Saturday, May 18, 2013

कन्नड साहित्यिक - विरोध झुंडशाहीचा! मराठी साहित्यिक - स्वीकार थंडशाहीचा!!


दै, कृषीवलच्या ‘उरूस’ सदरातील माझा लेख दि. १८ मे २०१३


  • नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकांत कन्नड साहित्यिकांनी झुंडशाहीच्या विरोधात रोखठोक आणि स्पष्ट अशी भूमिका घेतली. राजकीय भूमिका घेताना कुठलीही संदिग्धता कन्नड साहित्यिकांच्या मनात नव्हती, प्रसंगी झुंडशाहीचा आधार घेणार्‍या राजकारण्यांना चार कडवे बोल सुनावण्यात ते मागे हटले नाहीत. या पार्श्वभूमीवर मोठी चर्चा मराठी साहित्यिकांच्या संदर्भात माध्यमांमधून चालू आहे. कवियित्री प्रज्ञा पवार यांनी झुंडशाहीच्या विरोधात मराठी साहित्यिक स्पष्ट भूमिका घेत नाहीत, असा आरोपच केला आहे. आता खरे तर प्रज्ञा पवार यांना याचे प्रत्यंतर जानेवारी महिन्यात संपन्न झालेल्या चिपळूणच्या साहित्य संमेलनातच आले होते. कार्यक्रम पत्रिकेवर एकाही साहित्यिकाचे नाव नाही. संपत्तीचे उघड विकृत प्रदर्शन करणारे, भ्रष्टाचार करणारे मंत्री दिमाखात वावरत होते. कवी संमेलनाचे अध्यक्षपद नाकारून प्रज्ञा पवार यांनी आपला बाणेदारपणा दाखवला; पण इतर एकसुद्धा साहित्यिक राजकीय नेत्यांच्या विरोधात काहीएक स्पष्ट भूमिका घेऊन संमेलनाकडे फिरकला नाही, असे घडले नाही. स्वत:ला फुले, शाहू, आंबेडकरांचा वारस मानणारे नागनाथ कोत्तापल्ले मोठ्या उत्साहात स्वत:ला अध्यक्ष म्हणून मिरवून घेत राहिले. मावळते अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनीही कुठलीच जाहीर भूमिका घेतली नाही. सांगलीच्या साहित्य संमेलनात राष्ट्रपतींच्या उपस्थितीचा गाजावाजा करत साहित्यिकांना बोलायची संधी नाकारल्या गेली. याबाबत जाहीर भूमिका घेत अरुण साधू यांनी संमेलनास न जाणे पसंत केले. परिणामी, मावळत्या अध्यक्षांकडून उगवत्या अध्यक्षांकडे द्यावयाची सूत्रे कशी द्यायची हा प्रश्न निर्माण झाला. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कौतिकराव ठाले पाटलांनी स्वत:च्या हस्ते सूत्रे देऊन हौस भागवून घेतली. अरुण साधूंनी घेतलेली ही भूमिका त्यांच्याच विदर्भाचे पुरोगामी चळवळीत असलेले वसंत आबाजी डहाके यांना मात्र घेता आली नाही. मग प्रज्ञा पवार तुम्हीच सांगा इथे स्वत:ला मिरवण्याच्या जागा आहेत. मंच आहेत- ते या मोठमोठ्या लोकांना नाकारता येत नाहीत, तर झुंडशाहीच्या विरोधात बोलण्याची काय गोष्ट करता?
  • आम्हा मराठी साहित्यिकांचं खरं आणि मूलभूत धोरण हे थंडशाहीचं आहे. म्हणजे काय होतं, कुठून कुठून सन्मान चालून आले, गौरव चालून आले की, आम्हाला अगदी राहावत नाही. नाही कसं म्हणणार? असं म्हणत म्हणत आम्ही भल्या भल्या नेत्यांच्या सोबत सुहास्य वदनाने त्यांच्या हातून मोठमोठे पुरस्कार स्वीकारतो. प्रसंगी त्याच नेत्यांना सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल जाहीर पाठिंबाही देतो, कारण एकच आणि ते म्हणजे आमचे अधिकृत धोरण ‘थंड’शाही.
  • प्रज्ञा पवार तुम्ही आम्हाला हे बंडशाहीचे धडे कशाला शिकवत आहात? ते काही आम्हाला पचणारे नाहीत! खरे तर पुराणातल्या गोष्टी पुराणातच ठेवल्या पाहिजेत त्याप्रमाणे नंतर निर्माण झालेलं संत साहित्य आणि त्यातल्या गोष्टीही अशाच पुस्तकातच ठेऊन दिल्या पाहिजेत, हे आमचं ठाम मत आहे. आता हेच बघा ना, संत तुकाराम यांच्या रचना आम्ही अभ्यासतो, वाचतो, प्रसंगी भाषणं करताना सटा सट तुकारामांची वचने श्रोत्यांच्या तोंडावरती फेकतो, त्यांना चकीत करतो; पण तुम्ही जर आम्हाला तुकाराम महाराजांसारखी कृती करायला सांगाल, तर ते मोठं अवघड आहे. आता हेच बघा ना, असं म्हणतात की, शिवाजी महाराज संत तुकारामांच्या गावी गेले आणि त्यांना गौरविण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिला :

तुम्हापाशी आम्ही । येऊनिया काय ।
वृथा आहे सीण । चालण्याचा ॥
मागावे हे अन्न । तरी भिक्षा थोर ।
वस्त्रासी हे थार । चिंध्या बिंदी ॥
निद्रेसी आसन । उत्तम पाषाण ।
वरी आवरण । आकाशाचे ॥
येथे काय करणे । कवनाची आस ।
वाया होय नाश । आयुष्याचा ॥
राजगृहा यावे । मानाचिया आसे ।
तेथे काय वसे । समाधान ॥
रायाचीये घरी । भाग्यवंता मान ।
इतरा सामान्य । मान नाही ॥
देखोनिया वस्त्रे । भूषणाचे जन ।
तात्काळ मरण । येते मज ॥
ऐकोनिया मानाल । उदासता जरी ।
तरी आम्हा हरी । उपेक्षीना ॥
आता हेची तुम्हा । सांगणे कौतूक ।
भिक्षे ऐसे सुख । नाही नाही ॥
तप व्रत याग । महा भले जन ।
आशा बद्ध हीन । वर्तताती ॥
तुका म्हणे तुम्ही । श्रीमंत मनाचे ।
पूर्वीच दैवाचे । हरिभक्त ॥
(सार्थ तुकाराम गाथा, ढवळे प्रकाशन, पृष्ठ 961, क्षेपक अभंग क्र. 82)


