Thursday, July 27, 2017

मुलांना काय वाचायला द्यावे ?


उरूस, सा.विवेक, 23 जूलै 2017

शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. मुलांना पाठ्येतर वाचायला काय द्यावे हा प्रश्‍न काही पालक आवर्जून विचारतात.ल.म.कडू यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि कुमारांसाठीच्या वाङ्मयाची चर्चा सुरू झाली.  लहान मुलांचे साहित्य आणि त्यातही विशेषत: कुमार वयीन मुलांचे साहित्य मराठीत फारसे नाही म्हणून टीका करत असताना जे उपलब्ध आहे त्याचे काय? यावर आपण बोलतच नाही.
 
उदा. बालभारतीच्या वतीने गेली 46 वर्षे ‘किशोर’ मासिक चालू आहे. गेली दोन वर्षे औरंगाबादला आम्ही हे मासिक उपलब्ध करून देतो आहोत. एका मोठ्या लेखकाला जेंव्हा याबाबत सांगितले तेंव्हा त्यांची प्रतिक्रिया अशी होती, ‘म्हणजे अजून किशोर चालू आहे? मला वाटले बंद पडले.’ अजून एका चांगल्या लेखकाची बर्‍यापैकी वाचकाची प्रतिक्रिया तर मोठी विचित्र, ‘त्यात काय वाचण्यासारखं. आजकाल दर्जा नाही राहिला त्यांचा.’ आम्ही त्याला खोदून खोदून विचारलं की तूम्ही अशातले किती अंक वाचले आहेत? मग त्याने कबूल केले की अशात त्याने किशोर बघितलेही नाही. वाचायचा तर प्रश्‍नच नाही. 

ज्या किशोर मासिकाचा वर उल्लेख केला त्याची किंमत केवळ 7 रूपये आहे. 52 पानांचा ए 4 आकाराचा संपूर्ण रंगीत मजकूर केवळ 7 रूपयांत उपलब्ध आहे. दर महिन्यात प्रकाशित होतो आहे. मग आपण त्याला किती प्रतिसाद देतो? शासकीय पातळीवर याची जी काही वितरणाची व्यवस्था आहे त्याच्या पलीकडे एक सामान्य वाचक म्हणून आपण काय करतो? 

जर मोठ्या प्रमाणावर या मासिकाचे वाचक वाढले, त्यांच्या प्रतिक्रिया नियमित जायला लागल्या तर याचा दबाव संपादकांवर वाढेल. मग स्वाभाविकच मजकूराच्या बाबतीत एक जागरूकता निर्माण होईल. लहान वाचकांच्या प्रतिक्रिया या मासिकात नियमित अगदी फोटोसह प्रसिद्ध होतात. मग आपण आपल्या घरातील मुलांना हे मासिक वाचायला लावून त्यावरच्या प्रतिक्रिया पाठवायला प्रोत्साहित करतो का? 

‘किशोर’ मासिकच नाही तर बालभारतीच्या वतीने पाठ्येतर वाचनासाठी इतरही काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शिवाजी महाराजांवरचा अतिशय चांगला ‘स्मृतीग्रंथ’ बालभारतीने प्रकाशित केलाय. तो तर केवळ कुमार वाचकांसाठीच नाही तर सर्वांसाठीच उपयुक्त आहे. विशेषत: जेंव्हा शिवचरित्राबद्दल नको ते वाद उपस्थित केले जातात अशावेळी महाराजांबद्दल एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित करण्याचे काम बालभारती करते आणि आपण त्याची योग्य ती दखलही घेत नाही याला काय म्हणायचे? डॉ.आ.ह.साळुंखे, न्या.महादेव गोविंद रानडे, कृष्ण अर्जून केळूस्कर, सर जदूनाथ सरकार, शेजवलकर, बेंद्रे, सेतु माधवराव पगडी, डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. अ.रा.कुलकर्णी, नरहर कुरूंदकर आदी मान्यवरांचे लेख या ग्रंथात आहेत.

इतरही काही अतिशय चांगली पुस्तके बालभारतीने प्रकाशित केली आहेत. 

केवळ बालभारतीच नव्हे तर इतरही प्रकाशकांनी कुमारवयीन मुलांसाठी अतिशय चांगली पुस्तके प्रकाशित केली आहेत. मग ही जी पुस्तके उपलब्ध आहेत ती आपण मुलांपर्यंत का नाही पोचवत? 

ज्योत्स्ना प्रकाशनाने सातत्याने लहान मुलांसाठी पुस्तके प्रकाशित केली आहेत. माधुरी पुरंदरे यांनी तर एखादे व्रत घ्यावे, वसा घ्यावा तसा लहान मुलांसाठीच्या लेखनाचा प्रपंच मांडला आहे. त्यांना यापुर्वी साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित केल्या गेले आहे.

त्यांनी संपादीत केलेली  ‘वाचू आनंदे’ या नावाने चार पुस्तके अतिशय देखण्या स्वरूपात प्रकाशित झाली. या पुस्तकांमध्ये चित्रांचाही समावेश होता. त्यांना आम्ही एकदा विचारले की ‘हे इतके महत्त्वाचे काम आहे तर मग ही सगळी चित्रे त्यांच्या मूळ रूपात म्हणजे बहुरंगीत का नाही छापल्या गेली?’ त्यांनी अडचणींचा जो पाढा वाचला त्याने आम्हाला धक्काच बसला. मराठीत मुलांच्या वाचनासाठी अतिशय महत्त्वाचा असा प्रकल्प प्रकाशित होतो. आणि आपण त्यासाठी किमान निधी उभा करू शकत नाहीत? 8 वी पर्यंतच्या मुलांना अभ्यासक्रमाची पुस्तके मोफत वाटली जातात. ज्या पालकांची खरेदी करायची क्षमता आहे त्यालाही ही पुस्तके गरज नसताना फुकट मिळतात. मग अशावेळी या पालकांनीही आपले हे वाचलेले पैसे मोठ्या मनाने ‘वाचू आनंदे’ सारख्या प्रकल्पांवर खर्च करून याला हातभार का लावू नये? 

नवनित प्रकाशनाने कुमारांपेक्षा लहान गटासाठी गोष्टींची पुस्तके बहुरंगी स्वरूपात अतिशय देखणी अशी प्रकाशित केली आहेत. ही पुस्तके विक्रीसाठी प्रत्येक जिल्ह्यात पाठ्यपुस्तकांच्या विक्रीसारखी यंत्रणा उभी केली आहे. त्यासाठी वेगळे विक्री प्रतिनिधी नेमले आहेत. मग हे सगळं इतर प्रकाशकांनी का करू नये? आणि या पुस्तकांना पालकांनी का प्रतिसाद देवू नये? 

मराठीत विंदा करंदीकर, इंदिरा संत, मंगेश पाडगांवकर, शांता शेळके, बाबा भांड, अनिल अवचट अलिकडच्या काळातले उदाहरण म्हणजे कवी दासू वैद्य, कविता महाजन, रेणु पाचपोर यांसारख्या प्रौढ लिखाण करणार्‍या साहित्यिकांनी आवर्जून लहान मुलांसाठी लिहीले आहे. 

भा.रा.भागवत सारख्यांनी तर कुमारवयीन मुलांसाठी जे आणि जेवढे लिहून ठेवले ते अजूनही कुणाला जमलेले नाही. त्यांचा फास्टर फेणे आजही त्या पिढीच्या मनावर अधिराज्य गाजवतो. दिलीप प्रभावळकरांनी नेटाने ‘बोक्या सातबंडे’ ची दहा पुस्तके लिहीली. वीणा गवाणकरांचे ‘एक होता कार्व्हर’ संस्कारक्षम कुमारवयीन मुलांना आजही भावून जाते. ल.म.कडू, राजीव तांबे, राजा मंगळवेढेकर अशासारख्यांनी  नेटाने मुलांसाठी लिहीले. 

आता छपाईचे तंत्र सोपे झाले आहे. बहुरंगी छपाई उत्तम दर्जाची करता येते. इंद्रजित भालेराव यांचे ‘गावाकडं’ हे बालकवितांचे पुस्तक याचे उत्तम उदाहरण आहे. प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन यांच्या चित्राने हे पुस्तक सजले आहे. 

नॅशनल बुक ट्रस्ट जी पुस्तके आहेत ती मजकूरापेक्षाही त्यांच्या चित्रांनी फार महत्त्वाची आहेत. मुलांमध्ये चित्रांचा संस्कार घडविण्यासाठी ही पुस्तके उत्तम आहेत. ही प्रकाशन संस्था शासकीयच  आहे.

जयंत नारळीकरांसारख्या मोठ्या विज्ञान लेखकाने कुमारवयीन मुलांसाठी आवर्जून लिहीले आहे. साहित्य अकादमी या अजून एका शासकिय प्रकाशन संस्थेने नारळीकरांचे बालसाहित्य प्रकाशित केले आहे. ते पण आपण अजून नीटपणे मुलांपर्यंत पोचवू शकलेलो नाही. 

चंपक, चांदोबा, इंद्रजाल कॉमिक्स, वॉल्ट डिस्नेचे ‘विचित्र वाडी’, चाचा चौधरी ही सगळी चित्रमय मासिके कॉमिक्स कालबाह्य झाली हा एक भ्रम आपण करून घेतला आहे. आजही दर्जेदार चित्रांचे पुस्तक मुलांसमोर ठेवा मुलं गुंगून जातात की नाही ते बघा. अजूनही माधुरी पुरंदरे यांचे व्हॅन गॉगचे चरित्र तूमच्या 14 वर्षांच्या चित्रात गोडी असणार्‍या मुलाच्या हातात पडू द्या बघा तो रात्रभर जागून वाचतो की नाही, परिकथाच काय पण जी.ए.नी अनुवादीत केलेली ‘शेव्हिंग ऑफ शॅगपट’ ही कादंबरी द्या मुलीच्या हातात. बघा ती दोन दिवस त्यात पागल होते की नाही. राम पटवर्धनांनी मार्जोरी रोलिंग्जचा केलेला अनुवाद ‘पाडस’ कसा दीर्घ प्रभाव टाकतो मुलांवर ते त्यांच्या हाता देवून अनुभवा. कुमारवयीन मुलांच्या हातात प्रकाश नारायण संतांची ‘लंपन’ मालिकेतील चारही पुस्तके ठेवून बघा ती ‘मॅड’ होतात की नाही. इतकं कशाला श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या ‘डोह’ मधील मुलगा-बाप संबंधातील हळवे अनुबंध कुठल्याही कुमारवयीन मुलाला भारून टाकतात.    

कुमारवयीन मुलांसाठी नविन पुस्तके यायला हवी यात काही वादच नाही. पण आधी जी पुस्तके आहेत ती तरी सर्वत्र पोचायला हवी. आणि मुलांसाठी आग्रहाने ही पुस्तके का पोचवायची तर हीच मुलं भविष्यातले चांगले वाचक आहेत. आत्ता जे प्रौढ आहेत त्यांना वाचनाबद्दल कितीही सांगितले तरी फार परिणाम पडेल ही शक्यता नाही.       
  

श्रीकांत उमरीकर, जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Thursday, July 20, 2017

योगेंद्र यादव यांचा खोटारडेपणा



काळ कसा सुड उगवतो बघा. महागाईच्या विरोधात आंदोलने करण्यात हयात घालविलेल्या समाजवादी नेत्यांना शेतमालाच्या भावासाठी पेटलेल्या आंदोलनात आपलीही पोळी भाजून घ्यावी म्हणून उतरायची वेळ आली आहे.

मंदसौर पासून सुरू झालेली किसान यात्रा दिल्लीत पोचणार आहे. योगेंद्र यादव आपल्या ‘स्वराज इंडिया’ च्यावतीने यात सामिल झाले आहेत. आपल्या लेखात (लोकसत्ता दि. 13 जूलै) या संदर्भात अतिशय धादांत खोटी मांडणी योगेंद्र यादव यांनी केली आहे.  

यादव लिहीतात ‘...एकीकडे भारत विरुद्ध इंडियाचा नारा दिला जात होता, तर दुसरीकडे जमीनदार विरुद्ध शेतमजूर असा लढा होता. नवीन शेतकरी आंदोलनात हा द्वैतवाद संपला आहे.’ 

