Tuesday, May 6, 2014

रस गळतो | अंबा छळतो । दिल्लीचा राजा | झिम्मा खेळतो ||


                                      दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 6 मे 2014 

भारतीय हापुस अंब्याला युरोपात बंदी घातल्यची बातमी आली आणि मोठा गदारोळ माजला. फार मोठी आपत्ती कोसळली आहे, भारतीय मालाला बंदी घालून भारतावर काहीतरी अन्याय केला गेला आहे, भारतीय शेतकर्‍यांचे फार मोठे नुकसान होत आहे, यांना आपणही बंदी घालून चांगला धडा शिकवला पाहिजे असे अकलेचे तारे तोडल्या गेले. नेमके किती अंबे युरोपात जातात? एकूण अंब्याच्या बाजारपेठेत त्यांचा वाटा किती याची जरा जरी तपासणी केली असती तर वस्तूस्थिती समजली असती. पण तशी समजून घेण्यात आपल्याला मुळीच रस नसतो. परिणामी काहीतरी शुल्लक गोष्टीवर गदारोळ माजविला जातो. एकूणच दिल्लीचे धोरण शेतमालाच्या भावाशी झिम्मा खेळण्याचेच असल्याने हे खरेही वाटते.
मागच्या वर्षी युरोपात एकूण 3250 व अमेरिकेत 175 असा जवळपास 3500 टन अंबा निर्यात केला गेला. भारतातील हापूसची सगळ्यात मोठी घावूक बाजारपेठ म्हणून वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिल्या जाते. एकट्या वाशीमध्ये दररोज सहा हजार टन अंबा येतो. एकूण सिझन मध्ये अंब्याचा व्यापार जवळपास साडे तीन लाख टन इतका होतो. म्हणजे एकूण व्यापाराच्या केवळ एक टक्का अंबा युरोपला जातो. आता जर यावर बंदी आली तर असे काय मोठे आभाळ कोसळले? शंभरातील एक रूपयाच्या व्यापाराची अडचण निर्माण झाली. पण बाकी नव्व्याण्णव रूपयाचे व्यवहार तर आधीसारखेच चालू आहेत ना त्यांचे काय? म्हणजेच जो अंब्याचा इतर व्यापार चालू आहे त्याबद्दल कोणी काहीच बोलायला तयार नाही. आणि युरोपच्या एक टक्का व्यापाराबाबत मात्र गोंधळ सुरू आहे.
अंब्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ ही हापूसची नसून इतर गावठी अंब्यांची आहे. आणि ही किमान हापूसच्या व्यापाराच्या वीस पट आहे. भारतभर कित्येक गावठी जातीचे अंबे तयार होतात आणि जवळपासच्या बाजारात विक्रीला येतात. या अंब्याला फार दुरवरची बाजारपेठ परवडत नाही. कारण वाहतूक व्यवस्था, साठवणुकीसाठी शीतगृह, पॅकिंग इत्यादी बाबत आपल्याकडे आनंदी आनंद आहे. परिणामी स्थानिक फळांना स्थानिक बाजारेपठ हाच व्यवहार्य पर्याय उपलब्ध असतो.
दुसरी बाब म्हणजे अंब्याच्या बाबतीत ताज़्या फळांपेक्षा प्रक्रिया केलेल्या अंब्याच्या गराचा (मँगो पल्प) व्यापार प्रचंड मोठा बनला आहे. ताजे अंबे निर्यात करायचे म्हणजे मोठी किचकट प्रक्रिया आहे. त्या अंब्याचा रंग, त्याची चव, त्याचा आकार याबाबत प्रचंड काळजी घ्यावी लागते. त्याचे पॅकिंग विशिष्ट पद्धतीने व्हायला हवे. विशिष्ट दिवसांमध्ये हा अंबा विकला गेला तरच त्याचे पैसे मिळतात. या उलट मँगो पल्पसाठी मात्र तूलनेने दुय्यम स्थितीतला अंबाही चालतो. शिवाय हा पल्प तयार करून हवाबंद डव्यांत वर्षभर विकता येतो. त्याला दिवसांचे बंधन नाही. शितपेय (माझा वगैरे) उत्पादनांत मँगोपल्पला फार मोठी मागणी आहे. भारतभरच्या रसवंत्या (ज्यूस सेंटर) मध्ये सगळ्यात जास्त मागणी मँगो पल्प पासून केलेल्या मँगो मिल्क शेक ला आहे. परिणामी ही बाजारपेठ विस्तारली असून ती ताज्या फळांच्या कैकपट आहे.
युरोप अमेरिका सोडा, पण दुबई सारखे जवळपास 91 देश आहेत त्यांना आपण फळं निर्यात करतो. ही पण बाजारपेठ युरोपपेक्षा कित्येक पट मोठी आहे.
द्राक्षांच्या बाबतील 2010 मध्ये मोठा झटका आपल्या द्राक्ष उत्पादकांना बसला होता. पण नुसते रडत न बसता आणि वर्तमानपत्रे/टीव्ही वाहिन्यांवर चर्चा करत न बसता द्राक्ष उत्पादकांनी त्यावर मार्ग काढला. गेली चार वर्षे द्राक्षांची निर्यात नियमित चालू आहे. याच पद्धतीने अंब्याच्या अडचणीवरही अंबा उत्पादक मार्ग काढतील. पुढच्या वर्षीपासून अंब्याची निर्यात युरोपात सुरळीत होण्याची आशा आहे. या बाबी चर्चा करणारे लक्षात घेत नाहीत.
खरा प्रश्न आहे फळं आणि भाजीपाला यांची भारतीय बाजारपेठ सुधारणार की नाही? कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मोजमाप करायला इलेक्ट्रॉनिक्स तराजू हवे आहेत, मालाची ने आण करण्यासाठी शीतपेट्या हव्या आहेत, मालाची प्रतवारी करणे (ग्रेडिंग), शीतगृहांमध्ये (कोल्ड स्टोरेज) साठवणुक करणे यासाठी आवश्यक ती संरचना (इन्फ्रास्ट्रक्चर) उभी करायला हवी. भारतभर साडेचारलाख खेडी आहेत. जळपास पन्नास हजार आठवडी बाजार आहेत. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फळे, भाजीपाला विक्रीला येतो. या आठवडी बाजारांच्या ठिकाणी किमान पिण्याचे पाणी, मालाच्या विक्रीसाठी ओटे इतकी तरी व्यवस्था आपण केली आहे का? शेतातून बाजाराच्या ठिकाणी माल नेण्यासाठी किमान व्यवस्था तरी आहे का?
फळे, भाजीपाला यांचे बीट (घावूक उलाढाल करण्याचे ठिकाण) जिथे चालते तिथे एखाद्या सकाळी सूर्य उजाडण्यापूर्वी जावून पहावे. म्हणजे चर्चा करणार्‍यांच्या डोळ्यांसमोर खरे चित्र उभे राहिल. मोसंबीचा ढिग समोर ओतलेला असतो आणि त्याचा नजर लिलाव होतो. म्हणजे या ढिगाची किंमत किती याची बोली लावली जाते. मोसंबी किती नग आहे किंवा किती वजनाची आहे हे मोजल्या जात नाही. केळाची खरेदी वजनाने होते आणि विक्री मात्र नगाने होते. भाजीच्या जुड्या मोजताना काही जूड्या वर न मोजता देवून टाकाव्या लागतात. अशा कितीतरी बाबी आहेत ज्यांची चर्चा आजही होत नाही. इतर अन्नधान्य सोडा पण फळे, भाजीपाला, फुले यांची मोठी बाजारपेठ स्वत: भारतच आहे. त्यासाठीच्या सुधारणा कधी होणार? त्यासाठी आवश्यक ती राजकीय इच्छाशक्ती आपण बाळगणार की नाही?
एक भिती घातली जाते की भारतीय शेतीमालाच्या बाजारपेठेवर परकिय आक्रमण होवू शकते म्हणून. किंवा आपला माल बाहेर जावू नये असा कट रचला जातो आहे. ज्याला विचार करता येत नाही, अभ्यास करायचा नाही अशीच माणसे असा वाह्यात आरोप करू शकतात. आज जगभरात विविध उत्पादनांसाठी जीवघेणी स्पर्धा सुरू आहे हे खरे आहे. पण शेतीमालाबाबत मात्र परिस्थिती काहीशी विपरीत आहे. कुठल्याच पुढारलेल्या देशात शेती करायला कोणी तयार नाही. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान सर्वत्र शेतीवरील लोकसंख्या ही फक्त 5 ते 10 टक्के इतकी मर्यादीत आहे. आणि ही लोकसंख्या शेतीवर टिकावी म्हणून त्यांना विविध अमिषं दाखवावी लागतात, अनुदानं द्यावी लागतात, त्यांच्या मालाची काळजी शासनालाच घ्यावी लागते. याच्या नेमकी विरूद्ध स्थिती आपली आहे. आपल्याकडे शेतीवरची लोकसंख्या जवळपास 65 टक्के इतकी आहे. इतक्या लोकांना आपण कुठलीच सुट सबसिडी देवू शकत नाही. फक्त ती दिल्याचा खोटा खोटा देखावा मात्र उभारू शकतो. त्यामुळे आपल्याकडे शेतीत जे मनुष्यबळ उपलब्ध आहे, शेतीत राबण्याची जी वृत्ती भारतीय माणसांमध्ये आहे, शेकडो वर्षांपासून शेती करण्याचे व्यवहारिक पारंपरीक ज्ञान आपल्याकडे आहे आणि शिवाय नैसर्गिक रित्या जी स्थिती आपल्याला उपलब्ध आहे ती जगात फार थोड्या ठिकाणी आहे (आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेचा काही भाग) त्यामुळे आपल्या मेहनतीला तोड नाही. जे लोक आपल्याला ही भीती घालतात ते फसवणूक करीत आहेत.
युरोपच्या निमित्ताने भारतीय फळं आणि भाजीपाल्याच्या बाजारेपेठेबाबत नविन धोरणं आखण्याची गरज निर्माण झाली आहे. नविन रचना केली नाही तर ‘रस गळतो । अंबा छळतो । दिल्लीचा राजा । झिम्मा खेळतो ॥ हेच म्हणत टाळ्या वाजवीत बसावे लागेल. शेतमालाशी झिम्मा खेळण्याची दिल्लीच्या राजाची (केंद्र सरकार) सवय अजूनही गेली नाही. इतर बाबीत हेच आहे. पण शेतीच्या बाबतीत जास्तच आहे. 

