिकरण मानणारे, नेहरू अती सरकारवादी, गांधी अ-सरकारवादी, नेहरू उद्योग केंद्री शहर केंद्री (इंडिया)  तर गांधी ग्रामकेंद्री (भारत). मग गांधींचा वारसा नेहरू आणि पुढचे त्यांचे सत्ताधारी वारस यांनी कुठे चालवला?

केतकर कौतुक करतात ती सोनियांच्या काळात राबवल्या गेलेली अन्नसुरक्षा, शिक्षणाचा हक्क, मनरेगा, महिला सबलीकरण ही धोरणं कुणाची होती? ही डाव्या चळवळींची आग्रही मागणी होती.

मुळात जे या सर्व डाव्यांचे (कम्युनिस्टां शिवायचे पुरोगामी समाजवादी डावे) कुलगुरू डॉ. राम मनोहर लोहिया यांनी फार पूर्वीच नेहरूंच्या समाजवादी ढोंगाचे पितळ उघडे पाडले होते. महात्मा गांधींच्या हत्येनंतर 1948 ला नाशिक येथे अधिवेशन भरवून समाजवादी विचारांची मंडळी कॉंग्रेसमधून बाहेर पडली आणि त्यांनी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केला.  गांधी जिवंत होते तोपर्यंत कॉंग्रेस अंतर्गत समाजवाद्यांना नैतिक आधार वाटत होता. पण त्यांच्या हत्येनंतर मात्र हा आधार संपला. कारण नेहरूंची सत्तालालसा कॉंग्रेस पक्षाला समाजवादी धोरणे राबवू देणार नाही म्हणून कॉंग्रेस अंतर्गत राहून काही उपयोग होणार नाही अशी आग्रही मांडणी लोहियांनी केली.

इतकेच नाही तर नेहरूंच्या समाजवादाच्या कृत्रिम प्रेमात अशोक मेहतांसारखे मोठे नेते अडकू पहात आहेत, जयप्रकाश नारायण मऊ पडत आहेत हे पाहून समाजवादी पक्षात फुट पाडत लोहिया यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. पुढे त्यांनी नेहरूंच्या विरोधात 1962 मध्ये निवडणुकही लढवली. त्यात लोहियांचा पराभव झाला. पण 1963 च्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून त्यांनी लोसभेत प्रवेश घेतला. संसदेत नेहरूंचा समाजवाद कसा नकली आहे हे ते जोरदारपणे मांडत राहिले.

केतकर एकीकडे भाजप सोबतच लोहियांच्या पुरोगामी शिष्याना नेहरूंच्या विचारांचे विरोधक म्हणत आहेत पण दुसरीकडे त्यांचीच धोरणे राबवू पाहणार्‍या सोनियांची तळी उचलत आहेत.

विश्वंभर चौधरी यांनी आग्रह धरला त्याप्रमाणे कॉंग्रेसने रस्त्यावर उतरून भाजप सरकार विरूद्ध आंदोलनं केली पाहिजेत. जनसामान्यांपर्यंत पोचले पाहिजे. आण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधात हाक देताच उभा देश आणि विशेषत: तरूणाई पाठिशी उभी राहिली. ही तळमळ म्हणजेच गांधी विचारांशी जूळणारा खादीचा धागा आहे. हे आत्ताच्या कॉंग्रेसने समजून घेतले पाहिजे. उलट आताची कॉंग्रेस म्हणजेच भ्रष्टाचाराच्या ‘खादी’ विचारांची झाली आहे.

विश्वंभर चौधरी यांची खंत असली (महात्मा) गांधींची रामराज्य वाली कॉंग्रेस उरली नसून नकली (सोनिया) गांधींची रोमराज्य वाली कॉंग्रेस उरली अशी आहे (हे शब्द माझे आहेत त्याचे खापर विश्वंभर यांच्यावर नको).  तिने आत्मपरिक्षण करावे अशी प्रमाणिक तळमळ मांडत आहेत.

केतकर मात्र कुठलेही आत्मपरिक्षण करण्यास तयार नाहीत. उलट आजही आणीबाणीचे समर्थन करत जयप्रकाश नारायण यांच्यावर आंतरराष्ट्रीय कटाचा आरोप करत आहेत. भाजप सोबतच भाजपेतर पक्षांवर कॉंग्रेस विरोधाचा ठप्पा मारत आहेत.

नुकतीच बिहार मधून बातमी आली आहे की राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखाली भाजप-नितिश कुमार विरोधी जी आघाडी बनते आहेत त्यातून कॉंग्रेस हद्दपार केली जात आहे. म्हणजे इकडे केतकर नेहरू विचार विरोध म्हणून ज्या पुरोगाम्यांना हिणवत आहेत तेच आता राजकीय तडजोड म्हणून कॉंग्रेसला सोबत घ्यायला तयार नाहीत. मग कॉंग्रेसचे राजकीय अस्तित्व बिहारात शिल्लक राहिल काय? विश्वंभर चौधरी यांची तळमळ किती खरी आहे याचा लगेच पुरावा बिहार मधील राजकीय घडामोडीं मधून येतो आहे. 

हा अंतर्विरोध नेहरूवाद गांधीवाद असा केवळ वैचारिक नाही. जनसामान्यांचा पाठिंबा नसलेले दरबारी राजकारणी आणि जनसामान्यांत मिळसळणारे त्यांचे प्रश्‍न समजून घेणारा सच्चा कार्यकर्ता असापण आहे. हेच विश्वंभर चौधरी यांना सुचवायचे आहे.

‘येथे समस्त बहिरे बसतात लोक, का मधुर भाषणे तू करिशी अनेक’ अशी परिस्थिती असताना विश्वंभर चौधरी यांचे तळमळीचे म्हणणे कोण ऐकणार? त्यांची अपेक्षा फोलच ठरण्याची शक्यता जास्त. त्यांच्यातल्या सच्च्या गांधीवाद्याला यामुळे वेदना होणार. पण जोपर्यंत नकली गांधी (सोनिया-राहूल-प्रियंका-रेहान) कॉंग्रेसला विळखा घालून बसलेले आहेत तोपर्यंत काही इलाज नाही. या नकली गांधींची चापलुसी करून खासदारकी पदरात पाडून घेणार्‍यांकडून तर कसल्याच अपेक्षा ठेवता येत नाहीत.

(छायाचित्रातील गांधी नेहरू यांचे कपडेही हा विरोध सांगायला प्रतिक म्हणून पुरेसे आहेत)
 
      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Saturday, June 27, 2020

संजय झा, कॉंग्रेसमधून बाहेर जा !


उरूस, 27 जून 2020 

फोर्ड या प्रसिद्ध कंपनीच्या मोटारी सुरवातीला फक्त काळ्याच रंगात होत्या. त्याचा मालक हेन्री फोर्ड म्हणायचा मी माझ्या ग्राहकाला मोटारीचा रंग निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. अट इतकीच की तो रंग काळाच असला पाहिजे.

याच प्रमाणे कॉंग्रेस कार्यकारिणीतील सर्व सदस्यांना पक्ष अध्यक्ष निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण अट इतकीच की ते नाव राहूल गांधी हेच असले पाहिजे.

