Monday, April 22, 2019

खैरे झांबड नको जलील । फक्त हर्षवर्धन जाधव पाटील ॥



औरंगाबाद आणि जालना मतदारसंघात उद्या मतदान होत आहे. जालन्यात शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यावर माजी न्यायधीश त्र्यंबक जाधव (निशाणी कपबशी) उभे आहेत. त्यांना मतदान करा अशी विनंती मी जालन्याच्या मतदारांना करत आहे.

औरंगाबाद शहरात हर्षवर्धन जाधव यांना पाठींबा दिला म्हणून काही जणांनी माझ्यावर टीका केली. त्याचा खुलासा करण्यासाठी हे लेखी आवाहन. गेली 30 वर्षे खैरे औरंगाबाद शहरात आमदार खासदार मंत्री म्हणून सत्ता उपभोगत आहेत. शहराच्या विकास प्रश्‍नांवर वारंवार त्यांच्याकडे लोकांनी आग्रह धरला. नेहमी ते आश्वासनं देत राहिले. प्रत्यक्षात शहराचे प्रश्‍न गंभीर बनत गेले. आता तर परिस्थिती हाताच्या बाहेर गेली आहे. 2013 मध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी मी आंदोलन करून तुरूंगात गेलो. सुटला झाल्यानंतरच्या एबीपी माझावरील जाहिर चर्चेत खा. खैरे यांनी जनतेला नागरी प्रश्‍न सोडविण्याचे आश्वासन दिले होते.  पण खैरे यांनी काहीच केले नाही.
सतत ‘खान पाहिजे की बाण पाहिजे’ असा धर्मांध प्रचार करून सामान्य मतदाराची दिशाभूल केली गेली. औरंगाबाद शहराच्या मतदारांनी मनपा-विधानसभा-लोकसभा सतत सगळं विसरून शिवसेना भाजपलाच पाठिंबा दिला. इतकंच नाही तर मी ज्या भागात राहतो त्या ज्योती नगर भागातून तर शिवसेना नगरसेवक म्हणून सौ. हाळनोर बिनविरोध निवडून गेल्या. मतदारांचे इतके प्रेम लाभूनही त्याची जराशीही उतराई शिवसेना झाली नाही.

त्याचा निषेध म्हणून शिवसेनेला मतदान न करण्याचे आवाहन मी करतो आहे. इम्तियाज जलील हे सुशिक्षीत बुद्धिमान उमेदवार आहेत. पण त्यांनी निवडलेला पक्ष हा धर्मांध आणि मध्ययुगीन बुरसटलेल्या मानसिकतेचा आहे. हा मराठवाडा निजामाच्या जूलमी राजवटीविरोधात लढला आहे. तेंव्हा आम्ही परत त्या रझाकारी मानसिकतेला मत देवू शकत नाही.

कॉंग्रेस हा नेहरू प्रणीत भीकवादी समाजवादी आर्थिक धोरणं राबविणार्‍यांचा पक्ष. सोनिया-राहूल यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाने खुली आर्थिक धोरणं राबविणार्‍या मनमोहनसिंग यांचा पार कचरा करून टाकत त्यांना आपली भीकवादी धोरणं राबविण्यास भाग पाडले. अजूनही त्यांची मानसिकता बदललेली दिसत नाही. त्यामुळे कॉंग्रेसचे सुभाष झांबड यांना आम्ही मतदान करू शकत नाहीत.

मतविभागणी होवून जलील निवडून येतील म्हणून दिल्लीत मोदींसाठी शिवसेनेच्या खैरे यांना मतदान करा असे भावनिक आवाहन करण्या येत आहे. मी स्वत: जलील यांचा धर्म मुस्लिम आहे म्हणून त्यांना विरोध करत नाहीये. शेतकरी संघटनेने शेख अन्वर मुसा या मुस्लिम युवकालाच निवडणुक मैदानात उतरविले होते. पण तांत्रिक कारणामुळे त्यांचा अर्ज बाद झाला. परिणामी मी (वैयक्तिक पातळीवर. शेतकरी संघटना म्हणून नाही.) जाधवांना पाठिंबा देण्याचे आवाहन करतो आहोत.

हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहिर करताच काही जणांनी माझ्यावर जाधवांशी हितसंबंध जूळलेले आहेत असे वाह्यात आरोप केले आहेत. माझा हर्षवर्धन जाधव यांच्याशी कुठलाही परिचय नाही. त्यांच्याशी आत्तापर्यंत मी कधीही बोललेलो नाही. प्राप्त परिस्थितीत आणि जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यात मला त्यांची उमेदवारी पाठिंबा देण्यालायक वाटली.

या पूर्वीच्या राजकीय कारकिर्दीत हर्षवर्धन जाधव यांनी केलेल्या चुकांची कुठलीही तरफदारी मी करत नाही. भविष्यातही करणार नाही. प्राप्त परिस्थितीत अपात्र इतर उमेदवार किंवा नोटाला मत देवून आपला लोकशाही अधिकार मर्यादित करण्यापेक्षा हर्षवर्धन जाधव यांच्यासारख्या तरूण अपक्ष उमेदवाराच्या पाठिशी राहणे माझ्या सत्सत् विवेक बुद्धीला पटत आहे. म्हणून तसे आवाहन मी सर्व मतदारांना करतो आहे.

मी काही वाद उकरून काढून चर्चेत राहू इच्छितो आणि त्याचा फायदा घेतो असा बेजबाबदार बेताल आरोप करण्यात आला. त्यांना मी इतकेच सांगू इच्छितो

सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही
मेरी कोशीश है की ये सुरत बदलनी चाहीये
मेरे सिनेमे नही तो तेरे सिनेमे सही
हो कही भी आग लेकीन आग जलनी चाहीये
- दुष्यंत कुमार

             
श्रीकांत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575
 

No comments:

Post a Comment