अहो यादव हा द्वैतवाद होता कुणाच्या मनात? तुम्हा समाजवाद्यांनीच साम्यवाद्यांच्या सुरात सुर मिसळत छोटा शेतकरी विरूद्ध बडा शेतकरी असा वाद रंगवला होता. शेतकरी विरूद्ध शेतमजूर असा भेद मांडला होता. कोरडवाहू विरूद्ध बागायदार असे चित्र उभे केले होते. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शरद जोशी यांनी अगदी आधी 1980 पासून ‘शेतकरी तितूका एक एक’ अशीच मांडणी केली होती. अगदी शेतमजूर हाही अल्पभूधारक शेतकरीच असतो.  कधीकाळी तोही शेतकरीच होता त्यामुळे यांच्यात भेद नाही हीच आग्रही मांडणी केली होती.

इतकेच नाही तर ‘इंडिया विरूद्ध भारत’ हे म्हणत असताना सरकारी पातळीवर जी धोरणं आहेत तिच्यात हा भेद आहे अशी ती मांडणी आहे. इंडियातील नागरिक विरूद्ध भारतातील नागरिक अशी नाही. इंडियात म्हणजे शहरातही झोपडपट्टीत भारत आहे आणि भारतात म्हणजेच ग्रामीण भागात सरकारी कर्मचार्‍यांच्या रूपाने किंवा इतर शासकीय येाजनांच्या लाभार्थींच्या रूपाने इंडिया आहेच अशी मांडणी होती. 

‘...महिला शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यांनीही आता जोर धरला आहे.’ हे वाक्य तर खोटारडेपणाचा कळसच झाले. 1986 ला चांदवड (जि. नाशिक) येथे शेतकरी संघटनेने प्रचंड शेतकरी महिला अधिवेशन भरवून दाखवले. जगात आजतागायत इतक्या महिला कधीच कुठेच गोळा झाल्या नव्हत्या. शेतकर्‍याची बायको म्हणजे गुलामाची गुलाम ही मांडणी पहिल्यांदा शेतकरी संघटनेने केली. पुढे लक्ष्मी मुक्तीचे मोठे आंदोलन उभारल्या गेले. लाखो शेतकर्‍यांनी आपली शेतजमीन बायकोच्या नावावर तेंव्हा करून दिली. 31 वर्षांपूर्वी हे चालू होते तेंव्हा योगेंद्र यादव काय करत होते? त्यांच्या सोबतच्या समाजवादी महिलानेत्या शेतकरी महिला आघाडीच्या मंचावर स्थानापन्न झाल्या होत्या. आणि यादव म्हणताहेत महिला शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यानी आता जोर धरला आहे. 

तिसरा जो सगळ्यात विरोधाभासाचा मुद्दा आहे स्वामिनाथन आयोगाचा. या निमित्ताने सरकारी हस्तक्षेपाचा उंट शेतकर्‍याच्या तंबूत घुसविण्याचा सरकारचा आणि यादवांसगट सगळ्याच समाजवाद्यांचा डाव्यांचा प्रयत्न चालू आहे. 

शेतकरी संघटनेने सुरवातीपासून सरकारी हस्तक्षेपाचा कडाडून विरोध केला आहे. जेंव्हा बंदिस्त व्यवस्था होती तेंव्हा शेतकरी आंदोलनाने उत्पादन खर्चावर रास्त भाव मागितला होता. 1991 च्या डंकेल प्रस्तावाच्या स्वीकारानंतर हमी भाव ही संकल्पना मागे पडली व जागतिक पातळीवर बाजार खुला होताना दिसला. तेंव्हा शेतकरी आंदोलनाने काळाबरोर कुस बदलत शेतीमालाला बाजाराचे स्वातंत्र्य हवे असे मांडले. कुस आता नाही 25 वर्षांपूर्वीच बदलली आहे. 

2000 साला नंतर कापसात बी.टी. कॉटन यावे म्हणून शेतकरी संघटना आग्रही होती. त्या निमित्ताने शेतकर्‍यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य शेतकरी संघटनेने मागितले. तेंव्हाही परत काळानुरूप आंदोलनाने कुस बदलली. 

या सगळ्या बदलाच्या वेळी योगेंद्र यादव आणि आज त्यांच्या बरोबर असलेले डावे समाजवादी साथी काय करत होते? ते या सगळ्याला विरोध करत होते. 

एक साधी तूर खरेदी करायची तर सरकारी यंत्रणेचे डोळे पांढरे पडले. मग सगळा शेतमाल सरकारी हमी भावाने खरेदी करायचे म्हटले तर काय होईल? सगळी सरकारी यंत्रणा कोलमडून पडेल.

असल्या शेखचिल्ली मांगण्या शेतकरी संघटनेने कधीही केल्या नाहीत. तुम्हाला आमच्या तुरीला भाव देता येत नसेल तर निर्यात खुली करा आम्ही बाहेर आमची तुर विकून पैसे कमवू. तूमच्या खरेदीची लाचारी नको अशीच शेतकरी संघटनेची भूमिका राहिलेली आहे. 

असाच मुद्दा कर्जमाफीचा. कर्जमाफी या शब्दालाच शेतकरी संघटनेचा कडाडून विरोध आहे. आम्ही काय गुन्हा केला आहे म्हणून आम्हाला माफी दिली जात आहे? शेतकर्‍यावरील कर्ज हे सरकारी धोरणाचे पाप आहे. तेंव्हा सरकारने जी आत्तापर्यंत शेतकर्‍याची भावात लूट केली आहे तिच्यातून सरकारनेच मुक्ती मिळवावी. म्हणून कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती आम्ही मागतो आहोत. आणि ही कर्जमुक्तीही केवळ सरकारी कर्जाची नसून खासगी कर्जापासूनही हवी. आणि ही मागणी 20 वर्षांपासून असताना योगेंद्र यादव जणू काही यांना कालच नव्याने ही कल्पना सुचली असे मांडत आहेत. 

6 जूलैपासून मंदसौर येथून शेतकरी आंदेालनाचा नवा अध्याय सुरू झाला असे अतिशय धादांत खोटे विधान यादव करत आहेत. वास्तविक ते जे काही मांडत आहेत ते सगळे आधीच मांडून झाले आहे. यादव यात नव्याने आले आहेत इतकेच. आपण दुपारी 12 वाजता उठायचे आणि ‘.. बघा बघा सुर्य उजाडला आहे’ असे म्हणायचे असा हा प्रकार आहे.  

शेतकरी आंदोलनाने तूम्हाला जाग नव्हती तेंव्हाच कुस बदलली आहे. 

शेतकरी स्वामिनाथन आयोगाला कडाडून विरोध करतो आहे. आम्हाला भाव देणारे तुम्ही कोण? तूम्ही आमच्या मार्गात येवू नका. आत्ता टमाट्याचे भाव वाढले आहेत. मग यावर यादव काय भूमिका घेणार? ऊसाचा प्रश्‍न या वर्षी गंभीर होणार आहे कारण उसाचे क्षेत्र जास्तीचे आहे. योगेंद्र यादव तूमच्या सोबतच्या राजू शेट्टींना विचारा काय भूमिका घेणार ते. साखर उद्योग नियंत्रणमुक्त करा ही मागणी ते जेंव्हा शेतकरी संघटनेत रांगत होते तेंव्हा पासून घेतलेली आहे. त्यांना आता ती मंजूर आहे का? तेंव्हा त्यांनी हाताची मुठ वळून शपथ घेतली होती.

यादव तुमच्या सेाबतच्या मेधाताई पाटकरांना विचारा नर्मदा सरोवराचे पाणी गुजरातच्या शेतकर्‍यांना मिळाले त्याला तुम्ही खोडता घातला होता. ती भूमिका आता बदलली आहे का?

योगेंद्र यादव, राजू शेट्टी, मेधा पाटकर यांच्यासारखी मंडळीच कुस बदलून काहीतरी बरळत आहेत. शेतकरी आंदोलनाने वेळोवेळी काळाप्रमाणे योग्य तिथे कुस बदलली आहे. आणि आता ज्या मागण्या घेवून शेतकरी उभा आहे त्या खालील प्रमाणे आहेत. 

1. शेतकर्‍याला बाजारपेठेचे स्वातंत्र्य हवे.
2. शेतकर्‍यााला तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य हवे. 
3. शेतमालाच्या जागतिक व्यापारविषयक धोरणात सातत्य व पारदर्शकता हवी. बाहेर भाव जास्त असताना लादल्या जाणार्‍या अन्यायकारक बंदीला आम्ही कडाडून विरोध करतो. 
4. शेतमालाच्या प्रक्रियेवरील सर्व बंधने उठली पाहिजेत.
5. शेतीविरोधी सर्व कायदे तातडीने रद्द झाले पाहिजेत. 

यातील तूम्हाला काय मंजूर आहे सांगा योगेंद्र यादव? का या सगळ्या स्वतंत्रतावादी मागण्या सोडून तूम्ही शेतकरी आंदोलनाला समाजवादी अंगरखा घालण्याचा अट्टाहास चालू ठेवणार आहात? 

Wednesday, July 19, 2017

संमेलन अध्यक्ष : निवडणूकीने की नियुक्तीने ?


उरूस, सा.विवेक, 23 जूलै 2017

साहित्य संमेलनाचे पडघम वाजायला सुरवात झाली आहे. या वेळेस पहिल्यांदाच संमेलन अध्यक्षाची निवड कशी असावी याबाबत साहित्य महामंडळाने आपल्या बैठकीत गांभिर्याने चर्चा सुरू केली आहे. अजून निर्णय झाला नाही. बैठक सध्यातरी स्थागित आहे. 

सामान्य रसिकांना कित्येक वर्षांपासून पडलेला प्रश्‍न आहे की या संमेलनाचा अध्यक्ष निवडला कसा जातो? त्यासाठी कोण मतदान करते?

महामंडळाच्या मुख्य चार घटक संस्था आहेत. मुंबई साहित्य संघ-मुंबई, महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणे, मराठवाडा साहित्य परिषद-औरंगाबाद आणि विदर्भ साहित्य संघ-नागपुर. या घटक संस्थांना प्रत्येकी काही मते दिलेली आहेत (सध्या ती संख्या 175 आहे). महाराष्ट्राच्या बाहेर बडोदा, गोवा, गुलबर्गा, हैदराबाद येथील साहित्य संस्थांना प्रत्येकी 50 मते दिली आहेत. माजी अध्यक्षांना मतदानाचा अधिकार आहे. असे सगळे मिळून जेमतेम हजार लोकांना मतदानाचा अधिकार प्राप्त आहे. हे मतदार कोण तर त्या त्या घटक संस्थेच्या कार्यकारिणीने निवडलेले लोक. त्याला कसलाही निकष नाही. हे लोक मिळून 12 कोटी मराठी भाषिकांच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडतात. 

यात बदल व्हावा अशी मागणी फार वर्षांपासून विविध स्तरांतून सतत मांडली गेली आहे. सध्याच्या अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेमुळे अतिशय सुमार दर्जाची माणसे अध्यक्ष म्हणून निवडून येत आहेत. अध्यक्षीय भाषणांचा दर्जाही खालावत चालला आहे.  

सर्व घटक संस्थांची साहित्य संमेलने होतात. त्याच्या अध्यक्षपदासाठी निवडणुक होत नाही. विश्व साहित्य संमेलनाचा अध्यक्षही निवडून येत नाही. इतकंच काय ज्या महामंडळाद्वारे हा कारभार चालतो तेथेही लोकशाहीला फाटा दिला आहे. चारही घटक संस्थांनी प्रत्येकी तिन तिन वर्षे अध्यक्षपद व महामंडळाचे कार्यालय वाटून घेतले आहे. तेथेही निवडणूक होत नाही. महाराष्ट्राच्या बाहेरच्या संस्थांना केवळ उपाध्यक्ष पदासारखे नामधारी पद दिले जाते पण महामंडळाचे अध्यक्षपद कधीही दिले जात नाही. 

म्हणजे एकीकडे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणुक म्हटलं की ‘लोकशाही आहे आपण ती नाही कशी म्हणणार?’ असला तोरा मिरवणारे महामंडळ इतर वेळी हीच निवडणुकीची लोकशाही गुंडाळून ठेवते.

