Tuesday, February 11, 2020

गुलाम रसूल संगीत महोत्सव, परभणी वर्ष दूसरे !


उरूस, 11 फेब्रुवारी 2020

मराठवाड्यात स्वातंत्र्याच्या नंतर अगदी सुरवातीच्या काळात संगीत चळवळ रूजविणारी जी मोजकी नावे आहेत त्यापैकी एक म्हणजे परभणीचेा उस्ताद डॉ. गुलाम रसूल. परभणीला गायनाची कुठलीच पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य कुटूंबात उस्तादजींचा जन्म 24 एप्रिल 1927 ला झाला. उस्तादजींनी स्वयंप्रेरणेने संगीताचे शिक्षण प्राप्त केले. 1974 मध्यं संगीताचार्य म्हणजेच डॉक्टरेट ही पदवी त्यांनी मिळवली. भारतभर परिक्षक म्हणून फिरत असताना विविध कलाकारांशी त्यांचा संपर्क आला. आग्रा ग्वाल्हेर घराण्याची गायकी त्यांच्या गळ्यावर प्रभाव टाकून गेली.

1965 च्या दरम्यान त्यांनी ललित कला मंडळाच्या माध्यमातून संगीत शिक्षणाची सुरवात परभणीस केली. त्या काळात असे संगीताचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणार्‍या संस्था आणि संगीतातील पदवी प्राप्त शिक्षक फार दुर्मिळ होते. मराठवाड्यातील अशा मोजक्याच लोकांपैकी डॉ. गुलाम रसूल. त्यांच्या आधीच्या पिढ्या या मौखिक परंपरेतून शिकलेल्या. यांच्यापेक्षा उस्तादींचे वेगळेपण त्यांच्या अभ्यासू व्यक्तीमत्वात शोधता येते. संगीत विषयक मासिकांमधून नियमितपणे लेख लिहीणारे त्यांच्यासारखे फारच थोडे विद्वान त्या काळात होवून गेले.
डॉ. गुलाम रसूल यांच्या स्मृती प्रित्यर्थ औरंगाबादेत त्यांचे शिष्य डॉ. पराग चौधरी गेली अकरा वर्षे संगीत महोत्सव भरवत आहेत. परभणीला त्यांच्या जन्म आणि कर्मभूमीत संगीत महोत्सव झाला पाहिजे अशी त्यांच्या शिष्यांची आणि चाहत्यांची इच्छा होती. त्या इच्छेला देवगिरी संगीत प्रतिष्ठान या शास्त्रीय संगीत चळवळीसाठी मराठवाडाभर काम करणार्‍या संस्थेने मूर्त रूप दिले. गेल्या वर्षीपासून हा संगीत महोत्सव परभणी शहरात भरवला जातो आहे.

या वर्षी 8-9 फेब्रुवारी रोजी हा महोत्सव संपन्न झाला. लोकवर्गणीतून हा महोत्सव साजरा करण्याचा पायंडा सेलू पाठोपाठ आता परभणीतही चांगलाच रूजला आहे. संगीत रसिक, शहरातील गायक वादक, संगीत शिकणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, संगीत प्रेमी या सगळ्यांच्या सहकार्याने हा महोत्सव पार पाडला जातो. लोकसहभाग आणि लोकवर्गणी ही फार महत्त्वाची बाब या महोत्सवात घडून येत आहे. अशा प्रकारचे उत्सवच हळू हळू लोकमहोत्सव बनत टिकून राहतात. एरव्ही बहुतांश उपक्रमांचे आयुष्य फारसे नसते.

शास्त्रीय संगीतासाठी हे घडून येते आहे ही पण फार महत्त्वाची बाब आहे. अन्यथा इतर संगीत प्रकारांसाठी प्रायोजक मिळतात, आश्रयदाते तयार असतात. पण शुद्ध शास्त्रीय संगीतासाठी म्हणून काही उपक्रम करणं कठिण जातं. त्यासाठी येणार्‍या अडचणी विविध प्रकारच्या आहेत. सगळं जूळून आलं तरी समोर जाणकार श्रोते नसतील तरी ते श्रम सार्थकी लागत नाहीत. यासाठी श्रोत्यांचा कान तयार करण्याचे पण मोठे आव्हान संयोजकांसमोर असते.

मराठवाड्याच्या ग्रामीण भागात सर्वत्र संगीतविषयक अतिशय पोषक वातावरण आहे.

शारंगदेवाच्या संगीत रत्नाकर ग्रंथात गायन-वादन-नृत्य या तिन्हीला मिळून संगीत म्हटल्या गेलेलं आहे. मराठवाड्यात जास्त करून गायनाचेच कार्यक्रम होतात. त्या तूलनेनं वादन फारसे होत नाही. आणि नृत्य तर त्याहूनही कमी. जवळपास नाहीच. गुलाम रसूल संगीत महोत्सवात आवर्जून वाद्य संगीत आणि नृत्य यांचा समावेश करण्यात येतो. या वर्षी महागामी गुरूकुलाच्या श्रीया दिक्षीत आणि रसिका तळेकर या पार्वती दत्ता यांच्या शिष्यांनी अप्रतिम असा कथ्थक नृत्याचा आविष्कार सादर केला. उस्ताद शाहिद परवेझ यांचे शिष्य आणि पुत्र उस्ताद शाकिर खा यांनी राग जोग आणि पिलू रागातील धून वाजवली.

मराठवाड्यातील युवा कलावंत जालन्याची भक्ती पवार हीच्या आश्वासक सुरांनी मराठवाड्यात शास्त्रीय संगीताचे भवितव्य उज्वल असल्याची ग्वाही दिली. उस्ताद गुलाम रसूल यांचे शिष्य डॉ. पराग चौधरी यांनी पहिल्या दिवशी जो मारवा आळवला त्यात आर्तता तर होतीच पण सोबत गुलाम रसूल यांचा वारसा पुढे चालविण्याची ग्वाहीही होती.

