Saturday, July 15, 2017

शंकरमहाराज खंदारकर लिखित वारकरी प्रस्थान त्रयी


उरूस, सा.विवेक, 9 जूलै 2017


पंढरीची आषाढीची वारी संपली की सगळे लोक/माध्यमं हा विषय आपल्या डोक्यातून काढून टाकतात. परत पुढच्या वर्षी मॉन्सून आणि मग गावोगावच्या दिंड्यांची लगबग या बातम्या येईपर्यंत सारे काही या गप्पगार असते. 

खरं तर आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. म्हणजेच देव आता विश्रांतीला जातात. आणि बरोब्बर चार महिन्यांनी कार्तिक महिन्यात एकादशीला हा चातुर्मास संपतो. त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. या चार महिन्याच्या काळात पंढरपुरला वारकरी संप्रदायातील साधुपुरूष किर्तनकार अभ्यासक गोळा होतात. चार महिने मुक्काम पंढरपुरातच ठेवतात. आपसात विचारांची आदान प्रदान करणे, चर्चा करणे, संप्रदायातील कुट प्रश्‍न-अडचणी सोडवणे याकाळात घडते. 

त्याच सोबत वारकरी संप्रदायातील ज्या तीन ग्रंथांना प्रस्थान त्रयी म्हणून मान आहे त्या ‘ज्ञानेश्वरी’, ‘एकनाथी भागवत’ आणि ‘तुकाराम गाथा’ यांच्यावर सखोल अभ्यास या काळात केला जातो. अन्यथा पंढरीची वारी म्हणजे गावोगावातून टाळ कुटत निघालेल्या रिकामटेकड्या लोकांची दिंडी अशीच सगळ्यांची भावना होवून बसली आहे. 

गेल्या शंभर वर्षांत मौखिक परंपरेनं आलेलं ज्ञान नोंदवून ठेवण्याची चांगली प्रथा वारकरी संप्रदायात आता रूळली आहे. सोनोपंत दांडेकर, जोग महाराज,  धुंडामहाराज देगलुकर असे अधिकारी पुरूष या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत.   त्यातीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजे वै.ह.भ.प. शंकरमहाराज खंदारकर. शंकर महाराजांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी प्रस्थान त्रयीतील तिनही ग्रंथांवर सटीप भाष्य लिहलं. अन्यथा केवळ ज्ञानेश्वरी, केवळ तुकाराम गाथा यांच्यावरील बर्‍याच अधिकारी पुरूषांची भाष्ये आहेत.

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात कंधार गावी साधुमहाराज (इ.स.1708 ते 1812) म्हणून संत अठराव्या शतकात होवून गेले. त्यांच्या घराण्यातील सातवे वंशज म्हणजे शंकर महाराज खंदारकर (1923-1985).
महाराजांनी तुकाराम गाथेवर केलेले भाष्य 1965 मध्ये प्रसिद्ध झाले. (आजपर्यंत त्याच्या 9 आवृत्त्या प्रकाशीत झाल्या आहेत). जवळपास दहा वर्षांनी 1974 मध्ये ज्ञानेश्वरीवरील भाष्य ‘ज्ञानेश्वरी भावदर्शन’ प्रसिद्ध झाले (आठ आवृत्त्या). महाराजांच्या निर्वाणानंतर 1991 मध्ये प्रस्थानत्रयीतिल शेवटचा ग्रंथ ‘भावार्थ एकनाथी भागवत’ प्रकाशित झाला (चार आवृत्त्या). गंभीर ग्रंथांच्या आवृत्त्या म्हणजे वाचकांनी अभ्यासकांनी ही एका प्रकारे दिलेली पावतीच आहे.


शंकरमहाराजांचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सोप्या शब्दांत त्यांनी या तिनही ग्रंथांचे मर्म उलगडून दाखवले आहे. संसारात अडकलेली सामान्य माणसे, वारकरी संप्रदायात मानसिक आधार शोधायला येतात. महाराष्ट्रात महानुभाव, लिंगायत, गाणपत्य, शाक्त, दत्त असे कितीतरी संप्रदाय आहेत. सर्वसामान्यांना समावून घेईल असा एकमेव वारकरी संप्रदायच आहे हे काळावर सिद्ध झाले. शंकर महाराजांनी हे ओळखून आपल्या भाष्याची मांडणी केली आहे. महाराज लिहीतात, ‘... शास्त्राच्या दृष्टीने संन्याशाची मुले म्हणून भ्रष्ट ठरलेल्या परिस्थितीतही परमार्थ करता येतो, हे श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रात आहे. कनक-कांता संपन्न असलेल्या परिस्थितीतही परमार्थ करता येतो, हे श्री एकनाथ महाराजांच्या चरित्रात आहे. त्याचप्रमाणे विपन्नावस्थेतही परमार्थ कसा करता येतो, हे श्री तुकाराम महाराजांची आपल्या चरित्रात दर्शविले आहे.’