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, April 29, 2014

तालाचा ‘शंकर’ आणि सुरांवर ‘जय’ असा ‘किशन’

                                        दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 29 एप्रिल 2014 

गायकाच्या उजव्या बाजूला तबल्यावर शंकरसिंग रघुवंशी आहेत आणि डाव्या बाजूला हार्मोनियमवर जयकिशन डाह्याभाई पांचाळ. गाणं अप्रतिम आहे आणि लोक भरभरून दाद देत आहेत. असं जर लिहीलं तर कुणाला काहीच कळणार नाही. एखाद्या गाण्याबद्दल हे वर्णन असून कलाकारांची नावे आहेत. पण हेच जर ‘शंकर-जयकिशन’ असा नुसता शब्द लिहीला तर पुढचे फार काही लिहीण्याची गरजच पडणार नाही. जून्या हिंदी गाण्याच्या प्रेमींच्या डोळ्यासमोर शेकडो गाणी दिसायला लागतील. कानात त्यांचे मधुर सुर घुमायला लागतील.
शंकर जयकिशन या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडीतील शंकर यांची 26 एप्रिल ही पुण्यतिथी. (शंकर जन्म:15 नोव्हें.1922  मृ: 26 एप्रिल 1987, जयकिशन जन्म: 4 नोव्हें 1929 मृ.:12 सप्टें.1971)   त्यांची आठवण होण्याचं कारण म्हणजे सध्या सुरू असलेला लग्नाचा हंगाम. घराच्या जवळ मंगल कार्यालयात एक लग्न होतं. त्याच्या वरातील डिजेच्या ढणढणाटी आवाजात गाणी वाजत होती आणि काही जण नाचत होते काही शांतपणे चालत होते. इतक्यात गाणं बदललं. आणि बघता बघता तरूण म्हातारे मध्यमवयीन बायका पुरूष सगळेच नाचायला लागले. ते गाणे होते ‘‘रामय्या वस्तावय्या, मैने दिल तुझको दिया’’. राज कपुरच्या श्री 420 या चित्रपटातील हे प्रसिद्ध गाणे. मी नाचणार्‍या एका अठरा वर्षाच्या पोराला थांबवून उत्सूकतेने विचारले, ‘‘मित्रा, हे गाणं कुठलं आहे? तूला माहित आहे का?’’ तो म्हणाला, ‘‘पता नही अंकल. लेकीन ट्यून कितनी जबरा है.’’ सर्वसामान्यांच्या ओठांवर खेळावीत आणि ऐकता ऐकता पायांनी ताल धरावा, सार्वजनिक ठिकाणी सहजपणे नाचता यावे ही ताकद शंकर जयकिशनच्या गाण्यांची होती.
शंकर हे पृथ्वीराज कपुर यांच्या पृथ्वी थिएटर या नाटक कंपनीत तबला वाजविण्याचे काम करायचे. ते एका गुजराती चित्रपट निर्मात्याकडे संगीत देण्याची संधी मिळते का हे पाहण्यासाठी चकरा मारत होते. तेंव्हा त्यांना जयकिशन नावाच्या तरूण मुलाची गाठ पडली. तोही याच कामासाठी चकरा मारत होता. तो हार्मोनिअम अप्रतिम वाजवायचा. या दोघांची ओळख झाली. संगीत दोघांच्याही रक्तात वहात होते. पुढे ही मैत्री इतकी घट्ट झाली की जयकिशन यांच्या अकाली जाण्यानंरतही 16 वर्षे एकट्या शंकर यांनी चित्रपटांना संगीत दिले पण नाव मात्र ‘शंकर जयकिशन’ असेच ठेवले होते. तसा त्या दोघांत करारच झाला होता असं म्हणतात.
शंकर यांनी जयकिशन यांनाही पृथ्वी थिएटरमध्ये बोलावून हार्मोनिअम वाजवायचे काम मिळवून दिले. त्यांच्या सोबतच पृथ्वी थिएटरमध्ये एक गोरा देखणा तरूण आपल्या निळ्या डोळ्यांत नव्या चित्रपटाची स्वप्ने घेवून फिरत होता. त्याने आग नावाने पहिला चित्रपट काढला. त्या चित्रपटाला संगीत देणार्‍याला राम गांगुली यांना सहाय्यक म्हणून शंकर काम करत होते. दुसर्‍या चित्रपटाच्यावेळी त्या तरूणाच्या लक्षात आल्या की जुन्या लोकांशी आपले जमणार नाही. समवयस्क  शंकरसोबत त्याच्या काळजाच्या तारा जुळल्या. त्याचे नाव राज कपुर. शंकरने जयकिशनला सोबत घेण्याचा आग्रह धरला.  बरसात, आह, आवारा, श्री 420, जिस देश मे गंगा बहती है, बुट पॉलिश, संगम, मेरा नाम जोकर असे एकाहून एक चित्रपट देत शंकर-जयकिशन आणि राजकपुर या जोडीने इतिहास घडविला.
शंकर जयकिशनचे नाव काढले की पहिल्यांदा राज कपुरच डोळ्यांसमोर येतो. मुकेशचा आवाज आपल्या कानात घुमायला लागतो ‘मेरा जुता है जपानी’, ‘आवारा हुं’, ‘किसी की मुस्कूराहटों पे हो निशा’, ‘दुनिया बनानेवाले क्या तेरे मन मे समाई, काहे को दुनिया बनाई’, ‘होठों पे सच्चाई होती है’ हीच गाणी येतात. कारण तशी प्रतिमाच तयार झाली आहे.
शंकर जयकिशनबद्दलची भरपूर माहिती आता महाजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध आहे. एकाने तर बरीचशी अचुक अशी आकडेवारीच दिली आहे. ती बघितली की जरा आश्चर्याचा धक्काच बसतो. राजकपुर मुकेश यांच्याशी आपण शंकर जयकिशनला कायम जोडत आलो. पण त्यांच्याकडे लता मंगेशकरला सर्वात जास्त (466) गाणी आहेत.मोहम्मद रफी (363), आशा भोसले (213) यांच्यानंतर मुकेश (134) चा नंबर लागतो. किशोर कुमार (103) आणि मन्ना डे (77) हे नंतर येतात.
पं. नेहरूंच्या समाजवादी व्यवस्थेचा तो काळ होता. त्यामुळे राजकपुरचे चित्रपट त्या विचारसरणीकडे झुकलेले असायचे. हाच धागा गीतकार शैलेंद्र यांनी पकडला. शंकर जयकिशन यांच्या संगीताने या विचारसरणीला कलात्मक रूप दिले. शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि पाश्चिमात्य संगीत असा त्रिवेणी संगम जर कुणाच्या गाण्यात प्रामुख्याने दिसत असेल तर तो शंकर जयकिशन यांच्याच. हसरत जयपुरी आणि शैलेंद्र या दोन गीतकारांचा सर्वात जास्त वापर त्यांनी आपल्या गाण्यात केला.
मुकेशचा आवाज ज्यांच्या संगीताची ओळख बनला त्यांना फिल्म फेअर पुरस्कार मात्र ‘चोरी चोरी’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा मिळाला ज्यात मुकेशचे एकही गाणे नाही. काय आश्चर्य आहे हा चित्रपट राजकपुर-नर्गिसचा आहे पण आरके बॅनरचा नाही.  ‘आजा सनम मधुर चांदनी मे हम’, ‘ये रात भिगी भिगी’, ‘जहा मै जाती हु वही चले आते हो’, ‘पंछी बनु उडके फिरू’, ‘मन भावन के घर आये गोरी’ अशी एकापेक्षा एक अप्रतिम गाणी यात आहे ज्यांनी शंकर जयकिशनच्या नावावर पहिल्यांदा पुरस्काराची मोहर उठवून दिली.
त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांची संख्या पावणेदोनशेच्या घरात आहे. वयाच्या 41 व्या 1971 मध्ये वर्षी जयकिशन यांचे अकस्मात निधन झाले. गुजरात मध्ये त्यांच्या जन्मगावी त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. जयकिशनयांच्या अंत्ययात्रेला प्रचंड जनसमुदाय लोटला होता. जयकिशन गेल्यावर ते ज्या चर्चगेटच्या गेलॉर्ड हॉटेलमध्ये बसायचे त्या टेबलावर मेणबत्ती लावून ‘हा टेबल जयकिशन यांच्यासाठी राखीव आहे’ अशी महिनाभर पाटी ठेवलेली होती.
जयकिशन यांच्या मृत्यूनंतर शंकर आणि राजकपुर यांचे सांगितिक संबंध तुटले. पुढची 16 वर्षे शंकर एकट्याने संगीत देत होते. पण आता त्यांच्यातील प्राणच निघून गेला होता. हळू हळू शंकर एकटे पडत गेले. 1986 मध्ये त्यांचा मृत्यू झाला तेंव्हा अंत्यसंस्कार समयी अतिशय मोजके लोक होते. राजकपुरही तेंव्हा उपस्थित नव्हते.
मेरा नाम जोकर हा राजकपुर सोबतचा त्यांचा शेवटच्या काळातला चित्रपट. यात शैलेंद्रचे गाणे आहे

