Monday, June 22, 2015

डाळींची आयात ! शेतकर्‍याचा घात !!


उरूस, दैनिक पुण्य नगरी,  21 जून 2015 

देशात डाळींचे भाव कडाडले, डाळ 100 रूपयांच्या पुढे गेली की लगेच शासकीय पातळीवर डाळींची आयात करणार असल्याची आवाई उठवली गेली. सर्वसामान्य माणसांना असे भासविले जाते की हे शासन त्यांची किती काळजी करते. याचा थोडा शांततेने विचार केला की लक्षात येईल की ही घोषणा प्रचंड फसवी आहे. याचा सामान्य माणसांशी काहीही संबंध नाही. आणि शेतकर्‍यांचा तर ही घातच करणारी बाब आहे.
सर्वसामान्य ज्याला ग्राहक म्हणून संबोधल्या जाते त्यातील बहुतांश वर्ग हा शेतकरीच आहे. स्वाभाविकच हा शेतकरी आपल्याला लागणारे बरड धान्य आपल्या शेतातच पिकवितो. महाराष्ट्राचा आपण विचार केला तर असे लक्षात येईल की  शेतकरी त्याला लागणार्‍या डाळीही आपल्या शेतातच पिकवितो. म्हणजे साधा हिशोब आहे की ज्याला गरीब सामान्य म्हणून गणल्या जातो त्यातील बहुतांश हा शेतकरी किंवा शेतीशी संबंधीत आहे. मग तो आपल्याला लागणारे वर्षाचे धान्य, डाळी यांची साठवणूक एकदाच करून ठेवतो. त्याचा बाजारातील चढउताराशी संबंध येतच नाही. राहता राहिला शेतकरी नसलेला इतर शहरी मध्यमवर्गीय ग्राहक. आपण परत महाराष्ट्राचा विचार करू. हा मध्यमवर्गीय ग्राहक नेहमी बरड धान्य व डाळी यांची वार्षिक खरेदी करतो. अगदी फार मोठी शहरं सोडली तर दर महिन्याच्या महिन्याला जावून डाळ, गहु, तांदूळ आणण्याची पद्धत मध्यमवर्गात नाही. अगदी गव्हाचे तयार पीठही खरेदी केले जात नाही. वर्षाचे जे धान्य साठवले असले ते निवडुन गरजे प्रमाणे त्याचे पीठ दळून आणले जाते. बाजरी सारख्या धान्याची तर अशी समस्या आहे की जास्त दिवस हे पीठ टिकत नाही. ते कडून बनते. परिणामी ते दळून आणले की लगेच वापरून टाकावे लागते. 
मग या डाळींचे/बरड धान्यांचे भाव वाढतात किंवा घसरतात याचा परिणाम नेमका कोणावर पडतो?  असा उच्च मध्यमवर्ग आहे ज्याचे वार्षिक उत्पन्न किमान दहा लाख रूपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे. चार माणसांच्या एका कुटूंबाचा धान्य, डाळी यांच्यावरील खर्च हा साधारणत: पंधरा हजार इतका आहे. आता जर हा खर्च वाढून वीस हजार झाला तर त्याच्या एकूण बजेट  मध्ये असा काय फार मोठा फरक पडतो? डाळींची धान्याची खरेदी उन्हाळ्याच्या आधी केली जाते. उन्हाळ्यात त्यांना वाळवून कोठ्यांमध्ये भरले जाते. आता पावसाळ्याच्या तोंडावर जर डाळींचे भाव वाढले तर त्याची इतकी चिंता करण्याचे कारणच काय?  

मग ही बोंब का केली जाते? त्याचे साधे कारण म्हणजे कृषीमालाची आंतराष्ट्रीय बाजारपेठ. यात ऑस्ट्रेलिया मधून मोठ्या प्रमाणात डाळ येते. या डाळीचा व्यापार करणारे मोठमोठे व्यापारी दिल्लीत किंवा विविध देशांच्या राजधानीत डेरे देवून बसलेले असतात. त्यांच्याशी संधान साधून आयात करण्यासाठी वातावरण निर्मिती केली जाते. या सगळ्यातून अशी ओरड केली जाते की सामान्य माणसाचे जीवन भरडून निघत आहे. डाळी खाल्ल्या नाहीत तर मोठ्या प्रमाणात शाकाहारी असलेला हा हिंदू भारत प्रथिने कुठून मिळवणार? मग यावर उपाय काय तर परदेशातून डाळी आयात करा.

खरं तर सामान्य माणसाला प्रथिनांसाठी सध्या अंडे परवडत आहेत. उन्हाळा आणि पावसाळ्यात अंड्याचा भावही उतरता राहतो. किंवा फार चढला तरी तो पाच सहा रूपयांच्या पुढे जात नाही. कोंबड्यांवर कुठलीही बंदी नाही. कारण कोंबड्यांच्या पोटात देव नाहीत. कोंबड्यांचा उपयोग खाण्यासाठी होतो, अंडी मिळतात म्हणून त्यांची पैदास मोठ्या प्रमाणात केली जाते. परिणामी बाजारात अंडी स्वस्त उपलब्ध आहेत. इतकेच नाही तर खेड्यात सर्रास कोंबड्या पाळल्या जातात. शेळीवरही कुठली बंदी नाही. शेळीच्याही पोटात देव नाही. परिणामी खेड्यांमधून घराघरात शेळ्याही पाळल्या जातात. ज्यांचा व्यवहारीक उपयोग होतो त्यांच्या वंशाच्या वृद्धीसाठी कुठलाही कायदा करावा लागत नाही. लोक त्यांचे पालनपोषण ममत्वाने करतात. त्यांच्या वंशाची अमर्याद वृद्धी होते. यातून सामान्य माणसाची प्रथिनाची गरज भागते. मग हा सामन्य माणूस महाग झालेल्या डाळीकडे वळत नाही.

सामान्य ग्राहक असे विचारतो की जर आम्हाला परदेशातून स्वस्त डाळ मिळत असेल तर आम्ही ती का घ्यायची नाही? याचेही उत्तर शेतकरी चळवळीने शास्त्रशुद्ध पद्धतीने दिले आहे. ‘जर का भारतातील सामान्य ग्राहकाला ऑस्ट्रेलियातील डाळ त्याच्या दारात भारतातील डाळीपेक्षा स्वस्त मिळत असेल तर त्या ग्राहकाचा स्वस्त परदेशी डाळ खरेदी करण्याचा हक्क आम्ही मान्य करतो. आमच्या शेतकरी बांधवांना आम्ही सांगू की तूम्ही डाळीचे पीक घेवू नका. कारण बाजारपेठीय व्यवस्थेत ग्राहक हा राजा आहे हे तत्त्व शेतकरी चळवळीला मान्य आहे. पण जर का शासन परदेशी डाळ जास्त किमतीत आणून इथल्या बाजारपेठेत स्वस्तात ओतण्याचा आततायी धंदा करणार असेल तर मात्र आम्ही त्याला विरोध केल्या शिवाय राहणार नाही.’

आज जी डाळ आयात केली जाणार आहे तिचा भाव काय? ती किती भावाने आणणार आणि भारतातल्या बाजारपेठेत ती किती भावाने विकणार? म्हणजे हा सगळा खटाटोप सामान्य ग्राहकाचे नाव पुढे करून शेतमालाची बाजारपेठ उद्धस्त करून टाकण्याची आहे बाकी काही नाही. समजा जर डाळींचे भाव चढले. त्यात शासनाने काहीही हस्तक्षेप केला नाही. तर जास्तीत जास्त शेतकरी या वाढलेल्या भावाने आकर्षित होतील. पुढच्या मोसमात डाळींचे उत्पादन वाढलेले असेल. परिणामी डाळींचे भाव बाजारपेठेत घसरतील. यासाठी वेगळं काहीच करण्याची गरज नाही. 

पण शेतमालाच्या बाजारपेठेत हस्तक्षेप करून ही बाजारपेठ मोडून काढण्याचा जूना खेळ सोडायला अजूनही सरकार नावाची यंत्रणा तयार नाही. बरं हे नेमकं शेतमालासाठीच का होते? औषधं ही जीवनावश्यक गोष्ट आहे. मग काही मोजक्या जीवनावश्यक औषधांची घावूक खरेदी करून ती बाजारपेठेत आणण्याची योजना शासन का आखत नाही? 

पोटाच्या भुकेनंतर वस्त्राची गरज असते. मग सामान्य माणसांना स्वस्त कापड मिळावं म्हणून कापडगिरण्यांवर शासन नियंत्रण का आणत नाही? उलट हेच शासन या कापडगिरण्यांना शेतकर्‍यांच्या शेतातला कापूस स्वस्त भेटावा म्हणून त्यावर निर्यातबंदी मात्र लादते. कापसाचे भाव पाडले जातात. परिणामी कापडगिरण्यांना कापूस स्वस्त मिळतो. पण हा स्वस्त कापूस वापरून तयार केलेले कापड स्वस्त आहे का महाग हे मात्र बघण्याची तोशीश सरकार स्वत:ला लावून घेत नाही. 

कांद्याचे भाव चढले की लगेच ओरड चालू होते. खरं तर पावसाळ्यात कांदा फार कमी खाल्ला जातो. चातुर्मासात कांद्याचा वापर टाळला जातो. जैन समाज तर कांदा वर्षभर खात नाही. आणि कांदा जिवनावश्यक वस्तूही नाही. हेच साखरे बाबत. साखरेचे भाव उतरले की लगेच शेतकर्‍यांच्या विरोधात सगळे सांगतात, ‘हे मुर्ख शेतकरी भावासाठी आंदोलन करत आहेत. यांना कळत नाही की साखरेचे भाव भारतातच नाही तर जगता उतरले आहेत.’ मग या अर्थशास्त्रज्ञांना हे विचारले पाहिजे की जर साखरेचे भाव कोसळले की लगेच उसाचे भाव कोसळतात तसे भाव चढले की मग शेतकर्‍यांना चढे भाव का नाही दिले जात? 

आज डाळींचे भाव चढले की सगळ्यांच्या डोळ्यात येते आहे. पण जेंव्हा भाव कोसळतात तेेंव्हा कोणी विचारायला येत नाही. डाळींचे पीक तसे किचकट आहे. शेतात पिकली की लगेच डाळ बाजारात आणता येत नाही. तिच्यावर प्रक्रिया करावी लागते. डाळी भरडणे, त्यांना पॉलिश करणे, त्यांचे पॅकिंग करणे आणि मग एक उत्पादन म्हणून तीला बाजारात आणणे. या सगळ्यात शेतकरी एक हिस्सा आहे केवळ. डाळीवर प्रक्रिया करणारे किती उद्योग शेतकर्‍यांनी स्वत: चालविले आहेत? मग ही भावाची ओरड करून कोणाचा फायदा करून दिला जात आहे? मूळात सध्या जो शेतकरी जीवतोडून पेरणीच्या लगीनघाईत गुंतला आहे त्याच्या घरात डाळीचा कण तरी आहे का विकायला? असं म्हणतात की पेरणीच्या काळात शेतकर्‍याच्या बायकोच्या गळ्यात सोन्याचा पिवळा मणीही उरत नाही मग डाळीचा पिवळा दाणा विक्रीसाठी त्याच्या घरात उरणार कसा? 

