Friday, September 28, 2018

कविता तुझ्या आठवणीत तुझीच - ग्राफिटी वॉल




कविता महाजन 27 सप्टें 2018


तू हसायचीस खळखळून
बोलयचीस भरभरून
भांडायचीस कडकडून
सगळं कसं रसरशीत
उसळून आलेलं
आतून
मग तास संपायच्या आधीच
घंटा वाजायच्या आतच
का गेलीस निघून?
ही कुठली बंडखोरी?

तूला श्रद्धांजली तरी कसे म्हणू?
आम्ही सगळेच तर थोडे थोडे
गेले आहोत तूझ्यासोबत मरून...

आता हे तूझेच शब्द तूलाच...

कादंबरी आणि कविता हे दोन महत्त्वाचे वाङ्मयप्रकार समर्थपणे हाताळत असतांना कविता महाजन यांना  सदर लेखन करावंसं वाटलं. आजूबाजूला जे काही घडत असतं त्याचे परिणाम लेखकावर होत असतात. त्यांना तोंड देतांना त्यातून छोट्या आवाक्याची साहित्य निर्मिती होते. प्रसंग घटना यांचा आवाका छोटा असला तरी त्यांची ताकद मोठी असते. ती ओळखून त्यावर यथायोग्य टिपणी करणं हे आव्हान लेखकासमोर असते. आपल्या या सदर लिखाणात येणारे विषय, त्यावर व्यक्त होणारी वाचकांची प्रतिक्रया याची अतिशय स्पष्ट जाणीव लेखिकेला आहे. सदरातील शेवटच्या लेखात ती लिहून जाते

खरं आणि स्पष्ट लिहिण्या-बोलण्यात त्रास असतो. पण खोटं बोलण्याच्या, अर्धवट बोलण्याच्या, आडपडदे ठेवण्याच्या आणि मुस्कटदाबीच्या त्रासाहून तो निश्‍चितच कमी असतो. म्हणून मला पारदर्शक असंण आवडतं आणि तुलनेत परवडतंदेखील. 

इतकी भूमिका स्वच्छ असल्यावर लेखन आपोआपच एका दर्जापर्यंत पोंचलेलं असंतं हे सांगायला समिक्षकाची गरज नाही. सदरातील चाळीस लेख या पुस्तकांत समाविष्ट आहेत.  आदिवासींचे प्रश्‍न, शेतकर्‍यांचे प्रश्‍न, वाङ्मयीन संस्कृती, सामाजिक जीवनात येणारे विविध प्रसंग या सगळ्यांना सारख्याच साधेपणानं सामोरं जात लेखिकेनं टिपलं आहे. शब्दांचा फुलोरा टाळून अनुभवांना साध्या शब्दांत मांडणं हे अवघड आहे.
काही विवाद्य विषयावर लिहितांना (उदा. ‘कविता आणि काण्डॉम’, ‘पुरुषवेश्या ाणि गिर्‍हाईक बायका’, ‘आतल्या दुनियेतले अनुभव’) गांभिर्याची कसोटीच लागते. ही कसोटी कविता महाजन यांनी उत्तम निभावली आहे. आणि हे विषय मांडत असतांना स्वत:चा दृष्टिकोनही जपला आहे.

कवितेला ‘श्‍वास घ्यायची जागा’ संबोधून आपल्या संवेदनांची जातकूळीच या लेखिकेनं सांगितली आहे. कवितेची इतकी नेमकी जागा एखाद्या समिक्षकालाही  करता येणार नाही. स्त्री-पुरूष असा भेद वाङ्मयीन क्षेत्रात केला जातो आणि ते लेखिकेला खुपत जातं. त्याबद्दलची मतं तीनं तीव्रतेनं व्यक्त केली आहेत. केवळ स्त्री म्हणून बोलावण्यापेक्षा एक व्यक्ती म्हणून ही बोलवा ही भूमिका तर तकलादू स्त्री-वादी चळवळीच्याही सीमा ओलांडून जाणारी आहे. शेतकरी महिला आघाडीच्या चांदवडच्या अधिवेशनात 1986 साली एक घोषणा दिली गेली होती ‘स्त्री शक्तीच्या जागरणात स्त्री-पुरूष मुक्ती’. या पद्धतीनं कविता महाजन आपली भूमिका व्यक्तीच्या पातळीवर पोंचवतात तेंव्हा साहजिकच त्याला एक उंची प्राप्त होते. त्यांच्या खास महाजनी शैलीत त्यांनी लिहीलंय

‘स्त्री-पुरूष भेद हे आजतरी साहित्यात करण्याची गरज राहिलेली नाही. तो फारफार तर टॉयलेटमध्ये करावेत, कारण तिथं बांधकाम वेगळं करावं लागतं, इतकंच.’