या वेळी अजून एक चर्चा महामंंडळाच्या बैठकीत झाली. तो विषय होता साहित्य विषयक काम करणार्‍या इतर काही संस्थांना महामंडळाचे सदस्यत्व द्यायचे की नाही? उदा. कोकणात मधु मंगेश कर्णिक यांनी ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ स्थापून गेली 20 वर्षे सातत्याने संमेलने घेतली आहेत. मोठे उपक्रम राबविले आहेत. कोल्हापुरला ‘दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद’ काम करते आहे. यांना अजूनही साहित्य महामंडळाने आपल्या सभासद संस्था म्हणून मान्यता दिली नाही. ही नेमकी मागणी काय आहे? 

झालं असं की पुण्यात जेंव्हा साहित्य परिषद सुरू झाली तेंव्हा तिचे कार्यक्षेत्र तेंव्हाचा संपूर्ण महाराष्ट्र असे होते. त्यात विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश नव्हते. विदर्भ जेंव्हा महाराष्ट्रात सामिल झाला तेंव्हा त्या प्रदेशात आधिच ‘विदर्भ साहित्य संघ’ ही संस्था कार्यरत होती. मराठवाडा सामिल झाला तेंव्हा हैदराबाद येथून काम करणारी ‘मराठवाडा साहित्य परिषद’ ही संस्था कार्यरत होती. मुंबई शहरापुरता वेगळा ‘मुंबई साहित्य संघ’ होता. 
अखिल भारतीय साहित्य महामंडळ तयार करण्यासाठी या चारही संस्था एकत्र आल्या. पण यामध्ये एक असमतोल होता याचा कुणीही विचारच तेंव्हा केला नाही. प्रत्येकाची आजीव सभासद संख्या वेगवेगळी होती. प्रत्येकाचे कार्यक्षेत्र वेगवेगळे होते. केवळ मुंबई महानगरापुरती ‘मुंबई साहित्य संघ’ ही संस्था. तिच्यात ठाण्याचाही समावेश नाही. विदर्भ, मराठवाडा या स्पष्टच नावाप्रमाणे त्या त्या प्रदेशापुरत्या साहित्य संस्था. नेमकी अडचण आहे ती पुण्याच्या महाराष्ट्र( साहित्य परिषदेबाबत. कारण तिचे कार्यक्षेत्र अवाढव्य आहे. 

साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडताना नेमकी हीच बाब अडचणीची ठरते. आणि अन्याय होतो आहे ही जी भावना आहे तिचा उगम इथेच आहे. मुंबई महानगरातल्या लोकांना 175 मते आहेत. विदर्भाच्या 11 जिल्ह्यांना मिळून 175 मते आहेत. मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यांना मिळून 175 मते आहेत. तर कोकणासह पश्चिम, उत्तर महाराष्ट्र अशा अवाढव्य पसरलेल्या (15 जिल्हे) महाराष्ट्र साहित्य परिषदेलाही केवळ 175 च मते आहेत. 
महाराष्ट्रात सध्या 27 महानगरपालिका आहेत. त्यातील केवळ एक महानगरपालिका (मुंबई) मुंबई साहित्य संघाच्या कार्याक्षेत्रात येते. विदर्भाच्या कार्यक्षेत्रात 4 महानगर पालिका येतात. मराठवाड्याच्या कार्यक्षेत्रातही 4 महानगर पालिका येतात. पण पुण्याचा विचार केला तर तब्बल 18 महानगर पालिका येतात. 

तेंव्हा पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभाजन-त्रिभाजन झाल्याशिवाय हा प्रश्‍न सुटणार नाही. म्हणजे सध्याच्या परिस्थितीत अध्यक्षाची निवड त्यातल्या त्यात निर्दोषपणे करावयाची असल्यास उत्तर महाराष्ट्र साहित्य परिषद (नाशिक, धुळे, जळगांव, नंदूरबार जिल्हे- 4 महानगर पालिका), दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद (सांगली, सातारा, कोल्हापुर, सोलापुर, नगर जिल्हे- 4 महानगर पालिका) व सध्या अस्तित्वात असलेली साहित्य परिषद केवळ पुणे जिल्हया पुरती (किंवा त्यात सलगचा नगर जिल्हा जोडण्यात यावा) तसेच कोकणासाठी सध्या अस्तित्वात असलेली कोकण मराठी साहित्य परिषद इतक्या संस्था तयार कराव्या लागतील. 

यासाठी पुण्याची तयारी नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे गोची आहे पुण्याच्या परिषदेच्या कार्यक्षेत्राची आणि पुण्याचीच परिषदेची मंडळी आपल्या अधिकारात कपात करायला तयार नाहीत. 

सध्या ज्या चार घटक संस्था आहेत त्यांची संख्या वाढून सात झाली तर महामंडळाचे अध्यक्षपद फिरून येण्यास जास्त वेळ लागेल. परिणामी आपली हुकूमत त्यावर राहणार नाही. असा हा सगळा कुणी कबूल करणार नसलेला साहित्यबाह्य मुद्दा आहे.

हे टाळण्यासाठी महामंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय घेवून अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिकांस बहाल करण्यात यावे असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यावर अजूनतरी एकमत झाले नाही. 

इंदिरा संत, विंदा करंदीकर, विजय तेंडूलकर, चि.वि.जोशी, भालचंद्र नेमाडे, बा.भ.बोरकर, मंगेश पाडगांवकर अशी कितीतरी अव्वल दर्जाची साहित्यिक मंडळी अध्यक्ष बनू शकली नाही. 

आता तर ज्याला ही सगळी यंत्रणा यशस्वीपणे हाताळता येते, ‘म्यानेजमेंट’ नीट जमते तोच उभा राहतो. इतर त्या फंदातच पडत नाहीत. अध्यक्षपदासाठी कुणाला उभे करायचे त्या प्रमाणे त्याला अनुकूल लोकांना मतदार करण्यात येते, त्याला अनुकूल ठिकाण साहित्य संमेलनासाठी निवडण्यात येते म्हणजे स्वागत समितीची मते एकगठ्ठा आपल्या ताब्यात येतात. 

या सगळ्या खेळात अव्वल दर्जाचा लेखक आणि खरा रसिक दोघेही भाग घेत नाहीत. मग सुमार दर्जाची माणसे अध्यक्ष म्हणून निवडून येतात आणि आता तर रसिकांनी संमेलनाकडे पाठ फिरवून आपला निषेध स्पष्टपणे नोंदवायला सुरवातही केली आहे. डोंबिवली संमेलनाचा पुरता बोजवारा उडण्याचे कारण हेच. 

असंच चालू राहिले तर ‘मोले घातले रडाया नाही आसु नाही माया’ अशी स्थिती होईल. संमेलन आयोजित होईल, कुणीतरी अध्यक्षपदी निवडून येईल. समोर चार रसिकही असणार नाहीत. एक उपचार म्हणून सगळं उरकले जाईल. 

हे व्हायचे नसेल तर महामंडळाची सध्याची जी कार्यपद्धती-जी रचना आहे त्यात अमुलाग्र बदल करावे लागतील. रसिकाभिमुख निर्णय घेवून ते समंजसपणे चिकाटीने राबवावे लागतील. प्रकाशक, ग्रंथ विक्रेते, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते, गावोगावच्या छोट्यामोठ्या साहित्य-सांस्कृतिक काम करणार्‍या संस्था यांना सगळ्यांना जोडणारा दुवा म्हणून काम करावे लागेल. तर हा साहित्य गंगेचा प्रवाह विशाल होत जाईल. नसता ती गटार गंगाच बनत जाईल यात काही वाद नाही.      

श्रीकांत उमरीकर, जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Tuesday, July 18, 2017

डॉ. लोहिया : कॉंग्रेस विरोधी राजकारणाचा जनक


"समर्थ भारत" स्वप्न - विचार - कृती  (साप्ताहिक विवेक हीरक महोत्सवी विशेष ग्रंथ) 

बरोबर 50 वर्षांपूर्वी सर्वंकष सत्ता भोगणार्‍या कॉंग्रेसचा पराभव करता येऊ शकतो, त्यासाठी आपसातले मतभेद मिटवून एकत्र येणं शक्य आहे अशी मांडणी एका लोकनेत्याने केली होती. आणि महत्त्वाच्या 9 राज्यांमध्ये कॉंग्रेसचा पराभव करून संयुक्त विधायक दलाची सरकारं  स्थापूनही दाखवली होती. दुर्दैवाने या लोकनेत्याचे लगेच निधन झाले आणि कॉंग्रेस विरोधाचे राजकारण बारगळले. त्याच्या शिष्यांनी आपल्या गुरूची शिकवण लक्षात ठेवली नाही. पण त्यांचे शिष्य नसलेल्या, त्या विचार परंपरेतील नसलेल्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कॉंग्रेसचा निर्णायक पराभव करून दाखवला. आधी लोकसभा 2014 मध्ये आणि नंतर 2017 मधील उत्तर प्रदेशातील विधानसभेत. जवळपास 50 वर्षांनी घडलेली ही घटना म्हणजे त्या नेत्याच्या कॉंग्रेसविरोधी राजकारणाला वाहिलेली आदरांजलीच म्हणावी लागेल. त्या महान लोकनेत्याचे नाव होते डॉ. राम मनोहर लोहिया.

चरित्र :

लोहियांच जन्म 23 मार्च 1910 चा. लोहियांचे वडिल कॉंग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात तुरूंगवासही भोगला. लोहिया तरूणपणी शिक्षणासाठी जर्मनीत गेले आणि तेथेच त्यांच्यावर समाजवादाचे संस्कार झाले. लोहियांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कोरडेपणाने कधीच समाजवादाची शिकवण अंगिकारली नाही. भारतीय परंपरा अतिशय डोळसपणे समजून घेवून, भारतीय दर्शनांचा अभ्यास करून, भारतीय मानसिकतेची जाण ठेवूनच त्यांची समाजवाद आपल्या देशात रूजवायचा प्रयत्न केला. साहजिकच बाकिच्या समाजवाद्यांपेक्षा लोहिया नेहमीच वेगळे आणि लक्षणीय वाटत राहिले. 

लोहियांनी ‘मीठ कर व सत्याग्रह’ या विषयावर जर्मनीत प्रबंध लिहून हुम्बोल्ट विद्यापीठात सादर केला. अर्थशास्त्राची डॉक्टरेट त्यांना मिळाली व ते भारतात 1933 मध्ये परतले. 

भारतात तेंव्हा कॉंग्रेस सोशालिस्ट पार्टिच्या स्थापनेच्या हालचाली आचार्य नरेंद्र देव यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाल्या होत्या. अगदी सुरवातीपासूनच लोहिया त्यात सहभागी झाले. कलकत्याहून प्रकाशित होणार्‍या ‘कॉंग्रेस सोशलिस्ट’ या मुखपत्राचे ते संपादक राहिले. अगदी सुरूवातीपासून लोहियांनी आपल्या समाजवादी साथींसमोर दोन धोके अधोरेखित करून ठेवले होते.  एक म्हणजे खुद्द कॉंग्रेस. नेहरूंच्या समाजवादी भूलाव्याला लोहिया कधीच बळी पडले नाहीत. त्यांनी आपला बिगरकॉंग्रेसवाद नेहमीच धगधगता ठेवला. आणि दुसरा धोका म्हणजे कम्युनिस्ट. जयप्रकाश नारायण यांनी कम्युनिस्टांना पक्षात घेतले ही फार मोठी चुक होती अशीच त्यांची आधीपासून धारणा होती. लोहियांसारखीच टीका अच्युतराव पटवर्धन, मिनू मसानी, अशोक मेहता आदींनीही केली होती. 

दुसर्‍या महायुद्धात युद्ध विरोधी भूमिका घेत आपण तिसरी आघाडी उघडावी अशी जोरदार मागणी लोहियांनी महात्माजींकडे केली. इतकेच नाही तर याच काळात ब्रिटीशांविरूद्धही लढा उभारण्याचा लकडा गांधीमागे लावला. पुढे 1942 च्या चले जाव लढ्यात त्यांनी हिरीरीने सहभाग नोंदवला. 

