Tuesday, August 26, 2014

बैलाचे कौतुक शेतकर्‍याच्या शहरी पोरांनाच जास्ती !!


                             दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 26 ऑगस्ट 2014 


ठाण्याजवळ मुलूंड उपनगरात रविवारी प्रत्यक्ष घडलेला प्रसंग आहे. सकाळची गर्दीची वेळ. रविवार मुळे थोडी कमी असली तरी महानगराची ती गर्दी. रेल्वेस्टेशनच्या पादचारी पुलावरून माणसे झपाझपा इकडून तिकडे चाललेली. इतक्यात पायर्‍यांवरून गायीच्या गळ्यातील घंट्यांचा आवाज आला. सगळे वळून पाहताहेत तोवर एका माणसाने धरलेल्या कासर्‍यासोबत एक गायही रेल्वे पुलावरील पायर्‍या चढून येत होती. आता मुंबईमध्ये या गायीचे काय काम? गायीला चारा घालण्याचे पुण्य भक्तांना भेटावे या उद्दात (!) हेतूने पलिकडच्या एका मंदिरासमोर ही गाय घेवून हा माणूस बसतो. यासाठी 300 रूपये रोजाने गाय भाड्याने मिळते. लोकांकडून पैसे गोळा करायचे. भक्तांच्या खात्यात दिवसभर पुरेसे पुण्य आणि याच्या खिश्यात पुरेसे पैसे गोळा झाले की गाय मालकाकडे वापस. 

या सगळ्या प्रकाराला काय म्हणणार? काल पोळ्याचा सण सर्वत्र साजरा झाला. शहरातदेखील हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे प्रत्यक्ष खरे जातीचे बैल असण्याचा प्रश्नच नाही. मग मातीचे बैल बाजारातून खरेदी केले जातात. (हो आजकाल घरी कोणी बैल बनवत नाही. शाळेत पोरांना हस्तकला म्हणून कौतुकानं बैल बनवायला सांगतात ती गोष्ट वेगळी.) मातीचा संबंध तुटलेली माणसे मोठ्या उत्साहाने, ‘आमच्या घरी आजही कशी बैलाची पुजा होते’ हे कौतुकाने एकमेकांना दाखवून देतात. शिवाय चुकून माकून कुणी बैलजोडी सजवून शहरात रस्त्यावरून मिरवायला आणली तर काही विचारू नका. सगळ्यांना त्या बैलांना ओवाळणे, त्यांच्या पायाखाली काकडी फोडणे, बैलाला पुरणपोळी खावू घालणे याचा नको तेवढा उत्साह येतो. 

शहराचे सोडा खेड्यात काय परिस्थिती आहे? गाय, बैल, शेळ्या आदी जनावरे सांभाळणे मोठी कटकट होवून बसली आहे. आधी चराईसाठी गायरानं असायची, माळ असायचे. आता तसे काही उरलं नाही. शिवाय जनावरे सांभाळण्यासाठी दुध काढण्यासाठी माणसं होती. चरायला न्यायला गुराखी असायचे. या जनावरांना खायला जसं बाहेर उपलब्ध होतं त्याप्रमाणेच शेतातील ज्वारीचा किंवा मक्याचा कडबा (पिकाचा कणीस सोडून उरलेला जैविक भाग- कडबा म्हणजे काय हे आजकाल सांगावं लागतं) असायचा.  लसूण गवत, कडूळ किंवा अजून काही जनावरांना उपयुक्त चारा शेतकरी आवर्जून लावायचे. पण दिवसेंदिवस शेतीची बिकट अवस्था होत चालली आहे आणि हे सगळं नाहिसं होत आहे. दुष्काळात जनावरांचे मोठे हाल होतात. परिणामी ट्रॅक्टरने शेतीची कामं झपाट्याने उरकून शेतकरी मोकळा होत आहे. जनावरांचे झेंगट त्याला परवडेनासे झाले आहे. 

मग पोळ्याचे- बैलाचे कौतुक कोणाला? शेतीसोडून शहरात येवून नोकरी करणार्‍या शेतकर्‍यांच्या पोरांना! जसे पन्नास शंभर वर्षांपूर्वी  कोकणातील बहुतांश लोक पोटपाण्यासाठी मुंबई पुण्याला स्थलांतरीत झाले. गावच्या आठवणी त्यांच्या मनात जिवंत असायच्या.  त्यामुळे कोकणातील लेखकांनी लिहीलेली वर्णनं वाचताना त्यांना मोठं छान वाटायचं. परिणामी मराठीत कोकणातील लेखकांच्या पुस्तकांची मोठी चलती निर्माण झाली. तसं आता या ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या पोरांनी केलं आहे. यांनी शेती सोडली. पण शेतीचे वर्णन करणारे, काळ्या मातीचे गुणगान करणारे, बैलाचा, गायीचा लळा वर्णन करणार्‍या साहित्यकृतीचे मोठे कौतुक सुरू झाले. एकीकडे गावाकडून शहरात स्थलांतरीतांचा ओघ सुरू राहिला. शेती विकून नौकर्‍या स्विकारल्या आणि दुसरीकडे गावच्या वर्णनाचा पुर मराठी साहित्यात निर्माण झाला. हा एक विरोधाभासच होता. 

बैल हा विषय तर फार पुरातन. अगदी ऋग्वेदात गायीचे बैलाचे संदर्भ आहेत. स्वाभाविकच आहे कारण मानवी संस्कृतीची सुरवातच शेतीपासून झाली. मारून खाणारा म्हणजे शिकार करणारा माणूस पेरून खायला लागला म्हणजे शेती करायला लागला आणि हजारो लाखो वर्षांनंतर पहिल्यांदाच तो स्थिर झाला. स्थिर झाला म्हणूनच संस्कृती निर्माण झाली. वेदांतील कृषीसुक्तात 

कल्याण बैलांचे तसे माणसांचे,
कल्यण करो या शेताचे नांगर
कल्याणाच्या गाठी वडींच्या असोत
कल्याणकारक असावा आसूड ॥

कल्याणा आमुच्या नांगरोत फाळ
नांगर्‍ये चालोत बैलांच्या संगती
कल्याण पाऊस बरसो पाण्याने
आम्हां सुख द्यावे शेतीजी-सीतने ॥ 
(वेदांतील गाणी-विश्वानाथ खैरे, पृ. 18, मंडल 4,  ऋचा 57, संमत प्रकाशन)

असे असल्यावर बैलाचे स्थान आपल्या परंपरेत असणारच. तेंव्हा बैलाची पुजा करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं स्वाभाविकच आहे. श्रावण अमावस्येला पोळ्याचा सण साजरा करावा. हे मानवी स्वभावाला धरूनच आहे. पण प्रत्यक्ष खर्‍याखुर्‍या बैलाची आता उपयुक्तता किती उरली आहे? असा प्रश्न विचारला तर भले भले दचकतात. खरं तर प्रत्यक्ष कृतीतून आपण बैलाची उपयुक्तता संपली हे दाखवून दिले आहे. गायीचे बैलाचे कौतुक करणारे कोण आहेत? ज्यांनी शेती सोडली आहे किंवा ज्यांचा आता शेतीशी काही संबंध नाही ते.

आमचे एक ज्येष्ठ कवीमित्र मोठे चांगले चित्रकार आहेत. ते बांगड्याच्या तुकड्याच्या मोठ्या सुंदर कलाकृती भिंतीवर चितारतात. यात प्रामुख्याने मोर आणि बैल असतात. बर्‍याच ग्रामीण सहित्यीकांनी आपल्या घरात भिंतीवर हा बैल काढून घेतला आहे. पण प्रत्यक्षात कोणाच्याच शहरातील घरात गोठा आढळणार नाही. गायी बैलावर फार गहिवरून कोणी बोलू लागला तर त्याला फक्त इतकेच विचारावे की तुझ्या घरात आत्ता जनावरं आहेत का? फार पैसा आला तर तू गाडी घेतोस, घराला दुसरा मजला बांधतोस, पोराला महागडा मोबाईल घेवून देतोस मग जास्तीचा प्लॉट घेवून त्यावर गोठा बांधून गायी बैल का नाही सांभाळत? खरं कारण म्हणजे आता गायी बैल पाळणं सांभाळणं हा आतबट्ट्याचा व्यवहार कोणालाच नको आहे. पण तसं कोणी कबुल करत नाही. आपल्या संस्कृतीत एक विकृती आहे. ज्यावर अन्याय करायचा, ज्याला दुय्यम स्थान द्यायचं त्याचा वरवर अवास्तव वाटावा असा गौरव आम्ही करतो. स्त्रीयांना दुय्यम मानायचं आणि मातृदेवता म्हणून तिची पुजा करायची, शेतकर्‍याची शेतीची माती करायची आणि बळीराजा म्हणून त्याचं कौतुक करायचं, शहरात येवून स्थायीक व्हायचं आणि गावगाड्याची रम्य वर्णन एकमेकांना सांगायची. हे सगळं ढोंग आहे. जनावरांच्या श्रमावर आधारलेली व्यवस्था कधीच संपली आहे. यंत्रयुग आलं आहे आणि आपण त्याचा लाभ घेतो आहोत. त्या अनुषंगाने मानवाने आपली प्रगती साधली आहे. घोड्यांचे कौतुक आहे म्हणून कोणी घोडागाडी वापरत नाही. तसेच बैलाचे कौतुक आहे म्हणून त्याला नांगराला जोडणे, बैलगाडीचा वापर करणे आता शक्य नाही. ते त्रासदायक ठरतं आहे. अगदी जवळच्या गावाला जायलाही आता छोट्या गाड्यांचा वापर होतो बैलगाडीचा नाही.