कॉंग्रेसचे प्रवक्ते ज्येष्ठ नेते संजय झा यांनी आपल्याच पक्षाने आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करणारा लेख टाईम्स ऑफ इंडिया या मोठ्या प्रतिष्ठीत इंग्रजी दैनिकांत लिहीला. नेहरू यांनीही कसे आपल्यावर टीका करणारा लेख आपणच लिहून प्रसिद्ध केला होता हे उदाहरणही झा यांनी दिले. शिवाय पक्षाच्या सर्वच प्रमुख नेत्यांमध्ये/ कार्यकर्त्यांमध्ये कशी अस्वस्थता आहे याचीही नोंद केली. आपण सर्वांशी बोललो. पण कुणीच या अस्वस्थतेला तोंड फोडायला तयार नाही. मग आपणच ही जबाबदारी स्वीकारून हा लेख कसा लिहीला वगैरे वगैरे त्यांनी संागितले.

अपेक्षा होती तसेच घडले. कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सहीने संजय झा यांचे पक्ष प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करणारे पत्र प्रसिद्धीला देण्यात आले.

म्हणजे संजय झा यांचा जो मुळ उद्देश होता की पक्षाच्या पराभवाबद्दल वर्तमान स्थितीबद्दल चर्चा व्हावी तो राहिला बाजूला उलट आता त्यांनाच सांगण्यात आले, ‘संजय झा, कॉंग्रेसमधून बाहेर जा!’

पक्षातील मतभेदांचे पडसाद नुकत्याच पार पडलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीतही उमटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक पातळीवरील टीका करू नये असा आग्रह आर.पी.एन. सिंह यांच्यासारख्या नेत्यांनी घेतली. त्या बाजूने बहुतांश ज्येष्ठ नेते यांनी विचार मांडले. पण प्रियंका गांधी यांनी मात्र आपल्या भावाची बाजू घेत, ‘एकटे राहूल गांधीच मोदींवर टीका करण्याचे धाडस करतात. बाकी नेते कसे काय चुप बसून असतात?’ असा सूर लावला.

मग स्वाभाविकच सर्वांचे धाबे दणाणले. आणि सर्वांनीच राहूल गांधी यांच्या ‘मोदी मुझसे डरते है’ सारख्या तथ्यहीन सूरात मिसळून सूर लावला. काही तसांतच सर्वच प्रमुख कॉंग्रेंस नेत्यांच्या ट्विटरवर एकाच पद्धतीचे व्हिडिओ प्रसारीत झाले.

ज्या विषयांची चर्चा अपेक्षीत होती ती झालीच नाही. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकांत पक्षाचे 5 उमेदवार पराभूत झाले. त्यावर चर्चा व्हायला हवी होती. राजस्थानात पक्षात जी बेदिली माजली आहे त्यावर काही एक निर्णय व्हायला हवा होता. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी धोरण आखण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकार बाबत गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत ज्याची तक्रार कॉंग्रेस नेत्यांनीच केली होती. त्या बाबत काही एक निर्णय अपेक्षीत होता.

पण हे काहीच घडले नाही. लद्दाखमधील चीनी आक्रमणाबाबत राहूल गांधींची निर्बुद्ध देश विघातक भाषाच पक्षाचे अधिकृत धोरकण म्हणून मांडावी असा दबाव सर्वांवर आला.

याच आठवड्यात ‘राजीव गांधी फाउंडेशन’ला मिळालेल्या चीनी देणग्या, पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून फाउंडेशनकडे वळविण्यात आलेला निधी आदी बाबत गंभीर आरोप भाजपने केले आहेत. यावर काही एक चर्चा कॉंग्रेस कार्यकारिणीत होणे अपेक्षीत होते. चीनी कम्युनिस्ट पक्षासोबत 2008 मध्ये कॉंग्रेस पक्षाने केलेल्या कराराचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. सर्वौच्च न्यायालयात यावर एक याचिका ऍड. महेश जेठमलानी यांनी दाखल केली आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय झा यांचे लिखाण बघितले असता हे लक्षात येते की त्यांनी वापरलेली आत्मपरीक्षणाची गरज कॉंग्रेस पक्षाला किती आणि कशी आहे.

संजय झा, आरपीएन सिंह यांनी पक्षात एक वेगळी चर्चा सुरू करण्याची गरज मांडली असताना विद्वान पत्रकार राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी नेमके याच काळात सा. साधनात  एक लेख लिहून एक नवेच वाढण पक्षासमोर आणून ठेवले आहे. 20 जूनच्या आपल्या ‘कॉंग्रेस विरोध म्हणजे नेहरू विचार विरोध’ या लेखात केतकरांनी भाजप सोबतच इतर पुरोगामी पक्षही कसे नेहरू विचारांचे विरोधक आहेत हे ठासून सांगितले आहे.

आता हे केतकरांना कुणी सांगावे की आज भाजपविरूद्ध लढताना इतर विरोधी पक्षांना कॉंग्रेसची गरज आहे या पेक्षा जास्त गरज आपल्या अस्तित्वासाठी कॉंग्रेसलाच या इतर विरोधी पक्षांची आहे. अशावेळी त्यांच्यावर वैचारिक लाथा झाडण्याचे काहीही औचित्य नव्हते. पण ऐकतील ते केतकर कसले.

पी.व्हि. नरसिंहराव सरकारच्या काळात मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून जागतिकीकरणाला अनुकूल अशी आर्थिक धोरणे राबविली. हे केतकर आताच्या काळात लपवून काय मिळवत आहेत? त्याने पक्षाला या आधुनिक काळात कसा फायदा मिळणार आहे? मनरेगा, अन्नसुरक्षा सारख्या भीकमाग्या योजना राबविण्यापेक्षा आधुनिक काळात नविन पद्धतीनं गरिबांचे सबलीकरण करता येते याचा पाया मनमोहन सिंग यांनीच घालून दिला होता. हेच केतकर लोहिया प्रणित समाजवादी नेत्यांवर टीका करतात, जयप्रकाश नारायण यांच्यावर तर इंदिरा सरकार कोसळण्यासाठी आखलेल्या आंतराष्ट्रीय कटाचा हिस्सा असल्याचा गंभीर आरोप करतात आणि  मनरेगा अन्नसुरक्षा या समाजवादी योजना पक्षाने राबवाव्या या सोनिया गांधींच्या धोरणांचा उदो उदो करतात. कॉंग्रेसचा वैचारिक आघाडीवर पराभव करण्याचा मक्ता केतकरांनी घेतला आहे का? केतकर कॉंग्रेसचे वैचारिक राहूल गांधी होवू पहात आहेत का?

उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू ही लोकसभा सदस्य संख्येच्या दृष्टीने सर्वात मोठी असलेली राज्ये आहेत. या राज्यांत (तामिळनाडू वगळता) एकेकाळी कॉंग्रेस हा एकमेव बळकट मोठा पक्ष होता. आज या सर्वच राज्यांतून कॉंग्रेस पक्ष स्वत:च्या जीवावर संपूर्ण जागासुद्धा लढू शकत नाही. मणिपुरमध्ये नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकांत पक्षाचा उमेदवार तर हारलाच पण राज्य सरकार उलथून टाकण्याची खेळीही उलटली. याची कसलीही चर्चा करण्याची गरज कॉंग्रेस कार्यकारिणीला वाटलेली नाही.

