Sunday, March 1, 2015

दिवाळी अंकांबद्दलची संपलेली असोशी



'अंतर्नाद' मार्च २०१५ मध्ये प्रसिद्ध झालेला लेख 


दिवाळी अंकांबद्दल काही लिहायचे म्हटलं तर लवकर लिहूनच होईना. एरव्ही लिखाणाचा उत्साह असलेला मी. पण या विषयात मात्र असा का वागतो आहे?  

बरोब्बर 20 वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. 1995 मध्ये जानेवारी महिन्यातच परभणीला अखिल भारतीय साहित्य संमेलन भरले होते. संमेलन अध्यक्षांच्या अधिकारात असलेला साहित्य पुरस्कार नारायण सुर्वे यांनी प्रकाश नारायण संत यांना जाहिर केला होता. त्यामुळे प्रकाश संत संमेलनाला हजर होते. आम्ही तरूण मित्र मोठ्या उत्सुकतेने त्यांच्याभोवती कोंडाळे करून होतो. त्याचे साधे कारण म्हणजे त्यांच्या कथा दिवाळी अंकातून वाचायला मिळाल्या होत्या. पण त्यांचे पुस्तक आलेले नव्हते. पुढची दोन तीन वर्षे प्रकाश संतांच्या कथांसाठी म्हणून दिवाळी अंक आवर्जून विकत घेतलेले मला आठवतात. हीच बाब अनिल अवचट यांच्या लेखांबाबत. सदा डूंबरे साप्ताहिक सकाळ मध्ये दरवर्षी एक मोठा लेख अवचटांकडून लिहून घ्यायचे. अक्षरच्या दिवाळी अंकात एखादी वेगळी कादंबरी (ऍडम-रत्नाकर मतकरी, तृष्णा-सुमेध वडावाला रिसबूड) वाचायला मिळायची. एरवी कुठे फारसे न वाचायला मिळणारं विनय हर्डीकर यांचे लेखन कालनिर्णयच्या दिवाळी अंकात साळगांवकर  छपायचे. ‘सुमारांची सद्दी’ हा हर्डीकरांचा गाजलेला लेख असाच दिवाळी अंकातून भेटला होता. अगदी अलिकडच्या काळात आसाराम लोमटे याची कथा ज्या दिवाळी अंकात आहे तो अंक आवर्जून घेतलेला आठवते. शब्दच्या दिवाळी अंकात ‘नसिरूद्दीन शहा आणि ओम पुरी’ यांची तुलना करणारा श्रीकांत बोजेवार यांचा सुंदर लेख अजूनही आठवतो. एरव्ही वाचायला न मिळणारे बब्रूवान रूद्रकंठवार याचे उपहास उपरोध अंगानं जाणारं लिखाण  पद्मगंधा, लोकसत्ता, मटाच्या दिवाळी अंकातूनच उराउरी भेटल्याचे कित्येक वाचकांनी मोठ्या मोठ्या लेखकांनी लेखकाला कळवलेले मला माहित आहे.  फार वर्षांनी मौजेच्या दिवाळी अंकात अनुराधा पाटील यांची ‘ती पान लावते’ ही कविता वाचायला मिळाली आणि त्या वर्षी दिवाळी जास्तच उजळली असं मलाच वाटलं. दिवाळी अंकांमध्ये आत्ताआत्तापर्यंत काही एक मजकूर संपादक अशा पद्धतीनं द्यायचे की त्या प्रभावात दिवाळीच्या मागचे पुढचे काही दिवस भारून जायचे.

मग आता नेमकी काय परिस्थिती आहे? आताचे दिवाळी अंक निराशा करतात. आवर्जून ते घ्यावेत आणि वाचावं अशी असोशीच राहिली नाही. अंक न घेता असं बोलणं ही पळवाट असू शकते. पण मी तसं केलं नाही. तब्बल 15 दिवाळी अंक खरेदी केले. अजून 15 खरेदी करून नातेवाईक मित्रांना सप्रेम भेट दिले. 

