Wednesday, December 26, 2018

शरद जोशींचा विचार वारसा चालविणार्‍या निष्ठावंतांची मांदियाळी !




सा.विवेक, डिसेंबर 2018

12 डिसेंबर 2015 ला शेतकरी नेते युगात्मा शरद जोशी यांचे निधन झाले. बर्‍याच अभ्यासकांना असं वाटत होतं की आता शेतकरी संघटना शिल्लक राहणार नाही. शेतकरी संघटनेकडे कुणी वलय असलेला नेता नाही. सत्तेची कुठली पदं नाहीत भविष्यातलेही सत्ता-संपत्तीचे आकर्षण नाही. सध्याच्या काळात गाडी करून पैसे देवून माणसं बोलवावे लागतात. शेतकरी संघटनेकडे पैसेही नाहीत. मग शरद जोशींच्या माघारी शेतकरी संघटनेने अधिवेशन भरवले तर कोण येणार? 

शेतकरी संघटनेतून सत्तेच्या मोहात फुटून बाहेर गेलेल्यांनी सगळे प्रयत्न करून पाहिले. पण त्यांना शरद जोशींची जागा घेता आली नाही. सर्वसामान्य शेतकर्‍यांचा पाठिंबाही मिळवता आला नाही. आपआपल्या गावात मतदारसंघात छोटी मोठी पदे मिळवत ही मंडळी मिरवत राहिली. पण व्यापक अर्थाने शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर रान उठविणे यांना जमले नाही. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे शेतकरी संघटनेचे 14 वे संयुक्त अधिवेशन उत्साहात पार पडले. पदरमोड करून आलेली शेतकर्‍यांची प्रचंड गर्दी पाहून भल्या भल्या राजकीय सामाजिक अभ्यासकांना अचंबित केले. 

महाराष्ट्राच्या काना कोपर्‍यातून स्वखर्चाने सामान्य शेतकरी, बाया बापड्या, तरूण झुंडीच्या झुंडीने अधिवेशन स्थळी येत आहेत. थंडीचा कडाका वाढलेला असतानाही लोकांमध्ये उत्साह आहे. भावनिक भाषणं, धार्मिक अस्मितेला गोंजारणारी मांडणी, समाजवादी भीकमाग्या योजनांची भलावण असे काही काही नाही. केवळ आणि केवळ विशुद्ध आर्थिक पायावर आधारलेली मांडणी जिथे चालू आहे अशा मंडपात दोन दिवस प्रतिनिधी अधिवेशनात लोक बसून राहतात हे दृश्य मोठं चकित करणारं आहे. 

नुकतंच नोव्हेंबर महिन्यात दिल्लीला समाजवादी डाव्यांच्या प्रभावाखालील दोनशे शेतकरी संघटनांनी मिळून किसान मार्च काढला. त्यात परत स्वामिनाथन आयोगासारख्या आर्थिकदृष्ट्या अतर्क्य मागण्या पुढे रेटण्यात आल्या. सरकारी हस्तक्षेपाचे समर्थन करण्यात आले. आम्ही गरीब आहोत. आम्ही भीकेला लागलो आहेात. आता आमचे तूम्हीच तारणहार म्हणून सरकारच्या गळ्यात पडण्याचा समाजवादी कार्यक्रमच पुढे रेटण्यात आला. बाजार कोसळलेला आहे तेंव्हा आमच्या मालाची खरेदी आता सरकारनेच करावी आणि आम्हाला किमान अमुक अमुक किंमत तरी द्यावी असा रडका सुर दिल्लीच्या किसान मार्च मध्ये डाव्यांनी मांडला होता. 

याच्या अगदी विरूद्ध शेतकरी संघटनेच्या 14 व्या अधिवेशनात मागणी करण्यात आली. ‘सरकार समस्या क्या सुलझाये सरकार खुद समस्या है’ या अगदी सुरवातीपासूनच्या घोषणेचा पुनरूच्चार करण्यात आला. 
पहिले दोन दिवस शास्त्रशुद्ध पद्धतीनं शेतकर्‍यांशी संबंधीत विविध विषयावर मांडणी करण्यात आली. सगळे वक्ते केवळ भाषणबाजी न करता विषयाचे गांभिर्य ठेवून बोलत होते. आणि ते सगळं समोरचा पाच ते दहा हजाराचा शेतकरी जमाव शांतपणे ऐकत होता. प्रसंगी काही आपल्या जवळच्या कागदांवर टिपणं करून घेत होती. एखाद्या विद्यापीठाच्या परिसंवादातही आढळणार नाही असं हे दृश्य.  