राहूल गांधी यांच्या 50 व्या वाढदिवसांनिमित्त पक्षाने त्यांना परत अध्यक्षपदाचे ‘गिफ्ट’ देण्याचे ठरवलेले दिसत आहे. पण मुळात त्यांनी राजीनामा का दिला? याची चर्चा का नाही केल्या गेली? हा राजीनामा देवून आता 1 वर्ष उलटून गेले. पक्षाच्या लोकसभा निवडणुकीचा पराभव का झाला यासाठी कुठली समिती स्थापन करून एव्हाना त्याचा अहवाल यायला हवा होता. पण हे काहीच न करता आत्मपरिक्षणाची गरज व्यक्त करणार्‍या संजय झा यांची हकालपट्टी हा एकमेव साधा सोपा उपाय कॉंग्रेस पक्षाने अवलंबिला आहे.

किटकशास्त्रात अभ्यास करणार्‍या एका शास्त्रज्ञाने एका किड्याचा पाय कापला आणि त्याला चालण्याची आज्ञा दिली. तो किडा चालत राहिला. मग दुसरा पाय कापला. तरी तो चालत राहिला. असे करत करत त्याचे सर्व आठही पाय कापून टाकले. आणि त्याला चालण्याची आज्ञा दिली. तेंव्हा मात्र तो किडा गुपचुप पडून राहिला. या शास्त्रज्ञाने आपला निष्कर्ष असा काढला की, ‘किड्याचे सर्व पाय कापले असता त्याला ऐकू येत नाही.’
कॉंग्रेस पक्षाची अवस्था सध्या अशीच झाली आहे. सगळे होयबा जमा झालेले राहूल-प्रियंका यांच्या दबावात ‘किड्याचे सर्व पाय कापल्यावर त्याला ऐकू येत नाही’ असा निष्कर्ष काढण्यासाठी मजबूर आहेत. त्यांच्याकडून बाकी काय अपेक्षा करणार? संजय झा तूमची अपेक्षा चुक आहे. तूम्हीच योग्य तो इशारा ओळखा आणि तूम्हाला आता पक्षातून हाकलून देण्याआधी तूम्हीच पक्षाचा राजीनामा देवून बाहेर या.

    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Friday, June 26, 2020

नदीकिनारी, नदीकिनारी, नदीकिनारी ग ऽऽ !



काव्यतरंग, शुक्रवार 26 जून  2020 दै. दिव्यमराठी

नदीकिनारी

नदीकिनारी, नदीकिनारी, नदीकिनारी ग ऽ

अवतीभवती नव्हते कोणी
नचत होत्या राजसवाणी
निळ्या जळावर सोनसळीच्या नवथर लहरी ग ऽ

जरा निळ्या अन् जरा काजळी
ढगांत होती सांज पांगली
ढवळी ढवळी वर बगळ्यांची संथ भरारी ग ऽ !

दुसरे तिसरे नव्हते कोणी
तुझेच हसले डोळे दोन्ही
अवखळ बिजली भरली माझ्या उरांत सारी ग ऽ !

सळसळली, ग ऽ हिरवी साडी
तिनेच केली तुझी चहाडी
फडफडल्या पदराच्या पिवळ्या लाल किनारी ग ऽ !

वहात होते पिसाट वारे
तशांत मी उडविले फवारे
खुलून दिसली तुझ्या उराची नवी थरारी ग ऽ !

कुजबुजली भवताली राने
रात्र म्हणाली चंचल गाणे
गुडघाभर पाण्यांत दिवाणे दोन फरारी ग ऽ !

-ना.घ.देशपांडे, (शीळ, पृ. 59, मौज प्रकाशन गृह, 4 आ.)

या कवितेला आता जवळपास 90 वर्षे होत आली. ना.घ. यांचा कविता संग्रह प्रकाशीत झाला 1954 ला. पण शीळ या गाण्याची ध्वनीमुद्रीका निघाली होती 1932 ला. म्हणजे त्याच्या जवळपासच ही कविता लिहील्या गेली. आज ही कविता वाचणार्‍याला कुणाही सामान्य रसिकाला यात नेमके काय वेगळेपण आहे हे चटकन लक्षात येणार नाही. पण 80 च्या पुढच्या वयाचे जे हयात असतील त्यांना ही कविता वाचताच/आठवताच त्यांच्या मनावर मोरपिस फिरल्याचा भास होईल.

त्या काळातील इतर कवितांमधून ही कविता शुद्ध प्रेमाच्या आविष्कारामुळे उठून दिसते. म.वि.राजाध्यक्ष यांनी ना.घ.च्या कवितेबद्दल इतकं सुंदर आणि नेमकं लिहून ठेवलं आहे, ‘... तिच्या स्त्रीत्वाला कोणताच आगंतुक गुण चिकटविलेला नसल्यामुळे तिच्याविषयीचे प्रेम ‘शुद्ध’ आहे-म्हणजे ते फक्त प्रेम आहे. त्यात दया, सहानुभूती, उद्धार इत्यादी ‘सामाजिक’ लचांडे नाहीत. या प्रेमात जगाची बाधा नाही तसा अध्यात्माचाही नेहमीचा एखादा आव नाही. अलौकित उत्कटतेचे हे प्रेम सर्वस्वी लौकित आहे; शारीर आहे. त्याला सांकेतिक आडपडदा नाही. कवीला प्रीतीतून मुक्ती नको; प्रीती हीच त्याची मुक्ती.’ (शीळ कविता संग्रहाची प्रस्तावना)

ना.घ. देशपांडे यांच्या कविता भावगीत बनुन गायल्या गेल्या. त्यांना अतिशय लोकप्रियता लाभली. ही कविता आजच्याही तरूण तरूणींच्या प्रेमाचा उत्कट अविष्कार म्हणून शोभून दिसू शकते. ना.घ. यांच्या कवितेतील हे विशुद्ध प्रेम पुढे बी. रघुनाथ, बोरकर, पाडगांवकर, महानोर यांच्या कवितेतही अनुभवास आले.

विंदा करंदीकरांच्या एका कवितेत,

हिरवे हिरवे माळ मोकळे,
ढवळ्या ढवळ्या त्यावर गायी,
प्रेम करावे अशा ठिकाणी,
विसरून भिती विसरून घाई

असे मुक्त विशुद्ध प्रेमाचे चित्र उमटले आहे. पुढच्या या सर्व कविंच्या मुक्त प्रेम अविष्काराची वाट ना.घं.नी प्रशस्त करून ठेवली आहे.

या कवितेत प्रेमासोबत जलरंगातील एक निसर्गचित्रही समोर येते. प्रेमाचा ताजा टवटवीत रंग आपल्याला अनुभवाला मिळतो. ‘जरा निळ्या नि जरा पांढर्‍या’ या कडव्यांत हे निसर्गचित्र फार सुंदर उतरलं आहे.

अजून एका कडव्यांत ‘सळसळी, ग हिरवी साडी’ यात रंगांचा उल्लेख येतो. आता हा जो साडीचा हिरवा रंग आहे तो सळसळणारा आहे कारण माळावर पसरलेल्या हिरव्या पोपटी गवतातून वारा वाहतो तेंव्हा ही सळसळ आपल्याला  अनुभवायला येते. ही रसरशीत सळसळ चितारण्यासाठी हिरवाच रंग हवा. इथे दूसरा रंग चालला नसता.पहिल्याच कडव्यात ‘निळ्या जळावर सोनसळीच्या’ असाच रंगांचा उत्सव समोर येतो. ही कविता म्हणणूनच एक तरल निसर्गचित्र बनून समोर येते.

