Wednesday, May 28, 2014

गावाकडील ताठ कण्याचे आई-वडिल !

दै. पुण्यनगरी, उरूस,  बुधवार  28 मे 2014 

आपल्याकडे कुणीही भेटले आणि थोडाफार जिव्हाळा त्याच्याबाबत वाटला की आपला स्वाभाविक प्रश्न असतो, ‘‘तूमचे गाव कुठले?’’त्याचे उत्तर मिळाल्यावर पुढचा प्रश्न समोर येतो, ‘‘गावाकडं कोण असतं?’’ भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात गेल्या 50 वर्षात शहरीकरणाचा वेग फार मोठा राहिला आहे. शहरातील लोकसंख्या आता जवळपास 50 टक्के इतकी झाली आहे. पण अजूनही का कुणास ठाऊक बहुतांश मराठी माणसांचं मन (भारतीय देखील) गावातच अडकून पडलेलं असतं. गावाकडं कोण या प्रश्नाचं उत्तर मिळतं, ‘‘आई वडिल असतात.’’
गावाकडे आईवडिल असतात असं म्हटलं की समोर येणारं चित्र साधरणत: असं असतं. पक्की सडक सोडून गाव थोडासा आतमध्ये असतो. ही कच्ची सडक पुढे दुसर्‍या छोट्या गावाकडं गेलेली असते. फाट्यावर थोडीफार दुकानं, टपरीवजा हॉटेल. मोडक्या अवस्थेत बस स्टॉपचं पत्री शेड. जून्या खराब आणि आता सिमेंटच्या पक्क्या रस्त्यानं आत गेलं की एकमेकांना खेटून असलेली बसकी घरं लागतात. रस्त्याच्या बांधकामानं घरं खाली गेलेली असतात. 
सर्वसाधारण घरं साधी दगडा-मातीची ढासळलेल्या अवस्थेत दिसतात. दरवाजा जरा बर्‍या अवस्थेत असतो. त्यातून आत गेलो की खाटेवर पडलेले वडिल आणि स्वयंपाकघराच्या उंबर्‍याशी बसून काहीतरी निवडीत टिपत बसलेली म्हातारी आई. जनावरांचा गोठा ओस पडलेला. तिथली मातीची जमिन पूर्ण उखडलेली. बाकी घराच्या काही भागात जूजबी थोडंफार दूरूस्तीकाम करून घेतलेलं असतं. आईवडिल थकलेले असतात. वाड्यात जळमटं झालेली असतात. आर्थिक परिस्थिती खराब असेल तर घर म्हणजे वाडा नसून नुसतं पत्र्याचं छोटं शेड असतं. बाकी वरवरची सुबत्ता सोडता आई वडिल मात्र कुठल्याही गावाकडच्या घरातले थकलेले, उदास डोळ्यांचे, पोरंबाळं आता फिरकत नाही ही खंत बाळगणारे असतात.  त्यात फारसा फरक नाही.
बरेच आईवडिल गावाकडं अडकून पडतात ते केवळ मुलांच्या संसारात अडगळ नको म्हणून नाही. तर गावाकडचं घर आणि शेतीचा तुकडा, गावगाड्यातले रीतरिवाज परंपरा त्यांना बांधून ठेवत असतात. आपल्या देहाची माती गावच्या मातीत मिळावी असली काहीतरी समजूत मनाशी घट्ट बाळगून ते गावपांढरीशी चिटकून असतात.
पण शेत नाही, गावात जूनं घर नाही असा कुणी शहरातील मोठं घर सोडून गावाकडं निवृत्तीनंतर घर बांधून राहिल का? धनंजय चिंचोलीकर या आमच्या लेखक मित्राच्या आईवडिलांनी हा समज खोटा ठरवला. कन्नड सिल्लोड रस्त्यावरील चिंचोली लिंबाजी हे त्यांचे मुळ गाव. धनंजयच्या शिक्षक असलेल्या आईवडिलांनी (लक्ष्मीकांतराव व सुमन चिंचोलीकर) निवृत्तीनंतर गावाकडं उचं जोतं घेवून, मोठ्या उंचीचं छोटं तीन खोल्यांचं टूमदार घर बांधलं. परसात कडीपत्ता, लिंब, मोगरा अशी छोटीशी बाग धनंजयच्या आईनं मोठ्या हौसेनं पोसली आहे. स्वत: धार्मिक कर्मकांडांना महत्त्व न देणार्‍या या जोडप्यानं स्वखर्चानं दत्ताचं एक मंदिर विठ्ठल मंदिराच्या परिसरात उभारलं. औरंगाबाद शहरात स्थायिक असलेल्या दोन मुलं दोन मुलींचा आग्रह न जुमानता गावाकडं राहण्याचा निर्णय घेतला आणि गेली 20 वर्षे तो अमलात आणून दाखवला आहे.  मुलाबाळांच्या संसारातून बाजूला होण्याची "वानप्रस्थ" आश्रमाची परंपरा आपल्याकडे आहे. आधुनिक काळातील वानप्रस्थाचे उदाहरणच चिंचोलीकर काका-काकूंनि समोर ठेवले आहे.
त्यांच्या घरात देवीची एक मोठी मुर्ती पाहण्यात आली. कापडांत झाकून ठेवलेली होती. चौकशी केल्यावर लक्षात आलं की सार्वजनिक नवरात्र महोत्सवातील ही मूर्ती आहे. म्हणजे या उपक्रमांतही यांचा सहभाग मोलाचा असणार. शिवाय स्वाध्यायाचे वर्ग त्यांच्याकडे चालतात.
गावानेही या जोडप्याला मोठा आदर दिला आहे. दसर्याच्या पूजेचा मान त्यांना दिला जातो. घराबाहेर पडले कि कुणीही त्यांना बस स्थानका पर्यंत सोडते. सगळ्या उपक्रमात त्यांचा सल्ला घेतला जातो. त्यांचा निर्णय अंतिम मानला जातो.
गावचे ग्रामदैवत असलेल्या देवीचे विसर्जन त्यांच्या दारासमोरच्या आडात केले जाते. तो आड त्यांची चांगला व्यवस्थित बांधून घेतला आहे. त्यावर लोखंडाची जाळी बसवून कुणी पडू नये याचीही काळजी घेतलेली आहे. अंगणातील सामाजिक धार्मिक असो की परसातील बाग असो या जोडप्यानं कलात्मक दृष्टिकोन  जपत आपलं आयुष्य समृद्ध केलं आहे.