  • आता हा अभंग आम्हा साहित्यिकांना किती गैरसोयीचा? बरं आमचा बाणा ‘थंड’शाहीचा! त्यामुळे आम्ही थंड डोक्याने भरपूर (?) अभ्यास केला. भरपूर विद्वानांनी भरपूर डोके लावले आणि सगळ्यांनी मिळून ठरवले हा अभंग प्रक्षिप्त आहे. तेव्हा आम्ही थंडशाहीवादी साहित्यिक सर्वसामान्य वाचकांना हेच सांगू इच्छितो, असले प्रक्षिप्त अभंग आम्ही मानत नाही, परिणामी त्याप्रमाणे आचरण करण्याची आमची जबाबदारी नाही. पारंपारिक गाथांमध्ये हे अभंग क्षेपक अभंग म्हणूनच आम्ही अजूनही ठेवले आहेत. तुमचे नशीब थोर की हे अभंग गाळूनच टाका असे आम्ही म्हटलेले नाही.
  • तेव्हा प्रज्ञा पवार तुम्ही आम्हाला झुंडशाही विरोधात भूमिका घ्यायचा आग्रह करू नका. अहो काय होतं, झुंडशाहीच्या विरोधात भूमिका घेतली की, फार मोठी पंचाईत होऊन बसते. त्या कन्नड साहित्यिकांना काय लागतं? ते आपले झुंडशाहीच्या विरोधात भूमिका घेतात आणि प्रामाणिकपणे साहित्य निर्मिती करत बसतात! मग त्यांच्याकडून मोठमोेठं लिखाण होतं आणि त्यांना ज्ञानपीठ-बिनपीठसारख्या पुरस्कारांच्या लॉटर्‍या लागतात. भैरप्पासारखे कादंबरीकार त्यांच्याकडचे - त्यांच्याकडे तर वाचले जातातच; पण इकडे मराठीत येऊनही त्यांना मोठा वाचकवर्ग मिळत जातो. आता तुम्हीच सांगा, याचा काय बरे उपयोग? साहित्य सेवा म्हणजे कशी तर गल्लीतल्या नगरसेवकापासून ते मुंबईतल्या मंत्र्यांपर्यंत किंवा दिल्लीतल्या केंद्रीय मंत्र्यापर्यंत कोणत्या तरी मोठ्या आमदार मंत्रीपदाची झुल पांघरलेल्या गुंड, भ्रष्टाचारी माणसाला पकडायचे, त्याच्याकडून ‘भव्य’ प्रमाणात संमेलनाचे आयोजन करायचे, सर्व साहित्यिकांची उत्तम ‘बडदास्त’ ठेवायची. प्रत्यक्ष भाषणे किंवा कविता कशाही होवोत, स्मृतिचिन्ह मात्र जोरदार द्यायचं! संमेलन घडवून आणणार्‍या साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांची सगळ्यांत चांगली ‘सोय’ ठेवायची हीच खरी साहित्य सेवा! यातले काही त्या कन्नड साहित्यिकांना जमते का? त्यांच्याकडे मोठमोठी साहित्य संमेलने भरतात का? शासनाच्या पैशाने फुकटात विश्‍व संमेलनाला गेल्याशिवाय आणि तिथे ‘मसाज’ करून घेतल्याशिवाय मराठी भाषेला आणि साहित्य संस्कृतीला ‘साज’ चढणार कसा? 
  • आता हे सगळं त्या कन्नड लेखकांना कोण सांगणार? ते बसले आपले बोंबलत झुंडशाहीच्या नावाने! अरे, इकडे बघा जरा, वेगवेगळ्या बँकांमधले घोटाळे, सिंचनाचे घोटाळे, बांधकाम विभागातले घोटाळे याच्या तोडीस तोड आम्हीही आता साहित्य महामंडळात ‘सह्या’जी रावांचे अनोखे प्रयोग सुरू केलेले आहेत. साहित्य संमेलनातल्या बिलांचे आकडे इतरांच्या तुलनेत भले छोटे असोत; पण आमची वृत्ती मात्र मोठमोठे घोटाळे करणार्‍यांपेक्षा थोडीसुद्धा कमी नाही. हे सगळं केल्याशिवाय मराठी साहित्याची सेवा करणार कशी? र्‍हस्व आणि दीर्घचे नियम जराही माहीत नसलेल्या माणसाला मराठी भाषा सल्लागार समितीवर नेमल्याशिवाय मराठी भाषा आणि संस्कृतीला ‘गार’ कसे करता येईल? तेव्हा कन्नड साहित्यिकांनो हे असले झुंडशाहीचे विरोधात बोंब मारून त्रास करून घेणे आम्हाला कदापीही मंजूर नाही.
  • साहित्य संमेलन, साहित्य महामंडळ, साहित्य परिषदा यांना मिळणारा शासकीय व इतर निधी यांचा मलिदा खाऊन सर्व साहित्य सांस्कृतिक संस्था आम्ही ‘गार’ केलेल्या आहेत. त्यामुळे स्वाभाविकच आमचे अधिकृत धोरण हे ‘थंड’शाहीचे आहे. हे तुम्हाला कळत कसे नाही? तुम्हाला जे काही साहित्य-संस्कृतीच्या नावानं बोंबलायचे आहे ते खुशाल वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे यांतून बोंबला, करोडो रुपयांचे घोटाळे करून हसर्‍या चेहर्‍याने, शांतपणे सत्ता भोगणार्‍यांचे ‘आदर्श’ आमच्या समोर आहेत. नव्हे, त्याच ‘आदर्श’मध्ये आम्हालाही कुठे जागा भेटावी म्हणून तरसत आहोत. तेव्हा हे कन्नड साहित्यिकांनो झुंडशाहीच्या विरोधात बोंबलून तुम्ही गरीबच राहा! पुरस्कार आणि वाचकांचे प्रेम मिळवत राहा, चांगली साहित्यनिर्मिती करत राहा, आम्ही मात्र चौथ्या विश्‍व संमेलनासाठी फुकटाचे तिकीट मिळावे म्हणून सज्ज आहोत. 