कवितेच्या शेवटी ‘गुढघाभर पाण्यात दिवाणे दोन फरारी, गऽ ऽ’ असं वर्णन येतं. गुन्हा केल्यावर जो शिक्षेसाठी पात्र आहे आणि आता सापडत नाही तो ‘फरार’. तसं प्रेमाच्या गुन्ह्यात आपण ‘फरार’ आहोत अशी मोक़ळी स्पष्ट कबुली इथे दिलेली आहे. बरं हे पाणी काही गळाभर नाही. गुढघाभरच आहे. प्रेमात बुडून मेलो वगैरे असं काहीच म्हणत नाहीत. तर आपण त्यात कसे डुंबत आहोत, हे सांगितलं आहे. गुढघाभर पाण्यातच आपण कसे आकंठ बुडालो आहोत याचा प्रत्यय कवी वाचकाला देतो. रहिमचा एक दोहा फार प्रसिद्ध आहे

रहिमन नदीया प्रेम की उलटी जिसकी धार
पार हुआ वो डूब गया, डुबा हुआ वो पार

ना.घं.च्या कवितेत उत्कट प्रेमाचा रंग त्यांच्या शेवटच्या शेवटच्या कवितांतूनही दिसून येतो. ते रहायचे त्या मेहकर गावांत एक कंचनीचा महाल आहे. या कंचनीच्या प्रेमावर एक सुंदर असे खंडकाव्य त्यांनी लिहीलं.

ना.घं.वरती दासू वैद्यने फार सुंदर कविता लिहीली आहे. त्याचा शेवट करताना त्यानं लिहीलं आहे

जोपर्यंत कुणाला तरी कुणाची
प्राणातून याद येते
तोपर्यंत उगवत राहील
तुझ्या शब्दांतून पोपटी गवत

दासूने ‘पोपटी’ हा जो रंगाचा उल्लेख केला आहे तो अतिशय समर्पक आहे. तो गवतासाठी केला असल्याने त्यात वेगळं काय कारण गवत पोपटीच असतं असं कुणालाही वाटेल. पण भारतीय रससिद्धांतात विविध रसांसाठी विविध रंग सांगितलेले आहेत. त्यात शृंगार रसाचा रंग हा आपण समजतो किंवा पाश्चात्यांच्या संकेतानुसार वापरतो तो गुलाबी नाहीये. शृंगारासाठी भरताच्या नाट्यशास्त्रात पोपटी रंग सांगितला आहे. पोपटी रंग रसरशीत प्रेमाचे प्रतिक आहे. ना.घं.ची कविता अशीच रसरशीत प्रेमाचे प्रतिक आहे.

ना.घ.च्या कवितांचा अप्रतिम कार्यक्रम ‘अंतरिच्या गुढगर्भी’ जालन्याचे कै. बलवंत धोंगडे यांच्या कल्पनेतून तयार झाला. त्याला अभय अग्निहोत्री यांनी फार सुरेख चाली दिल्या आहेत. हा कार्यक्रम आम्ही परभणीला बी. रघुनाथ सभागृहात घेतला होता.

1995 च्या परभणी येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात ना.घ.देशपांडे यांचा मुख्य सत्कार आम्ही केला होता. त्याचे आमंत्रण देण्यासाठी इंद्रजीत भालेराव सोबत मी नाघंना भेटायला मेहकरला गेलो होतो. त्यांनी जिच्यावर कविता लिहीली तो नदीकाठचा कंचनीचा महाल आम्ही बघितला.  तब्येतीमुळे ते बाहेर पडत नसत. पण आमच्या आग्रहाने ना.घ. आवर्जून आले. कुठलेही भाषण करणे त्यांना शक्य नव्हते. कविता म्हणायचा त्यांना आग्रह केल्यावर ‘कुठली म्हणू?’ असं त्यांनी बोळक्या झालेल्या तोंडाने विचारलं. तेंव्हा महानोरांनी त्यांना ‘नदीकिनारी नदीकिनारी’ म्हणा असा आग्रह केला.‘हात्तीच्या !!’  म्हणून निरागस हसत डोक्यावर हात मारून घेतला होता.
 
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Thursday, June 25, 2020

आठवण आणीबाणीची । ओरड अघोषित आणीबाणीची



उरूस, 25 जून 2020 

आज 25 जून. बरोबर 45 वर्षांपूर्वी याच दिवशी आणीबाणीची घोषणा करण्यात आली. भारतीय लोकशाहीच्या स्वच्छ चारित्र्यावर लागलेल्या या काळ्या कुट्ट्या धब्ब्याची सगळ्यांनाच आठवण येते. तेंव्हाची परिस्थिती काय आणि कशी होती याबाबत अजूनही जागजागो लिहील्या जाते.

पण गेल्या काही दिवसांपासून म्हणजे नेमके सांगायचे तर 2014 पासून देशांत अषोघित आणीबाणी आलेली आहे, लोकशाही धोक्यात आहे, हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे असा आरोप जमात-ए-पुरोगामी करताना दिसतात.

अगदी आत्ताही काही पत्रकारांनी लेख लिहून देशात 75 च्या आणीबाणी पेक्षाही कशी वाईट परिस्थिती आहे याचे आपल्या परिने वर्णन करून भडक चित्र रंगवले आहे. विचारांचा लढा विचारांनी लढता येतो पण अविचारांशी कसे लढणार? वगैरे वगैरे विचार मांडले आहेत.

हे विचार मांडणारे जमात ए पुरोगामी यांचा हेतू प्रमाणिक असला असता तर तो समजून घेता तरी आला असता. पण ज्या कॉंग्रेस पक्षाने आणीबाणी लादली तो पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आहे. ज्याने आणीबाणीला पाठिंबा दिला त्या शिवसेनेचाच मुख्यमंत्री आहे. ज्या पक्षाचे नेते स्वत: आणीबाणी काळात कॉंग्रेस मंत्रिमंडळात होते तो राष्ट्रवादीही सत्तेत आहे. इतकंच काय पण या सरकारचे सर्वेसर्वा शरद पवारच आहेत. आणि असं असताना सध्या देशात अघोषित आणीबाणी आहे असा दावा करणारे महाराष्ट्रातील सरकारवर काहीच न बोलता ज्यांच्या सगळ्यात जास्त कार्यकर्त्यांनी आणीबाणीत तुरूंगवास भोगला त्या भाजपच्या केंद्रातील सत्तेवर टीका करत आहेत.