कविता महाजन यांचे बहुतांश लेख हे लेखक म्हणून समाजात वावरत असतांना आलेल्या अनुभवांवर आधारलेले आहेत. आणि ते स्वाभाविकच आहेत. सामान्य वाचकांच्या प्रतिक्रिया, ज्येष्ठ लेखक मित्रांच्या प्रतिक्रिया, वाङ्मयीन उपक्रमांच्या आयोजनातलं राजकारण, वाचक-लेखक संबंध, लेखक-प्रकाशक संबंध असे अनेक विषय यात आलेले आहेत. मौज प्रकाशन गृह, साहित्य अकादमी, राजहंस प्रकाशन, तुला प्रकाशन अशा विविध प्रकाशकांशी कविता महाजन यांचे लेखक म्हणून संबंध आले. या सगळ्यातून लेखन-वाचन-प्रकाशन याबाबतची एक निकोप दृष्टि त्यांना असल्याचं लिखाणातून आढळतं.

सगळ्या लेखनात ‘टाकलेली माणसं’ हा लेख मला नितांत आवडला. सत्कार समारंभानंतर लेखिका एकटीच कमी वर्दळीच्या आणि रिकाम्या गल्ल्यांमधून फिरते. तीला एक म्हातारी भिकारीण दिसते. ती तीला ‘मुली’ असं संबोधते आणि लेखिकेच्या मनातील तार हलते. तीला देतायेण्यासारखं काहीच नसतं. ती स्वत:जवळची एक पन्नास रूपयाची नोट तीला देते. हे सगळंच वर्णन फारच अप्रतिम आहे. भिकारणीच्या निमित्ताने सगळ्याचंच एकटेपण लेखिकेनं अधोरेखित केलं आहे.

विदर्भातले साहित्यिक आत्महत्या का करत नाहीत? असं उपरोधिक शिर्षक असलेला एक चांगला लेख या पुस्तकात आहेत. चंद्रकांत देवतालेंच्या कवितेवर आधारित ‘थोडीशी मुलं आणि बाकी मुलं’ हा पण एक खूप चांगला लेख आहे. सामाजिक पातळीवर काम करणार्‍या संस्था, शासकीय धोरण, राज्यकर्ते-साहित्यीक यांच्या ढोंगी भूमिका या सगळ्याचा यथोचित उहापोह काही लेखांमधून केला गेलेला आहे.

आपण लिहितो म्हणजे काय, लिखाण कशासाठी असतं, लेखक म्हणून काय जबाबदार्‍या असतात यांचं फार चांगलं भान लेखिकेला आहे म्हणूनच विविध विषयांवरचे हे लेख वाचनिय तर झाले आहेतच पण त्यांना एक गंभीर भान आहे. आपल्या लेखनाबद्दल शेवटच्या लेखात लेखिका लिहिते

‘वेगळ्या विषयांवरचं लेखन छापण्याचं धाडस दाखवणारे वृत्तपत्र-मासिकांचे संपादक आणि पुस्तकांचे प्रकाशक मला भेटले आहेत. ज्यांना माझा प्रामाणिकपणा, माणसांविषयीचा कळवळा आणि या जगातली अनेक जगं पाहण्याचं माझं कुतूहल कळलं आहे. अशी नितळ, निखळ विचारांची माणसंही मला माझ्या हयातीतच भेटली आहेत ही निश्‍चितच मला पाठबळ देणारी गोष्ट आहे.’

मोठा लेखन प्रकार हाताळणार्‍या कविता महाजन यांनी सदरा सारख्या छोट्या लेखन प्रकारातही जान ओतली हे विशेष.

ग्राफिटी वॉल/ लेखिका: कविता महाजन/ पृष्ठे: 200/ किंमत 225/-, प्रकाशक: राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे
  

1 comment:

  1. कविता महाजन यांच्या जाण्याने आपल्या कुटुंबात अजून एक न भरून येणारी पोकळी तयार झाली आहे. त्यांच्याबाबत फार काही वाचलेलं नसूनही लेख वाचुन कोणी घरचा माणूस गेल्यासारखं दुःख झालं... अप्रतिम लेख! त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.

    ReplyDelete