शेतकरी चळवळीने सातत्याने मागणी केली आहे की शेतीमालाच्या बाजारपेठेत हस्तक्षेप करण्याचे सोडा. ही बाजारपेठ योग्य त्या किंमतीवर स्थिर होवू शकते. साधी मोबाईलची बाजारपेठ स्वस्तात येवून स्थिरावते मग जीवनावश्यक असणार्‍या अन्नधान्याच्या बाजारपेठेची काय कथा. पण दिसते असे आहे की ही बाजारपेठ स्थिर होवू न देण्यातच काही जणांचे हित गुंतले आहे. मग असे असेल तर शेतकर्‍यांसाठी ‘अच्छे दिन’ येणार कधी?             

 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, June 14, 2015

काव्यप्रेमी पुल आणि सुनिताबाई देशपांडे

 उरूस, दै. पुण्य नगरी 14 जून 2015 

नवरा बायकोला लक्ष्मी नारायणाचा जोडा असे आपल्याकडे संबोधले जाते. इंग्रजीमध्ये ‘मेड फॉर इच अदर’ असेही म्हणतात. काही नवरा बायको एकमेकात इतके गुंतून गेले असतात की एकमेकांशिवाय त्यांच्या अस्तित्वाची कल्पनाही करता येत नाही.  सुप्रसिद्ध मराठी लेखक पु.ल.देशपांडे त्यांच्या पत्नी सुनीता देशपांडे हे असेच जोडपे. त्यांचे एकमेकांशी 100 % पटत होते का? तर तसे मुळीच नाही. सुनीताबाईंनी ‘आहे मनोहर तरी’ या आपल्या पुस्तकात अतिशय विस्तृतपणे त्यांच्या सहजीवनाबद्दल तटस्थपणे लिहीले आहे. त्यात मतभेदाचे, मनभेदाचे अनेक मुद्दे आहेत प्रसंग आहेत. पण या सगळ्या लिखाणातून समोर जे काही येते ते त्या दोघांचे एकमेकांच्या सहवासात फुलून आलेले आयुष्य. पु.ल.नी कधीच सुनीबाईंबद्दल फार काही लिहीलं नाही. पु.ल.गप्पच राहिले. या गप्पपणातूनच त्यांनी खुप काही सांगितले आहे. पु.ल. म्हणायचे, ‘आमच्या घरात मी एकटाच देशपांडे, ही उपदेशपांडे आहे.’

हे आठवायचे कारण म्हणजे 12 जून हा पु.ल.देशपांडे यांचा स्मृती दिन. या दिवसाची कहाणी मोठी विलक्षण आहे. पु.ल. अतिशय गंभीर आजारी पडले. आजार त्यांना आयुष्याच्या अगदी अंतिम टप्प्यात घेवून गेला. आता ते जाणार हे निश्चित झाले. त्यांचा भाच्चा दिनेश ठाकूर जो की त्यांचा अत्यंत लाडका होता, ज्याला त्यांनी मुलगाच मानले त्याला अमेरिकेतून बोलावणे पाठवले. तो येईपर्यंत पु.ल. यांना कृत्रिमरित्या जिवंत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे सगळं चालू असताना सुनीताबाईंच्या लक्षात आले की आपल्या लग्नाचा वाढदिवस 12 जून जवळ येत आहे. त्यांनी हाच दिवस निश्चित केला. तोपर्यंंत दिनेश भारतात परतला. बरोब्बर 12 तारखेला पु.लंना दिलेला कृत्रिम आधार काढून घेतला आणि पु.ल. यांना आपल्या लग्नाच्या 54 व्या वाढदिवशी सुनीताबाईंनी निरोप दिला. ही कहाणी मोठी विलक्षण आहे. 

ज्यांना वाटायचं की आहे मनोहर तरी मध्ये सुनीताबाईंनी ज्या नवर्‍याच्या इतक्या तक्रारी किंवा आपसातले मतभेद वाचकांसमोर मांडले त्या आपल्या नवर्‍यावर खरेच किती प्रेम करतात? पण सुनीताबाईंनी आपल्या आचरणातून दाखवून दिले की त्या पु.ल.मध्ये किती गुंतून गेल्या होत्या. पुढे त्याही फारश्या जगल्या नाहीत.

कविता हा पु.ल. आणि सुनीताबाईंमधला समान दुवा. बा.भ. बोरकर, आरती प्रभू, मर्ढेकर हे दोघांचेही आवडते कवी. यांच्या कवितांचे कार्यक्रम ते मिळून सादर करायचे.
30 नोव्हेंबर 1987 ला पु.ल.व सुनीताबाई यांनी औरंगाबादला बोरकरांच्या कवितांचा कार्यक्रम ‘आनंदयात्री’ सादर केला होता. स.भु. संस्थेच्या जालान सभागृहातील या कार्यक्रमास औरंगाबादकर रसिकांनी  तुडूंब गर्दी केली होती. आमच्या सारख्या शाळकरी विद्यार्थ्यांना तिथे बसायला जागाच उरली नव्हती. शिवाय आमच्या खिशातही तिकीटासाठी पैसे नव्हते. मग आम्ही खिडकीच्या गजाला लटकून उभा राहण्याचा फुकटचा अफलातून पर्याय निवडला. आनंदयात्री हे नाव खरे तर पाडगांवकरांच्या कवितेचे आहे. 

आनंदयात्री मी आनंदयात्री
अखंड नुतन मला ही धरीत्री
प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री

अशा त्या ओळी आहेत.

हे वर्णन बोरकरांना चपखल लागू पडते असे वाटून पुल व सुनीताबाईंनी हे नाव बोरकरांच्या कवितेच्या कार्यक्रमासाठी निवडले. या कार्यक्रमाचे नेपथ्य अगदी साधे पण प्रभावी होते. मागे काळा पडदा लावलेला. पांढर्‍या शुभ्र चादरींची बैठक मंचावर केलेली. त्यावर साध्या पांढर्‍या गुरूशर्ट झब्ब्यात पु.ल. व  फिक्क्या निळ्या जांभळ्या फुलांच्या पांढर्‍या सुती साडीत सुनीताबाई बसलेल्या. पु.ल.समोर हार्मोनियम. काही कविता पु.ल. गाऊन म्हणत आहेत. बोरकरांच्या आठवणी सांगत श्रोत्यांना हसवत आहेत, स्वत: हसत आहेत.

समुद्र बिलोरी आयना
सृष्टीला सातवा महिना

ही बोरकरांची कविता पु.लनी झोकात साजरी केली. ‘निळ्या जळावर कमान काळी’ या कवितेत दुधावर आली शेते या शब्दाचा अर्थ समजावून सांगताना भाताचा शेताचा संदर्भ ते सहज देत होते. पु.ल.च्या विरूद्ध सादरीकरण सुनीताबाईंचे होते. त्या साध्या संथ स्वरात हळूवारपणे बोरकरांच्या कविता म्हणत आहेत. श्रोत्यांच्या हळू हळू लक्षात येत गेले की आपण सर्वात जास्त दाद पुलंना देत आहोत. पण सुनीताबाई जेंव्हा कविता वाचतात तेंव्हा आपण कशात तरी हरखून जातो. अगदी दाद देण्याचेही आपल्या लक्षात रहात नाहीत. कारण सुनीताबाईंनी बोरकरांची संपुर्ण कविता आपल्यात जिरवून घेतली आहे.

एखाद्या साध्या स्वरात आवाजात किती ताकद असू शकते, प्रभाव असू शकतो हे मला तरी त्या दिवशी पहिल्यांदाच जाणवले. पुलंपेक्षा सुनीताबाईंच्या या वाचनाने प्रभावी होवून पुढे कायमस्वरूपी बोरकरांच्या कवितांचे गारूड माझ्या मनावर पडून राहिले.

मर्ढेकरांची कविता 

अभ्रांच्या गे कुंद अफूने 
पानांना ये हिरवी गुंगी
वैशाखाच्या फांदीवरती
आषाढाची गाजारपुंगी

ही वाचत असताना सुनीताबाई थबकल्या. त्यांनी ती पुलंना म्हणून दाखवली. मग पुलंही त्यात अडकून गेले. बोलता बोलता कित्येक तास हे दोघे नवरा बायको मर्ढेकरांच्या कवितांमध्ये गुंतून पडले. एकमेकांना कविता चढाओढीने वाचून दाखवत राहिले. त्यांना असे वाटले की आपल्याला इतका आनंद एकमेकांना वाचून दाखवताना मिळतो आहे तर आपण तो मराठी रसिकांना का नाही द्यायचा? म्हणून त्यांनी मर्ढेकर, बोरकर, आरती प्रभूंच्या कवितांचे कार्यक्रम करण्यास सुरवात केली.

आरती प्रभूंच्या कवितेचे एक उदाहरण पुल व सुनीताबाई आपल्या कार्यक्रमात द्यायचे

तेंव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकूनी मी जाईन दूर गावा

पाण्यात ओंजळीच्या यावा चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यात अर्थ जावा

तारांवरी पडावा केंव्हा चुकून हात
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा

सुनीताबाई या कवितेवर बोलताना सांगायच्या, ‘अचानक काहीतरी हाती लागते, ज्यासाठी कितीही मेहनत केली तरी मिळेल याची शाश्वती नसते. कलेचे तर असेच आसते. मग अशावेळी आपली भावना काय होते? सर्वस्व सोडून निघून जाण्याचीच होते. कारण हे कलासक्त मन भौतिक वस्तूंमध्ये अडकलेलेच नसते. ते दूर कुठेतरी काही तरी शोधत असते.’
पुल स्वत: अतिशय प्रतिभावंत लेखक होते. त्यांची कथाकथनाचे, एकपात्री असे कित्येक प्रयोग त्यांनी केले. नाटकात सिनेमात कामं केली, गाण्या बजावण्यात बुडून गेले पण आपल्याला आवडलेल्या इतरांच्या कवितांसाठी त्यांनी जीव पाखडला.

सुनीताबाई याही प्रतिभावंत लेखिका. ‘सोयरे सकळ’ सारखे त्यांचे व्यक्तिचित्रंाचे पुस्तक मोठे विलक्षण आहे. पं. मल्लीकार्जून  मंसूर किंवा पं. कुमार गंधर्व यांच्या सारख्या अलौकिक प्रतिभेच्या गायकांवर त्यांनी अतिशय सुंदर लिखाण केले आहे. मण्यांची माळ मधील ललित लेखन वाचकांना असेच खिळवून ठेवते. त्यांनीही आपले साहित्य बाजूला ठेवून बोरकर, आरती प्रभू, मर्ढेकर यांच्या कवितांवर जिवापाड प्रेम केले. त्यांच्या कवितांचा आनंद स्वत:ला मिळाला तसा इतरांना मिळावा म्हणून त्याचे कार्यक्रम महाराष्ट्रभर केले.

या कार्यक्रमांमधून जमा झालेले पैसे किंवा इतरही कार्यक्रमांचे पैसे, पुस्तकांचे मानधन या सगळ्यांतून या जोडप्याने अक्षरश: लाखो रूपये विविध साहित्यीक संस्थांना दान केले. विविध सामाजिक संस्थांना देणग्या दिल्या.

पुल यांच्या पंच्चाहत्तरी निमित्त एक स्मरणिका प्रकाशित झाली होती. तिच्या मलपृष्ठावर इंद्रजीत भालेराव यांची पुलंवरची एक कविता छापलेली आहे

शब्द मिठी मारलेले
तुम्ही ओठ सोडविले
एक अभयआरण्य
त्यांच्यासाठी घडविले

तुम्ही म्हणाला वाहवा
तुम्ही वाजविली टाळी
तेच भाग्य मिरविते 
आज कविता कपाळी

मराठी कवितेच्या घट्ट मिठी मारलेल्या शब्दांचे अर्थ उलगडून दाखविणारे हे विलक्षण प्रतिभावंत जोडपे. 12 जून हा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. त्या निमित्त पुल आणि सुनीताबाईंचे हे स्मरण. 
           