वाडवडिलांची शेतवाडी घरदार काहीच नसताना या जोडप्याला गावाकडं का रहावं वाटत असेल? स्वतंत्र पेन्शन  असल्याने कुणावर अवलंबून राहण्याचीही गरज नाही. ही कुठली ओढ असेल? काकांच्या बोलण्यातून सतत साधेपणा आणि माणसांबद्दलचा जिव्हाळा वहात असतो.  काकू तर फारशा बोलतच नाहीत. त्या केवळ नजरेनंच बोलतात असं लक्षात आलं.
गावकर्‍यांना अडीअडणींना हे जोडपं मदत करत राहतं. खरं तर आपल्या पुढच्या पिढीतील किंवा त्याही पुढच्या पिढीतील कुणीच गावाकडं परतणार नाही हे माहित आहे. गावातली कुठलीच सत्ता त्यांच्यापाशी नाही. आपण काही फार मोठी समाजसेवा करत आहोत असा आव बोलण्यात वा कृतीत नाही. गावाला एकत्र बांधून ठेवायचं म्हणून धार्मिक उपक्रम आवश्यक असतात इतक्या साध्या विचारसरणीतून त्यांनी नवरात्र महोत्सव असो, दत्त मंदिर असो, स्वाध्याय असो की गावदेवीची जत्रा असो यांचे महत्त्व ओळखले. ज्या काळात पुरोगामी विचारवंत कुठल्याही जत्रा उत्सवांकडे हेटाळणीने पहायचे. आजही पाहतात. त्या काळात एक निवृत्त शिक्षक आपल्या बायकोला घेवून गावाकडं येतो आणि या सगळ्यात रस घेतो हे विलक्षण आहे. या उपक्रमांमुळे गावातील व्यसनांचे प्रमाण कमी होते हे त्यांचे निरिक्षण मोठं मार्मिक आहे.
अहिल्याबाई होळकर यांच्यावरील पुस्तकात विनया खडपेकर यांनी अहिल्याबाईंनी मंदिरं, नदिवरील घाट यांच्या उभारणीतून सामाजिक शांतता प्रस्थापित करण्याचे धोरण कस आखले याचे मोठे मार्मिक विश्लेषण केले आहे. युद्धामुळे प्रचंड नुकसान होते शिवाय आपण बाई असल्यामुळे आपल्याला मर्यादा आहेत. त्यापेक्षा आपण धार्मिक बाबींचा चांगला उपयोग समाजासाठी करून घेवूत हे ध्यानात ठेवून त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने धार्मिक स्थळांचा विकास केला. चिंचोलीकर काकांना हे सारं स्पष्टपणे कदाचित माहितही नसेल. पण त्यांनी एक छोटं प्रात्यक्षिक आपल्या गावात करून दाखवलं आहे. सामाजिक काम करताना किंवा धार्मिक कामांतही सहभाग नोंदवताना माणसं अतिशय कदरलेली असतात. वैताग दाखवत राहतात. उगाच हे सारं गळ्यात पडलं असा भाव त्यांच्या मनात असतो. पण चिचांलीकर काकांच्या आणि काकुंच्या वागण्या बोलण्यात हे काहीच दिसत नाही. अगदी सहजपणे ऐंशी वर्षाच्या वयातही ते या उपक्रमांमधून वावरत असतात. 
ज्या काळात प्रवास करणे मोठं जिकीरीचं काम होतं. त्या 1960 ते 80 च्या काळात या जोडप्याने जवळपास संपूर्ण भारत पालथा घातला आहे. हे मला समजलं आणि मोठं आश्चर्यच वाटलं. मिळेल त्या साधनांनी काका काकूंनी भारतभर मिळून प्रवास केला. स्वत:ची गाण्याची नाट्य संगीताची आवड जोपासली. आजही त्यांची नातवंडं आजीआजोबांची आठवण आली की गाडीत तबला पेटी घेवून गावाकडं जातात. आजीआजोबांना जमेल तसं गाणं ऐकवतात. स्वत: आनंद घेतात, त्यांना आनंद देतात. आयुष्याच्या निरस चित्रात कलेचा रंग भरून घेतात/देतात. 
धनंजयच्या सासुबाईंचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला होता. निर्णय घेणं सोपं असतं पण राबविणं महाकठीण. जमलेल्या लोकांना वाटले घरची म्हातारी माणसं अशा निर्णयाला परवानगी देतील का? पण धनंजयच्या आई-वडिलांनी पारंपरिक मतं बाजूला ठेवून सुनेच्या निर्णयाला पाठिंबा देवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 
हिंदू धर्मात उदारमतवादी विचारांची एक फार मोठी अशी परंपरा शतकानुशतके राहिलेली आहे. या परंपरेचे नेतृत्व मोठ मोठ्या संत महात्म्यांनी केलं हे खरं आहे. पण ही परंपरा बळकट करण्याचे महत्त्वाचे काम चिंचोलीकर काका- काकुंसारख्यांनी गावपातळीवर केलं आहे.   इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या एका कवितेत वर्णन केले होते

मी  पाहतो तुझा गाव
आणि तू येतोस माझ्या गावाला
उगाच नावाला  कौतुक करतो आपण
एकमेकांच्या आईबापाचे घरादाराचे
चौकटीवर बहिणींनी काढलेल्या
मोडक्या तोडक्या मोराचे
भाऊ भावजयांनी रोपलेल्या शेताचे
आणि गावकर्यांनी केलेल्या स्वागताचे
सगळ्यांची मेटे मोडलेली दिसत असताना.


याच्या नेमके उलट धनंजयच्या गावाकडे गेले की मेटे न मोडलेले 
म्हातारे पण  ताठ कण्याचे आईवडील दिसतात. आपल्या जवळच्या मित्राचे ते आईवडिल आहे या समाधानापेक्षा असा विचार करणारी माणसं आपल्या जवळ आहे हे समाधान वाटत राहते.    
  
   

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, May 20, 2014

‘नोटा’ चा सोटा ‘आप’च्या पाठीत !!