बुद्धिभ्रम पसरवायचा असेल तर शाब्दिक खेळ खुप करता येतात. पण त्या फंदात न पडता सामान्य माणसांच्या दृष्टीने आपण ढोबळमानाने तपासू की 75 ची आणीबाणी आणि आत्ताची परिस्थिती यात काही साम्य आहे का.
1975 ला आणीबाणी लागू झाली तेंव्हा त्या वेळची माध्यमे म्हणजेच वृत्तपत्रे यांच्यावर संपूर्ण बंधने आणली गेली. अगदी वृत्तपत्रांच्या संपादकीय विभागात सरकारी अधिकारी बसून एक एक बातमी तपासायचे. काही मोठ्या वृत्तपत्रांचा विद्यूत पुरवठा खंडित करण्यात आला. वृत्तपत्रांना पुरवण्यात येणारा कागद रोकला गेला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सरळ सरळ दिसेल अशी गळचेपी करण्यात आली. ‘दिसेल अशी’ यासाठी म्हणतो की दै. मराठवाडा ने तर अग्रलेखाची जागाच कोरी सोडून द्यायला सुरवात केली. बातम्यांत शब्द गाळले जावून तिथे रिकाम्या जागा दिसायला लागल्या.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राजकीय कार्यकर्त्यांना उचलून सरळ सरळ तुरूंगातच टाकण्यात आले. त्या विरोधात कसलीही तक्रार कुठेच करण्यासाठी जागा ठेवण्यात आली नव्हती.

तिसरी आणीबाणीची ठळक खुण म्हणजे सामान्य लोकांच्या मनात तयार करण्यात आलेली सत्तेसंबंधातील जरब. यामुळे लोकांना राग आला. लोकांच्या मनात राग आहे हे प्रत्यक्ष सिद्ध करता येत नाहीत. पण हे आजचे पुरोगामी आणीबाणीबाबत असं म्हणतात की सामान्य लोकांनी आणीबाणी उठल्यानंतरच्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा दारूण पराभव करून दाखवला (दारूण म्हणावा असा पराभव झालेला नव्हता. चांगल्या 189 जागा इंदिरा कॉंग्रेसच्या निवडुन आल्या होत्या). हा निवडणुकीतील पराभव म्हणजेच लोकांच्या मनात जो राग होता त्याचा पुरावा.

आता आपण या तिनही गोष्टी आजच्या काळात तपासून घेवू. आज वृत्तपत्र किंवा सध्या असलेली इतर माध्यमे यांच्यावर असली कोणती बंधने आहेत? ‘मोदी सरकार आता माझी नौकरीपण आता घालवेल’ असा आरोप करत 2015 मध्ये गळा काढणारे रविशकुमार आजही एनडिटिव्हीत नौकरी करत आहेत. वृत्तत्रपे, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे, सामाजिक माध्यमे यांद्वारे लोक वाट्टेल तसे व्यक्त होत आहेत. (वाट्टेल तसे म्हणण्याचे कारण फेक खाती उघडून करण्यात येत असलेली बदनामी, वापरण्यात येत असलेली असभ्य भाषा) कुणाचीही गळचेपी झाल्याचा सकृतदर्शनी पुरावा नाही. ज्यांच्यावर गुन्हे नोंदवले अशी ओरड हे पुरोगामी करत आहेत त्यांनी देशविरोधी चुकीचे लिखाण केले म्हणून खटले दाखल झाले आहेत. शिवाय त्यांना उचलून तुरूंगात टाकलेले नाही. दाद मागण्यासाठी सर्व न्यायालयीन पर्याय त्यांना खुले आहेत.

दुसरी बाब म्हणजे राजकीय कार्यकर्त्यांच्या तेंव्हा झालेल्या अटका. आज म्हणजे 2014 पासून किती राजकीय कार्यकर्त्यांना विनाचौकशी तुरूंगात टाकण्यात आले? एकही ठळक उदाहरण देता येत नाही. ज्या राजकीय नेत्यांच्या मागे सक्त वसुली संचालनालयाच्या चौकश्या लावण्यात आल्या आहेत त्या आर्थिक स्वरूपांतील गंभीर गुन्ह्यांबाबत आहेत. त्यांहीसाठी त्या राजकीय नेत्यांना न्यायाची दाद मागण्याचे सर्व पर्याय खुले आहेत. पी. चिदंबरमसारख्यांना तर विक्रमी वेळा जामिन मिळाला आहे. आताही ते जामिनावर सुटून बाहेर आले आहेत. सफुरा झरगर हीच्या बाबत जी ओरड याच पुरोगाम्यांनी केली होती तिलाही जामिन नुकताच मंजूर झाला आहे. आज अघोषित आणीबाणीची ओरड करणार्‍या पत्रकारांनी हे तरी एकदा प्रमाणिकपणे सांगावे 1975 ला इतके राजकीय कार्यकर्ते तुरूंगात गेले मग त्यामानाने किती पत्रकार लेखक तेंव्हा तरी तुरूंगात गेले होते? ज्येष्ठ पत्रकार अनंत भालेराव, लेखक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते विनय हर्डीकर ही दोनच नावे ठळक आहेत. नरहर कुरूंदकर आणि दुर्गाबाई भागवत यांनी जोरदार भूमिका आणीबाणी विरोधात घेतली. पण त्यांना अटक झाली नव्हती. आज ओरड करणारे पत्रकार-कलावंत-लेखक तेंव्हाही कातडी बचावत होते हे लक्षात घ्या.

तिसरी बाब म्हणजे सामान्य लोकांमध्ये असलेली सत्ताधार्‍यांबाबतची चीड संताप मतपेटीद्वारे व्यक्त होतो आहे का? 2014 पेक्षा जास्त टक्केवारी मतांनी आणि जागांनी भाजपला लोकांनी 2019 मध्ये निवडुन दिले आहे. मग सामान्य लोकांमध्ये या सरकारविरोधी संतापाची भावना आहे याचा कसला पुरावा ग्राह्य मानायचा?
मग एक प्रश्‍न निर्माण होतो की 2014 नंतर वारंवार जमात ए पुरोगामी असली भूमिका का मांडत आहेत?
1980 नंतर फार मोठ्या प्रमाणावर डाव्या विशेषत: समाजवादी चळवळीतील पक्षांची राजकीय पिछेहाट झाली. जवळपास त्यांची राजकीय कारकीर्दच संपून गेली. हे सगळे डावे कार्यकर्ते नेते विविध सामाजिक संस्था उपक्रमांत स्वत:ला व्यग्र ठेवायला लागले. या सामाजिक संस्थांना (एन.जी.ओ.) मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे सरकारी धोरण आखण्यात आले. बघता बघता डाव्या राजकीय चळवळीचेच एनजीओकरण झाले. त्यांच्यातील राजकीय संघर्षाची वृत्ती संपून गेली. सरकारी निघी तसेच मोठ्या प्रमाणांतील देशी विदेशी देणग्या यातून यांचा कारभार हळू हळू सरकारी कामासारखा होवून बसला. सामान्य लोकांच्या खर्‍या प्रश्‍नांपासूनही हे दूर जात राहिले.

2014 पर्यंत या सर्व डाव्या चळवळीच्या एनजीओना भक्कम सरकारी आश्रय उपलब्ध होता. 2014 नंतर मात्र मोदी सरकारने या संस्थांच्या गैरकारभाराची बारीक चौकशी सुरू केली, आर्थिक घोटाळे पकडण्यात आले (उदा. तिस्ता सेटलवाड यांची संस्था), सरकारी निधी आटला, परदेशी निधीवर बंधने आली. आणि यातूनच यांच्यात एक अस्वस्थता सुरू झाली.

लिखित माध्यमं होती तोपर्यंत डाव्यांची त्यावर प्रचंड हुकुमत होती. नव्हे जवळपास एकाधिकारशाहीच होती. पण 1995 नंतर इलेक्ट्रॉनिक्स माध्यमं, 2010 नंतर समाज माध्यमं यांचे वर्चस्व वाढू लागले. आणि माध्यमांतूनही डाव्यांचा प्रभाव संपून गेला.