 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, June 7, 2015

नर्गीस-सुनील दत्त : धर्मापलिकडचे शुद्ध प्रेम फक्त


उरूस, पुण्य नगरी,  7 जून 2015 

तीचा जन्म 1 जून 1929 चा. त्याचा जन्म तिच्या बरोबर पाच दिवसानंतरचा 6 जून 1929 चा. तिचे मूळ गाव रावळपिंडी, पश्चिम पंजाब (आताचा पाकिस्तान) त्याचेही मूळ गाव झेलम पश्चिम पंजाब. तिचे वडिल पंजाबी. तोही पंजाबी. तिचे चित्रपट गाजले ते परत त्याच परिसरातील असलेल्या नटासोबत. ती राज्यसभेवर खासदार होती. तिचा नवराही खासदार होता. केंद्रात मंत्री होता. तिची मुलगीही खासदार होती. तीचे खरे नाव फातिमा राशिद.  इतकं सांगितलं तर वाचकांना फारसा उलगडा होणार नाही. पण नर्गीस इतके शब्द उच्चारले की बाकी काही सांगायची गरजच उरत नाही. 

अभिनेत्री नर्गिसचा जन्म कोलकत्त्याचा. तिचे कुटूंब मूळचे पाकिस्तानात गेलेल्या पंजाब प्रांतातले. तिने लग्न केले सुनील दत्तशी. त्याचेही गाव त्याच परिसरातले. फाळणी नंतर सुनील दत्तचे कुटूंब भारतात आले. त्यांना आश्रय दिला तो त्यांच्या वडिलांचे मुस्लीम मित्र याकुब यांनी. हरियानातल्या एका छोट्या गावात ते राहिले. पुढे लखनौला स्थलांतरीत झाले. 

इकडे आपण हिंदू मुस्लीम एकतेच्या गप्पा मारत राहतो. पण कित्येक कलाकार आपल्याकडे असे आहेत की त्यांनी त्यांच्या आयुष्याची किंमत यासाठी मोजली आहे. आपले आयुष्यच या सगळ्याचे उदाहरण म्हणून समोर ठेवले आहे. भारतात कलेला पोषक वातावरण आहे हे हिंदू इतकेच मुस्लीम कलाकारांनाही माहित होते. बडे गुलाम अली असो की साहिर लुधियानवी असो असे कित्येक कलाकार इथेच राहिले. आणि त्यांनी आयुष्यभर भारतातील कला रसिकांच्या पोटी आपली कृतज्ञता व्यक्त केली. 

नर्गीसने 1935 पासूनच चित्रपटात काम करायला सुरवात केली. पण तिचा खरा बोलबाला झाला तो राज कपुर सोबतच. राज कपुर परत त्याच पंजाब प्रांतातला. फाळणीचे चटके त्याच्याही कुटूंबाला भोगावे लागले. पाकिस्तानात गेलेल्या पंजाबच्या मातीतच काहीतरी कलेचे गुण असावेत.

नर्गीसचे चित्रपट गाजले ते राज कपुर सोबत. ‘आह’ मध्ये लताचा कोवळा सुर नर्गीसला मिळाला आणि ‘आजा रे अब मेरा दिल पुकारा’ हे आर्त अवीट गोडीचं गाणं रसिकांच्या कानावर पडलं. तिथेच लता-नर्गीस-शंकर/जयकिशन-राजकपुर हे समिकरण जूऴून आलं. नंतर राज कपुरच्या चित्रपटात इतरही नायिका आल्या. नर्गीसनेही इतर ठिकाणी काम केलं. पण जी प्रतिमा राज-नर्गीस या जोडीची तयार झाली ती कधीच पुसली गेली नाही. आर के बॅनरचे बोधचिन्ह मोठे सुचक आहे. एका हातात व्हायोलिन व एका हातावर नायिका घेवून उभा असलेला नायक. यात नायक अर्थातच राज कपुर तर नायिका नर्गीस आहे हे वेगळं सांगायची गरजच नाही. 

'आह' मधील ‘जाने न जिगर पहचाने नजर’ किंवा ‘आवारा’ मधील ‘मै तूमसे प्यार कर लूंगी’ किंवा ‘श्री 420’ मधील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ किंवा ‘चोरी चोरी’ मधील ‘ये रात भिगी भिगी’ अशी कितीतरी सुंदर गाणी राजकपुर-नर्गीस यांच्यावर चित्रीत झालेली आहे. भारतीय चित्रपटात प्रेम करणार्‍या जोडप्याचे प्रतिक म्हणून राज-नर्गीस यांचेच नाव घ्यावे लागते. देखण्या देव आनंद आणि स्वरूप सुंदरी मधुबालाचे चाहते खुप आहेत. पण त्यांचे एकत्र चित्रपट मात्र लोकांना तेवढे भावले नाहीत. 

नर्गीसला सुरैय्या किंवा नुरजहां सारखा गोड गळा नव्हता. वैजयंती माला किंवा वहिदा रहमान सारखी नृत्यनिपुणता नव्हती. मधुबाला सारखे सौंदर्य नव्हते. पण गीता बाली, नुतन यांच्यासारखी एक सहजता तिच्यात होती. खाली गुडघ्यापर्यंत येणारी काळी पँट, वरती पांढरा अर्ध्या बाह्यांचा शर्ट, छोट्या केसांच्या दोन सुंदर वेण्या, त्याला लावलेल्या रिबीनी आणि समोरच्या तरूण देखण्या राजकपुरला ‘मै तूमसे प्यार करू लूंगी’ असं म्हणणारी नर्गीस. 1952 मध्ये एखादी नायिका नायकाला सरळ सरळ प्रेमाची कबूली देते आहे. हे अतिशय वेगळं होतं. तिचा वेशही वेगळा होता. तिचे आविर्भावही वेगळे होते.
स्वातंत्र्यानंतर सारंच बदललं होतं. 1950 नंतर जगाचे संदर्भ बदलले. जगभरातील अर्ध्याहून अधिक देश नेमके याच काळात स्वतंत्र झाले. मोकळेपणाचे वारे सगळीकडे वाहू लागले. मग स्वाभाविकच नायक आणि नायिकाही आपल्या प्रेमाची उघड उघड कबूली द्यायला लागले. आपले प्रेम जाहिर व्यक्त करू लागले. याच काळात वैजयंतीमालाचे गाणे ‘सैय्या दिल मे आना रे’ बघणार्‍या एैकणार्‍या प्रेक्षकांना राज-नर्गीस जोडीच्या गाण्यांमधून वेगळं आपल्या जवळचं असे काही  मिळत होतं. ‘सैय्या दिल मे आना रे’ हे शमशादचे गाणे. राज कपुरच्या पहिल्या चित्रपटात ‘आग’मध्ये नर्गीस साठी शमशादचाच आवाज वापरला होता. पण नर्गीस, मधुबाला, वैजयंतीमाला, गीताबाली, वहिदा रहमान यांच्यासाठी शमशादचा आवाज शोभत नव्हता. आता लता, गीता, आशा यांचे सुर त्यांच्या तोंडी असलेले लोकांना जास्त भावत होते.
नर्गीसने पडद्यावर राजकपुर सोबत भूमिका निभावल्या पण पडद्यामागे सुनील दत्त सोबत संसार रंगवला. 1958 ते मृत्यूपर्यंत सुनील दत्त सोबत एकनिष्ठ राहून तिनं पत्नीची भूमिका निभावली. पण पडद्यावर मात्र या दोघांची जोडी जमली नाही.
सुनील दत्तचे चित्रपट नर्गीसची कारकीर्द संपल्यावरच्या  काळात जास्त गाजत गेले. विशेषत: बी. आर. चोप्रा सोबत ‘गुमराह’, ‘वक्त’, ‘हमराज’ हे चित्रपट जास्त लोकप्रिय झाले. साहिर सारखा गीतकार, रवी सारखा संगीतकार असल्याने महेंद्रकपुरचा पडेल निर्जीव आवाजही लोकांनी सहन केला. इतकेच नाही तर या गाण्यांना लोकप्रियता लाभली. ‘चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो’,  ‘इन हवाओ मे इन फिजाओ मे’ (गुमराह), किंवा वक्त मधील गद्य कविता वाटावी असे गाणे ‘मैने देखा है फुलो की वादी मे’ किंवा हमराज मधील ‘तुम अगर साथ देने का वादा करो’ हे गाणे. ही सगळी सुनील दत्तची गाणी लोकांना आजही आठवतात.
मदर इंडिया मध्ये नर्गीसने सुनील दत्तच्या आईची भूमिका केली होती. त्यासाठी तिला अभिनयाचे राष्ट्रीय पारितोषिकही मिळाले. मदर इंडियाची गाणीही विलक्षण गाजली. पण या दोन कलाकारांची पडद्यावरची कारकीर्द रेल्वेच्या रूळांसारखी स्वतंत्रपणे समांतरपणे चालत राहिली. आणि उलट संसारिक आयुष्यात मात्र ते एकरूप होवून गेले होते.
सुनील दत्तने एक वेगळाच चित्रपट रसिकांना दिला. एकपात्री प्रयोग नाटकात केलेला आपणांस माहित असेल. पण एकपात्री सिनेमा असू शकतो का? सुनील दत्तचा ‘यादे’ नावाचा असा चित्रपट आहे. त्यात त्याने एकपात्री भूमिका केली आहे. अजूनही असे धाडस कोणी केले नाही.
सुनील दत्त यांचा 1961 मध्ये ‘छाया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. सलिल चौधरी यांनी यात एक सुंदर गाणे दिले आहे. ‘इतना ना मुझसे तू प्यार बढा के मै एक बादल आवारा’. तलत महमुद/लता  यांच्या आवाजतील या गाण्याचे शब्द आहेत राजेंद्रकृष्ण यांचे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे जगप्रसिद्ध संगीतकार मोझार्टच्या 40 नंच्या सिंफनीचे संगीत या गाण्याच्या सुरवातीला वापरले आहे. भारतीय वा पाश्चिमात्य संगीताचा असा सुंदर संगम फार कमी ठिकाणी ऐकायला मिळतो. हे गाणे सुनील दत्त व आशा पारेख यांच्यावर चित्रित आहे.  
नर्गीस-सुनील दत्त यांच्या आयुष्यातील एक शोकांतिका मोठी विलक्षण आहे. नर्गीस-सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्त. त्याचा पहिला चित्रपट रॉकी 1981 मध्ये प्रदर्शित झाला. त्याचा प्रिमिअर 7 मे रोजी होता. नर्गीस कॅन्सरन आजारी होती. 2 मेला ती कोमात गेली. आणि 3 मे 1981 ला तिचे निधन झाले. मुलाच्या पहिल्या चित्रपटाचा प्रिमिअर तिला पाहता आलाच नाही. या प्रिमिअर साठी सुनील दत्तच्या बाजूची एक सीट नर्गीस साठी रिकामी ठेवण्यात आली.
सुनील दत्त यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. कॉंग्रेसच्या वतीने ते मुंबई मधून खासदार म्हणून निवडून आले. मनमोहनसिंग यांच्या पहिल्या मंत्रीमंडळात ते मंत्रीही राहिले. पुढे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी प्रिया दत्त ही पण खासदार म्हणून निवडून आली होती.
‘प्यार हुआ एकरार हुआ’ या गाण्यात शैलेंद्रने याने असे लिहीले आहे

रातो दशोदिशाओसे कहेगी अपनी कहानिया
गीत हमारे प्यार की दोहरायेगी जवानीया
हम ना रहेंगे तूम ना रहेंगे फिर भी रहेंगी निशानिया...