                                        दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 20 मे 2014 


मोदीलाटेत सारेच वाहून गेले. आधीच शस्त्र टाकून देणारी कॉंग्रेस सोडून द्या पण स्थिर बुद्धी ठेवून विचार करणारेही वाहून जात आहेत. खरे तर समोर आलेल्या आकडेवारीचा आभ्यास करून सारासार विचार करून काही एक मांडणी केली जायला हवी.  या निवडणुकीत वरिल पैकी कुणीही नाही (नन अबाव्ह द ऑल-नोटा) चा पर्याय मतदान यंत्रावर देण्यात आला होता. हा प्रयोग यापूर्वी दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ विधानसभा निवडणुकी झाला होता. या नोटाला मिळालेल्या मतांचा विचार करायला हवा. 
महाराष्ट्राचा विचार केल्यास  एकूण सरासरी मतदान 65 टक्के इतके झाले आहे. म्हणजे पहिलेच 35 टक्के लोक घरीच बसले. तरी एकूण मतदान पूर्वीपेक्षा दहा टक्क्यांनी वाढलेले आहे. अशी नेहमी मांडणी केली जाते की मतदारांना घरातून बाहेर काढणे मोठे कठीण काम आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची फौज पाहिजे आहे. पैसे पाहिजे आहेत. इतकं करून हे लोक कुणाला मतदान करतील सांगता येत नाही. मोठे प्रस्थापित पक्ष साम-दाम-दंड-भेद वापरून मतदान करून घेतात हा आरोप छोटे पक्ष नेहमी करत आले आहेत. एखादा चांगला चारित्र्यवान बुद्धीमान उमेदवार नेहमीच असे सांगतो की आपल्यापाशी पैसे नाहीत. आपल्यापाशी ताकद नाही. आहे तो फक्त सामान्य  लोकांचा पाठिंबा. हे लोक घराबाहेर पडले आणि त्यांनी मतदान केले की आपला विजय नक्कीच आहे. 
आता हाच नेमका विचार करण्यासाखा प्रश्न आहे. मोठ्या पक्षांना मिळालेले मतदान सोडून देऊ. ते कुठल्यातरी अमिषाने पडले आहे किंवा जाहिरातींचा भडिमार झाला म्हणून पडले असे थोड्यावेळापुरते गृहीत धरू. पण जे लोक आपणहून घराबाहेर पडले. मतदान केंद्रापर्यंत गेले. त्यांची नावे गहाळ झाली नव्हती. त्यांना व्यवस्थित मतदान करता आले. आणि या लोकांनी सगळ्या उमेदवारांना नाकारून नोटा (पैसा) नाकारून नोटाचा (वरिलपैकी कुणी नाही) पर्याय निवडला त्यांचे काय? हे अपयश कुणाचे आहे? हा कुणाला इशारा आहे?
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी निवडणुका झाल्या. यात थोड्या थोडक्या नाहीत तर तब्बल 17 जागांवर दहा हजारांपेक्षा जास्त लोकांनी नोटाचा पर्याय निवडला. हे मतदार संघ असे आहेत
बारामती- 14216, बुलढाणा-10546, दिंडोरी-10897, गडचिरोली-24488, हातकणंगले-10059, लातुर-13996, मावळ-11186, मुंबई पश्चिम-11009, नंदूरबार-21178, पालघर-21797, परभणी-17502, रायगड-20362, रत्नागिरी-12313, सातारा-10589, शिरूर-11995, सोलापुर-13118, ठाणे-13174. 
ही आकडेवारी पाहिली तर लक्षात येते की घराबाहेर पडून आग्रहाने मतदान करून गडचिरोली, नंदूरबार, पालघर या भागातील आदिवासी मागास लोकांमध्ये लोकशाहीवर विश्वास दाखवावा इतकी प्रगल्भता जरूर आहे पण सोबतच सर्वांनाच नाकारायची लोकशाहीची ताकदही ते दाखवून देतात. हे मोठे विलक्षण आहे. रायगड मुंबईला लागूनच आहे. त्यामानाने विकासाची फळे जास्त चाखायला मिळाली असा ग्रामीण भाग आहे. पण तिथेही नोटाचा पर्याय लोकांनी मोठ्या प्रमाणावर हाती घेतला आहे. परभणीत सतत शिवसेनेचा खासदार निवडून येतो आणि तो पक्ष बदलून कॉंग्रेसकडे जातो. त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा राग आहे. कॉंग्रेसवर तर सर्वत्रच नाराजी आहे. शरद पवार यांच्या बारामतीत आणि छत्रपतींचे वंशज असल्याचा माज दाखविणार्‍या उदयन राजे यांच्या सातार्‍यातही नोटाला मिळालेली मते मोठी आहेत.
पण हे विश्लेषण एवढ्यावरच थांबत नाही. नोटाचा सोटा कुणाच्या पाठी? असे विचारले तर याचे उत्तर या निवडणुकी ‘आप’च्या पाठी असेच द्यावे लागेल. त्याचे कारणही तसेच आहे.
सर्व प्रस्थापित पक्षांवर टिका करत आम आदमी पक्षाची स्थापना झाली. शिवाय आम्ही वेगळे आहोत असं त्यांनी आग्रहाने सांगायला सुरवात केली. पहिल्या दिवसापासून ते तसे भासवत होते. दिल्लीत सरकार आल्यावर तर ‘आप’ला जास्तीचा जोर चढला. संपूर्ण भारतात सर्वात जास्त (कॉंग्रेस-414 आणि भाजप-415) 443 जागा आम आदमी पक्षाने लढविल्या होत्या. सर्व प्रस्थापित पक्ष (यात छोटे मोठे सर्व आले) मतदारांना आमिष दाखवतात. आणि निवडून येतात. साहजिकच ‘आप’च्या मताने जे विचारी समजदार लोकशाहीवर विश्वास असणारे मतदार आहेत ते सर्व त्यांचे मतदार आहेत. अगदी एकही जागा न जिंकू शकलेल्या बहुजन समाज पक्षावरही आरोप केला जातो की दलितांची विशिष्ट मते ते खेचून घेतात बाकी त्यांना काही कुणी मोजत नाही. घरातून बाहेर न पडलेल्या मतदारांवर टिका करणे सोपे आहे. पण जे घरातून बाहेर पडले. त्यांनी मतदान केले. मात्र हे मतदान ‘आप’च्या उमेदवाराला केले नाही याचे कोणते कारण ‘आप’ देऊ शकतो?
ज्या मतदारसंघात दहा हजारपेक्षा जास्त मते नोटाला मिळाली त्यातीलही परत दहा मतदार संघ असे आहेत की ज्या ठिकाणी आम आदमीच्या उमेदवारांपेक्षाही नोटाला जास्त मतदान लोकांनी केले. (उदा परभणी. आपच्या उमेदवाराला मिळालेली मते 4459 आणि नोटाला मिळालेली मते 17502). हिंगोली आणि रायगडमध्ये विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा नोटाला मिळालेली मते जास्त आहेत.  
प्रस्थापित पक्ष म्हणजेच भाजप आघाडी आणि कॉंग्रेस हे तर नोटाचा विचारच करणार नाहीत कारण त्यांना तशी काहीच गरज नाही. निवडून येवो किंवा पडो त्यांना मिळणारी मते ही त्यांनी खेचून घेतलेली मते आहेत असंच आमचे तथाकथित विद्वान मानतात. म्हणजे आपणहून सामान्य मतदार लोकशाहीवर विश्वास ठेवून यांना मतदान करत नाही असाच यांचा आरोप असतो. इतर छोटे पक्ष यांनी आपआपले डबके तयार करून घेतले आहे. उदा. बहुजन समाज पार्टी. महाराष्ट्रात यांना ठराविक दलित मते मिळत राहतात. त्यांचा आपण विचार करण्याची काही गरज नाही असाच आव सर्वांनी आणलेला असतो. माध्यमांमधूनही बसपाची चर्चा होत नाही. ‘मनसे’ सारखे तोंडाळ आणि वाचाळ पक्ष म्हणजेच मुख्येत्वेकरून त्यांचे नेते सभेत मोठ मोठी भाषणं करत फिरतात, त्यांच्या मोठ्या बातम्या होतात. शिवसेनेलो पाडण्याचे पवित्र कार्य मागच्या निवडणुकात केल्यावर यावेळेस त्यांना लोकांनीच घरचा रस्ता दाखवला. तेंव्हा यांचाही या नोटाच्या पर्यायाशी काही संबंध नाही. त्यामुळे उरतो फक्त आम आदमी पक्ष. हे मतदान आपल्याकडे खेचण्यात आम आदमी पक्षाला अपयश आले. नोटाचा सोटा आम आदमी पक्षाच्याच पाठी बसला असेच म्हणावे लागते.  
महाराष्ट्रात जवळपास एक टक्का इतके मतदान नोटाला लोकांनी दिले आहे. बहुजन समाज पक्ष (2.6 टक्के) आम आदमी पक्ष (2.2 टक्के), मनसे (1.5 टक्के) शेकाप (1 टक्के), अपक्ष व इतर (3.3 टक्के) यांना मिळालेली मते बघितली तर नोटा ची काय ताकद आहे ते लक्षात येईल. म्हणजे महाराष्ट्रात स्वतंत्रपणे विचार करणारी आणि आपल्या विचारासाठी प्रत्यक्ष कृती करणारी माणसे चार लाख तेहतीस हजार एकशे ऐंशी आहेत हे तरी आपण मान्य करणार आहोत की नाही? 
भाजपने धार्मिक उन्मादाचे वातावरण निर्माण केले यात काही शंकाच नाही. कॉंग्रेसही यात कणभर मागे नाही. उलट कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक-लांगूलचालनाच्या धोरणामुळेच भाजपचे फावले हे स्पष्ट आहे. डाव्यांच्या नेतृत्वाखालची तिसरी आघाडी नावाची गोष्ट आजी आजोबांनी नातावांना सांगावी तशी ‘आटपाट नगर होते, तिथे एक गरीब तिसरी डावी आघाडी रहात होती’ अशी उरली आहे. अशावेळी महाराष्ट्रात चार लाखांपेक्षा जास्त लोक नोटाचा पर्याय निवडतात हे विचार करण्यासारखे आहे. 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, May 13, 2014

............ आईवर शक्य नाही कविता !!


          (Jan 18, 2009 - Mother With Child Painting by Padmakar Kappagantula)                                   

                                   दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 13 मे 2014 


मे महिन्याचा दुसरा रविवार जगभर ‘‘मातृदिन’’ म्हणून साजरा केला जातो. 11 मे रोजी हा दिवस यावर्षी साजरा केला गेला. आपल्या भारतीय परंपरेत तर आईचा महिमा किती वर्णन केला आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. आईवर भरपूर कविता आहेत. बहुतांश कविता अतिशय चांगल्या आहेत. ‘श्यामची आई ’ चित्रपटातील ‘आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी । स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी॥ हे गाणे ऐकून (कवी : यशवंत) ढसाढसा रडल्याची कबूली खुपजण देतात. आईवर इतक्या कविता लिहील्या गेल्या त्याचे एक साधे आणि अतिशय काव्यात्मक कारण दासू वैद्य या आमच्या कविमित्राने देउन ठेवले आहे

प्रत्येक आईचा मुलगा
कवी असतोच असे नाही
पण प्रत्येक मुलासाठी त्याची आई
एक कविता असते.


यामुळे स्वाभाविकच आईवर भरपूर लिहील्या गेलं. इतकं लिहीलं जाऊनही आई परत शब्दांबाहेर शिल्लकच राहते. हिंदी/उर्दूमध्ये दोन कविता या दृष्टिने मला फार आवडतात. चंद्रकांत देवतालेंनी आपल्या कवितेत कबुलीच दिली आहे, 

मां के लिए संभव नही होगी 
मुझसे कविता
जब कोई मां छिलके उतारकर
चने, मूंगफली या मटर के दाने
नन्ही हाथेलियों पर रख देती है
तब मेरे हाथ अपनी जगह पर 
थरथराने लगते हैं ।

मां ने हर चीज के 
छिलके उतारे मेरे लिए
देह, आत्मा, आग और 
पानी तक के छिलके उतारे
और मुझे कभी भूखा
नही सोने दिया ।

मैंने धरती पर कविता लिखी है
चंद्रमा को गिटार में बदला है
समुद्र को शेर की तरह 
आकाश के पिंजरे मे
खडा कर दिया है
सूरज पर कभी भी
कविता लिख दूंगा
मां पर नही लिख सकता कविता ॥


प्रतिभावान कवी एखाद्या शब्दांत सारं काही सांगून जातो. ‘मां ने हर चीज के छिलके उतारे मेरे लिये’ इतक्या साध्या शब्दांत देवताले प्रचंड मोठा आशय सांगून जातात. आईवर कविता शक्य नाही ही कुण्या एका कविची मर्यादा नसून ती आई या विषयाची व्याप्ती आहे हे देवतलेंना सुचवायचे आहे. अतिशय लोकप्रिय कवी गीतकार नीदा फाजली यांनी आईवर एक गझल लिहीली आहे. आई म्हणजे संपूर्ण घर किंवा एक संस्कृतीच असते. तिची वेगळी अशी व्याख्या कशी करणार?