कल खेल मे हम हो ना हो
गर्दीश मे तारे रहेंगे सदा
भूलोंगे तूम भूलेंगे वो
पर हम तूम्हारे रहेंगे सदा
रहेंगे यहा अपने निशा
इसके सिवा जाना कहा

शंकर यांच्याही ओठांवर मृत्यूसमयी हीच ओळ असेल.
पतिता हा त्यांचा अगदी सुरवातीच्या काळातला राजकपुर प्रभावाच्या बाहेरचा अतिशय वेगळा चित्रपट. यात लताच्या आवाजात शैलेंद्रचे शब्द अतिशय समर्पक आहेत. भारतीय रसिकांची शंकर जयकिशन यांच्या प्रती हीच भावना असेल

वो रंग भरते है जिंदगी मे
बदल रहा है मेरा जहां
कोई सितारे लूटा रहा था
किसीने दामन बिछा दिया

रसिकांच्या पदरात चांदण्याचे दान देणार्‍या या प्रतिभावंतांना श्रद्धांजली.
   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, April 22, 2014

वाराणसी निवडणुक आणि गालिबची कविता



                                        दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 22 एप्रिल 2014 

सध्या वाराणसी फार चर्चेत आहे. कारण नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल येथून लोकसभेची निवडणुक लढवत आहेत म्हणून. नरेंद्र मोदी निवडणुक लढवित आहे म्हणजे मुलसमानांची मते कुणाला, मुसलमान उमेदवार कसा उभा करायचा किंवा उभा राहू द्यायचा नाही यावर चर्चा रंगल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर गालिब सारख्या फार्सी-उर्दूच्या महाकविला या शहराबद्दल काय वाटत होते हे कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तशी कुणालाही आवश्यकता वाटण्याचे कारणच नाही. 

गालिब हा प्रतिगाम्यांपेक्षा पुरोगाम्यांची अडचण करणारा कवी आहे. त्याने या शहराचे वर्णन ‘चराग-ए-दैर’ (दिव्यांचे देऊळ) कवितेत जे करून ठेवले आहे त्याने भल्या भल्यांची गोची होवून बसली आहे. गालिबची ही कविता मुळ फार्सीत आहे. त्याचे हिंदी-इंग्रजी भाषांतर सर्वत्र उपलब्ध आहे. पवन कुमार शर्मा यांनी गालिब वर एक सुंदर पुस्तक इंग्रजीत लिहीले आहे (गालिब : द मॅन, द टाईम्स, प्रकाशक साहित्य अकादमी, दिल्ली). या पुस्तकाचे मराठी भाषांतर प्रा.निशिकांत ठकार यांनी केले आहे. या पुस्तकात ही कविता त्यांनी गद्य स्वरूपात दिली आहे. एरवी गालिबच्या उर्दू गझलांचे दाखले सगळेच देतात. पण त्याच्या फार्सी  रचना मात्र फारश्या अभ्यासल्या, चर्चिल्या जात नाहीत. "माझ्या अस्सल प्रतिभेचे दर्शन फार्सी कवितेतच सापडते" असे गालिब यानेच लिहून ठेवले आहे. शिवाय आपल्याकडे फक्त गझलांचेच कौतुक करायची परंपरा आहे. त्यामुळे गझलेशिवाय जे काही गालिब किंवा इतर उर्दू कवींनी लिहून ठेवले आहे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. चराग-ए-दैर या सुंदर कवितेचा मराठी भावानुवाद असा  होईल...

दिव्यांचे देऊळ

आपल्या रंगभर्‍या मस्तीने
स्वर्गाला लाजविणार्‍या बनारसला
न लागो कुणाची वाईट नजर
पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे म्हणतात
इथल्या मरणाला लाभतो 
अमरत्वाचा जर

हे मंदिर आहे
रंगीबिरंगी आश्चर्याचे जग
इथल्या वसंतात
सदोदीत फुलण्याची धग

इथे शरद बनून राहतो
उजळ कपाळीचा चंदनटिळा
आणि वसंतवारा घालतो
फुललहरींचे जानवे
इथली धुसर संध्या
स्वर्गीच्या भुवयांमधल्या 
कुंकवागत जाणवे

पैगंबराला दिसलेल्या दिव्य प्रकाशापासून 
घडलेल्या इथल्या मूर्ती
त्यांच्या चेहर्‍यावर
गंगेकाठच्या दिव्यांच्या
लवथवत्या उत्साहाची पूर्ती
सूर्य-चंद्र जेंव्हा रेंगाळतात
पूर्व क्षितीजावर टेहळण्यासाठी
ही काशी सुंदरी उचलते गंगेचा आरसा
आपले लावण्य न्याहळण्यासाठी

तार्‍यांनी खच्चून भरल्या एका रात्री
विशुद्ध भाव बाळगून गात्री
मी विचारले एका साधुला
महाराज,
या दु:खी जगातून
निष्ठा-प्रेम-भलेपणा-विश्वास
यांनी घेतला अखेरचा श्वास
बापलेक दाबताहेत परस्परांचा गळा
भावाचा भावाच्या वाईटावर डोळा
सार्‍या कोमल भावनांचा 
झाला लय
मग का होत नाही प्रलय ?
का वाजत नाही शेवटची रणभेरी ?
अंतिम संहाराची 
कोणा हाती दोरी ?
मंद हसू ओठांवर खेळवत
प्रेमभाव डोळ्यांत मिळवत
तो म्हणाला
ही नगरी आहे
विधात्याचे प्रिय काळीज-वतन
तो होऊ देणार नाही ही नष्ट
वा हीचे पतन 