लोहियांचा गांधींवर प्रचंड विश्वास होता. गांधी आहेत तोपर्यंत कॉंग्रेसमध्ये समाजवादी विचारांना, त्या विचारांच्या लोकांना न्याय भेटेल असे त्यांना वाटत होते. पण गांधी हत्येनंतर चित्र पूर्णपणे पलटल्याचे त्यांना जाणवले. नेहरूंची सत्तालालसा लक्षात यायला लागली. पुढे 1948 ला नाशिकच्या संमेलनात समाजवादी पक्ष कॉंग्रेसमधून बाहेरच पडला. पुढे नेहरूंनी तटस्थ राष्ट्रांची जी आघाडी आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडली ती खरे तर लोहियांची संकल्पना. लोहिया दुसर्‍या महायुद्धाच्या आधीपासूनच युद्ध विरोधी तिसर्‍या आघाडीचे हिरीरीने समर्थन करत आले होते. 

लोहियांचे वेगळेपण आणि द्रष्टेपण हे की 1949 लाच पाटण्याच्या आधिवेशनात समाजवादी पक्ष कॉंग्रेसचा पुरक पक्ष आहे का सक्षम विरोधी पक्ष आहे असे विचारून कडव्या विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याची गरज त्यांनी आग्रहानी मांडली.

1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत समाजवादी पक्षाला मोठे अपयश पचवावे लागले. पण तरीही लोहियांनी आपल्या विचारांचा पाया हलू दिला नाही. पराभवानंतर भरलेल्या अधिवेशनात समाजवादी विचारांचे नवदर्शन त्यांनी कार्यकर्त्यांना घडवले. कम्युनिझम व भांडवलशाही दोघांनाही आपला विरोध असल्याचे स्पष्ट प्रतिपादन केले. 

नेहरूंनी 1955 मध्ये आवाडी येथे कॉंग्रेस अधिवेशनात समाजवादी धर्तीचा समाज निर्माण करण्याचा ठराव मंजूर करून घेतला. पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कसलीही हालचाल केली नाही. यामुळे समाजवाद्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात फुट पडली. नेहरूंच्या समाजवादाच्या कृत्रिम प्रेमात अशोक मेहता सारखे अडकले. जयप्रकाश नारायण मऊ पडले. याचा परिणाम एकच झाला की लोहियांना बाहेर पडून दुसरा पक्षच स्थापन करावा लागला. 1956 ला हैदराबाद येथे नविन पक्षाचे पहिले अधिवेशन झाले. तेंव्हा अध्यक्ष म्हणून लोहियांची निवड करण्यात आली.

1962 च्या लोकसभा निवडणुकीत लोहिया पं. नेहरूंच्या विरोधात उभे राहिले. अर्थात लोहियांचा पराभव झाला पण त्यांनी कॉंग्रेसला आणि विशेषत: नेहरूंना विरोध करता येवू शकतो हे आपल्या कृतीने सिद्ध केले. याच वर्षी चीनने भारतावर आक्रमण केले आणि नेहरूंनी उभ्या केलेल्या वैचारिक भूलाव्याचा डोलारा कोसळला. पुढे 1963 च्या पोटनिवडणुकीत लोहिया निवडून आले आणि लोकसभेत पोंचले. त्यांच्या पहिल्याच भाषणाने नेहरू हादरले. नेहरूंना जाणीव झाली असणार की आपण जो समाजवाद मांडतो आहोत तो नकली आहे. खरा समाजवाद तर लोहिया मांडत आहेत. 

1964 च्या नेहरूंच्या मृत्यूनंतर शास्त्रींची अल्प राजवट संपून इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या आणि घराणेशाहीचा एक विकृत नमूना समोर आला. लोहिया जो कॉंग्रेस विरोध स्पष्टपणे मांडत होते त्याला एक प्रकारे या घटनेने पाठिंबाच मिळाला. लोहियाच काळावर खरे ठरले. पुढे 50 वर्षांनी आज जेंव्हा राहूल  गांधींच्या निर्नायकी कारभारामूळे कॉंग्रेस लयाला चालली आहे याची बीजं इंदिरा गांधींच्या राजकारणातच आहेत.

1967 च्या निवडणुकीत लोहिया कनौज मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. त्यांच्या बोलण्याला इंदिरा गांधी वचकून असत. त्या फारशा बोलतच नसत. म्हणून त्यांना लोहियां ‘गुंगी गुडिया’ म्हणत.  याच निवडणुकांत 9 राज्यांमध्ये कॉंग्रेसचा पराभव करत संयुक्त विधायक दलाची सरकारनं स्थापन झाली. दुर्दैवाने यानंतर लगेच लोहियांचे निधन झाले (12 ऑक्टोबर 1967) आणि कॉंग्रेसतर राजकारणातील एक सशक्त हस्ती काळाच्या पडद्याआड गेली.

विचार : 

लोहियांनी भारताबाबत अतिशय स्पष्टपणे स्वतंत्र प्रतिभेने विचार मांडले आहेत. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात लोहिया जर्मनीत होते. त्यांना आंतरराष्ट्रीय परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. परराष्ट्र संबंधात त्यांचा अभ्यास दांडगा होता. मार्क्सवाद आमच्या देशात चालणार नाही. हे लोहियांनी सुरवातीपासूनच मांडले आहे. नेहरू ज्या पद्धतीनं समाजवादी धोरणं मांडत आहेत त्याच्याही मर्यादा लोहियांनी सुरवातीपासूनच स्पष्ट केल्या होत्या.

भारतासारख्या मागास राष्ट्रासाठी अल्पप्रमाण यंत्रांच्या वापराचा विचार ते मांडत होते. युरोप-अमेरिकेच्या अगदी उलट हा विचार होता. मनुष्यबळाचा जास्तीत जास्त बुद्धिमत्तापूर्ण उपयोग करत अल्पप्रमाण यंत्राचा वापर असा तो विचार होता.

मार्क्सवादातील हुकूमशाही ही अतिशय वाईट गोष्ट आहे असे त्यांनी नोंदवले आहे. मार्क्सवाद हे आशियाई देशांविरूद्धचे हत्यारच आहे या महत्त्वपूर्ण निष्कर्षाची नोंदही लोहियांनी घेतली होती.

मार्क्सवादाची चिकित्सा करतानाच लोहियांनी त्यांना प्रिय असलेल्या गांधीवादाचीही चिकित्सा केली आहे. गांधीवाद देशात अपुरा सिद्ध झाला आहे. ‘आज देशात जे काही चालले आहे, तो गांधीवाद नाही, तर गांधीवाद आणि मार्क्सवाद यांचे एक प्रकारचे निकृष्ट प्रतीचे पेय आहे.’ असं लोहिया म्हणतात. 

लोहिया स्वत:ला उदारमतवादी म्हणत. गांधींच्या तत्त्वातील अहिंसा त्यांना प्रिय होती. ‘अहिंसा माझा जवळपास ध्रुवतारा राहिला आहे.’ असं त्यांनी लिहून ठेवलंय. 

महात्मा गांधी आणि अणू बॉंम्ब यांबाबत लिहिताना लोहिया म्हणतात, ‘महात्मा गांधी आणि अणुबॉंब या दोनच आपल्या शतकातील मौलिक गोष्टी आहे आणि हे शतक संपण्यापूर्वी यांपैकी एक दुसरीचा पराभव करील.’ 

लेहियांना भारतीय परंपरांचे विलक्षण आकर्षण होते. त्यांनी राम कृष्ण आणि शिव यांच्यावर फार सुरेख लिहिले आहे. लोहिया लिहितात, ‘हे भारतमाते, आम्हाला शिवाची बुद्धी दे, कृष्णाचे हृदय दे आणि रामाचा एकवचनीपणा व कर्मशक्ती दे. असीमित बुद्धी, उन्मुक्त हृदय आणि मर्यादायुक्त जीवन यांनी आमचे सृजन कर!’

पुराणाकालीन भारतावर चिंतन करताना त्यांनी अनेक पैलू समोर आणले आहेत. पण त्याहीपेेक्षा हजार वर्षांतील भारताच्या बाबतीत त्यांची जी निरिक्षणे मांडली आहेत ती जास्त मार्मिक आणि महत्त्वाची आहेत. त्यातून लोहियांची भारताच्या प्रश्‍नांबाबतची जाण किती सखोल आहे हे लक्षात येते.  

लोहियांचे हे विचार फार महत्त्वाचे आहेत. ‘खोटे समाधान बाळगणार्‍या मुसलमानांना किंवा यातनांचे मूळ कशात आहे, हे न जाणणार्‍या हिंदूंना दीर्घकाळपर्यंत शासनसंस्थेच्या अभावाची जाण आली नाही. गेल्या दहा शतकांहूनही अधिक काळ हिंदूस्थानचा इतिहास ज्यांनी आत्मसात केला ते जाणातत, की शासनसंस्था ही जवळ जवळ भौतिक गरज आहे. इतर सर्व गोष्टी दुय्यम दर्जाच्या आहेत. अगदी माणूस आणि मानवतादेखील. मध्यवर्ती शासन संस्थेच्या अभावामुळे हिंदुस्थानात माणसे नव्हे तर उंदरांची पैदास झाली. माणसांतील गुलामी वृत्तीच्या किंवा लोभी वृत्तीच्या व्यक्तिवादाची दुर्गंधी झाकण्यासाठीचे, सर्वोच्च मानवता हे एक अमूर्त आवरण होते. अजूनही लोक धोका पत्करण्यास तयार नाहीत. ते आपल्या शासनसंस्थेसाठी प्रणांची बाजी लावायला तयार नाहीत. शासनव्यवस्था ज्यांनी दीर्घकाळ अनुभवली अशा लोकांजवळ रग आणि सर्व प्रकारच्या सुरक्षिततेसाठी सुप्त शक्ती असते.’ आज प्रबळ केंद्र सरकार हा विषय समोर येतो आहे त्या पार्श्वभूमीवर लोहियांचे हे विचार तपासून पाहण्यासारखे आहेत. 

लोहिया फाळणीच्या कट्टर विरोधी होते. ‘अंग्रेजी हटाव’ सारखे धोरण त्यांनी हिरीरीने मांडले. भारतातील तीर्थक्षेत्रे एकतेची प्रतिकं आहेत असंही लोहिय मानायचे.  त्यांचे हे विविध पैलू असलेले बंडखोर विचार झापडबंद समाजवादी पठडीतही बसणं मुश्किल होतं. आपले विचार आपल्या काळातही बर्‍याच जणांना पचू शकत नाहीत हे त्यांना जाणवत होते.

लोहियांनी समग्र मानवजातीचा विचार आपल्या भारतीय समाजवादी चौकटीत केला हे विशेष. लोहिया लिहितात

‘.... युरोपिय देशात अत्युच्च समाजिक समता आढळत असली तरी तेथील मनुष्य जीवन आज चिंता, मानसिक ओढाताण व एकप्रकारची शून्यमनस्कता यांनी ग्रस्त झाले आहे. अध्यात्मिक समतेच्या अभावी व ताणावाच्या ओझ्यामुळे आधुनिक संस्कृती युरोपात विव्हळत आहे, कोलमडत आहे. पाश्‍चिमात्य माणसाचे मन शांत नाही. स्वत:साठी घर शोधीत तो घराबाहेर भटकत आहे.

माणसाचा हा वनवास आणि स्वत:लाच हरवून बसण्याची भावना यांचा अंत करणे हाच समाजवादाच्या प्रदीर्घ यात्रेचा उद्देश आहे. आज सर्वत्र व आपल्या देशातही या यात्रेला नवी दिशा मिळवून द्यावी अशी समाजवाद्यांकडून अपेक्षा केली जात आहे. मानवी पूर्णत शोधण्याच्या परंपरेशी केवळ इमान राखता यावे म्हणून नव्हे तर ती परंपरा जिवंत राहवी यासाठी समाजवादाला अशी नवी दिशा देणे आवश्यक आहे....’ (लोहिया विचार दर्शन, पृ. 87) 

जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर त्यातून बाहेर पडून जनसंघाने ‘भारतीय जनता पक्ष’ची निर्मिती केली. त्याच्या सुरवातीच्या उद्दीष्टांतच ‘गांधीवादी समाजवादा’ची विचारसरणी अंगिकारल्याचे अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते. कदाचित त्यांच्या डोळ्यांसमोर लोहियांचेच विचार असावेत.