माझ्या मामाची रंगीत गाडी हो 
तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो 

हे फक्त लहानमुलांच्या कवितेतच उरलं आहे. 
ज्यांना म्हणून वृषभ संस्कृतीचे गोडवे गायचे असतील त्यांच्या घरातील स्वयंचालित गाड्यांची संख्या आधी मोजून घ्या. हे ढोंग आपण आता सोडून दिलं पाहिजे. पुजेत इतके सारे देव आपण पुजतो त्याप्रमाणे आता एक बैलाचीही मुर्ती करून पुजूत. ऋषी पंचमी हा सण म्हणजे बैलाचा शेतीत वापर झाला त्याच्या आधीच्या काळातील सण आहे. आपण तो आजतागायत साजरा करतो आहोत.  या दिवशी बैलाच्या श्रमाने पिकवलेले धान्य खात नाहीत. तसे आता वर्षातून एक दिवस तरी बैलाच्या श्रमाचे खायचा सण साजरा करावा लागेल. तो सण आपण कृषी पंचमी किंवा वृषभ पंचमी म्हणून साजरा करू. बाकी बैलाचे जास्तीचे गोडवे गायची काही गरज नाही  (हे वाचून कोणा बैलप्रेमी मानवाच्या भावना दुखावल्या तर मी क्षमा मागतो. बैलाच्या भावना दुखावणार नाहीत उलट त्यांना आनंदच होईल याची मला खात्री आहे !!) 
             
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575       

Tuesday, August 19, 2014

कहा ले चले हो ‘गुलजार’ हमे बावरा बनाईके ॥



                                   दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 19 ऑगस्ट 2014 


संपुर्णसिंग कालरा यांचा जन्म 18 ऑगस्ट 1936 रोजी झेलम जिल्ह्यातील दिना या गावी झाला. हे गाव पाकिस्तानातील पंजाब प्रांतात आहे. फाळणीनंतर हे कुटूंब भारतात स्थलांतरित झाले. अशी माहिती दिली तर तूम्हाला फारसा काहीच बोध होणार नाही. कोणातरी स्थलांतरित शीख कुटूंबातील माणसाची ही माहिती आहे असं तूम्ही समजाल. पण हेच फक्त ‘गुलजार’ एवढं लिहीलं तर तूम्हाला बाकी फारसं काहीच सांगायची गरजच पडणार नाही. ‘गुलजार’ या नावाची मोहिनीच तेवढी जबरदस्त आहे. चित्रपटांची श्रेयनामावली वाचताना संगीत-अमूक ढमूक, गायक- अमूक ढमूक असं वाचता वाचता गीत-गुलजार असं पडद्यावर दिसायचं. मला लहानपणी खुप वेळा असं वाटायचं की गीत आणि गुलजार हे दोन्ही शब्द जोडूनच येतात म्हणजे ते एकच आहेत की काय. त्यामुळे ‘गुलजार’ ला नुसतं गुलजार न समजता मी नेहमीच 'गीत गुलजारच' समजत आलो. लहानपणी झालेली ही चुक नसून खरेच अशी परिस्थिती आहे हे आता मोठेपणी कळत आहे.

बरोबर पन्नास वर्षांपूर्वी बंदिनी चित्रपटात गुलजार नी पहिलं गाणं लिहिले. सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ते गोड गाणं होतं ‘मोरा गोरा अंग लई ले । मोहे श्याम रंग दई दे ॥ याच गाण्यातील शेवटच्या कडव्यात गुलजार यांनी जे लिहून ठेवलं आहे ते आजही हिंदी रसिकांना जसंच्या तसं लागू पडतं. गुलजार ने लिहीलं होतं

कुछ खो दिया है पाईके
कुछ पा लिया गवाईके
कहा ले चला है मनवा
मोहे बावरी बनाईके ॥

ही जी ‘बावरी बनाईके’ अवस्था आहे ती हिंदी गाणी ऐकणार्‍या रसिकांची गुलजारने करून ठेवली आहे. त्यामुळे गुलजारचेच शब्द घेवून गुलजारला म्हणावेसे वाटते

कहा ले चले हो गुलजार
हमे बावरा बनाईके ॥

खरं तर चित्रपट गीतांमुळे अफाट प्रसिद्धी लाभलेल्या गुलजार यांना आपल्या या यशाचे अतोनात समाधान वाटायला हवे होते. अगदी या पहिल्या गाण्यापासून ते अगदी अलिकडच्या ‘बीडी जलाइले’ पर्यंत लोकप्रियतेचा, व्यावसायिकतेचा  गुलजारचा आलेख चढताच राहिला आहे. हिंदी चित्रपटांमधे दर्जेदार प्रतिभावंत गीतकारांची एक मोठी परंपरा आहे. साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, शैलेंद्र, शकिल बदायुनी, हसरत जयपूरी, राजा मेहंदी अली खान, राजेंद्र कृष्ण, कैफी आझमी. या परंपरेतील शेवटची दोन नावं म्हणजे गुलजार आणि जावेद. त्यानंतर इतके प्रतिभावंत आणि प्रभावशाली गीतकार झाले नाहीत. चित्रपट क्षेत्रात सर्वोच्च समजाला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार आत्तापर्यंत 61 जणांना देण्यात आला. त्यात गीतकार असलेले केवळ तीनच आहेत. मजरूह सुलतानपुरी -1993,  प्रदीप ('ए मेरे वतन के लोगो' लिहीणारे) 1997 आणि गुलजार-२०१३ . 

एवढ्या पुरस्कारानेही गुलजार मधला कवी मात्र अस्वस्थच राहिला. पहिला पुरस्कार पटकावणार्‍या मजरूह ने दस्तक चित्रपटात अतोनात सुंदर गजल लिहून कलाकाराची वेदना मांडली आहे. मदन मोहन यांची ही रचना लता मंगेशकरने गायली आहे. 

हम है मता ऐ कुचा ओ बाजार की तरहा
उठती है हर निगाह खरीददार की तरहा |

गल्लीबोळातील दुकानात मांडून ठेवलेल्या वस्तूंसारखे आम्ही आहोत. कारण प्रत्येक नजर ग्राहक असल्यासारखी आमच्यावर रोखलेली आहे. असं व्यावसायिकतेचं दु:ख मजरूहने मांडलं होतं. गुलजार यांनाही हीच बाब अस्वस्थ करत राहते. 

‘जय हो’ गाण्यासाठी जागतिक चित्रपट क्षेत्रातील सर्वात मोठा, प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार गुलजार यांना मिळाला. त्या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी गुलजार यांना निमंत्रित केल्या गेले. त्यासाठी ज्या अटी संयोजकांनी घातल्या होत्या त्या वाचून गुलजार अचंबित झाले. त्या प्रसंगी विशिष्ट प्रकारचे कपडे घालणे (टाय, कोट, बुट) अनिवार्य होते. गुलजारमधला कवी अस्वस्थ झाला. त्यांनी कधीच हे कपडे घातले नव्हते. त्यांनी नम्रपणे कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासच नकार दिला. हा पुरस्कार वितरण सोहळा चालू असताना गुलजार आपल्या घरीच दिवाणखान्यात गालिबच्या पुतळ्यापाशी बसून राहिले. याचं कारण म्हणजे व्यावसायिक गीतकार म्हणून प्रसिद्धी पैसा लोकप्रियता मिळाली तरी गुलजार खरे कवी आहे. आपण जे लिहीतो आहोत ते केवळ रसिकांसाठी. त्यानं दाद दिली, दखल घेतली तर ती खरी पावती. तो खरा पुरस्कार. आपल्या एका कवितेत गुलजार यांनी ही भावना फार सोप्या शब्दांत आणि फार परिणामकारकरित्या लिहून ठेवली आहे.

उम्मीद भी है
घबराहट भी है
कि अब लोग क्या कहेगे
और 
इससे बडा डर यह है
कही ऐसा ना हो
कि लोग कुछ भी न कहे

गुलजार यांच्या चित्रपट गीतांवर भरपूर लिहील्या गेलं आहे. त्याची दखलही घेतल्या गेली आहे. पटकथा लेखक, दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी  गौरविल्या गेली आहेत. पण कवी म्हणून त्यांची फारशी दखल घेतली गेली नाही. याचे दु:ख खुद्द गुलजार यांनाही असावे. त्यांचा अगदी अलिकडे प्रकाशित झालेला कविता संग्रह ‘पन्द्रह पाच पचहत्तर’ याची साक्ष आहे. हा संग्रहाचे हस्तलिखीत त्यांनी हिंदीचे प्रसिद्ध कवी समिक्षक अशोक वाजपेयी यांना दाखवले. त्यांनी आक्षेप घेतल्या त्या कविता वगळल्या. अशोक वाजपेयींनी याला छोटीशी प्रस्तावना लिहीली तेंव्हाच हा लोकप्रिय, जागतिक पुरस्कार प्राप्त कवी काहीसा समाधान पावला. 

अशोक वाजपेयींनी गुलजार यांच्या कवितेबाबत लिहीलं आहे, ‘गुलजार के यहां बहुत ज्यादा कहने की उतावली नही है । उनका आग्रह उतना ही कहने पर है जितना जरूरी हो, जो सटीक बैठे । गुलजार की कविता, एक बार फिर, हमे यह भरोसा दिलाती है  कि आज की दुनिया और समय में कविता हमारे साथ है और अपनी दुनिया की कई सुंदरताऐ, उलझने और बिडम्बनाऐं कविता के सहारे बेहतर समझ सकते है ।’

अशोक वाजपयेंनी या ओळी 2010 मध्ये लिहील्या आहेत. पण काय आश्चर्य या संग्रहात नसलेली आधीची एक गुलजार यांची कविता नेमकी शेवटच्या ओळींशी मिळती जुळती आहे. 