हे एैकून अभिमानाच्या गुलालाने
भरून गेले बनारसचे कपाळ
विचारांच्या पंखांना शिवता येऊ नये
असे उंचावले बनारसचे आभाळ


वाराणसीबद्दल इतकी पवित्र भावना बाळगणार्‍या गालिब यांचे गाव होते दिल्ली. आजही दिल्लीला त्यांची कबर आहे. ते रहात असलेल्या बल्लीमारा मोहल्याचे मोठे सुंदर वर्णन गुलजार यांनी केले आहे. गुलजार लिहीतात,

बल्लीमारा मोहल्ले की वो पेचिदा दलिलों की सी गलिया ।
सामने टाल के नुक्कड पे बटेरों के कसिदे ।
गुडगुडाती हुई पान की पिकों मे वो दाद वो वाह वाह ।
चंद दरवाजे पर लटके हुये बोसिदा से कुछ टाट के पर्दे ।
एक बकरी की ममियाने की आवाज ।
और धुंदलाई हुयी श्याम के बेनुर अंधेरे
ऐसे दिवारोंसे मूं जोड के चलते है यहा,
चुडीवालां की कटरी की बडी बी जैसे,
अपनी बुझती हुई आखोंसे दरवाजे टटोले।
इसी बेनूर अंधेरी गलीकासिम से
एक तरतीब चरागों की शुरू होती है,
एक पुराने सुखन का सफा खुलता है ।
असद उल्ला खॉं गालिब का पता मिलता है ।


गालिबच्या भाषेला न्याय द्यायला गुलजार यांचेच शब्द पाहिजेत. याचे काय भाषांतर करणार?   

केवळ कविता लिहूनच गालिब थांबला असे नाही तर आपल्या एका मित्राला लिहीलेल्या पत्रात त्याने असे लिहीले आहे, "धर्माचा त्याग करून एका हातात माळ घ्यावी, कपाळावर टिळा लावावा, गळ्यात जानवे घालावे, गंगेकाठी जाऊन बसावे, अस्तित्वाच्या प्रदूषणापासून स्वत:ला पवित्र करावे आणि थेंब होऊन नदीशी एकरूप होऊन जावे अशी इच्छा मला झाली होती." (गालिब : काळ आणि कर्तृत्व, पवन कुमार वर्मा, अनु. निशिकांत ठकार, साहित्य अकादमी पृ.37)
गालिब यांनी आपल्या कवितेतून आणि पत्रातून व्यक्त केलेली भावना अतिशय विशुद्ध अशी आहे. त्याचा धर्माचा तसा काही संबंध नाही. मोदीं आणि त्यांना विरोध करायचा म्हणून केजरीवाल यांचे हेतू धार्मिक राजकीय आहेत हे काही लपलेले नाही. पण एक सुंदर-पवित्र नगरी, हीचे सौंदर्य पावित्र्य अबाधित ठेवण्याचे काही कोणी निवडणुक प्रचारात बोललेले नाही.
भोवतालच्या सर्व प्रदुषणाचा मनापासून वीट येऊन गालिबसारख्याला वाराणसीच्या गंगेकाठी विशुद्ध पवित्र असं वातावरण सापडले आणि त्याचा त्याला मोह पडला. आजच्या वातावरणात गालिब यांना असे ‘वाराणसी’ कविता लिहायला सापडेल का?  गालिबच्या कवितेच्या मोहात पडून आपण वाराणसीला गेलो तर आपल्या हाती काहीच सापडणार नाही. गालिबची कविता आपण आपल्याच मनातील वाराणसी किंवा आपल्याला आवडणारे नदी काठचे कुठलेही गाव/शहर यांना लागू करून मनातल्या मनात आनंद साजरा करू. (मूळ फार्सी कविता चिराग-ए-दैर मला उपलब्ध झाली नाही. कुणाला ती मिळाल्यास जरूर सांगा. अर्थात त्यातील शब्दांच्या अर्थासहीत आणि देवनागरी लिपीत पाठवा. मला स्वत:ला उर्दू लिपी वाचता येत नाही.)   

 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, April 15, 2014

बाबासाहेब आणि ज्ञानेश्वर-तुकाराम


                                     गवसे ना ओंजळीत | उरे व्यापून आभाळ |
                                     त्याची  खुण म्हणूनिया | घेतो माखून कपाळ ||

                                            
                                      दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 15 एप्रिल 2014


बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हा एक फार मोठा सण म्हणून साजरी केली जाते. मोठ्या मिरवणुका काढल्या जातात आणि या निमित्ताने सर्व वातावरण निळं होऊन जातं. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, ‘‘आज जयभीम वाल्यांचा सण आहे’’ असं म्हणून इतर समाज अंग झटकून बाजूला होतो. बाबासाहेबांच्या महानिर्वाणालाही आता 60 वर्षे होत आहेत. तरीही आपण दलितांना आणि त्यातही परत बुद्ध धर्म स्वीकारलेल्या पूर्वाश्रमीच्या महारांना वेगळं समजतो. कालपर्यंत त्यांच्यावर सामाजिक बहिष्कारच होता. आज तो उघड नाही पण छुप्या पद्धतीने मात्र चालूच आहे.
स्वत: आंबेडकरांना भारतीय उपखंडांतील चालिरीती, धर्म संकल्पना, संस्कृती या बद्दल संपूर्ण आणि सम्यक भान होते. त्यांनी पहिले वृत्तपत्र पाक्षिक ‘मुकनायक’ 31 जानेवारी 1920 ला सुरू केले. या पाक्षिकाच्या पहिल्याच अंकात बोधवाक्य म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग वापरला आहे.

काय करू आता धरूनिया भीड ।
नि:शंक हे तोंड वाजविले ॥
नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण । 

सार्थक  लाजून नव्हे हीत ॥
दलितांमध्ये साक्षरांची संख्या हजारात 9 इतकी मामुली असतानाही बाबासाहेबांनी पाक्षिकाचा उपद्व्याप केला. त्यामागे त्यांची दूर दृष्टी दिसून येते. साक्षर सवर्णांचा मोठा वर्ग त्यांच्या समोर असावा हे तर उघडचे आहे. तुकाराम महाराजांचा अभंग वापरायचे कारण त्यांना वारकरी संप्रदाय आणि त्याचा प्रभाव याची पूर्ण जाणीव होती. जनसामान्यांच्या प्रबोधनाचे काम करावयाचे तर त्यासाठी त्यांना समजेल अशीच भाषा वापरली पाहिजे. त्या काळात आणि खरं तर आजही तळागाळात वारकरी संप्रदायाने एक अध्यात्मिक सामाजिक परिभाषा रूजवली.आपल्या मुक राहिलेल्या सामाजाच्या दु:खाला वाचा फोडण्यासाठी आपण नायक बनलोच पाहिजे इतकेच नाही तर प्रत्येक सामान्य मुक जन हा ‘मुकनायक’ बनला पाहिजे हे त्यांना अभिप्रेत होते. आणि त्यासाठी त्यांनी तुकाराम महाराजांचा अभंग वापरला.
अभंगाच्या पुढच्या ओळी ज्या त्यांनी प्रत्यक्ष वापरल्या नाहीत पण त्यातूनही बाबासाहेबांचा दृष्टीकोन काय आहे हे स्पष्ट जाणवते

