Quest for Freedom...

Monday, February 25, 2019

साहित्य संगीत कला चळवळ लोक वर्गणीतून चालायला हवी !


संबळ, अक्षरमैफल, फेब्रुवारी 2019

साहित्य संमेलनाच्या उद्घाटकांना येवू नका असं सांगून जो अपमान केला गेला त्याच्या प्रतिक्रिया सर्वत्र उमटल्या.  विरोध करणारे आणि संमेलनाचे पाठिराखे या दोन्ही बाजूंनी एक वेगळा मुद्दा या निमित्ताने समोर येतो आहे तो लक्षात घ्यायला हवा. समजा हे संमेलन आयोजीत करणारी संस्था कुठल्याही सरकारी निधीशिवाय, राजकारण्यांच्या हस्तक्षेपाशिवाय काम करणारी असली असती तर ही वेळ आली असती का? सामान्य रसिक, साहित्य प्रेमी, प्रकाशक, लेखक, ग्रंथालय कार्यकर्ते, विक्रेते यांनी मिळून जर हे आयोजन स्वखर्चातून केले असते तर अशा पद्धतीनं गदारोळ उठला असता का? 

स्वाभाविकच आपण मुळ मुद्द्याकडे येतो. जेंव्हा एखादे साहित्य कलाविषयक नियोजन अपरिहार्यपणे इतरांच्या हातात जाते तेंव्हा त्या त्या वर्गाचा दबाव वाढत जातो. तो प्रमाणाच्या बाहेर गेला की असे आयोजन आपला मूळ हेतूच हरवून बसते. 

औरंगाबाद शहरातच घडलेले दोन सांस्कृतिक उपक्रम याची साक्ष देतात. वेरूळ महोत्सव या नावाने 30 वर्षांपूर्वी वेरूळच्या कैलास लेण्याच्या परिसरात शास्त्रीय संगीतासाठी महोत्सव शासनाच्या पर्यटन विभागाने आयोजीत करावयाला सुरवात केली होती. काही वर्षे हा महोत्सव सुरळीत चालला. पण पुढे हा महोत्सव म्हणजे पांढरा हत्ती बनला असून शहरापासून तो दूर आहे अशी कारणं देत औरंगाबाद शहरात हलविण्यात आला. त्याला औरंगाबाद वेरूळ महोत्सव असे नाव देण्यात आले. पुढे सरकारी अधिकार्‍यांनी हस्तक्षेप वाढवत वाढवत या शास्त्रीय संगीताच्या महोत्सवात अजय-अतूल सारख्यांना चित्रपट संगीतासाठी प्रचंड मानधन देवून आमंत्रित केले. बघता बघता महोत्सव आपला मुळ हेतू हरवून बसला. शेवटी तर तो बंदच पडला. वेरूळ लेण्यात भारतीय संगीत परंपरा शिल्पांमधुन जतन केलेली आहे. आधुनिक काळात या कलेचे जतन करणे त्यांचे संवर्धन करणे यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत हे जाणून महोत्सवाची सुरवात झाली होती. पण हा हेतू विसरला गेला.

दुसरे उदाहरण खासगी क्षेत्रातले आहे. कार्पोरेट झगमगाट असलेला ‘स्वरझंकार संगीत महोत्सव’ प्रसिद्ध व्हायोलीन वादक पं. अतूल उपाध्याय यांनी सुरू केला होता. या महोत्सवात यावेळी फ्युजन आणि पंकज उधास यांचे गझल गायन यांचा समावेश करण्यात आला. सामान्य जनतेला शास्त्रीय फारसे कळत नाही, शिवाय प्रयोजकांनी आग्रह धरला अशी लंगडी कारणं पुढे करण्यात आली. यातून परत तेच घडले. शास्त्रीय संगीताचा प्रचार प्रसार परंपरेचे जतन संवर्धन हा मूळ हेतूच हरवून बसला.

कलाकार आणि रसिक, लेखक आणि वाचक, नाटक/चित्रपट आणि प्रेक्षक यांच्यात हस्तक्षेप करणारे प्रमाणाच्या बाहेर मोठे झाले, त्यांची लुडबूड वाढली की विकृती जन्माला येतात. याच्या नेमके उलट यांच्यातील नातं जितकं सरळ प्रस्थापित होवू शकेल तितकी ती या कलांसाठी पोषक फायदेशीर ठरू शकते. 

यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. गावातील हरिनाम सप्ताहात जसे सर्वजण आपआपल्यापरिने योगदान देतात, प्रत्यक्ष मेहनत करतात, त्या प्रसंगाचे पावित्र्य राखण्याचा सर्व मिळून प्रयास करतात, कुणीही जबाबदारी झटकून टाकत नाही याचा परिणाम म्हणजे वर्षानुवर्षे असे उत्सव, जत्रा, उरूस आपल्याकडे नियमित संपन्न होताना दिसतात. आधुनिक काळात बदलत्या परिस्थितीतही यांचे अस्तित्व टिकून आहे. नव्हे बहरले आहे. 

म्हणजे एकीकडे साहित्य संमेलनांत वाद होत आहेत, शास्त्रीय संगीताच्या उत्सवांत अशास्त्रीय बाबींचा शिरकाव होवून हेतू हरवून बसत आहे, अवाच्या सव्वा खर्च झाल्याने सामान्य रसिक प्रामाणिक आयोजक त्यापासून बिचकून दूर जात आहेत. कलाकारांना शुद्ध स्वरूपातील कला कशी सादर करावयाची हा संभ्रम निर्माण झाला आहे. प्रतिभावंत लेखक संमेलनाकडे पाठ फिरवत आहे. आणि दूसरीकडे परंपरेने चालत आलेले सण उत्सव जत्रा उत्साहात साजरे होताना दिसत आहेत.

या दोन भिन्न बाबींचा विचार करून साहित्य संगीत कलांसाठी काही एक वेगळे नियोजन करता येईल का याची चाचपणी करायला हवी. 

सेलू (जि. परभणी. हे गांव नाशिक-मनमाड-औरंगाबाद या रेल्वे मार्गावर असून तिथे एक्स्प्रेस रेल्वे थांबतात. मुंबई पुण्याहून येथे सरळ रेल्वे उपलब्ध आहे. सचिन कुंडलकर सारख्यांनी हा लेख वाचून परत सेलू कुठे आहे असा प्रश्‍न विचारू नये. सेलू आणि परिसरात प्राचिन मंदिरे आहेत. साईबाबांचे गुरू केशवराव बाबासाहेब यांची समाधी याच सेलूत आहे. साईबाबांचे जन्मगाव जवळच पाथरी हे असून तिथे त्यांचें सुंदर मंदिर आहे.) येथे हरिभाऊ चारठाणकर हे जून्या जमान्यातील थोर गायक  नट होवून गेले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे कुटूंबिय छोटा कार्यक्रम दरवर्षी घ्यायचे. यावर्षी सेलूकर रसिकांनी मिळून एक मोठा संगीत महोत्सव हरिभाऊंच्या स्मृती प्रित्यर्थ घेेण्याचा संकल्प केला. हा महोत्सव देान दिवसांचा असावा व लोकवर्गणीतून तो संपन्न व्हावा असे सर्वांनी ठरवले. त्या प्रमाणे वर्गणी गोळा करून कुठलाही मोठा प्रयोजक नसताना, कुठल्याही राजकीय नेत्याचे पाठबळ नसताना, कुठलाही भपका न करता हा पार पडला. कलाकारांना रसिकांनी आपल्या घरी उतरवले. जेवू खावू घातले. हा आत्मियतेचा प्रत्यय कलाकारांनाही भारावून टाकणारा होता. कुणावरच मोठा आर्थिक ताण आला नाही. सामान्य रसिकांनाही मोकळेपणाने उत्सवात सहभागी होता आले. शिवाय हा महोत्सव आपला आहे अशी भावनाही लोकांमध्ये रूजली.

अशा पद्धतीशी एक शैली जर विकसित झाली तर साहित्य संगीत कला यांचे महोत्सव अगदी साधेपणाने उत्स्फुर्तपणे साजरे होवू शकतात. गावोगावी शेकडो वर्षे उत्सवांची अशीच परंपरा चालवली जाते आहे. त्यातील धार्मिकतेचा भाग बाजूला ठेवला तर अगदी हेच सुत्र साहित्य संगीत कला चळवळीसाठी वापरता येवू शकते.

आपल्याकडील धार्मिक उत्सवांमधूनही संगीत जपण्याची एक मोठी चळवळ नकळत जोपासल्या गेली आहे. किर्तनांत संगीताचा भाग मोठाच राहिला आहे. आज ज्याला स्टँडअप कॉमेडी म्हणतात याचाच जूना अवतार म्हणजे किर्तन. आत्ताच्या इंदूरीकर महाराजांची किर्तनं म्हणजे स्टँडअप कॉमेडीच असते. 

आमच्या परिसरात जून्या दर्ग्यांमधून उरूस भरवले जातात. या उरूसांमध्ये कव्वाली गाण्याची परंपराही फार मोठी आहे. एकेकाळी मोठ मोठे गायक संगीतकार या उरूसांमध्ये येवून कव्वाल्या ऐकायचे. सादर करायचे. या पारंपारीक चाली नव्यानं चित्रपटांत गाणी म्हणून यायच्या. ‘मेरा पिया घर आया’, ‘मेरे रश्क-ए-कमर’, ‘भर दे झोली मेरी या मुहम्मद’ या चित्रपटांमधून गाजलेल्या कव्वाल्या मूलत: उरूसातील पारंपरिक कव्वाल्याच आहेत. त्यांना जरासा आधुनिक साज चढवून चित्रपट गीत म्हणून सादर केल्या गेले. 

पंढरपुरची यात्रा उत्स्फुर्तपणे शेकडो वर्षे पार पडते आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी कुठलीही कमिटी बनवली जात नाही. त्यासाठी कुठलाही मोठा निधी निर्धारीत केल्या जात नसतो. आप आपल्या गावाहून पायी निघालेल्या लाखो वारकर्‍यांची जेवण्या खाण्याची संपूर्ण महाराष्ट्रभर सोय केल्या जाते. यासाठी कुठलाही भेदभाव पाळला जात नाही. आपण पंढरपुरला जावू शकत नाही तर किमान तिकडे निघालेल्या वारकर्‍यांची जरा सेवा करावी असा पवित्र भाव सामान्य नागरिकांमध्ये असतो. 