विदूषी मंजिरी कर्वे आलेगांवकर आणि बेंगलुरूचे ज्येष्ठ गायक पं. परमेश्वर हेगडे ही मोठी नावं. मंजिरी ताईंचा नंद असो की परमेश्वरजींचा मारूबिहाग एकाचवेळी रसिकांना बांधून ठेवत होता  आणि गायन क्षेत्रातील जाणकारांना बौद्धिक मेजवानीही देवून जात होता.

महोत्सवाचे आयोजन अतिशय साध्या पद्धतीने करण्यात आले. कुठलाही अंगावर येणारा भपका नव्हता, आक्रस्ताळी सजावट नव्हती, असांगितिक लोकांचा अनावश्यक वावर नव्हता. कुठेही भाषणबाजी नव्हती. एखादे घरगुती कार्य असावे त्या निगूतीने आणि आपुलकीने कार्यकर्ते संगीतप्रेमी रसिक शिष्यवर्ग कार्यरत होता.
या महोत्सवाने एक वेगळा पायंडा पाडला आहे.

उस्ताद गुलाम रसूल सारख्यांनी अतिशय प्रतिकूल काळात संगीत चळवळ रूजवली. आज तंत्रज्ञानाची मोठी साथ असताना, आर्थिक दृष्ट्या सामान्य माणसे सुस्थितीत आली असताना कलाविषयक चळवळी मंदावल्या याची खंत आहे. चांगली सभागृहे, ध्वनी व्यवस्था, प्रवासाच्या निवासाच्या सोयी सगळ्यांचीच बर्‍यापैकी समृद्धी गुलाम रसूल यांच्या काळापेक्षा आता दिसून येते. पण कलाविषयक जाणीवा मात्र विस्तारताना दिसत नाहीत. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे भाग आहे. संगीत क्षेत्रातील सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्याला इतरांनी साथ दिली पाहिजे. सामान्य रसिकांचा कान घडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

देवगिरी संगीत प्रतिष्ठान यासाठी कटीबद्ध आहे. मराठवाड्यात ज्यांना कुणाला या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी संपर्क करावा.
             
 श्रीकांत उमरीकर 9422878575


Thursday, February 6, 2020

किशोरकुमारच्या दुर्मिळ चित्रपटाच्या दोन रीळ सापडल्या


उरूस 6 फेबु. 2020 

किशोरकुमार पडद्यावर दिसतो आहे नायक म्हणून पण गाणं जे चालू आहे ते इतर गायकांच्या आवाजात. हे दृश्य एक दोन नव्हे तर तब्बल 22 वेळा घडले आहे. अशी 22 गाणी सापडली आहे. एका गाण्याबाबत मात्र वाद चालू होता. 1957 ला ‘बेगुनाह’ नावाचा किशोर कुमारचा चित्रपट आला होता. हा चित्रपट डॅनी केच्या ‘नॉक ऑन वूड’ या इंग्रजी चित्रपटाची नक्कल होता. त्यामुळे त्याच्यावर मुळ इंग्रजी निर्मात्यांनी बंदी घालण्याची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आणि चित्रपट डब्यात गेला.

या चित्रपटात मुकेशच्या आवाजातील ‘ए प्यारे दिल बेजुबां’ हे गाणे किशोरकुमारवर चित्रीत झाले असे मानले जायचे. पण प्रत्यक्षात पुरावा काहीच नव्हता. हा चित्रपट पाहणार्‍यांनी हे गाणे संगीतकार जयकिशनवर चित्रित झाल्याचे सांगितले. इसाक मुजावर यांनी आपल्या ‘चित्रपट संगीताचा सुवर्ण काळ- 1931 ते 1960’ या पुस्तकात हे लिहून ठेवले आहे.

माझे वडिल अनंत उमरीकर हे हिंदी चित्रपट आणि गाण्यांचे प्रचंड दर्दी. त्यांनी हे गाणे जयकिशनवरचे आहे आणि त्याने पांढरा सुट घातला आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले. मी त्यांना विचारले अहो या चित्रपटावर तर बंदी आली होती. तूम्ही केंव्हा बघितलात? ते म्हणाले बंदी आली पाचव्या दिवशी. मी तर पहिल्याच दिवशी चित्रपट पाहिला होता. ते तेंव्हा हैदराबादला शिकायला होते.

‘द हिंदू’ दैनिकाने या गाण्याची चित्रफित सापडल्याची बातमीच दिनांक 5 फेब्रुवारी 2020 च्या अंकात अगदी पहिल्या पानावर दिली आहे. या गाण्याच्या वेळेसचा फोटोही त्यांनी पहिल्याच पानावर छापला आहे. किशोर कुमारच्या चित्रपटांत त्याच्यासाठी इतर गायकांनी गाणी गायली आहेत हे बहुतेकांना माहित होत नाही. अशा किशोर कुमारच्या गाण्यांची यादी खाली जोडली आहे. ‘ए प्यारे दिल बेजुबान’ चा फोटो सौजन्य दै. द हिंदू. 