आले ते उत्तर बोलो स्वामीसवे । 
धीट नीट जीवे होऊनिया ॥
तुका म्हणजे जीवा समर्थांशी गाठी ।
घालावी हे मांडी थापटूनी ॥ 3211॥
(श्रीसार्थ तुकारामाची गाथा, संपादक विष्णुबुवा जोग, ढवळे प्रकाशन आठरावी आवृत्ती, पृ. 667)
वारकरी संप्रदायावर कुणी कितीही टिका केली तरी एक गोष्ट सर्वांनाच मान्य करावी लागते की त्यांनी एका धाग्यात अवघ्या लोकांना बांधून ठेवले. विठ्ठल हे दैवत, महिन्यातील दोन दिवस (एकादशीला) उपवास करणे, मांसाहार न करणे, धुत वस्त्र परिधान करणे, प्रत्येकाच्या ठायी देव आहे हे उमजून एकमेकांच्या पाया पडणे, वर्षातून एक वेळ पंढरीची वारी करणे इतक्या साध्या बाबींवर संप्रदायाचा संपूर्ण डोलारा उभा केला. बाबासाहेबांना ही गोष्ट तीव्रतेने लक्षात आली असणार. आणि म्हणूनच त्यांना आपल्या समाजाच्या दु:खाला वाचा फोडण्यासाठी तुकारामांच्या ओळी समर्पक पद्धतीने वापराव्या वाटल्या.
बाबासाहेब पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेले आणि हे पाक्षिक बंद पडले. पुढे सात वर्षांनी त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ हे पाक्षिक सुरू केले (पहिला अंक दि. 3 एप्रिल 1927) दुसरे पाक्षिक चालू करताना तर बाबासाहेबांनी संत वाङ्मयाचा अभ्यास केल्याचे खैरमोडे यांनी लिहूनच ठेवले आहे. ‘‘ वर्तमानपत्र काढण्याचे मुक्रर केल्यानंतर साहेबांनी मराठी भाषेचा व हिंदुस्थानातील सामाजिक सुधारणेच्या चळवळीचा अभ्यास करण्याचे ठरविले. मुकुंदराय, मुक्तेश्वर, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास इत्यादी संतांचे वाङ्मय विकत घेवून त्याचा अभ्यास पाच-सात महिन्यांत केला.’’ (डॉ.आंबेडकरांचे अंतरंग, द.न.गोखले, मौज प्रकाशन, 1ली आवृत्ती, पृ.87). आपल्या समाजाच्या दुबळ्यांचा मुक आक्रोश मांडण्यासाठी मी आवाज उठवणार आहे असे म्हणणारे बाबासाहेब आता मात्र नुसता आवाज उठवून शांत बसण्यास तयार नाहीत. प्रत्यक्ष कृती करण्याची गरज मांडताना ते  ज्ञानेश्वरतील कृष्णाने अर्जूनाला केलेल्या उपदेशाचा आधार बाबासाहेब घेतात.

आता कोदंड घेऊनि हाती । आरूढ पां इये रथी ।
देई अलिंगन वीरवृत्ती । समाधाने ॥
जगी कीर्ति रूढवी । स्वधर्माचा मानु वाढवी ।
इया भारापासोनि सोडवी । मेदिनी हे ॥
आतां पार्था नि:शंकु होई । या संग्रामा चित्त देई ।
एथ हे वांचूनि कांही । बोलो नये ॥
(ज्ञानेश्वरी अध्याय 3, ओवी क्र. 189, पारायण प्रत, पृ.70, प्रकाशक-ज्ञानेश्वर मंदिर संस्थान, आळंदी)

कुठलीही शंका मनात न ठेवता तू शस्त्र हाती घे आणि ही पृथ्वी वाचव हा संदेश कृष्णाचा अर्जूनाला जसा आहे तसाच बाबासाहेबांचा त्यांच्या अनुयायांना आहे. कुठलीही शंका मनात न घेता आता शस्त्र हाती घ्या आणि लढा. पण आधुनिक काळातील युद्ध हे शस्त्राने लढण्याचे नसून शिक्षणाने लढावयाचे आहे. त्यामुळे वृत्तपत्राचे शस्त्र त्यांनी हाती घेतले.
भारतीय तत्त्वज्ञानात शेवटचे दर्शनकार म्हणजे महात्मा गौतम बुद्ध. नंतरच्या लोकांनी या दर्शनांचा अन्वयार्थ लावणे, त्याची मिमांसा करणे हे काम केले पण पूर्णपणे नविन दर्शन मांडले नाही.  या दर्शनकारांची जी विचार मांडणी करण्याची पद्धत आहे त्यात मागचे सगळे खोडून माझेच सगळे खरे असं म्हणण्याची पद्धत नाही. मागचे काय मी स्वीकारत आहे आणि काय नाकारत हे सकारण आणि सविस्तर नोंदवून ठेवण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे नविन काही मांडणी करताना जूने काय आहे ते सांगावे लागते. बाबासाहेबांना जी नविन मांडणी करायची होती त्यासाठी जून्यातील जे काय आहे त्याचा आधार घेतला पाहिजे याचीही त्यांना जाणिव होती. स्वाभाविकच वारकरी संप्रदायातील काही बाबी आपण विचारात घेतल्या पाहिजे. हे समजून त्यांनी ज्ञानेश्वर तुकारामांच्या ओळी वापरल्या.
आधुनिक म्हणवून घेताना बुद्ध धर्म स्वीकारलेल्या दलितांनी सरसकट सगळ्या जून्या परंपरा मुल्य नाकारायची आणि  इतरांनी दलितांना  नाकारायचे  असला बाष्कळपणा बाबासाहेबांसारख्या विद्वानाला कधीच मंजूर झाला नसता. त्यामुळे त्यांनी बंड करतानाही भारतीय परंपरेतीलच धर्म स्वीकारला. कारण त्यांना आपल्या संस्कृतिची पूर्ण जाण होती.
ज्ञानेश्वरांचा आणि त्यातही परत इतर अभंग किंवा रचना न घेता ज्ञानेश्वरीतीलच ओळ वापरण्यात दुसराही एक अर्थ त्यांना अभिप्रेत असावा. महाभारतावर संशोधन करताना रविंद्र गोडबोले यांनी हे निदर्शनास आणून दिले आहे की यात एकही माणूस ‘धर्म’ संकल्पनेवर बोलत असताना ब्राह्मणांचा संदर्भ देत नाही. किंवा ब्राह्मणांच्या तोंडी धर्मवचने येत नाहीत. याचाच अर्थ त्यावेळच्या रूढी, परंपरा, धर्म, तत्त्वज्ञान यावर ब्राह्मणेतर समाजाचे वर्चस्व असले पाहिजे. हीच बाब अप्रत्यक्षपणे ज्ञानेश्वर आणि नंतर तो संदर्भ वापरणारे बाबासाहेब यांनाही अधोरेखित करावयाची असावी.
हे आपण समजून घेत नाही कारण हे सगळे गैरसोयीचे आहे. आजच्या कळपवादी, जमातवादी, जातवादी राजकारणाला हे परवडणारे नाही. बाबासाहेबांच्या 123 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आपण जरा डोळसपणे विचार करायला लागलो तरी खुप आहे.

 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Thursday, April 3, 2014

.............. चैत्र पालवी । मनी फुटावी।


                              उरूस, गुरूवार 3 एप्रिल 2014

नुकताच गुढी पाडवा होवून गेला. त्या दिवशी अतिशय गलिच्छ मजकुर फेसबुकवर फिरत होता. छत्रपती संभाजी महाराजांची हत्या या दिवशी झाली. परिणामी हा सण साजरा करणे ही कशी ब्राह्मणी विकृती आहे असे सांगितले जात होतं. आपल्याकडे सण समारंभ म्हटले की त्याचा धर्माशी आणि स्वाभाविकच ब्राह्मणांशी संबंध जोडणं ही एक सोय आहे. खरं तर काही सण समारंभ यांचा ब्राह्मणांशी काडीचाही संबंध नाही. पण इतका सारासार विचार अशा विकृत लोकांना करायचा नसावा.

पाडव्याचा पहिला संदर्भ येतो तो रामायणातील. प्रभु श्रीराम या क्षत्रिय राजाने रावण या ब्राह्मणाचा पराभव करून त्याचा वध करून विजय मिळविला. अशा श्रीरामाचे लक्ष्मण, सीता, हनुमान व इतर वानर सैन्यासह अयोध्येत आगमन झाले तो हा दिवस. या दिवशी अयोध्येतील जनतेने मोठ्या आनंदाने आपआपल्या घरासमोर गुढ्या उभारल्या. तोरणं बांधली. रांगोळ्या काढल्या. आज ज्याला साडी व त्यावर उलटा तांब्या असं म्हणून हिणवलं गेलं ते म्हणजे जरीचे वस्त्र व त्यावर कलश अशी रचना आहे. जमिनीवर कलश मांडताना सुलटा ठेवला जातो तर तोच कलश काठीवर ठेवायचा असेल तर उलटा केला जातो त्यामागे कुठलेही कारस्थान असण्याचे कारण नाही. संभाजी महाराजांचे मस्तक म्हणजे हा कलश असा विपरीत अर्थ कशासाठी काढल्या जातो? आणि जर जातीचाच विचार केला तर या सणाची सुरूवात ही क्षत्रियांपासून होते. ब्राह्मणांपासून नाही.