बेसन की सोंधी रोटी पर
खट्टी चटनी-जैसी मॉं 
याद आती है चौका-बासन
चिमटा, फुकनी-जैसी मॉं 
 
बान की खुर्री खाट के ऊपर
हर आहट पर कान धरे
आधी सोयी आधी जागी
थकी दोपहरी-जैसी मॉं

बीबी, बेटी, बहन, पडोसन
थोडी-थोडी-सी सब में
दिन भर इक रस्सी के ऊपर
चलती नटनी-जैसी मॉं

बॉंट के आपना चेहरा, माथा
आँखे जाने कहॉं गयी
फटे पुराने इक अल्बम में
चंचल लडकी-जैसी मॉं


निदा फाजली यांची कविता भाषा सोडली तर आपलीच आहे  हे भारतातील कुठल्याही प्रांतातल्या माणसाच्या सहज लक्षात येईल. भावूक पातळीवर कविता लिहीणारे तर आईच्या प्रेमात आंधळे होणारच. पण महान तत्त्ववेत्तेही यातून सुटलेले नाहीत. शंकराचार्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग अतिशय विलक्षण आहे. त्यांना संन्यासाची परवानगी देताना आईनं अट घातली की माझ्या मृत्यूसमयी तू माझ्याजवळ हवा आहेस. त्याप्रमाणे आईचा मृत्यूप्रसंग त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणला. आणि त्यासमयी ते लांबचा प्रवास करून पोचले. तीच्या देहांतानंतर अंत्यविधी करण्यासाठी कर्मठ ब्राह्मण आईच्या देहाला शंकराचार्यांना हात लावू देईनात. यांनी सन्यास घेतला त्यामुळे आता ते धर्मदृष्ट्या आईचा मुलगा नाहीत. सर्वांना धर्म शिकविणार्‍या तत्त्वज्ञ शंकराचार्यांनी कर्मठ ब्राह्मणांचे ऐकले नाही. आईचा अंत्यविधी आपणच करणार असे आग्रहाने प्रतिपादले. इतरांनी अंत्यविधीवर बहिष्कार टाकला. तरी शंकराचार्य डगमगले नाहीत. त्यांनी कुर्‍हाडीने आईच्या देहाचे तुकडे करून पोत्यात भरले. आणि ते पाठकुळी घेवून नदीकाठी सरणावर ठेवले. त्यांचा विधीवत अंत्यसंस्कार केला. 
आईवर लिहीताना अजून एक गोष्ट लेखकांना खुणावत असते आणि ते म्हणजे आपले बालपण. आई म्हणजे नुसती आई नसून तिच्या आठवणींसोबत आपले बालपणही घट्ट बिलगलेले असते. बर्‍याचदा तर असे होते की आई, लहानपणीचे घर, घरातली माणसे, आपण राहतो ती गल्ली हे सारेच आईत एकजीव होऊन जाते. जॉं निस्सार अख्तर सारख्या प्रतिभावंत बापाच्या पोटी जन्मलेले जावेद अख्तर यांचा वडिलांवर कायम राग होता. आई गेल्यावर ते वडिलांशी भांडून घराबाहरे पडले. याच जावेद यांना लहानपण आठवते ते आईच्या आठवणींना लगटूनच. 

मुझे यकीं है सच कहती थी 
जो भी अम्मी कहती थी
जब मेरे बचपन के दिन थे 
चांद में परियां रहती थी

एक ये दिन जब सारी सडके
रूठी रूठी लगती है
एक वो दिन जब ‘आओ खेले’
सारी गलियॉं कहती थी

एक ये दिन जब लाखों गम
और काल पडा है आंसू का
एक वो दिन जब एक जरा सी
बात पे नदियॉं बहती थीं


आईवर लिहीण्याचा प्रयत्न आजवर खुपजणांनी केला. तरी आई नावाच्या संज्ञेची व्याख्या कुणाला करता आली नाही. आईनं आपल्यासाठी सोसलेल्या असंख्य कळांपैकी एकजरी कळ तीच्यासाठी सोसता आली तर आई नावाच्या संज्ञेची व्याख्याही करता येईल. 