आज कॉंग्रेसचा निर्णायक राजकीय पराभव करून मोंदींनी लोहियांचे एक स्वप्न पूर्ण केले आहे. आता त्यांच्या विचार सरणीला अनुसरून पावले उचलून कॉंग्रेसेतर इतर राजकीय पक्षांनी बाकी स्वप्न पूर्ण करावे. त्यांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी वर्षा निमित्त हीच लोहियांना खरी श्रद्धांजली ठरेल.   

         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, July 16, 2017

बंद करा संमेलन अध्यक्ष निवडीचा फार्स !


दैनिक महाराष्ट्र टाईम्स १६ जुलै २०१७ 

दरवर्षी मान्सूनचा पाऊस, मृगाच्या पेरण्या, आषाढीची वारी या बातम्या आटोपल्या की सुरू होतात साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या बातम्या. कोण उभं राहणार? याचे आडाखे सुरू होतात. बहुतांश मराठी वाचकांना निवडणुक कशी होते हेच आजतागायत कळलेले नाही. 12 कोटी मराठी माणसांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 18 सदस्य हा खेळ खेळतात. ही अठरा माणसे मिळून जेमतेम हजारभर लोकांना मतदार करतात (निकष काय अजूनपर्यंत गुलदस्त्यात आहेत). या लोकांच्या लुटूपुटीच्या खेळाला शासन 25 लाख रूपये देणगी देतं. स्थानिक राजकारण्यांना हताशी धरून दर वर्षी संमेलन संमेलन नावाचा तमाशा आयोजित केला जातो. 

यावर्षीच्या डोंबिवलीच्या संमेलनाआधीपर्यंत निदान लोकांनी केलेली गर्दी तरी चर्चेचा विषय होती. आणि सगळे असं म्हणायचे, ‘काही का असेना लोक तर येत आहेत ना. गर्दी तर जमा होते आहे ना. बस्स झालं !’ पण यावर्षी तेही नाही. सर्वसामान्य रसिकांनी संमेलनाकडे पूर्णपणे पाठ फिरवली. मग कशासाठी हा अट्टाहास चालू आहे? 

सगळ्यात पहिल्यांदा विषय येतो तो संमेलनाच्या अध्यक्षपदाचा. अध्यक्ष म्हणून जो निवडून येतो त्याचे साहित्य किती रसिकांना माहित आहे? त्याची पुस्तके किती लोकांपर्यंत पोचली आहेत? साहित्य संमेलनांना शंभरपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. गेली 50 वर्षे आपण सार्वजनिक ग्रंथालय चळवळ चालवित आहोत.  गावोगाव शाळा व त्यांच्या माध्यमातून ग्रंथालये पोचली आहेत. 11 विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न असलेली किमान 5 हजार महाविद्यालये. या महाविद्यालयांमध्येही ग्रंथालये आहेत. 

आणि असं असतनाही जेंव्हा एखादा लेखक साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून निवडून येतो तेंव्हा यच्चावत पत्रकार, सामान्य रसिक यांना त्याच्या एकाही पुस्तकाची माहिती नसते हे कसे काय? 

नुकतीच आषाढीची यात्रा होवून गेली. वर्षभर महिन्यातील दोन एकादश्यांना उपवास करावयाचा, गळ्यात तुळशीची माळ घालायची, मांसाहार वर्ज्य करायचा, गावातील विठ्ठल मंदिरात किमान एकाशीला भजन किर्तन असतं त्यात सहभागी व्हायचं. कुणालाही गुरू करायचा नाही. प्रत्येकानं प्रत्येकाच्या ठायी परमेश्वर आहे असं समजून एकमेकांच्या पायी लागायचं. आणि असं वर्षभर केल्यावर मग कुठं पंढरीची आषाढीची वारी करायची. पण हे सगळं सोडून केवळ पंढरीची वारी करणे याला महत्त्व नाही. 

वर्षभर कुठलेही वाङ्मयीन उपक्रम राबवायचे नाहीत. आपल्या गावातील ग्रंथालयाचे काय हाल आहेत याचा विचार करायचा नाही. आपल्या गावातील शाळा-महाविद्यालयात मराठी विषयाचे शिक्षक-प्राध्यापक काय दिवे लावतात आपल्याला माहित करून घ्यायचे नाही. ज्या पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत त्यांची जूजबीही माहिती ठेवायची नाही. आणि केवळ एक मोठं संमेलन आयोजित करायचं किंवा त्याला उपस्थित रहायचं. अशानं साहित्य चळवळ वाढणार कशी?  अशानं जो लेखक अध्यक्ष म्हणून निवडून आला आहे त्याची लेखक म्हणून ओळख महाराष्ट्राला होणार कशी? बरं नंतरही वर्षभर ह्या अध्यक्षाचे कार्यक्रम कुठे आयोजित केल्या जातात का? त्याच्या पुस्तकांवर चर्चा घडवून आणली जाते का?

आज जी हजारभर लोकांनी मिळून अध्यक्ष निवडण्याची पद्धत आहे ती अतिशय दोषास्पद आहे. त्यावर कुठलीही चर्चा न करता आधी तातडीने ती बंद केली पाहिजे. यासाठी महामंडळाने ‘लोकशाही आहे काय करणार?’ असले फुसके कारण देवू नये. कारण महामंडळाचा अध्यक्ष निवडणुकीच्या मार्गाने निवडला जात नाही. घटक संस्थांची संमेलने होतात तेंव्हा त्याच्या अध्यक्षपदासाठीही निवडणुक होत नाही. विश्व संमेलनाचा अध्यक्षही निवडून येत नाही. तेंव्हा केवळ अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्षच तेवढा निवडणुकीद्वारे हे म्हणणे बरोबर नाही. याला कुठलेही संयुक्तिक कारण नाही.

असली टिका केली लगेच काही जण म्हणतात मग पर्याय सांगा. 

1. साहित्य महामंडळाच्या घटक संस्था या रसिकाभिमुख व्हायला हव्या. प्रकाशक-ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते-ग्रंथ विक्रेते- शालेय /विद्यापीठीय पातळीवर मराठीचे अध्यापन करणारे शिक्षक असे सर्व घटक यात समाविष्ट असावयास हवे. (सुप्रसिद्ध समिक्षक वा.ल.कुलकर्णी यांची जन्मशताब्दि वर्ष होते. त्यासाठी स्थानिक साहित्य संस्था व विद्यापीठ यांनी मिळून कार्यक्रमाचे नियोजन करावे असे आम्ही एकदा सुचवले. तर त्या दोन्ही ठिकाणच्या लोकांनी असा काही चेहरा केला की जणू काही ब्रह्मांड कोसळणार आहे. शिवाय प्रत्येकाचे म्हणणे, ‘आम्हाला काय गरज? हवं तर त्यांनी आमच्याकडे यावं.’ हा पवित्रा अतिशय घातक आहे.) 

तेंव्हा साहित्य महामंडळाने सगळ्यात पहिल्यांदा साहित्य विषयक आस्था असणारे विविध घटक शोधून त्या सर्वांना सांधण्याचे काम करावयाला हवे. त्यासाठी घटक संस्थांनी आपल्या कामाचे स्वरूप बदलून रसिकाभिमूख-इतर संस्थांना सोबत घेवून उपक्रम करण्याचे धोरण आखायला हवे. 

2. साहित्य संमेलन म्हणजे आषाढीची वारी आहे असं समजून त्याआधी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जावे. इतर संस्थांनी केलेल्या उपक्रमांची दखल घेतली जावी. वर्षभरातील विविध सहित्य संमेलनांच्या अध्यक्षांना सन्मानाने अखिल भारतीय साहित्य संमेलनात आमंत्रित करण्यात यावे.

3. महामंडळाची जी कार्यकारिणी आहे तिची व्याप्ती वाढवून विविध लोकांकडून अध्यक्षपदासाठी प्रस्ताव मागवले जावेत.  यांचा विचार करून अंतिम काही नावांची यादी तयार करण्यात यावी. मग कार्यकारिणीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जावा. 

प्रत्यक्ष साहित्य संमेलन म्हणजे महामंडळाने स्थानिक आयोजक संस्थेला सोबत घेवून केलेला मनमानी कारभार असे स्वरूप सध्या आलेले आहे. त्यामुळे सामान्य रसिक संमेलनाकडे पाठ फिरवतात. किंवा त्या त्या आयोजकांनी गोळा केलेल्या हौशी लोकांचीच गर्दी होते. साहित्य रसिक त्यात आढळत नाहीत.

यासाठी साहित्य संमेलन म्हणजे आठवडाभर चालणारा माय मराठीचा उत्सव व्हायला हवा. तीन दिवसांचे संमेलन. त्याला जोडून ग्रंथालय संघाचे एक दिवसाचे अधिवेशन. सोबतच प्रकाशक परिषदेचेही एक दिवसाचे अधिवेशन आयोजित करता येवू शकते. एक दिवस ग्रंथविक्री क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते दुकानदार यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राखीव ठेवण्यात यावा. 

अशा पद्धतीनं सहा दिवस विविध कार्यक्रम राबविता येतील. सोबतच नॅशनल बुक ट्रस्ट व साहित्य अकादमी सारख्या संस्थांना हाताशी धरून मोठे ग्रंथ प्रदर्शन सहाही दिवस आयोजित करण्यात यावे. याला जोडून रविवारच्या सुट्टीचा एखादा दिवस वाढवून सात दिवसाचा ‘माय मराठी उत्सव’ साजरा करता येईल. 

या आधी ज्या ठिकाणी संमेलन झाले ती सर्व ठिकाणे टाळून नव्या ठिकाणीच संमेलन आयोजित करण्यात येईल असे धोरण आखले पाहिजे.

साहित्य संमेलनाचा अध्यक्ष आधी ठरवून त्याने वर्षभर महाराष्ट्रात फिरून साहित्य विषयक जागृती करावी. काही कारणाने अध्यक्ष जास्त फिरू शकला नाही तर इतरांनी ही जबाबदारी घ्यावी. मग वर्षाच्या शेवटी त्याच्या अध्यक्षतेखाली संमेलन पार पाडले जावे.    

श्रीकांत उमरीकर

Saturday, July 15, 2017

शंकरमहाराज खंदारकर लिखित वारकरी प्रस्थान त्रयी


उरूस, सा.विवेक, 9 जूलै 2017


पंढरीची आषाढीची वारी संपली की सगळे लोक/माध्यमं हा विषय आपल्या डोक्यातून काढून टाकतात. परत पुढच्या वर्षी मॉन्सून आणि मग गावोगावच्या दिंड्यांची लगबग या बातम्या येईपर्यंत सारे काही या गप्पगार असते. 

खरं तर आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. म्हणजेच देव आता विश्रांतीला जातात. आणि बरोब्बर चार महिन्यांनी कार्तिक महिन्यात एकादशीला हा चातुर्मास संपतो. त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. या चार महिन्याच्या काळात पंढरपुरला वारकरी संप्रदायातील साधुपुरूष किर्तनकार अभ्यासक गोळा होतात. चार महिने मुक्काम पंढरपुरातच ठेवतात. आपसात विचारांची आदान प्रदान करणे, चर्चा करणे, संप्रदायातील कुट प्रश्‍न-अडचणी सोडवणे याकाळात घडते. 

त्याच सोबत वारकरी संप्रदायातील ज्या तीन ग्रंथांना प्रस्थान त्रयी म्हणून मान आहे त्या ‘ज्ञानेश्वरी’, ‘एकनाथी भागवत’ आणि ‘तुकाराम गाथा’ यांच्यावर सखोल अभ्यास या काळात केला जातो. अन्यथा पंढरीची वारी म्हणजे गावोगावातून टाळ कुटत निघालेल्या रिकामटेकड्या लोकांची दिंडी अशीच सगळ्यांची भावना होवून बसली आहे. 

गेल्या शंभर वर्षांत मौखिक परंपरेनं आलेलं ज्ञान नोंदवून ठेवण्याची चांगली प्रथा वारकरी संप्रदायात आता रूळली आहे. सोनोपंत दांडेकर, जोग महाराज,  धुंडामहाराज देगलुकर असे अधिकारी पुरूष या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत.   त्यातीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजे वै.ह.भ.प. शंकरमहाराज खंदारकर. शंकर महाराजांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी प्रस्थान त्रयीतील तिनही ग्रंथांवर सटीप भाष्य लिहलं. अन्यथा केवळ ज्ञानेश्वरी, केवळ तुकाराम गाथा यांच्यावरील बर्‍याच अधिकारी पुरूषांची भाष्ये आहेत.