दुसरा संदर्भ आहे तो शेती करणार्‍या कुणब्यांचा. शेतीची सर्व कामे या काळात संपलेली असतात. मोठी पेरणी जी दिवाळीच्या दरम्यान होते तीचे खळे उरकलेले असते. इंद्रजीत भालेराव यांच्या ‘पीकपाणी’ या संग्रहात शेतीसंबंधी एक दीर्घ कविता आहे. तिच्या शेवटच्या तुकड्यात

खळेदळे उरकले
झाला कुणबी मोकळा
चैती वाहुटळीसंग
उडू लागला पाचोळा


असा संदर्भ आलेला आहे. पाडव्याला जुने सगळे हिशोब मिटवून नव्यानं ‘साल’ सुरू होतं. नविन सालदार याच दिवशी नेमले जातात. भारत काळे यांच्या ‘ऐसे कुणबी भुपाळ’ या कादंबरीत हे संदर्भ आलेले आहेत. तेंव्हा पाडवा म्हणजे कुणब्याचा मार्च एन्ड होवून नविन वर्ष सुरू होण्याचा दिवस.

याच काळात जत्रा भरतात. लग्न समारंभ याच रिकाम्या काळात आटोपले जातात. कारण कुणब्याच्या हातात पैसा आलेला असतो शिवाय शेतात काही महत्त्वाचे काम नसते. त्यामुळे पाडवा साजरा करण्यात येतो. यात कुठेही ब्राह्मणांचा आणि धार्मिक संदर्भ नाही.

तिसरा संदर्भ तर फारच महत्त्वाचा आहे. आणि तो म्हणजे निसर्गाचा. रामाचा जय असो नाही तर संभाजी महाराजांची हत्या असो याच्या पलिकडे निसर्ग ही एक फार मोठी शक्ति आपल्या जीवनाला व्यापून राहिलेली आहे. भारतीय उपखंडात हा काळ वसंत ऋतू म्हणून ओळखल्या जातो. जुनी पानं टाकून झाडांना नविन पालवी फुटते. लिंबाच्या मोहराचा घमघमाट सर्वत्र पसरलेला असतो. पिंपळ, कडु लिंब, अंबा, पळस ही या ऋतूची सुंदर प्रतिकं आहेत. पिंपळाच्या कोवळ्या लुस पानांवरून अक्षरश: नजर ठरत नाही. कडु लिंबाच्या घमघमाटाने सारा आसमंत भरून जातो. अंब्याचा मोहोर आणि मग त्याला लगडलेल्या कैर्‍या, पळसाच्या फुलांचा अप्रतिम लाल केशरी रंग आणि त्यांच्या देठाजवळचा काळसर मखमाली रंग नजरेला वेडं करतात. झाडांच्या पालवीला म्हणून जो शब्द आहे तो ‘चैत्र पालवी’ असा आहे नुसता पालवी असा नाही. शिवाय या काळात एक विलक्षण रिकामपण, एक शांतता पसरलेली असते. मर्ढेकरांनी मोठं सुंदर वर्णन या काळाचे केलं आहे

झोपली ग खुळी बाळे
झोप अंगाईला आली
जड झाली शांततेची
पापणी या रित्या वेळी

चैत्र बघतो वाकून
निळ्या नभांतून खाली
आणि वार्‍याच्या धमन्या
धुकल्या ग अंतराळी


या काळातील रंग आणि गंध याचा मोह बोरकरांसारख्या कवीला न पडता तरच नवल. बाराही महिने आणि त्या काळातील निसर्ग यांच्या उपमा प्रेयसीला देताना बोरकर लिहीतात

फुलवित चित्र चैत्र तुझ्या अंगी झाला धुंद
वक्षी फळून वैशाख उरी लोटी दाह गंध


हे सारं विसरून काही तरी विकृती मनात ठेवायची आणि तिचं प्रदर्शन या इतक्या सुंदर काळात करायचं याला काय म्हणावं? खरं तर हा काळच जुनं सारं विसरून नव्यानं काही तरी करण्याची उमेद बाळगावी असा असतो. जगण्याचे तत्त्वज्ञानच या काळात निसर्ग आपल्याला शिकवतो. धनंजय चिंचोलीकर या मित्राच्या दारापुढील पिंपळाला पाहून मला जी कविता सुचली होती तिच्यात मी हेच मांडण्याचा प्रयत्न केला आहे

कात टाकूनी पुन्हा नव्याने
करितो सळसळ दारी पिंपळ
मिटवून टाकी पानगळीचे
अंगोपांगी उठलेले वळ

अटवून टाकी चैत्राचे ऊन
साकळलेले दु:खाचे जळ
डबडब भरण्या सज्ज जाहले
मनामनाचे सुकलेले तळ

जीर्ण शीर्ण जे पडले ते ते
उडवूनी लावी पिशी वावटळ
जूने बाजूला सरल्यावरती
नव्यास मिळते रूजण्याला बळ


जूने साचलेले कुबट अटून जावून नविन लसलसणारे चैतन्यमय असे काही तूमच्या मनामनात रूजो हीच चैती पाडव्याच्या निमित्ताने प्रार्थना. (लेखातील छायाचित्र -श्रीकृष्ण उमरीकर)

  श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575     

Wednesday, March 19, 2014

कुठे शेतकर्‍यांचा राजा, कुठे दिल्ली-लाचार फौजा



     प्रसंग आहे बरोबर 340 वर्षांपूर्वीचा आहे. महाराष्ट्रात धुमश्चक्री चालू होती. शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होती. कुठलेही अस्मानी संकट म्हणजे पाऊस, पूर, दुष्काळ आलेले नव्हते, तर संकट सुलतानी होते. (अस्मानी संकट म्हणजे आभाळातून प्रचंड पडलेला किंवा न पडलेला पाऊस, गारपीट किंवा भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती आणि सुलतानी संकट म्हणजे राज्य करणार्‍या सुलतानाने लहरीप्रमाणे केलेला अन्याय. हे यासाठी सांगितले की एका प्रतिष्ठित दैनिकाच्या संपादकाला अस्मानी आणि सुलतानी यातील फरकच माहीत नव्हता. परिणामी, त्यांच्या लेखनात या शब्दांची गल्लत होत गेली. )  मोगलांच्या सैन्याने मराठी मुलखाला पुरते कोंडीत पकडले होते. पेरणीचे दिवस तोंडावर आलेले होते. गनिमी काव्याचा आधार घेऊन शिवाजी महाराज मोगलांना अजून कितीही काळ या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर करत फिरवत बसू शकले असते; पण महाराजांच्या लक्षात आले की हा पेरणीचा काळ वाया गेला, तर पूर्ण शेती उद्ध्वस्त होईल. महाराजांनी मिर्झा राजे जयसिंग यांच्याशी तह केला. ही तारीख होती 12 जून 1665. 
       आजचे शेतकर्‍यांचे पुत्र असलेले राज्यकर्ते, 'जाणते राजे' सकाळ-दुपार-संध्याकाळ तिन्ही त्रिकाळ शाहू फुले आंबेडकर हा जप करतात. शिवाजी महाराजांच्या नावाने जयजयकार करतात; पण आपल्या कृतीत यांची धोरणे येवू नये याची काळजी घेतात. शिवाजी महाराजांनी सगळे राजकारण बाजूला ठेवून शेतकर्‍यांच्या हितासाठी मिर्झा राजे जयसिंगांशी तह केला.
तेव्हा पेरणी तोंडावर होती. आज सुगी संपून धान्य हाती येण्याच्याच नेमक्या काळात अस्मानी गारपिटीने शेतकर्‍यांच्या ताटात माती कालवली आहे. शेती पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. दिल्लीच्या निवडणुका तोंडावर आहेत. एकही राज्यकर्ता अजून असं म्हणाला नाही की, शेतीची अतिशय दयनीय अवस्था पाहता महाराष्ट्रातील निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात. पुढे होणार्‍या विधानसभा निवडणुकांबरोबर या निवडणुका घेतल्या जाव्यात. सध्या आपण सगळे मिळून शेतकरी राजा पुन्हा उभा कसा राहील, यासाठी कंबर कसून प्रयत्न करूत.
     'जाणते राजे' म्हणवले जाणारे शरद पवार केंद्रात कृषिमंत्री आहेत. पंचनामे झाल्याशिवाय शेतकर्‍यांना मदत मिळू शकत नाही, हे त्यांनी सांगितले. एखादा रुग्ण अतिशय आजारी आहे. त्यातच त्याचे देहावसान झाले. त्याचे शव विच्छेदन अजून व्हावयाचे आहे. डॉक्टरांनी त्याला अजून मृत घोषित केले नाही. तोपर्यंत त्याला जिवंत समजायचे काय? दिल्लीचे पंचनामे अजून झाले नाहीत, तोपर्यंत शेतकर्‍यांना काय वार्‍यावर सोडायचे? मागच्या वेळी झालेल्या गारपिटीची मदत आजतागायत शेतकर्‍यांपर्यंत पोहचली नाही. आजही ही मदत देण्यासाठी आताच  आजच्या जाणत्या राज्यांनी खळखळ सुरू केली आहे. कुठल्या दृष्टीने यांना शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणायचे?
    आजचे राज्यकर्ते म्हणजे 'जाणते राजे' नसून या दिल्ली दरबारातील लाचारांच्या फौजा आहेत. शिवाजी महाराज आग्र्‍यात गेले, तेव्हा त्यांचे वर्तन कसे होते? आग्रा येथील किल्ल्यात शिवाजी महाराजांची पाऊले पडली तेव्हा त्या मातीला काय वाटले असेल याचे कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेत फार छान वर्णन केले आहे.