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Tuesday, May 6, 2014

रस गळतो | अंबा छळतो । दिल्लीचा राजा | झिम्मा खेळतो ||


                                      दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 6 मे 2014 

भारतीय हापुस अंब्याला युरोपात बंदी घातल्यची बातमी आली आणि मोठा गदारोळ माजला. फार मोठी आपत्ती कोसळली आहे, भारतीय मालाला बंदी घालून भारतावर काहीतरी अन्याय केला गेला आहे, भारतीय शेतकर्‍यांचे फार मोठे नुकसान होत आहे, यांना आपणही बंदी घालून चांगला धडा शिकवला पाहिजे असे अकलेचे तारे तोडल्या गेले. नेमके किती अंबे युरोपात जातात? एकूण अंब्याच्या बाजारपेठेत त्यांचा वाटा किती याची जरा जरी तपासणी केली असती तर वस्तूस्थिती समजली असती. पण तशी समजून घेण्यात आपल्याला मुळीच रस नसतो. परिणामी काहीतरी शुल्लक गोष्टीवर गदारोळ माजविला जातो. एकूणच दिल्लीचे धोरण शेतमालाच्या भावाशी झिम्मा खेळण्याचेच असल्याने हे खरेही वाटते.
मागच्या वर्षी युरोपात एकूण 3250 व अमेरिकेत 175 असा जवळपास 3500 टन अंबा निर्यात केला गेला. भारतातील हापूसची सगळ्यात मोठी घावूक बाजारपेठ म्हणून वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिल्या जाते. एकट्या वाशीमध्ये दररोज सहा हजार टन अंबा येतो. एकूण सिझन मध्ये अंब्याचा व्यापार जवळपास साडे तीन लाख टन इतका होतो. म्हणजे एकूण व्यापाराच्या केवळ एक टक्का अंबा युरोपला जातो. आता जर यावर बंदी आली तर असे काय मोठे आभाळ कोसळले? शंभरातील एक रूपयाच्या व्यापाराची अडचण निर्माण झाली. पण बाकी नव्व्याण्णव रूपयाचे व्यवहार तर आधीसारखेच चालू आहेत ना त्यांचे काय? म्हणजेच जो अंब्याचा इतर व्यापार चालू आहे त्याबद्दल कोणी काहीच बोलायला तयार नाही. आणि युरोपच्या एक टक्का व्यापाराबाबत मात्र गोंधळ सुरू आहे.
अंब्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ ही हापूसची नसून इतर गावठी अंब्यांची आहे. आणि ही किमान हापूसच्या व्यापाराच्या वीस पट आहे. भारतभर कित्येक गावठी जातीचे अंबे तयार होतात आणि जवळपासच्या बाजारात विक्रीला येतात. या अंब्याला फार दुरवरची बाजारपेठ परवडत नाही. कारण वाहतूक व्यवस्था, साठवणुकीसाठी शीतगृह, पॅकिंग इत्यादी बाबत आपल्याकडे आनंदी आनंद आहे. परिणामी स्थानिक फळांना स्थानिक बाजारेपठ हाच व्यवहार्य पर्याय उपलब्ध असतो.
दुसरी बाब म्हणजे अंब्याच्या बाबतीत ताज़्या फळांपेक्षा प्रक्रिया केलेल्या अंब्याच्या गराचा (मँगो पल्प) व्यापार प्रचंड मोठा बनला आहे. ताजे अंबे निर्यात करायचे म्हणजे मोठी किचकट प्रक्रिया आहे. त्या अंब्याचा रंग, त्याची चव, त्याचा आकार याबाबत प्रचंड काळजी घ्यावी लागते. त्याचे पॅकिंग विशिष्ट पद्धतीने व्हायला हवे. विशिष्ट दिवसांमध्ये हा अंबा विकला गेला तरच त्याचे पैसे मिळतात. या उलट मँगो पल्पसाठी मात्र तूलनेने दुय्यम स्थितीतला अंबाही चालतो. शिवाय हा पल्प तयार करून हवाबंद डव्यांत वर्षभर विकता येतो. त्याला दिवसांचे बंधन नाही. शितपेय (माझा वगैरे) उत्पादनांत मँगोपल्पला फार मोठी मागणी आहे. भारतभरच्या रसवंत्या (ज्यूस सेंटर) मध्ये सगळ्यात जास्त मागणी मँगो पल्प पासून केलेल्या मँगो मिल्क शेक ला आहे. परिणामी ही बाजारपेठ विस्तारली असून ती ताज्या फळांच्या कैकपट आहे.
युरोप अमेरिका सोडा, पण दुबई सारखे जवळपास 91 देश आहेत त्यांना आपण फळं निर्यात करतो. ही पण बाजारपेठ युरोपपेक्षा कित्येक पट मोठी आहे.
द्राक्षांच्या बाबतील 2010 मध्ये मोठा झटका आपल्या द्राक्ष उत्पादकांना बसला होता. पण नुसते रडत न बसता आणि वर्तमानपत्रे/टीव्ही वाहिन्यांवर चर्चा करत न बसता द्राक्ष उत्पादकांनी त्यावर मार्ग काढला. गेली चार वर्षे द्राक्षांची निर्यात नियमित चालू आहे. याच पद्धतीने अंब्याच्या अडचणीवरही अंबा उत्पादक मार्ग काढतील. पुढच्या वर्षीपासून अंब्याची निर्यात युरोपात सुरळीत होण्याची आशा आहे. या बाबी चर्चा करणारे लक्षात घेत नाहीत.
खरा प्रश्न आहे फळं आणि भाजीपाला यांची भारतीय बाजारपेठ सुधारणार की नाही? कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मोजमाप करायला इलेक्ट्रॉनिक्स तराजू हवे आहेत, मालाची ने आण करण्यासाठी शीतपेट्या हव्या आहेत, मालाची प्रतवारी करणे (ग्रेडिंग), शीतगृहांमध्ये (कोल्ड स्टोरेज) साठवणुक करणे यासाठी आवश्यक ती संरचना (इन्फ्रास्ट्रक्चर) उभी करायला हवी. भारतभर साडेचारलाख खेडी आहेत. जळपास पन्नास हजार आठवडी बाजार आहेत. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फळे, भाजीपाला विक्रीला येतो. या आठवडी बाजारांच्या ठिकाणी किमान पिण्याचे पाणी, मालाच्या विक्रीसाठी ओटे इतकी तरी व्यवस्था आपण केली आहे का? शेतातून बाजाराच्या ठिकाणी माल नेण्यासाठी किमान व्यवस्था तरी आहे का?
फळे, भाजीपाला यांचे बीट (घावूक उलाढाल करण्याचे ठिकाण) जिथे चालते तिथे एखाद्या सकाळी सूर्य उजाडण्यापूर्वी जावून पहावे. म्हणजे चर्चा करणार्‍यांच्या डोळ्यांसमोर खरे चित्र उभे राहिल. मोसंबीचा ढिग समोर ओतलेला असतो आणि त्याचा नजर लिलाव होतो. म्हणजे या ढिगाची किंमत किती याची बोली लावली जाते. मोसंबी किती नग आहे किंवा किती वजनाची आहे हे मोजल्या जात नाही. केळाची खरेदी वजनाने होते आणि विक्री मात्र नगाने होते. भाजीच्या जुड्या मोजताना काही जूड्या वर न मोजता देवून टाकाव्या लागतात. अशा कितीतरी बाबी आहेत ज्यांची चर्चा आजही होत नाही. इतर अन्नधान्य सोडा पण फळे, भाजीपाला, फुले यांची मोठी बाजारपेठ स्वत: भारतच आहे. त्यासाठीच्या सुधारणा कधी होणार? त्यासाठी आवश्यक ती राजकीय इच्छाशक्ती आपण बाळगणार की नाही?
एक भिती घातली जाते की भारतीय शेतीमालाच्या बाजारपेठेवर परकिय आक्रमण होवू शकते म्हणून. किंवा आपला माल बाहेर जावू नये असा कट रचला जातो आहे. ज्याला विचार करता येत नाही, अभ्यास करायचा नाही अशीच माणसे असा वाह्यात आरोप करू शकतात. आज जगभरात विविध उत्पादनांसाठी जीवघेणी स्पर्धा सुरू आहे हे खरे आहे. पण शेतीमालाबाबत मात्र परिस्थिती काहीशी विपरीत आहे. कुठल्याच पुढारलेल्या देशात शेती करायला कोणी तयार नाही. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान सर्वत्र शेतीवरील लोकसंख्या ही फक्त 5 ते 10 टक्के इतकी मर्यादीत आहे. आणि ही लोकसंख्या शेतीवर टिकावी म्हणून त्यांना विविध अमिषं दाखवावी लागतात, अनुदानं द्यावी लागतात, त्यांच्या मालाची काळजी शासनालाच घ्यावी लागते. याच्या नेमकी विरूद्ध स्थिती आपली आहे. आपल्याकडे शेतीवरची लोकसंख्या जवळपास 65 टक्के इतकी आहे. इतक्या लोकांना आपण कुठलीच सुट सबसिडी देवू शकत नाही. फक्त ती दिल्याचा खोटा खोटा देखावा मात्र उभारू शकतो. त्यामुळे आपल्याकडे शेतीत जे मनुष्यबळ उपलब्ध आहे, शेतीत राबण्याची जी वृत्ती भारतीय माणसांमध्ये आहे, शेकडो वर्षांपासून शेती करण्याचे व्यवहारिक पारंपरीक ज्ञान आपल्याकडे आहे आणि शिवाय नैसर्गिक रित्या जी स्थिती आपल्याला उपलब्ध आहे ती जगात फार थोड्या ठिकाणी आहे (आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेचा काही भाग) त्यामुळे आपल्या मेहनतीला तोड नाही. जे लोक आपल्याला ही भीती घालतात ते फसवणूक करीत आहेत.
युरोपच्या निमित्ताने भारतीय फळं आणि भाजीपाल्याच्या बाजारेपेठेबाबत नविन धोरणं आखण्याची गरज निर्माण झाली आहे. नविन रचना केली नाही तर ‘रस गळतो । अंबा छळतो । दिल्लीचा राजा । झिम्मा खेळतो ॥ हेच म्हणत टाळ्या वाजवीत बसावे लागेल. शेतमालाशी झिम्मा खेळण्याची दिल्लीच्या राजाची (केंद्र सरकार) सवय अजूनही गेली नाही. इतर बाबीत हेच आहे. पण शेतीच्या बाबतीत जास्तच आहे. 

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, April 29, 2014

तालाचा ‘शंकर’ आणि सुरांवर ‘जय’ असा ‘किशन’

