Tuesday, April 15, 2014

बाबासाहेब आणि ज्ञानेश्वर-तुकाराम


                                     गवसे ना ओंजळीत | उरे व्यापून आभाळ |
                                     त्याची  खुण म्हणूनिया | घेतो माखून कपाळ ||

                                            
                                      दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 15 एप्रिल 2014


बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हा एक फार मोठा सण म्हणून साजरी केली जाते. मोठ्या मिरवणुका काढल्या जातात आणि या निमित्ताने सर्व वातावरण निळं होऊन जातं. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, ‘‘आज जयभीम वाल्यांचा सण आहे’’ असं म्हणून इतर समाज अंग झटकून बाजूला होतो. बाबासाहेबांच्या महानिर्वाणालाही आता 60 वर्षे होत आहेत. तरीही आपण दलितांना आणि त्यातही परत बुद्ध धर्म स्वीकारलेल्या पूर्वाश्रमीच्या महारांना वेगळं समजतो. कालपर्यंत त्यांच्यावर सामाजिक बहिष्कारच होता. आज तो उघड नाही पण छुप्या पद्धतीने मात्र चालूच आहे.
स्वत: आंबेडकरांना भारतीय उपखंडांतील चालिरीती, धर्म संकल्पना, संस्कृती या बद्दल संपूर्ण आणि सम्यक भान होते. त्यांनी पहिले वृत्तपत्र पाक्षिक ‘मुकनायक’ 31 जानेवारी 1920 ला सुरू केले. या पाक्षिकाच्या पहिल्याच अंकात बोधवाक्य म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग वापरला आहे.

काय करू आता धरूनिया भीड ।
नि:शंक हे तोंड वाजविले ॥
नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण । 

सार्थक  लाजून नव्हे हीत ॥
दलितांमध्ये साक्षरांची संख्या हजारात 9 इतकी मामुली असतानाही बाबासाहेबांनी पाक्षिकाचा उपद्व्याप केला. त्यामागे त्यांची दूर दृष्टी दिसून येते. साक्षर सवर्णांचा मोठा वर्ग त्यांच्या समोर असावा हे तर उघडचे आहे. तुकाराम महाराजांचा अभंग वापरायचे कारण त्यांना वारकरी संप्रदाय आणि त्याचा प्रभाव याची पूर्ण जाणीव होती. जनसामान्यांच्या प्रबोधनाचे काम करावयाचे तर त्यासाठी त्यांना समजेल अशीच भाषा वापरली पाहिजे. त्या काळात आणि खरं तर आजही तळागाळात वारकरी संप्रदायाने एक अध्यात्मिक सामाजिक परिभाषा रूजवली.आपल्या मुक राहिलेल्या सामाजाच्या दु:खाला वाचा फोडण्यासाठी आपण नायक बनलोच पाहिजे इतकेच नाही तर प्रत्येक सामान्य मुक जन हा ‘मुकनायक’ बनला पाहिजे हे त्यांना अभिप्रेत होते. आणि त्यासाठी त्यांनी तुकाराम महाराजांचा अभंग वापरला.
अभंगाच्या पुढच्या ओळी ज्या त्यांनी प्रत्यक्ष वापरल्या नाहीत पण त्यातूनही बाबासाहेबांचा दृष्टीकोन काय आहे हे स्पष्ट जाणवते

आले ते उत्तर बोलो स्वामीसवे । 
धीट नीट जीवे होऊनिया ॥
तुका म्हणजे जीवा समर्थांशी गाठी ।
घालावी हे मांडी थापटूनी ॥ 3211॥
(श्रीसार्थ तुकारामाची गाथा, संपादक विष्णुबुवा जोग, ढवळे प्रकाशन आठरावी आवृत्ती, पृ. 667)
वारकरी संप्रदायावर कुणी कितीही टिका केली तरी एक गोष्ट सर्वांनाच मान्य करावी लागते की त्यांनी एका धाग्यात अवघ्या लोकांना बांधून ठेवले. विठ्ठल हे दैवत, महिन्यातील दोन दिवस (एकादशीला) उपवास करणे, मांसाहार न करणे, धुत वस्त्र परिधान करणे, प्रत्येकाच्या ठायी देव आहे हे उमजून एकमेकांच्या पाया पडणे, वर्षातून एक वेळ पंढरीची वारी करणे इतक्या साध्या बाबींवर संप्रदायाचा संपूर्ण डोलारा उभा केला. बाबासाहेबांना ही गोष्ट तीव्रतेने लक्षात आली असणार. आणि म्हणूनच त्यांना आपल्या समाजाच्या दु:खाला वाचा फोडण्यासाठी तुकारामांच्या ओळी समर्पक पद्धतीने वापराव्या वाटल्या.
बाबासाहेब पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेले आणि हे पाक्षिक बंद पडले. पुढे सात वर्षांनी त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ हे पाक्षिक सुरू केले (पहिला अंक दि. 3 एप्रिल 1927) दुसरे पाक्षिक चालू करताना तर बाबासाहेबांनी संत वाङ्मयाचा अभ्यास केल्याचे खैरमोडे यांनी लिहूनच ठेवले आहे. ‘‘ वर्तमानपत्र काढण्याचे मुक्रर केल्यानंतर साहेबांनी मराठी भाषेचा व हिंदुस्थानातील सामाजिक सुधारणेच्या चळवळीचा अभ्यास करण्याचे ठरविले. मुकुंदराय, मुक्तेश्वर, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास इत्यादी संतांचे वाङ्मय विकत घेवून त्याचा अभ्यास पाच-सात महिन्यांत केला.’’ (डॉ.आंबेडकरांचे अंतरंग, द.न.गोखले, मौज प्रकाशन, 1ली आवृत्ती, पृ.87). आपल्या समाजाच्या दुबळ्यांचा मुक आक्रोश मांडण्यासाठी मी आवाज उठवणार आहे असे म्हणणारे बाबासाहेब आता मात्र नुसता आवाज उठवून शांत बसण्यास तयार नाहीत. प्रत्यक्ष कृती करण्याची गरज मांडताना ते  ज्ञानेश्वरतील कृष्णाने अर्जूनाला केलेल्या उपदेशाचा आधार बाबासाहेब घेतात.