या जमिनीवर
या जमिनीवर असेल तेव्हा
प्रिय माझ्या त्या शककर्त्याचे
पडले पाऊल
या भूमीच्या सुगंधसिंचित धूलिकणांना
सह्याद्रीवर अवतरलेल्या
ऊर्जस्वल स्वातंत्र्य उषेची
इथे लागली पहिली चाहूल

याच ठिकाणी-
मावळ खोर्‍यामधले वादळ
इंद्रसभेवर या आदळले
कृष्णेचे जळ खडकांमधले
यमुनेच्या श्रीमंत तटावर येथे वळले
इथे तमाच्या अधिराज्याला
तेजाचे बळ प्रथमच कळले

मखमली गाद्यांवर सळसळ
संतापाची असेल उठली
माळ करांतील या तख्तावर असेल तुटली
काच बिलोरी ऐश्वर्याची
पोलादाच्या त्या तुकड्यावर इथेच फुटली
(पृ.10-11, स्वगत,  पुनर्मुद्रण 86, कॉन्टिनेंटल प्रकाशन- पुणे)
    
     सध्याचा अनुभव मात्र उलटा आहे. महाराष्ट्रातला नेता दिल्लीत जातो आणि अजूनच लाचार होतो. महाराष्ट्रासाठी कुठलीही मदत मागायची असो आणि त्यातही परत शेतकर्‍यांसाठी काही मागायचे असो. यांचे शब्द तोंडातल्या तोंडातच जिरतात.  दिल्लीच्या इंद्रसभेवर यांच्या पोलादाचे तुकडे जाऊन आदळत नाहीत, कारण हे रबराचे तुकडे आहेत. रे रबरी चेंडू आपले आपणच उड्या मारत राहतात. आपलेच प्रतिबिंब तिथल्या आरशात पाहण्यात गुंग होतात.
     आग्र्‍यावरून परतल्यावर पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची व्यवस्था लावणे, जमिनीची मोजणी करून घेणे, शेतसार्‍याची नीट मांडणी करणे या मोहिमा हाती घेतल्या होत्या. शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे 19 मार्च रोजी आहे. सरकारी जयंती तारखेप्रमाणे 20 फेब्रुवारीला पार पडली आहे. शिवाजी महाराज असते, तर निश्चितच कडाडले असते आणि पहिल्यांदा गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी सरसावले असते.
     महाराष्ट्रातील शेतकरी सुलतानी जाचातून शिवाजी महाराजांनी मुक्त केला तेंव्हा मोगलाईतील जाट शेतकरी अन्यायाने त्रस्त होवून औरंगजेबाविरूद्ध बंड करत होता. या बंडाचा वणवा इतका होता की औरंगजेबाचा सरदार अब्दुलनबी याला सामान्य शेतकर्‍यांनी ठार केले. आजच्या राज्यकर्त्यांना शेतकरी निवडणुकीत गार करेल म्हणजे त्यांचे डोळे उघडतील 
     ‘शेतकर्‍यांचा राजा शिवाजी’ या पुस्तकात शरद जोशी यांनी शिवाजी महाराजांच्या या पैलूचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे. श्रीकांत देशमुख यांनी नुकतेच याच विषयावरील ‘कुळवाडीभुषण शिवराय’ हे पुस्तक सिद्ध केले आहे. या पुस्तकाला मसापचा म.भि.चिटणीस साहित्य पुरस्कारही प्राप्त झाला आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी हे लिखाण निदान नजरेखालून तरी घालावे.  
 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Friday, March 14, 2014

भटां नंतरची मराठी गझल: शाब्दिक बुजगावणे


सुरेश भट यांचा आज ११ वा स्मृतीदिन. ( जन्म १५ एप्रिल १९३२ - मृत्यू १४ मार्च २००३ )  त्यांच्यानंतर मराठी गझल खरेच पोरकी झाली. गझलेचे वृत्त आणि वृत्ती जाणून घेणारा त्यांच्या इतका समर्थ मराठी गझलकार कोणी नंतर झाला नाही. नंतरची मराठी गझल अतिशय पोरकट, शब्दांचे खेळ करणारी, उथळ सिद्ध झाली आहे. अनेकांना हे मत आवडत नाही. एका नवीन गझलकाराला माझ्या मताचा आतिशय राग आला. त्याच्या गझलामधील चुका मी दाखवून दिल्या तर त्याने मला चक्कं शिव्याच घातल्या. कोणीही मला सुरेश भट यांच्या नंतर लिहिल्या गेलेल्या १०० गझला सांगा. मी त्यांची चिकित्सा करायला तयार आहे. कुठलेही पुस्तक आसेल तर विकत घेऊन वाचायला तयार आहे. कृपया कोणीही मला भीमराव पांचाळे किंवा आजून कोणी गावून दाखवलेली गझल सांगू नये. मी लेखी स्वरूपातील गझल वाचायला तयार आहे. गायल्या गेलेली गझल हा गाण्याचा भाग झाली. तिचा विचार आपण संगीताच्या क्षेत्रात करूत. भट यांच्या नंतर लिहिल्या गेलेल्या १०० गझला आणि त्यांचा अभ्यास हीच भट यांना खरी श्रद्धांजली. कृपया कोणीही उथळ शेरेबाजी नं करता लिखित स्वरूपातील मजकूर सांगावा.

'एल्गार' कविता संग्रहाच्या दुसर्‍या आवृत्तीत सुरेश भटांनी ‘गझलेची बाराखडी’ नावाचे एक परिशिष्ट जोडले आहे. गझलेबाबतच्या त्यांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्यास गझलेच्या नावाने शब्दांचे बुजगावणे मराठी कवितेत उभे आहे असे दिसेल. आणि ते करणारे किती पोरकट आहेत हे वाचकांच्या लक्षात येईल. मी इथे रसिक हा शब्द वापरला नाही. कारण बहुतांशवेळा तो श्रोत्यांसाठी प्रेक्षकांसाठी वापरला जातो. इथे मला वाचकच अपेक्षीत आहे. गझल वाचून नव्हे तर ऐकून समजावून घेणार्‍यांनी  यापासून दूरच रहावे. त्यांना मला इथे काहीच सांगायचे नाही.

भटांनी नोंदवलेल्या महत्त्वाच्या गोष्टी

1. गझल लिहिण्यासाठी निर्दोष वृत्तात लिहिता येतणे आवश्यक आहे. शक्यतोवर गणवृत्तात लिहावे. अगदी आवश्यक असल्यासच मात्रावृत्तांचा (जातीचा) उपयोग करावा

2. प्रत्येक शेर म्हणजे एक संपूर्ण कविताच असते. गझल उलगडत नसते. कोणताही शेर सुटा वाचला तरी तो संपूर्ण अभिव्यक्ती असलेली कविता वाटणे हे गझलेचे गमक आहे. नुसत्या आकृतिबंधाने गझल ठरत नसते.

3. यमक, अन्त्ययमक आणि वृत्तांचे बंधन पाळूनसुद्धा शेर अगदी सहज व सोपा पण तितकाच गोटीबंद असावा. फालतू शब्दांना जागा नसावी. अनावश्यक शब्दांनी वृत्ताची मात्रापूर्ती करू नये.

4. शेरातील दोन्ही ओळींचा परस्परांशी संबंध असलाच पाहिजे.