हे गाणे चित्रित करतान राज कपुर-नर्गीस हे पावसात भिजत आहेत. आणि रस्त्यावरून तीन लहान मुले एकमेकांचा हात धरून जात आहेत. लहानपणीचे शशी कपूर, रणधीर कपूर आणि ऋषी कपुर अशी ही लहान मुले आहेत.
पण याचा ढोबळ अर्थ आपले वारस असा नाही. रहेंगी अपनी निशानिया म्हणजे या कलाकारांनी मागे ठेवलेल्या कलाकृती. नर्गीस-सुनील दत्त यांनी आपल्या मागे कितीतरी सुंदर गाणी, चित्रपट ठेवून दिले आहेत. शिवाय दोघांनी धर्मापलिकडे जाणारी प्रेमाची एक सुंदर निखळ गोष्ट आपल्यासाठी मागे ठेवून दिली आहे हे विशेष. नर्गीस आणि सुनील दत्त या दोघांच्याही जयंती निमित्त त्यांची ही आठवण.  
           
 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

Saturday, May 30, 2015

नेमाडेंच्या खासगी ज्ञानपीठाचे सरकारी कौतुक कशासाठी?

उरूस, दैनिक पुण्य नगरी,  रविवार 31 मे 2015 

ज्येष्ठ मराठी साहित्यीक डॉ. भालचंद्र नेमाडे यांना 2014 साठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आणि समस्त मराठी वाचकांना आनंद झाला. तो तसा होणे स्वाभाविकच होते. आत्तापर्यंत चार मराठी लेखकांना हा पुरस्कार मिळाला आहे. नेमाडे यांचे अभिनंदन विविध संस्था व्यक्ती यांनी केले. त्यांचे सत्कार सोहळे सुद्धा झाले आणि पुढेही होतील. आणि झालेही पाहिजेत.
7 ते रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘‘गौरव ज्ञानपीठ विजेत्यांचा, गौरव मराठी भाषेचा !’’ असा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आणि पहिल्यांदा प्रश्न निर्माण झाला की शासनाने असा कार्यक्रम का करावा? बहुतेक जणांचा असा समज आहे की ‘‘ज्ञानपीठ’’ पुरस्कार भारत सरकाराचा कुठला तरी सर्वोच्च साहित्यीक पुरस्कार आहे. केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी सर्व भाषांत मिळून एका साहित्यीकाला सन्मानित करण्यात येते. त्यामुळे जेंव्हा मराठीला हा पुरस्कार भारतीय पातळीवर मिळाला तर आनंद साजरा केलाच पाहिजे. 

सगळ्यात पहिले हे समजून घेतले पाहिजे की ज्ञानपीठ हा सर्वथा खासगी संस्थेद्वारे देण्यात येणारा पुरस्कार आहे. त्याचा शासनाशी काहीही संबंध नाही. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्र समुहाचे सर्वेसर्वा श्री. साहु शांतीप्रसाद जैन यांच्या 50 व्या वाढदिवशी 21मे 1961 रोजी त्यांच्या कुटूंबियांना असे वाटले की भारतीय पातळीवर साहित्यीकांचा गौरव केला गेला पाहिजे. विविध भारतीय भाषांमधील  महत्त्वाचे लेखन हिंदीत भाषांतरीत होवून ते सर्वांपर्यंत पोचले पाहिजे. त्यासाठी ज्ञानपीठ याच नावाने प्रकाशनही सुरू करण्यात आले. ‘नया ज्ञानोदय’ नावाने एक हिंदी मासिकही गेली 12 वर्षे या संस्थेद्वारे प्रकाशीत केले जाते.
भारतातील विविध भाषेमधील 300 विद्वान साहित्यीकांशी संपर्क करून चर्चा करून ज्ञानपीठ पुरस्काराची योजना ठरविल्या गेली. 1965 मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम लेखक जी. शंकर कुरूप यांना प्रदान करण्यात आला. तेंव्हा त्याची रक्कम 1 लाख रूपये होती. आता त्याची रक्कम 10 लाख करण्यात आली आहे. 1982 पर्यंत हा पुरस्कार लेखकाला एखाद्या साहित्यकृतीसाठी देण्यात येत असे. मराठीला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तो वि.स.खांडेकर यांना त्यांच्या ‘ययाती’ या कादंबरीसाठी.
1983 पासून मात्र हा पुरस्कार एखाद्या साहित्यकृतीला न देता एकूण साहित्यीक कारकीर्द लक्षात घेवून प्रदान करण्यात येतो. म्हणजे मराठीपुरते बोलायचे तर कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे यांच्या एखाद्या पुस्तकाला हा पुरस्कार न देता त्यांची एकूण साहित्यीक कारकीर्द लक्षात घेवून देण्यात आला आहे. हा पुरस्कार हिंदीला 10 वेळा, कन्नडाला 8 वेळा, बंगाली व मल्याळमला 5 वेळा, उडिया-उर्दू-मराठीला प्रत्येकी 4 वेळा व इतर भाषांना यापेक्षा कमी वेळा मिळाला आहे.
1992 पासून एक वेगळीच अट या पुरस्कारासाठी घालण्यात आली. ज्या वर्षी हा पुरस्कार घोषित केला जातो ते वर्ष सोडून त्या साहित्यीकाची त्यापूर्वीची 20 वर्षांची साहित्यीक कारकीर्द लक्षात घेतली जावी. नेमाडे यांना हा पुरस्कार घोषित झाला 2014 मध्ये. म्हणजे आधीची 20 वर्षांची साहित्यीक कारकीर्द लक्षात घेता ‘हिंदू’ ही एकमेव महत्त्वाची कलाकृती नेमाडेंची या काळातील आहे. त्यांची भाषणे, त्यांच्या मुलाखती अशी पुस्तके या काळात आली. पण त्यांच्या कोसला, बिढार, झुल, हूल, जरीला या पाचही कादंबर्‍या आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त टिकास्वयंवर हे समीक्षेचे पुस्तक हे त्यापूर्वीचे आहे.
तांंत्रिक बाबी सोडा, कारण नेमाडे महत्त्वाचे लेखक आहेतच. त्यांना उशीरा का होईना पुरस्कार मिळाला हे चांगलेच झाले. प्रश्न इतकाच की यात शासनाचा काय संबंध? 

हा पुरस्कार एका खासगी संस्थेने दिला आहे. त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात ती संस्था यशस्वी झाली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्र्याला आनंद झाला तर त्यांनी तो नेमाडे यांच्या घरी जावून त्यांचा सत्कार करून व्यक्त करावा. यासाठी महाराष्ट्र शासनाने 1 कोटी रूपये खर्च करून सोहळा साजरा करण्याचे काय कारण?
ज्ञानपीठ पुरस्कारात विविध प्रकारचे राजकारण चालते अशी टीका बर्‍याच जणांनी केली.  स्वत: नेमाडे यांनीच पूर्वीच्या ज्ञानपीठ विजेत्यांच्या साहित्यीक दर्जाबाबत वाईट टिका टिप्पणी केली आहे. आपल्या कादंबर्‍यांमधुनही उपहास केला आहे.
या पुरस्काराला पर्याय म्हणून के.के. बिर्ला प्रतिष्ठानने 1991 मध्ये ‘सरस्वती सन्मान’ पुरस्काराची सुरवात केली. या पुरस्कार प्राप्त लेखकांची नुसती यादी जरी पाहिली तरी लक्षात येते की ज्यांना ज्ञानपीठ मिळाले नाही किंवा मिळू दिले गेले नाही त्यांच्यासाठी ही सोय आहे. किंवा उलट म्हणून या. ज्यांना ज्यांना सरस्वती सन्मान प्राप्त होतो त्यांना कधीही ज्ञानपीठ मिळत नाही. 1991ते 2014 पर्यंत 24 वेळा हे दोन्ही पुरस्कार देण्यात आले. या यादीत एकही नाव समाईक नाही.
मराठी पुरते बोलायचे झाले तर आजपर्यंत विजय तेंडूलकर व महेश एलकुंचवार या दोघांना सरस्वती सन्मान देण्यात आला. तेंडुलकर हयात नाहीत. महेश एलकुंचवार यांचा ज्ञानपीठचा रस्ता बंद झाला हे नक्की.
शासन हे सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी म्हणून काम करत असते. त्याने सर्वसामान्यांचे जगणे सुखकारक होईल एवढे पहावे. त्यांना जिवनावश्यक सुविधा पहिले मिळतील याकडे लक्ष पुरवावे. विविध पुरस्कार देणे हे त्याचे काम नाही. पण तरी शासन स्वत: विविध पुरस्कार देते. साहित्याच्या क्षेत्रात ‘साहित्य अकादमी’ हा सर्वोच्च पुरस्कार शासनाकडून देण्यात येतो. साहित्य अकादमी ही स्वायत्त संस्था असली तरी तिला सर्व निधी शासनाकडून मिळतो. तसेच तिचे संचालन भारतीय प्रशासन सेवेतील अधिकार्‍यांकडूनच होत असते. शिवाय पद्म पुरस्कारही शासन देते. तेंव्हा शासनाला फारच साहित्यीकांचा कळवळा असेल तर अजून एक भारतीय पातळीवरील सर्वोच्च सन्मान शासनाने सुरू करावा. हे म्हणजे असे झाले. चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार शासन देते. पण त्याने फिल्मफेअर पुरस्कार मिळाला म्हणून कुणाचा लाखो रूपये खर्च करून जाहिर सत्कार करावा.  
एकीकडे विनोद तावडे जागतिक मराठी साहित्य संमेलनासाठी पैसे देणार नाहीत म्हणून सांगतात. आणि दुसरीकडे नेमाडे यांना ज्ञानपीठ हा खासगी पुरस्कार मिळाला की त्यांच्या सत्कार सोहळ्यावर एक कोटी रूपये खर्च करतात याचा अर्थ काय काढायचा?
महाराष्ट्र शासनाच्या वतीने उत्कृष्ठ वाङ्मय निर्मिती पुरस्कार दिले जातात. गेल्यावर्षी पासून त्यांची रक्कम वाढवून एकूण पुरस्काराची संख्या कमी केली गेली. म्हणजे जास्त लोकांना कमी पैशाचे पुरस्कार देण्याऐवजी कमी लोकांना जास्त पैसे मिळावे असे धोरण ठरले. जितकी रक्कम पुरस्कारासाठी वाटप केल्या गेली त्याच्या चौपट रक्कम प्रवासखर्च, प्रशासनिक खर्च, हॉटेलचा खर्च, खाण्याचा खर्च यावर उधळल्या गेली. त्याबाबत कोणी काहीच बोलले नाही.
एक कोटी रूपये खर्च करून नेमाडे यांचा आणि एकूणच ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांचा गौरव केल्या गेला. पण त्या सोहळ्यात नेमाडे यांना भाषणच करू दिले गेले नाही. त्यांच्या जून्या भाषणाची चित्रफित दाखविल्या गेली. गेट वे ऑफ इंडिया पाशी झालेला हा सगळा सोहळा म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या घशात एक कोटी रूपये घालणे इतकेच सिद्ध झाले. असे करणे म्हणजे या शासनाचे सांस्कृतिक धोरण आहे का?
घुमान येथे साहित्य संमेलन पार पडले. संत नामदेवांच्या नावाचा उदोउदो करण्यात आला. साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने प्रकाशीत झालेली नामदेव गाथा गेली 5 वर्षे उपलब्ध नाही. याकडे लक्ष देण्यास विनोद तावडे यांना वेळ मिळाला नाही. महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक धोरण म्हणजे शालेय स्नेहसंमेलनासारखे भगवे फेटे घालायचे, धोतरं नेसायचे, नऊ वारी साड्या नेसायच्या, नाकात नथ घालायची आणि गर्जा महाराष्ट्र म्हणायचे असे आहे की काय?
एक तर शासनाने न पेलणारा साहित्य संस्कृतीचा उठारेठा करूच नये. आपल्याकडे काहीही घडले की रडत बसायचे आणि अशा रडणार्‍याला कडेवर घेवून शासनाने चॉकलेट खाऊ घालायचे, विमान दाखवायचे, त्याच्या हातात फुगा द्यायचा  ही प्रथाच पडली आहे. त्या रडणार्‍याची खरी गरज अन्नाची आहे. त्याला सकस अन्न खाऊ घालायला आम्ही तयार नाही. त्याला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करायला आम्ही तयार नाही.
साहित्य संमेलनाचे 25 लाख असो की नेमाडे यांच्या सत्कारावर खर्च झालेले 1 कोटी असो. ही रक्कम तरी लहानच आहे. एका मराठी चित्रपटाला 25 लाख असे किमान एका वर्षाला 10 कोटी रूपये हे शासन नाहक उधळत आहे. आणि इतकं करूनही मराठी सिनेमा काही चालायला तयार नाही. जे सिनेमे धंदा करत आहेत त्यांची व्यवसायीक गणितं वेगळीच आहेत. त्याचा शासनाशी काही संबंध नाही.
महाराष्ट्रातल्या 12 हजार सार्वजनिक ग्रंथालयाचे प्रश्न भिजत पडले आहेत. शालेय ग्रंथालये मरणासन्न नव्हे तर पूर्णपणे मरूनच गेली आहेत. शासनाची प्रकाशनं जवळजवळ ठप्प पडली आहे. आंबेडकरांच्या साहित्याच्या नावाने लाखो रूपये खर्च करणारे शासन अजूनही त्यांची सर्व पुस्तके उपलब्ध करून देत नाही. पुढच्या वर्षी बाबासाहेबांच्या निर्वाणाला 60 वर्षे पुर्ण होत आहेत. जानेवारी 17 पासून बाबासाहेबांच्या लिखाणाचे सर्व हक्क खुले होत आहेत. मग शासनाच्या पुस्तकाला काळं कुत्रं तरी विचारील का?
नेमाडेंच्या सत्कारावर 1 कोटीची उधळपट्टी करणारे याचे उत्तर देतील का? 
    