आता कोदंड घेऊनि हाती । आरूढ पां इये रथी ।
देई अलिंगन वीरवृत्ती । समाधाने ॥
जगी कीर्ति रूढवी । स्वधर्माचा मानु वाढवी ।
इया भारापासोनि सोडवी । मेदिनी हे ॥
आतां पार्था नि:शंकु होई । या संग्रामा चित्त देई ।
एथ हे वांचूनि कांही । बोलो नये ॥
(ज्ञानेश्वरी अध्याय 3, ओवी क्र. 189, पारायण प्रत, पृ.70, प्रकाशक-ज्ञानेश्वर मंदिर संस्थान, आळंदी)

कुठलीही शंका मनात न ठेवता तू शस्त्र हाती घे आणि ही पृथ्वी वाचव हा संदेश कृष्णाचा अर्जूनाला जसा आहे तसाच बाबासाहेबांचा त्यांच्या अनुयायांना आहे. कुठलीही शंका मनात न घेता आता शस्त्र हाती घ्या आणि लढा. पण आधुनिक काळातील युद्ध हे शस्त्राने लढण्याचे नसून शिक्षणाने लढावयाचे आहे. त्यामुळे वृत्तपत्राचे शस्त्र त्यांनी हाती घेतले.
भारतीय तत्त्वज्ञानात शेवटचे दर्शनकार म्हणजे महात्मा गौतम बुद्ध. नंतरच्या लोकांनी या दर्शनांचा अन्वयार्थ लावणे, त्याची मिमांसा करणे हे काम केले पण पूर्णपणे नविन दर्शन मांडले नाही.  या दर्शनकारांची जी विचार मांडणी करण्याची पद्धत आहे त्यात मागचे सगळे खोडून माझेच सगळे खरे असं म्हणण्याची पद्धत नाही. मागचे काय मी स्वीकारत आहे आणि काय नाकारत हे सकारण आणि सविस्तर नोंदवून ठेवण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे नविन काही मांडणी करताना जूने काय आहे ते सांगावे लागते. बाबासाहेबांना जी नविन मांडणी करायची होती त्यासाठी जून्यातील जे काय आहे त्याचा आधार घेतला पाहिजे याचीही त्यांना जाणिव होती. स्वाभाविकच वारकरी संप्रदायातील काही बाबी आपण विचारात घेतल्या पाहिजे. हे समजून त्यांनी ज्ञानेश्वर तुकारामांच्या ओळी वापरल्या.
आधुनिक म्हणवून घेताना बुद्ध धर्म स्वीकारलेल्या दलितांनी सरसकट सगळ्या जून्या परंपरा मुल्य नाकारायची आणि  इतरांनी दलितांना  नाकारायचे  असला बाष्कळपणा बाबासाहेबांसारख्या विद्वानाला कधीच मंजूर झाला नसता. त्यामुळे त्यांनी बंड करतानाही भारतीय परंपरेतीलच धर्म स्वीकारला. कारण त्यांना आपल्या संस्कृतिची पूर्ण जाण होती.
ज्ञानेश्वरांचा आणि त्यातही परत इतर अभंग किंवा रचना न घेता ज्ञानेश्वरीतीलच ओळ वापरण्यात दुसराही एक अर्थ त्यांना अभिप्रेत असावा. महाभारतावर संशोधन करताना रविंद्र गोडबोले यांनी हे निदर्शनास आणून दिले आहे की यात एकही माणूस ‘धर्म’ संकल्पनेवर बोलत असताना ब्राह्मणांचा संदर्भ देत नाही. किंवा ब्राह्मणांच्या तोंडी धर्मवचने येत नाहीत. याचाच अर्थ त्यावेळच्या रूढी, परंपरा, धर्म, तत्त्वज्ञान यावर ब्राह्मणेतर समाजाचे वर्चस्व असले पाहिजे. हीच बाब अप्रत्यक्षपणे ज्ञानेश्वर आणि नंतर तो संदर्भ वापरणारे बाबासाहेब यांनाही अधोरेखित करावयाची असावी.
हे आपण समजून घेत नाही कारण हे सगळे गैरसोयीचे आहे. आजच्या कळपवादी, जमातवादी, जातवादी राजकारणाला हे परवडणारे नाही. बाबासाहेबांच्या 123 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आपण जरा डोळसपणे विचार करायला लागलो तरी खुप आहे.

 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

6 comments:

  1. सुरवात खुल सुंदर आणि वास्तवदर्शी केलीत सर... आज सुद्धा हि मानसिकता बदलली नाही समाजातील...

    ReplyDelete
  2. अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी परंतु शेवटच्या पर्वात बाबासाहेब काय म्हणतात तेही फार महत्त्वाचे आहे. बाबासाहेब म्हणतात संतांनी दगडातला देव माणसात आणला तरी हे फक्त धुळ झटकल्याप्रमाणे झाले धर्मातील अन् समाजातील अस्वच्छता (अन्याय, अत्याचार, अनिष्ट प्रथा परंपरा) स्वच्छ करू शकले नाहीत.

    ReplyDelete
  3. सुरेख मांडणी

    ReplyDelete