किशोर कुमार साठी इतर गातात तेंव्हा

1. बाप रे बाप (1955)- ओ.पी.नय्यर- जाने भी दे छोड ये बहाना-आशा
2. भागम भाग (1956)- ओ.पी.नय्यर- चले हो कहां करके जी बेकरार- रफी/आशा
3. भागम भाग (1956)- ओ.पी.नय्यर- आंखो को मिला यार से- रफी/बातीश
4. भागम भाग (1956)- ओ.पी.नय्यर- हमे कोई गम है- आशा रफी
5. भागम भाग (1956)- ओ.पी.नय्यर- हमे कोई गम है- आशा रफी
6. पैसा ही पैसा (1956)- अनिल विश्वास-  ले लो सोने का लड्उू - किशोर/रफी
(एक कडवे रफीचे किशोरवर चित्रित आहे)
7. बेगुनाह (1957)-शंकर जयकिशन-  दिन अलबेले प्यार का मौसम- मन्ना/लता
8. रागिणी (1958)- ओ.पी.नय्यर- मन मोरा बावरा- रफी
9. रागिणी (1958)- ओ.पी.नय्यर- छेड दिये दिल के तार - अमानत अली (उपशास्त्रीय)
10. शरारत (1959)- शंकर जयकिशन- अजब है दास्ता तेरी ए जिंदगी- रफी
11. शरारत (1959)- शंकर जयकिशन- लुस्का लुस्का लुई लुई शा तू मेरा कॉपी राईट- रफी/लता
12. करोडपती (1961)- शंकर जयकिशन-  पहले मुर्गी हुयी थी के अंडा- मन्ना
13. करोडपती (1961)- शंकर जयकिशन- आप हुये बलम मै तेरी हो गयी- मन्ना/लता
14. नॉटी बॉय (1962)- सचिन देव बर्मन - हो गयी श्याम दिल बदनाम-रफी/आशा
15. बागी शहजादा (1964)- बिपीन दत्त- मै इस मासुम चेहरे को- रफी/सुमन
16. अकलमंद (1966)- ओ.पी.नय्यर- जब दो दिल हो बेचैन- आशा/शमशाद
17. अकलमंद (1966)- ओ.पी.नय्यर- ओ बेखबर तुझे क्या खबर- दुर्रानी/महेंद्र/ भुपेंद्र
18. अकलमंद (1966) - ओ.पी.नय्यर बालमा साजना दुनिया भूला दी-आशा/उषा
19. दुनिया नाचेगी (1967) - की जो मै होता हवा का झोका-मन्ना/आशा
20. हाय मेरा दिल (1968)- उषा खन्ना- जानेमन जानेमन तूम-मन्ना/उषा खन्ना
21. हाय मेरा दिल (1968)- उषा खन्ना- काहे जिया की बात- मन्ना
22. प्यार दिवाने (1972)- लाला सत्तार- अपनी आदत है सबको सलाम- रफी

Wednesday, February 5, 2020

तळ्याकाठी निवारा शोधीत थकून आली शांतता !


काव्यतरंग, दै. दिव्य मराठी  २  फेबु २०२० .

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून रहावे मला वाटते
जिथे शांतता स्वत:च निवारा शोधीत थकून आली असते
जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिसळून असतो काही
गळून पडत असता पान मुळीच सळसळ करीत नाही
सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारून मासळी मधूनच नसते वरती येत
पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपर्‍यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो
हृदयावरची विचारांची धूळ जिथे हळूहळू निवळत जाते
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून रहावे मला वाटते
-अनिल
(दशपदी, मौज प्रकाशन)

खुप ताणाताणीचे व्यग्र असे (व्यग्र हा शब्द वापरायच्या ऐवजी आपण चुकीने सर्रास हिंदी अर्थाचा शब्द व्यस्त वापरतो. त्याचा मराठीतला अर्थ ‘सम’च्या विरूद्ध ते ‘व्यस्त’ असा आहे.) जीवन जगत असताना कधीतरी आपल्याला शांततेची तहान लागते. अशी जागा आपण शोधू पहातो तिथे कुठलेच आवाज नसतील. अशा जागी जो आवाज असतो त्याला शांततेचा आवाज म्हणतात. जंगलात एखाद्या तळ्याच्याकाठी अशी जागा आपल्याला सापडते.

कवी अनिलांनी याच भावनेला आपल्या कवितेत शब्दरूप दिले आहे. अनिलांच्या अकादमी पुरस्कार प्राप्त अतिशय प्रसिद्ध अशा ‘दशपदी’ कवितासंग्रहात ही कविता आहे. ‘दशपदी’तील सर्वच कविता या दहा ओळींच्या आहेत. त्यांची वैशिष्ट्ये समिक्षकांनी उलगडून दाखवली आहेत. नुकतेच अनिलांच्या समग्र कवितेचे पुस्तक श्याम धोंड यांनी मोठ्या कष्टाने संपादित करून प्रकाशीत केले आहे.

‘तळ्याकाठी’ या कवितेची लय अतिशय संथ उस्ताद अमीर खां यांचा विलंबीत ख्याल असावा अशी आहे. जवळ जवळ गद्य वाट्याव्या अशा ओळी यात आलेल्या आहेत. आपण ही कविता वाचत जातो तसं तसं आपल्या आत एक शांतता पसरत गेल्याचा विलक्षण अनुभव येत जातो. दुसर्‍याच ओळीत ‘शांतता स्वत:च निवारा शोधीत थकून आली असते’ असे शब्द येतात. म्हणजेच शांतते साठी जे काही इतर उपाय आपण करत असतो ते सगळे थकून गेले आहेत. त्यांना मर्यादा पडली आहे. आणि ही शांतता नेमकी मिळते कुठे तर वर्दळीपासून पूर्णत: दूर गेल्यावर जंगलातल्या एखाद्या अस्पर्श अशा तळ्याच्याकाठी. जिथे शेकडो वर्षांपासून प्राणी पक्षी वृक्ष यांचे सहजीवन अव्याहतपणे चालू आहे.  मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेल्या जागी आपण जावून त्याच भावनेने शांत बसून राहिलो तरच आपल्याला ही शांतता अनुभवण्यास मिळणार आहे.