--
श्रीकांत उमरीकर

Tuesday, May 7, 2013

साहित्य संस्था... की संस्थाने?

दै. महाराष्ट्र टाइम्स दि. ७ मे २०१३ मधील संपादकीय पानावरील माझं लेख



सध्या पुण्याच्या वातावरणात हलचल आहे. अजितदादा यांचे ते अतिशय सु प्रसिद्ध विधान मग आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्सचे गेल भांडला गेल भांडला हे गाणे. हे सगळे पाहून मराठी साहित्य महामंडळावर निवड होण्यासाठी तेव्हा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह असलेले मिलिंद जोशी यांना आपणही काहीतरी योगदान द्यावे असे मनापासून वाटले असावे असे गेल्या काही आठवड्यातल्या घडामोडींकडं पाहून म्हणावेसे वाटते! 

महामंडळाचे अध्यक्षपद प्राप्त करण्यासाठी जोशींनी जोरदार तयारी केली होती. गोव्याच्या रम्य वातावरणात महामंडळाची बैठक पार पडली. त्यात त्यांनी साहित्य परिषदेचे नामधारी अध्यक्ष शेजवलकर यांचे त्यांना पठिंबा देणारे पत्रच सादर केले. पण एवढा बंदोबस्त करूनही माधवी वैद्यबाईंनी अशी काही मात्रा चालवली की महामंडळाच्या नेतेपदाच्या (अध्यक्ष) निवडणुकीतून जोशींनी सपशेल माघार घेतली. खरे तर प्रकरण तेथेच मिटलेपण ते पत्र... ते महामंडळाच्या बैठकीच्या इतिवृत्ताच्या नोंदीत राहिलेच! 

या पत्राचा कसून शोध घेतला गेला तेव्हा ते पत्र आपण लिहिलेच नसल्याचा खुलासा शेजवलकरांना करावा लागला. त्यामुळे खळबळ माजली. खरे तर शेजवलकरांची प्रकृती नामधारी अध्यक्षाची. त्यांना काम फक्त सह्या करण्याचे. पण त्या पत्रावरील शेजवलकरांची सही त्यांनी केलेली नसून जोशींनी केल्याचे उघड झाले. यातून जो गदारोळ झाला त्यामुळे जोशींचा राजीनामा तर घेतलाच गेला शिवाय हे सगळं प्रकरण पत्रकारांपुढंही उघड झालं. माध्यमांच्या दृष्टीने ही खळबळजनकच बातमी होती. हे प्रकरण सार्वत्रिक झाल्यानंतर हा सही रे सही फार्स टाळता नसता का आला इथपासून व्यक्तिगत दोषारोपांपर्यंत त्यावर चर्चा होणं स्वाभाविकच होतं. साहित्यिक वर्तुळात ती अद्यापही चालू आहे. हे काय चाललं आहे काय अखिल भारतीय साहित्य महामंडळ या नावाची ही नौटंकी आता पाहिजेच कशाला मुळात या महामंडळाची रचनाच सदोष आहे. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तेव्हा पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषद नावाची संस्था काम करत होती. मुंबईला साहित्य संघ कार्यरत होता. विदर्भात विदर्भ साहित्य संघ आणि मराठवाड्यात मराठवाडा साहित्य परिषद या संस्था होत्या. सोयीच्या राजकीय तडजोडीप्रमाणे या चार संस्थांचे मिळून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ स्थापन करण्यात आले.कुणालाही प्रश्न पडेल की या चार संस्था ज्या विभागांचे प्रतिनिधित्व करतात ते विभाग समान आहेत का ?त्यांची लोकसंख्या किती किती साहित्यिक या संस्थांचे सभासद आहेत पण हे प्रश्न तेव्हा कुणाला पडले नव्हते. महामंडळाची सध्याची रचना खालील प्रमाणे आहे- (अ. भा. संमेलनासाठी) 

संस्था- मराठी साहित्य संघ (मुंबई) कार्यक्षेत्र- बृहन्मुंबई आजीव सभासद- २००० मतदारसंख्या- १७५. संस्था- महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) कार्यक्षेत्र- १४ जिल्हे , ( कोकण प. महाराष्ट्र खान्देश) आजीव सभासद- ९०००मतदारसंख्या- १७५. संस्था- मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद) कार्यक्षेत्र- आठ जिल्हे , ( मराठवाडा विभाग) आजीव सभासद- २४०० मतदारसंख्या- १७५. संस्था- विदर्भ साहित्य संघ , ( नागपूर) कार्यक्षेत्र- ११ जिल्हे , ( विदर्भ विभाग) आजीव सभासद- ६००० मतदारसंख्या- १७५. 