   
 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, May 26, 2015

जनावरे घेवून शेतकरी। न्यायालयाच्या दारी ॥

उरूस, दैनिक पुण्य नगरी,  रविवार 24 मे 2015 

ज्यांनी कधी गाय पाळली नाही, गायीचे दुध, शेण, मुत याचा उठारेठा केला नाही ते छाती पुढे करून ‘गोवंश हत्या बंदी’ विधेयकाची पाठराखण करताना आढळतात. उलट ज्यांच्याकडे जनावरे आहेत असा कोणीही शेतकरी शासनाच्या गोवंश हत्या बंदीच्या बाजूने उभं राहिल्याचे चित्र नाही. शेतकर्‍यांची ही नाराजी कायद्याच्या भाषेत एका शेतकर्‍याने हिंमत करून न्यायालयापुढे आणून पहिल्यांदाच या विधेयकाला मोठे कायदेशीर आव्हान उभे केले आहे. आजपर्यंत शेतकरी केवळ खाली मान घालून शासनाचे सर्व शेतीविरोधी धोरणं सहन करत आला. पण आता गोवंश हत्याबंदीबाबत मात्र दोन शेतकर्‍यांनी हिंमत केली आणि औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल केली. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे अतिशय महत्त्वाचे असल्याने न्यायालयाने त्यांचा दावा दाखल करून घेतला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील बोकुड जळगावचे शेतकरी हाशिम उस्मानी आणि राजेंद्र किसन भालकर यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. 

हिंदू मुसलमानात दुही निर्माण करण्यासाठी असे चित्र उभे करण्यात आले होते की मुसलमान हे गायी कापून खाण्याच्या बाजूने आहेत. हाशिम उस्मानी यांनी आपल्या याचिकेत सगळ्यात पहिल्यांदा हिंदू बांधवांच्या भावना लक्षात घेवून अगदी  बाबर, सम्राट अकबर, बहादूरशहा जफर यांच्यापर्यंत सर्वांनी गोहत्या बंदीबाबत जे हुकूम काढले त्यांचे समर्थन केले आहे. गायीची हत्या केली जावू नये याबाबत तमाम हिंदूच्या भावनाशी आपण सहमत आहोत. आक्षेप आहे तो बैल, वळू किंवा गोर्‍हे यां सर्वांना एकत्र करून गायीसोबत जोडले आणि समग्र असे ‘गो-वंश हत्या बंदी’ विधेयक आणले याला या शेतकर्‍यांचा विरोध आहे. हा मुद्दा सर्वांनी सोयीस्कर रित्या बाजूला ठेवला होता. गाय आणि गो-वंश यात फरक असून त्यांना एकाच तराजूत मोजता येणार नाही. 

गो-वंश हत्या बंदी विधेयक कशासाठी? तर त्याची चार कारणे सरकारकडून दिल्या गेली आहेत.1. दुध उत्पादन 2. जनावरांची पैदास 3. ओझ्याची वाहतूक 4. शेतीची कामे. 

दुधासाठी भारतात मोठ्या प्रमाणात म्हशीचा वापर होतो. म्हशीची दुध देण्याची क्षमताही जास्त आहे शिवाय त्यातील फॅटचे प्रमाणही गायीच्या दुप्पट असते. त्यामुळे दुध उत्पादनासाठी हा कायदा करायचा आहे हा मुद्दा अडगळीत पडतो. जनावरांची पैदास आता कृत्रीम रेतन केंद्रात जतन केलेल्या वीर्यातील शुक्राणुंंपासून होते. त्यासाठी प्रत्यक्ष मोठ्या संख्येने वळू पोसायची गरज नाही. काही मोजके वळू संगोपन केंद्रात सांभाळून त्यांचे वीर्य गोळा करून त्याची साठवणूक केली जाते. जगभर हीच पद्धत अवलंबिली जाते. त्यामुळे हाही मुद्दा गैरलागू ठरतो. ओझ्याची वाहतूक करण्यासाठी गाय वापरली जात नाही. पाच वर्षांचा झाल्यावर बैल शेतीच्या कामासाठी वापरायचा झाल्यास त्याचे खच्चीकरण करावे लागते. (ग्रामीण भाषेत बैल ठेचल्या जातो.) मग हा बैल शेतीच्या वापराचा होतो. आणि तो जेंव्हा शेतीच्या कामाचा उरत नाही तेंव्हा तो ओझी वाहण्याच्या कामासही येत नाही. मग ओझी वाहण्यासाठी गो-वंशाचा वापर केंव्हा होतो? तर केवळ तो शेतीत कामाचा असतो तेंव्हाच. तेंव्हा तर शेतीची इतर कामे महत्त्वाची असतात. मग हाही मुद्दा निकालात निघतो. 

शेवटचा मुद्दा शासनाने पुढे केला तो म्हणजे शेतीची कामे. शेतीच्या कामासाठी हा बैल साधारणत: वयाच्या पाचव्या वर्षापासून ते 12 ते 13 वर्षांपर्यंत वापरात येतो. म्हणजे 1 ते 5 ही वर्षे त्याला सांभाळावे लागते. पुढे तो म्हातारा झाल्यावर कामाला येत नाही. असा बैल 20 वर्षापर्यंत म्हणजे 7 वर्षे रिकामा सांभाळावा लागतो. त्याला पोसण्यासाठी दिवसाला किमान 150 रूपयांचा चारा पाणी लागते. म्हणजे महिन्याला चार ते पाच हजार रूपये खर्च त्या बैलावर तो कामातून गेल्यावर करावा लागतो. वर्षाला असा बैल पन्नास हजार रूपये खातो. आता काहीच काम न करणारा बैल पन्नास हजार रूपये देवून गरीब शेतकर्‍याने मरेपर्यंत पोसायचा कसा? 