म्हणजे 1980 नंतर राजकीय कारकीर्द मर्यादीत झाली, एनजीओचे महत्व संपले, माध्यमांत प्रभाव राहिला नाही. यातून जमात ए पुरोगामींची विफलता आता वारंवार ‘अघोषित आणीबाणी’ आली असं म्हणते आहे.
2014 पासूनचे भाजप मोदींचे आव्हान परतवण्यासाठी काही एक राजकीय सामाजिक संघटन उभे करणे त्यासाठी मेहनत घेण्याासाठी मात्र हे कुणी तयार नाहीत.

ज्या कॉंग्रेस विरोधात आणीबाणीत लढा दिला त्याच कॉंग्रेसचा पदर धरून ही मंडळी भाजप मोदींच्या ‘अघोषित आणीबाणी’ विरोधात लढू पहात आहेत.  खरं तर कॉंग्रेस हाच पुरोगाम्यांच्या मार्गातील मोठा अडथळा आहे. त्यातही गांधी वाड्रा घराणे हीच मोठी अडचण आहे. कुमार केतकरांनी साप्ताहिक साधनात एक लेख लिहून भाजप सोबतच या डाव्यांना तडाखे लगावले आहेत. (‘कॉंग्रेस विरोधाचे मुख्य कारण नेहरूविरोध आहे’ - सा. साधना दि. 20 जून 2020)  त्यातून योग्य तो बोध घेवून भाजप विरोधात एक भक्कम आघाडी पुरोगाम्यांनी तयार करावी. त्यात गांधी वाड्रा परिवार वगळून कॉंग्रेसला सहभागी करून घ्यावे. तरच यांना काही भवितव्य आहे.
नसता अजून पाच वर्षांनी 2025 मध्ये आणीबाणीचा ‘सुवर्णमहोत्सव’ येईल, भाजप तिसर्‍यांदा सत्तेवर आलेला असेल आणि हे परत असलेच ‘अघोषित आणीबाणी’चे लेख लिहीत बसतील.

    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Tuesday, June 23, 2020

लोकसत्ताचे ‘चीनेश’ सरलष्कर!


उरूस, 23 जून 2020   

दै. लोकसत्तात दर सोमवारी संपादकीय पानावर ‘लालकिल्ला’ हे सदर प्रसिद्ध होते. नावावरून कुणाही वाचकांचा असा समज होईल की हे सदर दिल्लीतील घडामोडींबाबत आहे. ते तसे आहेही. पण याचे लेखक महेश सरलष्कर यांचा कदाचित असा समज झाला असावा की हे सदर लाल ‘चीन’च्या किल्ल्यावरून असे आहे. निदान 22 जूनचा त्यांचा लेख वाचल्यावर हा लेख ‘चीनेश’ सरलष्कर यांनी चीनची भलामण करण्यासाठीच लिहीला असावा याची खात्री पटते.

प्रस्थापित अमेरिकेन माध्यमांना गेल्या 4 वर्षांत 19 मिलियन डॉलर इतकी प्रचंड रक्कम चीनने वाटली असल्याची माहिती नुकतीच बाहेर आली आहे. (60 लाख डॉलर वॉल स्ट्रीट जर्नल, 46 लाख डॉलर वॉशिंग्टन पोस्ट, 24 लाख डॉलर फॉरेन पॉलिसी मॅगझीन, 55 हजार डॉलर न्युयॉर्क टाईम्स, व इतर). शिवाय 11 मिलियन डॉलर इतकी रक्कम छोट्या छोट्या वृत्तपत्रांना वाटली आहे. भारतात अशी किती रक्कम आली याचा अजून खुलासा झाला नाही. त्यामुळे मराठीत कुणाला किती मिळाले हेही माहित नाही. पण मराठीत यासाठी सर्वाधिक पात्र उमेदवार ‘लोकसत्ता’च असेल यात काही शंका नाही.

‘चीनेश’ सरलष्कर असं लिहीतात, ‘... पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर ‘चीनवर बहिष्कार’ या भाजपपुरस्कृत भावनिक आवाहनाचेही कौतुक केले! मग, बाकी राजकीय पक्षांनी नांगी टाकली तर नवल नव्हे. कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी मात्र केंद्र सरकारच्या चीन प्रकरणाच्या हाताळणीबाबत प्रश्‍न उपस्थित केले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनने घुसखोरी केली नसल्याची ‘ग्वाही’ दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले. त्यामुळे संभाव्य एकमुखी पाठिंब्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीचा फज्जा तर उडालाच वर नाहक स्पष्टीकरण देण्याची वेळ पंतप्रधान कार्यालयावर आली.’

आता ही बैठक करोडो भारतीयांनी ऐकली/ पाहिली. बैठकीचा फज्जा उडाला असे ‘चीनेश’ सरलष्कर कशाच्या आधाराने लिहीतात? याच ‘चीनेश’ सरलष्कर यांच्या लोकसत्ताने दुसर्‍याच दिवशी 23 जून 2020 मंगळवारी पहिल्याच पानावर चीनच्या अधिकार्‍यांचा हवाला देवून अशी बातमी छापली आहे की आपला अधिकारी ठार झाल्याची कबुली चीनने दिली आहे. म्हणजे कालच तूम्ही पंतप्रधानांच्या सर्वपक्षीय बैठकीचा फज्जा उडाल्याचे सांगता. चीनचे 43 सैनिक मारल्या गेल्याची बातमी खोटी असल्याचे लिहीता. भारतीय 20 जवानांच्या शहिद होण्याची टिंगल करता. आणि दुसर्‍याच दिवशी चीनने आपल्या नामुष्कीची कबुली दिलेली तुम्हाला पहिल्या पानावर छापावे लागते.

‘चीनेश’ सरलष्कर दोघांच्या लिखाणाचा संदर्भ आपल्या लेखात वापरतात. एक म्हणजे अजय शुक्ला. हे अगदी 2013 मध्येही असे लिहीत होते की गलवान व्हॅली हा चीनचा भाग आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एल.ए.सी.) बाबत सातत्याने धुळफेक करणारे लिखाण अजय शुक्ला करत आले आहेत. दुसरे आहेत मे.ज.(निवृत्त) एस.एच. पनाग. माध्यमांमधून चीनची बाजू घेत सातत्याने भारतीयांचा बुद्धिभेद करणारी ही काही नावं. यांचे जूने लेख, ट्विट काढून तपासा. ही माणसं सतत खोट्या बातम्या, खोटी माहिती पसरवत आहेत. आणि ‘चीनेश’ सारखे यांच्या लेखांचा संदर्भ घेत भारतविरोधी मांडणी करत आहेत.