याच पद्धतीनं याच भावनेनं जर संगीत महोत्सव, साहित्य संमेलनं भरवली गेली तर त्यांच्यामध्येही असाच उदंड उत्साह आढळून येईल. आज ज्या पद्धतीनं वाद होत आहेत आणि या सगळ्याला एक कळकट सरकारी मदतीचा करडा रंग प्राप्त झाला आहे तो तसा राहणार नाही. 

जूनी शिल्पं, अजिंठा सारख्या ठिकाणची रंगीत चित्रं, मंदिरांतून जतन केल्या गेलेलं संगीत हे सगळं पाहता मंदिरं हे कलांचे एक मोठे उर्जा केंद्र राहिलेलं आहे. आज आधुनिक काळात मंदिर व्यवस्थेवर टीका करत असताना त्यातील कलेचा हा मोठा घटक आपण नकळतपणे उपेक्षीला. गुरूवारी दत्ताची पंचपदी, एकादशीला होणारे किर्तन अशा कितीतरी निमित्ताने संगीताची जोपासना केली जायची. 

अंबड (जि. जालना. येथे महाकाली महासरस्वती महालक्ष्मी असे एकत्र मोठे सुंदर मंदिर आहे. अहिल्याबाईंनी त्याचा जिर्णाद्धार केला आहे. शिवाय तळ्याइतकी मोठी पुष्करणी बारव आहे. खंडोबाचे सुंदर मंदिर आहे. सचिन कुंउलकर यांना जालना जिल्हा माहित नसल्यास अंबड माहित असण्याची शक्यता फार कमी आहे म्हणून सविस्तर सांगितलं. जालना हे रेल्वे स्टेशन असून मुंबईहून येथे रेल्वे आहे. तेथून अंबड 35 कि.मी. अंतरावर आहे. पुण्याहून रस्ता मार्गे आल्यास अहमदनगरहून उजवीकडे नांदेडला जाणार्‍या राष्ट्रीय महार्गावरून गढी गावापर्यंत गेल्यास तेथून जालन्याला जाणार्‍या राज्य रस्त्यावर अंबड हे तालूक्याचे ठिकाण आहे.) येथे गेली 95 वर्षे दत्त जयंती संगीत महोत्सव भरत आहे. 

95 वर्षांपूर्वी अंबड जवळ भणंग जळगांव इथे त्र्यंबक नारायण कुलकर्णी यांना त्यांच्या गुरूंनी दत्त जयंती निमित्ताने संगीत सेवा सुरू करण्याचा आदेश दिला.  त्यांची आज्ञा प्रमाण माणून त्र्यं.ना.कुलकर्णी यांनी हे कार्य सुरू केले. त्र्यंबकरावांच्या पोटी गायनाचार्य गोविंदराव जळगांवकर यांचा जन्म झाला. त्यांच्या लहानपणापासून संगीताचे संस्कार झाले. हैदराबादचे प्रसिद्ध गायक वासुदेव नामपल्लीकर यांच्याकडून गांविंदरावांना आग्रा घराण्याच्या गाण्याचा वारसा मिळाला. गाविंदरावांनी पुढे अंबड शहरात वास्तव्यास आल्यावर दत्त जयंती संगीत महोत्सव अंबडला सुरू केला. तेंव्हा पासून ते आजतागायत अंबड शहरात अखंडपणे ही गायन चळवळ चालू आहे. 

चार वर्षांपूर्वी पं. गोविंदराव जळगांवकरांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य असे सभागृह अंबड नगर पालिकेने उभारले आहे. त्यांचा सुंदर असा अर्धाकृती पुतळा सभागृहाच्या दर्शनी भागात उभारण्यात आला आहे. एखाद्या गायकाच्या नावाने ग्रामीण भागात भव्य सभागृह असणे आणि अखंडपणे त्याची आठवण संगीत महोत्सवातून जतन केली जाणे हे दुर्मिळ उदाहरण आहे. आज घडीला अंबड इतकी जूनी परंपरा असलेला संगीत महोत्सव दूसरा नाही.

अशा पद्धतीनं छोट्या छोट्या गावांमधून संगीत विषयक चळवळ चालवली जाते. भविष्यातही याच मार्गाने ही चळवळ पुढे जावू शकते. कर्‍हाडजवळ औदूंबरला साहित्य संमेलन भरवले जाते. या साहित्य संमेलनात आजतागायत कुठले वाद झाले नाहीत. एक लोकचळवळ असे स्वरूप या साहित्य संमेलनाचे राहिले आहे. परभणीला गेली 16 वर्षे ‘बी. रघुनाथ महोत्सव’ भरत आहेत.आज घडीला महाराष्ट्रात विविध ठिकाणी साहित्य कलाविषयक उपक्रम लोक उत्स्फुर्तपणे घेत आहेत. त्यासाठी निधी आपणहून गोळा केला जात आहे. हे असे छोटे मोठे महोत्सव जे लोकांनी आपणहून चालवले आहेत ते टिकून राहतात. या उलट शासनाने मदत केलेले साहित्य संमेलनासारखे उपक्रम वादात सापडताना दिसत आहेत. 

सरकारी मदत घ्यावी की नाही हा वादाचा विषय आहे. मोठे प्रायोजक मिळवावे की नाहीत हा पण वादाचा विषय आहे. ज्यांना अशा मदतीतून उपक्रम घ्यायचे आहेत ते त्यांनी घ्यावेत. पण सामान्य रसिक आणि कलाकार यांनी परस्पर समन्वयातून चांगले महोत्सव साधेपणाने आता भरवायला हवे. 

सेलूच्या हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाचा हिशोब त्या समितीने आठच दिवसांत सगळ्या लोकांसमोर मांडला.  पहिल्या बैठकीत जे ठरले होते तेंव्हा पासून ते शेवटी सगळा हिशोब सादर करण्यापर्यंत एक पारदर्शकता पाळल्या गेली. याचा परिणाम म्हणजे पुढचा महोत्सव आम्ही अजून चांगला भरवून दाखवतो असे आश्वासन आत्ताच सामान्य कार्यकर्त्यांनी दिले. समितीत सगळेच कार्यकर्ते होते. कुणीच पदाधिकारी नसल्याने महोत्सव सर्वांना आपला वाटला. 

सुरेश भटांनी आपल्या एका गझलेत असे लिहीले होते

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे
हा थोर गांडूळांचा भोंदू जमाव नाही

भटांचे शब्द जरा कडक होते. पण सामान्य माणसांवर त्यांनी टाकलेला विश्वास हा कलेच्या चळवळीतही खरा ठरताना दिसतो आहे. 

माध्यमांनी पण आता अशा चळवळींना योग्य ती प्रसिद्धी देवून सामाजिक पुरूषार्थाचा गौरव केला पाहिजे. जेंव्हा सामान्य माणसांच्या बळावर चळवळी चालतात तेंव्हा त्यांच्या टिकण्याची आणि वर्धिष्णु होण्याची शक्यता जास्त असते. या उलट जेंव्हा महोत्सव चळवळ वरून लादली जाते तेंव्हा तीचे आयुष्य फार असत नाही. साहित्य संगीत कला चळवळ निरोगीपणे पुढे न्यायची असेल तर ही पालखी  सामान्य रसिकांनी आपल्या खांद्यावर घ्यायला हवी. 

(छायाचित्र- पंकज लाटकर हरिभाउ चारठाणकर समारोहात सेलू येथे गाताना)


Posted by Quest for Freedom ... at 8:12 PM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Tuesday, February 19, 2019

छोट्या गावांमध्ये रूजत आहे शास्त्रीय संगीत चळवळ


विवेक, उरूस, फेब्रुवारी 2019

डिसेंबर महिन्यातील शेवटच्या दिवसांतील ही घटना आहे. थंडी प्रचंड वाढलेली. रविवारचा दिवस. नेमका हा लग्नाचा मुहूर्त.  अशा प्रसंगी जर संगीताचा कार्यक्रम तोही शास्त्रीय संगीताचा तोही सकाळी 8 वा. ठेवला तर कुणी येईल का? गाव छोटं. पण या सगळ्या अडथळ्यांवर मात करत सेलू (जि. परभणी. गांव रेल्वे ट्रॅकवर आहे. यवतमाळ माहित नसणारे लोक महाराष्ट्रात आहेत. तेंव्हा त्यांना सेलू कुठे आहे हे सांगावंच लागेल.) या गावात शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत शंभरएक रसिकांनी पहाटे हजेरी लावून आपलं रसिकतेचं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध केलं. 

जून्या जमान्यातील गायक संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन 29-30 डिसेंबर 2018 रोजी करण्यात आले होते. समान्य रसिकांच्या बळावर शास्त्रीय संगीताचा महोत्सव भरवता येतो यावरच मुळात कुणाचा विश्वास बसत नव्हता. पण सेलू सारख्या गावानं कुठलाही मोठा प्रायोजक न घेता, कुठल्याही राजकीय नेत्याचा आश्रय न घेता सामान्य रसिकांच्या स्वेच्छा देणगीवर संमेलन यशस्वी करून दाखवले. या संमेलनात संपूर्ण तीन सत्रे शास्त्रीय संगीताचीच झाली. 

आधी केले मग सांगितले या धरतीवर या प्रदेशातील रसिकांनी सेलूचा महोत्सव झाल्यावर औरंगाबादला मराठवाडा पातळीवर बैठक घेतली. आधी संपूर्ण मराठवाड्यात आणि नंतर महाराष्ट्रात शास्त्रीय संगीताचे महोत्सव, छोट्या मैफली, कार्यशाळा यांचे आयोजन करण्याचा निर्धार केला. आधीपासून विविध ठिकाणी ज्या व्यक्ती आणि संस्था शास्त्रीय संगीतासाठी काम करत आहेत त्यांना जोडून घेण्यासाठी ‘देवगिरी संगीत प्रतिष्ठान’ नावाने अनौपचारिक मंचाची स्थापना केली. संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गायक पं. नाथराव नेरलकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या मंचाचे रितसर उद्घाटन गाण्याच्या मैफिलीनेच व्हावे असे सर्वानूमते ठरले. 