डंगरा बैल विकून त्या किमतीत कामाचा नवा बैल शेतकरी खरेदी करतो. पण जर हा डंगरा बैल विकू दिला नाही तर मग त्याचा खाण्याचा खर्च तर आहेच शिवाय कामाला नविन बैल घ्यायला परत पैसाही नाही. आधीच शेतीचे हाल चालू आहेत. वर या डंगर्‍या बैलांचे ओझे.
भाकड झालेल्या गायी आणि डंगरे बैलं यांचे करायचे काय? याचे उत्तर शासनाला देता आलेले नाही. या गायी बैलांच्या शेणाचे, मुताचे उत्पन्न शेतकर्‍याला मिळते असे प्रतिपादन गुजरात मधील न्यायालयांच्या एका निकालात न्या. लाहोटी यांनी केले होते. ते खोडून हाशिम उस्मानी यांनी दाखवून दिले आहे की पंचेविस हजार रूपये खर्च करून सहा महिने डंगरा बैल पोसल्यावर जितके शेण मिळते त्या शेणाच्या गाडीला मिळणारी किंमत ही फक्त बाराशे रूपये आहे. मग हा घाट्याचा धंदा करायचा कोणी?
उस्मानी यांनी पुढे आणलेला अजून एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. दुष्काळात शेतकरी पहिल्यांदा बैल विकतो. कारण गायीशी त्याची भावना गुंतलेली असते. जमिन लगेच विकता येत नाही. बाकी काही मालमत्ता त्याकडे विक्रीयोग्य नसतेच. मग एका अर्थाने बैल हे त्याचे बचत खाते आहे. यात गुंतवलेला पैसा त्याला विक्रीकरून मिळतो. त्याचा वापर करून तो दुष्काळातून कुटूंब सावरतो. पुढे पैसे हाताशी आल्यावर शेतात पिक उभे राहिल्यावर तो परत बैल विकत घेवून आपले काम करतो. म्हणजे एका अर्थाने बैल हे शेतकर्‍याचे चलन आहे. आता या चलनाच्या वापरावरच जर बंदी आणली तर शेतकर्‍यांचे अर्थकारण चालणार कसे?
आपल्याकडे शेतीचे तुकडे पडून एकराची शेती आता गुंठ्यावर आली आहे. छोट्या शेतीत ट्रॅक्टर परवडत नाही. शिवाय शेतात पीक उभे असताना बैल त्यात काम करून शकतो. ट्रॅक्टर करू शकत नाही. मग जर बैलाच्या विक्रीवर बंधनं आली तर शेतकरी बैल पोसणारच नाही. मग त्याच्या शेतीच्या कामाचे कसे?
बैल हा उपयुक्त पशु असे म्हटले आहे. जगात कुठल्याही उपयुक्त पशुला संरक्षीत पशु म्हणून जतन करण्याचा कायदा कोणीही कधीही केला नाही. उलट उपयुक्त असल्यामुळे त्याची काळजी अधिकच घेतली जाते. भाकड डंगरे जनावरे मारल्याशिवाय धडधाकट बळकट जास्त काम करणारे जनावरे सांभाळता येत नाहीत. हे आर्थिक व्यवहारीक सत्य शासन नजरेआड करते आहे.
गायीशी हिंदूंच्या भावना जोडल्या गेल्या आहेत हे लक्षात घेवून उस्मानी यांनी  स्वत:चा अनुभव सांगितला की आम्ही आत्तापर्यंत एकही गाय कधी विकली नाही. उलट शेजार पाजारच्या गरीब शेतकर्‍यांच्या गायी आम्ही दुष्काळात सांभाळल्या आहेत. उस्मानी यांनी हेही नमूद केले की हिंदू बांधवांच्या भावना लक्षात घेता बहुतांश मुस्लीम गायीचे मांस खात नाहीत. खाटिकांनी आपल्या दुकानात गायीचे धड दर्शनी भागात टांगून ठेवू नये अशी एक मोहिम उस्मानी यांनी राबविली होती. तर खाटिकांनी सांगितलेला अनुभव अतिशय दाहक होता. खाटिक  म्हणाले भैय्या, आम्ही कोणतेही मांस विकले तरी हे पोलिस आम्हाला गोमांस विकले म्हणूनच दमदाटी करतात व आमच्याकडून हप्ते वसूल करून घेतात. उलट पोलिसांना गायीचे मांस विकले काय किंवा नाही काय याच्याशी काहीच घेणे देणे नाही. त्यांना त्यांच्या हप्त्याशी घेणे देणे आहे.
उस्मानी आणि भालकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर आता न्यायालयात येत्या 10 जूनला सुनावणी होणार आहे. असंख्य शेतकर्‍यांनी या खटल्यात आम्हालाही सामावून घ्या म्हणून उस्मानी यांच्याकडे विनंती केली आहे.
कोणाला वाटेल खटला दाखल करणारा हा कोणी कट्टर धार्मिक पांढरी जाळीची टोपी घालणारा वेडा मुसलमान असेल.  हाशिम उस्मानी उच्चशिक्षीत (एमबीए) आहेत. त्यांच्या मातोश्री राणा हैदरी आंबेडकर विद्यापीठात उर्दू विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे आजोबा याकुब उस्मानी हे आंबेडकरांचे जवळचे स्नेही होते. मिलींद परिसरात बाबासाहेब यायचे तेंव्हा ते याकुब साहेबांना आवर्जून भेटायचे.
उस्मानी यांच्या घरात सरस्वतीचा फोटो दर्शनी भागातच टेबलावर मांडून ठेवला आहे. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेने आपल्या हिरक महोत्सवी वर्षात याकुब उस्मानी यांना स्मृतीचिन्ह देवून गौरविले होते. स्वत: हाशिम उस्मानी यांनी गेली तीन वर्षे औरंगाबाद परिसरातील शेतकर्‍यांसाठी दुष्काळी चारा छावण्या उघडून फार महत्त्वाचे काम केले आहे.
गोवंश हत्या बंदी विधेयकामागचे शेतीविरोधी धोरण या याचिकेमुळे कायदेशीर भाषेत समोर आणण्याचे काम हाशिम उस्मानी यांनी केले आहे. याला हिंदू विरोधी रंग देण्याचे काम सुरू आहे. हे कारस्थान हाणून पाडून समस्त शेतकर्‍यांनी ज्यांची जात केवळ आणि केवळ शेतकरी हीच आहे धर्म शेती हाच आहे गोत्र काळी आई हेच आहे त्यांनी या याचिकाकर्त्याच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे. 
   
 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Monday, May 18, 2015

गुर्जर, आम्ही तूमच्या पाठीशी आहोत

उरूस, पुण्य नगरी रविवार 17 मे 2015 

कोण हे गुर्जर? वसंत दत्तात्रय गुर्जर हे कवी आहेत हेच बर्‍याच वाचकांना माहित नाही. ‘गांधी मला भेटला’ या कवितेवर अश्लिलतेचा व महात्मा गांधीसारख्या महापुरूषाच्या बदनामीचा खटला भरला गेला. तब्बल 20 वर्षांनंतर याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. प्रकाशक व मुद्रक यांनी माफी मागितली. त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आता महापुरूषाची बदनामी झाली नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने कवी वसंत दत्तात्रय गुर्जर यांच्यावर सोपविली आहे. हा खटला परत लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात चालणार आहे.
आपल्याकडे एक ढोंगीपणा सर्वत्र आढळतो. सगळ्यांना एखादी गोष्ट माहित असते. पण तीचा उल्लेख करायचा नाही असा अलिखित नियम असतो. कोणी त्याबद्दल काही बोलले की मग मात्र सगळे असा काही आव आणतात की बाप रे! हे काय! किती हे गच्चाळ! अश्लिल! बिभत्स!! आपण नाही बाबा असलं काही खपवून घेणार. हा आमच्या संस्कृतीवर हल्ला आहे. म्हणजे हे सारे आपल्याकडे आहे याचे आम्हाला काहीच वाटत नाही. फक्त याचा कोणी उल्लेख केला की मग मात्र सर्वांची डोकी फिरतात. सर्वांना संस्कृती रक्षणाची जाग येते.
वसंत गुर्जर यांची ही कविता 1984 मध्ये प्रास प्रकाशनाने प्रसिद्ध केली. तेंव्हापासून दहा वर्षे ती कित्येकांच्या वाचनात आली. पण कोणालाही त्यावर काही आक्षेप घ्यावा असे वाटले नाही. ही कविता 1994 मध्ये  बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघटनेच्या वार्तापत्रात छापण्यात आली. साहित्याची पुस्तके कधीही न वाचणार्यानी हे वार्तापत्रही वाचले असेल याची शक्यता नाही. पण कोणीतरी कर्मचार्‍याने हे बघितले. त्याच्या डोळ्यात बाकी सगळी कविता सोडून, ‘गांधी मला भेटला, हेमामालिनीच्या नावाने ***** करताना’ ही ओळ नेमकी भरली. झाले लगेच यांची संस्कृती रक्षणाची उर्मी उसळून आली. एरव्ही गांधी कोण हे माहित नसलेले लगेच गांधी प्रेमाने पेटून उठले.
‘अखेर कमाई’ या  कुसूमाग्रजांच्या कवितेत फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्याशी  संवाद करताना गांधी म्हणतात,
तरी तूम्ही भाग्यवान 
एकेक जातजमात तरी 
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र 
फक्त सरकारी कचेर्‍यातील भिंती !
(मुक्तायन, पृ.109,पॉप्युलर प्रकाशन)
एरव्ही सरकारी कार्यालयांच्या भिंती पाठीशी असलेल्या गांधींच्या पाठीशी विचारांनी पतित झालेले पावन लोक उभे राहिले. त्यांनी खटला दाखल केला.
सलमान खानला दोन तासात बेल देणार्‍या आपल्या महान न्यायव्यवस्थेने अतिशय गतीने तत्परतेने फक्त 20 वर्षे घेत या खटल्याचा अर्धवट निकाल दिला. आता कवी वसंत दत्तात्रय गुर्जर यांना हे सिद्ध करावयाचे आहे की या ओळींमधून महात्मा गांधींची कुठलीही बदनामी होत नाही.
आपल्याकडे बहुतांश जून्या मंदिरांवर संभोग शिल्पं आहेत. आपल्या भाषेत असंख्य शिव्या आहेत. तुकारामा सारख्या संतांनी त्यांचा भरपूर वापर आपल्या अभंगांमध्ये केला आहे. वामाचारी शाक्त पंथियांचे कित्येक विधी अतिशय बिभत्स आहेत. हे सगळं आपल्याकडे शेकडो वर्षांपासून चालत आले आहे. पण यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या वगैरे असे काही घडले नाही. या गोष्टी चालत राहणार म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. बापाने पोराला सांगितलं नाही किंवा कळू दिलं नाही म्हणून काही पोराला अश्लिल गोष्टी माहीत होत नाहीत असे नाही. फक्त ते आपण संकेत म्हणून बोलत नाही. कामशास्त्र लिहून ठेवणारी आपली उदार खुली भारतीय परंपरा केवळ अशा एखाद्या कविच्या शब्दाने अपमानित होते? आपल्या राज्यकर्त्यांनी किती बायका केल्या, किती नाटकशाळा सांभाळल्या, त्यांच्या पदरी किती किन्नर होते (तृतीयपंथी) यांच्या लिखीत नोंदी सापडलेल्या आहेत. पेशवाईच्या काळात 13 वर्षांच्या कोवळ्या पोरी पुरवाव्यात असे आदेश दिलेले आहेत. इतकंच काय मराठी नाटकाच्या सुरवातीच्या काळात काही नाटककार हे समलिंगी कसे होते. त्यांना संभोगासाठी कोवळी तरूण मुलं कशी लागायची. आणि ही एक मराठी नाट्यसृष्टीची वेगळीच समस्या कशी होवून बसली आहे असे उल्लेख आहेत. हे सगळं आपल्याकडे आहे ही तक्रार नसते. तर ते केवळ कोणी शब्दांत मांडला, चित्र काढले, चित्रपट काढला, सुरात गुंफून गाणे केले की लगेच बोंब मारायला सुरवात. हे काय ढोंग आहे?  
पु.ल.देशपांडे यांनी या सगळ्याबाबत अतिशय साध्या सौम्य शब्दांत पण फार मार्मिकपणे लिहून ठेवलं आहे. ‘महाराष्ट्र कधी चाळामुळे बिघडला नाही आणि टाळामुळे सुधरला नाही.’ चाळ म्हणजे तमाशा आणि टाळ म्हणजे पंढरीची वारी असा सुंदर श्लेष पु.लं.नी केला होता. 
ज्यांनी गुर्जरांच्या कवितेवर आक्षेप घेतला ते कायदेशीर दृष्ट्या बरोबरच आहेत. पण त्यांचे हेतू शुद्ध नाहीत. आणि जर असे आक्षेप घ्यायचे म्हटलं तर आपल्या संतांनी जे जे लिहून ठेवलंय त्याचे काय करायचे? फक्त अश्लिलता जावू द्या. पण संत साहित्यात दलित जातींबद्दल अतिशय वाईट शब्द वापरले गेले आहेत. त्याचे काय करायचे? असे एका एका ओळींवर शब्दांवर खटले भरायचे तर पुढची 100 वर्षे बाकी सारे सोडून हेच काम न्यायव्यवस्थेला करत बसावे लागेल. आणि तरीही ते पूर्ण होणार नाही.
जे कोणी जाणीवपूर्वक असे अश्लिल उल्लेख करतात, ज्यांचे हेतू वाईट असतात, समाजात तेढ निर्माण करणारे असतात त्यांना समाज त्याच्या पद्धतीने शिक्षा देतच असतो. अश्लिलतेचे आता फारसे काही कोणाला उरले नाही.  साध्या शब्दांची चर्चा चालू आहे, कवीला दोषी गृहीत धरल्या जातंय पण तिकडे माहाजालावर (इंटरनेट) सगळ्या प्रकारचे वासनेचे खेळ सगळ्यांना पाहण्यासाठी खुले आहेत. कुठल्याही वयाची पोरं वाट्टेल ते सहज पाहू शकतात. आधी आंबट शौकिनांसाठी पिवळी मासिकं असायची. प्लेबॉय, पुसीकॅट अशी त्यांची नावं असायची. ब्लुफिल्म पाहण्यासाठी आंबट शौकिन मोठी धडपड करून त्या  व्हिडीओ कॅसेट मिळवायचे. हे सगळे आता खूप कमी झाले आहे. कारण असं काही करायची कोणाला गरजच उरली नाही. ज्याला हवे आहे त्याच्यासाठी हे सगळं मोफत सहज उपलब्ध आहेत.
असं घडलं म्हणून समाजातले बलात्कार वाढले का? आईसलँड/तैवान सारख्या देशात नग्नता हा गुन्हा नाही तिथे जगातील सर्वात जास्त बलात्कार होतात का? उलट असे काही होत नाही हेच सिद्ध झाले आहे. आईसलँड हा तर महिलांसाठी सर्वात सुरक्षित देश समजल्या जातो. बंदी घातली की अशा भावना जास्तच उचंबळून येतात. नैतिकता ही सामान्य लोकांच्या मनात असते यावर विश्वास ठेवला पाहिजे. उलट सर्व लोक अनैतिकच आहेत असं गृहीत धरून आपल्याकडे कायदा आणि सुव्यवस्था वागते. त्यामुळे या यंत्रणेवरचा ताण उगीचच वाढतो.
ज्ञानेश्वरांनी ‘जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ॥ असे म्हटले आहे. म्हणजे वाईट विचार वासना कमी होवेा आणि चांगले विचार वाढो. म्हणजेच माणसाच्या मनात हे सगळे असतेच. चांगूलपणा जो आहेच तो वाढो. निर्माण होवो असे ज्ञानेश्वरांनी म्हटले नाही.
वसंत दत्तात्रय गुर्जर एक गंभीर आणि महत्त्वाचे कवी आहेत. त्यांनी जी कविता लिहीली तिचा वाङमयीन दर्जा अतिशय वरचा आहे. कोणीही ही कविता वाचल्यास त्यांचा उद्देश काय आहे हे सहज कळू शकते. त्यासाठी कुठल्याही तज्ज्ञाचे मत विचारायची, न्यायालयाचा अमूल्य वेळ खर्च करायची गरज नाही. ज्यांना हे आवडत नाही त्यांनी हे वाचू नये. नाही तरी ही कविता कालचा निकाल येईपर्यंत किती जणांना माहित होती? 1984 ची कविता 1994 पर्यंत आक्षेप घेणार्‍यांनी तरी कुठे वाचली होती.  या पुढची जी न्यायालयीन लढाई वसंत दत्तात्रय गुर्जर यांना लढायची आहे त्यांच्या पाठीशी सर्व साहित्यीक, चित्रकार, कलाकारांनी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणार्‍यांनी ठामपणे उभे रहावे. कायदा मोडणार्‍या सलमानसाठी रस्त्यावर उतरणार्‍या ढोंगी लोकांपेक्षा ही कृती निश्चितच लोकशाही ला प्रगल्भ करणारी आहे.
गुर्जर आम्ही तुमच्या सोबत, तूमच्या पाठीशी आहोत ! आम्ही अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या बाजूने आहोत.    
 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575