व्यंकटेश माडगुळकर यांचे ‘नागझिरा’ हे आख्खे पुस्तक म्हणजेच अनिलांच्या या कवितेचा गद्य विस्तार होय. ‘नागझिरा’ पुस्तकाच्या शेवटी माडगुळकरांनी असे लिहीले आहे की ‘..येताना सोबत जी मद्याची बाटली आणली होती ती बॅगेच्या तळाशी परत येताना तशीच पडून होती.’ त्यांना त्या नशेची कुठली गरजच पडली नाही इतकी नशा या निसर्गातील प्राणी पक्षी वृक्ष यांच्या सहवासात लाभली होती.

अनिलांच्या या कवितेतला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो प्रत्यक्षपणे शब्दांत आलेला नाही तो म्हणजे या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आपल्यालाही त्यात त्याच पद्धतीनं मिसळावं लागेल हा आहे. नसता निसर्गात जावून आपण जो धुडगुस घालतो, खाण्यापिण्याचा जो आचरटपणा करतो, आरडा ओरडा करून सगळं पाणी गढूळ करून टाकतो ते भयानक आहे. हे पूर्णत: टाळलं पाहिजे. पाणी गढूळ करून टाकतो हे केवळ पाण्याशी संबंधीत विधान नाही. आपण त्या निसर्गातील सगळं जगणंच गढूळ करून टाकतो. रणजीत देसाई यांची एक सुंदर कथा आहे. त्यात रात्रभर जंगलातील विविध आवाजांचे वर्णनं येत जातात. जंगलातील विलक्षण अनुभव देसाई रंगवत जातात. कथेच्या शेवटी असं वाक्य येतं, ‘... खट खट लाकडे तोडण्याचा आवाज येवू लागला. आणि जंगलात माणसांचा दिवस सुरू झाला.’या एकाच वाक्यात मानवी हिंसक वृत्तीची दखल रणजीत देसाईंनी नेमकी घेतली आहे.

व्यंकटेश माडगुळकरांनी नागझिरा तळ्याच्या काठी बसून रात्रभर चांदण्यात विविध आवाज कसे अनुभवायला आले याचे वर्णन केलं आहे. आणि शेवटी तेंदू पत्ता मजूर कसे येतात आणि आवाजाचा कलकलाट कसा सुरू होतो याचे वर्णन येतं. आत्तापर्यंत गढून न झालेलं पाणी पुरतं गढूळ होवून जातं.

निसर्गातील सर्व घटक या शांततेत समाजवून गेलेले असतात. कुणीच कुणाच्या शांततेचा भंग करत नाही. केवळ माणूस हा असा एकच प्राणी आहे की जो गोंगाट करून सगळं काही ढवळून टाकतो.

कवितेचा शेवट हृदयावरची विचारांची धूळ हळू हळू जिथे निवळत जाते असा केलेला आहे. विचार हे मानवी उत्क्रांतीचे एक महत्त्वाचे साधन आहे. बुद्धी आहे म्हणूनच तर माणूस इतर प्राण्यांपासून वेगळा आहे. पण याच विचारांची धूळ बनते आणि ती आपल्या हृदयावर साचून राहते तेंव्हाच आपण शांतता गमावून बसतो. ही धुळ झटकायची असेल तर आपल्यालाही प्राणी पक्षी झाडे यांच्यासारखाच निसर्गाचा एक अविभाज्य घटक बनून तळ्याच्या काठी बसून रहावे लागेल तेंव्हाच ती अनुभूती येईल.

धुळे जिल्ह्यात महाराष्ट्र गुजरात सीमेवर ‘बारीपाडा’ नावाचे सुंदर गाव आहे. या गावाने स्वत:चे जंगल राखले आहे. या जंगलातील तलावाकाठी बसून अनिलांच्या या कवितेचा अनुभव मला स्वत:ला घेता आला. उपस्थित सर्व मित्र मैत्रिणींना ही कविता मी म्हणून दाखवली आणि काही काळ शांत बसायला सांगितलं. सगळ्यांना एका विलक्षण अनुभूतीचा साक्षात्कार झाला. तूम्हीपण हा अनुभव जरूर घ्या.

श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Thursday, January 30, 2020

त्या चंद्राचे या चंद्राचे मुळीच नाही काही नाते !


२६ जानेवारी २०२० काव्यतरंग, दै. दिव्य मराठी.
त्या चंद्राचे या चंद्राचे
मुळीच काही नाही नाते.
त्या चंद्रावर-
अंतरिक्षयानात बसोनी
माकड मानव कुत्रा यांना जाता येते
या चंद्राला वाटच नाही
एक नेमके ठिकाण नाही
हाहि नभाचा मानकरी पण-
लक्ष मनांच्या इंद्रगुहांतुनि
भटकत राही.

नटखट मोठा ढोंगीसोंगी
लिंबोणीच्या झाडामागे
केव्हा लपतो मुलाप्रमाणे
पीन स्तानांच्या दरेत केव्हा
चुरून जातो फुलाप्रमाणे
भग्न मंदिरावरी केधवा
बृहस्पतीसम करतो चिंतन
कधी बावळा तळ्यात बुडतो
थरथर कापत बघतो आतुन,
तटघुमटावर केव्हा चढतो
कधी विदूषक पाणवठ्यावर
घसरूनि पडतो
कुठे घराच्या कौलारांतुनि
उतरुनि खाली शेजेवरती
तिथे कुणाची कमलपापणी
हळूच उघडून नयनी शिरतो
कधी कुणाच्या मुक्त मनस्वी प्रतिभेसाठी
द्वारपाल होऊन जगाच्या
रहस्यतेचे दार उघडतो
अशा बिलंदर अनंतफंदी
या चंद्राचे त्या चंद्राशी कुठले नाते?