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या पत्नी वत्सलाबाई जोशी या औरंगाबादच्या. येथील शारदा मंदिर प्रशालेत त्यांचे शिक्षण झाले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सांगितिक उपक्रम करण्याचे प्रयत्न पूर्वीही झाले होते. पण त्यात सातत्य राहिले नाही. तेंव्हा ‘देवगिरी संगीत प्रतिष्ठान’ ची सूरवात म्हणून वत्सलाबाईंच्या स्मृतीत संगीत सभा घेण्याचा ठरले. पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांच्या गायन मैफिलीचे आयोजन करण्यात आले. बनारस घराण्याचे तबला वादक पं. अरविंद आझाद यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून प्रतिष्ठानचे रीतसर उद्घाटन झाले. 
प्रतिष्ठानच्या वतीने परभणीला उस्ताद डॉ. गुलाम रसूल यांच्या स्मृतीत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे संगीत चळवळीची कोंडी फोडण्याचे काम केले आहे. या प्रदेशात अंबडसारख्या छोट्या गावात गेली 95 वर्षे दत्त जयंती संगीत महोत्सव होतो आहे. असे तूरळक अपवाद वगळता छोट्या गावांमधून नियमित स्वरूपात शास्त्रीय संगीताचे उपक्रम होताना दिसत नाहीत. 

मोठ्या शहरांमध्ये ’सवाई गंधर्व संगीत महोत्सव’ च्या धर्तीवर छोटे मोठे उपक्रम आता नियमित होत आहेत. पण लहान गावांत असं काही घडत नाही. त्यातील काही अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. एक तर अशा कार्यक्रमांना तिकीट लावले तर लोक येतीलच असे नाही. शिवाय पुरेसा निधी जमा होईलच असे नाही. प्रयोजक मिळवावेत तर त्यांच्या काही अटी असतात त्या शास्त्रीय संगीताला पेलतीलच असे नाही. कुठल्याही व्यवसायीक आस्थापनांची अपेक्षा असते भरपूर गर्दी जमा झाली पाहिजे. पण असे काही शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांत होताना दिसत नाही. 

पॉप-रॉक-पंजाबी गाण्यांना प्रचंड मोठा समुह ऐकायला मिळतो. मोठ्या स्टेडियमवर हे कार्यक्रम होतात. येणारे तरूण तरूणी धूंद होवून नाचत असतात. प्रचंड मोठा आवाज केलेला असतो. याच्याशी तूलना करता शास्त्रीय संगीताचे क्षेत्र प्रचंड वेगळंच आहे हे लक्षात येतं.

पहिली बाब म्हणजे हजारो श्रोत्यांपर्यंत आमचं संगीत अशा पद्धतीनं पोचू शकत नाही. डोकं बाजूला ठेवून बेधुंदपणे झिंग आणणार्‍या तालावर नाचणे हे इथे जमत नाही. हे संगीत बुद्धि बाजूला ठेवून नव्हे तर बुद्धि लावूनच सादर केले जाते परिणामी ऐकतानाही त्या श्रोत्याला आपल्या बुद्धिनं त्याचा अन्वयार्थ लावावा लागतो. हे संगीत म्हणजे तयार असलेल्या नोटेशनवर केवळ गाणं असं नाही. रागदारीची एक चौकट तेवढी असते. बाकी रंग प्रत्येक मैफलीत त्या त्या वेळी भरल्या जातो. तोच गाणारा/वाजवणारा असेल आणि रागही तोच असेल तरी तो पहिल्यासारखा असतोच असे नाही. 

कुणीही येवून शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला बसेल आणि त्याला ते पचेल असेही नाही. इथे श्रोत्याचा कानही तयार व्हावा लागतो. शास्त्रीय संगीतासाठी साधारणत: 500 आसनक्षमतेचे सभागृह पुरेसे आहे. (छोट्या मैफिलीं साठी 200 पेक्षाही कमी पुरे.) त्यापेक्षा जास्तीची आसनव्यवस्था पोषक ठरत नाही. आज ज्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचा बोलबाला आहे त्याही महोत्सवात जास्तीची गर्दी अनावश्यक आहे असंच या क्षेत्रातील तज्ज्ञ मानतात. मूळात आमचं संगीत असं पाच आणि दहा हजारांच्या संख्येने ऐकण्याचं नाहीच.

मोठे कलाकार व्यवहारीक पातळीवर मोठ्या महोत्सवात सहभागी होतात पण जाणीवपूर्वक छोट्या मैफिलीत आपली कला सादर करतात कारण त्यांना त्यातून आपल्या सादरीकरणाचे कितीतरी आयाम सापडतात. हे प्रचंड मोठ्या ठिकाणी घडत नाही. डोळे मिटून आपण केलेला रियाज आपला विचार ते जेमतेम सादर करतात. पण नविन काही सुचण्याची प्रक्रिया प्रचंड मोठ्या महोत्सवात घडत नाही. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर छोट्या गावांमधून सुरू झालेल्या ‘देवगिरी संगीत प्रतिष्ठान’ सारख्या शास्त्रीय संगीत चळवळीला रूजवू पाहणार्‍या उपक्रमांचा विचार करावा लागेल. 

मूळात आपल्याकडे देवळांमधून संगीत परंपरा फार वर्षांपासून जतन केल्या गेली होती. कितीतरी कालबाह्य धार्मिक रूढी परंपरांना विरोध करत असताना नकळतपणे आपण संगीत परंपरेवरही घाला घातला. देवीच्या आरत्या पदे गाणी सादर करणारे दलित कलाकार पुरोगामी चळवळीत या परंपरा जतन करताना टीकेचे लक्ष्य व्हायला लागले. चर्मवाद्य वाजविण्याची परंपरा पूर्वाश्रमीचे महार, मातंग यांच्याकडे चालत आलेली होती. कोल्हाटी समाजाकडे नृत्याची परंपरा होती. जाती व्यवस्थेची एक काळी छाया संगीतावर पडलेली होती. 
पण स्वातंत्र्योत्तर कालखंडात यातील कालबाह्य रूढी परंपरांना बाजूला ठेवून निखळ संगीत परंपरा जतन व्हायला हवी होती. अजूनही दक्षिणेतील काही मंदिरांमध्ये ती जतन केलेली आहे. मंदिरांपेक्षा सार्वजनिक सभागृहांमध्ये आपण सांस्कृतिक उपक्रम चालवू. ते सोपं आहे. असं बर्‍याच जणांना वाटतं. पण यातील अडचण अशी की महाराष्ट्रात सांस्कृतिक उपक्रमांसाठी बांधलेली सभागृहे, समाज मंदिरे यांची अवस्था बकाल होवून गेलेली आहे. शासनाने जी नाट्यगृहे स्थानिक स्वराज्य संस्थांना (नगर पालिका, महानगर पालिका) निधी देवून उभारली ती काही दिवसांतच निकाली निघाली. याच्या उलट छोट्या गावांमध्ये आजही जूने किंवा नविन एखादे मंदिर आढळून येते ज्याचे सभागृह चांगल्या अवस्थेत असते. तिथे किमान स्वच्छता राखल्या जाते. त्या त्या देवी देवतेचा उत्सव असेल तर छोट्या गावातील अगदी धार्मिक नसलेले लोकही त्यात उत्साहाने सामील होतात. 
या मंदिरांना जोडून छोट्या गावांमध्ये संगीताच्या मैफिली करणं सहज शक्य आहे. काही ठिकाणी गुरूवारची पंचपदी, एकादशीचे किर्तन, महाशिवरात्रीचे भजन अशा परंपरा आहेतच. यांना केवळ थोडेसे आधुनिक रूप देण्याची गरज आहे. 

शास्त्रीय संगीतासाठी असे उपक्रम रूजविण्याचे कारण म्हणजे इतर सर्व प्रकारच्या सुगम संगीताचा पाया म्हणजे हे संगीत होय. ते शिकविण्याची एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. काही एक मेहनत, उपजत गळा आणि बुद्धी या तिन्हीच्या आधारावर हे संगीत फुलते. संगीत ही सादरीकरणाची कला असल्या कारणाने ते सादर होणेच गरजेचे आहे. खुप मोठा गायक आहे पण तो गातच नाही. असं होवू शकत नाही. 

दुसरीकडून चांगले रसिक म्हणजेच कानसेन तयार होण्यासाठी नियमितपणे हे शास्त्रीय संगीत सादर झालं पाहिजे. या दोन्ही बाबींचा विचार करून म्हणजेच तानसेन आणि कानसेन किंवा त्याहीपेक्षा ज्यांच्याकडे कलासक्त मन आहे त्यांच्यासाठी पोषक वातावरण होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. धर्माच्या नावाखाली शेकडो वर्षे हे चाललं.    आता मात्र जाणीवपूर्वक वेगळ्या पद्धतीनं हे रूजवलं गेलं पाहिजे. 

दुसरा एक गंभीर मुद्दा सध्याच्या धकाधकीच्या काळात पुढे येता आहे. तास दोन तास शांत बसून एखाद्या रागाचा विस्तार ऐकणे, स्वरांचे बारकावे समजून घेणे, संगीत सौंदर्याचा आस्वाद घेणे हे मनशांतीसाठी आवश्यक आहे हे लक्षात घेतले पाहिजे. तूम्हाला गाणं कळो की न कळो पण या गाण्यानं मनशांती मिळते, विचारशक्तीला चालना मिळते, आपलंही मन सृजनात्मक दिशेनं काम करू लागतं हे महत्त्वाचं आहे.

छोट्या गावांमध्ये ही चळवळ जास्त चांगली रूजू शकते याचे एक कारण म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडात तयार झालेला मध्यमवर्ग.  त्याच्यापाशी किमान वेळ आणि पैसा अशा कलांसाठी उपलब्ध आहे. शहरांमध्ये वेळेची समस्या मोठी गंभीर आहे. आणि अगदी छोट्या गावांमध्ये पोटापाण्याचे प्रश्‍नच सुटलेले नसताना कलात्मक चळवळींसाठी कुठल्याच अर्थाने जागा शिल्लक नसते. मग यातला मधला पर्याय  म्हणून नगर पालिका असलेली महाराष्ट्रातील 200 गावं संगीत चळवळीची केंद्र म्हणून विचारात घ्यावी लागतील. ‘देवगिरी संगीत प्रतिष्ठान’ सारख्या उपक्रमांचे महत्त्व या दृष्टीने जास्त आहे. 