                                        दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 29 एप्रिल 2014 

गायकाच्या उजव्या बाजूला तबल्यावर शंकरसिंग रघुवंशी आहेत आणि डाव्या बाजूला हार्मोनियमवर जयकिशन डाह्याभाई पांचाळ. गाणं अप्रतिम आहे आणि लोक भरभरून दाद देत आहेत. असं जर लिहीलं तर कुणाला काहीच कळणार नाही. एखाद्या गाण्याबद्दल हे वर्णन असून कलाकारांची नावे आहेत. पण हेच जर ‘शंकर-जयकिशन’ असा नुसता शब्द लिहीला तर पुढचे फार काही लिहीण्याची गरजच पडणार नाही. जून्या हिंदी गाण्याच्या प्रेमींच्या डोळ्यासमोर शेकडो गाणी दिसायला लागतील. कानात त्यांचे मधुर सुर घुमायला लागतील.
शंकर जयकिशन या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडीतील शंकर यांची 26 एप्रिल ही पुण्यतिथी. (शंकर जन्म:15 नोव्हें.1922  मृ: 26 एप्रिल 1987, जयकिशन जन्म: 4 नोव्हें 1929 मृ.:12 सप्टें.1971)   त्यांची आठवण होण्याचं कारण म्हणजे सध्या सुरू असलेला लग्नाचा हंगाम. घराच्या जवळ मंगल कार्यालयात एक लग्न होतं. त्याच्या वरातील डिजेच्या ढणढणाटी आवाजात गाणी वाजत होती आणि काही जण नाचत होते काही शांतपणे चालत होते. इतक्यात गाणं बदललं. आणि बघता बघता तरूण म्हातारे मध्यमवयीन बायका पुरूष सगळेच नाचायला लागले. ते गाणे होते ‘‘रामय्या वस्तावय्या, मैने दिल तुझको दिया’’. राज कपुरच्या श्री 420 या चित्रपटातील हे प्रसिद्ध गाणे. मी नाचणार्‍या एका अठरा वर्षाच्या पोराला थांबवून उत्सूकतेने विचारले, ‘‘मित्रा, हे गाणं कुठलं आहे? तूला माहित आहे का?’’ तो म्हणाला, ‘‘पता नही अंकल. लेकीन ट्यून कितनी जबरा है.’’ सर्वसामान्यांच्या ओठांवर खेळावीत आणि ऐकता ऐकता पायांनी ताल धरावा, सार्वजनिक ठिकाणी सहजपणे नाचता यावे ही ताकद शंकर जयकिशनच्या गाण्यांची होती.
शंकर हे पृथ्वीराज कपुर यांच्या पृथ्वी थिएटर या नाटक कंपनीत तबला वाजविण्याचे काम करायचे. ते एका गुजराती चित्रपट निर्मात्याकडे संगीत देण्याची संधी मिळते का हे पाहण्यासाठी चकरा मारत होते. तेंव्हा त्यांना जयकिशन नावाच्या तरूण मुलाची गाठ पडली. तोही याच कामासाठी चकरा मारत होता. तो हार्मोनिअम अप्रतिम वाजवायचा. या दोघांची ओळख झाली. संगीत दोघांच्याही रक्तात वहात होते. पुढे ही मैत्री इतकी घट्ट झाली की जयकिशन यांच्या अकाली जाण्यानंरतही 16 वर्षे एकट्या शंकर यांनी चित्रपटांना संगीत दिले पण नाव मात्र ‘शंकर जयकिशन’ असेच ठेवले होते. तसा त्या दोघांत करारच झाला होता असं म्हणतात.
शंकर यांनी जयकिशन यांनाही पृथ्वी थिएटरमध्ये बोलावून हार्मोनिअम वाजवायचे काम मिळवून दिले. त्यांच्या सोबतच पृथ्वी थिएटरमध्ये एक गोरा देखणा तरूण आपल्या निळ्या डोळ्यांत नव्या चित्रपटाची स्वप्ने घेवून फिरत होता. त्याने आग नावाने पहिला चित्रपट काढला. त्या चित्रपटाला संगीत देणार्‍याला राम गांगुली यांना सहाय्यक म्हणून शंकर काम करत होते. दुसर्‍या चित्रपटाच्यावेळी त्या तरूणाच्या लक्षात आल्या की जुन्या लोकांशी आपले जमणार नाही. समवयस्क  शंकरसोबत त्याच्या काळजाच्या तारा जुळल्या. त्याचे नाव राज कपुर. शंकरने जयकिशनला सोबत घेण्याचा आग्रह धरला.  बरसात, आह, आवारा, श्री 420, जिस देश मे गंगा बहती है, बुट पॉलिश, संगम, मेरा नाम जोकर असे एकाहून एक चित्रपट देत शंकर-जयकिशन आणि राजकपुर या जोडीने इतिहास घडविला.
शंकर जयकिशनचे नाव काढले की पहिल्यांदा राज कपुरच डोळ्यांसमोर येतो. मुकेशचा आवाज आपल्या कानात घुमायला लागतो ‘मेरा जुता है जपानी’, ‘आवारा हुं’, ‘किसी की मुस्कूराहटों पे हो निशा’, ‘दुनिया बनानेवाले क्या तेरे मन मे समाई, काहे को दुनिया बनाई’, ‘होठों पे सच्चाई होती है’ हीच गाणी येतात. कारण तशी प्रतिमाच तयार झाली आहे.
शंकर जयकिशनबद्दलची भरपूर माहिती आता महाजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध आहे. एकाने तर बरीचशी अचुक अशी आकडेवारीच दिली आहे. ती बघितली की जरा आश्चर्याचा धक्काच बसतो. राजकपुर मुकेश यांच्याशी आपण शंकर जयकिशनला कायम जोडत आलो. पण त्यांच्याकडे लता मंगेशकरला सर्वात जास्त (466) गाणी आहेत.मोहम्मद रफी (363), आशा भोसले (213) यांच्यानंतर मुकेश (134) चा नंबर लागतो. किशोर कुमार (103) आणि मन्ना डे (77) हे नंतर येतात.
पं. नेहरूंच्या समाजवादी व्यवस्थेचा तो काळ होता. त्यामुळे राजकपुरचे चित्रपट त्या विचारसरणीकडे झुकलेले असायचे. हाच धागा गीतकार शैलेंद्र यांनी पकडला. शंकर जयकिशन यांच्या संगीताने या विचारसरणीला कलात्मक रूप दिले. शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि पाश्चिमात्य संगीत असा त्रिवेणी संगम जर कुणाच्या गाण्यात प्रामुख्याने दिसत असेल तर तो शंकर जयकिशन यांच्याच. हसरत जयपुरी आणि शैलेंद्र या दोन गीतकारांचा सर्वात जास्त वापर त्यांनी आपल्या गाण्यात केला.
मुकेशचा आवाज ज्यांच्या संगीताची ओळख बनला त्यांना फिल्म फेअर पुरस्कार मात्र ‘चोरी चोरी’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा मिळाला ज्यात मुकेशचे एकही गाणे नाही. काय आश्चर्य आहे हा चित्रपट राजकपुर-नर्गिसचा आहे पण आरके बॅनरचा नाही.  ‘आजा सनम मधुर चांदनी मे हम’, ‘ये रात भिगी भिगी’, ‘जहा मै जाती हु वही चले आते हो’, ‘पंछी बनु उडके फिरू’, ‘मन भावन के घर आये गोरी’ अशी एकापेक्षा एक अप्रतिम गाणी यात आहे ज्यांनी शंकर जयकिशनच्या नावावर पहिल्यांदा पुरस्काराची मोहर उठवून दिली.
त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांची संख्या पावणेदोनशेच्या घरात आहे. वयाच्या 41 व्या 1971 मध्ये वर्षी जयकिशन यांचे अकस्मात निधन झाले. गुजरात मध्ये त्यांच्या जन्मगावी त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. जयकिशनयांच्या अंत्ययात्रेला प्रचंड जनसमुदाय लोटला होता. जयकिशन गेल्यावर ते ज्या चर्चगेटच्या गेलॉर्ड हॉटेलमध्ये बसायचे त्या टेबलावर मेणबत्ती लावून ‘हा टेबल जयकिशन यांच्यासाठी राखीव आहे’ अशी महिनाभर पाटी ठेवलेली होती.
जयकिशन यांच्या मृत्यूनंतर शंकर आणि राजकपुर यांचे सांगितिक संबंध तुटले. पुढची 16 वर्षे शंकर एकट्याने संगीत देत होते. पण आता त्यांच्यातील प्राणच निघून गेला होता. हळू हळू शंकर एकटे पडत गेले. 1986 मध्ये त्यांचा मृत्यू झाला तेंव्हा अंत्यसंस्कार समयी अतिशय मोजके लोक होते. राजकपुरही तेंव्हा उपस्थित नव्हते.
मेरा नाम जोकर हा राजकपुर सोबतचा त्यांचा शेवटच्या काळातला चित्रपट. यात शैलेंद्रचे गाणे आहे

कल खेल मे हम हो ना हो
गर्दीश मे तारे रहेंगे सदा
भूलोंगे तूम भूलेंगे वो
पर हम तूम्हारे रहेंगे सदा
रहेंगे यहा अपने निशा
इसके सिवा जाना कहा

शंकर यांच्याही ओठांवर मृत्यूसमयी हीच ओळ असेल.
पतिता हा त्यांचा अगदी सुरवातीच्या काळातला राजकपुर प्रभावाच्या बाहेरचा अतिशय वेगळा चित्रपट. यात लताच्या आवाजात शैलेंद्रचे शब्द अतिशय समर्पक आहेत. भारतीय रसिकांची शंकर जयकिशन यांच्या प्रती हीच भावना असेल

वो रंग भरते है जिंदगी मे
बदल रहा है मेरा जहां
कोई सितारे लूटा रहा था
किसीने दामन बिछा दिया

रसिकांच्या पदरात चांदण्याचे दान देणार्‍या या प्रतिभावंतांना श्रद्धांजली.
   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, April 22, 2014

वाराणसी निवडणुक आणि गालिबची कविता



                                        दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 22 एप्रिल 2014 

सध्या वाराणसी फार चर्चेत आहे. कारण नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल येथून लोकसभेची निवडणुक लढवत आहेत म्हणून. नरेंद्र मोदी निवडणुक लढवित आहे म्हणजे मुलसमानांची मते कुणाला, मुसलमान उमेदवार कसा उभा करायचा किंवा उभा राहू द्यायचा नाही यावर चर्चा रंगल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर गालिब सारख्या फार्सी-उर्दूच्या महाकविला या शहराबद्दल काय वाटत होते हे कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तशी कुणालाही आवश्यकता वाटण्याचे कारणच नाही. 

गालिब हा प्रतिगाम्यांपेक्षा पुरोगाम्यांची अडचण करणारा कवी आहे. त्याने या शहराचे वर्णन ‘चराग-ए-दैर’ (दिव्यांचे देऊळ) कवितेत जे करून ठेवले आहे त्याने भल्या भल्यांची गोची होवून बसली आहे. गालिबची ही कविता मुळ फार्सीत आहे. त्याचे हिंदी-इंग्रजी भाषांतर सर्वत्र उपलब्ध आहे. पवन कुमार शर्मा यांनी गालिब वर एक सुंदर पुस्तक इंग्रजीत लिहीले आहे (गालिब : द मॅन, द टाईम्स, प्रकाशक साहित्य अकादमी, दिल्ली). या पुस्तकाचे मराठी भाषांतर प्रा.निशिकांत ठकार यांनी केले आहे. या पुस्तकात ही कविता त्यांनी गद्य स्वरूपात दिली आहे. एरवी गालिबच्या उर्दू गझलांचे दाखले सगळेच देतात. पण त्याच्या फार्सी  रचना मात्र फारश्या अभ्यासल्या, चर्चिल्या जात नाहीत. "माझ्या अस्सल प्रतिभेचे दर्शन फार्सी कवितेतच सापडते" असे गालिब यानेच लिहून ठेवले आहे. शिवाय आपल्याकडे फक्त गझलांचेच कौतुक करायची परंपरा आहे. त्यामुळे गझलेशिवाय जे काही गालिब किंवा इतर उर्दू कवींनी लिहून ठेवले आहे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. चराग-ए-दैर या सुंदर कवितेचा मराठी भावानुवाद असा  होईल...