आजच्या गझलेबाबतच्या सर्वात आक्षेपार्ह दोन गोष्टी म्हणजे वृत्त आणि यमक. बहुतांश गझल ही वृत्तात लिहीलेली नसते. आणि बहुतांश वेळेला यमक पाळल्या गेलेले नसते. वृत्ताच्या अभ्यासासाठी मराठी व्याकरण हे मो.रा.वाळिंबे यांचे पुस्तक कुणीही संदर्भ म्हणून वापरावे किंवा अजून कुठलेही काव्यशास्त्रावरचे पुस्तक वापरावे.

यमकासाठी भटांनीच नोंदवलेल्या गोष्टी इथे देतो. त्यांचीच एक गझल त्यासाठी पाहूत

चंद्र आता मावळाया लागला
प्राण माझाही ढळाया लागला

काय तो वेडा इथेही बोलला?
हा शहाणाही चळाया लागला

ओठ ओठांना सतावू लागले...
श्वास गालाला छळाया लागला

हालते भिंतीवरी छाया तूझी...
दीप हा कैसा जळाया लागला

हाक दाराने मला जेव्हा दिली
उंबरा मागे वळाया लागला

मी खरे बोलून जेव्हा पाहिले

हा टळाया... तो पळाया लागला


गझलेच्या पहिल्या शेरात तिचा आकृतिबंध स्पष्ट झाल्यानंतर, तिची ‘जमीन’ निश्चित झाल्यावर मग यमक उर्फ काफिया आपल्या वैशिष्ट्यांसह शेवटपर्यंत तोच कायम राहतो. काफियाचे शब्द बदलतात, पण त्याच्या अंमलबजावणीचा कायदा गझलेच्या शेवटापर्यंत तोच कायम राहतो. उदाहरणार्थ- मावळाया, ढळाया, चळाया, छळाया, जळाया, वळाया

या गझलेत अन्त्ययमक रदिफ हे ‘लागला’ म्हणून आलेले आहे. ते शेवटपर्यंत तेच राहते. यमकाच्या ऊर्फ काफियाच्या शेवटच्या न बदलणार्‍या एका अक्षराआधी किंवा एकाहून अधिक अक्षरांआधी येणार्‍या एका विशिष्ट अक्षरात जो न बदलणारा स्वर असतो, त्यालाच स्वरचिन्ह किंवा ‘अलामत’ समजावे. जसे येथे व, ढ, च, ज यामध्ये अ हाच स्वर आहे. म्हणजे अन्त्ययमक रदिफ ‘लागला’ हे तर कायम आहेच, पण काफिया मध्ये ळाया ही दोन अक्षरेही कायम असून त्याआधी येणारा अ हा स्वरही कायम आहे.

आजच्या गझलेले हे सारे नियम लावून पहावेत म्हणजे ती गझल आहे की नाही हे समजून येईल. असे खुप बारकावे भटांनी सांगितले आहेत आणि मुख्य म्हणजे याचे प्रात्यक्षिक म्हणून अतिशय चांगली निर्दोष मराठी तोंडवळ्याची गझल लिहून ठेवली आहे. त्यांच्या नावाने गळे काढणारे, त्यांनी पाठीवरून हात फिरवला म्हणून सांगणारे, त्यांनी पत्र पाठवले, त्यांच्या सोबत कसा जेवलो वगैरे वगैरे ‘ष्टोर्‍या’ सांगणारे दोन शेरही निर्दोषपणे लिहू शकत नाहीत हीच शोकांतिका आहे. भटांच्या वैयक्तिक आठवणी सांगणार्‍यांना सक्त ताकीद आहे की माझ्यापाशी अशा आठवणींचा भरपूर खजिना आहे. आठवणींचे पीठ दळू नये. ही चर्चा साहित्यिक आहे. ती तशीच राहावी. संदर्भ लेखी द्या म्हणजे दाखल घेता येते.

(वर दिलेली भटांची गझल उत्कृष्ठ कविता आहे म्हणून दिलेली नसून गझलेचे व्याकरण समजून घेण्यासाठी सोपी आहे म्हणून वापरली आहे. संदर्भ- एल्गार- सुरेश भट, आ.दुसरी 30 मार्च 1987, सुपर्ण प्रकाशन, पुणे) 



बरोबर १ वर्षापूर्वी मी हा लेख लिहिला होता आणि बरेच गझल लिहिणारे भडकले होते. नवीन गझल लिहिणाऱ्याच्या १०० गझला निवडून द्या मी त्याची चिकित्सा करायला तयार आहे असे आवाहन मी केले होते. पण उथळ गझल लिहिणारे भटानंतरचे कोणी तयार झाले नाही. आता साहित्य अकादमी ह्या मान्यवर प्रकाशन संस्थेने "मराठी गझल-अर्धशतकाचा प्रवास" हे पुस्तक प्रकाशित केले आहे. राम पंडित ह्या गझलेच्या अभ्यासकाने ह्याचे संपादन केले आहे. राम पंडित यांचाच निष्कर्ष मी तुमच्या समोर ठेवतो "..... पण प्रतिभेच्या दृष्टीने अध्याप तरी मराठी गझलने भटांच्या गझलेला मागे सारले असे म्हणवत नाही. अनुभावाधिष्टीत शेर कमी व उधार आणलेले दु:ख वेदनांचा  भडीमार अनेक गझलात आढळतो यामुळे गझलेची कलात्मक गुणवत्ता बऱ्याचदा संशयास्पद ठरते." एकूण ४१ जणांच्या गझला राम पंडित या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत.  त्यांची नवे अशी १. मंगेश पाडगावकर, २. सुरेश भट ३. वा.न. सरदेसाई ४. खावर ५. घनश्याम धेंडे ६. संगीता जोशी ७. ललिता बांठीया ८. मनोहर रणपिसे ९. सदानंद डबीर १०. इलाही जमादार ११. ए के शेख १२. अप्पा ठाकूर १३. रमण रणदिवे १४. बबन सराडकर१५. शोभा तेलंग १६. दीपक करंदीकर १७. श्रीकृष्ण राउत १८. शिवाजी जवरे १९. प्रशांत वैद्य २०. मधुसूदन नानिवडेकर २१. अरुण सांगोळे २२. क्रांती साडेकर २३. दिलीप पांढरपट्टे २४. संतोष कुलकर्णी २५. सिद्धार्थ भगत २६. प्रतिभा सराफ २७. गौरवकुमार आठवले २८. अनंत नांदुरकर २९. वैभव जोशी ३०. चित्तरंजन भट ३१. प्रमोद खराडे ३२. नितीन भट ३३, समीर चव्हाण ३४. रुपेश देशमुख ३५. अनंत ढवळे ३६. विजय आव्हाड ३७. वैभव देशमुख ३८. जनार्दन केशव म्हात्रे ३९. सतीश दराडे ४०. ज्ञानेश पाटील ४१. अमित वाघ
संगीतकार विश्वनाथ ओक यांनी व्यक्त केलेले मत.

"भटां नंतरची मराठी गझल: शाब्दिक बुजगावणे" हा आपला लेख वाचला. मी बव्हंशी सहमत आहे. मी संगीतकार असल्याने आणि कवितेची आवड असल्याने काव्याचे अनेक प्रकार रसिकतेने वाचत असतो. त्यातच गझल सुद्धा असतेच. गझल आणि त्यातही मराठी गझल यांना मी कमी दर्जाच्या मानतो असे नाही . पण मराठी गझलांचे पीक उदंड झाल्यासारखे दिसते. सकस असते तरी चालले असते. पण त्यातल्या अनेक रचना एकसुरी वाटतात. त्यातून प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता. त्यामुळे अनेक शेर असलेल्या एका गझलेतून नेमका व एकसंध असा भाव हाती लागतच नाही. अजून एक धुमाकूळ - - - - - गझल गायन हा "संगीताचा" एक प्रकार असे का मानतात हे कळतच नाही. स्वरबद्ध करून गायिली गेली की ती एक गीतच बनते- त्यातून अनेकांकडून तिच्या गायकीमध्ये केली गेलेली गुलाम अली किंवा मेहदी हसन किंवा जगजित सिंग यांची भ्रष्ट नक्कल. या तिघांनी केलेले प्रयोग व्यावसायिक स्तरावर यशस्वी झाल्यानेच त्याची लागण या गझल गायन प्रकाराला झाली. असो. हे माझे वैयक्तिक मत आहे. त्याचे खंडन मंडन होऊ शकते.