                                 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
Posted by Quest for Freedom ... at 6:56 PM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Monday, February 11, 2019

संविधानाची चौकट, संघ आणि प्रकाश आंबेडकर


विवेक, उरूस, फेब्रुवारी 2019

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी भाजप विरोधी महागठबंधन करण्यासाठी कॉंग्रेस समोर एक विचित्र अशी अट ठेवली आहे. ती अट म्हणजे संघाला संविधानाच्या चौकटीत बसविण्याचा आराखडा कॉंग्रेसने तयार करावा. तरच वंचित बहुजन आघाडी भाजप विरोधी महागठबंधनात सामील होईल. 

पत्रकार परिषदेतील सर्व पत्रकार, हे ऐकणारे उपस्थित श्रोते आणि इतरही सर्व नागरिक यांना या अटीचा उलगडा होण्याची जराही शक्यता नाही. अगदी मोठ मोठ्या अभ्यासकांनाही प्रकाश अंबेडकरांची मागणी समजणं अवघड आहे. 

प्रकाश आंबेडकरांचा असा आरोप आहे की संघाची समांतर अशी सरकार सारखी यंत्रणा आहे. ती घटनेला मानत नाही. ही यंत्रणा स्वतंत्रपणे आपले काम करत असते. अगदी कॉंग्रेससारख्या पक्षातही संघाचे लोक गुप्तपणे सामील आहेत. ते नागपुरमधल्या मध्यवर्ती संघ कार्यालयाच्या संपर्कात असतात. आणि कॉंग्रसच्याही धोरणांची सगळी वित्तंबातमी देत असतात. 

कम्युनिस्टांमध्येही संघाचे लोक आहेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले असते तर त्यांचा सध्याचा आवेश पाहून कुणाला आश्चर्य वाटलं नसतं. इतकंच कशाला आमच्या वंचित बहुजन आघाडीतही संघवाले गुप्तपणे सामील झाले आहेत असंही आंबेडकर म्हणतील. त्यासाठी सध्या त्यांचे तोंड कुणी धरू शकत नाही. ( सांगली लोकसभा बवंआ कडून लढणारे पडळकर खरेच संघाचे कार्यकर्ते आहेत.)

संघाची स्थापना झाली तेंव्हा बाबासाहेब आंबेडकर भारतीय समाजकारणात राजकारणात समर्थपणे सक्रिय होते. तेंव्हा पासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे जवळपास 30 वर्षे बाबासाहेबांनी संघाची जी काही वाटचाल आहे ती पाहिली. त्या नंतरही दलित चळवळीला संघाची वाटचाल पाहता आली. पण कुणीच आत्तापर्यंत संघाबद्दल अशी मागणी केली नव्हती. 

1967 ची डॉ. लोहिया यांच्या नेतृत्वाखालची कॉंग्रेस विरोधी आघाडी, 1975 च्या आणीबाणी काळातील जनता पक्ष, 1989 चा व्हि.पी.सिंहांचा जनता दल या सगळ्या काळात कुठेही कधीही दलित चळवळ किंवा प्रकाश आंबेडकर यांनी संघाच्या असंवैधानिक बाबींचा उल्लेख केला नाही. जनता दलाच्या काळात तर स्वत: प्रकाश आंबेडकर सक्रिय होते. शरद जोशींच्या शिफारशीवरून व्हि.पी.सिंहांनी दोन जणांना राज्यसभेवर खासदार म्हणून घेतलं (दुसरे पंजाबातील शेतकरी नेते भुपेंद्रसिंग मान). त्यातील एक नाव प्रकाश आंबेडकरांचे होते. याच सरकारला भाजपचा पाठिंबा होता. पण तेंव्हा प्रकाश आंबेडकरांना संघा बद्दल काही आक्षेप घ्यावा असे वाटले नाही. 

मराठवाड्यात विद्यापीठ नामांतराचे आंदोलन पेटले तेंव्हा गोपीनाथ मुंढे वगैरे भाजपची नेते मंडळी नामांतराच्या बाजूने हिरीरीने पुढे आली होती. मराठवाड्यातील भाजप-संघाचा नामांतराला पूर्ण पाठिंबा होता. पुढे मंडल आयोगालाही भाजपने पाठिंबा दिला. सगळ्यात जास्त ओ.बी.सी. नेतृत्व भाजपतूनच पुढे आले. मराठवाड्यात नामांतराच्या आधीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकिय प्रतिष्ठान स्थापन करून संघ परिवाराने आपल्या वैद्यकीय उपक्रमांची सुरवात केली होती. या काळातच प्रकाश आंबेडकर यांनी गायरान जमिनी दलितांना मिळाव्यात यासाठी औरंगाबादेत मोठी परिषद घेवून आपली राजकीय ताकद दाखवायला सुरवात केली होती. त्या काळातही कधी त्यांना संघ असंवैधानिक आहे असे वाटले नव्हते. 

मूळात आंबेडकरांचा आरोप काय आहे? संघाची एक स्वतंत्र अशी यंत्रणा कार्यरत आहे. ती संविधानाला जूमानत नाही. आता आंबेडकर हे निष्णात वकिल आहेत. कायदा कोळून प्यालेल्या बाबासाहेब आंबेडकरांचे ते वारस आहेत. त्यांना हे पूर्ण माहित आहे की कुठलाही आरोप करताना पुरावा द्यावा लागतो. पण ते कुठलाही पुरावा देत नाहीत. 

भीमा कोरेगांव प्रकरणांत संभाजी भिडे यांच्यावर मनसोक्त आरोप करणारे, आठ दिवसांत भिडेंना अटक झालीच पाहिजे अशा गर्जना जाहिर सभांमधून करणारे प्रकाश आंबेडकर चौकशी आयोगासमोर मात्र चुप राहिले. त्यांनी संभाजी भिडेंच्या नावाचाही उल्लेख केला नाही. कारण बोलभांडपणे नुसती भाषणं करणं वेगळं आणि प्रत्यक्ष कायद्यासमोर, एखाद्या चौकशी आयोगासमोर आपले म्हणणे मांडणे वेगळे. त्याला वैध पुरावे द्यावे लागतात. 

संघाचे विविध उपक्रम विविध नावांनी चालतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने कुठलीही संस्था नोंदणीकृत नाही. संघावर आर्थिक आरोप करताना पत्रकार प्रा. जयदेव डोळे यांनीही असेच बीनबुडाचे आरोप केले होते. त्यांनाही कुठलेही पुरावे देता आले नाहीत. संघाशी संबंधीत संस्था त्या त्या नावाने धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत आहेत. बँका रिझर्व्ह बँकेचा परवाना घेवून चालतात, शैक्षणिक संस्था शिक्षण विभागाकडे नोंदणी केलेल्या असतात. सामाजिक न्याय विभागाकडे आश्रमशाळा, वस्तीगृहे, अनाथालये यांची नोंदणी झालेली असते. संघाशी संबंधीत वृत्तपत्रे मासिके नियतकालिके आर.एन.आय. कडे नोंदणीकृत झालेले आहेत. मग ज्यांना आरोप करायचे आहेत, शंका घ्यायच्या आहेत त्यांनी त्या त्या संस्थां संबंधात माहितीच्या अधिकारात अर्ज करावा. आणि माहिती गोळा करावी. 

प्रकाश आंबेडकरांना संघाचा जो असंवैधानिक पैलू खुपत आहे त्या बद्दल कॉंग्रेस कडून आराखडा कशासाठी पाहिजे आहे? मोदी सरकारची पाच वर्षे आणि अटल बिहारींची सहा वर्षे वगळली तर देशात कुणाचे राज्य होते? त्यांना या सगळ्या कालखंडात संघाचे हे असंवैधानिक स्वरूप का नाही खुपले?

कॉंग्रेसच्या काळात संघाची वाढ झाली. म्हणजे कॉंग्रेसचा संघाला छुपा पाठिंबा आहे असे प्रकाश आंबेडकरांना वाटते का? कॉंग्रेसमध्ये छुपे संघावाले आहेत तर ते कोण आहेत? एक तरी नाव प्रकाश आंबेडकरांनी जाहिर करावे. 

आंबेडकरांची अडचण मोठी विचित्र झाली आहे. कॉंग्रेस त्यांना राजकीय दृष्ट्या मोजायला तयार नाहीत. आत्ता महाराष्ट्रात पाच नगर परिषदांच्या निवडणुका झाल्यात. त्यातही परत भाजपचेच नगरसेवक जास्त संख्येने निवडून आले. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने यातील कर्जत नगर परिषदेत उमेदवार उभे केले होते. सर्वच्या सर्व उमेदवार पडले इतकेच नाही तर त्यांची अमानत रक्कमही जप्त झाली. अशी राजकीय वस्तुस्थिती असताना प्रकाश आंबेडकर लोकसभेच्या 12 जागा कशाच्या आधारावर मागत आहेत? त्यांना साथ आहे आवैसी यांच्या एम.आय.एम. पक्षाची. जो पक्ष मुळात संविधानाला मानतो का? हे आधी आंबेडकरांनी स्पष्ट करावे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कट्टरपंथी मुसलमांनाच्या बद्दल काय लिहून ठेवले हे आधी प्रकाश आंबेडकरांनी वाचावे. ते ज्यांच्या मांडीला मांडी लावून सध्या बसतात त्या असदुद्दीन ओवैसी यांचा पोशाख काय असतो? ओवैसी भारतीय घटनेचे किती पालन करतात हे स्वत:च्या तोंडून सांगावे.

मूळात महाराष्ट्रातील दलित चळवळ स्वत:च्या जीवावर वाढलीच नाही. सतत कुणीतरी फेकलेल्या सत्तेच्या तुकड्यामूळे लाचार राहिली. मोजक्या नेत्यांना चार दोन सत्तेची पदे, मंत्रीपदे, विधान परिषदेवर आमदारकी, विधान परिषदेचे सभापतीपद, राज्यसभेवर खासदारकी, राज्यपालपद यावरच ही चळवळ चालू आहे असे चित्र आहे. ज्या पद्धतीनं मायावतींनी स्वत:च्या जीवावर सत्ता मिळवत आपली राजकीय ताकद दाखवून दिली तसं महाराष्ट्रात कधीच झालं नाही. जेमतेम एका अकोला जिल्हा परिषदेत काही काळ प्रकाश आंबेडकरांना सत्ता राबवता आली. भारीप- बहुजन महासंघ स्थापन करून विविधी जातींच्या नेत्यांचे कडबोळे अशी एक आघाडी त्यांनी तयार केली. त्यासाठी कसलाही वैचारिक आधार उभा केला नाही. कांशीराम यांनी आपली सुरवात महाराष्ट्रातूनच केली होती हे लक्षात घेतले म्हणजे प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, रा.सु. गवई, जोगेंद्र कवाडे यांनी नेमके काय गमावले हे लक्षात येते. 1998 ला कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर हे चौघेही खुल्या जागांवरून खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर एकच टर्म प्रकाश आंबेडकर निवडून येवू शकले. परत कुणीही दलित नेता स्वत:च्या बळावर खुल्या मतदारसंघातून निवडून आला नाही. हे कुणाचे अपयश आहे? 