त्या चंद्रावर विज्ञानाची शिडी लावुनी
शास्त्रज्ञांना चढता येते
रसिक मनांना या चंद्राला
पळभर केंव्हा
जळात वा डोळ्यांतच केवळ धरता येते.
-कुसुमाग्रज
(हिमरेषा, कॉंटिनेंटल प्रकाशन)
(कवितेवरील चित्र जॉन मस्टोन, सौजन्य आंतरजाल)

कुसुमाग्रजांच्या कितीतरी प्रसिद्ध अशा कविता आहेत. पण ही कविता तशी फारशी पोचलेली नाही. ‘हिमरेषा’ या दुर्लक्षीत राहिलेल्या कवितासंग्रहातील ही कविता. मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले त्या प्रसंगावरून कुसुमाग्रजांना ही कविता सुचली असावी. कारण हीचा कालखंड तोच आहे. (हिमरेषा 1 ली आवृत्ती 1964)
कला आणि जीवन यांतील एक अतिशय सुरेख असा संबंध कुसुमाग्रजांनी परत कलेच्याच नाजूक भाषेत समजावून सांगितला आहे. 1960 नंतर औद्योगिकीकरणाने जगभरात वेग पकडला. 1990 नंतरच्या जागतिकीकरणांतून बाजारपेठेचे तत्त्वज्ञान जोरकसपणे पुढे आले. त्याचा मोठ्या प्रमाणात स्वीकार जगभरात केला जावू लागला. 2000 नंतर संगणक आणि पुढे मोबाईलने अवघे विश्व व्यापले.

या सगळ्यांतून आपण परत त्याच मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले या बिंदूपाशी येवून थांबतो. दगड माती खड्डे यांनी भरलेला चंद्र पाहताना कलाकारांनी लेखकांनी पाहिलेला चंद्र कुठे आहे? हा  प्रश्‍न जसा कुसुमाग्रजांना तेंव्हा पडला होता तसाच प्रश्‍न आज नवनविन शोध लागत असताना, तंत्रज्ञानाचा विस्फोट होत असताना मानवी मनाला पडतो आहे. माणसाच्या मुळच्या भावभावनांचे काय? हास्य, करूणा, शृंगार, वीर आदी नवरस सगळे अजूनही मनावर कब्जा करून बसलेले आहेतच ना. मानवी जीवन यंत्रांनी व्यापून टाकले तरी माणूस यंत्र नाही ना बनू शकत. आणि तो तसा बनत नाही यातच त्याचे माणूसपण आहे. हेच कोडे व्यवहारी दृष्टीच्या लोकांन उलगडत नाही. हे कोडे रसिक दृष्टीकोनातूनच समजून घेता येवू शकते.

कुसुमाग्रजांच्या कवितेत उलगडून दाखवावे असे काहीच नाही. तशी खुप सहज सोपी ही कविता आहे. तितकीच ती मुलभूत मानवी भावभावनांची दखल घेणारी सखोल कविता आहे. आपण एखाद्या पौणिमेच्या चांदण्या रात्री गच्चीवर किंवा उघड्या माळावर किंवा कोरड्या नदीच्या पात्रात पडून एकटक आकाशाकडे पाहिलं तर एका वेगळ्याच सौंदर्याची अनुभूती येते आणि या कवितेचा आशय उमगून येतो.  सभोवतीचे भौतिक जग त्या चांदण्यात असे काही अद्भूत वाटू लागते की जणू काही हे सगळं परिकथेतीलच आहे. अशी काय ताकद चांदण्यात असते की ती आपल्या मनाचा कब्जा घेते? हीच कलेची ताकद आहे. आणि कला समजून घ्यायची असेल तर तसेच कलासक्त मनही असावे लागते. रसिकतेची रसिकतेने करून दिलेली व्याख्या असेच या कवितेचे वर्णन करावे लागेल.  


श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575

Monday, January 27, 2020

10 रु.थाळीचे थोतांड कार्यकर्त्यांचे पोट भरण्यासाठी !


उरूस, 27 जानेवारी 2020

हा लेख वाचणार्‍या कुणालाही माझे आवाहन आहे. त्याने आपल्या आजूबाजूच्या गरजू काम करणार्‍या सामान्य मजूराला आपल्या घरचे शिल्लक अन्न देवून पहावे. बघा तो घेवून जातो का. जवळपास सगळ्यांचाच असा अनुभव आहे की कुणी अन्न न्यायला तयार नाही. औरंगाबाद सारख्या शहरात (महाराष्ट्रभर हीच परिस्थिती आहे.) शिल्लक अन्न हीच समस्या आहे. अन्न नाही ही समस्याच नाही. मग असं असताना 10 रूपयांत जेवण यांसारख्या भिकारड्या थोतांड माजवणार्‍या योजना का राबवल्या जातात?

आधी शाळेत मुलांना तांदूळ वाटप केला जाण्याची योजना आली. नंतर खिचडी वाटपाची योजना आली. तिची वाट लागल्यावर आता ही 10 रूपयांत ‘शीव थाळी’ योजना आली आहे.

1965 च्या हरितक्रांती नंतर जगभरांत अन्नधान्याचे उत्पादन प्रचंड वाढले. नंतर आलेल्या जैविक तंत्रज्ञान क्रांतीनंतर तर कमी जागेत जास्त अन्न तयार करण्याची तंत्रज्ञान क्रांती विकसित झाली आहे. लवकरच कमी जागेत जास्त अन्न पिकेल, आज जेवढी जागा लागते त्याच्या केवळ 30 टक्के जागेतच जास्त लोकसंख्येला लागणारे अन्न तयार होईल. मग आधी जी जमीन शेतीखाली होती ती रिकामी होईल. त्या जागेत इतर पिके घेता येतील किंवा त्या जागी जंगल वाढवता येईल. ही स्थिती पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर असेल.