पाकिस्तान विरोधी घोषणा करत कश्मिरातील कारवाईने देशात मुस्लिम विरोधी मानसिकता तयार करून त्याचा उपयोग निवडणुकांत भाजपकडून केला जातो असा हिणकस आरोप ‘चीनेश’ आपल्या लेखात करत आहेत. आणि वर ‘... पाकिस्तानला युद्धात हरवल्याने आपण जेते आहोतच. पण यातील एकही गोष्ट चीन विरोधात लागू पडत नाही. 1962 मध्ये चीनने भारतावर मात केली. अक्साई चीन ताब्यात घेतला. पाकिस्तानला बळ दिले. संयुक्त राष्ट्रात कायमस्वरूपी सदस्यत्व मिळू दिले नाही. चीन सतत वरचढ राहिल्यामुळे चीनविरोधात भाजपला देशांतर्गत राजकीय लाभासाठी ‘राष्ट्रवादा’चा वापर करता येत नाही. उलट गलवान खोर्‍यातील चीनच्या दृष्टीने क्ष्ाुल्लक असणार्‍या संघर्षातून भाजपच्या आक्रमकवादाला खिंडार पाडले गेल्याची परिस्थिती आहे.’...   ‘चीनेश’ सरलष्कर यांचे हे शब्द म्हणजेच चीनमधून काहीतरी मलिदा मिळाल्याचा पुरावा आहे.

याच वृत्तपत्राला दुसर्‍याच दिवशी चीनी नामुष्कीच्या बातम्या पहिल्या पानावर छापाव्या लागल्या आहेत. आताही जगभरची माध्यमे आणि चीनमधूनही आपल्या मृत जवानांची माहिती का दिली नाही म्हणून आवाज उठत आहे. भारतात शहिदांना सन्मान मिळतो आणि आपल्याकडे मृत जवानांची हाडं डब्यात बंद करून चुपचाप चोरी छुपे घरी पाठवली जातात याबद्दल चीनमध्ये संताप उठत आहे. आणि इकडे मात्र ‘चीनेश’ यांना भारताची नामुष्की झाल्याची दिवास्वप्ने पडत आहेत.

 ‘छोटे मिया तो छोटे मिया बडे मिया सुभानअल्ला’ असा या लेखावरचा अग्रलेखातील मजकुर आहे. आपल्या सवयीप्रमाणे गिरीश कुबेर यांनी डोनाल्ड ट्रंप यांना तडाखे लगावताना भारतासाठी चीन अधिक धोकादायक असे वर वर सांगत शेवटी काय लिहीलंय ते बघा, ‘... आपले दावे काहीही असोत, पण गलवान खोर्‍यात आपल्याला चीनने झटका दिला हे निश्चित. 2018 साली मोदी आणि जिनपिंग यांच्यात वुहान येथे सुरू झालेला दोस्ताना 2019 साली महाबलीपुरम येथे शहाळ्याच्या स्वादात अधिक वृद्धिंगत झाला असल्याचे सांगितले गेले. 2014 साली मोदी यांच्या राज्यारोहणानंतर साबरमती आश्रमात सूत कातण्यास जिनपिंग येण्याआधी चिनी सैन्याची आपल्या देशातील घुसखोरी वाढली आणि 2019 च्या महाबलीपुरम महाबैठकीनंतर वर्षभरात चीनने किमान 600 वेळा सीमा मर्यादाभंग केल्याचे प्रकार नोंदले.’

मोदिंचा आंधळा द्वेष करता करता देशहितही कळत नाही यांना? 2019 मध्ये 600 वेळा सीमा मर्यादाभंग केल्याचे सर्रास खोटे कशाच्या आधारावर कुबेर लिहून जातात? सैन्याच्या वतीने अधिकृतरित्या अशा आक्रमणाची माहिती दिली जाते. स्वत: कुबेरांच्या वृत्तपत्राने कितीवेळा 2019 मध्ये या बातम्या दिल्या? आणि आता अचानक अग्रलेखात हा 600 चा आकडा येतो कुठून?

भाजप मोदी यांचा विरोध लोकशाहीत आपण समजू शकतो. पण ही नीच देशविरोधी वृत्ती कशी काय समजून घ्यायची हेच माझ्यासारख्याला कळत नाहीये. मुंबईत 11 बॉंब स्फोट झाले असताना शरद पवार असे म्हणाले की 12 बॉंम्ब स्फोट झाले. शरद पवार खोटे बोलले कारण की सामाजिक स्वास्थ्य टिकून रहावे म्हणून 12 वा बॉंम्ब स्फोट मस्जिदमध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व महान पत्रकारांनी चुकूनही कधी आपल्या नागरिकांना सांगितले नाही. स्वत: शरद पवारांनीच आपल्या मुलाखतीत सांगितल्यावर हे खोटं बाहेर आले. कारण काय तर देशहित.

आणि इथे पंतप्रधान, सुरक्षामंत्री, परराष्ट्र मंत्री, सैन्याचे अधिकारी, काही जबाबदार पत्रकार सर्व जी काही सत्य परिस्थिती सांगत असताना देशहित गाडून चीनहित डोळ्यासमोर ठेवून हे कुबेर, चीनेश, सोनिया, राहूल, सीताराम येचुरी व समस्त डावे, चिदंबरम, अजय शुक्ला, मे.ज.(नि.) पनाग सारखे ‘चीन-चुन-चु’ देशद्रोही मात्र त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत.

कधी वाटतं असल्या देशद्रोह्यांची दखल घेत आपण कशाला इतका विचार करतो लिहीतो ? सामान्य माणसे कशी राग आली की आई बहिणीवरून सणसणीत शिवी देवून आपल्या संतापाला वाट करून देतात तसे करता आले तर बरं होईल. कारण ही देशद्रोही वृत्ती जाणीवपूर्वक असे करते आहे. एकच आशा आहे. प्रमाणिक भारतीय नागरिक ज्याचे आपल्या देशावर नितांत प्रेम आहे, हजारो वर्षांची आक्रमणे त्याने पचवली आहेत. त्याच्या पर्यंत आपण सत्य पोचवू. आणि सत्याची ताकद इतकी असते की अंतिमत: त्याचाच विजय होतो. आपण सत्याच्याच बाजूने लढू. 
   
    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

Sunday, June 21, 2020

सफुराच्या बचावासाठी आंतरराष्ट्रीय दबाव!


उरूस, 21 जून 2020 

लदाखच्या गलवाल व्हॅलीतील चिनी सैन्याच्या धुसफुशीत एक बातमी काहीशी मागे पडली. दिल्ली दंग्यातील आरोपी सफुरा झरगर हीची जामिन याचिका सर्वौच्च न्यायालयासमोर 6 जून रोजी सादर झाली. सफुरा गरोदर असल्याने तिचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी तिच्यावतीने वकिलांनी मागणी केली होती. शिवाय तिच्यावरची गुन्ह्याची कलमं गैर पद्धतीनं लावण्यात आली आहेत वगैरे वगैरे दावे केल्या गेले.

ही याचिका सर्वौच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सफुरा प्रमाणेच इतरही काही गुन्हेगार महिला ज्या गर्भवती आहेत, काहींची प्रसुतीही याच तुरूंगात झालेली आहे, काही अगदी लहान बाळं सांभाळण्याची त्यांच्या खेळण्याची चांगली व्यवस्था तुरूंगात कशी आहे हे सरकारी पक्षाच्या वतीने व तुरूंग प्रशासनाच्या वतीने सर्वौच्च न्यायालयाला सप्रमाण पटवून देण्यात आलं. आणि सफुरासाठीचा हा बचावाचा प्रयत्न फसला.

पण इतक्यावर शांत बसतील तर ते पुरोगामी कसले. या जमात ए पुरोगामींनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय टोळीच्या मदतीने ‘अमेरिकन बार असोसिएशन’च्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध केले. त्यात मागणी केली की सफुरावर अन्याय झाला असून  तिला तुरूंगात टाकणे म्हणजे आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचा भंग आहे. तिला ताबडतोब मुक्त करण्यात यायला हवे.