आज प्रकाश आंबेडकर भाजप-संघावर आरोप करत आहेत पण याच संघाने एक दलित व्यक्ती राष्ट्रपती पदावर बसवली, एक ओ.बी.सी. पंतप्रधानपदावर बसवला, एक शेतकरी उपराष्ट्रपती पदावर बसवला, दुसर्‍या एका पक्षाचा बहुजन नेता राज्यसभेत उपाध्यक्ष म्हणून बसवला. मग हे कुणाचे प्रतिनिधी आहेत? जातीबाबत हाच प्रश्‍न प्रकाश आंबेडकर कम्युनिस्टांना का नाही विचारत? किती दलित कम्युनिस्टांना सर्वोच्च पदावर संधी मिळाली? आज ज्या आनंद तेलतुंबडे या आपल्या बहिणीच्या नवर्‍यासाठी प्रकाश आंबेडकर आकंडवतांडव करत आहेत त्यांचा भाऊ मिलींद तेलतुुंबडे नक्षलवादी कारवाया कुठल्या संवैधानिक चौकटीत राहून करतो हे आंबेडकरांनी सांगावे. संघावर आरोप करताना आपल्या आजूबाजूचे किती लोक उघडपणे संविधान विरोधी कारवाया करत आहेत हे प्रकाश आंबेडकरांनी पहावे जरा.   

                              श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 
Posted by Quest for Freedom ... at 11:19 AM 1 comment:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Saturday, February 9, 2019

प्रवीण बर्दापूरकर : दुपारच्या चहाचे मैत्र


दैनिक उद्याचा मराठवाडा ९ फेब्रुवारी २०१९ 

दुपारी साडेतीन चार ची वेळ झाली की मला बर्दापूरकर सरांची आठवण येते. माझ्याही नकळत माझी बोटं मोबाईलवर त्यांचा नंबर डायल करतात. ‘सर मोकळे अहात का? चहाला येऊ?’. माझ्या प्रश्‍नाला बहुतांश वेळा त्यांचा उत्साहानं भरलेला होकार येतो. उन्हं कलायला लागलेली असतात. माझ्या घरापासून अगदी जवळ असलेल्या त्यांच्या घरी मी उत्सुकतेनं पोचतो. माझ्या डोक्यात खुप काही बोलायचं असतं. काही खटकलेल्या गोष्टींसाठी त्यांच्यापाशी मन मोकळे करायचे असते. त्यांच्याकडून खुप काही ऐकायचं असतं. पत्रकारीतेतील कितीतरी संदर्भ नव्यानं समजून घ्यायचे असतात.

त्यांना आतल्या खोलीत आपण आलेलो कळावे म्हणून दरवाजा उघडा असला तरी मी बेल वाजवतोच.  आवाज कशाला केलास म्हणून त्यांचे बोलणेही खातो. वहिनी बाहेर खुर्चीवर बसलेल्या असतात. टिव्हीवर कुकरी शो, खेळ किंवा जूनी हिंदी गाणी असलं त्यांच्या आवडीचं काहीतरी चालू असतं. बर्दापूरकर त्यांच्या आतल्या खोलीत ज्याला मी आणि धनंजयनी ‘दिवाण-ए-खास’ नाव दिलं आहे तिथं असतात. मग आतूनच तिकडे येण्याचा आदेश येतो. वहिनींना चार दोन शब्द मी बोलतो. त्यात बर्‍याचदा जून्या गाण्यांचेच संदर्भ असतात. बर्दापुरकर बाहेर असतील तर तेही काहीतरी गाण्यांबद्दल बोलतात. त्यांच्या किंवा माझ्या बोलण्यात एखादा चुक संदर्भ आला की वहिनी न चुकता तो दुरूस्त करत, ‘नाही रे, त्यात वहिदा नाही, माला सिन्हा आहे’, ‘संगीतकार रवी नाही जयदेव आहे’, ‘लता नाही सुमन कल्याणपुरचे आहे ते गाणे’ असं अगदी कमी शब्दांत सांगून मोकळ्या होतात. आवडतं गाणं चालू असेल तर आम्ही तिघेही त्यावरच्या गप्पा मारत बाहेरच्या खोलीत ज्याला आम्ही ‘दिवाण-ए-आम’ असं नाव दिलंय तिथे बसतो.  

आतल्या खोलीत गेल्यावर बर्दापूरकर सर त्यांच्या आवडत्या लेखनाच्या टेबलासमोरच्या खुर्चीवर विराजमान होतात.  मधल्या छोट्या टीपॉयवर कामवाल्या मावशींनी चहा आणि सोबत बिस्किटं खारी आणून ठेवली असते. चहा कधीच छोट्या कपात नसतो. मोठ्या कपात काठोकाठ भरून चहा येतो. माझा मित्र अशा कपातून चहा पिण्याला ‘तांब्यानं चहा पिणं’ म्हणतो. मला चहा अत्यंत प्रिय असल्याने ‘फारच मोठा कप आहे, इतका कशाला?’ असलं काहीही शिष्टासारखं न म्हणता तो कप मी ताब्यात घेवून चहाचा बिस्कीटांचा आस्वाद घेत सरांशी गप्पा मारायला लागतो. किंवा खरं तर उलटं झालेलं असतं. मी चहा सुरू करे पर्यंत सरांनी त्यांच्या डोक्यात असलेला एखादा विषय संदर्भ आठवण सांगायला सुरवातही केली असते. मी त्यांच्याकडे कधीच संकोच न करता सर्व बिस्कीटं संपवणे शिल्लक जास्तीचा चहा असेल तर तोही पिणे असले  उद्योग करतो. 

त्यांच्या माझ्या वयातलं 20 वर्षांचं अंतर विसरून त्यांचा पत्रकारितेतला प्रचंड दांडगा अनुभव, कित्येक राजकीय नेत्यांशी, उच्चपदस्थ अधिकार्‍यांशी असलेली त्यांची अगदी अरे तूरेची मैत्री, शेकडो सामाजिक संस्थांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध सारं सारं बाजूला ठेवून ते सहजपणे माझ्याशी गप्पा मारत असतात.

बर्दापूरकर सरांचा माझा प्रत्यक्ष परिचय व्हायच्या आधीच त्यांची भेट लोकसत्तातून झालेली होती. त्यांच्या वेगळ्या बातम्या, एखादं स्फुट, एखादं फिचर आम्हां मित्रांमध्ये चर्चिल्या गेल्याचं आजही चांगलं आठवतं (औरंगाबादला झालेल्या विचारवेध संमेलनाचे पाहूणे भाजप-सेनेच्या गाडीतून कसे उतरले वगैरे). निवृत्तीनंतर त्यांनी औरंगाबादला स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. श्याम देशपांडेच्या कार्यालयात आम्ही दर रविवारी जमून गप्पा टवाळ्या करायचो त्यात बर्दापुरकर सर सहज सामील झाले. वयाचे अंतर मिटवून तिथे सगळेच मोकळेपणाने गप्पा मारतात. त्या ‘संडे क्लब’ ने त्यांच्याशी  मैत्रीचे धागे घट्ट करून दिले.
 
त्यांच्या घरी मी जायला लागलो तसा एक मोकळेपणा अनुभवास आला. जसा मोठा भाऊ आपली काळजी घेतो आपल्याला वडिलकीच्या नात्याने रागावतो प्रसंगी आपल्याशी मित्रत्वाच्या नात्याने वागतो अशी त्यांच्याबाबतची एक भावना माझ्या मनात वाढत गेली.बर्‍याचदा ते लिखाण डिक्टेट करून सांगतात. या प्रक्रियेत लिहायच्या आधी गप्पा मारताना उघड चिंतन असं काही तरी घडत असणार. मग त्यांना माझ्यासारखी एक जिवंत भिंत सेयीची वाटत असावी. त्यांच्या कितीतरी लेखांचे विषय त्यांनी माझ्यापाशी सविस्तर चर्चिले आहेत. वस्तुत: त्यात माझा काहीच सहभाग नसतो. मी त्या विषयातला कुणी तज्ज्ञ नसतो. माझ्याशी त्या व्यक्ती किंवा त्या घटना संबंधित नसतात. पण तरी सर माझ्याशी नदिच्या पात्रात संथपणे पाणी वहात जावं तसं बोलत राहतात. मी काहीतरी एखादी व्यक्ती एखादी घटना एखादा प्रसंग या बाबत थोडंसं काहीतरी त्यांना पुढे बोलण्यासाठी आधार मिळावं असं बोलतो. परत त्यांचा ओघ चालू राहतो. 

छापिल पत्रकारितेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी त्यांच्या वयाला शोभणार नाही अशी डीजीटल पत्रकारिता सुरू केली. सातत्याने ब्लॉग लेखन केलं. सामाजिक राजकीय बातम्यांचे त्यांचे ‘सोर्स’ आजही जबरदस्त आहेत. त्यांच्या लिखाणात इतरत्र छापून आलेल्या किंवा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांतून समोर आलेल्या त्याच बातमीचे कितीतरी वेगळे पैलू वाचकां समोर येतात. वेगळे संदर्भ वाचकांना समृद्ध करून जातात. 

मंगल वहिनींच्या आजारपणाने त्यांना गेले काही दिवस घरातच जखडून ठेवले आहे. पण याचा कुठलाच परिणाम त्यांच्या लिखाणावर होवू शकला नाही हे एक आश्चर्य आहे. वहिनींच्या आजारपणाची कसरत सांभाळताना एखाद्या बातमीचा घटनेचा संदर्भ वेगळ्या दृष्टीने शोधणे, संबंधित व्यक्तीला अधिकार्‍याला प्रत्यक्ष फोन करून खातरजमा करून घेणे, स्वत:च्या समृद्ध ग्रंथ संग्रहातून नेमकी माहिती शोधून लेखात पेरणे हे सगळं अतिशय कठिण काम आहे. त्यांच्यातला सच्चा पत्रकार त्यांना शांत बसू देत नाही.