गांधी मला भेटला

गांधी मला
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या 10 बाय 12 च्या खोलीत
6 बाय अडीचच्या बाजल्यावर
भारतीय जनतेच्या प्रतीकांत भेटला
तेंव्हा तो म्हणाला-
सत्यापासुन सौंदर्य वेगळे असू शकत नाही
सत्य हेच सौंदर्य आहे,
त्या सत्याच्याद्वारा मी सौंदर्य पाहतो
सत्याचा आग्रह ठेवल्यामुळेच तडजोड करण्यात
असलेल्या सौंदर्याचे मोल जाणता येते
सत्य हे वज्राहूनि कठोर आणि
कुसूमाहूनहि कोमल आहे

गांधी मला आकाशवाणी मुंबई ब केंद्राच्या
537.6 किलोसायकलवर
गांधीवंदना या कार्यक्रमात भेटला
तेंव्हा तो बोलला-
महात्म्याचे वचनदेखील बुद्धीच्या
कसोटीवर घासून घ्या
आणि ते कसास न उतरल्यास
त्याचा त्याग करा
आकाशवाणीच्या निविदेकेनं सांगितलं
गांधीवंदना हा कार्यक्रम आपण
5 वाजून 55 मिनीटं ते 6 वाजून 2 मिनीटांपर्यंत
तांत्रिक बिघाडामुळे ऐकू शकला नाहीत
त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत

गांधी मला चार्तुवर्ण्याच्या देवळात भेटला
तेंव्हा तो बनियाच्या धर्माला अनुसरून
पैशाची मोजदाद करत होता
(कुणाचं लक्ष नाही असं पाहून त्यानं
कनवटीला निळी लावली)
गांधी मला
बौद्ध मठांत भेटला
तेव्हा तो बीफचिली ओरपत होता

गांधी मला
चर्चमध्ये भेटला
दर आठवड्याला क्षमा करणार्‍या येशूपुढे
तो गुडघे टेकून उभा होता

गांधी
चुकला (नंगा) फकीर
मला मशिदीत भेटला
तेव्हा तो धर्मांतर करत होता

गांधी मला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
प्रबुद्ध भारतात भेटला
तेव्हा तो म्हणाला-
हरिजनांची सेवा माझ्या जीवनाचा
प्राणवायू आहे
मला पुनर्जन्म नको आहे
पण येणारच असेल तर अस्पृश्याचा यावा
म्हणजे येणारी दु:खं, यातना, अपमान
यांचा मला अनुभव येईल
अस्पृश्यता जिवंत राहण्यापेक्षा
अस्पृश्यता असलेला हिंदुधर्म
मेलेला मला चालेल
असं बोलून तो तडक
भारतमातेच्या मंदिरात आंघोळ करून
गंगेच्या पात्रात उतरला

गांधी मला
सानेगुरूजींच्या आंतरभारती  शाळेत
आयला झवून बापाला सलाम करणार्‍या
धडपडणार्‍या मुलांना
श्यामच्या गोड गोष्टी सांगताना भेटला
तेंव्हा श्यामची आई त्याला म्हणाली-
निरोध वापरा बिनविरोध

गांधी मला
भर रस्त्यात हेमालिनीच नावानं
हस्तमैथून करतांना दिसला
देशांतला हा पहिलाच स्ट्रीट प्ले
अहिंसेचा हाहि एक प्रयो

गांधी मला
टागोरांच्या गीतांजलीत भेटला
तेव्हा तो गोलपिठ्यावर
कविता लिहीत होता

गांधी मला
बाबा आमट्यांच्या एकात्म भारतांत
अपंगांच्या महोत्सवात भेटला
तेव्हा तो म्हणाला-
हात हे याचनेसाठी दुसर्‍यापुढे
पसरण्यासाठी नसतात
आणि दान हे माणसाला नादान बनवते
असं म्हणून
त्यानं अमंरिकन डॉलरचा चेक
ऍक्सेप्ट केला

गांधी मला आचार्य रजनीशांकडे
ध्यानधारणेत
संभोगातून समाधीकडे म्हणत
शेळीकडे वळताना दिसला

गांधी मला
मार्क्सच्या टॉऍटोमधून ड्रायव्ह इन
थिएटरमध्ये
जगातील कामगारांनो एक व्हा
हा पिक्चर पहात
टाइम किल करताना भेटला

गांधी मला
माओच्या लॉंगमार्च मध्ये भेटला
तेव्हा तो शेतकर्‍यांच्या वेषांत
खेड्यातून शहरांत स्थायिक व्हायला
निघाला होता

गांधी मला
डांग्यांच्या गिरणीची भिंत
चढून जाताना दिसता
तेव्हा तो ओरडला-
बिर्लाबावटे की जय

गांधी मला
काळा गांधीच्या दवाखान्यात
सावरकरांना
सँपलची बाटली विकताना भेटला
गांधी मला
अटलबिहारी वाजपेयींच्या
पेशवाईत भेटला
तेंव्हा तो गांधीवादी समाजवादाची
जपमाळ ओढत होता.

गांधी मला
चारु मजुमदारच्या नक्षलबाडीत भेटला
तेव्हा तो घोषणा देत होता-
आमारबाडी तोमार बाडी
सकलबाडी नक्षलबाडी
लालकिलेपे लाल निशान
मॉंग रहा है हिंदुस्थान

गांधी मला
क्रेमलिनमध्ये ब्रेझनेवच्या हस्ते
शांततेचे नोबेल पारितोषिक
घेतांना भेटला
गांधी मला
रेगनच्या व्हाईट हाऊसमध्ये
रेगनच्या न्यूट्रॉनची कळ दाबताना भेटला
माणसं मेलेल्या जगांतली
स्थावरजंगम मालमत्ता दाखवून
गांधी रेगनचं सांत्वन करत होता

गांधी मला
छत्रपतीशिवाजी विडीचे झुरके घेत
फोरासरोडला 580 नंबरच्या कमर्‍यांत
रंगरंगोटी केलेल्या लोकशाही नांवाच्या
रांडेकडे भेटला
तेंव्हा ती म्हणाली-
तू कुठली चिकित्सा करणार आहेस?
तू कुठला प्रयोग करणार आहेस?
तू कुठला प्रकाश दाखवणार आहेस?

गांधी मला
परम पूजनीय सरसंघचालक
बाळासाहेब देवरसांच्या संघस्थानावर
अखंड हिंदुस्थानच्या जाघोषात
अर्धी चड्डी सावरत 61-62 उठाबशा
काढत घोषणा देतांना दिसला
मी हिंदू आहे आणि त्याचा मला
अभिमान आहे
वंदे मातरम्
कॉंन्व्हेंटमध्ये शिशूंना शिकवून
इंग्लंड-अमेरिकेत स्थायिक करीन.

गांधी मला
जमाते इस्लामच्या घोगारी मोहल्ल्यात
पेट्रोडॉलरच्या थ्री-इन-वनमध्ये
पाकिस्तानविरूद्ध हिंदुस्थान क्रिकेट
कॉमेंट्री ऐकताना दिसला
पाकिस्तानचा हिंदुस्थानवर
2 गडी राखून विजय
हे ऐकताच तो नमाज पढला
मोहोल्ला मोहोल्ल्यांत जावून त्यानं
ग्रीनबोर्डाला हार घातला

गांधी मला
सदाशिवपेठेतल्या ना.ग.गोर्‍यांच्या
वाड्यांत भेटला
तेंव्हा तो म्हणाला
स्वातंत्र्याला इतकी वर्षे झाली तरी
आम्हाला
भारत माझा देश आहे
या देशावर माझे प्रेम आहे
इथला विविधतेने नटलेल्या समृद्ध
परंपरांचा मला अभिमान आहे
मी माणसांचा मान ठेवीन
मी माझ्या देशाशी निष्ठा ठेवीन
असं म्हणावं लागतं याची मला खंत वाटते
असं मला लंडनच्या
टेम्स नदीच्या तीरावर सुचलं

गांधी मला
आयर्विनच्या व्हाइसरॉय हाउसमध्ये
भेटला
तेंव्हा तो स्वातंत्र्य सैनिकांच्या
पेन्शनीचा हिशेब करत होता.