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात कंधार गावी साधुमहाराज (इ.स.1708 ते 1812) म्हणून संत अठराव्या शतकात होवून गेले. त्यांच्या घराण्यातील सातवे वंशज म्हणजे शंकर महाराज खंदारकर (1923-1985).
महाराजांनी तुकाराम गाथेवर केलेले भाष्य 1965 मध्ये प्रसिद्ध झाले. (आजपर्यंत त्याच्या 9 आवृत्त्या प्रकाशीत झाल्या आहेत). जवळपास दहा वर्षांनी 1974 मध्ये ज्ञानेश्वरीवरील भाष्य ‘ज्ञानेश्वरी भावदर्शन’ प्रसिद्ध झाले (आठ आवृत्त्या). महाराजांच्या निर्वाणानंतर 1991 मध्ये प्रस्थानत्रयीतिल शेवटचा ग्रंथ ‘भावार्थ एकनाथी भागवत’ प्रकाशित झाला (चार आवृत्त्या). गंभीर ग्रंथांच्या आवृत्त्या म्हणजे वाचकांनी अभ्यासकांनी ही एका प्रकारे दिलेली पावतीच आहे.


शंकरमहाराजांचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सोप्या शब्दांत त्यांनी या तिनही ग्रंथांचे मर्म उलगडून दाखवले आहे. संसारात अडकलेली सामान्य माणसे, वारकरी संप्रदायात मानसिक आधार शोधायला येतात. महाराष्ट्रात महानुभाव, लिंगायत, गाणपत्य, शाक्त, दत्त असे कितीतरी संप्रदाय आहेत. सर्वसामान्यांना समावून घेईल असा एकमेव वारकरी संप्रदायच आहे हे काळावर सिद्ध झाले. शंकर महाराजांनी हे ओळखून आपल्या भाष्याची मांडणी केली आहे. महाराज लिहीतात, ‘... शास्त्राच्या दृष्टीने संन्याशाची मुले म्हणून भ्रष्ट ठरलेल्या परिस्थितीतही परमार्थ करता येतो, हे श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रात आहे. कनक-कांता संपन्न असलेल्या परिस्थितीतही परमार्थ करता येतो, हे श्री एकनाथ महाराजांच्या चरित्रात आहे. त्याचप्रमाणे विपन्नावस्थेतही परमार्थ कसा करता येतो, हे श्री तुकाराम महाराजांची आपल्या चरित्रात दर्शविले आहे.’


‘श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य’ सगळ्यात पहिल्यांदा प्रकाशित झाले. पहिल्याच ग्रंथांत शंकर महाराजांनी पाठभेद काळजीपूर्वक तपासून आपली भूमिका जाहिर केली आहे. त्यावरून त्यांची दृष्टी एका टाळकुट्या वारकरी सांप्रदायिकाची न राहता चिकित्सक आधुनिक अभ्यासकाची कशी आहे हे लक्षात येते. बोली भाषेतील विविध छटांचे शब्द बदलून तेथे मूळ प्रमाण असणारे संस्कृत शब्द त्यांनी भाष्य करताना योजिले आहे. उदा. आहिक्य- ऐहिक, अतित्यायी- आततायी, अभिळास-अभिलाष, दरुशण-दर्शन, कमळणी- कमलिनी. 

शंकरमहाराज सांप्रदायिक आहेत. त्यांच्या लेखनात परंपरेचा एक जिव्हाळा आढळून येतो. ज्ञानेश्वर माऊली बद्दल लिहीताना स्वाभाविकच त्यांच्या लेखणीलाही पान्हा फुटतो, ‘... आपण समाधिस्थ झाल्यावर माऊलीने बाळाला दररोज दूध पिण्याकरिता हरिपाठ लिहून ठेवला. बाळाने जन्मदरिद्री राहू नये व सर्वकाळ आनंदात राहावे म्हणून अनुभवामृताचे धन साठवून ठेवले. बाळाचे पारमार्थिक आरोग्य कायम राहण्याकरिता पासष्टीच्या रूपाने पासष्ट सुवर्णमात्रा करून ठेवल्या. बाळाला वाईटाच्या संगीतने वाईट वळण लागू नये म्हणून गाथेच्याद्वारा विठ्ठल भक्तीचे संस्कार त्याच्यावर केले...’

शंकर महाराजांचा तिसरा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे ‘भावार्थ एकनाथी भागवत‘. महाराजांच्या पूर्वी जी संपादने या भागवताची उपलब्ध आहेत त्यांच्यात मूळ संस्कृत श्लोकाचा अर्थ नाही. शंकर महाराजांनी मात्र मूळ संस्कृत श्लोक, त्याचा अर्थ, त्यावरच्या एकनाथ महाराजांच्या ओव्या आणि मग त्या ओव्यांचा अर्थ आपल्या टिपणीसह असे स्वरूप या ग्रंथाला आहे. म्हणून त्याचे महत्त्व वाढले आहे. काही ठिकाणी तर प्राप्त परिस्थितीचा विचार करून नविन अर्थाची मांडणीही करून दाखवली आहे. त्यातून महाराजांची उच्चकोटीची प्रज्ञा आणि प्रतिभा जाणवते.


एकनाथी भागवताच्या नवव्या अध्यायात 192 क्रमांकाची ओवी आहे

विजातीयभेद ते ठायी । नसे सजातीय भेद कांही ।
स्वगतभेदु तोही नाही । भेदशून्य पाहे ये रीती ॥

आता यात नाथांच्या मूळ ओवीत कितीतरी रिकाम्या जागा आहेत. शंकर महाराजांनी याचा अर्थ उलगडून दाखवताना, ‘... त्या नारायणाचे ठिकाणी वृक्ष पाषाणातल्याप्रमाणे विजातीय भेद नाही. वड-पिंपळातल्याप्रमाणे सजातीय भेद नाही आणि वृक्षांच्या शाखा, पल्लव, पाने, फुले, फळे यांच्यातल्याप्रमाणे स्वगतभेदही नाही. याप्रमाणे नारायणाचे स्वरूप भेदशून्य आहे.’ रिकाम्या जागा भरून काढल्या आहेत. 

गेली आठशे वर्षे अशिक्षीत जनतेला वेदांताचे तत्त्वज्ञान साध्या सोप्या सुबोध भाषेत संतांनी समजावून सांगितले. स्वत:वर अन्याय झाला तरी (ज्ञानेश्वरांना वाळीत टाकले, एकनाथांना भावार्थ रामायण अर्धवट ठेवून जलसमाधी घ्यावी लागली, तुकारामांचा शेवट तर गुढच आहे) सामान्य लोकांना भवसागरातून तरून जाण्याचा मार्ग सुचवला. आधुनिक काळात शंकर महाराजांसारख्या साधुपुरूषांनी चिकित्सक दृष्टीनं डोळसपणे हे सगळं विचारधन लिखित स्वरूपात भाष्यासह उपलब्ध करून दिलं. आपण शिक्षणाची इतकी साधनं निर्माण केली, गावोगाव शाळा उघडल्या, हजारोंनी शिक्षक नेमले तरी अपेक्षीत ज्ञान पोंचत नाही म्हणून आपण ओरड करतो. मग या साधु संतांनी शेकडो वर्षे कुठलीही अनुकूलता नसताना ही ज्ञानाची परंपरा केवळ लोकांनी दिलेल्या भिक्षेवर आणि दानावर समृद्ध करून दाखवली हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल.       

(शंकर महाराजांची सर्व ग्रंथ संपदा वै. शंकरमहाराज खंदारकर विश्वस्त संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आली असून ती वाचक अभ्यासक वारकरी भक्तांसाठी उपलब्ध आहे.)

   
श्रीकांत उमरीकर, 
जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Monday, July 10, 2017

खार पाळणार्‍या मुलाची गोष्ट


उरूस, सा.विवेक, 9 जूलै 2017

... अशातच मी टोपीचं दुमडलेलं तोंड मोकळं केलं. तेवढ्या उजेडात पिलाचे इवलेसे डोळे लुकलुकताना दिसले. काजव्यासारखे. विचार आला, हिचं नाव ‘लुकलुकी’ ठेवूया. आईनं ‘लकाकी’ सुचवलं. पण त्यापेक्षा ‘लुकी’ म्हटलं तर? माझा मलाच आनंद झाला. मनातल्या मनात बारसं करून मोकळा झालो. ‘लुकी’ नाव पक्कं झालं....

‘खारिच्या वाटा’. ल.म.कडू यांच्या या पुस्तकाला यावर्षीचा साहित्य अकादमीचा बालसाहित्यासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. एक छोटा चौथीतला शाळकरी मुलगा खारीचं पिल्लू पाळतो त्याची ही गोष्ट आहे  एक साधं छोटं कथानक. कादंबरी जेमतेम दीडशे पानांची. वाक्यांची सुटी सुटी रचना असल्याने पानं इतकी भरली. नसता जेमतेम शंभरच भरतील. पण ज्या साधेपणानं, ज्या निरागसतेनं, ज्या उत्कटतेनं यात गावाचं लहानमुलांच्या विश्वाचं निसर्गाचं वर्णन आलंय त्याला तोड नाही. 

मोरानं पावसाळ्यात आपला पिसरा उलगडत न्यावा तसा इतका हा नाजूक विषय ल.म.कडू यांनी वाचकांसमोर उलगडत नेला आहे. मोराचा आणि पावसाळ्याचा संदर्भ आठवण्याचं एक कारण म्हणजे या पुस्तकातच तसा संदर्भ आहे. हा छोटा मुलगा आणि त्याचा मित्र दिनू गायरानात गुराखी जनावरं चरायला जातात तिकडे रोज खेळायला जात असतात. त्यांना एक मोठी दगडी उंच शिळा आढळते. त्यांना असं वाटतं की आपण यावर मोराचे चित्र कोरले पाहिजे. त्या प्रमाणे ते कामाला सुरवात करतात. दोघं मित्र समोरा समोर बसलेले दोन मोर दगडात कोरतात. आणि असं नियोजन करतात की हे सगळं काम आषाढाच्या पहिल्या दिवसापर्यंत पूर्ण व्हावं. आणि तसं ते पूर्ण होतंही.

काय पण प्रतिभा आहे .. इकडे कालिदासाच्या  मेघदुतात आषाढाच्या पहिल्या दिवशी दिसलेल्या ढगामुळे यक्षाला बायकोची आठवण होते असं वर्णन आहे. आणि इथे या कादंबरीत लेखक आषाढाच्या पहिल्या दिवसापर्यंत मोराचे शिल्प पूर्ण होण्याचा प्रसंग रंगवतो. जेणे करून पुढच्या नियमित कोसळणार्‍या पावसात जणू हे मोर नाचणारच आहेत. हे मोर त्या दोन लहान मुलांच्या मनात नाचू लागले हे निश्‍चित. कडू यांच्या प्रतिभेची आणि त्यांच्या चित्रकार असण्याची साक्ष अजून पुढच्या एका वर्णनात पटते. या मोराच्या शिल्पात खाली रिकामी जागा राहिली असते. तिथे त्यांनी पाळलेल्या ‘लुकी’ खारीचं शिल्प ते रेखाटतात. आणि पुढे ल.म.कडू यांनी असं लिहीलं आहे, 

...दोन दिवसांत कोरीव काम पूर्ण झालं. चंदनं ‘लुकी’ असं नावही कोरलं. ‘ल’ चा उकार मोठा करून त्याला शेपटीसारखा झुबकाही काढला....

संपूर्ण कादंबरीत लहान मुलांचे विश्व, गावगाडा आणि निसर्ग असे तिन पातळीवरील वर्णनं आलेली आहेत. 

गावातल्या एका लग्नाचं वर्णन करताना सगळा कसा एकमेकात मिसळून गेला आहे हे अगदी साधेपणात नकळतपणे लेखक रंगवून जातो. त्यात कुठेही अभिनिवेश येत नाही. कुठेही शब्दांचा अतिरिक्त फुलोरा नाही. 