ज्या दिवाळी अंकाची नेहमीच चर्चा होते तो मौजेचा दिवाळी अंक या वर्षी बरेचसे समाधान देतो. त्यातही परत गंमत अशी की जे ज्येष्ठ म्हणून नावाजलेले लेखक आहेत (मधु मंगेश कर्णिक, विजया राजाध्यक्ष) निराश करतात. तर स्टीफन परेरा सारखे तुलनेने नविन लोक आपल्या प्रतिभेने लक्ष खेचून घेतात. समीर कुलकर्णी यांची याच अंकातील कथा मिलिंद बोकील यांच्या प्रभावातली वाटते. अनाथ असलेल्याने आपल्या मुळांचा शोध घेत जाणे हा विषय यापूर्वीही मौजेच्या दिवाळी अंकातूनच आलेला आहे. आशा बगेंच्या दोन लघुकथा या अंकांत आहेत. बगेंच्या कथा आणि दिवाळी असं काहीसं समिकरणच माझ्या मनात तयार झालंय. त्यांची पुस्तकं नंतर वाचनात आली. वि.ज.बोरकरांचा ‘मित्र’ नावाचा एक सुंदर लेख या अंकात आहे. लेखक म्हणून परिचित असलेले बोरकर मित्रांच्या बाबतीत ‘मला मित्र नाही’ म्हणत कसे मित्रात गुंतत जातात आणि तोही परत आरती प्रभूंसारखा कवी मित्र असेल तर विचारायलाच नको. अशा काही मित्रांबाबत बोरकरांनी फार छान लिहीलं आहे. 

मौजेच्या दिवाळी अंकात नरेंद्र चपळगांवकरांचा एक लेख हमखास असतो. किंबहूना असा एखादा लेख चपळगांवकर केवळ मौजेसाठीच राखून ठेवत असावेत. त्यांनी हैदराबाद संस्थानातील माणसांबाबत लिहीलेले बरेच लेख मौजेच्या दिवाळी अंकातून आलेले आहेत. यावेळी त्यांनी नामदार गोखलेंवर लिहीले आहे. पण हैदराबाद संस्थानातील व्यक्तींवर लिहीताना जे लालित्याचे पाझर त्यांच्या लिखाणाला फुटतात ते इतर विषयांवर लिहीताना फुटत नाही. परिणामी हे लिखाण काहीसं कोरडं वाटत रहातं. राम पटवर्धनांवर विकास परांजपेंनी लिहीलेला लेख फार आत्मिय झालेला आहे. परांजपे प्रकाशक म्हणून सर्वांना परिचीत आहेत. पण लेखक म्हणून त्यांचा मला तरी परिचय पहिल्यांदाच होतो आहे. खरं तर विजय कुवळेकर, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे व्यक्तीपर लेखही याच अंकात आहेत. ते नावाजलेले लेखक आहेत आणि त्यांनी ज्यांच्यावर लिहीले तेही (विश्राम बेडेकर, शांताबाई शेळके) नावाजलेले आहेत. पण फार सराईतपणा लेखनाला आडवा येतो की काय असे वाटते आहे.

अक्षरच्या दिवाळी अंकात बालाजी सुतार याचा सेल्फी या विभागातील लेख आणि राजकुमार तांगडे यांची कथा या  काहीतरी वेगळं सांगू पहात आहेत. मिलींद बोकील यांची कथाही याच अंकात आहे. पारध्यांच्या मुलांसाठी असलेल्या वस्तीगृहातील मुलगा बंधनं न आवडून पळतो. वस्तीकडे येतो तर तिथे वस्तीच जागेवर नसते. आणि त्याचा शोध घेत त्याचे गुरूजी त्याच्या मागोमाग येवून त्याला गाठतात. परत त्याला चल म्हणून घेवून जातात. बोकील एकट्या माणसांचा वेध आपल्या कथा कादंबर्‍यांतून घेताना मनोविश्लेषणाच्या पातळीवर एकसारखीच वर्णनं करत राहतात. (महेश्वर सारखी कथा, गवत्या सारखी कादंबरी किंवा चित्तासारखी कथा.)
‘मिळून सार्‍याजणी’च्या दिवाळी अंकात बळीराजाचे चांगभलं नावावं विशेष विभाग आसाराम लोमटे यांनी संपादित केला आहे. प्रतिमा इंगोले यांनी शेतकरी स्त्रीच्या आत्महत्येवर लिहून शेतकरी स्त्री आत्महत्या करत नाही हा बाष्कळ समज खोडून काढला आहे हे बरेच झाले. ‘चांदवडची शिदोरी’ नावानं शरद जोशी यांनी शेतीच्या अंगाने स्त्रीप्रश्नाची मांडणी सविस्तरपणे केली आहे. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्या सरोज काशीकर यांनी आपल्या लेखात हा आढावा घेतला आहे. या विभागाचे संपादन करताना ‘जागतिकीकरण म्हणजे पर्वणीच असे मत एका बाजूला तर जागतिकीकरणानेच शेतकरी देशोधडीला लावला असे मत दुसर्‍या टोकाला’ असे वाक्य लोमटेंनी वापरले आहे. वस्तूत: जागतिकीकरण म्हणजे पर्वणी असे कोणी म्हटले हे त्यांनी स्पष्ट केले नाही. पूर्वीच्या व्यवस्थेनं अन्याय केला तेंव्हा ती नाकारण्याकडे कल असणे स्वाभाविक आहे. नविन व्यवस्था अजून पुरती शेतीला लागू झालीच नाही हा अरोपच मुळी खुल्या व्यवस्थेचे समर्थक अशा शेतकरी संघटनेने केला आहे. दुसरी एक बाब या विभागात लोमटे समाविष्ट करू शकले असते. भारतात आठवडी बाजार नावाची संकल्पना फार पूर्वीपासून रूळली आहे. या व्यवस्थेत ग्रामीण स्त्रीयांचा सहभाग फार मोठ्या प्रामाणात आहे. हे सगळे बाजार ग्रामीण भागातच प्रामुख्याने भरतात. या ठिकाणी आपल्या शेतातील माल विक्रीला आणणे आणि आपल्या गरजेपुरत्या वस्तूंची खरेदी करणे अशी विक्रेता आणि ग्राहक दुहेरी भूमिका शेतकरी निभावतो. त्यावर काही प्रकाश पडायला हवा. 