सकाळी आलेल्या वर्तमानपत्रांतील एखाद्या चुकीच्या शब्दांबद्दल ते अस्वस्थ असतात. टिव्ही वाहिन्यांवरच्या बातम्यांची चिरफाड करण्याचा तर त्यांना आता कंटाळाच आला आहे. त्या चर्चांमध्ये जाणेही त्यांनी पार कमी करून टाकले आहे. 

माझा त्यांचा प्रत्यक्ष परिचय होण्याआधी नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेंव्हा त्यांनी लिहीलेला लेख माझ्या वाचण्यात आला. मी त्यांच्या त्या शैलीच्या प्रेमातच पडलो. लोकसत्ताच्या पुरवणीतील त्या लेखाचे पानभर लेआऊट आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यांच्या इतर सगळ्या लिखाणात मला त्यांची व्यक्तीचित्रे आणि ललित लेखच जास्त आवडतात. माझा तर त्यांना सतत आग्रह असतो तूम्ही हे अनुभव ललित शैलीत मांडा. 

मी जून्या गाण्यांचा अभ्यास हौसेखातर करतो आहे. त्यात एकदा साबरी ब्रदर्सच्या ‘भर दे झोली मेरी या मोहम्मद’ या कव्वालीचा संदर्भ निघाला. ही कव्वाली चित्रपटात आहे असा उल्लेख वाचून मी त्याचा शोध घेत होतो. पण तो संदर्भ सापडतच नव्हता. मग पुढे ही कव्वाली पाकिस्तानी चित्रपटात असल्याचे केदार मांडाखळीकर या तरूण मित्राने शोधून दिले. मी हे बर्दापूरकरांना सांगत होतो तेंव्हा त्यांनी खुलताबादच्या उरूसात ही कव्वाली आपण तरूणपणी कशी ऐकली होती ते रसदार वर्णन करून सांगितलं. मी त्यांना आग्रह धरला की तूम्ही या आठवणी लिहाच. पत्रकारिता करताना केवळ रूक्ष घडामोडींवरच लिहायला पाहिजे असं नाही. आजूबाजूच्या साहित्यिक सांस्कृतिक घटनांचाही आढावा घेतला पाहिजे हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीने दाखवून दिले होते. पुरवणीत प्रतिभावंतांना लिहायला लावून वाचकांना एक मोठी कलात्मक मेजवानी दिलेली आहे. विदर्भातील साहित्यिक सांस्कृतिक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. हे सगळे अनुभव त्यांनी लिहावेत असा माझा लकडा असतो. 

महाराष्ट्र राज्याचे भाषा संचालक यशवंत कानिटकर यांचं बीड जिल्ह्यातील गाव लिंबा गणेश बर्दापुरकरांच्या गावा जवळच आहे. गावच्या खुप सुंदर आठवणी त्यांनी लिहून ठेवल्या आहेत. त्याच धर्तीवर मी बर्दापुरकरांना त्यांच्या लहानपणच्या शिक्षणाच्या घराच्या गावाच्या सुरवातीच्या पत्रकारितेच्या  आठवणी लिहा असा आग्रह करत असतो. ते या आठवणी सांगताना व्यंकटेश माडगुळकरांची मला नेहमी आठवण येते. अकृत्रिम अशा शैलीत माडगुळकर लिहीत जातात. तशीच धाटणी बर्दापुरकरांची आठवणी सांगताना जाणवते. पण अजूनही त्यांनी हे फारसं लिहीलं नाही ही माझी खंत आहे. 

आपल्या क्षेत्रातील तरूण पत्रकारांना मदत करण्यासाठी ते एका पायावर तयार असतात. पण नविन पिढी फारशी मेहनत घेत नाही ही तक्रार त्यांची असते. सध्या कार्यरत असलेल्या संपादकांच्या सुमारपणाबद्दल त्यांच्या खुप तक्रारी आहेत. त्यांनी स्पष्टपणे खुपदा लिहीलेही आहे. काही जणांना त्यांचे फटकारणे खुपते. पण त्या मागची पत्रकारितेबद्दलची तळमळ ते लक्षात घेत नाहीत.  

त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खुप पैलू या काही दिवसांत जवळून पहायला मिळाले. सायलीच्या लग्नाच्या प्रसंगातला एक प्रेमळ बाप, मंगल वहिनींच्या आजारपणात काळजी घेणारा एक प्रेमळ नवरा, त्यांच्याबद्दल हळवेपणाने बोलताना एक प्रियकर, सद्यकालीन पत्रकारितेवर कोरडे ओढणारा जून्या पिढीतला सच्चा पत्रकार, मी-मनोज-धनंजय आमच्यावर मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करणारा सहृदय माणूस, घर टापटीप सुंदर ठेवणारी एक कलासक्त व्यक्ती, एक शैलीदार लेखक, आपल्या वयाचा अनुभवाचा मोठेपणा विसरून इतरांत मिसळणारा माणसांच्या गोतावळ्यात रमणारा एक माणूस असे त्यांचे कितीतरी पैलू लखलखत समोर येतात. मिलींद देशपांडे सारख्या मित्राचा उल्लेख त्यांच्या तोंडून ऐकताना तर मला कुणी आपल्याच हृदयाच्या एका तुकड्याबद्दल बोलत आहे असा भास होत राहतो. मी स्वत: जवळच्या मित्रांमध्ये असा नेहमीच विरघळून जातो म्हणून असेल कदाचित मला त्यांची ही मित्राबद्दलची भावना चांगलीच उमगते. 

बर्दापूरकरांच्याकडे मी काहीतरी माझ्या आयुष्यातील अडचणी तक्रारी घेवून गेलेलो असतो. त्यांच्या समोर कमीजास्त शब्दांत मी त्या मांडलेल्या असतात. गप्पा संपवून परत येताना उन्हं पूर्ण कललेली असतात. संध्याकाळचे सुरेख रंग आभाळात पसरलेले असतात. माझ्या अचानक लक्षात येतं की माझी तक्रार, अडचण त्यांनी अलगद सुसह्य करून दिलेली आहे. माझ्या मनावरचे ओझं उतरलेलं असतं. मंगल वहिनींनी अतिशय मोजक्या शब्दांत जिव्हाळ्याचं दान माझ्या पदरात घातलेलं असतं. माझ्या एका कार्यक्रमाला त्या डॉ. अंजली देशपांडे सोबत आलेल्या होत्या. त्या कार्यक्रमातलं निवेदन त्यांना आवडलं. नंतर पुढे आजरपणानं त्यांचं बाहेर जाणं बंद झालं. पण प्रत्येक भेटीत माझ्या निवेदनाची एक ओळख त्या डोळ्यांतून मुकपणाने देत आहेत असंच जाणवत राहतं. अन्यथा अतिशय थोड्या परिचयात इतकी माया माझ्या वाट्याला येण्याचं कारणच काय.

मी त्यांच्या घरातून बाहेर पडतो. संध्याकाळचा अंधार पडत चाललेला असतो. केवळ प्रवीण बर्दापूरकर ही एक व्यक्ती नव्हे तर मंगल वहिनी आणि त्या घराशीच आपलं काहीतरी मैत्र जूळून आलेलं आहे. त्या मैत्रिचा मंद दिवा आपल्या आत पेटला आहे. असं वाटत राहतं. मॅटिनी शोच्या चित्रपटांचा एक सौम्य असा रंग असतो (जून्या काळी). तसा दुपारच्या चहाच्या वेळच्या या मैत्रिला एक सौम्य रंग, मंद सुगंध आहे. 

संध्याकाळी आई तुळशीसमोर दिवा लावायची तेंव्हा  शुभंकरोती म्हणत हात नकळत जुळले जायचे. आता तुळशी समोर दिवा शुभंकरोती हे वाढत्या वयात बदललेल्या काळात लोपून गेलंय. दासू-धनंजय-शाहू-मनोज या समकालीन मित्रांच्या सोबत श्याम देशपांडे, जयदेव डोळे, निशीकांत भालेराव आणि प्रवीण बर्दापूरकर या वयाने मोठ्या असलेल्या स्नेह्यांनी जे मैत्र दिलंय त्याचा दिवा काळजात  तेजाळून येतो. आई वडिलांपासून परभणीहून मी 2004 मध्ये दूर औरंगाबादला आलो. पंधरा वर्षे उलटली पण ती हूरहूर या मित्रांनी कधी जाणवू दिली नाही.   
बर्दापूरकरांच्या तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आज होतो आहे. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस 11 तारखेला आहे. त्यांना आणि वहिनींना मन:पूर्वक शुभेच्छा ! 
(छायाचित्र बर्दापूरकर यांच्या ब्लॉग वरून साभार )
 
श्रीकांत उमरीकर 

जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-401. मो. 9422878575
Posted by Quest for Freedom ... at 11:51 AM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Thursday, February 7, 2019

सावरकर विरोधकांचा वैचारिक आडमुठपणा !


विवेक, उरूस, फेब्रुवारी 2019

महात्मा गांधींच्या हत्येला 70 वर्षे होवून गेली. या हत्येच्या कटात सावरकरांचा सहभाग होता असा आरोप करण्यात आला. विशेष न्यायालयात त्यांच्यावर रीतसर खटला दाखल झाला आणि सावरकर त्यातून निर्दोष सुटले. सावरकरांची सुटका अजूनही त्यांच्या विरोधकांना पचलेली नाही.

सावरकर विचाराचे अभ्यासक  मा. श्री. शेषराव मोरे यांनी हा विषय धसाला लावण्याचे ठरवले. त्यांनी आधी ‘सावरकरांचा बुद्धीवाद’, ‘सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग’ अशी पुस्तके लिहीली होती. पण गांधीहत्येच्या प्रकरणाला हात लावला नव्हता. सावरकरांचा मृत्यू 1966 ला झाला. तेंव्हा पासून ते 1998 ला अटल बिहारी वाजपेयी यांचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एन.डी.ए.) सरकार केंद्रात सत्तेवर येईपर्यंत सावरकर विरोधक शांत होते. पण वाजपेयी सरकारच्या काळात अंदमान येथील पोर्ट ब्लेअर विमानतळाचे नामकरण ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विमानतळ’ असे करण्यात आले.  शिवाय संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात सावरकरांच्या तैलचित्राचे अनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते 26 फेब्रु. 2003 मध्ये करण्यात आले. 