कन्धे झुक जाते है जब बोझ से इस लंबे सफर के
हॉंप जाता हूं मैं जब चढते हुऐ तेज चढाने
सांसे रह जाती है जब सीने मे एक गुच्छा-सा हो कर
और लगता है 
कि दम टूट ही जायेगा यही पर

एक नन्हीसी मेरी नज्म मेरे सामने आ कर
मुझसे कहती है मेरा हाथ पकड कर
मेरे शायर
ला, मेरे कन्धों पर दख दे
मैं तेरा बोझ उठा लूं ।

गुलजारच्या छोट्याशा ‘नज्म’ने केवळ त्यांचे ओझं उचललं आहे असं नसून समस्त  रसिकांचे ओझं आपल्या डोक्यावर उचलून धरलं आहे म्हणून तर हे रूक्ष जगणं सुसह्य आहे. वाढदिवसाच्या गुलजार यांना लाख लाख शुभेच्छा ।  
             
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, August 12, 2014

शेतकर्‍याचा 15 ऑगस्ट कवा हाय ?

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 12 ऑगस्ट 2014 


आजपासून बरोबर 3 दिवसांनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावतील. आणि जनतेला संबोधित करतील. 68 वेळा ही कवायत केल्या गेली. विविध पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. सध्याचे पंतप्रधान कॉंग्रेसेतर पहिले पंतप्रधान आहेत ज्यांना स्वत:च्या बळावर पूर्ण बहुमत मिळाले आहे. कॉंग्रेसशिवाय कुणालाही हे भाग्य लाभले नव्हते. पण सर्व पंतप्रधानांमध्ये शेतकरी विरोधाचे सूत्र मात्र समान आहे.  ‘शेतकर्‍याचे मरण हेच सरकारचे धोरण’ अशी घोषणाच शेतकरी चळवळीने दिली होती. सर्व शेतकर्‍यांना मोठी आशा होती की हे नविन मोदी सरकार तरी ही घोषणा खोटी ठरवेल. पण याही सरकारने कांदा, बटाटा यांना जिवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकूले. कांद्याचे निर्यात मुल्य वाढविले, जनुकीय बियाण्यांच्या चाचण्या घेण्यास का-कू करून आपण काही फार वेगळे नाही हे दाखवून दिले. 

दिल्लीच्या सरकारचा अन्याय कमी पडला म्हणून की काय मुंबईचे सरकारही आपल्या कडून होईल तो अन्याय करून आपणही मागे नाही हेच दाखवून देत आहे. पंधरा ऑगस्टच्या मुहूर्तावर परभणीच्या शेतकर्‍यांवर मुंबईच्या सरकारने गुन्हे नोंदवून तुरूंगात टाकण्याची तयारी चालविली आहे. हे शेतकरी नक्षलवादी आहेत का? हे दहशतवादी आहेत का? काही आतंकवादी कारवाया यांनी केल्या आहेत का? कुठे बलात्कार करण्यात यांचा पुढाकार आहे का? काही चोरी खुन लाच लुचपत अशी काही प्रकरणे आहेत का? तर तसे काहीच नाही. कारण असे काही करणार्‍यांना पकडण्याचा पुरूषार्थ सरकार दाखवित नसते. या शेतकर्‍यांनी जो गुन्हा केला आहे तो सरकारच्या दृष्टीने फारच भयानक गुन्हा आहे. या शेतकर्‍यांनी आपल्या पडिक शेतात पेरणी करण्याचा घोर अपराध केला आहे. तेंव्हा त्यांना तुरूंगात टाकणे सरकारचे आद्य कर्तव्यच नाही का?

गोष्ट तशी फार मोठी नाही आणि समजायलाही फार अवघड नाही. परभणीला कृषी विद्यापीठ स्थापन करण्याचा शासनाचा निर्णय झाला. परिणामी विद्यापीठासाठी म्हणून दहा हजार एकर जमिन (चार हजार हेक्टर) शेतकर्‍यांकडून संपादित करण्यात आली. 1972 ते 1976 या काळात हे संपादन पूर्ण झाले. शेतकर्‍यांकडून जमिनी घेताना त्यांचे पुनर्वसन आणि घरटी एक नौकरी असे आश्वासन देण्यात आले. जमिनीच्या बदल्यात शेतकर्‍यांना मिळालेला मोबदला मामुली होता. 

प्रत्यक्षात काय घडले? शेंद्रा, बलसा, सायाळा या गावच्या जमिनी संपादित केल्या गेल्या पण या शेतकर्‍यांचे पुनर्वसन झालेच नाही. शिवाय नौकर्‍यांचे आश्वासनही नुसते कागदोपत्रीच राहिले. विद्यापीठाने ही जमिन 1990 सालापर्यंत जवळपास 14 वर्षे वहित केली. शेतीच्या उत्पन्नावर विद्यापीठाचा खर्च चालावा अशी संकल्पना होती.  विद्यापीठाच्या लक्षात आले की शेतीतून फायदा होणे तर दूरच उलट खर्चच होतो. मग विद्यापीठाने सरकारकडे हात पसरले. अनुदानाचा ओघ सुरू झाला. शेती पडिक राहिली. शेवटी 2001 साली विद्यापीठाने जाहिर केले की 'एकूण जमिनीपैकी 2380 हेक्टर जमिन म्हणजे सहा हजार हेक्टर जमिन अतिरिक्त आहे. आम्ही ती कसू शकत नाही.' ज्या शेतकर्‍यांची ही जमिन होती ते इतरत्र मजूरी करून आपली गुजराण करत होते.  

ज्या कामासाठी सरकाने जमिनी संपादित केल्या ते काम झाले नाही किंवा ते उद्दीष्ट सफल झाले नाही तर त्या जमिनी मुळ मालकाला परत द्याव्या अशी नियमाप्रमाणे तरतूद आहे. त्याप्रमाणे ही अतिरिक्त पडिक जमिन आपली आपल्याला परत द्यावे अशी मागणी शेतकर्‍यांनी सरकारकडे केली. सरकारने त्याकडे अर्थातच लक्ष दिले नाही. मग ही जमिन निदान कसू द्या अशी मागणी शेतकर्‍यांनी केली.त्याकडेही सरकारने फारसे लक्ष दिले नाही. काही शेतकर्‍यांनी 2002 सालापासून या जमिनीची मशागत सुरू केली. सर्व शेतकर्‍यांनी ही मशागत करून पेरणी केली नव्हती. बारा वर्षे वाट पाहण्यात गेली तेंव्हा अजून काही शेतकर्‍यांनी असे ठरविले की आपणही आपले पडिक  शेत मशागतीने सुधारू आणि जमेल तसा पेरा करू. एरव्ही जमिन पडिक ठेवणार्‍या विद्यापीठ प्रशासनाला 12 वर्षांनंतर पहिल्यांदाच जाग आली. आणि त्यांनी यावेळी शेतकर्‍यांना धडा शिकवायची तयारी चालू केली. सरकारने चालविलेल्या दडपशाहीचे चटके बसण्यास सुरूवात होताच सर्व शेतकर्‍यांनी मिळून शेतकरी संघर्ष समिती स्थापन केली. शेतकरी संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क केला. प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचा एक मेळावा घेण्याचे ठरविले. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, माजी आमदार वामनराव चटप यांना आमंत्रित केले. हा मेळावा होण्याच्या दोन दिवस आधी शेतकर्‍यांना धडा शिकविण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने वहित जमिनीवर केलेला पेरा ट्रॅक्टर लावून मोडून काढला. दिवसा ढवळ्या आपलेच शासन आपल्याच शेतात आपण केलेली मेहनत मातीमोल करताना शेतकरी डोळ्यात पाणी आणून पहात राहिले. 

शेतकर्‍यांच्या मेळाव्यात आजारपणामुळे शरद जोशी उपस्थित राहू शकले नाहीत. पण गुणवंत पाटील हंगरगेकर, माजी आमदार वामनराव चटप, गोविंद जोशी आणि ऍड. अनंत उमरीकर यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करून शांततेच्या मार्गाने अहिंसक पद्धतीने लढा उभारण्याचे सांगितले. शंतकर्‍यांनी हे शांतपणे एैकून घेतले. शेतकरी घरी परतले पण प्रमुख कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवून त्यांना तुरूंगात डांबण्याचे उद्योग शासनाने सुरू केले. लढा उभारणारे तरूण नेतृत्व किशोर ढगे याच्यावर गुन्हे नोंदवले गेले आहेत. उद्या पंधरा ऑगस्ट आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शेतकर्‍याला तुरूंगाचा आहेर देण्याची योजना शासनाने आखली आहे. 

कृषी विद्यापीठातूनच एकेकाळी शेतकरी चळवळीचे वादळ उठले होते. तेंव्हा विद्यार्थी असलेले शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते लातूरचे प्रा. डॉ. शेषराव मोहिते यांची एक कविता त्या काळात फार गाजली होती. पंधरा ऑगस्टच्या पार्श्चभूमीवरील शेषराव यांची कविता ‘आमचा 15 ऑगस्ट कवा हाय?’ असा प्रश्न इतर सामान्य जनतेला विचारीत होती. आजही हीच परिस्थिती पाहून शेषराव यांनी याहून काय वेगळे लिहीले असते..

आमचा पंधरा ऑगस्ट कवा हाय?