अरूण शेवतेंनी ‘ऋतूरंग’ चा अंक स्थलांतर विशेषांक म्हणून काढला आहे. पण गंमत म्हणजे मुखपृष्ठावर चित्र मात्र गावगाड्यातच राहणार्‍या वासुदेवाचे आहे. स्थलांतराच्या संदर्भात एखादे चित्र दिले असते तर जास्त संयुक्तिक वाटले असते. यात सायली राजाध्यक्ष यांचे कुलदीप नय्यर आणि असिफ नुरानी यांच्या लिखाणाचे अनुवाद आणि विजय पाडळकर यांनी गुलजारांच्या लेखनाचा केलेला अनुवाद हे पुर्वीच्या छापिल पुस्तकांतून घेतले आहेत. हे शोभणारं नाही. पूर्वी प्रकाशित मजकूर परत देण्यात काय हाशील? नरेंद्र मोहन यांनी संपादित केलेल्या ज्ञानपीठ प्रकाशनाच्या पुस्तकातील चार कथा आहेत ते आपण समजू शकतो. त्या हिंदी कथांचा मराठी अनुवाद करून घेण्याचे श्रेय संपादकाकडे जाते. पण मराठीत प्रसिद्ध मजकूर परत देण्यानं आपण वाचकांचा विश्वास गमावतो हे ध्यानात घ्यायला हवं.

नियतकालिकांचे दिवाळी अंक हा एक वेगळाच विषय होवू शकतो. नियमित काम करणारे पत्रकारच परत दिवाळी अंकात लिहीतात असं दिसतं आहे. श्रीकांत बोजेवार, मुकूंद कुळे, विजय चोरमारे, जयंत पवार, गिरीश कुबेर, स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ, सुहास सरदेशमुख, दिनेश गुणे, मार्कुस डाबरे हे पत्रकार त्यांच्याच दिवाळी अंकात लिहीतात. लोकसत्ताच्या दिवाळी अंकात ’राजकीय दहशतीचा उदयास्त’ या विभागात  विजयसिंह मोहिते पाटील (सोलापुर), पद्मसिंह पाटील (उस्मानाबाद), नारायण राणे (सिंधुदुर्ग) आणि भाई ठाकूर (वसई-विरार) यांच्यावर स्थानिक पत्रकारांनी लिहीले आहे. या लिखाणाला तोच वर्तमानपत्री वास येत राहतो. खोलात जावून एकूणच महाराष्ट्रातील राजकीय दहशत हा विषय मांडण्याऐवजी तुकडे तुकडे करून मांडण्याची वर्तमापत्री पद्धत दिवाळी अंकात काय कामाची? 