या फुकटाच्या योजना सामान्यांचे पोट भरण्यासाठी कदापिही आखल्या जात नाहीत. तर कार्यकर्त्यांचे पोट भरण्यासाठी आखल्या जातात हे एक उघड गुपीत आहे. अशा योजना या पूर्वीही आल्या होत्या. 1 रूपयांत झुणका भाकर ही योजना युती सरकारने 1995 ला आणली होती. या झुणका भाकर केंद्राच्या जागा कार्यकर्त्यांनी ढापल्या. आता तिथे काय दुकानदारी चालते ते एकदा जावून तपासावे.

10 रूपयांत जेवण मिळू शकत नाही हे सगळ्यांना माहित आहे. यासाठी शासनाकडून सबसिडी मिळणार आहे. यातच सगळी गोम दडली आहे. खरं तर शासनाने यात पडायची काही गरजच नव्हती. जो कुणी भुकेला आहे त्याची काळजी घेण्यासाठी शेतकरी समर्थ आहे. त्यानं सगळ्या मानवप्राण्यांची भूक भागू शकेल इतके अन्नधान्य पिकवून ठेवले आहे. काही दुर्गम आदिवासी भागांत कुपोषणाने मुले मृत्युमुखी पडतात तेथे अन्नधान्य पोचविण्याची गरज आहे. अन्नधान्य उपलब्ध नाही असे नाही तर वितरणाची यंत्रणा काही ठिकाणी विस्कळीत आहे ही समस्या आहे. सरकारी गोदांमामध्ये प्रचंड प्रमाणात धान्य सडत आहे.

शीख पंथातील लंगर सारख्या योजना अखंडपणे प्रत्येक भूकेलेल्या अन्न पुरवण्याचे काम करतच आहेत. इस्कॉन सारख्या मोठ्या धार्मिक संस्था शाळांमधून सकस अन्न मोफत पुरवत आहेत.

ज्यांना कुणाला भुकेल्यांची दया येते त्यांनी अशा संस्थांना मदत करावी. त्यासाठी शासकीय पातळीवर 10 रूपयात थाळी सारखे थोतांड करायची गरज नाही. देवस्थानांच्या गावी अतिशय कमी किमतीत जेवण दिले जाते आहेच. शिर्डी काय किंवा शेगांव काय इथे अशा योजना वर्षानुवर्षे बीनबोभाट चालू आहेत. गरजू त्याचा लाभ घेतही आहेत.

शिवाय गावोगावी भंडारे होतात. तिथेही अन्न वाटपाचा मोठा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो.
शीख, क्रिश्‍चन आणि बौद्ध या धर्मांत भीकेला जराही स्थान नाही. परिणामी या धर्मियांत भिकारी आढळतच नाही. जो कुणी भीक मागेल त्याची खाण्याची सोय लावली जाते. तसेच ज्याला काम करायचे आहे त्याचीही सोय लावली जाते. परिणामी भिकारी आढळतच नाही. या उलट हिंदू, इस्लाम आणि जैन धर्मात भीकेचे मोठेच अवडंबर माजवल्या गेले आहे. भीक घालणे मोठे पुण्याचे काम समजले जाते. याचा परिणाम म्हणजे भीक मागण्यालाही एक मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. आढळून असे येते की भीक ही मागण्यार्‍यापेक्षा ती देणार्‍याची जास्त गरज आहे. परिणामी ही व्यवस्था अव्याहतपणे टिकून राहिली आहे. हीच गोष्ट अन्नदानाची. आता जास्तीचे अन्नधान्य उपलब्ध असल्याने ती वाटणार्‍याची गरज होवून बसली आहे न की खाणार्‍याची.

औरंगाबाद शहरात जास्तीचे अन्न गोळा करून वाटप करण्याचे काम दोन संस्था करतात. त्यांचे मो. क्र. खाली देत आहे. ज्या कुणाकडे जास्तीचे अन्न असेल त्यांनी यांच्याशी संपर्क साधावा. किमान औरंगाबाद शहरांत तरी भुकेला एकही माणूस असेल अशी शक्यता नाही. तेंव्हा 10 रूपयांत थाळी सारख्या योजनांचे थोतांड माजवल्या जावू नये. सरकारी पैशाची नासधुस अशा नको त्या गोष्टींवर करू नये. रस्ते वीज पाणी कचरा नालेसफाई अतिक्रमणं हे विषय आधी सरकारने मार्गी लावावेत.

सार्वजनिक वितरण व्यवस्था (रॅशन) पूर्णपणे सडून गेली आहे. त्यापेक्षा या सगळ्यांतून शासनाने बाजूला होवून दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या खात्यात काही एक रक्कम जमा करण्याची सोय करावी. किंवा फुड कुपन्स सारख्या योजना राबवून त्यांना खुल्या बाजारातून धान्य खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. पण धान्य वाटप किंवा शिजवलेले अन्न वाटप असा आचरटपणा करू नये. भ्रष्टाचारासाठी नविन कुरण तयार करू नये. 

(शिल्लक अन्ना आणि भुकेल्यांना अन्न देण्यासाठी संपर्क रॉबिनहूड आर्मी 9823399929, मानव सेवा ग्रुप 8983171289)
 
श्रीकांत उमरीकर 9422878575


ˆˆ   

Wednesday, January 22, 2020

उकिरड्यावर पडलेले होट्टलचे शिल्पवैभव


उरूस, 22 जानेवारी 2020

नांदेड जिल्ह्यात देगलूर तालूक्यात तेलंगणा सीमेवर होट्टल नावाचे गांव आहे. चालूक्यांची उप राजधानी असलेले हे गांव शिल्पवैभवाने अतिशय समृद्ध आहे. या गावांतील दोन मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यात आला. आज याच मंदिरांच्या परिसरात होट्टल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते आहे.  एक हजार वर्षांपूर्वीची ही अतिशय समृद्ध अशी नगरी. जूने भक्कम दगडी वाडे आजही गावात आहेत. परिसरांतील 22 गावे ज्यांच्या देशमुखीखाली होती अशा तालेवार देशमुखाची प्रचंड गढी या गावात आहे. गढीची पडझड झालेली असली तरी प्रवेशद्वार आणि त्या भोवतीची भक्कम भिंत जून्या वैभवाची साक्ष देते.