दिव्यांचे देऊळ

आपल्या रंगभर्‍या मस्तीने
स्वर्गाला लाजविणार्‍या बनारसला
न लागो कुणाची वाईट नजर
पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे म्हणतात
इथल्या मरणाला लाभतो 
अमरत्वाचा जर

हे मंदिर आहे
रंगीबिरंगी आश्चर्याचे जग
इथल्या वसंतात
सदोदीत फुलण्याची धग

इथे शरद बनून राहतो
उजळ कपाळीचा चंदनटिळा
आणि वसंतवारा घालतो
फुललहरींचे जानवे
इथली धुसर संध्या
स्वर्गीच्या भुवयांमधल्या 
कुंकवागत जाणवे

पैगंबराला दिसलेल्या दिव्य प्रकाशापासून 
घडलेल्या इथल्या मूर्ती
त्यांच्या चेहर्‍यावर
गंगेकाठच्या दिव्यांच्या
लवथवत्या उत्साहाची पूर्ती
सूर्य-चंद्र जेंव्हा रेंगाळतात
पूर्व क्षितीजावर टेहळण्यासाठी
ही काशी सुंदरी उचलते गंगेचा आरसा
आपले लावण्य न्याहळण्यासाठी

तार्‍यांनी खच्चून भरल्या एका रात्री
विशुद्ध भाव बाळगून गात्री
मी विचारले एका साधुला
महाराज,
या दु:खी जगातून
निष्ठा-प्रेम-भलेपणा-विश्वास
यांनी घेतला अखेरचा श्वास
बापलेक दाबताहेत परस्परांचा गळा
भावाचा भावाच्या वाईटावर डोळा
सार्‍या कोमल भावनांचा 
झाला लय
मग का होत नाही प्रलय ?
का वाजत नाही शेवटची रणभेरी ?
अंतिम संहाराची 
कोणा हाती दोरी ?
मंद हसू ओठांवर खेळवत
प्रेमभाव डोळ्यांत मिळवत
तो म्हणाला
ही नगरी आहे
विधात्याचे प्रिय काळीज-वतन
तो होऊ देणार नाही ही नष्ट
वा हीचे पतन 

हे एैकून अभिमानाच्या गुलालाने
भरून गेले बनारसचे कपाळ
विचारांच्या पंखांना शिवता येऊ नये
असे उंचावले बनारसचे आभाळ


वाराणसीबद्दल इतकी पवित्र भावना बाळगणार्‍या गालिब यांचे गाव होते दिल्ली. आजही दिल्लीला त्यांची कबर आहे. ते रहात असलेल्या बल्लीमारा मोहल्याचे मोठे सुंदर वर्णन गुलजार यांनी केले आहे. गुलजार लिहीतात,

बल्लीमारा मोहल्ले की वो पेचिदा दलिलों की सी गलिया ।
सामने टाल के नुक्कड पे बटेरों के कसिदे ।
गुडगुडाती हुई पान की पिकों मे वो दाद वो वाह वाह ।
चंद दरवाजे पर लटके हुये बोसिदा से कुछ टाट के पर्दे ।
एक बकरी की ममियाने की आवाज ।
और धुंदलाई हुयी श्याम के बेनुर अंधेरे
ऐसे दिवारोंसे मूं जोड के चलते है यहा,
चुडीवालां की कटरी की बडी बी जैसे,
अपनी बुझती हुई आखोंसे दरवाजे टटोले।
इसी बेनूर अंधेरी गलीकासिम से
एक तरतीब चरागों की शुरू होती है,
एक पुराने सुखन का सफा खुलता है ।
असद उल्ला खॉं गालिब का पता मिलता है ।


गालिबच्या भाषेला न्याय द्यायला गुलजार यांचेच शब्द पाहिजेत. याचे काय भाषांतर करणार?   

केवळ कविता लिहूनच गालिब थांबला असे नाही तर आपल्या एका मित्राला लिहीलेल्या पत्रात त्याने असे लिहीले आहे, "धर्माचा त्याग करून एका हातात माळ घ्यावी, कपाळावर टिळा लावावा, गळ्यात जानवे घालावे, गंगेकाठी जाऊन बसावे, अस्तित्वाच्या प्रदूषणापासून स्वत:ला पवित्र करावे आणि थेंब होऊन नदीशी एकरूप होऊन जावे अशी इच्छा मला झाली होती." (गालिब : काळ आणि कर्तृत्व, पवन कुमार वर्मा, अनु. निशिकांत ठकार, साहित्य अकादमी पृ.37)
गालिब यांनी आपल्या कवितेतून आणि पत्रातून व्यक्त केलेली भावना अतिशय विशुद्ध अशी आहे. त्याचा धर्माचा तसा काही संबंध नाही. मोदीं आणि त्यांना विरोध करायचा म्हणून केजरीवाल यांचे हेतू धार्मिक राजकीय आहेत हे काही लपलेले नाही. पण एक सुंदर-पवित्र नगरी, हीचे सौंदर्य पावित्र्य अबाधित ठेवण्याचे काही कोणी निवडणुक प्रचारात बोललेले नाही.
भोवतालच्या सर्व प्रदुषणाचा मनापासून वीट येऊन गालिबसारख्याला वाराणसीच्या गंगेकाठी विशुद्ध पवित्र असं वातावरण सापडले आणि त्याचा त्याला मोह पडला. आजच्या वातावरणात गालिब यांना असे ‘वाराणसी’ कविता लिहायला सापडेल का?  गालिबच्या कवितेच्या मोहात पडून आपण वाराणसीला गेलो तर आपल्या हाती काहीच सापडणार नाही. गालिबची कविता आपण आपल्याच मनातील वाराणसी किंवा आपल्याला आवडणारे नदी काठचे कुठलेही गाव/शहर यांना लागू करून मनातल्या मनात आनंद साजरा करू. (मूळ फार्सी कविता चिराग-ए-दैर मला उपलब्ध झाली नाही. कुणाला ती मिळाल्यास जरूर सांगा. अर्थात त्यातील शब्दांच्या अर्थासहीत आणि देवनागरी लिपीत पाठवा. मला स्वत:ला उर्दू लिपी वाचता येत नाही.)   

 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, April 15, 2014

बाबासाहेब आणि ज्ञानेश्वर-तुकाराम


                                     गवसे ना ओंजळीत | उरे व्यापून आभाळ |
                                     त्याची  खुण म्हणूनिया | घेतो माखून कपाळ ||

                                            
                                      दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 15 एप्रिल 2014


बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हा एक फार मोठा सण म्हणून साजरी केली जाते. मोठ्या मिरवणुका काढल्या जातात आणि या निमित्ताने सर्व वातावरण निळं होऊन जातं. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, ‘‘आज जयभीम वाल्यांचा सण आहे’’ असं म्हणून इतर समाज अंग झटकून बाजूला होतो. बाबासाहेबांच्या महानिर्वाणालाही आता 60 वर्षे होत आहेत. तरीही आपण दलितांना आणि त्यातही परत बुद्ध धर्म स्वीकारलेल्या पूर्वाश्रमीच्या महारांना वेगळं समजतो. कालपर्यंत त्यांच्यावर सामाजिक बहिष्कारच होता. आज तो उघड नाही पण छुप्या पद्धतीने मात्र चालूच आहे.
स्वत: आंबेडकरांना भारतीय उपखंडांतील चालिरीती, धर्म संकल्पना, संस्कृती या बद्दल संपूर्ण आणि सम्यक भान होते. त्यांनी पहिले वृत्तपत्र पाक्षिक ‘मुकनायक’ 31 जानेवारी 1920 ला सुरू केले. या पाक्षिकाच्या पहिल्याच अंकात बोधवाक्य म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग वापरला आहे.