‘युनिक फिचर्स’ एकेकाळी वर्तमानपत्रांना असा गोळा केलेला मजकूर त्यावर हात फिरवून देण्यासाठी प्रसिद्ध होती. आता दिवाळी अंकांना त्याची गरज वाटत नाही बहुतेक. एरव्ही युनिक फिचर्सचे लेख दिवाळी अंकात हमखास दिसायचे. आपल्याच पत्रकारांना लेखक करण्याचा आटापिटा वर्तमानपत्रांच्या संपादकांना का करावा वाटतो आहे? त्या ऐवजी या विषयात काम करणार्‍या लेखकांना पुरेसा वेळ देवून त्यांना काही संदर्भ पुरवून टिकणारे लेखन करून ते दिवाळी अंकात छापावे का वाटत नाही? का जाहिराती तशाच छापता येत नाहीत म्हणून मध्ये मध्ये काही मजकूर टाकणे आवश्यक आहे इतकेच मजकुराचे महत्त्व आहे? आहेच हाताशी आपले वार्ताहर, जूंपा त्यांना कामाला. माध्यमांवर गिरीश कुबेर स्वत:च संपादक असताना लिहीतात. मग तटस्थता येणार कुठून? एखाद्या बाहेरच्या माणसाने जास्त कठोरपणे प्रसंगी लोकसत्तावर टिका करून लिहीले असते. कुबेर लोकसत्ताची चिकित्सा करणार का? श्रीकांत बोजेवार यांनी  ‘गांधी पुन्हा पुन्हा’ हा लेख महाराष्ट्र टाईम्स च्या दिवाळी अंकात लिहीला आहे. मला एक साधा प्रश्न आहे जर हा लेख इतर कोणी लिहीला असता तर तो दिवाळी अंकात आला असता का? कारण हा ललित लेख आहे. त्याच्या दर्जाच्या प्रश्न नाही कारण बोजेवार प्रतिभावंत आहेतच. प्रश्न वर्तमानपत्रांच्या औचित्याचा आहे. या संपादकांना आपल्या लेखणीचा इतका मोह का होतो? (गिरीश कुबेर संपादक आहेत म्हणून त्यांचे सदर वर्ष संपले तरी चालू असते. श्रीकांत बोजेवार, प्रविण टोकेकर हे संपादक आहेत म्हणून त्यांची सदरं वर्षानुवर्षे चालतात. एखाद्या बाहेरच्या लेखकाला सलग दोन तीन वर्षे लिहू दिलं जातं असं मराठीत कुठे घडतंय?)

पद्मगंधा प्रकाशनाने उत्तम अनुवाद नावाने वेगळा दिवाळी अंक काढण्याची प्रथा दहा वर्षांपासून सुरू केली आहे. या वर्षी हा अंक  युद्धसाहित्याला वाहिलेला आहे. यात भारतीय कथा कमी असून परदेशी कथा जास्त आहेत. अर्थातच भारतीय भूमीवर अलिकडच्या काळात युद्धं कमी घडले. त्यावर साहित्यही कमीच आहे. त्यामुळे हे स्वाभाविकच आहे. उलट युरोपात गेल्या शतकातील मोठा काळ युद्धाने व्यापलेला आहे. तिकडे त्यावर आधारीत लिहीलंही बरंच गेलं आहे. पद्मगंधाचा नियमित दिवाळी अंक ‘भूमी’ या विषयाला वाहिलेला आहे. पण ऋतूरंग प्रमाणेच यांचेही मुखपृष्ठ आणि आतील मुख्य विभाग यात तफावत झाली आहे. दिलीप रानडे यांचे चित्र ‘भूमी’शी नाते सांगत नाही. या विभागात भूमितत्त्व सांगताना अरुणा ढेरे यांनी भूमीकन्या सीतेचा उल्लेख केला आहे. शेतकरी चळवळीत अशी मांडणी केली जाते की शेतीचा शोध बाईने लावला. माणसाची म्हणून जी संस्कृती आहे ती शेतीची संस्कृती आहे. मारून खाणारा माणूस पेरून खायला लागला आणि हाच मानवी संस्कृतीचा आरंभ बिंदू होय. या विभागात भूमीतत्त्व म्हणत असताना त्याचा शेतीशी असलेला अनुबंध ठळकपणे जोडणारा लेख आला असता तर जास्त संयुक्तिक वाटले असते. 