जवा उद्या पंधरा ऑगस्ट असायचा
तवा माय माझी 
अंगावरले फाटके कपडे टाचायची
नवे कपडे नाहीत म्हणून
बापावर राग काढायची
कर्मावर बोटं मोडाची
तवा बाप माझा
कोपर्‍यातल्या दिव्या जवळ बसून
पायातले काटे काढायचा
तिथं मेण लावून जाळायचा
ओठावर ओठ गच्च दाबून
डोळ्यातून टिपं गाळायचा
जवा उद्या पंधरा ऑगस्ट असायचा

पण 
अलिकडे अलिकडे
पंधरा ऑगस्ट आला की
माझा बाप बिथरल्यावानी करतोय
कुळवाचं रूमणं हातात घेतोय
आणि नाशिकात निपाणीत
सांडलेल्या रक्ताच्यान
आमचा पंधरा ऑगस्ट 
कवा हाय मनतोय.

आमचा पंधरा ऑगस्ट कवा हाय?
                     
                   - शेषराव मोहिते

तेंव्हा नाशिक निपाणीत शासनाने केलेल्या गोळीबारात शेतकर्‍यांचे रक्त सांडले होते. आता तीस वर्षे उलटून गेली. तेहतीस शेतकरी शासनाच्या गोळीबारात शहीद झाले. पण परिस्थिती तीच आहे. नौकरी मिळत नाही आणि स्वत:ची पडिक जमिन कसायला गेलं, परत मागायला गेलं की मायबाप सरकार तुरूंगात टाकतंय, उद्या गोळ्याही झाडायला कमी करणार नाही. पंधरा ऑगस्ट तूमचा आहे. मग आमचा पंधरा ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन कवा हाय? असं म्हणत आर्त टाहो फोडणार्‍या शेतकर्‍याचा आवाज आम्हाला कधी ऐकू येणार?           
    
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, August 5, 2014

किशोरकुमारसाठी रफी गातो तेंव्हा...


दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 5 ऑगस्ट 2014 

वाचकांना कदाचित असे वाटेल की शिर्षक चुकले आहे. दिलीपकुमारसाठी रफी गातो तेंव्हा..., देव आनंदसाठी रफी गातो तेंव्हा... किंवा शम्मी कपुरसाठी रफी गातो तेंव्हा... असे शिर्षक योग्य आहे. कारण या नायकांसाठी मोहम्मद रफीचा आवाज आपल्या मनात ठसून आहे. पण किशोरकुमार जो की स्वत:च एक चांगला गायक होता त्यासाठी मोहम्मद रफीचा आवाज... पण हे खरं आहे. 31 जूलै ही रफीची पुण्यतिथी तर 4 ऑगस्ट ही किशोरची जयंती.  

कल्पना करा मस्तीखोर किशोरकुमार छब्बा जाकिट धोतर घालून व्यवस्थित भांग पाडून हाती तंबोरा घेवून मांडी घालून बसला आहे. समोर नटखट मधुबाला किंवा मुमताज किंवा शुभा खोटे कोणी नसून शास्त्रीय नृत्यांत निपूण असलेली पदमिनी सारखी सौंदर्यवती आहे. किशोरकुमार तोंड उघडतो आणि त्याच्या तोंडातून मोहम्मद रफीचे सूर बाहेर पडतात. शास्त्रीय रागदारीवर आधारीत ‘मन मोरा बावरा’ हे गाणं किशोरकुमारसाठी रफीने गायले आहे. 1958 ला आलेल्या ‘रागिणी’ या चित्रपटातील हे गीत आहे. अजून एक आश्चर्य म्हणजे या गाण्याचा संगीतकार कुणी शास्त्रीय संगीतासाठी प्रसिद्ध असलेला संगीतकार नाही. तर मस्तीखोर चालीसाठी टांग्याच्या ठेक्यासाठी प्रसिद्ध असलेला ओ.पी.नय्यर हा या गाण्याचा संगीतकार आहे. नुसता रफीच नाही तर तेंव्हाचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक  फतेह अली, अमानत अली आणि उस्ताद अमीर खान यांचेही आवाज किशोरकुमारसाठी ओ.पी.नय्यरनी यात वापरून कमाल केली आहे. ‘ललत’ रागातील अमीर खां यांची प्रसिद्ध बंदिश ‘जोगिया मोरे घर आये’ ही याच चित्रपटात आहे. सध्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद राशीद खां ही बंदिश अप्रतिम गातात. पण याही चित्रपटाच्या आधी १९५६ मध्ये "भागम भाग" नावाचा किशोरकुमार भगवान दादा यांचा चित्रपट आला होता. त्यालाही संगीत ओ पी नय्यर यांचेच होते. "चले हो कहा करके जी बेकरार" असे एक गोड गाणे रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात आहे. पडद्यावर शशिकला आणि किशोरकुमार आहेत. यात खरे तर किशोर रफी अशी दोन गाणी आहेतही. याच चित्रपटात अजून एका गाण्यात किशोरकुमार साठी एस. डी. बतीश यांचा आवाज वापरला आहे. ( दिल दिया दौलत को- रफी व एस डी बतीश)    

शंकर जयकिशनने किशोरकुमारचा वापर फार थोडा केला असा समज आहे. गंमत म्हणजे मुकेशच्या बरोबरीनेच किशोरकुमारची गाणी शंकर जयकिशनकडे आहेत. रागिणीनंतर दुसर्‍याच वर्षी 1959 मध्ये ‘शरारत’ नावाच्या शंकर जयकिशनच्या चित्रपटात किशोरकुमारच्या तोंडी रफीचे गाणे आहे. ‘अजब है दास्ता तेरी ऐ जिंदगी । कभी हसा दिया रूला दिया कभी ॥ असे या गाण्याचे साधे पण नितांत सुंदर बोल हसरत जयपूरीने लिहीले आहेत. हे खरंच अजब आहे की मस्तीखोर किशोरकुमार शांतपणे पियानोवर बसून मीनाकुमारी समोर हे गाणं सादर करतो आहे. शंकर जयकिशनचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी शैलेंद्र व हसरत जयपूरी सोडून कुणाचीच गाणी कधी वापरली नाहीत. बी.आर.चोप्रा यांनी विविध संगीतकारांना आपल्या चित्रपटांसाठी संगीत देण्यासाठी बोलावले. पण गीतकार म्हणून साहिर त्यांनी कधी सोडला नाही. एकदा त्यांनी शंकर जयकिशनला आमंत्रित केलं. सर्व अटी दोघांनाही मान्य झाल्यावर गीतकारासाठी त्यांनी साहिरच्या नावाचा आग्रह धरला. साहिर तसा चित्रपटसृष्टीतील फार मोठा प्रतिभावंत गीतकार. पण शंकर-जयकिशनने शैलेंद्र आणि हसरत जयपूरीशिवाय संगीत देणार नाही म्हणत करार मोडून टाकला. ज्याच्यासाठी शंकर जयकिशन आग्रही होते तो हसरत जयपूरी एक साधा बस कंडक्टर होता. 

चौथ गाणं रफीने किशोर कुमारसाठी गायलं ते ‘बागी शहजादा’ (1964) या चित्रपटासाठी. किशोरकुमार आणि कुमकुमवर हे गाणं चित्रित झालं आहे. रफीसोबत आहे सुमन कल्याणपूर. बीपीनदत्त या अनोळखी संगीतकाराने हे गाणं गावून घेतलं आहे. गाण्याचे बोल फारच मधूर आहेत. ‘मै इस मासूम  चेहरेको अगर छू लू तो क्या होगा?’ असा प्रश्न रफीने केल्यावर त्याला सुमन कल्याणपूर तशाच हळव्या आवाजात उत्तर देते, ‘अरे पागल वो ही होगा जो मंजूर ए खुदा होगा.’ रफी-सुमन कल्याणपूर ही जोडी फार काळ टिकली. त्याचं कारणही मोठं गंमतशीर आहे. गाण्याची रॉयल्टी घेण्यावरून लता मंगेशकरने पहिल्यांदा आवाज उठवला. गाण्याच्या रेकॉर्ड जशा खपल्या जातात तशी जास्त रॉयल्टी आपल्याला भेटली पाहिजे असा लताचा आग्रह होता. त्याला रफीने दिलेले उत्तर फार तात्विक आणि त्याची स्वच्छ नितळ मानसिकता सांगणारे आहे. रफीचे म्हणणे होते की चित्रपटासाठी गाताना आपण आपले एक मानधन सांगितलेले असते. आणि ते आपल्याला निर्माता देतो. चित्रपट पडला तर आपण आपल्याकडून पैसे परत देतो का? मग चित्रपटाची गाणी चालली तर आपल्याला जास्त पैसे मागायचा काय हक्क आहे? परिणामी लता-रफी यांच्यात बेबनाव झाला. मग रफीसोबत कोण गाणार? अशावेळी सुमन कल्याणपुरचा आवाज संगीतकार रफीसोबत वापरायला लागले. सुमन कल्याणपुरने आपल्या गोड आवाजात या संधीचं सोनचं केले आहे.

पाचवे गाणे ‘प्यार दिवाने’ (1972) चित्रपटातील आहे. हे गाणे मात्र अगदी किशोरकुमारला शोभावं असेच मस्तीखोर आहे. खरं तर हे गाणे त्याने स्वत:च का गायले नाही कळत नाही. समुद्रकिनार्‍यावर नटखट मुमताजच्या मागे लागलेल्या किशोरकुमारच्या तोंडी ‘अपनी आदत है सबको सलाम करना, हुस्नवालो को हसके कलाम करना, क्या खबर थी की आप बुरा मानेंगे’ हे शब्द खरंच शोभून दिसले असते. रफीनेही या गाण्याला योग्य न्याय देत आपणही ‘चाहे कोई मुझे जंगली कहे’ आवाजाचे आहोत हे दाखवून दिले आहे. या गाण्याला लालासत्तार या अनोळखी संगीतकाराचे संगीत आहे.