मुख्य महादेव मंदिराचे चिरे, नक्षीदार 20 खांब, बाह्यांगावरच्या सूरसूंदरींची शिल्पे, नृत्य गणेशाचे अप्रतिम शिल्प यांचा शोध घेवून मंदिराचे बांधकाम परत करण्यात आले. स्थानिक पाथरवटांचे सहकार्य घेत रिकाम्या जागी त्याच आकाराचे दगड कलात्मक रित्या बसविण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर काम करणार्‍या इनटॅक्ट (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ऍण्ड हेरिटेज) संस्थेच्या सहकार्याने गुरूतागद्दी सोहळ्याच्या निधीतून या कामासाठी काही निधी उपलब्ध करून देण्यात आला.

जिर्णाद्धार झालेली दोन मंदिरे पाहून एकीकडे पुरातन ठेव्याबद्दल अभिमान वाटत असतानाच समोर येते दुसरे भग्न मंदिर. जमिनीखाली अर्धे गाडले गेलेले हे मंदिर आपल्या शिल्पवैभवाने एकीकडे पाहणार्‍याचे डोळ्याचे पारणे फेडते आणि परिसराची दुर्दशा बघून डोळ्यात पाणीही आणते.

मंदिराच्या परिसरांत कित्येक शिल्पे विखुरलेली आहेत. काही शिल्पांभोवती उकिरडा साठला आहे. प्रातर्विधीसाठी लोक या जागेचा वापर करताना पाहून त्याच दगडांवर डोके आपटून घ्यावे अशी भावना दाटून येते. मंदिर परिसरांत दगडी बांधकाम असलेली बारव आहे. तिथे प्रचंड झाडी गवत वाढले आहे. पाण्याचा उपसा नसल्याने हिरवट शेवाळ्याचा थर साचला आहे. गाळ प्रचंड असल्याने पाण्याला दुर्गंधी येते आहे. निगराणी अभावी दगडी चिरे ढासळून गेले आहेत.

पुरातत्व विभाग काय करतो आहे? किंवा लोकप्रतिनिधी सरकारी अधिकारी काय करत आहेत? या सोबतच आधी सामान्य नागरिक म्हणून आपण या पुरातत्वीय महत्त्वाच्या ठेव्याची अशी अवहेलना का करतो आहोत? हा प्रश्‍न सतावतो. या मंदिराच्या परिसराची किमान साफसफाई, कुंपण घालून त्याचे संरक्षण इतकी साधी गोष्ट आपणाला का जमत नाही?

एक शिव-हरेश्वराची सुंदर मुर्ती गावात नालीच्या कडेला पडून आहे. हत्तीचे सुंदर शिल्प उकिरड्यावर लोळत आहे. होट्टल महोत्सव पाहण्यासाठी आलेला व्हिन्सेंट पास्किलीनी हा परदेशी फ्रेंच प्रवासी उपहासाने म्हणाला, ‘तूम्ही भारतीय इतके श्रीमंत अहात की अप्रतिम अशी शिल्पे तूम्ही उकिरड्यार फेकून देता.’ आता या उद्गारावर काय प्रतिक्रिया द्यावी?

ज्या मंदिराचा जिर्णोद्धार केला गेला आहे तेथपासून ते जमिनीत गाडल्या गेलेल्या दुसर्‍या मंदिरापर्यंत सरळ असा दगडी मार्ग असल्याचे अभ्यासक सांगतात. रस्त्यात असलेल्या मानवी वस्तीचे अतिक्रमण काढले तर हा संपूर्ण मार्ग दृष्टीपथास येवू शकतो.

आजही दगडी काम करणारे कारागीर येथे आहेत. त्यांची काम करण्याची तयारी आहे. त्यांचा तो पोटपाण्याचा उद्योग असल्याने गरजही आहे. मग या पाथरवटांच्या साहाय्याने ही कामं आपण का नाही मार्गी लावू शकत? निवेदनं द्या, प्रस्ताव तयार करा, मग सरकारी पातळीवर हालचाली होणार, सरकारी पातळीवरची उदासीनता हे सगळं असह्य आहे. आपल्या लोकप्रतिनिधींना याची जाण जेंव्हा येईल तेंव्हा येईल पण आधी किमान आपण स्थानिक पातळीवर शक्य होईल ते काम केले पाहिजे. त्यासाठी गावकर्‍यांनी आधी पुढाकार घेतला पाहिजे.
मंदिरांचा जिर्णोद्धार, परिसराची स्वच्छता, होट्टल पर्यंत येण्यासाठी पक्क्या चांगल्या रस्त्याचे निर्माण यातून मोठ्या प्रमाणात स्थानिक रोजगार निर्मिती होईल. केवळ चर्चा करण्यापेक्षा आपण कृती करू या.

होट्टल असो की चारठाणा की मराठवाड्यातील अजून इतरत्र असलेली जूनी मंदिरे आणि प्राचीन वारसा सांगणार्‍या वास्तू यांचे जतन करण्यासाठी आपण सगळे मिळून चळवळ उभारू या. ज्यांना ज्यांना या कामात सहभागी होण्यात रस आहे, इच्छा आहे, मदत करायची आहे, सुचना आहेत, जे अभ्यासक आहेत त्यांनी संपर्क साधावा. आपण सगळे मिळून मराठवाडा पातळीवर ऐतिहासिक वारसा जतन चळवळीची उभारणी करू या.