या वर्षीच्या दिवाळी अंकात चित्रपटांविषयी जास्त मजकूर आहे. विशेष उल्लेख करायला हवा तो मौजेच्या दिवाळी अंकातील परिसंवादाचा. गणेश मतकरी यांनी मेहनतीने हा परिसंवाद घडवून आणला. यात चित्रा पालेकर यांच्यापेक्षा गणेश मतकरी, परेश मोकाशी, सचिन कुंडलकर ही नविन नावे जास्त सविस्तरपणे समजुतदारपणे स्वत:तून बाहेर येवून नविन पिढीशी आणि काळाशी सुसंगत असे काही मांडतात. सचिन कुंडलकरने आपल्या अभिरूचीसमोर कित्येक प्रश्न उभे केले आहेत. धर्मकिर्ती सुमंत याने गुरूदत्त बद्दल वेगळं लिहीलं आहे.  अक्षरच्या दिवाळी अंकात सोनाली नवांगुळ यांनी पटकथाकार उर्मीला जुवेकरची मुलाखत घेतली आहे. जुवेकरांनी  ‘फिल्मची पटकथा म्हणजे सहित्य नव्हे’हे सांगून बरं केलं. नसता चित्रपट मालिकांत संवाद पटकथा लिहून लेखक म्हणून मिरवायला आपल्याकडे सुरवात झाली होती.  मंगेश हाडवळे आणि नागराज मंजूळे यांनी मटाच्या दिवाळी अंकात लिहीलं आहे. मंजूळे यांना आपण ‘फँड्री’त अडकवून संपवून टाकणार आहोत असे दिसते आहे. त्यातून तेही बाहेर पडताना दिसत नाहीत. बाबू मोशाय यांनी ललिता पवार यांच्यावर चंद्रकांत दिवाळी अंकात ‘मिस अंबू’ हा अतिशय मस्त लेख लिहीला आहे. त्यांच्या लेखनाच्या चाहत्यांना तो जरूर आवडेल.

अनुभवच्या दिवाळी अंकात व्हॅन गॉगवर वसंत आबाजी डहाकेंचा अतिशय चांगला मोठा लेख आहे. सामाजिक चळवळींपासून आपले लेखक कलाकार स्वत:ला दूर ठेवतात. त्यावर फारसे काहीच भाष्य न करता डहाकेंनी व्हॅन गॉगच्या आयुष्यातील एका प्रसंगाचा शेवटी उल्लेख केला आहे. ‘मृत्यूपूर्वी काही दिवस आधी व्हिन्सेंटने ‘आवेर टाऊन हॉल ऑन 15 जुलै 1890’ हे चित्र काढलं होतं. बॅस्टिलचा तुरूंग फोडून मुक्तीची घोषणा झाल्याला 101 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जो उत्सव साजरा झाला होता त्याचं हे चित्र. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तीन मुल्य देणार्‍या फ्रेंच राज्य क्रांतीविषयीची आदरभावनाच व्हिन्सेंटने या चित्रतून व्यक्त केली होती.’ 

याच अंकात ‘मी शिष्य मी गुरू’ हा आरती अंकलीकर यांचा लेख आहे. आपल्याकडे गायक, चित्रकार, शिल्पकार, वादक यांनी फार कमी लिखाण केलं आहे. किंवा त्यांच्याकडून आपण लिहून घेतलं नाही. हा विभाग आता समृद्ध करायला हवा. किशोरी आमोणकर, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व यांच्यावरची पुस्तकं आली. धोंडूताई कुलकर्णी यांचे चरित्रही नुकतेच आले. अशोक रानडे यांचे लिखाण अजून ग्रंथरूपात येतेच आहे. पण अजून बर्‍याच कलाकारांवर लिहीलं गेलं पाहिजे. विविध दिवाळी अंकात जे लिहीलं गेलं आहे ते एकत्रित केलं पाहिजे. बहुतेक मागच्यावर्षीच्या पद्मगंधाच्या दिवाळी अंकात हरिप्रसाद चौरसिया यांनी आपल्या गुरू अन्नपूर्णा देवी यांच्यावर लिहीलं होतं.