... लग्न ही काही एका दिवसात उरकायची गोष्ट नसे. आधी हळदी. दुसर्‍या दिवशी लग्न. तिसरा दिवस वरातीचा. चौथ्या दिवशी देवाची ‘पांजी’. असा सगळा रमणा. त्यात अख्खा गाव गुंतलेला. ‘चूलबंद’ निमंत्रण. एकाही घरात चूल पेटत नसे. सारं काही लगीन घरीच. गाव एक कुटूंब होई. बलुतेदार, कातकरी, धनगर त्यातच येत...

चौथितला हा मुलगा आपल्या शाळेचं, मित्रांचं वर्णनही अगदी सहज बोलता बोलता एखादं चित्र रेखाटावं, रेखाटन काढावं तसं मांडून जातो. खरं तर निसर्ग, गावगाड्यातील माणसं ही इतकी इकमेकांत मिसळून गेलेली असत की त्यांना वेगळं वेगळं काढता येत नाही. लेखक हे सगळं नेमकेपणानं टिपत जातो. 

त्याची शाळा भरते आहे तिच मुळी भैरोबाच्या मंदिरात. मंदिराच्या परिसरात भरपूर झाडी. खारी अंबा असा हळूवार खायच्या की त्यांनी खाल्लेला अंबा तसाच झाडाला लटकून असायचा. कधीतरी मोठा वारा आला की तो अंबा पडायचा. त्याचा मंदिराच्या पत्र्यांवर आवाज व्हायचा. पोरांना वाटायचं की हा पाडाचाच अंबा आहे. 

ल.म.कडू यांनी जी वर्णनं केली आहेत ती त्यांच्यातल्या प्रतिभावंत चित्रकाराची साक्ष देतात. चित्रापेक्षाही रेखाटनांची जास्त आठवण येते. आता एक वर्णन आहे शाळा भरते त्या भैरोबाच्या देवळाचे

...देवाची मूर्ती दगडाची. काळी कुळकुळीत. गुळगुळीत. वर छोटी कमान. मधोमध लटकती पितळी घंटा. भरवती नवसाचे पाळणे, नारळाच्या वाट्या, तांबडी निशाणं, बारक्या घंट्या असं काही बाही अडकवलेलं. गाभारा अंधूक. देवापुढं दगडी चीप. त्यावर नारळ फुटत. कमानीच आत दोन लहानग्या देवळ्या. त्यात दगडी पणत्या. तेलानं मेणचटलेल्या. वात लावल्यावर उजेड पांगायचा. भैरोबाची मूर्ती स्पष्ट दिसायची. चांदीचे डोळे चमकायचे...

चित्रपटात एखादा निकराचा हाणामारीचा जगण्या मरण्याशी संबंधीत ‘क्लायमॅक्स’चा प्रसंग असतो तसा एक छोटा पण फार प्रत्यंयकारी प्रसंग लेखकानं यात रंगवला आहे. एकदा ही खार या छोट्या मुलाच्य खांद्यावरून बैलाच्या अंगावर जावून पडते. काहीतरी अंगावर बसलं म्हणून तो झटकायला जातो. भिवून लुकी त्याच्या वशिंडाजवळ येवून चिटकून बसू लागते. तस तसा तो बैल चवताळत जातो. तो बेभान होतो. तसतशी खार अजूनच त्याला भितीनं चिटकून राहते. बैल अजूनच चवताळतो. उधळतो. आता काय होणार म्हणून सगळे भयचकित होवून पहात असतात. खारीनं खाली उडी मारावी असं सगळ्यांना वाटत असतं पण तसं सांगणार कसं? बैलाच्या शेपट्याचा मार्‍यानं शेवटी ही लुकी खाली पडते. ती निपचित पडते हे पाहून छोट्या मुलाच्या काळजाचा ठोका चुकतो. त्याचा मित्र दिनू त्याला समजावतो. शेवटी जेंव्हा लुकी थोडी मान हलवते तेंव्हाच यांच्या जिवात जीव येतो. 

कांदबरीभर असे प्रसंग विखूरलेले आहेत. लाकडाच्या रचलेल्या ढिगात साप शिरतो असा समज होतो. त्या जागेतून तो बाहेर काढायचा तर एवढी मोठी लाकडं बाहेर काढावी लागणार. ते तर शक्य नसतं. मग दिनू सुचवतो की लुकीला आपण या ढिगात सोडू. ती अलगद पुढच्या फटीतून बाहेर आली की कळेल धोका नाही. आणि धोका असेल तर ती परत सोडल्या रस्त्यानंच वापस येईल. त्या प्रमाणे लुकीला सोडतात. ती सुखरूप पलिकउच्या बाजूनं बाहेर येते तेंव्हा सगळेच निश्‍वास सोडतात की आत साप नाही. 

असे प्रसंग तर अतिशय विलक्षण असे उतरले आहेत. 

कादंबरीचा शेवट अतिशय प्रत्ययकारी केला आहे. धरण होणार म्हणून गाव उठतं. सगळे घरदार सोडून सामान सुमाान बांधून जायला निघतात. हा छोटा मुलगा लुकीला पण आपल्या सोबत घेवून जावू पहात असतो. पण त्याचा पायच गावातून निघत नसतो. 

... माझी वाट बघून ट्रकचा रबरी भोंगा ‘पोंऽऽ पों ऽऽ’ वाजायला लागला. निघायलाच हवं होतं. उठून उभा राहत होतो, इतक्यात लुकी घाईनं डाव्या हातावरून खाली उतरली. एकवार माझ्याकडं पाहिलं आणि मंद चालीनं चिंचेच्या झाडाकडे गेली. बुंध्याजवळ थबकली. पुन्हा वळून पाहिलं आणि त्याच गतीनं चिंचेवर चढली. नाराज झाली की तिची चाल मंद व्हायची. तिला गाव सोडायचा नव्हता. ‘सोड’ असं कुणी म्हणूनही शकत नव्हतं. आईची हाक आली. ट्रककडे गेलो. आईच्या हातात कापण्यांची पुरचुंडी होती. दिनूनं दिलेली. ती घेऊन चिंचेकडे धावलो. आडव्या फांदीनं वर चढलो. दोन फांद्यांच्या बेचक्यात पुरचुंडी नीट ठेवली. ‘दिन्यानं तुझ्यासाठी कापण्या दिल्यात. पुरवून पुरवून खा..’ असं काहीतरी सांगावंसं वाटत होतं. ती माझ्याकडं बघत होती. आणि मी तिच्याकडं.....

जागतिक वाङ्मयात शोभून दिसावी अशी कलाकृती एका मराठी लेखकाच्या हातून घडली याचा अभिमान आहे आणि तिचा सन्मान आज मोठ्या महत्वाच्या पुरस्कारानं होतो आहे याचा मनापासून आनंद आहे.    
     
श्रीकांत उमरीकर, 
जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Tuesday, July 4, 2017

साधेपणा हाच वारकरी संप्रदायाचा गाभा


उरूस,  4 जूलै 2017

‘पाऊले चालती पंढरीची वाट’ हे प्रल्हाद शिंदेंच्या आवाजातील गाणं आषाढाचा पाऊस कोसळायला लागला की मनात कोसळू लागते. गावोगावची माणसं सार्‍या प्रापंचिक अडचणी बोचक्यात बांधून घराच्या आढ्याला टांगून ठेवतात. जवळच्या बोचक्यात अगदीच जरूरीच्या चार दोन वस्तू जास्तीचा कपड्याचा जोड घेवून एका आंतरिक ओढीनं पंढरीकडे चालायला लागतात.

आत्तापर्यंत खूप विद्वानांची अभ्यास केला, खुप अभ्यासकांनी प्रत्यक्ष वारीत जावून अनुभव घेतला, देशीच काय पण परदेशी विचारवंत अभ्यासकही यात सहभागी झाले पण कुणालाच वारीचं कोडं उलगडलं नाही. कुसुमाग्रजांनी लिहीलंय

आभाळाचं मन कळत नाही
वारा होवून मुक्त झाल्याशिवाय
प्रकाशाच्या देवळात जाता येत नाही
दिवा होवून भक्त झाल्याशिवाय

तसं आपण भक्ताची भूमिका घेतली तर कदाचित वारीचे कोडे उलगडू शकेल. नसता केवळ कोरड्या तत्त्वज्ञानाचा- विचारांचा-अभ्यासाचा आधार काही कामा येणार नाही.

ग्रामिण भागातले लोक मोठ्यासंख्येने वारीत सहभागी होतात. आपल्या गरजा किमान ठेवायच्या, पायी चालायचे, मिळेल ते साधे अन्न खायचे, समुहात रहायचे, ओठांनी विठ्ठलाचे नाम संकिर्तन करायचे, बाकी सारे विचार सगळ्या चिंता सोडून द्यायच्या.

ज्ञानेश्वरांपासून वारीच्या ठळक नोंदी आहेत. त्याच्या काहीसं आधीपासून मोजलं तर जवळपास हजार वर्षांची ही परंपरा महाराष्ट्रात आहेत. जातीभेद विसरून सर्व लोक अगदी मुसलमानही यात सहभागी होत आलेले आहेत.
वारकरी संप्रदाय इतर संप्रदायांपेक्षा सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरला, सगळ्यात जास्त टिकला याचे कारण काय?

एक एकमेव साधे ठळक कारण म्हणजे या संप्रदायाचा साधेपणा.

‘ज्ञानेश्वरी’, ‘एकनाथी भागवत’ आणि ‘तुकाराम गाथा’ हे तीन ग्रंथ या संप्रदायाचे प्रमाण ग्रंथ. यांना ‘प्रस्थान त्रयी’ म्हणतात. या तीन ग्रंथांचे पठण करणे. दर महिन्यात येणार्‍या दोन एकादश्या पाळणे म्हणजेच त्या दिवशी उपवास करणे. गळ्यात तुळशीची माळ परिधान करणे (तुळशीच्या झाडाच्या छोट्याशा खोडापासून मणी तयार करतात. व त्याची माळ करून गळ्यात घालतात). गावातील विठ्ठलाच्या मंदिरात नियमित जाणे. भजन किर्तन करणे. वर्षातून एकदा पंढरीची वारी करणे. ही वारी आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैती अशी चार वेळा एकादशीला केली जाते. त्यातील केवळ आषाढी किंवा त्या खालोखाल कार्तिकी जास्त लोकप्रिय आहे. इतर वेळीही यात्रा भरते पण त्या तुलनेत गर्दी जमा होत नाही. प्रत्येकाच्या ठायी परमेश्वर आहे समजून प्रत्येने प्रत्येकाच्या पाया पडणे.  मांसाहार न करणे. दारू न पिणे. देवाची पूजा म्हणजे धूत वस्त्र परिधान करून (सोवळे नाही) विठ्ठलाच्या प्रतिमेला फुलं वाहणे. युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ही आरती तर लोकप्रिय आहेच.

बस्स इतक्या साध्या आचरणांवर हा संप्रदाय उभा आहे.

बाबासाहेबांनी सनातन हिंदू धर्मावर टिका करत नविन धर्मात प्रवेश केला. पण याच बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ ही वृत्तपत्रे सुरू करताना त्यांच्या शिर्षस्थानी ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या रचनांना स्थान दिले हे लक्षात घेण्यासारखे आहे. महाराष्ट्राच्या पातळीवर विचार केला तर सगळ्या समुहाचे मन समजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलेले आणि काळावर टिकलेले काय असेल तर तो केवळ वारकरी संप्रदायच. महाराष्ट्रातील ‘लिंगायत’ आणि ‘महानुभाव’ संप्रदायांना मर्यादा पडल्या कारण त्यांचे कट्टर स्वरूप. कठोरपणे झालेली बंड आपला समाज स्विकारत नाही. त्याला मर्यादा पडतात. उलट ही बंडं पचवून परत परंपराच मजबूत झालेली दिसते.

आज संतांच्या अभंगांचे दाखले घेवून हे कसे चातुवर्ण्य मानणारे होते, यांना कसे ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व मान्य आहे, संत कसे टाळकुटे होते, संतांनी महाराष्ट्र घडविला नसून बिघडवला आहे असे काही अभ्यासक उच्च स्वरात सांगत असतात.