या दोन ठळक प्रसंगानंतर सावरकर बदनामीला विरोधकांनी जोर दिला असा शेषराव मोरे यांनी साधार आरोपच आपल्या पुस्तकात केला आहे. तिस्ता सेटलवाड यांच्या ‘कम्युनॅलिझम कॉंबॅट’ नावाच्या मासिकात इ.स. 2000 मध्ये गांधीहत्येवरील गुजराथी व मराठी पुस्तकांचे संपादित अनुवाद प्रसिद्ध करण्यात आले.  मणिशंकर अय्यर यांनी 2002 मध्ये इंडियन एक्स्प्रेस मध्ये लेख लिहीला. 2004 च्या आऊटलूक च्या अंकात राजेश रामचंद्रन, सबा नक्वी व स्मृती कोप्पियर यांचेही लेख आहेत. मनिनी चटर्ज़ी (एक्स्प्रेस 2004) प्रफुल बिडवई (नवहिंद टाईम्स 2004),  अनिल नौरिया (द हिंदू 2004) अशी एक यादीच मोरे यांनी आपल्या पुस्तकात दिली आहे. 

सावरकरांच्या बदनामीचे मुळ आरंभक व प्रचारक अब्दुल गफूर नुराणी हे आहेत. पोर्ट ब्लेअर विमानतळाचे नामकरण झाल्यानंतर त्यांनी ‘सावरकर अँड हिंदुत्व : गोडसे कनेक्शन’ या नावाचे दोनशे पानाचे पुस्तक लिहून प्रसिद्ध केले. बहुतांश पत्रकारांनी नुरानी यांच्या पुस्तकाचा संदर्भ घेत आपले लिखाण केले आहे. 

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांचे 2007 मध्ये ‘लेट्स किल गांधी’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. तिस्ता सेटलवाड यांनी आपल्या लेखाचे संकलन असलेले पुस्तक ‘बिआउंड डाऊट- ए डोझायर ऑन गांधीज ऍसॅसेनेशन’ जानेवारी 2015 मध्ये प्रसिद्ध केले. काही मराठी पत्रकारांनीही यावर लेख लिहीले आहे. सुनील तांबे सारखे पत्रकार यांनी ‘सावरकर यांच्यावरील गांधी हत्येचा कलंक पुसणे केवळ अशक्य’ असे लेखकही लिहीले (मिडीया वॉच दिवाळी 2015). 

शेषराव मोरे यांनी आपल्या पुस्तकात अशा लेख आणि पुस्तकांचा सविस्तर आढावा घेतला आहे. मुळात ही सगळी माणसे ज्या कपुर आयोगाचा आधार घेतात त्याचीच चिकित्सा पहिल्यांदा मोरेंनी केली आहे. मुळात सावरकरांना न्यायालयाने निर्दोष सोडल्यानंतर परत त्यांच्यावर संशय ज्यांना होता त्यांनी वरच्या न्यायालयात खटला का नेला नाही? आयोग हा काही न्यायालयाचा निकाल परत तपासून पाहण्याची जागा नाही. आयोगाला तेवढा अधिकारही नाही. मग हा आयोग नेमलाच का गेला? 

हा एक असा नेमका मुद्दा हो की जिथे हे सगळे सावरकर विरोधक मूग गिळून गप्प बसतात. नुराणी सारखे लेखक तर ‘न्या. कपुर यांना गांधी हत्या कारस्थानाची संपूर्ण चौकशी करण्यास सांगितले होते’ असे सर्रास खोटं लिहीतात.

1964 मध्ये गोपाळ गोडस, विष्णु करकरे व मदनलाल पाहवा हे जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आले. त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या चाहत्यांनी  सार्वजनिक सत्यनारायण पुजेचा कार्यक्रम आखला होता. त्यात भाषण करताना लोकमान्य टिळकांचे नातू ‘केसरी’ व ’तरूण भारत’चे संपादक राहिलेले ग.वि.केतकर असे बोलून गेले की गांधीहत्या होणार हे त्यांच्या कानावर होते. आणि ही माहिती त्यांनी मध्यस्थामार्फत तत्कालीन मुख्यमंत्री बा.गं. खेर यांना दिली होती. 

केवळ हा एकच मुद्दा केंद्रभागी ठेवून निवृत्त न्या. जीवनलाल कपुर आयोगाची स्थापना केल्या गेली. कपुर आयोगाला जे तीन मुद्दे चौकशीसाठी दिले होते त्यांचा सारांश असा 

1. ग.वि.केतकर किंवा अन्य कुणाला गांधीहत्येच्या कटाची पूर्व माहिती होती का?
2. जर असेल तर त्यांनी ती सरकारला कळवले का? 
3. कळवले असेल तर सरकारने काय कारवाई केली?

म्हणजे मुळात कपुर आयोगाच्या कक्षा काही मुद्द्यांपूरत्या सिमीत आहेत. तसे असतनाही नुराणी सारखे लोक धादांत खोटे लिहीतात. आणि नुराणींचा संदर्भ घेवून बाकीही बदनामीचा उद्दोग करतात. 
कपूर आयोगाने आपल्या निष्कर्षात कुठेही सावरकरांचा उल्लेख केला नाही. केवळ एका परिच्छेदात काहीही संदर्भ नसताना सावरकरांचा ते उल्लेख करतात. आणि त्या आधारावर नुराणीपासून सर्व सावरकर विरोधक आरोपांचा पर्वत उभा करतात. 

शेषराव मोरे यांचे ‘गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी’ हे पुस्तक 28 मे 2018 ला प्रसिद्ध झाले. आता अपेक्षीत असे होते की सावरकर विरोधकांनी त्यावर आपले म्हणणे सविस्तर मांडावे. शेषरावांनी सावरकरांवरील आरोपांचे जे खंडन सविस्तर केले आहे त्याचा अभ्यास करून आपली पुढील मांडणी करावी. पण आता नऊ महिने उलटून गेलेत.  पण या विरोधकांनी शेषरावांच्या पुस्तकावर कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. 

सुनील तांबें सारखे पुरोगामी पत्रकार तर अशी जाहिर भूमिका घेत आहेत की मी शेषराव यांचे पुस्तक मी वाचणार नाही. हा निव्वळ वैचारिक आडमुठपणा झाला. तूम्ही काही पुस्तकांचा आधार घेवून सावरकरांवर आरोप करता. त्याची चिकित्सा कुणी केली तर तूमचे काम आहे की तूम्ही ते वाचून त्यावर आपली प्रतिक्रिया द्यावी. 

यातही एक बाब अशी आहे की न्यायालयीन बाबी, सार्वजनिक जिवनातल्या सावरकरांसारख्या उत्तूंग नेत्यांच्या विषयीची काही मते ही वैचारिक मतभेदापुरती मर्यादीत असू शकत नाहीत. एकदा न्यायालयाने निकाल दिल्यावर तो जर तूम्हाला मान्य नसेल तर त्याच्याही वरच्या न्यायालयात दाद मागावी लागते. तिथेही मिळालेला न्याय समाधान देणारा नसेल तर सर्वौच्य न्यायालयात जावे लागते. कुठल्याही न्यायालयाच्या निकालाला आयोग हा पर्याय नसतो. शिवाय इतकं करूनही कपुर आयोगातील प्रचंड त्रुटी शेषरावांनी आपल्या पुस्तकांत दाखवून दिल्या आहेतच. 

77 पुस्तके वाचून कायद्याचा सखोल अभ्यास करून (शेषराव मोरे हे मूलत: अभियंते आहेत. त्यांनी कायद्याची पदवी नंतर प्राप्त केली) मोरे यांनी सदर लिखाण केले आहे. त्यांच्या लिखाणीतील त्रुटी कुणीही सविस्तर दाखवून द्याव्यात. 

आपल्या वैचारिक लिखाणाचा कुणी प्रतिवाद करणार असेल तर मोरेंनी त्याचे स्वागतच केले आहे. फाळणीवरच्या त्यांच्या पुस्तकावर मतं व्यक्त करणार्‍या लेखांचेपण एक पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. त्यात विरोधी मतेही आहेत. पण याच्या नेमकं उलट सावरकर विरोधी पुरोगामी विचारवंत पत्रकार मात्र संकुचित भूमिका घेत आहेत. समोर सत्य आलेलं असताना  ते नाकारण्याची भूमिका अनाकलनीय आहे. 
एकीकडे ‘व्हेअर आर द राईट इंटेलेक्चुअल्स’ असा उद्धट प्रश्‍न पुरोगामी डाव्या विचारवंत पत्रकारांकडून केला जातो.  पण प्रत्यक्षात डावा नसलेला (उजवा म्हणूनही शिक्का नसलेला) तटस्थ शेषराव मोरेंसारखा कुणी एक अभ्यासू लेखक सविस्तर मोठे पुस्तक लिहीत आहे. त्याला उत्तर देण्याऐवजी ‘आम्ही नाही वाचणार जा... ’ असा बालीश आग्रह पुरोगामी धरणार असतील तर याला काय म्हणावे? यापूर्वी शेषराव मोरे यांच्या अंदमान येथील अध्यक्षीय भाषणावर असाच आडमुठा आग्रह पत्रकार प्रा. जयदेव डोळे यांनी धरला होता. मी शेषराव मोरे यांचे वाचतच नाही असे डोळेंचे म्हणणे होते. मग जर डोळे वाचणारच नसतील तर मग टीका तरी कशाला करता? 

खंडन मंडनाची एक प्राचीन भारतीय परंपरा आहे. आपल्या विरोधी मतवाल्याचीही दखल घेण्याची उदारता आमच्याकडे आहे. मग हे सगळं पुरोगामी विसरून जाणार आहेत का? आणि तसे असेल तर यांना ‘पुरोगामी’ म्हणायचेच कशाला? हे तर मध्ययुगीत सरंजामी मानसिकतेचे प्रतिगामी आहेत. यांची वैचारीक ताकद संपून गेली आहे असंच म्हणावं लागेल.  