‘आराधना’ या चित्रपटासाठी रफीच्या आवाजात दोन गाणी सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केली. (बागो मे बहार है, गुन गना रहे भवरे) पण नंतर ते आजारी पडले. मग त्यांचा मुलगा राहुलदेव बर्मन याने रफीऐवजी किशोरकुमारला घेवून बाकी गाणी संगीतबद्ध केली. त्या गाण्यांनी किशोरकुमार बघता बघता पहिल्या क्रमांकाचा पार्श्वगायक बनला. रफीनेच किशोरकुमारसाठी गायलेल्या ‘अजब है दास्ता तेरी ऐ जिंदगी’ प्रमाणेच इथेही घडले. ज्या आर.डी.बर्मनने रफीऐवजी किशोरकुमारचा आवाज वापरला त्याच आर.डी.बर्मनने एक सुंदर गाणे ‘क्या हुआ तेरा वादा’ (हम किसीसे कम नही 1977) रफीला दिले. रफीला याच गाण्यासाठी त्याच्या आयुष्यातले एकमेव राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. 

त्या काळातील चार महत्त्वाचे आवाज रफी, किशोर, लता आणि मुकेश अमर अकबर अँथनी साठी लक्ष्मीकांत प्यारेलालने वापरले. ते गाणे होते ‘हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे’. नंतर परत कधीच इतके आवाज एकत्र ऐकायला मिळाले नाही. 

हिंदी चित्रपट संगीतात 1949 (शंकर जयकिशनच्या ‘बरसात’ चित्रपटापासून) ते 1966 (राहूल देव बर्मन यांच्या ‘तिसरी मंझिल’पर्यंत) चे युग म्हणजे सुवर्ण युग आहे. या काळातील पाच आवाज सर्वात जास्त प्रभावी ठरले. लता, रफी, किशोर, गीता आणि आशा. कारण हे आवाज अष्टपैलू होते. सर्व भावभावना या आवाजात समर्थपणे व्यक्त करण्यात संगीतकार यशस्वी ठरले. इतर आवाज मन्ना डे, शमशाद, मुकेश, तलत, हेमंतकुमार यांचा एक विशिष्ट बाज होता. त्या पलीकडे ते फारसे जावू शकत नव्हते. यांचा प्रभाव निश्चतच होता पण त्यांच्याकडे अष्टपैलूत्व नव्हते. 

या काळात एक निकोप स्पर्धा होती. त्यामुळे शैलेंद्र या गीतकाराने स्वत: चित्रपट काढला (तिसरी कसम) तेंव्हा त्यातील  सर्व गाणी स्वत: न लिहीता त्याने हसरत जयपूरीलाही दिली. हेमंतकुमार या गायक संगीतकाराने इतर गायकांना आपल्याकडे सन्मानाने गायला लावले. गीता दत्त आणि लता मंगेशकर यांच्याबद्दल खर्‍याखोट्या अफवा लोक उठवतात. पण गीता दत्त गेल्यावर तिला श्रद्धांजली म्हणून लतानेच तिच्या गाण्याचा कार्यक्रम आपल्या आवाजात सादर केला हे कोणी सांगत नाही. 

1949 ते 1966 या काळातील संगीताने आपले कान समृद्ध केले आहेत. त्यातील दोन महत्त्वाचे पुरूषी आवाज रफी -किशोर यांच्या पुण्यतिथी व जयंती निमित्ताने आपण त्यांच्याच स्वरांतून त्यांना आठवूया.


किशोरची अजून काही  गाणी या विषयावर अभ्यास करताना सापडत गेली.. खाली अशा गाण्यांची यादी दिली आहे..(दि. २० जून २०१८)
किशोर कुमार साठी इतर गातात तेंव्हा

1. बाप रे बाप (1955)- ओ.पी.नय्यर- जाने भी दे छोड ये बहाना-आशा
2. भागम भाग (1956)- ओ.पी.नय्यर- चले हो कहां करके जी बेकरार- रफी/आशा
3. भागम भाग (1956)- ओ.पी.नय्यर- आंखो को मिला यार से- रफी/बातीश
4. भागम भाग (1956)- ओ.पी.नय्यर- हमे कोई गम है- आशा रफी
5. पैसा ही पैसा (1956)- अनिल विश्वास-  ले लो सोने का लड्उू - किशोर/रफी
(एक कडवे रफीचे किशोरवर चित्रित आहे)
6. बेगुनाह (1957)-शंकर जयकिशन-  दिन अलबेले प्यार का मौसम- मन्ना/लता
7. रागिणी (1958)- ओ.पी.नय्यर- मन मोरा बावरा- रफी
8. रागिणी (1958)- ओ.पी.नय्यर- छेड दिये दिल के तार - अमानत अली (उपशास्त्रीय)
9. शरारत (1959)- शंकर जयकिशन- अजब है दास्ता तेरी ए जिंदगी- रफी
10. शरारत (1959)- शंकर जयकिशन- लुस्का लुस्का लुई लुई शा तू मेरा कॉपी राईट- रफी/लता
11. करोडपती (1961)- शंकर जयकिशन-  पहले मुर्गी हुयी थी के अंडा- मन्ना
12. करोडपती (1961)- शंकर जयकिशन- आप हुये बलम मै तेरी हो गयी- मन्ना/लता
13. नॉटी बॉय (1962)- सचिन देव बर्मन - हो गयी श्याम दिल बदनाम-रफी/आशा 
14. बागी शहजादा (1964)- बिपीन दत्त- मै इस मासुम चेहरे को- रफी/सुमन
15. अकलमंद (1966)- ओ.पी.नय्यर- जब दो दिल हो बेचैन- आशा/शमशाद
16. अकलमंद (1966)- ओ.पी.नय्यर- ओ बेखबर तुझे क्या खबर- दुर्रानी/महेंद्र/ भुपेंद्र
17. अकलमंद (1966) - ओ.पी.नय्यर बालमा साजना दुनिया भूला दी-आशा/उषा 
18. प्यार दिवाने (1972)- लाला सत्तार- अपनी आदत है सबको सलाम- रफी
19. दुनिया नाचेगी (1967) - की जो मै होता हवा का झोका-मन्ना/आशा
20. हाय मेरा दिल (1968)- उषा खन्ना- जानेमन जानेमन तूम-मन्ना/उषा खन्ना
21. हाय मेरा दिल (1968)- उषा खन्ना- काहे जिया की बात- मन्ना 

     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, July 29, 2014

महायुद्धाची शंभरी आणि बंद पडणारे मॉल

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 29 जुलै 2014 


कोणाला असे वाटू शकेल की महायुद्ध आणि मॉल यांचा काय संबंध. तसा तो वरवर पाहता काहीच नाही. पण खोलवर विचार केला तर यांच्यातील समान धागा लक्षात येतो. पहिले जागतिक महायुद्ध 28 जूलै 1914 ला सुरू झाले. या घटनेला आता बरोबर शंभर वर्ष पूर्ण झाली. आपल्याकडे एखाद्या गोष्टीचे आयुष्य संपले की त्याची शंभरी भरली असे म्हणण्याची पद्धत आहे. शिशूपालाचे शंभर अपराध झाले आणि श्रीकृष्णाने त्याचा वध केला.  त्याप्रमाणेच महायुद्धाची शंभरी भरली याचा अर्थ आता महायुद्ध होणे नाही. 

आपल्याकडे ‘एकदा पाकिस्तानला चांगला धडा शिकवलाच पाहिजे.’ असे मानणारे फार लोक आहेत. चांगला धडा शिकवला पाहिजे म्हणजे त्यांच्यावर युद्ध करून त्यांचे प्रचंड लोक मारले पाहिजेत. अशी समज जगभरात बर्‍याच लोकांची आपसात होती. पहिले महायुद्ध झाल्यावर अतिशय अपमानास्पद अटी जर्मनीवर लादल्या गेल्या. याचा परिणाम इतकाच झाला की हिटलरचा उदय झाला. प्रचंड संहारक असे दुसरे महायुद्ध घडले. जपानवर केलेल्या अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतर सगळ्या जगालाच हादरा बसला. दुसर्‍या महायुद्धानंतर हाती जे सत्य आले ते फारच विचित्र होते. ते पचवणे सगळ्यांनाच अवघड होवून बसले.महायुद्धानंतर लक्षात आले हे की जो हारला त्याचे तर नुकसान झालेच पण जे विजयी झाले त्यांचेही आर्थिक कंबरडे मोडले. सगळ्या राष्ट्रांना एकच गोष्ट कळून चुकली आणि ती म्हणजे ‘महायुद्ध परवडत नाही’. हे कटू सत्य जगाने पचविले. आणि तातडीने पहिले काम काय केले तर तीन जागतिक संस्था स्थापन करण्याचा निर्णय अमेरिकेतील ब्रेटन वुड्स या शहरात घेतला गेला. 1. जागतिक नाणेनिधी (IMF) 2. जागतिक बँक (WB) 3. आंतरराष्ट्रीय व्यापार परिषद (ITO)

व्यापार परिषदेची निर्मिती करण्यासाठी काहीसा वेळ लागला. पुढे 1947 साली गॅट (GATT)- जागतिक व्यापार कराराची सुरवात झाली. यावर 23 देशांनी सह्या केल्या. भारत यावर सह्या करणार्‍या या पहिल्या 23 देशात सामील आहे. या गॅट करारावर चर्चा, वितंड वाद, मतभेद असे होत होत याला अंतिम स्वरूप येण्यास जवळपास पन्नास वर्षे लागली. आणि जागतिक व्यापार संघटना (WTO) जानेवारी 1995 ला स्थापन झाली. आश्चर्य म्हणजे दुसर्‍या महायुद्धानंतर आजतागायत महायुद्ध झाले नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या काळात जगभरात विविध देशांचा एकमेकांशी सुरू झालेला आणि वाढत गेलेला व्यापार. 