‘साधना’ आणि ‘युगांतर’ हे दोन दिवाळी अंक संपूर्णपणे वैचारिक लेखांनी भरलेले आहेत. त्यावर विविध अंगांनी चर्चा होऊ शकते. उदा. शेतकरी आंदोलनाने काय मिळवले या रमेश पाध्ये यांच्या युगांतर मधील लेखाचा कडवा प्रतिवाद करता येतो. किंवा ‘साधना’मध्ये जब्बार पटेल यांची विनोद शिरसाठ यांनी मुलाखत घेतली आहे. पटेल यांचा नुकताच आलेला यशवंतराव चव्हाणांवरचा चित्रपट निराशा करणारा असताना आणि नविन दिग्दर्शक त्यांच्यापुढे निघून गेले असताना परत त्यांची मुलाखत कशासाठी? हा प्रश्न पडू शकतो. एकीकडे जागतिकीकरणाच्या खुलीकरणाच्या काळात नविन दिग्दर्शक निर्माते देशात परदेशात आपल्या चित्रपटांना बाजारपेठ मिळविण्याचे प्रयत्न करत आहेत. झी सारख्या वाहिन्यांचे पाठबळ घेवून चित्रपट निर्मिती होते आहे. असं असताना सरकारी पैशावर कला पोसणार्‍या आणि ती निर्मितीही परत सुमार झाली असताना अशा मुलाखती का? 

अर्थात याची उत्तरे कोणी देत नाही. हे मुद्दे वादासाठी चर्चेसाठी नसून आपण अंतर्मुख होवून विचार करावा यासाठी आहेत. ‘वाचकांची लोकशाही कशी येईल?’ हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मिलींद बोकील यांनी ‘ललित’ च्या दिवाळी अंकात उपस्थित केला आहे. यासाठी बोकिल ज्या डाव्या बाजूला नकळतपणे असतात त्याचाच अडथळा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आजही मराठी पुस्तकांची आणि परिणामी दिवाळी अंकांचीही बाजारपेठ ही ग्राहककेंद्री नसून ती सरकारी अनुदानावर चालणार्‍या वाचनालयकेंद्री झाली आहे. सरकारी मदत हा एक मोठा अडथळा आहे. तो दूर झाला तर खुल्या बाजारात दिवाळी अंक येवू शकतील. आपल्या शेजारचे वाचनालय दिवाळी अंक खरेदी करून आपल्याला पोचविणार नाही हे एकदा कळले की वाचक जमेल तितके दिवाळी अंक स्वत: खरेदी करतील किंवा काही मित्र मिळून खरेदी करतील. आणि सरकारी अनुदानामुळे येणारी लाचारी संपेल. परिणामी चांगले लेखक, चांगला मजकूर, त्यावर काम करणारे संपादक, चांगली मांडणी करणारे चित्रकार ग्राफिक डिझायनर यांना किंमत येईल. आताही दिवाळी अंकाच्या एकूण उलाढालीमध्ये लेखकाचे मानधन हा फार छोटा हिस्सा आहे.  

आजचे दिवाळी अंक निराशा करतात ते या पार्श्वभूमीवर. मौज, पद्मगंधा, शब्द, साधना, युगांतर, उत्तम अनुवाद, दिपावली यांनी किमान काहीतरी अभिरूचीत संपन्नता आणल्याचे समाधान तरी दिले. इतरांनी तेही नाही. 

मी कवितांबाबत काही लिहीले नाही कारण बहुतांश कविता निराश करणार्‍या आहेत. नाविन्य म्हणत असताना परत एकाच साच्यात कविता अडकत चालली आहे. एकतर ग्रामीण भागातील कविता जी काळ्या आईच्या शपथेत अडकली आणि शहरी म्हणविणारी कविता बाजार नावाच्या तोंड रंगविलेल्या वेश्याच्या मिठीत गुदमरली अशी काहीशी स्थिती आहे. फक्त कविताच नाही तर नविन व्यवस्था किती घातक आहे बाजार किती वाईट आहे, जागतिकीकरण कसे भयानक आहे हे लिहीणारे जवळपास सगळेच शहरात निमशहरात राहणारे, मोबाईलपासून सर्व आधुनिक सोयी वापरणारे आहेत. आणि गाणे मात्र गरीबीचे, जुन्या व्यवस्थेचे, गाव किती चांगले होते, आधी माणसे माणसाला कशी विचारत होती, बाईला कशी किंमत होती अशीच असते. अभिराम भडकमकर यांच्या कादंबरीचा एक अंश लेाकसत्ताने छापला आहे. ही कादंबरी लगेच प्रकाशितही झाली. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांची गती किती भयानक आहे, माणसाच्या मरणाचे कसे भांडवल केले जाते. शहरी व्यवस्थेत कशी गळाकापू स्पर्धा आहे. वगैरे वगैरे रंगवत असताना अप्रत्यक्षरित्या खेड्यात कसं बरं चाललं आहे हेच सुचविलं जातं. याला काय म्हणायचं? बरं हे सगळं बालाजी सुतार, राजकुमार तांगडे सारख्याने खेड्यात राहून लिहावं तर ते एकवेळ समजू शकेल. पण शहरात राहूनही गरीबीचं खेड्याचं समर्थन करणारा कविता आणि कथांमधला ऐवज काय म्हणून समजून घ्यावा? का लिखाणाच्या बाबतीत गरीबीला जे ‘सेक्स’अपील आहे ते शहरी आधुनिकीकरण, श्रीमंतीला नाही असे समजायचे का? मोठ्या मोठ्या वृत्तपत्रांत- ज्यांची मालकी बड्या औद्यागिक कंपन्यांकडे आहे-नौकरी करायची, सरकारी लठ्ठ पगाराच्या नौकर्‍या करायच्या आणि भूमितत्त्व म्हणत दिवाळी अंकात लेख लिहून काळ्या आईच्या नावानं गळा काढायचा हे नेमकं कशाचे द्योतक आहे ?  हे एक ढोंग आपले बरेच लेखक कसोशीने पाळताना दिसतात म्हणून दिवाळी अंकाबद्दलची असोशी संपत चालली आहे असे वाटते.

काहीतरी जाहिराती गोळा करून अंक काढायचा. यातही परत एक गोम आहे. बँका मोठ्या कंपन्या यांत जोपर्यंत मराठी माणसे जनसंपर्क अधिकारी पदावर होते तोपर्यंत जाहिराती मिळायच्या. जेंव्हा दुसरे अमराठी अधिकारी आले तेंव्हा हिंदी गाण्यांचे कार्यक्रम किंवा हनीसिंग वग़ैरे उठवळांचे कार्यक्रम यांच्याकडे कंपन्यांचा पैसा प्रायोजकत्वाच्या नावाखाली वळला. शिवाय काही अधिकार्‍यांनी आपणच अंक काढायला सुरवात केली. महाराष्ट्र बँकेतून निवृत्त झाल्यावर एका लेखक मित्राने  दिवाळी अंक काढाला परिणामी महाराष्ट्र बँकेची जाहिरात त्यांना मिळाली. लेखक असणाऱ्या एका सनदी अधिकाऱ्याने   संपूर्ण ग्लेज्ड कागदावरचा दिवाळी अंक काढला ज्यात स्वत:चीच एक कादंबरी आणि स्वत:वरच एक परिचयात्मक लेखक छायाचित्रासह आपल्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांसह छापला आहे. जे वर्षानूवर्षे दिवाळी अंक काढत आहेत त्यांच्या पाठीशी ही पुण्याई यांनी का नाही उभी केली हा प्रश्न आहे.  साहित्य संमेलन भरविणारे सगळे स्वागताध्यक्ष तपासा. यातील कोणीतरी एकातरी दिवाळी अंकाला आपली, आपल्या संस्थेची, कंपनीची जाहिरात दिली आहे का? वर्तमानपत्रांच्या दिवाळी अंकांना जाहिराती दिल्या जातात त्याची कारणे शोधायला कुठलीही समिती स्थापन करण्याची गरज नाही.

एकीकडे भरमसाठ पैसा साहित्याच्या नावाने संमेलने, गावोगावीचे पुरस्कार, साहित्य मेळावे यांवर उधळले जातात. विद्यापीठांतील मराठी विभागात कार्यरत प्राध्यापकांची संख्या महाराष्ट्रात 5000 इतकी आहे. यांच्यावर दरवर्षी शासनाचे 500 कोटी रूपये खर्च होतात. आणि दिवाळी अंकासाठी मात्र खिशात हात घालायला हा महाराष्ट्र मागेपुढे पहातो. हे एक दुसरे ढोंग आपली व्यवस्था कसोशीने पाळते म्हणूनच दिवाळी अंकांबद्दलची असोशी संपत चालली आहे.   
    (अर्थात याला माझ्या वाचनाची मर्यादा आहे. शिवाय माझ्या वाचनात न आलेला मजकूर चांगला असू शकतो.)  
000
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. 9422878      





No comments:

Post a Comment