अमेरिकन बार असोसिएशन ची ही मागणी कुठल्या न्यूज पोर्टलनी उचलून धरली त्यांची नावे पहा. म्हणजे हा सगळी गँग कशी एकाच सुरात सुर मिसळून काम करते ते सहजच लक्षात येईल. द क्विंट, द वायर, लाईव्ह लॉ वेबसाईट, कश्मिरवाला, सियासत दिल्ली, नॅशनल हेरॉल्ड (तोच तो कॉंग्रेसवाला पेपर ज्यावर कोर्ट केस चालू आहेत.) या सगळ्यांनी मिळून ही अमेरिकन बार असोसिएशन ची बातमी चालवली आहे.

मुळात अमेरिकन बार असोसिएशन च्या लेटर हेडवर जे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे त्याच्या शिर्षकापासूनच दिशाभूल करण्यात आली आहे. ‘प्रिलिमिनरी रिपोर्ट - द कंटिन्यू डिटेन्शन ऑफ स्टूडंटस् व्हॉलंटिअर सफुरा झरगर न्यू दिल्ली जून 2020). एक तर सफुरा ही कुठल्याही विद्यार्थी विषयक आंदोलनात काम करत असताना पकडल्या गेलेली नाही. विद्यार्थ्यांच्या हक्काची कुठलीच लढाई ती लढत नव्हती. सीएए, एनआरसी, एनपीआर हे विषय विद्यार्थी आंदोलनाचे नाहीत. शिवाय सफुरावर या आंदोलनात सहभागी आहे म्हणून गुन्हा नोंदवला गेला नाही. तर दिल्लीत जे दंगे भडकले त्यात भडकावू भाषणं करणे, महिलांना दंग्याच्या ठिकाणी आणून रस्ता रोको, मेट्रो स्टेशन बंद पाडणे, दगड चाकु दंडे यांचा वापर करून आंदोलन हिंसक करण्यासाठी प्रोत्साहन देणे असे गंभीर गुन्हे आहेत. शिवाय तिच्या भडकावू भाषणांचे व्हिडिओ आहेत.

सफुरावर युएपीए या गंभीर कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. जो की देशद्रोह्यांसाठी असतो. देशविरोधी उचापती केल्या म्हणून तीला अटक केल्या गेली आहे. आणि अशा गंभीर गुन्ह्यात अमेरिकन बार असोसिएशन पत्रक का काढत आहे? हे पत्रक बार असोसिएशनच्या मानवाधिकार समितीने तयार केले असा नमुद करण्यात आले आहे.

कॅपिटल टिव्हीच्या पत्रकारांनी या पत्रकाचा भांडाफोड केला आहे. त्यांनीच यातील बनाव उघडकीस आणला. हे पत्रक कुठल्या माहितीच्या आधाराने तयार करण्यात आले? ज्या पत्रकारांच्या लेखांचा आधार घेतला आहे त्यांची नावे या पत्रकात खाली तळटीपेत दिली आहेत. गीता पांडे (बीबीसी), अश्रफ जरगर (सीबीएस न्यूज), निहा मसी (वॉशिंग्टन पोस्ट), आकाश बिस्ट (अज जजिरा), सीमा पाशा (द वायर), अदनान भट (साउथ चॅनेल मॉर्निंग पोस्ट), गौतम भाटीया  (द स्क्रोल), जीवनप्रकाश शर्मा (आउटलूक इंडिया) ही नावे पाहिलीच की कळते की जमात ए पुरोगामींचा हा कसा कट आहे ते.

हा सगळा अहवाल तयार केल्यावर पत्रकाच्या खाली बारीक अक्षरात अशी तळटीप दिली आहे की हा अहवाल अमेरिकन बार असोसिएशनच्या नियामक मंडळाने हा अहवाल तपासलेला नाही. याला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे हा अहवाल अमेरिकन बार असोसिएशनची अधिकृत भूमिका म्हणून धोरण म्हणून गृहीत धरण्यात येवू नये.

डाव्यांचा बौद्धिक भ्रष्टाचार आम्ही म्हणतो तो हा आहे. हे पत्रक अधिकृत म्हणून ज्या ज्या न्यूज पोर्टलवर चालविण्यात आले त्यांनी बारीक अक्षरांतील या तळटीपेचा उल्लेख केला नाही. जाहिरातीत जसे मोठ मोठे दावे केले जातात आणि मग अगदी बारीक अशी एक चांदणी काढून खाली खुलासा केला असतो, ‘अटी लागू’ तसा हा प्रकार आहे. सर्रास खोटा प्रचार करायचा. सामान्य वाचकांनी दिशाभूल करायची. हे सगळे देशद्रोही म्हणजे कसे महान आहेत अशी प्रतिमा तयार करायची. त्यांच्यासाठी जोरात प्रचार चालवायचा. आणि बौद्धिकदृष्ट्या कायदेशीर दृष्ट्या कुठे अडकायची वेळ येतच असेल तर अशी तळटीप देवून निसटण्याची फट ठेवायची.
अर्बन नक्षलीं असल्याचा संशय ज्याच्यावर आहे अशा ‘महान’ ‘विचारवंत’ लेखक असणार्‍यांची गेल्या 15-20 वर्षांतील महाराष्ट्रातील प्रतिमा कशी तयार करण्यात आली होती हे आठवून पहा. आता ते तुरूंगात जावून पडले आहेत, कायद्याचा फास त्यांच्या भोवती पक्का आवळला गेला आहे तेंव्हा मात्र त्यांच्या पाठीराख्यांची पाचावर धारण बसली आहे.

सफुराच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय दबाव आहे असा बनाव करण्यात आला आणि तो उघडा पडताच तातडीने ट्विट मागे घेतल जातात, लेख न्यूज पोर्टलवरून गायब होतात. पण आजकाल तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे हे सगळं साठवून ठेवण्याचे तंत्र विकसित झाले आहे. त्यामुळे असले खोटे ट्विट, मागे घेतलेले लेख जाणकार वाचकांच्या समोर येतात आणि या तथाकथित पुरोगाम्यांचे पितळ उघडे पडते.

(यु ट्यूबवरील कॅपिटल टिव्हीच्या व्हिडिओत ही सर्व माहिती  व अजूनही खुप माहिती देणारे व्हिडिओ आहेत. जरूर पहा. मी केवळ त्यातील थोडासा भाग मराठीत लिहून तूमच्यासमोर ठेवला आहे. हे जमात ए पुरोगामींचे षडयंत्र सगळ्या देशप्रेमींनी ओळखले पाहिजे व त्यांच्याकडून घडविण्यात येणार्‍या देशविरोधी कारवायांना आपल्या आपल्या परिने कडाडून विरोध केला पाहिजे. कॅपिटल टिव्ही, ऍपइंडिया, सत्य सनातन, ओएमएच न्यूज,  यांची ऍलर्जी असणार्‍या मित्रांना परत विनंती माझ्या लिखाणाच्या वाट्याला जावू नका. तूमचे आणि तूमच्या जमात-ए-पुरोगामी मित्रांचे मन:स्वास्थ्य बिघडले तर मी जबाबदार नाही.) 
   

    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575