दुसर्‍या महायुद्धानंतर झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी व्यापार वाढला पाहिजे यावर सगळ्यांचेच एकमत झाले. व्यापार कसा झाला पाहिजे त्याच्या अटी काय असाव्यात हे वाद होत राहिले. अजूनही ते मिटले नाहीत. अजूनही व्यापारविषयक मोठमोठे तंटे होत आहेत. अन्नसुरक्षेच्या मुद्द्यावरून भारताने जागतिक व्यापाराच्या अटींमध्ये कोलदांडा नुकताच घातला आहे. पण कुठल्याही परिस्थितीत व्यापार वाढलाच पाहिजे म्हणजेच कुठल्याही परिस्थितीत महायुद्ध झाले नाही पाहिजे यावर जगाचे एकमत आहे. याचाच परिणाम म्हणजे 1945 नंतर जगभर छोटी-मोठी युद्धे होत राहिली, परिस्थिती तणावाची राहिली, रशिया व अमेरिकेतील शीतयुद्ध जगावर परिणाम करून गेले. पण महायुद्ध मात्र झाले नाही.

व्यापाराने महायुद्धाची शक्यता पुसून टाकली. याच व्यापाराने अजून एक शक्यता पुसून टाकली. भांडवलशाही इतर सामान्य लोकांचे शोषण करील अशी संकल्पना डावे विचारवंत जगभर मांडत होते. मार्क्सच्या काळापासून या विचारसरणीने जगातील विचारवंतांच्या मेंदूंवर मोठी मोहिनी घातली होती. भांडवलदार ग्राहकाचे शोषण करतो पण जर ग्राहक गरीबच राहिला तर त्याचे शोषण करायचे कसे? हे काही मार्क्सने सांगितले नाही. व्यापाराच्या नविन युगात ग्राहक हाच राजा आहे हे काही डाव्या विचारसरणीच्या धुरीणांनी लक्षात घेतले नाही. हे त्यांनी लक्षात घेतले नाही कारण त्यांना तसे समजणे सोयीचे नव्हते. पण आश्चर्य म्हणजे भांडवलशाहीतील स्पर्धा नाकारणार्‍यांनीही हे लक्षात घेतले नाही. 

भांडवलशाही किंवा नविन व्यापार धोरण हे पैसेवाल्यांना सोयीस्कर असेल, हवा तितका पैसा ओतला की झाले असे समजणार्‍यांचेही वांधे या ग्राहकराजाने करून ठेवले. अमेरिकेतील गृहकर्ज घोटाळ्याने मोठा फटका अमेरिकेलाही बसला. मोठ मोठ्या संस्था रसातळाला गेल्या. 

औरंगाबाद शहरात नुकताच एक मोठा मॉल बंद पडला. बंद पडलेला हा पाचवा मोठा मॉल. उरलेला शेवटचा मॉल कधीही बंद पडावा अशाच स्थितीत आहे. मोठ मोठे मॉल आल्यावर छोट्या दुकानदारांचे कसे म्हणून गळे काढले गेले होते. छोटे दुकानदान बुडणारच असे गृहीत धरले होते. प्रत्यक्षात मोठे मॉलच बंद पडायला लागले. गरीबांच्या नावाने गळा काढणार्‍यांना समजेना आता गळा कुणाच्या नावाने काढायचा. हे असे का घडले? कारण आधुनिक काळात बाजार हा ग्राहकाच्या मर्जीवर चालतो. तो कुणा एकट्या दुकट्या भांडवलशहाच्या पैशाच्या मस्तीवर चालत नाही. दिल्लीत बसून निर्णय घेणार्‍या चार दोन डोक्यांप्रमाणे चालत नाही. 

भारतीय आठवडी बाजार तर मोठी अजब गोष्ट आहे. भारतात दहा बारा गावांमध्ये मिळून एक मोठा आठवडी बाजार भरतो. भारतातील पाच लाख खेड्यांचा विचार केला तर किमान पन्नास हजार आठवडी बाजार आहेत. या बाजारात आपल्या शेतातील काही एक जिन्नस शेतकरी विकायला घेवून येतो. त्याच्या मोबदल्यात आपल्या गरजेच्या वस्तू तो खरेदी करतो. म्हणजे जरी व्यवहार पैशात होत असला तरी प्रत्यक्षात मात्र वस्तू बदल्यात वस्तू नेली असेच चित्र असते. मग हा जो बाजार आहे त्याचे मुल्यमापन तूम्ही करणार कसे? ते ठराविक डाव्या किंवा त्याला विरोध करणार्‍या नकली भांडवलशाही (क्रोनी कॅपिटॅलिझम) पद्धतीने कसे होऊ शकेल?

आधुनिक काळात बाजार हा हळू हळू मुक्त होतो आहे. आणि तो आता बंदिस्त होण्याची शक्यता नाही. काही दिवसांत चीनमध्ये आर्थिक उलथापालथ झाली तर नवल नाही. पहिल्या महायुद्धानंतर खुमखुमी आली आणि दुसरे महायुद्ध जगाने अनुभवले. त्याचप्रमाणे पैशाच्या जोरावर बाजाराला नामोहरण करण्याचे प्रयत्न नविन काळात झाले. अमेरिकेतील गृहकर्ज घोटाळा आणि चीनने जगाच्या बाजारात तयार मालाची दडपादडपी करून केलेली दादागिरी हाही अनुभव जगाने घेतला.

औरंगाबाद शहरात जो मॉल बंद पडला त्याच्याच परिसरात दर सोमवारी भरणारा आठवडी बाजार मात्र अजूनही जोमात आहे. दर आठवड्याला तो वाढतच आहे. भारताचा विचार केला तर आठवडी बाजार ही आम्ही उभी केलेली एक मोठी सोयीची लवचिक अशी व्यवस्था आहे. भारतातील पन्नास हजार आठवडी बाजारांची गावे पक्क्या रस्त्यांनी एकमेकांना जोडली, बाजाराच्या जागेवर किमान ओटे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली आणि बाजार संपल्यावर गावी परतण्यासाठी वाहनांची चांगली व्यवस्था झाली तरी खुप काही होण्याची शक्यता आहे. 

इडली दोश्याचे तयार पीठ, चटणी विकणार्‍या एका दाक्षिणात्य फाटक्या माणसाला औरंगाबाद शहरातील एका मॉलने आपल्या जागेत येवून बसण्याची परवानगी नाकारली. त्याने किमान ओट्यावर बसू द्या म्हणून विनंती केली. कालांतराने तो मॉल तर बंद पडला. पण आजही तो इडलीवाला मात्र ओट्यावर आहे. आता तर तो कोपराच त्या इडलीवाल्याच्या नावाने ओळखला जातो. तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवले होते 'महापुरे झाडे जाती । तेथे लव्हाळे वाचती ॥' छोट्या बाजाराची लव्हाळे किंबहूना ग्राहक राजाच्या गरजा आणि खिसा ओळखणार्‍या बाजाराची लव्हाळी नविन काळात अजून तकाकी धरतील अशीच शक्यता दिसत आहे. युद्धखोरांची मस्ती जशी जिरवली तशीच पैशांच्या जोरावर बाजार काबीज करू पाहणार्‍यांचीही मस्तीही ग्राहक जिरवायला लागले आहेत.     
      
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, July 22, 2014

मौनराग : अभिनयाने फुलविली शब्दांतील आग




           दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 22 जुलै 2014 


मंचावर फारसे काहीच नेपथ्य नाही. एक जूना खांब, त्याला कंदिल लटकवलेला, दोन पातळ्या (नाटकाच्या भाषेत लेव्हल्स) एक छोटी पायरी. बस केवळ इतक्या सामग्रीवर महेश एलकुंचवार यांच्या लेखावर आधारीत सुंदर नाट्यानुभव सचिन खेडेकर सारखा कसलेला अभिनेता रसिकांसमोर सादर करतो. एलकुंचवार यांच्या शब्दांमधील आग आपल्या संयत अभिनयाने फुलवतो आणि एक अतिशय समृद्ध असा वेगळा अनुभव प्रेक्षकांना येतो.

प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांनी नाटकाव्यतिरिक्त फारसे लेखन केले नाही. त्यांच्या मोजक्या ललित लेखनाचे ‘‘मौनराग’’ हे पुस्तक मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केले. त्यातील दोन लेखांवर आधारीत ‘‘मौनराग’’ याच नावाने एक नाट्याविष्कार दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी व अभिनेते सचिन खेडेकर हे सादर करतात.

मृत्यूवरचे एलकुंचवारांचे चिंतन चंद्रकांत कुलकर्णी अभिवाचनाच्या माध्यमातून समोर ठेवतात. साध्या शब्दांमध्ये किमान चढ उतरांतून या लेखनाचा आशय प्रेक्षकांसमोर पोचविला जातो. पाच मिनीटांचे मध्यंतर आणि नंतर  सुरू होतो सचिन खेडेकर यांचा अभिनय, एलकुंचवारांचे शब्द आणि चंद्रकांत कुलकर्णी यांचे दिग्दर्शन ही जुगलबंदी. (तिघांची ती तिगलबंदी म्हणावे का?)