‘श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य’ सगळ्यात पहिल्यांदा प्रकाशित झाले. पहिल्याच ग्रंथांत शंकर महाराजांनी पाठभेद काळजीपूर्वक तपासून आपली भूमिका जाहिर केली आहे. त्यावरून त्यांची दृष्टी एका टाळकुट्या वारकरी सांप्रदायिकाची न राहता चिकित्सक आधुनिक अभ्यासकाची कशी आहे हे लक्षात येते. बोली भाषेतील विविध छटांचे शब्द बदलून तेथे मूळ प्रमाण असणारे संस्कृत शब्द त्यांनी भाष्य करताना योजिले आहे. उदा. आहिक्य- ऐहिक, अतित्यायी- आततायी, अभिळास-अभिलाष, दरुशण-दर्शन, कमळणी- कमलिनी. 

शंकरमहाराज सांप्रदायिक आहेत. त्यांच्या लेखनात परंपरेचा एक जिव्हाळा आढळून येतो. ज्ञानेश्वर माऊली बद्दल लिहीताना स्वाभाविकच त्यांच्या लेखणीलाही पान्हा फुटतो, ‘... आपण समाधिस्थ झाल्यावर माऊलीने बाळाला दररोज दूध पिण्याकरिता हरिपाठ लिहून ठेवला. बाळाने जन्मदरिद्री राहू नये व सर्वकाळ आनंदात राहावे म्हणून अनुभवामृताचे धन साठवून ठेवले. बाळाचे पारमार्थिक आरोग्य कायम राहण्याकरिता पासष्टीच्या रूपाने पासष्ट सुवर्णमात्रा करून ठेवल्या. बाळाला वाईटाच्या संगीतने वाईट वळण लागू नये म्हणून गाथेच्याद्वारा विठ्ठल भक्तीचे संस्कार त्याच्यावर केले...’

शंकर महाराजांचा तिसरा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे ‘भावार्थ एकनाथी भागवत‘. महाराजांच्या पूर्वी जी संपादने या भागवताची उपलब्ध आहेत त्यांच्यात मूळ संस्कृत श्लोकाचा अर्थ नाही. शंकर महाराजांनी मात्र मूळ संस्कृत श्लोक, त्याचा अर्थ, त्यावरच्या एकनाथ महाराजांच्या ओव्या आणि मग त्या ओव्यांचा अर्थ आपल्या टिपणीसह असे स्वरूप या ग्रंथाला आहे. म्हणून त्याचे महत्त्व वाढले आहे. काही ठिकाणी तर प्राप्त परिस्थितीचा विचार करून नविन अर्थाची मांडणीही करून दाखवली आहे. त्यातून महाराजांची उच्चकोटीची प्रज्ञा आणि प्रतिभा जाणवते.


एकनाथी भागवताच्या नवव्या अध्यायात 192 क्रमांकाची ओवी आहे

विजातीयभेद ते ठायी । नसे सजातीय भेद कांही ।
स्वगतभेदु तोही नाही । भेदशून्य पाहे ये रीती ॥

आता यात नाथांच्या मूळ ओवीत कितीतरी रिकाम्या जागा आहेत. शंकर महाराजांनी याचा अर्थ उलगडून दाखवताना, ‘... त्या नारायणाचे ठिकाणी वृक्ष पाषाणातल्याप्रमाणे विजातीय भेद नाही. वड-पिंपळातल्याप्रमाणे सजातीय भेद नाही आणि वृक्षांच्या शाखा, पल्लव, पाने, फुले, फळे यांच्यातल्याप्रमाणे स्वगतभेदही नाही. याप्रमाणे नारायणाचे स्वरूप भेदशून्य आहे.’ रिकाम्या जागा भरून काढल्या आहेत. 

गेली आठशे वर्षे अशिक्षीत जनतेला वेदांताचे तत्त्वज्ञान साध्या सोप्या सुबोध भाषेत संतांनी समजावून सांगितले. स्वत:वर अन्याय झाला तरी (ज्ञानेश्वरांना वाळीत टाकले, एकनाथांना भावार्थ रामायण अर्धवट ठेवून जलसमाधी घ्यावी लागली, तुकारामांचा शेवट तर गुढच आहे) सामान्य लोकांना भवसागरातून तरून जाण्याचा मार्ग सुचवला. आधुनिक काळात शंकर महाराजांसारख्या साधुपुरूषांनी चिकित्सक दृष्टीनं डोळसपणे हे सगळं विचारधन लिखित स्वरूपात भाष्यासह उपलब्ध करून दिलं. आपण शिक्षणाची इतकी साधनं निर्माण केली, गावोगाव शाळा उघडल्या, हजारोंनी शिक्षक नेमले तरी अपेक्षीत ज्ञान पोंचत नाही म्हणून आपण ओरड करतो. मग या साधु संतांनी शेकडो वर्षे कुठलीही अनुकूलता नसताना ही ज्ञानाची परंपरा केवळ लोकांनी दिलेल्या भिक्षेवर आणि दानावर समृद्ध करून दाखवली हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल.       

(शंकर महाराजांची सर्व ग्रंथ संपदा वै. शंकरमहाराज खंदारकर विश्वस्त संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आली असून ती वाचक अभ्यासक वारकरी भक्तांसाठी उपलब्ध आहे.)

   
श्रीकांत उमरीकर, 
जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

1 comment:

  1. ह.भ.प शंकर महाराजांची ग्रंथसंपदा मला वाचायला नक्की आवडेल

    ReplyDelete