गांधी मला
स्वयंघोषित नेताजी राजनारायणच्या
कुटुंबकल्याणकेंद्रात भेटला
तेंव्हा उघडाबंब गाद्यागिरद्यांवर लोळत
मालिश करून घेत
बदामपिस्ते मिठाई खात
भारत मे समाजवाद क्यों नही आता
ह्यावर तो पत्रकार परिषद घेत होता

गांधी मला
अखिल भारती हिजड्यांच्या संमेलनात
कुटुंबनियोजनावर भाषण करताना दिसला
तेंव्हा आशाळभूतपणे चव्हाण
रिकाम्या असलेल्या खुर्चीवर लक्ष ठेवून
संपूर्ण बेरजेचं राजकारण शिजवत होता

गांधी मला
आम जनताकी संपत्ती असलेल्या पृथ्वीवर
बेवारस मुलांच्यात नवरस-बायकोचा खेळ
करताना भेटला
तेंव्हा तो म्हणाला
निधर्मी देश की क्या पहचान
छोडो चड्डी मारो गांड

गांधी मला
हाजी मस्तानच्या साम्राज्यात दिसला
तेंव्हा त्यानं चक्क पंजा सोडला
त्याच्या पंच्यावर मी कधीच गेलो नाही
पंचा काय धोतर काय नि पटलून काय
सत्याचे प्रयोग कशांतूनहि होतात
हो अगदी कवितेतूनसुद्धा

गांधी मला
बाटाच्या कारखान्यांत
बुटाला शिलाई मारतांना दिसला
तेंव्हा बाबूजी गांधींना म्हणला
इस देश मे चमार कभी प्राइम मिनिस्टर
नही हो सकता

गांधी मला
मोरारजींच्या ओशियानात भेटला
शिवाम्बूच्या तारेत तो म्हणाला
स्त्रिया ह्या मूर्ख आणि विवेकशुन्य असतात
मी हे कोणाच्या संदर्भात म्हटलं-
हे आपल्या लक्षात आलं असेलच

गांधी मला
नियतीशी संकेत करताना
नेहरूंच्या तीन मुर्तीत भेटला
तुम्ही आमच्या विश्वासातले
गादी नंतर इंदिरेच्या हवाली करा

गांधी मला
चरणसिंगांच्या सुरजकुंडात भेटला
तेंव्हा तो राष्ट्राला उद्देशून म्हणाला
मेरे जिंदगीकी तमन्ना पुरी हो गयी

गांधी मला कमलेश्वरच्या
परिक्रमात दिसला
तेव्हा तो म्हणाला-
मनोरंजनाची ए यु साधनं
तळागाळातल्या जनतेपर्यंत पोचवायचं
माझं स्वप्न साकार झालं
(कॅमेरामननं कॅमेरा त्याचा आडपंचा
आणि काठी यावर केंद्रीत केला होता)

गांधी मला
रतन खत्रीच्या अड्ड्यावर दिसला
तेंव्हा तो मटक्यातून
राष्ट्रीय एकात्मतेची तीन पानं काढत होता

गांधी मला
सर्व भूमि गोपालकी म्हणणार्‍या
विनोबांच्या धारावीत
टिनपाट घेवून हायवेच्या रांगेत
कुश्चेव्हला
गार्ड ऑफ ऑनर देतांना दिसला

गांधी मला
इंदिरा गांधींच्या 1 सफदरजंग
कारस्थानात भेटला
धटिंगण आयम-माय कार्यकर्त्यानं
त्याच्या गांडीवर लाथ मारली
तेव्हा तो ओरडला-
देश की नेता इंदिरा गांधी
युवको का नेता संजय गांधी
बच्चों का नेता वरूण गांधी
भाड मे गया महात्मा गांधी

गांधी मला
अजितनाथ रेच्या न्यायालयात
आरोपीच्या पिंजर्‍यात दिसला
सत्याचे प्रयोग करून
देश धोक्यात आणल्याबद्दल
राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली
त्याला फांशी दिला

गांधी मला
अत्र्यांच्या शिवशक्तीत
गांधीवर अग्रलेख लिहितांना दिसला
गांधीत आम्ही ईश्वराचे दर्शन घेतले
धन्य झालो
अब्जावधी वर्षांत आता
ईश्वर पृथ्वीवर येणार नाही
स्वदेशी रहा- स्वदेशी बना
असं म्हणून त्यांनी देशीला जवळ केलं

गांधीबाबा राजघाटावर
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या
खांद्यावर हाथ ठेवून म्हणाला-
देव मेला आहे देवमाणूसही मेला आहे
आता सैतानाच्या विश्वात
मेलेल्या देवाला मुक्ती नाही
आणि देवमाणसाला तर नाहीच नाही
-आणि क्षणार्धात तो समाधीत गेला

-वसंत दत्तात्रेय गुर्जर.






Tuesday, May 12, 2015

बालकवींची आठवण कोणाला आहे का?...














उरूस, दैनिक पुण्य नगरी, रविवार 10 मे 2015 

पाच मे 1918 ची गोष्ट आहे. अठ्ठावीस वर्षे वयाचा एक तरूण आपल्या धुंदीत चालला होता. जवळची वाट पकडायची म्हणून तो रेल्वेचे रूळ ओलांडून जाणार्‍या छोट्या पायवाटेने निघाला. दोन रूळ एकत्र येवून पुढे जाणार्‍या ठिकाणी तो उभा होता. तेवढ्यात त्याला मालगाडीची शिट्टी एैकू आली. ही गाडी दुसर्‍या रूळावरून जाईन असा अंदाज होता पण ती नेमकी तो चालला होता त्याच रूळावर आली. घाईघाईत रूळ ओलांडताना त्याची चप्पल तारेत आडकली. ती सोडवण्यासाठी तो खाली झुकला. तोपर्यंत मालगाडी त्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून निघून गेली. 

एरव्ही ही घटना पोलीसांच्या नोंदीत अपघात म्हणून जमा झाली असती. पण हा तरूण म्हणजे कोणी सामान्य इसम नव्हता. मराठी कवितेत ‘बालकवी’ म्हणून अजरामर ठरलेल्या त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची ही गोष्ट आहे. जळगांव जिल्ह्यातील भादली या रेल्वेस्टेशनवर हा अपघात घडला. पाच मे 2015 ही बालकवींची 97 वी पुण्यतिथी. किती जणांना आठवण आहे या कवीची?

जागतिक हास्य दिवस मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. या वर्षी हा दिवस 3 मे रोजी साजरा झाला. जगभरात विविध उपक्रम हाती घेतले गेले. भारतात पण कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातही उत्साही लोकांनी हा दिवस साजरा केला. पण 5 मे रोजी ज्यांची पुण्यतिथी होती त्या बालकवींनी 

आनंदी आनंद गडे
इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे
वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला
दिशांत फिरला
जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे
आनंदी आनंद गडे !

अशी सुंदर आनंदावरची कविता लिहीली त्यांची आठवण हा जागतिक हास्य दिवस साजरा करणार्‍यांना झाली नाही. आनंदाचे तत्त्वज्ञान अतिशय साध्या सोप्या भाषेत लिहीणारा हा कवी ज्यानं आनंदाची केलेली व्याख्या किती साधी सोपी आणि मार्मिक आहे

स्वार्थाच्या बाजारात
किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो
सोडुनी तो स्वार्था जातो
द्वेष संपला  
मत्सर गेला  
आता उरला
इकडे तिकडे चोहिकडे
आनंदी आनंद गडे

बालकवींचा जन्म 13 ऑगस्ट 1890 रोजी धरणगाव (जि. जळगांव) इथे झाला. केवळ 28 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या कवीने अतिशय मोजक्या पण नितांत सुंदर आणि नितळ भावना व्यक्त करणार्‍या कविता लिहून मराठी वाचकांवर मोठे गारूड करून ठेवले आहे.

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, 
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी उन पडे 

किंवा 

हिरवे हिरवे गार गालीचे 
हरित तृणाच्या मखमालीचे 
त्या सुंदर मखमालीवरती 
फुलराणीही खेळत होती

या सारखी गोड रचना असो. आपल्या साध्या सुंदर शब्दकळेने बालकवी वाचकाच्या मनात घर करून राहतात. अशा सुंदर साध्या गोड कविता लिहीणार्‍याला आपण विसरून जातो. त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आमच्या लक्षातही राहत नाहीत. अजून तीन वर्षांनी त्यांची स्मृती शताब्दि येते आहे. गावोगावच्या साहित्य संस्था कित्येक उपक्रम सतत करत असतात. तेंव्हा ज्यांची जन्मशताब्दि होवून गेली आहे अशा मराठी कविंवर काहीतरी कार्यक्रम करावे असे का बरे कोणाच्या डोक्यात येत नाही? एक साहित्य संमेलन केवळ शताब्दि साहित्य संमेलन म्हणून नाही का साजरे करता येणार? केशवसुत, बालकवी पासून ते कुसूमाग्रज, मर्ढेकर, अनिल, इंदिरा संत, ना.घ.देशपांडे, बा.भ.बोरकर, वा.रा.कांत, ग.ल.ठोकळ, ग.ह.पाटील अशी कितीतरी नावे आहेत. शंभरी पार केल्यावरही टिकून राहणार्‍यांची आठवण न काढणे हा आपलाच करंटेपणा आहे.

या जून्या कविंची आठवण का काढायची? कोणाला वाटेल कशाला हे सगळे उकरून काढायचे. पण जर जूनी कविता आपण विसरलो तर पुढच्या कवितेची वाटचाल सोपी रहात नाही. बा.भ.बोरकर लिहून जातात

तू नसताना या जागेवर चिमणी देखील नच फिरके
कसे अचानक झाले मजला जग सगळे परके परके

आणि पन्नास साठ वर्षे उलटल्यावर संदिप खरे सारखा आजचा कवी लिहीतो

नसतेच घरी तू जेंव्हा जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे तुटती धागे संसार फाटका होतो

आजचा कवी काळाच्या किती मागे किंवा पुढे आहे हे समजण्यासाठी जूने कवी वाचावे लागतात. त्यांची कविता समजून घ्यावी लागते. जी कविता काळावर टिकली आहे निदान तेवढी तरी कविता आपण वाचणार की नाही? आणि ती नाही वाचली तर मराठी कवितेचेच नुकसान होते.

आजकाला सर्वच गोष्टींना जातीचा रंग चढवला जातो. मग बालकवी म्हणजे त्यांची जात कोणती? त्याचा काय फायदा आहे? त्याप्रमाणे त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करायची की नाही ते ठरते. कुठलाही खरा प्रतिभावंत नेहमीच जातीपाती, देश, काळ याच्या सीमा ओलांडून आपली निर्मिती करत असतो. 

बालकवींच्याच आयुष्यातील एक काळीज हेलावून टाकणारा प्रसंग आहे. त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे  त्यांचे स्नेही आप्पा सोनाळकर पोत्यात भरत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू खळाखळा वहात होते. बालकवींच्या सदर्‍याकडे हात जाताच आप्पांच्या लक्षात आले की आत घड्याळ आहे आणि ते अजूनही चालूच आहे. बालकवींची एक अप्रकाशित कविता आहे

घड्याळांतला चिमणा काटा
टिक_ टिक् बोलत गोल फिरे
हे धडपडते काळिज उडते
विचित्र चंचल चक्र खरे!
घड्याळातला चिमणा काटा
त्याच घरावर पुन्हा पुन्हा
किति हौसेने उडत चालला
स्वल्प खिन्नता नसे मना!

काळावर इतकी सुंदर कविता लिहीणारा हा कवी आपण कशासाठी जातीपातीच्या चौकटीत, नफा नुकसानीच्या हिशोबात मोजायचा?

शंभर वर्षांपूर्वी होवून गेलेला हा कवि आनंदाचे उत्साहाचे कारंजे आपल्यापुढे कवितेत ठेवून गेला आहे. त्याच्या डोळ्यापुढचे त्याच्या स्वप्नातले जग कसे होते?

सूर्यकिरण सोनेरी हे 
कौमुदि ही हंसते आहे
खुलली संध्या प्रेमाने
आनंदे गाते गाणे
मेघ रंगले
चित्त दंगले
गान स्फुरले
इकडे तिकडे चोहिंकडे 
आनंदी आनंद गडे !

बालकवींना 97 व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !
     
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575