पारवा या गावातील लहानपणी वास्तव्य केलेल्या घराची ओढ लागलेल्या माणसाची ही छोटी गोष्ट आहे. अडतीस वर्षांनी तो या गावात परत येतो आहे. ते केवळ त्या घराचा निरोप घ्यायला. कुठलंही काम नाही. कुणालाही भेटायचं नाही. त्या घरात आता एका सहकारी संस्थेचे कार्यालय आहे. लेखक परवानगी मागून या घरातून जून्या आठवणी जागवत फिरतो आहे. बघता बघता काळाचा पट बाजूला होतो आणि आपल्या लहानपणी लेखक जावून पोचतो. त्याला परसातल्या गुलाबाच्या फुलांच्या कुंड्या दिसायला लागतात. त्यांचा सुवास दरवळायला लागतो. माजघरातील स्वयंपाकघरात तो पोचतो. चुलीच्या बाजूला असलेले दुध दुभत्याचे कपाट त्याला दिसते. त्या कपाटाला येणारा दुधाचा तुपाचा वास, दरवाजाचा तुपकट ओशट स्पर्श, चुलीवरच्या अन्नाचा शिजताना येणारा रट रट आवाज, त्याचा वास, जवळच्या देवघरातील उदबत्तीचा कापराचा वास हे सगळंच त्याला जाणवायला लागतं.

जिना चढून तो माडीवर येतो. अतिशय कमी नेपथ्यातून आणि आपल्या अभिनयांतून सचिन खेडेकर यांनी हे सगळं साकार केलं आहे. माडीवरून त्याला पलिकडची आंबराई दिसते. सुट्टी संपवून गावाचा निरोप घेताना याच खिडकीतून त्याला जाणवणारा काळोख आजही त्याला अस्वस्थ करून जातो. माडीच्या छतावर तेंव्हा बागेतला मोर येवून बसायचा. गाण्यातील मिंड असावी तशी त्या मोराची छतावरून अंगणात घेतलेली झेप लेखकाला आठवते.

ओसरीतल्या झोपाळ्यावर बसून गाणी म्हणणारी बहिण. तिचा गोड आवाज रस्त्यावरच्या तिर्‍हाईतालाही खेचून घ्यायचा. याच ओसरीत वडिलांची कागदं ठेवायची शिवसी पेटी. ती उघडताच येणारा कस्तूरीचा वास. याच पेटीत लेखकाला गीतापठणात बक्षिस मिळालेले 21 कलदार रूपये मखमली पिशवीत ठेवलेले असतात. ते रूपये हातावर घेवून त्यांचा खणखणाट वडिलांनी लेखकांला ऐकवलेला असतो.

लेखकाचे वडिल रत्नपारखी असतात. डोळ्याला भिंग लावून दोन बोटांत हिरा धरून पारखणे आजही लेखकाला जशाला तसे आठवते. सचिन खेडेकर यांनी हा प्रसंग जेंव्हा रंगवला तेंव्हा त्यांच्या डोळ्यांच्या अप्रतिम हालचाली आणि दोन बोटांच्या चिमटीत बघणारी नजर खरोखरचा हिराच समोर असल्याचा भास प्रेक्षकांना होतो. ही या नटाची ताकदच म्हणावी लागेल. खुर्चीवर बसून शांतपणे बोलत असताना केवळ दोन हातांच्या हालचालीतून झोपाळ्याचा भास देणे, जिना चढून आल्यावर वर पहात केवळ डोळ्यांच्या हालचालीतून माडीचे अस्तित्व जाणवू देणे, मोराची आठवण सांगताना केलेल्या डौलदार हालचाली, पारवेकर देशमुखांच्या वाड्याचा आकार केवळ बोटांच्या हालचालीतून व्यक्त करणे असे कितीतरी प्रसंग आहेत ज्यातून सचिन खेडेकर यांची अभिनय क्षमता सिद्ध होते.

महेश एलकुंचवार यांचे लेखन ताकदवान आहेच. निरोप घेताना आईचे डोळेच पाठीला चिकटले, झाडाची साल गळून पडावी तसा इतरांचा गावाशी संबंध संपला असे लिहीणारे एलकुंचवार मोठे आहेतच. शेवटच्या प्रसंगात तर त्यांच्यातील प्रतिभेचा कसच लागला आहे. गौतम बुद्धाला बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली आणि सगळ्यांतून सुटल्याचा आनंद त्याला झाला. या प्रसंगाशी साधर्म्य सांगत घराचा निरोप घेताना मात्र मला आनंद झाला नाही. आई वडिल गेले आता घराचाही निरोप घेतला. पण मला बुद्धासारखी सगळ्यांतून सुटल्याची भावना मात्र झाली नाही हे लिहून एलकुंचवारांनी वेगळीच उंची गाठली आहे. सचिन खेडेकर यांनीही हा प्रसंग अप्रतिम रंगविला आहे. कमी शब्दांत आणि डोळ्यांतून अश्रू येत असतानाही आवाजावर पूर्ण नियंत्रण ठेवून हा भावनिक प्रसंग त्यांनी तोलून धरला आहे.

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी वयाची पन्नाशी नुकतीच पूर्ण केली आहे. मराठवाड्यातील या गुणी कलावंताने नाटक चित्रपट या क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. व्यावसायिक कामे करणार्‍या माणसांनी  या क्षेत्रात कलेसाठीही काहीतरी केले पाहिजे. असं नुसते म्हणत न बसता प्रत्यक्ष काम करणं फार गरजेचे आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपल्या कृतीतून आपण नाट्यकलेबाबत किती गंभीर आहोत हेच दाखवून दिले आहे.

मोठ्या लिखाणात एक दृश्य ताकद असते. ती ओळखून त्याचे नाट्यरूपांतर करणे, अभिवाचनाने असे लिखाण समोर आणणे, संगीताचा किमान वापर करून शब्दांना आकर्षक स्वरूपांत मांडणे ही सगळी कामे करायला पाहिजेत. पण ती कोण करणार? लोक पहायला येतील का? या सगळ्यासाठी पैसे उभे राहतील का? अशी केवळ चर्चा आपण करत राहतो. गावोगाव शेकडो साहित्य संमेलने, साहित्यीक उत्सव, साहित्यीक पुरस्कार, मेळावे, व्याख्यानमाला आजकाल होत आहेत. यावर लाखोंनी खर्च होतो आहे. पण इतकं करूनही प्रत्यक्ष साहित्यकृतींची ना ओळख होते, ना साहित्याचा प्रचार होतो ना चांगला लेखक रसिकांसमोर आणला जातो. यासाठी ‘मौनराग’ सारखे प्रयोग होण्याची गरज आहे.

ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेच्या बाबत ‘‘तेणे कारणे मी बोलेन । बोली अरूपाचे रूप दावीन । अतिंद्रिय परि भोगविन । इंद्रीयांकरवी॥ (अध्याय 3, ओवी 36) अशी प्रतिज्ञा केली होती. आपण ती पार विसरून गेलो आहोत. चांगल्या साहित्यकृतींवर आधारीत सादरीकरणं झाली पाहिजेत. त्यातून प्रेक्षकांना त्या कलाकृतीकडे वळावे वाटू शकते.

दि.बा.मोकाशी यांच्या ‘आनंद ओवरी’ या कादंबरीवर आधारीत अप्रतिम एकपात्री प्रयोग किशोर कदम या कसदार अभिनेत्याने यापूर्वी केलेला आहे. हिंदीत असे प्रयोग झाले आहेत. ‘तूम्हारी अमृता’ हा पत्र वाचनाचा प्रयोग फारूख शेख, शबाना आजमी हे करायचे.

भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू कादंबरीत अशा सादरीकरणाच्या भरपूर शक्यता आहेत. गो.नि.दांडेकर यांच्या कादंबर्‍यांचे अभिवाचन अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या कन्या वीणा देव व जावाई विजय देव हे करतात. या सगळ्यांतून नाट्य/साहित्यविषयक जाण प्रगल्भ होत जाते.

‘‘मौनराग’’ च्या निमित्ताने एक सुंदर अनुभूती मराठी रसिकांना सध्या भेटत आहे. चंद्रकांत कुलकर्णी व सचिन खेडेकर यांना यासाठी धन्यवाद !        


     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, July 15, 2014

अतिक्रमण पाडले । नशीब उजाडले ॥

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 15 जुलै 2014 


कुठलेही अतिक्रमण पाडले की समोर येणारे दृश्य ठराविक प्रकारचे असते. वीटा, दगड, मातीचा ढिग, पत्रे अस्ताव्यस्त पडलेले, लोखंडी चौकटी मोडून पडलेल्या, काही किरकोळ सामान इतस्तत: पसरलेलं. ज्याची ही टपरी असते तो माणूस केविलवाण्या चेहर्‍याने बायका पोरांसह त्या कचर्‍यात काही कामाची वस्तू राहून गेली का ते शोध घेत असतो. त्याची सगळ्यांनाच कीव येत असते. मोठ्या संख्येने बघे भोवती जमलेले. हातावर पोट असणार्‍यांबद्दल सगळ्यांनाच सहानुभूती असते. अशाच एका अतिक्रमणाची ही गोष्ट.