वारकरी संप्रदायाचा बारकाईने अभ्यास केला, वारकर्‍यांचे मन समजून घेतले तर लक्षात येते की हे सगळे आक्षेप फारच वरवरचे आहेत. संतांच्या रचनांमधुन विषमतेचे पुरावे मिळतात हे खरे आहे. पण ते फसवे आहेत. त्या काळी चालत असलेल्या रूढी परंपरांना फारसा विरोध न करता, त्यांच्या विरोधात फारसे बंड न करता शांतपणे समतेचा एक प्रवाह वारकरी संप्रदायाने वाहता ठेवला आहे. आणि तिच पद्धत जास्त उपयुक्त ठरली.

जे संत जन्माने ब्राह्मण होते त्यांनाही सनातन ब्राह्मणांनी वाळीतच टाकले. ज्ञानेश्वर आणि त्यांची तिनही भावंडे यांना ब्राह्मण म्हणून मान्यता शेवटपर्यंत मिळालीच नाही. ना त्यांच्या मुंजी झाल्या ना लग्नं झाली. चारही जणांना समाधी घ्यावी लागली. समाधानानं शांतपणे भरपूर आयुष्य जगू दिलं गेलं नाही.  दुसरे संत एकनाथ. एकनाथांनाही सनातनी ब्राह्मणांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. एकनाथांचा शेवट जलसमाधी घेवूनच झाला. शिवाय ते लिहीत असलेले भावार्थ रामायण अर्धवटच राहिले. याचा अर्थच असा होतो की एकनाथांना त्याकाळच्या ब्राह्मणांनी जगणे नकोसे करून सोडले असणार. तुकाराम तर बोलूनचालून कुणबी वाणी. म्हणजे यांच्या लेखी क्ष्ाुद्रच. पण आज याच संतांच्या रचनांना वारकरी संप्रदायाने आपले प्रमाण ग्रंथ म्हणून मान्यता दिली. त्याची पारायणे नियमितपणे केली जातात.

वारकरी संप्रदायाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कुठलेही अवडंबर या संप्रदायात नाही. या संप्रदायात गुरू केला जात नाही. देवाला तुळशीची माळ आणि त्याच्या समोर भजन किर्तन केलं की संपलं.

मध्यभारतात तीन लोकदैवतं प्रसिद्ध आहेत. पहिला आहे ओरिसातील पुरीचा जगन्नाथ. याला ‘अन्नब्रह्म’ म्हणतात. म्हणजे अन्नदान केल्याने तेथे पुण्य मिळते. या ठिकाणच्या जेवणाचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही ज्या मुळच्या भारतीय भाज्या आहेत त्यांचाच वापर केला जातो. दुसरे दैवत म्हणजे आंध्र प्रदेशातील तिरूपतीचा बालाजी. याला ‘कांचनब्रह्म’ म्हणतात. याला सोने अर्पण केल्याने पुण्य मिळते. आणि तिसरा आहे पंढरपुरचा आपला विठोबा. याला ‘नादब्रह्म’ म्हणतात. हा केवळ भजन किर्तनानं सुखी होतो. केवळ नामसंकिर्तन केल्याने इथे पुण्य लाभते.

बहिणाबाईने आपल्या कवितेत विठोबाचे वर्णन अतिशय सार्थ असे केले आहे

सोन्या रूप्यानं मढला
मारवाड्याचा बालाजी
शेतकर्‍याचा इठोबा
पानाफुलातच राजी

बहिणाबाईच्या या वर्णनातच वारकरी संप्रदायाच्या साधेपणाचा अर्थ प्रकटला आहे. आणि तेच या संप्रदायाचं खरं बलस्थान आहे.        

 
श्रीकांत उमरीकर,
जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Sunday, July 2, 2017

पुस्तकांनी समृद्ध भिलार ! मग उर्वरीत गावं का भिकार ?



उरूस, सा.विवेक, 2 जुलै  2017

महाबळेश्वर जवळचे भिलार गाव महाराष्ट्र शासनाने पुस्तकांनी समृद्ध केले. एक अतिशय अभिनव कल्पना शासनाने वास्तवात उतरवली. याच गावात वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम करण्याचेही नियोजन आता करण्यात आले आहे. मराठी ललित पुस्तकांवर प्रेम करणार्‍या तमाम रसिकांना या घटनेमुळे मनोमन आनंदच झाला असणार. थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरला जाणारे लोक आता वाट चुकवून भिलारच्या रस्त्याला लागतील आणि पुस्तकांचा आस्वाद घेत काही काळ तिथे रेंगाळतील अशी अपेक्षा. 

आपण एक गाव पुस्तकांनी समृद्ध केले पण महाराष्ट्रातील इतर हजारो छोट्या गावांचे काय? गाव तेथे ग्रंथालय अशी घोषणा करून 50 वर्षे उलटून गेली. शासनाने यासाठी आर्थिक मदतही घोषित केली. सध्या जी दहा हजार सार्वजनिक ग्रंथालयं कागदोपत्री का असेनाच चालू आहेत त्यांना कमी-जास्त अनुदान मिळतही आहे. पन्नास साठ वर्षांत महाराष्ट्रातील पन्नास हजार गावांपैकी केवळ दहा हजार गावांपर्यंतच आपण पुस्तकं पोचू शकलो असे का? 

प्रत्येक वेळी शासनाने काय करावे हे आपण मोठ्या शहाणपणाने सांगतो. खरं तर रस्ते-वीज-पाणी-रेल्वे-सुरक्षा आदी महत्त्वाचे विषय शासनावर सोडून द्यावेत.  पण इतर विषयांतही शासनाचीच जबाबदारी आहे हे आपण किती दिवस म्हणत बसणार आहोत?

विशेषत: साहित्य संस्कृतिविषयक कितीतरी बाबी शासनाच्या खांद्यावरून काढून लोकांनी आपल्या खांद्यावर घेतल्या पाहिजेत आणि व्यवस्थितपणे निभावल्या पाहिजेत. हे आता ठामपणे सांगायची वेळ आली आहे.
भिलारच्या निमित्ताने आता या पैलू कडे सगळ्या या क्षेत्रातल्या सुजाण लोकांनी लक्ष दिले पाहिजे. 

नुसती टिका न करत बसता नेमकं काय केलं पाहिजे हे सांगणं महत्त्वाचे आहे. टिका करणं सगळ्यात सोपं आहे.

ग्रामपंचायत पातळीवर आपण या विषयाचा विचार करू. महाराष्ट्रातील 50 हजार पैकी दहा हजार गावांमध्ये ग्रंथालयं आहेत. जवळपास गावांमध्ये रोजची वर्तमानपत्रं पोचतात. बहुतेक गावांमध्ये फक्त मराठीच वर्तमानपत्रं पोचतं. इंग्रजी पोचत नाही. एक मराठी आणि एक इंग्रजी वर्तमानपत्रं, तसेच शासन मुलांसाठी प्रसिद्ध करतं ते ‘किशोर’ सारखं केवळ 7 रूपये किंमत असलेलं मासिक, इतर काही साप्ताहिके, पाक्षिके, मासिके अशी जवळपास 800 रूपये किंमतीची वाचन सामग्री दर महिन्यात त्या ग्रामपंचायतीला पोचतील अशी व्यवस्था केली गेली पाहिजे. वर्षभराची ही रक्कम दहा हजाराच्या जवळपास जाते. आज ज्या गावांमध्ये ग्रंथालये आहेत ती आणि अजून चाळीस हजार गावे अशा सर्व 50 हजार गावांसाठी वर्षभरासाठी केवळ 50 कोटी इतक्या रकमेची गरज आहे.

ही जबाबदारी घ्यायची कुणी? पैसा कसा उभा करायचा? विविध कंपन्या आपल्या जाहिराती अभिनव मार्गांनी करतच असतात. त्यासाठी त्यांना प्रचंड खर्च येतो. त्या मानाने ही रक्कम अगदीच किरकोळ आहे. अशा कंपन्यांना हाताशी धरून, वर्तमान पत्रं वाटप करणार्‍या यंत्रणेचा उपयोग करून, या गावांपर्यंत ही सामग्री सध्या आहे त्याच यंत्रणेद्वारे पोचू शकते. पंचायतीच्या पारावर, एखाद्या मंदिराच्या ओट्यावर, ओसरीत असा हा खुल्यातील वाचन कक्ष चालवता येईल. ही सगळी वर्तमानपत्रे, मासिके, पाक्षिके नंतर जवळच्या शाळेत जमा करण्यात यावीत. किंवा ग्रामपंचायतीनं ती सांभाळावी.

नांदेड जिल्ह्यात कंधार तालूक्यातील काही गावांनी एक अभिनव प्रयोग चालवला आहे. मंदिराच्या माईकवर रोज सकाळी एक जण वृत्तपत्रातील महत्त्वाच्या बातम्या, लेख यांचे वाचन करतो. सगळ्या गावाला ते ऐकू जाते. मी जेंव्हा त्यांना विचारले की भोंग्यावर कश्यामुळे? तर त्यांनी उत्तर सांगितले की सकाळी लोक शेतावर कामाला निघाले असतात. गडबड असते. तेंव्हा त्यांच्या कानावर हे पडलं तर त्यांना ते सोयीचं जातं. 

आता हे जर ग्रामिण भागातील लोकांना सुचलं असेल तर त्याला आपण सगळ्यांनी मिळून थोडासा रेटा दिला तर ही चळवळ महाराष्ट्रात चांगली पसरू शकते. मी आग्रहाने वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके यांचेच नाव सुरवातीला का घेत आहे? तर त्याचे कारण म्हणजे यांची वितरणाची यंत्रणा अस्तित्वात आहे. आणि आजही महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात सुदूरपर्यंत लिखित स्वरूपात काय पोचत असेल तर केवळ पेपर पोचतो. (बाकी टिव्ही, रेडिओ हा विषय आपल्या कक्षेत येत नाही.)

तेंव्हा आपण याचा गांभिर्याने विचार केला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा गावांपर्यंत वर्तमानपत्रे (एक मराठी व किमान एक इंग्रजी), मासिके, नियतकालिके, पाक्षिके पोचवणे. तेथे लोकांना वाचणे, त्यावर चर्चा करणे, आपली मते लेखी स्वरूपात या नियतकालिकांना कळविण्याची सवय लावणे, आवडलेल्या लेखकाचा मो. क्र. दिलेला असेल तर त्याला आवर्जून कळवणे, शक्य असेल त्या लेखकाला गावात आमंत्रित करणे.  हे सगळं करावं अग्रक्रमाने करावे लागेल. 

या पुढची पायरी म्हणजे मग यातील ज्या गावांचा प्रतिसाद योग्य असेल, सकारात्मक असेल, जी गावं आपणहून यात काही गुणात्मक वाढ करून दाखवतील त्या गावांकडे विशेष लक्ष पुरवून त्या ठिकाणी ग्रंथालय उभारणे, असलेलं ग्रंथालय समृद्ध करणे, त्याच्या वतीने विविध उपक्रम कसे साजरे होतील याकडे लक्ष पुरवणे हे सगळं करावं लागेल. 

यातील काहीही करण्यासाठी शासनाची काहीही मदत घेण्याची गरज नाही. शासन त्याच्या त्याच्या परीने जे काही करत आहे त्याची समिक्षा आपण स्वतंत्रपणे करू. त्यावर टिका किंवा त्याची भलामण स्वतंत्रपणे करू. पण शासनावर आपली जबाबदारी ढकलून आपण काहीही न करता मख्ख सारखं बसून राहणं हे सगळ्यात घातक आहे. 

जवळपास सर्वच गावात बर्‍यापैकी मंदिर असते. त्या मंदिराचे बांधकाम आजकाल नव्याने केलेले आढळते. त्या ठिकाणी एखादे कपाट या सगळ्यासाठी ठेवता येईल. शिवाय या मंदिराच्यावतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. त्यात भंडारा किमान एकदा दोनदा होतोच. यावर प्रचंड मोठा खर्च होतो. तेंव्हा यातून वाचनासाठी वर्षभराचे दहा हजार बाजूला काढणे मूळीच कठिण नाही. जर एखादे वाचनालय गावात असेल तर त्यांचीही मदत या कामासाठी घेता येईल. त्यांच्याकडे काही वर्तमानपत्रे येतच असतात. 

तेंव्हा आहे त्या स्थितीत एक रूपयाही शासनाकडे भीक न मागता आपली गावं आपण वाचनाच्या प्राथमिक पातळीपर्यंत सहज नेवू शकतो.