   श्रीकांत उमरीकर 9422878575


ˆˆ   

Monday, January 20, 2020

जीवन त्यांना कळले हो !


काव्यतरंग, दै. दिव्य मराठी. रविवार १९ जानेवारी २०२० 

जीवन त्यांना कळले हो

जीवन त्यांना कळले हो
मीपण ज्यांचे पक्व फळापरि
सहजपणाने गळले हो

जळापरी मन निर्मळ ज्यांचे
गेले तेथे मिळले हो
चराचराचे होउनि जीवन
स्नेहासम पाजळले हो

सिंधूसम हृदयांत जयांच्या
रस सगळे आकळले हो
आपत्काली अन् दीनांवर
घन होउनि जे वळले हो

दूरित जयांच्य दर्शनमात्रे
मोहित होउनि जळले हो
पुण्य जयांच्या उजवाडाने
फुलले अन् परिमळले हो

आत्मदळाने नक्षत्रांचे
वैभव ज्यांनी तुळिले हो
सायासाविण ब्रह्म सनातन
घरीचं ज्या आढळले हो
-उरीच ज्यां आढळले हो

-बा.भ. बोरकर
(बोरकरांची समग्र कविता,खंड 1, प्रकाशक देशमुख आणि कं. पुणे,  पृष्ठ-322)

बोरकरांच्या या सुप्रसिद्ध कवितेचा महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती वर्षात एक वेगळा अन्वयार्थ लावतो येतो. त्या दृष्टीने ही कविता समजून घेतली पाहिजे. 

‘मीपण ज्यांचे पक्वफळापरी सहजपणाने गळले हो’ असं बोरकर लिहीतात तेंव्हा त्यांच्यासमोर गांधीजीच असणार. 1920 साली टिळकांच्या निधनानंतर गांधींचे नेतृत्व समोर आले तेंव्हा त्यांचे वय 50 होते. म्हणजे पक्वफळापरी हा संदर्भ अतिशय योग्य ठरतो. ‘जळापरी मन निर्मळ ज्यांचे’ या ओळी गांधीमधील पारदर्शकतेला लागू पडतात. याचे दाखले त्यांच्या आत्मकथेत कितीतरी आहेत.

‘आपत्काली अन् दीनांवर घन होवून जे वळले हो’ या ओळीसाठी गांधींच्या आयुष्यातील कितीतरी प्रसंग सांगता येतील. पण मला ‘गांधी’ चित्रपटांतील एक अतिशय साधा पण विलक्षण बोलका प्रसंग आठवतो. नदीवर स्नान करणार्‍या गांधींना नदीच्या दुसर्‍या काठावर आंघोळ करणारी अर्ध्यामुर्ध्या कपड्यांत लाज झाकतांना तारांबळ उडालेली एक स्त्री दिसते. तिच्या अर्धनग्नतेने गांधी प्रचंड अस्वस्थ होतात. हीच्यासाठी काय करता येईल हा विचार करत असतांना ते आपल्या अंगावरील उपरणे नदीच्या प्रवाहात तिच्या दिशेने सोडून देतात. पाण्यावरून वहात ते वस्त्र तिच्यापर्यंत पोचते. आणि ती उचलून ते पांघरून घेते. हा प्रसंग अप्रतिम तर आहेच पण तो चित्रपटांत मोठ्या प्रभावीपणे आला आहे. दीनांवर घन होवून वळणे याचा साधा सोपा अर्थ भूकेल्याला अन्न देणे असाच कुणाच्या नग्नतेवर वस्त्र पांघरणे हाही असू शकतो. पुढे आयुष्यभर गांधी मोजक्या कपड्यांतच राहिले.

‘दुरित जयांच्या दर्शनमात्रे मोहित होवून जळले हो’ हे तर कित्येकांनी लिहूनच ठेवले आहे. अगदी वैचारिक शत्रू असलेले लोकही गांधींबद्दल आदर बाळगून असायचे. मग दूरित तर जळून जाणारच. 

बोरकरांनी शेवटच्या कडव्यात ‘आत्मदळाने नक्षात्रांचे वैभव ज्यांनी तुळिले हो’ ही ओळ जी वापरली आहे ती अगदी 100 टक्के केवळ आणि केवळ त्या काळात गांधींनाच लागू पडते. श्रीकृष्णाची तुला करताना सगळी संपत्ती सगळे दागिने कमी पडले. केवळ रूक्मिणीच्या एका तुलसी दलाने कृष्णाचे पारडे वर गेले अशी पुराणांतील कथा आहे. आख्ख्या स्वातंत्र्य संग्रामात भारतीयांचे नैतिक पारडे ज्या माणसाच्या तुलसी दलाने जड झाले ते म्हणजे गांधीजीच. तेंव्हाच काय पण आजही गांधीशिवाय दुसरे कुठलेच नाव आत्मबळासाठी समोर येत नाही.

कुसुमाग्रजांच्या ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ या कवितेसारखी ‘घुमवा जयजयकार शांतिचा’ अशीही एक कविता बोरकरांनी गांधीप्रभावांतून लिहीली होती.  गांधी प्रभावांतून बोरकरांनी गोवा मुक्तिलढ्यात सक्रिय सहभाग नोंदवला होता. ‘महात्मायन’ नावाने एक महाकाव्यच त्यांनी गांधीजींवर लिहायला घेतले होते. पण ते पुर्ण झाले नाही. त्यांच्या कित्येक कवितांमधून गांधीविचारांचा प्रभाव दिसून येतो. पण ही कविता गांधींचे एक वेगळेच दर्शन घडवते. त्यासोबतच बोरकरांच्या प्रतिभेचाही एक लोभस पैलू समोर येतो.
ˆ
श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575