काय करू आता धरूनिया भीड ।
नि:शंक हे तोंड वाजविले ॥
नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण । 

सार्थक  लाजून नव्हे हीत ॥
दलितांमध्ये साक्षरांची संख्या हजारात 9 इतकी मामुली असतानाही बाबासाहेबांनी पाक्षिकाचा उपद्व्याप केला. त्यामागे त्यांची दूर दृष्टी दिसून येते. साक्षर सवर्णांचा मोठा वर्ग त्यांच्या समोर असावा हे तर उघडचे आहे. तुकाराम महाराजांचा अभंग वापरायचे कारण त्यांना वारकरी संप्रदाय आणि त्याचा प्रभाव याची पूर्ण जाणीव होती. जनसामान्यांच्या प्रबोधनाचे काम करावयाचे तर त्यासाठी त्यांना समजेल अशीच भाषा वापरली पाहिजे. त्या काळात आणि खरं तर आजही तळागाळात वारकरी संप्रदायाने एक अध्यात्मिक सामाजिक परिभाषा रूजवली.आपल्या मुक राहिलेल्या सामाजाच्या दु:खाला वाचा फोडण्यासाठी आपण नायक बनलोच पाहिजे इतकेच नाही तर प्रत्येक सामान्य मुक जन हा ‘मुकनायक’ बनला पाहिजे हे त्यांना अभिप्रेत होते. आणि त्यासाठी त्यांनी तुकाराम महाराजांचा अभंग वापरला.
अभंगाच्या पुढच्या ओळी ज्या त्यांनी प्रत्यक्ष वापरल्या नाहीत पण त्यातूनही बाबासाहेबांचा दृष्टीकोन काय आहे हे स्पष्ट जाणवते

आले ते उत्तर बोलो स्वामीसवे । 
धीट नीट जीवे होऊनिया ॥
तुका म्हणजे जीवा समर्थांशी गाठी ।
घालावी हे मांडी थापटूनी ॥ 3211॥
(श्रीसार्थ तुकारामाची गाथा, संपादक विष्णुबुवा जोग, ढवळे प्रकाशन आठरावी आवृत्ती, पृ. 667)
वारकरी संप्रदायावर कुणी कितीही टिका केली तरी एक गोष्ट सर्वांनाच मान्य करावी लागते की त्यांनी एका धाग्यात अवघ्या लोकांना बांधून ठेवले. विठ्ठल हे दैवत, महिन्यातील दोन दिवस (एकादशीला) उपवास करणे, मांसाहार न करणे, धुत वस्त्र परिधान करणे, प्रत्येकाच्या ठायी देव आहे हे उमजून एकमेकांच्या पाया पडणे, वर्षातून एक वेळ पंढरीची वारी करणे इतक्या साध्या बाबींवर संप्रदायाचा संपूर्ण डोलारा उभा केला. बाबासाहेबांना ही गोष्ट तीव्रतेने लक्षात आली असणार. आणि म्हणूनच त्यांना आपल्या समाजाच्या दु:खाला वाचा फोडण्यासाठी तुकारामांच्या ओळी समर्पक पद्धतीने वापराव्या वाटल्या.
बाबासाहेब पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेले आणि हे पाक्षिक बंद पडले. पुढे सात वर्षांनी त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ हे पाक्षिक सुरू केले (पहिला अंक दि. 3 एप्रिल 1927) दुसरे पाक्षिक चालू करताना तर बाबासाहेबांनी संत वाङ्मयाचा अभ्यास केल्याचे खैरमोडे यांनी लिहूनच ठेवले आहे. ‘‘ वर्तमानपत्र काढण्याचे मुक्रर केल्यानंतर साहेबांनी मराठी भाषेचा व हिंदुस्थानातील सामाजिक सुधारणेच्या चळवळीचा अभ्यास करण्याचे ठरविले. मुकुंदराय, मुक्तेश्वर, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास इत्यादी संतांचे वाङ्मय विकत घेवून त्याचा अभ्यास पाच-सात महिन्यांत केला.’’ (डॉ.आंबेडकरांचे अंतरंग, द.न.गोखले, मौज प्रकाशन, 1ली आवृत्ती, पृ.87). आपल्या समाजाच्या दुबळ्यांचा मुक आक्रोश मांडण्यासाठी मी आवाज उठवणार आहे असे म्हणणारे बाबासाहेब आता मात्र नुसता आवाज उठवून शांत बसण्यास तयार नाहीत. प्रत्यक्ष कृती करण्याची गरज मांडताना ते  ज्ञानेश्वरतील कृष्णाने अर्जूनाला केलेल्या उपदेशाचा आधार बाबासाहेब घेतात.

आता कोदंड घेऊनि हाती । आरूढ पां इये रथी ।
देई अलिंगन वीरवृत्ती । समाधाने ॥
जगी कीर्ति रूढवी । स्वधर्माचा मानु वाढवी ।
इया भारापासोनि सोडवी । मेदिनी हे ॥
आतां पार्था नि:शंकु होई । या संग्रामा चित्त देई ।
एथ हे वांचूनि कांही । बोलो नये ॥
(ज्ञानेश्वरी अध्याय 3, ओवी क्र. 189, पारायण प्रत, पृ.70, प्रकाशक-ज्ञानेश्वर मंदिर संस्थान, आळंदी)

कुठलीही शंका मनात न ठेवता तू शस्त्र हाती घे आणि ही पृथ्वी वाचव हा संदेश कृष्णाचा अर्जूनाला जसा आहे तसाच बाबासाहेबांचा त्यांच्या अनुयायांना आहे. कुठलीही शंका मनात न घेता आता शस्त्र हाती घ्या आणि लढा. पण आधुनिक काळातील युद्ध हे शस्त्राने लढण्याचे नसून शिक्षणाने लढावयाचे आहे. त्यामुळे वृत्तपत्राचे शस्त्र त्यांनी हाती घेतले.
भारतीय तत्त्वज्ञानात शेवटचे दर्शनकार म्हणजे महात्मा गौतम बुद्ध. नंतरच्या लोकांनी या दर्शनांचा अन्वयार्थ लावणे, त्याची मिमांसा करणे हे काम केले पण पूर्णपणे नविन दर्शन मांडले नाही.  या दर्शनकारांची जी विचार मांडणी करण्याची पद्धत आहे त्यात मागचे सगळे खोडून माझेच सगळे खरे असं म्हणण्याची पद्धत नाही. मागचे काय मी स्वीकारत आहे आणि काय नाकारत हे सकारण आणि सविस्तर नोंदवून ठेवण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे नविन काही मांडणी करताना जूने काय आहे ते सांगावे लागते. बाबासाहेबांना जी नविन मांडणी करायची होती त्यासाठी जून्यातील जे काय आहे त्याचा आधार घेतला पाहिजे याचीही त्यांना जाणिव होती. स्वाभाविकच वारकरी संप्रदायातील काही बाबी आपण विचारात घेतल्या पाहिजे. हे समजून त्यांनी ज्ञानेश्वर तुकारामांच्या ओळी वापरल्या.
आधुनिक म्हणवून घेताना बुद्ध धर्म स्वीकारलेल्या दलितांनी सरसकट सगळ्या जून्या परंपरा मुल्य नाकारायची आणि  इतरांनी दलितांना  नाकारायचे  असला बाष्कळपणा बाबासाहेबांसारख्या विद्वानाला कधीच मंजूर झाला नसता. त्यामुळे त्यांनी बंड करतानाही भारतीय परंपरेतीलच धर्म स्वीकारला. कारण त्यांना आपल्या संस्कृतिची पूर्ण जाण होती.
ज्ञानेश्वरांचा आणि त्यातही परत इतर अभंग किंवा रचना न घेता ज्ञानेश्वरीतीलच ओळ वापरण्यात दुसराही एक अर्थ त्यांना अभिप्रेत असावा. महाभारतावर संशोधन करताना रविंद्र गोडबोले यांनी हे निदर्शनास आणून दिले आहे की यात एकही माणूस ‘धर्म’ संकल्पनेवर बोलत असताना ब्राह्मणांचा संदर्भ देत नाही. किंवा ब्राह्मणांच्या तोंडी धर्मवचने येत नाहीत. याचाच अर्थ त्यावेळच्या रूढी, परंपरा, धर्म, तत्त्वज्ञान यावर ब्राह्मणेतर समाजाचे वर्चस्व असले पाहिजे. हीच बाब अप्रत्यक्षपणे ज्ञानेश्वर आणि नंतर तो संदर्भ वापरणारे बाबासाहेब यांनाही अधोरेखित करावयाची असावी.
हे आपण समजून घेत नाही कारण हे सगळे गैरसोयीचे आहे. आजच्या कळपवादी, जमातवादी, जातवादी राजकारणाला हे परवडणारे नाही. बाबासाहेबांच्या 123 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आपण जरा डोळसपणे विचार करायला लागलो तरी खुप आहे.

 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575