शेतीविरोधी कायदे तातडीने खारीज करून शेतकर्‍यांच्या भोवतीचा फास सोडवावा अशी मागणी ठरावाद्वारे या अधिवेशनात करण्यात आली. कुठल्याच समाजवादी डाव्या चळवळीने शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर आंदोलन करताना शेतीविरोधी कायद्याच्या मुळ समस्येला हातही लावलेला नाही.

शेतीला चोविसतास वीज पुरवठा करण्यात यावा. शिवाय ही वीज मोजून दिली जावी. आम्ही तिचे पैसे भरण्यास तयार आहोत. फुकटची वीज देण्याच्या नावाखाली सरकार शेतकर्‍यांना लुटते आहे. इतर क्षेत्राततील चोरी आणि वीज गळती शेतकर्‍यांच्या माथी मारून आपला हलगर्जीपणा लपवत आहे. अशी मांडणी जी शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात करण्यात आली ती कधीच कुठल्याच इतर शेतकरी आंदोलनांत करण्यात आलेली नाही. आम्हाला फुकट काहीच नको ही स्वाभिमाानी फक्त आणि फक्त शरद जोशींचा वारसा सांगणारी शेतकरी संघटनाच करते आहे. केवळ नावातच स्वाभिमान असणारे आजही सरकार कडे लाचारीने हात पसरण्याचे काम करत आहेत. सत्तेसाठी याचा त्याचा पदर पकडत फिरत आहेत. 

साखरेच्या प्रश्‍नावर गेली 25 वर्षे सतत एक भूमिका शेतकरी संघटनेने मांडली होती. ती म्हणजे साखर उद्योग नियंत्रणमुक्त करा. अशी स्वाभिमानी मांडणी आजही कुणी करायला तयार नाही. आता तर साखरेची अशी परिस्थिती आहे की कारखाने कबुल केलेले पैसेही देवू शकत नाहीत. सहकारी साखर कारखानदारीचे अवास्तव कौतुक करणारे आता तोंडाला कुलूप लावून चुप्प बसले आहेत. या स्थितीत शिर्डीला जमलेले शरद जोशींच्या विचारांचा वारसा पुढे चालविणारे अग्रहाने सांगत आहेत की साखर उद्योग मोकळा करा. उसापासून आम्ही इथेनॉल काढू, गुळ करू, वीज तयार करून किंवा परत चांगला भाव आला तर साखर काढू. पण तुमची बंधंने आम्हाला नको. 

शेतीला उद्योगाचे स्थान द्यावे ही मागणी या अधिवेशनात करण्यात आली. दिल्लीला निघालेला भीकमागा ‘किसान मार्च’ अशा मागण्यांचा विचारही करायला तयार नाही. इतर भारतीय नागरिकांप्रमाणे सन्मानाने आणि सुखाने जगण्याची शपथ शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात, अधिवेशनात, कार्यक्रमांत सर्व शेतकरी भावा बहिणींना दिली जाते. त्या अनुषंगाने इतर नौकरी व्यवसाय उद्योग यांना मिळणारे स्वातंत्र्य शेतीलाही द्या अशी शास्त्रशुद्ध मागणी शेतकरी संघटना सतत करत आली आहे. सध्याच्या शेतीच्या प्रचंड संकटाच्या काळातही आम्हाला स्वातंत्र्य द्या ही मागणी धाडसाची आहे. पण हे धाडस सामान्य कष्टकरी शेतकरी मोठ्या हिंमतीने करतो आहे. आणि दुसरीकडे ‘तू दुबळा आहेस, तु गरीब आहेस, तुला फुकट देतो, सुट सबसिडी देतो’ अशा मागण्यात अजूनही इतर शेतकर्‍यांच्या संघटना अडकल्या आहेत. 

युवकांच्या प्रश्‍नांवर मांडणी करताना या अधिवेशनात वक्त्यांनी शेतीवर आधारीत ग्रामीण उद्योगांना चालना देण्याची आग्रही मागणी केली. गावोगावचे आठवडी बाजार सक्षम करण्याची मागणी केली. शेतमालावर छोट्या मोठ्या प्रक्रिया करण्याच्या मार्गातील सरकारी परवाने, किचकट नियम, कायदे, अडथळे त्वरीत दूर करून हे क्षेत्र खुले करण्याची मागणी करण्यात आली. म्हणजे एकीकडे शेतकरी जमातींच्या युवकांना आरक्षणाच्या मुद्द्यावरून भरकटवले जात असताना शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात शेती करणारे युवक आमच्या पायातील बेड्या काढा, आम्हाला स्वतंत्र शेती उद्योग करू द्या असे म्हणत आहेत हे दुश्य कौतुकास्पद होते. 