                              श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

ReplyReply allForward


Displaying IMG_20190204_114631~2.jpg.
Posted by Quest for Freedom ... at 11:54 AM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Comments (Atom)

About Me

Quest for Freedom ...
श्रीकांत अनंत उमरीकर जन्म : 6 जानेवारी 1971 शिक्षण : बी.ई. (इलेक्ट्रीकल) प्रकाशित पुस्तके : 1) दोन शब्दांमध्ये (कवितासंग्रह) 2) समग्र बी. रघुनाथ खंड : 1,2,3,4 (संपादन) 3) बी. रघुनाथ यांचे वाङ्‌मय एक परिसंवाद (संपादन) 4) समग्र डॉ. ना. गो. नांदापूरकर (खंड:1,2) (संपादन.) संपादक : मासिक ग्रंथसखा कार्यकारी संपादक : पाक्षिक शेतकरी संघटक पुरस्कार : लोकमत युवा साहित्यिक पुरस्कार 1992 महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मिती पुरस्कार 1995 संस्था : सचिव - जनशक्ती ज्ञान अकादमी व्यवसाय : संचालक - जनशक्ती वाचक चळवळ सामाजिक कार्य * लोक नीती मंच ह्या द्वारे विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली जाते . * विविध सामाजिक चळवळीत सक्रीय सहभाग. * औरंगाबाद शहरातील रस्त्यावरील खड्ड्यासाठी केलेल्या आंदोलनात तुरुंगवास * शेतकरी संघटनेत सक्रीय सहभाग संपर्क : जनशक्ती वाचक चळवळ, 244- समर्थनगर, औरंगाबाद-431001-31. वीजकीय टपाल : shri.umrikar@gmail.com
View my complete profile

Total Pageviews

Blog Archive

  • ►  2022 (35)
    • ►  April (4)
    • ►  March (12)
    • ►  February (8)
    • ►  January (11)
  • ►  2021 (165)
    • ►  December (9)
    • ►  November (14)
    • ►  October (9)
    • ►  September (10)
    • ►  August (11)
    • ►  July (10)
    • ►  June (10)
    • ►  May (11)
    • ►  April (16)
    • ►  March (27)
    • ►  February (19)
    • ►  January (19)
  • ►  2020 (188)
    • ►  December (29)
    • ►  November (21)
    • ►  October (17)
    • ►  September (14)
    • ►  August (14)
    • ►  July (15)
    • ►  June (15)
    • ►  May (19)
    • ►  April (15)
    • ►  March (11)
    • ►  February (11)
    • ►  January (7)
  • ▼  2019 (61)
    • ►  December (4)
    • ►  November (3)
    • ►  October (7)
    • ►  September (5)
    • ►  August (4)
    • ►  July (3)
    • ►  June (7)
    • ►  May (7)
    • ►  April (7)
    • ►  March (5)
    • ▼  February (5)
      • साहित्य संगीत कला चळवळ लोक वर्गणीतून चालायला हवी !
      • छोट्या गावांमध्ये रूजत आहे शास्त्रीय संगीत चळवळ
      • संविधानाची चौकट, संघ आणि प्रकाश आंबेडकर
      • प्रवीण बर्दापूरकर : दुपारच्या चहाचे मैत्र
      • सावरकर विरोधकांचा वैचारिक आडमुठपणा !
    • ►  January (4)
  • ►  2018 (75)
    • ►  December (7)
    • ►  November (8)
    • ►  October (8)
    • ►  September (7)
    • ►  August (5)
    • ►  July (7)
    • ►  June (7)
    • ►  May (6)
    • ►  April (5)
    • ►  March (6)
    • ►  February (5)
    • ►  January (4)
  • ►  2017 (44)
    • ►  December (4)
    • ►  November (1)
    • ►  October (3)
    • ►  September (4)
    • ►  August (4)
    • ►  July (9)
    • ►  June (1)
    • ►  May (1)
    • ►  April (6)
    • ►  March (4)
    • ►  February (3)
    • ►  January (4)
  • ►  2016 (65)
    • ►  December (1)
    • ►  November (2)
    • ►  October (7)
    • ►  September (7)
    • ►  August (9)
    • ►  July (7)
    • ►  June (7)
    • ►  May (6)
    • ►  April (6)
    • ►  March (4)
    • ►  February (5)
    • ►  January (4)
  • ►  2015 (48)
    • ►  December (4)
    • ►  November (6)
    • ►  October (5)
    • ►  September (4)
    • ►  August (9)
    • ►  June (3)
    • ►  May (6)
    • ►  April (4)
    • ►  March (3)
    • ►  February (3)
    • ►  January (1)
  • ►  2014 (53)
    • ►  December (3)
    • ►  November (4)
    • ►  October (4)
    • ►  September (5)
    • ►  August (4)
    • ►  July (6)
    • ►  June (5)
    • ►  May (4)
    • ►  April (4)
    • ►  March (4)
    • ►  February (5)
    • ►  January (5)
  • ►  2013 (45)
    • ►  December (6)
    • ►  November (4)
    • ►  October (5)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (2)
    • ►  June (5)
    • ►  May (3)
    • ►  April (4)
    • ►  March (3)
    • ►  February (3)
    • ►  January (1)
  • ►  2012 (24)
    • ►  November (1)
    • ►  October (2)
    • ►  September (1)
    • ►  August (4)
    • ►  July (1)
    • ►  June (2)
    • ►  May (3)
    • ►  April (1)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (5)
  • ►  2011 (9)
    • ►  October (2)
    • ►  September (2)
    • ►  August (3)
    • ►  July (2)

About Me

Quest for Freedom ...
श्रीकांत अनंत उमरीकर जन्म : 6 जानेवारी 1971 शिक्षण : बी.ई. (इलेक्ट्रीकल) प्रकाशित पुस्तके : 1) दोन शब्दांमध्ये (कवितासंग्रह) 2) समग्र बी. रघुनाथ खंड : 1,2,3,4 (संपादन) 3) बी. रघुनाथ यांचे वाङ्‌मय एक परिसंवाद (संपादन) 4) समग्र डॉ. ना. गो. नांदापूरकर (खंड:1,2) (संपादन.) संपादक : मासिक ग्रंथसखा कार्यकारी संपादक : पाक्षिक शेतकरी संघटक पुरस्कार : लोकमत युवा साहित्यिक पुरस्कार 1992 महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मिती पुरस्कार 1995 संस्था : सचिव - जनशक्ती ज्ञान अकादमी व्यवसाय : संचालक - जनशक्ती वाचक चळवळ सामाजिक कार्य * लोक नीती मंच ह्या द्वारे विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली जाते . * विविध सामाजिक चळवळीत सक्रीय सहभाग. * औरंगाबाद शहरातील रस्त्यावरील खड्ड्यासाठी केलेल्या आंदोलनात तुरुंगवास * शेतकरी संघटनेत सक्रीय सहभाग संपर्क : जनशक्ती वाचक चळवळ, 244- समर्थनगर, औरंगाबाद-431001-31. वीजकीय टपाल : shri.umrikar@gmail.com
View my complete profile

Blog Archive

  • ►  2022 (35)
    • ►  April (4)
    • ►  March (12)
    • ►  February (8)
    • ►  January (11)
  • ►  2021 (165)
    • ►  December (9)
    • ►  November (14)
    • ►  October (9)
    • ►  September (10)
    • ►  August (11)
    • ►  July (10)
    • ►  June (10)
    • ►  May (11)
    • ►  April (16)
    • ►  March (27)
    • ►  February (19)
    • ►  January (19)
  • ►  2020 (188)
    • ►  December (29)
    • ►  November (21)
    • ►  October (17)
    • ►  September (14)
    • ►  August (14)
    • ►  July (15)
    • ►  June (15)
    • ►  May (19)
    • ►  April (15)
    • ►  March (11)
    • ►  February (11)
    • ►  January (7)
  • ▼  2019 (61)
    • ►  December (4)
    • ►  November (3)
    • ►  October (7)
    • ►  September (5)
    • ►  August (4)
    • ►  July (3)
    • ►  June (7)
    • ►  May (7)
    • ►  April (7)
    • ►  March (5)
    • ▼  February (5)
      • साहित्य संगीत कला चळवळ लोक वर्गणीतून चालायला हवी !
      • छोट्या गावांमध्ये रूजत आहे शास्त्रीय संगीत चळवळ
      • संविधानाची चौकट, संघ आणि प्रकाश आंबेडकर
      • प्रवीण बर्दापूरकर : दुपारच्या चहाचे मैत्र
      • सावरकर विरोधकांचा वैचारिक आडमुठपणा !
    • ►  January (4)
  • ►  2018 (75)
    • ►  December (7)
    • ►  November (8)
    • ►  October (8)
    • ►  September (7)
    • ►  August (5)
    • ►  July (7)
    • ►  June (7)
    • ►  May (6)
    • ►  April (5)
    • ►  March (6)
    • ►  February (5)
    • ►  January (4)
  • ►  2017 (44)
    • ►  December (4)
    • ►  November (1)
    • ►  October (3)
    • ►  September (4)
    • ►  August (4)
    • ►  July (9)
    • ►  June (1)
    • ►  May (1)
    • ►  April (6)
    • ►  March (4)
    • ►  February (3)
    • ►  January (4)
  • ►  2016 (65)
    • ►  December (1)
    • ►  November (2)
    • ►  October (7)
    • ►  September (7)
    • ►  August (9)
    • ►  July (7)
    • ►  June (7)
    • ►  May (6)
    • ►  April (6)
    • ►  March (4)
    • ►  February (5)
    • ►  January (4)
  • ►  2015 (48)
    • ►  December (4)
    • ►  November (6)
    • ►  October (5)
    • ►  September (4)
    • ►  August (9)
    • ►  June (3)
    • ►  May (6)
    • ►  April (4)
    • ►  March (3)
    • ►  February (3)
    • ►  January (1)
  • ►  2014 (53)
    • ►  December (3)
    • ►  November (4)
    • ►  October (4)
    • ►  September (5)
    • ►  August (4)
    • ►  July (6)
    • ►  June (5)
    • ►  May (4)
    • ►  April (4)
    • ►  March (4)
    • ►  February (5)
    • ►  January (5)
  • ►  2013 (45)
    • ►  December (6)
    • ►  November (4)
    • ►  October (5)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (2)
    • ►  June (5)
    • ►  May (3)
    • ►  April (4)
    • ►  March (3)
    • ►  February (3)
    • ►  January (1)
  • ►  2012 (24)
    • ►  November (1)
    • ►  October (2)
    • ►  September (1)
    • ►  August (4)
    • ►  July (1)
    • ►  June (2)
    • ►  May (3)
    • ►  April (1)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (5)
  • ►  2011 (9)
    • ►  October (2)
    • ►  September (2)
    • ►  August (3)
    • ►  July (2)

Feedjit

Simple theme. Powered by Blogger.

Followers