शहराच्या गजबजलेल्या भागात रस्त्याला लागून रिकामी असलेली एक जागा. रिकामी जागा म्हणजे अतिक्रमणाला सुवर्णसंधी. गल्लीतल्या दादाने तिथे लगेच रस्त्याला लागून एक छोटे हॉटेलच रात्रीतून बांधून काढले. त्याला लागून पाच टपर्‍या उभारून घेतल्या. ज्याची जागा होती तो मालक दूरवरच्या दुसर्‍या शहरात राहणारा. त्याने लगेच येवून आक्षेप घेतला. पण अतिक्रमण त्याच्या जागेत नसून त्याची जागा व मुख्य रस्ता यांच्यामध्ये होते. परिणामी त्याची कोणी दखल घेतली नाही. दादाने आजूबाजूच्या टपर्‍या कष्टकर्‍यांना भाड्याने देवून टाकल्या. एका टपरीत कटिंगवाला दळवी होता. जवळपास दुसरा न्हावी नव्हता. त्यामुळे दळवीची गरज सगळ्यांनाच होती. दुसर्‍या टपरीत शांताबाई पोळी भाजी केंद्र चालवायची. विधवा शांताबाई शाळकरी दोन पोरांच्या आधाराने गावाकडून पोटभरण्यासाठी शहरात आली. तिसर्‍या टपरीत दिपकने मोबाईल दुरूस्ती व रिचार्जचे दुकान टाकले. दिपकची परिस्थिती सामान्य. शिक्षण घेत घेत कमाई करणे त्याला भागच होते. मोबाईलची दुरूस्ती येणारा समीर नावाचा दोस्त हाताशी पकडून दिपकने जम बसवला. सरळ स्वभावाच्या व चारित्र्याच्या दिपककडे मुलांसोबतच मुलींचीपण गर्दी जमायला लागली. चहावाला गोरटेला सुरेश चहाची टपरी थाटून बसला होता. अर्धवट शिक्षण झालेल्या सुरेशवर कष्टाचे संस्कार झालेले होते. त्यानं आजूबाजूच्या दुकानदारांना चहा नेवून देण्याची सोय केली. बसल्याजागी चहा मिळण्याची सोय लोकांना फार भावली. शेवटची  टपरी पंक्चरवाल्या हमीदची होती. हमीदचा चुलतभाउ गफूर गावाकडून आला आणि त्यानं आपल्या हाताच्या कौशल्याने पंक्चरच्या टपरीचे रूपांतर छोट्या गॅरेजमध्ये केले. 

ज्या हॉटेलच्या आधाराने ही टपर्‍यांची रांग उभी राहिली त्या गल्लीतल्या दादाला स्वत:ला फार काही जमत नव्हते. एक चांगला स्वयंपाकी त्याने मिळवला आणि आपले हॉटेल त्यालाच चालवायला दिले आणि स्वत: दादागिरी करायला मोकळा झाला. स्वयंपाक्याच्या हातच्या मटनाला चांगली चव होती. त्यानं हाताशी भाकरी करणार्‍या सखुबाईला ठेवलं. त्यांचंही बरं चाललं होतं. अतिक्रमणवाले जेंव्हा जेंव्हा यायचे तेंव्हा तेंव्हा गल्लीतला दादा आपलं राजकीय वजन वापरून त्यांना परत पाठवायचा. 

महापालिकेत दादाची वट होती तोपर्यंत कोणाच्या केसाला धक्का पोचला नाही. मग रस्ता रूंदीकरणाची मोठीच मोहिम निघाली. त्यात अतिक्रमण पाडण्याचा धडाका सुरू झाला. न्यायालयानेही पालिकेला खडसावून जाब विचारला. मग अतिक्रमण पाडण्याची मोहिम कठोरपणे हाती घेणे पालिकेला भाग पडले. दादाच्या विरोधातील गट एव्हाना पालिकेत सत्तारूढ झाला होता. बघता बघता एके दिवशी सगळ्या टपर्‍या उद्ध्वस्त झाल्या. आपले काहीच चालत नाही हे पाहून गल्लीतला दादा गायबच झाला. त्याच्या राजकीय क्षेत्रातील एका दुरच्या नातेवाईकाने त्याला दूसर्‍या राज्यातच नेले आणि तिकडे दादागिरीचे नविन काम दिले. चहावाला सुरेश, कटिंगवाला दळवी, मोबाईलवाला दिपक, पोळीवाली शांताबाई, गॅरेजवाला हमीद व गफूर हे सगळे पोटपाण्याच्या धास्तीने हैराण झाले. काय करावे कोणाला सुचेना. 

समोर परतानी सेठचे सायकलच्या एजन्सीचे मोठे दुकान होते. त्यांच्या पोराची गॅरेजवाल्या गफूरशी दोस्ती. त्याने गफूरला त्याचे हवा भरायचे मशिन आपल्या दुकानात लावायला परवानगी दिली. आपल्या ओट्यावर त्याला जागा दिली. हमीद व गफूरची सोय लागली. पोळीवाल्या शांताबाई मागच्या गल्लीतल्या चौधरी आजी आजोबांकडे स्वयंपाकाला  जायच्या. मुलं बाळं परदेशात असल्यामुळे चौधरी आजीआजोबा एकटेच रहायचे. चौधरी आजींनी आपल्या घरातील अडगळीची खोली रिकामी करून शांताबाईंना दिली. शिवाय त्यांना रहायलाही जागा दिली. शांताबाईंची आता दूरवरच्या रहायच्या जागी जायची रोजची कटकट वाचली. शिवाय पोरांना शाळाही सोयीची झाली. 

मोबाईलवाल्या दिपकला समोरच्या शटरवाल्याने ऑफर दिली. त्याचे दुकान बंदच पडले होते. त्याचे भांडवल गुंतवायची तयारी होती. दिपकने समीरसोबत नविन जागेत दूकान अजून मोठे केले. कटिंगवाल्या दळवीने आतल्या गल्लीत एक शटर मिळवले. आधीची जागा फारच छोटी असल्यामुळे काही करणे शक्य नसायचे. पण आता नविन जागा मोठी आणि चांगली मिळाली. चांगलं उपयुक्त फर्निचर त्यानं करून घेतलं. जागेचे कादगपत्रं असल्याने बँकेने कर्जही दिलं. सुरेशला आजूबाजूच्या दुकानदारांनी पैसे दिले. एक छोटी लोखंडी टपरी करून ती नाल्यावर आत उभी करायला सर्वांनी त्याला मदत केली. अतिक्रमण पाडले आणि ह्या सर्वांचे नशिबाच उजाडले आसे म्हणायची पाळी आली. सर्वांच्या विकासाचे वैध मार्ग खुले झाले.

अतिक्रमण उठविल्यानंतर दोनच महिन्यात पाचही कष्टकर्‍यांना गल्लीने आपल्यात सामावून घेतले. अतिक्रमणाच्या जागेमुळे दुकानदारांना कित्येक समस्यांना तोंड द्यावे लागायचे. धंदा वाढवायला भांडवल मिळायचे नाही कारण बँका कर्ज द्यायच्या नाहीत. अतिक्रमण कधी पाडले जाईल याची एक टांगती तलवार कायम डोक्यावर असायची. आपण काहीतरी गैर करतो आहोत ही अपराधी भावना मनाला भोकं पाडायची. 

शहरं मोठी झाली तसे त्यांना लागणारे मनुष्यबळ कोठून आणायचे हा प्रश्न निर्माण झाला. गावाकडची माणसे झुंडीझुंडीने शहरात यायला लागली. त्यांना रहायला व्यवसाय करायला जागा नाही. मग काय करायचे? मग ही गरज ओळखून मोकळ्या जागांवर अतिक्रमणं व्हायला लागली. पोटासाठी केलेली अतिक्रमणं आणि हव्यासापोटी सरकारी अधिकार्‍यांना हाताशी धरून गुंडांनी राजकीय आशिर्वादाने केलेली अतिक्रमणे यात जमिनअस्मानाचा फरक आहे. कॅम्पाकोला आणि नाल्याकाठच्या टपर्‍या यात कायदेशीरदृष्ट्या फरक काहीच नाही. पण नैतिकदृष्ट्या मात्र प्रचंड फरक आहे. ज्याच्याकडे नैतिक बळ असते तो माणूस धैर्याने कुठल्याही परिस्थितीला तोंड देत उभा राहतो. ज्या टपर्‍या हटवल्या गेल्या ते पाचही कष्टकरी कुठेही पळून गेले नाहीत. ते तिथेच उभे ठाकले. पैसे कमावून शिक्षण करणारा दिपक, पोरांना पोसणारी विधवा शांताबाई, कष्टकरी सुरेश, हाती कसब असलेला दळवी, गॅरेजवाला हमीद-गफूर यांचा हेतू जवळपासच्या लोकांना चांगला कळत होता. त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडे मदत मागितली. आणि त्यांना तशी मदत समाजानेही केली. 

आपण सगळे मिळून एक मोठे ढोंग करतो. कॅम्पाकोलासारखी मोठ मोठी अतिक्रमणे जी आपणच करतो/ आपला मुक पाठिंबा असतो/ त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात आपलाच हात असतो. त्यांच्या विरोधात आपण फारसे बोलत नाही. न्यायालयात जावून वर्षानुवर्षे ही अतिक्रमणे वाचविण्याची धडपड सगळेच करत राहतात. आणि शेवटी एखादे  अतिक्रमण पाडावेच लागले की मानवतेबाबत मोठी बोंब होते. पण तेच रस्त्यांच्याकडेचे छोटेसे टपर्‍यांचे अतिक्रमण मात्र तासा दोन तासात जमिनदोस्त केले जाते. शिवाय पाहणारेही ‘‘कायद्याचा धाक असलाच पाहिजे’’ असा टेंभा मिरवतात. पण या टपर्‍या कष्टकर्‍यांच्या असतात ज्यांची आपल्यालाच गरज असते. 

ज्याची निती स्पष्ट । तो उपसे कष्ट । 
बाकी सारे भ्रष्ट । बहु ढोंगी ॥
लाटतो फायदा । तो ओकी गरळ । 
चालतो सरळ । कष्टकरी ॥

     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575