महिलांच्या सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर नेहमीच अशी मागणी करण्यात आली की ज्या पुरूषांच्या जागा आहेत यावर स्त्रीला हक्क मिळाला पाहिजे. पण व्यवस्थाच बदला अशी मागणी जगभरच्या स्त्रीवादी चळवळीनं कधी केली नाही. ज्या  प्रमाणे गोरा इंग्रज गेला आणि काळा इंग्रज आला. व्यवस्था तीच राहिली. तसेच पुरूष जावून तिथे स्त्रीला बसू द्या. बाकी काहीच बदलणार नाही. अश्या मागण्या जगभरच्या स्त्रीवादी चळवळी डाव्यांच्या प्रभावाखाली करत राहिल्या. केवळ आणि केवळ शेतकरी संघटनेची महिला आघाडीच अशी आहे की तिने ही मांडणी नाकारली आणि स्त्री शक्तीच्या जागरणात स्त्री-पुरूष मुक्ती अशी आगळी वेगळी घोषणा देत स्त्रीयांच्या प्रश्‍नांची वेगळी स्वाभिमानी स्वतंत्रतावादी मांडणी केली. शिर्डीच्या अधिवेशनात साध्या लुगड्यातल्या अक्षिशीत राधाबाई कांबळे सारख्या बाईनंही चतुरंग शेतीचे तत्त्वज्ञान आपल्या पोवाड्यातून गाऊन उपस्थितांना चकित केलं.

शेतकरी संघटनेच्या या अधिवेशनात तरूण नेतृत्वाला समोर येताना पाहून एक आश्वासक दिलासा या क्षेत्रातील लोकांना मिळाला. शरद जोशींच्या अंगारमळ्यात (अंबेठाण येथील शरद जोशींचे निवास्थान) लहानाचे मोठे झालेला अभिजीत शेलार किंवा सीमाताई नरोडे हे आता नेतृत्व करायला पुढे आलेले दिसत आहेत. सध्याचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी गेली एक वर्षे उभा महाराष्ट्र पिंजून काढत होते. त्यांच्या जोडीला युवा आघाडीचे सतीष दाणीं महिला आघाडीच्या गीता खांदेभराड हे मेहनत घेताना दिसत होते. महाराष्ट्रभरातून नविन पिढी उत्साहात शेतीच्या प्रश्‍नाची शरद जोशींनी केलेली अर्थवादी मांडणी सध्याच्या काळात करताना पाहून अभ्यासकांना आश्चर्य वाटत आहे. 

शेतीचा प्रश्‍न कुठलीही दया माया करूणा या मार्गाने सुटणार नाही. त्यासाठी स्वतंत्रतावादी दृष्टी ठेवून शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे.  शेतीच्या विकासाच्या मार्गातील सरकारी नियमांचे कायद्याचे अडथळे दूर केले पाहिजे. अशी वेगळी आश्वासक आणि स्वाभिमानी मांडणी अधिवेशनातून समोर आली. 

संघटनेचे सर्वात ज्येष्ठ नेते माजी अध्यक्ष रामचंद्र बापु पाटील यांनी ध्वजारोहण करून आणि पंजाब किसान युनियनचे नेते माजी खासदार भुपेंद्रसिंग मान यांनी शरद जोशींच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून केले. 

शेतकरी संघटना न्यासाचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी, माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार सरोजताई काशीकर, ऊस प्रश्‍नाचे अभ्यासक अजीत नरदे, डॉ. श्याम अष्टेकर, संपूर्ण परिसंवादाची वैचारिक शिस्त घालून देणारे डॉ. मानवेंद्र काचोळे, शेती विरोधी कायद्याची क्लिष्ट भाषा समजून सांगणारे ऍड. अनंत उमरीकर असे ज्येष्ठ आणि े विदर्भातील सचिन डाफे, पश्चिम महाराष्ट्रातील शीतल राजोबा, नवनाथ पोळ, उत्तर महाराष्ट्रातील ईश्वर लिधुरे, तंत्रज्ञान आघाडी सांभाळणारे गंगाधर मुटे, रामेश्वर अवचार, खुल्या अधिवेशनाचे सुत्र संचालन करणारा मराठवाड्यातील सुधीर बिंदू अशी तरूणाई असे चित्र अधिवेशनात ठळकपणे जाणवत होते. 

महाराष्ट्राबाहेरच्या गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश मधून आलेले शेतकरी नेते आणि त्यांच्या सोबतचे सामान्य शेतकरी यांची उपस्थिती मोठी आश्वासक होती.
 
शरद जोशींची शेतकरी संघटना संपली म्हणणार्‍यांना प्रचंड उपस्थिती आणि वैचारिक शुद्ध स्पष्ट मांडणी या दोन्ही अंगाने या अधिवेशनाने सणसणीत उत्तर दिले आहे. 

                          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment