Wednesday, December 16, 2020

मूर्ती मालिका -१६



गणेशासोबत नृत्यमग्न उंदीर उंदरी
गणेशाच्या विविध मोहक शिल्पकृती मंदिरांवर आढळून येतात. यातील नृत्यगणेश तर खुपच सुंदर आहेत. घोटण (ता. शेवगाव जि. नगर) येथील खांबांवर पशु पक्षांची शिल्पे ठळकपणे आढळून येतात. छायाचित्रातील शिल्पाने मला चकितच केले. शिल्पात नृत्य करणारा गणेश आहे. पण त्याच्या सोबत कोण आहे? तर दोन उंदीर दिसत आहेत. कमरेखाली उंदीर आणि वर मनुष्य. यातही परत डाव्या बाजूला आहे ती स्त्री तर उजव्या बाजूला पुरूष. उंदरी नाचत आहे तर उंदीर झांज वाजवत आहे. या मंदिरातील पशुपक्षांची शिल्पे संख्येन जास्त आणि ठळक आहेत. या शिल्पात गणपतीचे वाहन म्हणून छोटासा उंदिर न दाखवता त्याच्या सोबत नृत्य करणारी तेवढ्याच आकाराची ही उंदिर नवरा बायकोची जोडी. या कलाकाराच्या कल्पकतेला सलाम. (या आकृती किन्नरांच्या आहेत असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यावर इतर अभ्यासकांनी प्रकाश टाकावा.)

(छायाचित्र Vincent Pasmo




अशोक वनात हनुमान
घोटणच्या मल्लिकार्जूनेश्वर मंदिरात (ता. शेवगांव जि. नगर) पशुपक्ष्यांची शिल्पे लक्षणीय आहेत हे मी आधी सांगितले होतेच. या शिल्पात सीतेच्या शोधातील हनुमान दाखवला आहे. शिल्पाची झीज झाली शिवाय मोडतोड झाल्याने आधी लक्ष्यात नाही आले. तेथील पुजार्याने सांगितल्यावर नीट लक्ष्य देवून बघितले. मग हनुमानाने पुढे केलेले बोट म्हणजे तो सीतेला अंगठी दाखवतोय हे लक्ष्यात आले. बाजूला दोन बलदंड स्त्रीया म्हणजेच राक्षसी आहेत. अंगठी दिसताच सीतेने मान वरती केली, अंगठीसाठी हाताची ओंजळ पुढे केली. एरव्ही सीता खाली मान घातलेली दाखवली जाते. पण रामाची अंगठी दिसताच ती आनंदली. या शिल्पकाराने नेमका हा क्षण टिपला आहे. मागची अशोकाचे खोड सरळ न दाखवता कलात्मक असे त्रिभंग मुद्रेत उभ्या असलेल्या सुरसुंदरी सारखे दाखवले आहे. हनुमान हा आकाराने लहान होवून सीते समोर उभा राहिला असे वर्णन रामायणात आहे. इथे शिल्पकाराने त्याचाही विचार केलाय हे विशेष. बसलेल्या सीतेइतकीच हनुमानाची उंची आहे.
जेंव्हा हे शिल्प संपूर्ण चांगल्या स्थितीत असेल तेंव्हा त्याचे सौंदर्य काय आणि किती असेल. आज केवळ अवशेषांवरून अंदाज लावला तर त्याचे सौंदर्य जाणवते. मंदिरावरची छोटी शिल्पे आकारामुळे दूर्लक्षीत राहतात पण त्यांच्यातही मोठा अर्थ दडलेला असतो.
(छायाचित्र
TravelBaba
)  



मानस्तंभावरील जैन देवता
चारठाणा (ता. जिंतूर जि. परभणी) येथ ३४ फुटी उंच भव्य सुंदर आणि कलात्मक असा मानस्तंभ आहे. याचा कालखंड १३ व्या शतकातील आहे. पैठण आणि वेरूळच्या कैलास लेण्यात असलेल्या स्तंभांशी याची तूलना करता येते. याच्यावर चार दिशांना चार मातृदेवता कोरलेल्या आहेत. देवतांच्या वर छोट्या देवकोष्टकात जैन तीर्थंकारांच्या मूर्ती असल्याने या जैन मातृदेवता असल्याचे अनुमान निघते.
पूर्वेकडील चक्रेश्वरी जिच्या हातात चक्र असून वाहन गरुड ,उत्तरेकडील पद्मावती जिचे वाहन हंस , पश्चिमेकडील अंबिका जिचे वाहन सिंह , दक्षिणेकडील ज्वालामालिनी जिचे वाहन वृषभ व अष्टभुजा .
याच स्तंभाच्या समोर मंदिराच्या द्वारशाखेवरील तोरणाचे अवशेष आढळून येतात. इथे उत्खननास परवानगी मिळाल्यास मंदिर सापडण्याची शक्यता अभ्यासक ज्यांनी या मूर्तीवर/ स्तंभावर संशोधन केलेले
Laxmikant Sonwatkar
हे सांगतात.
हा सगळा परिसर निव्वळ उकिरडा बनला आहे. स्वच्छता अभियान राबवून गावकरी प्रयत्न करत आहेत. पण उत्खननास परवानगी आणि निधी मिळाल्या शिवाय इथला प्रश्न निकाली निघणार नाही. सरकारी निधी न मिळाल्यास जैन संघटनांनी याकडे लक्ष द्यावे निधी उपलब्ध करून द्यावा ही कळकळीची विनंती.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575

Tuesday, December 15, 2020

डाव्यांच्या कृषी आंदोलनाचा ‘अण्णु गोगट्या’ झाला


उरूस, 15 डिसेंबर 2020 

व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकांत पुलंनी अंतु बर्वा हे एक अफलातून व्यक्तिमत्व चितारले आहे. या लेखात गावांतील अण्णु गोगटे वकिल प्रत्येक निवडणुकीत पडायचे त्यामुळे विहिरीत पोहरा पडला तरी त्याचा ‘अण्णु गोगट्या झाला’ असे अंतू बर्वा यांच्या तोंडी वाक्य आहे. 

कृषी आंदोलनात डावे घुसले आणि त्या आंदोलनाचा ‘अण्णु गोगट्या’ झाला असेच आता म्हणावे लागेल. एखादे आंदोलन आपला मुळ हेतू विसरून कसे भरकटत जाते आणि त्यामागे हे डावे आपल्या सोबत इतर पुरोगामी टोळीची पण बौद्धिक फरफट करतात. याचे ताजे उदाहरण दिल्लीत चालू असलेले कृषी आंदोलन.

किमान आधारभूत किंमत आणि त्याप्रमाणे होणारी शासकीय खरेदी हा आंदोलनातील सगळ्यात कळीचा मुद्दा होता. सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी लागणारे धान्य (पी.डि.एस.) खरेदी करणारी सरकारी कृषी उत्पन्न बाजार समितीची (ए.पी.एम.सी.) व्यवस्था अबाधीत रहावी अशी प्रमुख मागणी होती. वस्तुत: आंदोलन सुरू झाले तेेव्हाच याला तत्वश: मंजूरी मोदी सरकारने दिली होती. चर्चेनंतर तसे लेखी आश्वासन देण्याची पण तयारी दर्शवली होती. या शासकीय खरेदी मध्ये गहु आणि तांदळाची खरेदी केली जाते. ही बहुतांश खरेदी पंजाब आणि हरियाणातून होते. 
यातील शेतकर्‍यांच्या मागण्या आणि त्याला सरकारने दिलेले उत्तर हा वेगळा विषय आहे. पण डाव्यांनी या आंदोलनात घुसून आपल्या बौद्धिक भ्रष्टाचाराचा पुरावाच कसा दिला ते आपण पाहू. 

पहिला मुद्दा होता तो मेधा पाटकर सारख्या नेत्यांचा. सरदार सरोवर प्रकल्पाला विरोध करत नर्मदा बचाव आंदोलन त्यांनी उभारले. त्यासाठी कडवी झुंज दिली. ‘डुबेंगे पर हटेंगे नही’ अशा घोषणा दिल्या. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल  विरोधात गेल्यावरही आपला आडमुठपणा सोडला नाही. नर्मदेवरील सरदार सरोवर प्रकल्पामुळे गुजरातच्या कच्छ भागातील कोरडवाहू शेतकर्‍यांना पाणी मिळणार होते. शेतीला तर सोडाच पण पिण्याच्या पाण्याचाही मोठा दुष्काळ त्या भागात होता. मेधा पाटकरांच्या आंदोलनास या भागातील शेतकर्‍यांनी सामान्य जनतेने तीव्र विरोध केला. सरदार सरोवरातील कळशीभर पाणी कच्छकडे जाणार्‍यां पाटांमध्ये सोडून या शेतकर्‍यांनी सामान्य जनतेने आंदोलनही केले होते. मग तेंव्हा शेतकरी विरोधी असलेल्या या मेधा पाटकर आता या आंदोलनात शेतकर्‍यांच्या बाजूने कशा काय उभ्या आहेत? 

जे शेतकरी आंदोलन करत आहेत ते गहु तांदूळ पिकवणारे आहेत. ही पीकं पाण्यावरची आहेत. म्हणजे या डाव्यांच्या भाषेत ‘पाणीवाले बडे शेतकरी’. कालपर्यंत हे यांच्या विरोधात बोलत होते. पाणीवाले विरूद्ध कोरडवाहू, बडे शेतकरी विरूद्ध छोटे शेतकरी, नगदी पिकवाले शेतकरी, भांडवली विळख्यात शेती अशी भाषा डाव्यांची असायची. मग आता हे या पाणीवाल्या बड्या बागायतदार शेतकर्‍यांच्या बाजूने कसे काय रस्त्यावर उतरले आहेत? 
पर्यावरणावादी आंदोलनातील लोकांनी सातत्याने पंजाबातील भात शेतकर्‍यांच्या विरोधात आवाज उठवला होता. हे भातवाले शेतकरी भाताचे तुस जाळतात. परिणामी प्रदुषण होते आणि दिल्लीतली हवा विषारी बनते. मग आता हे पर्यावरणवादी सगळे या आंदोलनात याच भाताच्या म्हणजेच तांदळाच्या शेतकर्‍यांच्या बाजूने कसे काय आहेत? 
तांदळासारखे पीक हे जास्त पाणी घेणारे आहे. शिवाय सध्या देशात तांदळाचे जास्तीचे उत्पादन होते आहे. अशा स्थितीत तांदळाचे उत्पादन घेवू नका असे सांगायची गरज आहे. या जास्तीच्या तांदळाची खरेदी शासनाने एमएसपी प्रमाणे करावी, त्याचा कायदा करावा अशी मागणी यांच्याच विचारसरणीच्या विरोधातील आहे. हे यांना कळत नाही का? आणि जर कळत असेल तर असा बौद्धिक भ्रष्टाचार हे काय म्हणून करत आहेत? 

भारतभर गहू आणि तांदूळ पिकतो. तो काय केवळ पंजाब आणि हरियाणातच पिकतो असे नाही. मग असे असताना किमान आधारभूत किमतीने (एम.एस.पी.) सरकारी खरेदी पंजाब आणि हरियाणालाच उजवे माप का? सरकारने ही खरेदी भारतभर खुली निविदा काढून करावी.  एकाधिकारशाहीला विरोध करणारे डावे पंजाब हरियाणातील शेतकर्‍यांची गहु तांदळाच्या बाबतीत सरकारी खरेदीतील जी एकाधिकारशाही निर्माण झाली आहे तिची काय म्हणून भलावण करत आहेत? चालू हंगामात मध्यप्रदेशातून पंजाब आणि हरियाणापेक्षा जास्त खरेदी झाली आहे. यातून मध्यप्रदेशाच्या शेतकर्‍यांना काही एक फायदा मिळू शकला आहे. हे डाव्यांना मंजूर नाही का?  
जसे की कामगारांच्या संघटना बांधत असताना यांनी केवळ संघटित कामगार आणि कर्मचार्‍यांकडेच लक्ष दिले. या उलट विखुरलेले असंघटित क्षेत्रातील कामगार दुर्लक्षिले. त्याच प्रमाणे गहु आणि तांदळाचे पंजाब हरियाणातील संघटीत ट्रॅक्टरवाले शेतकरी यांना दिसतात पण भारतभर विखुरलेले गरिब सामान्य शेतकरी (ही यांचीच भाषा आहे. शेतकरी संघटनेत शरद जोशींनी कायम शेतकरी तितुका एक एक अशीच भाषा वापरली.) दिसत नाहीत असेच म्हणावे लागेल. 

नविन कृषी कायद्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची मक्तेदारी मोडकळीस येणार आहे. त्यामुळे साहजिकच त्या मंड्यांमधील दलाल हमाल मापाडी व्यापारी यांचे हितसंबंध धोक्यात आले आहेत. डावे सतत दलित शोषितांची भाषा करत आले आहेत. मग आता ते या दलाल हमाल मापाडी व्यापारी यांची बाजू घेणार्‍या आंदोलनात का उतरले आहेत? खरेदी करणारे जास्त लोक बाजारात उतरले तर उत्पादकाचा फायदाच होतो. शेतकर्‍याच्या बांधावरून खरेदी करण्यासाठी स्पर्धा सुरू होईल. मग हे डावे नेमके या सामान्य कष्टकरी शेतकर्‍याचा फायदा करणार्‍या कायद्यांच्या विरोधात कसे काय? 

या आंदोलनातून अजून एक गंभीर मुद्दा समोर येतो आहे. पाणीवाल्या पिकांना विरोध करताना कोरडवाहूची पिके दुर्लक्षीत राहत आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये  (रॅशनिंग पी.डि.एस.) ज्वारी, बाजरी, मका यांची खरेदी व्हावी अशी आग्रही मागणी डावे का लावून धरत नाहीत? ज्यांना भरड पीके म्हणतात त्यांची खरेदी रॅशनिंग मध्ये झाली पाहिजे. त्या पीकांना हमीभावाचा फायदा (जो मिळतो असा यांचा भ्रम आहे) मिळावा अशी मागणी का नाही केली जात? 

पाण्यावरची पीके बड्यांची आहेत ते श्रीमंत शेतकरी आहेत अशी मांडणी करणारे मग कोरडवाहू पीके बाजरी- मका- हलकी ज्वारी- मुग- सोयाबीन- तुर- हुलगा-नाचणी-वरी यांची भलावण का करत नाहीत? यांच्या बाबतीत आंदोलन का उभारत नाहीत? (हे मुद्दे या आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या पत्रकावर सहि करणार्‍या राजन गवस यांच्याच कादंबरीतील आहेत).   

डाव्यांनी अलीकडच्या काळात जी जी आंदोलने पुकारली किंवा समोर आलेल्या आंदोलनात घुसखोरी केली त्या सर्वांचा फज्जा उडालेला दिसून येतो आहे. सर्वोच्च न्यायालयाने पण अशा प्रकरणांमध्ये फटकार लगावली आहे. शाहिनबाग प्रकरणांतही हेच घडले. कश्मिरबाबतचे 370, तीन तलाक, सीएए सर्व ठिकाणी हेच घडले. संख्यात्मक पातळीवर किंवा राजकीय पातळीवर ही आंदोलने फसली हा वेगळा मुद्दा. पण वैचारिकदृष्ट्या यंाचा ‘अण्णु गोगट्या’ झाला हे डाव्यांच्या बाबतीत जास्त महत्त्वाचे आणि त्यांच्या दुष्टीने शोकांतिका ठरणारे आहे. एकमेकांना विरोध करणारे समाजवादी-साम्यवादी- गांधीवादी-पर्यावरणवादी हे सगळेच या बौद्धिक भ्रष्टाचारात एकमेंकांच्या हातात हात घालून समोर आले आहेत हे पण दिसून येत आहे.

              श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 
  

Monday, December 14, 2020

जोगिया : गदिमांची आठवण



काव्यतरंग, 14 डिसेंबर 2020

14 डिसेंबर हा गदिमांचा स्मृती दिन. त्यांची जन्मशताब्दी 2019 ला नुकतीच साजरी झाली. गदिमांचे स्मारक व्हावे म्हणून विविध संस्था आज त्यांच्या स्मृतीत कार्यक्रम करत आहेत. गदिमांच्या विविध कविता गाणी कथा यांच्या आठवणी आज त्या निमित्ताने जागवल्या जात आहेत. मला गदिमांच्या एका कवितेची आज विशेषत्वाने आठवण होते आहे. जोगिया नावाने ही कविता प्रसिद्ध आहे. माझ्या साठी वेगळी आठवण म्हणजे या कवितेच्या चार ओळी. 
‘कोन्यात झोपली सतार’ या चार ओळी माझ्या कानावर पडल्या. मी मोठ्या उत्सुकतेने त्या लिहून घेतल्या. मला वाटले की कार्यक्रमाची भैरवी झाल्यावर कार्यक्रम संपवताना या ओळी छान वाटतील. ‘स्वराभिषेक’ नावानं भाव भक्ती गीतांचा एक कार्यक्रम मल्हारीकांत देशमुख या मित्राने धडपडीन बसवला होता. गायक वादक माझ्यासारखे निवेदक सहवादक असा सगळा जोडजमाव किंबहुना तारेवरची अवघड कसरत करत त्याने मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमाचा घाट घातला होता. या कार्यक्रमांत शेवटी गदिमांच्या या ओळी मी म्हणायचो. ऐकणार्‍यांना त्या फार आवडायच्या.  गदिमांच्या या ओळी अशा होत्या

कोन्यात झोपली सतार सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग
दुमडला गालिचा तक्के झुके खाली
तबकात राहिल्या देठ लवंगा साली

मला वाटायचे की एखाद्या सुंदर कवितेतील या शेवटच्या आळी असतील. पुढे एकदा ‘जोगिया’ याच नावाचा गदिमांचा कविता संग्रह हाती पडला. त्यातील ही संपूर्ण कविता पाहून मी हरखून गेलो. मला छानसा धक्का बसला तो वेगळ्याच कारणांनी. मी म्हणायचो त्या कवितेच्या शेवटच्या ओळी नसून सुरवातीच्या ओळी होत्या. तिथूनच कविता सुरू होते. त्याच्या पुढच्या चार ओळी या प्रमाणे होत्या.

झुंबरी निळ्या दिपात ताठली वीज
कां तुला कंचनी अजुनी नाही नीज ?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलुनी तू दार दडपिले पाठी

माझ्या लक्षात आले की ही कविता म्हणजे कथाकाव्य अशा पद्धतीची आहे. एक छोटासा प्रसंग गदिमांनी रंगवून कवितेत सांगितला आहे. गदिमा जसे गीतकार होते तसेच ते कथा व पटकथाकारही होते. त्यांना ते दृश्य डोळ्यासमोर दिसायचे. या कवितेतील कंचनी तिच्या महालात कशी बसली हे त्यांच्या डोळ्या समोर स्पष्ट दिसत असणार. त्या महालातील झुंबराचे दिवे आणि त्यातील ‘ताठलेली वीज’. एरव्ही दिव्यांची ज्योत हलते तेंव्हा तिच्यात जिवंतपणा असतो. पण इथे ही वीज आता ‘ताठली’ आहे. म्हणजेच मृतवत झाली आहे. ही कंचनी हळूवारपणे पान लावत आहे. हे जे वर्णन आले आहे ते केवळ अप्रतिम.

हळूवार नखलिशी पुन: मुलायम पान
निरखिसी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसि काय तें? - गौर नितळ तव कंठी
स्वरवेल थरथरे फूल उमलले ओठी

साधतां विड्याचा घाट उमटली तान
वर लवंग ठसतां होसि कशी बेभान
चित्रांत रेखितां चित्र बोलले ऐने
कां नीर लोचनी आज तुझ्या ग मैने?

त्या अधर फुलांचे ओले मृदुल पराग
हालले साधला भावस्वरांचा योग
घमघमे, जोगिया दवांत भिजूनी गाता
पाण्यांत तरंगे अभंग वेडी गाथा

यातील ‘स्वरवेल थरथरे’ ही उपमा लताबाईंच्या आवाजाला नेहमी वापरली गेली आहे. या महालात आरसे बसवले आहेत. त्यामुळे प्रतिबिंब चहुकडे दिसत आहेत. बाकी तर कोणी महालात नाही. सगळ्यांना घालवून देवून ही कंचनी एकटीच बसली आहे. तिची प्रतिमाच तिला प्रश्‍न करत आहेे. गदिमा पटकथाकार असल्याने दृश्या सोबत ते संवादही लिहीत जातात. ही कंचनी तिची कथा आपल्याच शब्दांत सांगते आहे. हे शब्द गीतातून उमटत जातात. आपली जिवीत कहाणी ती संागते आहे. कवितेचा हा पुढचा तुकडा संवादांनी भरलेला आहे. 

मी देह विकुनिया मागुन घेते मोल
जगविते प्राण हे ओपुनिया अनमोल
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा
ना पवित्र देही तिळाएवढी जागा

शोधीत एकदा घटकेचा विश्राम
भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम
सांवळा तरुण तो खराच ग वनमाली
लाविते पान तो निघून गेला खाली

अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव
पुसलेहि नाही मी मंगल त्याचे नाव
बोलला हळूं तो दबकत नवख्यावाणी.
मम प्रीती जडली आजे तूजवर राणी

नीतिचा उघडला खुला जिथे व्यापार
बावळा तिथे हा इष्का गणितो प्यार
हांसून म्हणाल्ये, ‘‘दाम वाढवा थोडा..
या पुन्हां, पान घ्या... ’’ निघून गेला वेडा

या कंचनीकडे निखळ प्रेमभावना एक तरूण व्यक्त करतो. हीला खुप अनुभव असतो जगाचा. त्यामुळे तिला त्याच्या शब्दांतील भाबडेपणा जाणवतो. ही त्याला व्यवहाराची आठवण करून देते. हीच्याही नकळत त्याच्या कोमल भावनेचा अपमान होतो. त्या भावनेची बूज राखली जात नाही. तो ताडकन निघून जातो आणि मग हीला त्याचे भान येते. आता हळहळ करून काही उपयोग नाही.  

राहिले चुन्याचे बोट थांबला हात
जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत
पुन:पुन्हां धुंडिते अंतर आता त्याला
तो कशाल येईल भलत्या व्यापाराला?

तो हाच दिवस हो हिच तिथी ही रात
ही अशीच होत्यें बसले परि रतिक्लांत
वळुनी न पाहतां कापित अंधाराला
तो तारा तुटतो- तसा खालती गेला

कवितेचा शेवट मोठा भावूक आहे. आज ही कंचनी रसिकांना महालाबाहेर घालवून एकटी बसली आहे ती हीच तिथी होते. एखादे व्रत पाळावे तसे ती या दिवशी त्याची आठवण जागवते. त्याच्यासाठी विडा घडवून त्याची वाट पहाते. व्रतस्त राहते. ही जी वेदना आहे ती तिच्या गाण्यांतून उमटते. म्हणून ‘वर्षात एकदा असा जोगिया रंगे’ अशी ओळ गदिमांच्या लेखणीतून उतरली. आज गदिमांचे स्मरण आपण करत आहोत. सर्व रसिकांसाठी गदिमांची ही माझी आवडती कविता सादर. या शेवटच्या चार ओळीं भैरवीसारख्या. 

हा विडा घडवुनी करिते त्याचे ध्यान
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान
ही तिथी पाळते व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षांत एकदा असा जोगिया रंगे. 

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Sunday, December 13, 2020

औरंगाबाद डोंगरमाथ्यावरच्या बाभळीची कविता...



उरूस, 13 डिसेंबर 2020 

औरंगाबाद शहरात सातारा परिसरांत टेकडीवर एकच बाभळीचे झाड दिसून येते. त्यावर मी याच सदरात लिहीले होते. त्या बाभळीवर लिहीताना वसंत बापट आणि इंदिरा संत यांच्या कवितांची आठवण झाली. त्याही कवितांचा उल्लेख केला होता. पण माझ्या लक्षात येत गेले हे झाड अजून जरा वेगळे आहे. या प्रदेशातील सोशीक माणसांचे ते प्रतिक आहे. आक्रमकांचे खुप घाव या प्रदेशाने झेलेले आहेत. तरी या परिसरांत कला संस्कृती फुलली जगणं रसरशीत बनत गेलं. कोरडवाहून प्रदेशात वाढणारी झाडंही वेगळी असतात. इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या कवितेत असं लिहून ठेवलं आहे

बारोमास खळाळणार्‍या दांडातून
आम्ही उकललो नाहीत
केळीच्या गाभ्यासारखे

आम्ही वाढलोत 
वर्षानुवर्षे अवर्षणग्रस्त 
भागातल्या झुडूपासारखे

पण खबरदार 
आम्हाला खुरटे म्हणाल तर
आम्ही तूमच्यापेक्षा 
अधिक उन्हाळे पावसाळे पाहिलेत

ही बाभळ खुरटी नाही. चांगली उंच वाढली आहे. आणि तीच या डोंगराची ओळख बनवली आहे. या डोंगरावर आम्ही वणव्यात होरपळलेली झाडे वाचविण्यासाठी गेलो होतो. तो अनुभव, या बाभळीचे जवळून दर्शन, इंदिरा संत वसंत बापटांची कविता, इंद्रजीत भालेराव यांच्या कवितेतील भावना या सगळ्यांतून मला एक कविता सुचत गेली. हा हेमंत ऋतू आहे (नविन पिढीला हे समजावून सांगावे लागते). तेंव्हा साहजिकच कवितेतील पहिली ओळ तशी आलेली आहे

हेमंतातील पहाटवेळी
उन्हे लेवूनी तांबूस पिवळी
डोंगरमाथी उभी एकटी
अशी देखली एक बाभळी ॥

कोरड्या डोंगरावर हे एकच झाड दिसून येते. बाकी कुणीच वाढले नाही आणि टिकले नाही. या वातावरणात टिकण्याची विलक्षण अशी किमया या बाभळीत आहे. नविन प्रकारचा अंबा रूजवायचा तर त्याची कलम गावरान अंब्यावर करावी लागते असे या विषयातील तज्ज्ञ सांगतात. या मातीत रूजण्याची किमया याच झाडात आढळते. दुसरे काही नविन करायचे तर यावर कलम करावी लागेल. या बाभळीचा काही नखरा नाही. आयुष्य सोसून येणारे एक समंजसपण दिसून येते. म्हणून पुढच्या ओळी सुचल्या.

घट्ट रोवूनी मुळे आपली
दिसे समंजस नाही तोरा
पदराखाली झाकून घेते
शुष्क कोरडा डोंगर सारा ॥

बाभळीच्या खोडाला गाठी असतात, भेगा पडलेल्या दिसून येतात. यातून या झाडाने किती आणि काय सोसले याचा पुरावा मिळतो. बाभळीवर या काळात येणारा पिवळा फुलोरा विलक्षण देखणा असतो. यातूनच पुढच्या ओळी सुचत गेल्या

खोडावरच्या रेषांमधूनी
दु:ख ठणकते जरी पुराणे
धम्मक पिवळा फुलवर गाई
आनंदाचे नविन गाणे ॥

ही बाभळी या प्रदेशांतील माणसांना जगण्याची प्रेरणा देते असं मला वाटून गेलं. सुख आणि दु:ख या दोन पाळूत आपले जगणे भरडून निघते अशी एक ओवी याच प्रदेशात गोदावरीच्या काठावर गायली जाते. त्यामुळेच कष्ट सोसणार्‍या ग्रामीण प्रदेशातील माणसांना ‘दु:ख दळून खाणारी माणसं’ असं संबोधलं जातं. ही बाभळी  जमिनीपासून उंचावर आहे. आभाळ मातीत तिनं स्वत:ला टांगून घेतलं आहे. सुख-दु:खात, जन्म-मृत्यूच्या दोन टोकांत हेलकावणार्‍या जगण्याचं ती प्रतिक आहे. असं वाटल्याने मला शेवटचे कडवे सुचले

बोलत नाही जरी ती काही
असेल तिजला सांगायाचे
आभाळ माती मध्ये आपुले
हसूनी जगणे टांगायाचे ॥

कविता शब्दांनी पूर्ण झाली पण माझ्या मनात मात्र रूंजी घालतच राहिली. आजही औरंगाबाद शहरात कुठून कुठेही जाताना हा डोंगर आणि हे झाड नजरेस पडते आणि हे शब्द माझ्या मनात फेर धरून नाचायला लागतात.

(ह्या बाभळी कडे पाहत असताना माझ्या नकळत माझे छायाचित्र मित्रवर्य प्रमोद ढवळे यांनी काढले. त्यांचे धन्यवाद)

             श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 
  

Thursday, December 10, 2020

कृषी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरेगांव शहिदांचे स्मरण


उरूस, 10 डिसेंबर 2020 

बरोबर 34 वर्षांपूर्वी म्हणजेच 10 डिसेंबर 1986 रोजी कापसाच्या आंदोलनात पोलिसांनी गोळीबार केला. हिंगोली जिल्ह्यातील सुरेगांव पाटी येथे तीन शेतकरी या गोळीबारात शहिद झाले. 

आज नेमके असेच शेतकरी दिल्लीच्या सीमेवर रस्त्यावर आंदोलन करत बसून आहेत. आज तरी सरकार शेतकर्‍यांशी बोलणी करत आहे. तेंव्हा कसलीच बोलणी करायला सरकार तयार नव्हते. शेतकर्‍यांची काय मागणी होती? कापुस एकाधिकार योजनेत शेतकर्‍याची लूट होत होती. कापसाला भाव वाढून मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कापसाला चांगली किंमत मिळत होती आणि इकडे भारत सरकार मात्र आपल्याच शेतकर्‍यांचे शोषण करत होते.

आज जे डावे समाजवादी पर्यावरणवादी बुद्धीजीवी सरकारी हस्तक्षेप सरकारी खरेदी यांचे जोरदार समर्थन करत आहेत, एमएसपी प्रमाणे सर्वच खरेदी व्हावी असा आग्रह धरत आहेत त्यांनी याचे उत्तर द्यावे की 34 वर्षांपूर्वी सर्व काही सरकारी असताना हेच शेतकरी आंदोलन का करत होते? 

आज जे शेतकरी आंदोलन करत आहेत ते गहू आणि तांदूळ ही पीके घेणारे आहेत. ही पीकं बागायती आहेत म्हणजेच पाण्यावर येणारी पीके आहेत. तेंव्हा जे शेतकरी आंदोलन करत होते ते कापसाचे म्हणजेच कोरडवाहू पीकाचे होते. मग हे डावे ज्यांना बडे शेतकरी बागायतदार शेतकरी म्हणून हिणवायचे त्यांचा उपहास करायचे त्यांच्या आंदोलनाला हे पाठिंबा कसा काय देत आहेत? आणि बरोबर 34 वर्षांपूर्वी जे कोरडवाहू पीकांच्या आंदोलनात रस्त्यावर उतरले होते त्या शेतकर्‍यांना यांचा विरोध कसा काय होता?

10 डिसेंबर 1986 ही तारीख महाराष्ट्रात अजून एका कारणाने लक्षात ठेवेल. आज जे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा  देत आहेत त्यात कोण कोणते पक्ष आहेत? सगळ्यात प्रमुख आहे राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष. याच पक्षाचे 1986 ला पंतप्रधान होते राजीव गांधी. राजीव गांधी यांच्या कृत्रिम धाग्यांना पाठिंबा देण्याच्या धोरणाने कापसाची माती केली होती. याच पक्षाचे मुख्यमंत्री होते मा. ना. शंकरराव चव्हाण. त्यांचेच सुपुत्र माजी मुख्यमंत्री आणि आजचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नांदेड जवळच हे आंदोलन तेंव्हा झाले होते. या शेतकर्‍यांना गोळीबार करण्याचा आदेश देणारे शंकरराव चव्हाणच होते. 

अजून एक नाव या संबंधात लक्षात घ्यावे लागेल. देशाचे सलग सर्वात जास्त काळ कृषी मंत्री राहिलेले मा. शरद पवार हे तेंव्हा समाजवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते होते. याच वर्षी म्हणजेच 1986 ला एकीकडे कापूस शेतकर्‍यांचे आंदोलन पेट घेत होते त्याच काळात अगदी त्याच वेळी नोव्हेंबर महिन्यात याच परिसरांत औरंगाबाद शहरात आमखास मैदानावर मोठा मेळावा भरला होता. हा मेळावा म्हणजे मा. शरद पवार यांचा कॉंग्रेस पक्षातील प्रवेश सोहळा होता. त्याला पंतप्रधान राजीव गांधी आणि जम्मु कश्मिरचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रिय मंत्री आणि आताचे गुपकार गटाचे प्रमुख मा. फारुख अब्दूला हजर होते. एकीकडे शेतकरी कापसाच्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला होता. तीन शेतकरी भाउ पोलिसांच्या गोळीबाराला बळी पडले होते. त्या रक्ताने माखलेल्या भूमीवर आज आंदोलनाचे समर्थन करणारे आपले राजकारण सार्थ करत होते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मा. शरद पवार आणि कॉंग्रेसचे सर्वच नेते यांना कुणीतरी पत्रकाराने हा प्रश्‍न विचारायला पाहिजे होता की 34 वर्षांपूर्वी कोरडवाहू कापुस शेतकर्‍यांच्या आंदोलनाला तूम्ही का विरोध केला होता? आणि आजच्या बागायती पीकांच्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला का पाठिंबा देत आहात? तेंव्हा सरकारी खरेदी च्या विरोधात शेतकर्‍यांत असंतोष होता. आज या जोखडातून शेतकरी मोकळा होउ पहात आहेत. कृषी कायद्याने शेतकर्‍याच्या स्वातंत्र्याच्या दिशेने पाउल उचलले आहे. ते पाउल मागे घ्या म्हणून डावे आंदोलन करत आहेत. त्यांच्या प्रचाराला पंजाबातील काही शेतकरी बळी पडले आहेत. यांना हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवाले कोणत्या तोंडाने पाठिंबा देत आहेत? 

शेतकरी संघटनेने 1980 पासून शेतकरी स्वातंत्र्याची मागणी केली. कुठलाही वैचारिक गोंधळ न ठेवता अतिशय स्पष्टपणे सरकारी हस्तक्षेप उठवून लावण्याची मागणी लावून धरली. आजचे शेतकरी आंदोलन नेमक्या त्याच्या उलट सरकारने किमान हमी भाव देवून खरेदी करावी असा आग्रह धरत आहेत. कालची मागणी आमची सुटका करा, तूम्हाला सुटका करता येत नसेल तर बाजूला व्हा आम्ही आमचे स्वातंत्र्य मिळवतो. पिंजर्‍याचे दार उघडा नसता आम्ही पिंजरा तोडतो अशी होती. फक्त तूम्ही पिंजर्‍याला बाहेरून कुलूप लावू नका. अशी होती.

आजची मागणी मात्र पिंजरा चांगला कसा करा, त्याला रंग कसा द्या इतकंच नाही तर पिंजरा सोन्याचा करा, पेरूच रोज न देता डाळिंबाचे दाणे द्या, फळांमध्ये विविधता कशी येवू द्या, पिंजरा कधी घरात कधी गॅलरीत कधी बागेत नेवून कसा ठेवा अशी आहे. चुकूनही पिंजर्‍याचे दार उघडा अशी मागणी नाही. 

कोरडवाहू पिकासाठी आंदोलन करताना आम्हाला स्वातंत्र्य द्या म्हणत शेतकरी शहिद झाले. आणि याच्या उलट आज बागायती पिकाचे, मोठ्या प्रमाणात संरक्षण असलेले, सरकारी खरेदीची कवच कुंडले लाभलेले पंजाबातील शेतकरीही सरकारच्या गळ्यात पडून आम्हाला वाचवा म्हणून गळा काढत आहेत. 

कालपर्यंत शेतकर्‍याच्या विरोधात उभे असलेले मेधा पाटकर, योगेंद्र यादव आणि सगळेच पर्यावरणवादी समाजवादी डावे आज शेतकर्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसून येत आहेत. यातूनच या आंदोलनाचे वैचारिक पितळ उघड पडताना दिसत आहे. 

निवृत्ती कर्‍हाळे, परसराम कर्‍हाळे आणि ग्यानदेव टोंपे या शेतकर्‍यांचे बळी सरकारी हस्तक्षेपाच्या धोरणाने घेतले. त्यांचे आत्मे आज स्वर्गात हळहळत असतील की आज पंजाबचे शेतकरी आपल्या मागणीच्या नेमक्या उलट्या मागणीसाठी आंदोलन करताना दिसत आहेत. 

दोन दिवसांनी म्हणजेच 12 डिसेंबर रोजी युगात्मा शरद जोशी यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी शेतकर्‍याला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला. सरकारी पिंजरा तोडायची दिशा दाखवली. त्यांच्या या खडतर मार्गावर चालताना 23 शेतकरी भाउ शहिद झाले. शेतकरी आंदोलनातील 23 हुतात्म्यांच्या रक्ताने माखलेला लाल रंगाचा बिल्ला शेतकरी विचाराचा पाईक सतत आपल्या छातीवर अभिमानाने लावत असतो. तेंव्हा या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, शरद जोशींना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासाठी आपण सर्व शेतकरी स्वातंत्र्याची शपथ घेवू या. आताच्या भीकमाग्या शेतकरी आंदोलनाचा संपूर्ण पराभव होईल यासाठी प्रयत्न करू या.

कृषी कायद्याने शेतकरी स्वातंत्र्याची पहाट होताना दिसत आहेत. आपण त्याचे स्वागत करू. 

यूं खूं की महक है के लबे यार की खुशबू
किस राह की जानिब से सबा आती है देखो!
गुलशन मे बहार आई के जिंदा हुवा आबाद?
किस सिम्त से नग्मों की सदा आती है देखो !

(हा रक्ताचा दरवळ आहे की प्रियेच्या ओठांचा सुगंध? हा पूर्वेकडून येणार्‍या पहाटवारा कोणत्या वाटेने येत आहे ते पहा. वसंत ऋतु फुलला आहे की तुरूंग गजबजला आहे. कोणत्या दिशेने गाण्याचे स्वर ऐकू येत आहेत- सुरेश भट यांनी आपल्या एल्गार कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेत या ओळींचा उल्लेख केला आहे.)

शेतकरी आंदोलनातील सर्व शहिदांना आणि मा. शरद जोशी यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन.

शेतकरी स्वातंत्र्याचा विजय असो! इडा पीडा टळणार आहे बळीचे राज येणार आहे !!

(छायाचित्रातील शहिदांचे पुतळे गावकर्‍यांनी पै पै गोळा करून पदरचे पैसे खर्चूृन खासगी देणगी मिळालेल्या जमिनीवर उभारले आहेत. सरकारी जमिनीवर नेत्यांची स्मारकं सरकारी खर्चाने उभे करणार्‍यांनी याची नोंद घ्यावी. या शेतकरी भावांची माय बहिणींची नियत साफ आहे. हीच शेतकरी चळवळीची शरद जोशींची पुण्याई आहे.)

             श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 
  

Wednesday, December 9, 2020

मूर्ती मालिका - १५

 

येरगी येथील काळम्मा

सरस्वतीची एक अतिशय सूंदर मूर्ती होट्टल पासून जवळच असलेल्या येरगी (ता. देगलूर जि. नांदेड) येथे आहे. स्थानिक लोक "काळम्मा" या नावाने तीची पूजा करतात.
ही मूर्ती आसनस्थ आहे. सरस्वती ओळखु येते कारण डाव्या वरच्या हातात आपण ज्याला एकतारी म्हणून ओळखतो तशी एकतंत्री वीणा आहे. त्याच बाजूला खालच्या हातात पुस्तक आहे. उजवा खालचा हात नीट दिसत नाही त्या हातात अक्षमाला आहे. वरच्या हातात अंकुश आहे. हळेबीडू येथील नृत्त मूद्रेतील सहा हातांच्या सरस्वतीच्या एका हातात अंकुश दाखवलेला आहे. तसा तो येथे आढळून येतो. कधी अंकुशाच्या ऐवजी पाश दाखवलेवा असतो. वीणा आणि पुस्तक जास्त आढळून येतात. त्यावरूनच ढोबळमानाने ही मूर्ती ओळखता येते.
मूर्तीच्या अंगावरील दागिने विशेषत: गळ्यातील हार अप्रतिम आहे. असे चौरसाकृती "नेकलेस" अगदी आजही फॅशनच्या नावाने लोकप्रिय आहे. त्याची पाळंमुळं या आठशे वर्षांपूर्वीच्या मूर्तीमध्ये सापडतात. होयसळ शैलीतले हे शिल्पांकन आहे.
पाठीमागे सहा देवतांच्या मूर्ती आहेत. अजून एक मूर्ती जी छायाचित्रात दिसत नाही ती असावी म्हणजे या सप्त मातृका असतील. पायाशी हंस कोरलेला आहे. पण खंडित असल्याने त्याची ओळख नीट पटत नाही.
Ainoddin Warsi
या मित्राने मूर्तीचा फोटो पाठवला.
Rajesh Kulkarni
यांनी या ठिकाणाची माहिती पुरवली. अभ्यासकांनी या सरस्वती मूर्तीवर अजून प्रकाश टाकावा. सरस्वती मंदिर म्हणून या ठिकाणाचा विकास झाला पाहिजे.
(आपणा सगळ्यांच्या प्रेमानं मी खरंच अवघडून गेलोय. नवनविन मूर्तींची माहिती आपण पाठवत अहात. हे मूर्ती व्रत आता माझे एकट्याचे उरले नसून सर्वांचेच झाले आहे. तूम्ही पाठवत असलेल्या फोटोंचे माहितीचे मन:पूर्वक स्वागत. मी माझ्या कुवतीप्रमाणे याला न्याय देत राहिन. परत धन्यवाद. रोज शक्य नाही पण शक्य तसे लिहित राहिन.)



मकर तोरणावरील देखणा नटेश
मंदिराच्या मुख्य मंडपातून गर्भगृहाकडे जाताना जो पॅसेज लागतो त्याला अंतराळ म्हणतात. या भागात डाव्या उजव्या भिंतींवर देवकोष्टके असतात. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची जी चौकट असते तिच्या वरच्या भागाला मकर तोरण म्हणतात. होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथील मंदिराच्या मकर तोरणावर हा नृत्य करणारा शिव कोरला आहे ( नृत्य शिव म्हणजे नटराज नव्हे). नटराज मूद्रेशिवाय शिवाच्या नृत्य मूद्रीत शिल्पांना नटेश असे म्हणतात. डावा पाय जमिनीवर आणि उजवा पाय उचललेला अशी ही मूद्रा आहे. (नटराज मूद्रेत उजवा पाय जमिनीवर आणि डावा उचललेला असतो) आजूबाजूला भक्तगण वाद्य वाजवत संगीतात गुंग झालेले आहेत. भक्तांच्या चार मूर्ती असून दोन वाद्य वाजवत आहेत तर दोन ललित मूद्रेत उभ्या असून नृत्याला साथ देत आहेत. मुख्य नर्तकाच्या मागे "कोरस" म्हणून कसे इतर उप नर्तक नाचत असतात तसे.
मगरीच्या मुखातून निघालेले नक्षीचे तोरण शिवाच्या माथ्यावर आहे. हे तोरण मोठे कलात्मक आणि सुंदर आहे. डाव्या खालच्या हातात बीजपुरक आहे. उजव्या वरच्या हातात डमरु आणि खालचा हात वरद मूद्रेत असून त्याच हातात अक्षमाला आहे. पायाशी नंदी बसलेला आहे.
हे मंदिर शिवाचे आहे हे सुचित करणारे हे शिल्पांकन गर्भगृहाच्या चौकटीवर दिसून येते. मंदिरांवरच्या शिल्पात खुप अर्थ दडलेला असतो. केवळ कोरायचे म्हणून शिल्प कोरले असे होत नाही. या शिल्पातील इतर मूर्तीही लयबद्ध आहेत. तोरणाच्या वरतीहि डाव्या उजव्या कोपर्यात गंधर्व किन्नर कोरलेले दिसून येतात. शिडी लावून वर चढून ही शिल्पं नीट पाहिली पाहिजेत. त्यांची सुंदर छायाचित्र, चलचित्रण (व्हिडिओ) करून ठेवले पाहिजे. म्हणजे सामान्य रसिकांना त्याचा आनंद घेता येईल. अन्यथा शिल्पातले बारकावे लक्षात येत नाहीत. खुप वरचे किंवा पुरेसा प्रकाश नसलेल्या जागचे दिसतही नाही.
छायाचित्र सौजन्य


पशु पक्षी शिल्पं घोटण
मंदिरांवर कोरलेल्या शिल्पांमागे काही एक अर्थ दडलेला असतो. पण काही शिल्प काही वास्तुरचना या सौंदर्याचा भाग बनुन निखळ कलात्मक आविष्कार बनुन येतात. पशु पक्षांच्या या सहा जोड्या घोटण (ता. शेवगाव जि. नगर) थेथील मल्लिकार्जूनेश्वर मंदिरावरील आहेत. मंदिराच्या पायाशी गजथर, अश्वथर असतो. पण हे प्राणी युद्धात वापरले जाणारे आहेत. मोर हंस गरुड हे देवतांचे वाहन आहैत. पण घोटण मंदिरावरील ही शिल्पे मुख्य मंडपावरील खांबांवर स्वतंत्र शिल्प म्हणून कोरलेली आहेत हे विशेष. बदक, हत्ती, हंस, वराह, हरिण आणि वानर अशा या सहा जोड्या आहेत. यातही परत नर मादी असं काही दाखवलं असतं तर त्यालाही काही वेगळा अर्थ देता आला असता. इथे तसंही नाही. केवळ जोड्या आहेत. मुख्य मंडपाच्या स्तंभांवर पौराणीक संदर्भ कोरलेले असतात किंवा नक्षी असते. पण इथे प्रामुख्याने पशु पक्ष्यांच्या जोड्या आहेत.
तेराव्या शतकातील या मंदिराचा जिर्णोद्धार पेशवेकाळात १८ व्या शतकात करण्यात आला. पुरातत्व खात्याकडून हे मंदिर चांगल्या पद्धतीनं जतन केलं गेलं आहे. पैठणपासून दक्षिणेला २० किमी अंतरावर हे मंदिर आहे. इथपर्यंत जाण्यासाठी रस्ता चांगला आहे.
(छायाचित्र
Vincent Pasmo
)

श्रीकांत उमरीकर औरंगाबाद 9422878575

Tuesday, December 8, 2020

गर्द हिरवाईत सुचलेली कविता ...



उरूस, मंगळवार 7 डिसेंबर 2020
   
लॉकडाउनच्या काळात अजिंठा डोंगरांत फिरत असताना एक सुंदर अनुभूती आली. ‘हिरवे हिरवे गार गालिचे’ ही बालकवींची कविता ओठावर घोळत होती. सर्वत पसरलेली मखमालीची हिरवी चादर. आभाळाची निळाई, मधूनच दाटून आलेले ढग आणि कोसळत चाललेल्या पाउस धारा. परत पडणारं ऊन.

वेताळवाडीच्या किल्ल्याला वळसा घालून पलिकडच्या डोंगर कपारीत रूद्रेश्‍वर लेणी आहे. तिथे आम्ही भटकत होतो.  उंचावरून कोसळणारा धबधबा, त्याचा नाद, त्या कातळात कोरलेली लेणी. दोन एक हजार वर्षांपूर्वी जो कुणी इथे पहिल्यांदा लेणी खोदण्यासाठी येवून राहिला असेल त्याची अनुभूती काय असेल? त्याला काय म्हणून इथेच लेणी खोदावी वाटली?

हे सगळं पहात असताना माझ्या मनात आपोआपच कविता सुचत गेली. शब्दांचा एक नादच डोक्यात घुमायला लागला. या परिसरांत या आधीही आलेलो होतो. पण ही अनुभूती पहिल्यांदाच येत होती.

नुसतीच कविता लिहीली आणि संपलं असंही होत नव्हतं. या शब्दांना एक लय होती. कविता लिहीणं झाल्यावर लक्षात आलं की यातील शब्द वेगळे करता येत नाहीत. त्यांची रचनाही बदलता येत नाही. बालकवी, बोरकर, महानोर, पाडगांवकर यांच्या निसर्गविषयक कवितांची एक मोहिनी मनावर आधीपासून होतीच. त्याच धर्तीवर हे शब्द आलेले आहेत हे पण जाणवत होते. एके ठिकाणी ‘कभिन्न काळा’ असा शब्द आला. शशांक जेवळीकर या मित्राने लक्षात आणून दिले की हा शब्द मर्ढेकरांच्या प्रभावातून आलेला आहे. कारण एरव्ही ‘काळा कभिन्न’ असं म्हणतो. पण उलट कभिन्न काळा असं म्हणत नाही. पुढे दुसर्‍या एका कवितेतही असाच धम्मक पिवळा शब्द आलेला आहे. 

पहिली ओळ सुचली ती पाऊस आणि सर्वत्र पसरलेली हिरवाई यांचा शाब्दिक अविष्कार बनून

डोंगर माथा । सचैल न्हातो
पाऊस रिमझिम । जवळ नी दूर
पोपट रंगी । मखमालीचा
हिरवा हिरवा । दाटे पूर  धृ० 

ही ओळ धृवपदासारखी घोळत राहिली.  धबधब्याचा नाद मंत्रघोषासारखा वाटायला लागला. पूजा करताना भोवताली पाणी शिंपडतात. मंत्र म्हणतात तसेच काहीतरी वाटायला लागले. आधी कातळ फोडूनी असा शब्द मी लिहीला होता. नंतर लक्षात आले की फोडूनी पेक्षा भेदूनी असा शब्द जास्त योग्य वाटतो. वार्‍याचा नाद, पाणी कोसळतानाचा नाद, पाणी खळखळा वाहतानाचा नाद असे सगळे सूर एकमेकांत मिसळून गेले आहेत..

कभिन्न काळा । कातळ भेदूनी
पाणी उसळे । झरा होवूनी
मंत्रघोष हो । चैतन्याचा 
सभोवताली । तुषार सिंचूनी
वार्‍यामधूनी । नाद लहरतो
सुरात मिसळूनी । जातो सूर ॥१

या परिसरांत मोर आहेत. जळकी नावाच्या गावात एका शेतकर्‍याने तर कोंबडीच्या अंड्यासोबत मोराचे अंडे उबवले. तो मोर कोंबडीच्या पिलांसोबतच वाढला. आज तो कोंबडीसारखाच घराच्या सभोवताली फिरत असतो.  मोरांच्या केका परिसरांत नेहमी ऐकू येतात. केवळ मोरच पिसे फुलवून नाचत आहेत असे नाही तर झाडांनीही पानांचा पिसारा फुलवला आहे.  

वनात कोणी । मनात कोणी
सुखे नाचतो । पिसे फुलवूनी
कानी पडती । मयुर केका
पानांमधूनी । वाजे ठेका
नादावूनी मग । खुळे पाखरू
हवेत सुर्रकन । मारी सूर ॥ २॥

या परिसरांत पळसाची झाडं भरपूर आहेत (महानोरांचे गाव पळसखेडे याच भागातले). तळ्याकाठी पाण्यात वाकुन पाहणारी पळसाची फांदी, काठावरची दगडी शिळा, चरणारी गाय हे सगळं आपोआपच कवितेत आलं. याच पसिरांत अजिंठा सारखी अप्रतिम शिल्पे घडली. तेंव्हा ही दगडी शिळा शिल्पासाठी झुरते आहे अशी ओळ सहजच कवितेत आली. आता पावसाळा चालू होतो. पळसांच्या लाल फुलांचा वसंत ऋतू ही खूप दूरची गोष्ट.

तळ्यात वाकून । पळस शोधतो
लाल फुलांचे । हसरे क्षण क्षण
काठावरची । शिळा एकटी
शिल्पासाठी । झुरते कण कण
चरता चरता । गाईचे मग
तिथेच अडूनी । राहते खूर ॥३॥

त्या डोंगर कपारीत भव्य कातळकडा भोवती उभा असताना आपल्या खुजेपणाची जाणीव खुपच तीव्र होत गेली. हे  भव्य असे जलरंगांतील चित्र कुणी रंगवलं? त्यात आपलं स्थान काय? मग यातून कवितेचा शेवट जो सुचला तो असा होता

डोंगर झाडी । अभाळ पाणी
‘जलरंगी’ या । ठिपका आपण 
भव्य रूप हे । पाहून विरते 
ताठर मनीचे । आपुले ‘मी’पण 
चैतन्याच्या । अनुभूतीने
भरून येतो । इवला ऊर ॥४॥

पावसाळ्यात या परिसरांत जरूर जा. कवितेत वर्णन केले आहे त्या निसर्गाचा अनुभव जरूर घ्या. 

(छाया चित्र सौजन्य व्हिन्सेंट पास्कीलिनी. आम्ही प्रत्यक्ष सप्टेंबर २०२० मध्ये गेलो तेंव्हाची छायाचित्रे)
 
श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, 9422878575