या रचनेकडे पाहिल्यास लक्षात येते की ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर ,सातारा पुणे अहमदनगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार अशा १४ जिल्ह्यांना सामावणाऱ्या पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र खूप मोठे असून त्यांना इतरांप्रमाणेच १७५ मतांचा अधिकार आहे. म्हणजेच बहुतांश आजीव सभासदांना मतदार होण्याची संधी आयुष्यात जवळपास एकदाही मिळत नाही.माझी सूचना आहे की विदर्भ साहित्य संघ व मराठवाडा साहित्य परिषद यांच्यात कुठलाही बदल करण्याची गरज नाही. कोकण विभागातील चार जिल्हे मुंबई साहित्य संघाला जोडून त्यांची एक घटक संस्था करण्यात यावी. पुणे महसूल विभागातील पुणे सोलापूर सांगली सातारा व कोल्हापूर यांची सध्या आहे ती महाराष्ट्र साहित्य परिषद ठेवावी. नाशिक महसूल विभागातील नगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार यांची मिळून उत्तर महाराष्ट्र साहित्य परिषद बनविण्यात यावी. म्हणजे पुणे व मुंबई यांच्यात मिळून तीन घटक संस्था तयार होतील.दुसराही एक विचार असा आहे की जर आपण सरकारचे पैसे स्वीकारतो तर सरकारच्या सहा महसुली विभागांप्रमाणेच सहा घटक संस्था तयार कराव्यात. म्हणजे फक्त अजून एक अमरावती महसूल विभाग म्हणजेच विदर्भ साहित्य संघाचे विभाजन करून वऱ्हाड साहित्य परिषद तयार करावी लागेल. 

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रांप्रमाणेही साहित्य महामंडळाची विभागणी करता येईल किंवा जिल्ह्याच्या पातळीवर काम करणाऱ्या साहित्य संस्थांचा महासंघ करता येईल. विभागीय केंद्रे हवीतच कशाला विभागवार साहित्याचे प्रश्न वेगळे असतात की काय या घटक संस्थांचे आजीव सभासद नेमके कोण आहेत आम्हाला का हे सभासदत्व घेता येत नाही अशी नेहमी ओरड होते. तेव्हा या सर्व घटक संस्थांनी पारदर्शीपणे याबाबत वर्तमानपत्रे प्रसिद्धी माध्यमे यांच्या सहाय्याने खुली मोहीम राबवावी व इच्छुक साहित्यप्रेमींना सशुल्क आजीव सभासदत्व घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. (हे होणार नाही हे मला माहीत आहे. आमच्या मराठवाडा साहित्य परिषदेने मुदत उलटून एक वर्षे झाले तरी निवडणूक घेतलीच नाही. गेले एक वर्ष घटनादुरुस्तीच्या नावाखाली पावतीपुस्तकेही कपाटात बंद करून ठेवली आहेत. मागच्या तारखांमध्ये सोयीच्या माणसांना अजूनही सभासदत्व बहाल केले जात असेल तर त्याचा शोधही घेता येत नाही.)साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदार हा फार कळीचा मुद्दा आहे. कोणाला मतदार करावे व कोणाला करू नये हा पूर्णपणे घटक संस्थांच्या कार्यकारिणीचा अधिकार आहे. त्यावरच अधिकतर आक्षेप घेतला जातो. तेव्हा जे अजीव सभासद आहेत त्या सर्वांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा. 

आधुनिक काळात २५ हजार मतदार म्हणजे काही फार नाहीत. तेव्हा सगळ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी खळखळ करण्यात काही अर्थ नाही. जर काही आक्षेप असेलच तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीसारखे त्या-त्या घटक संस्थांच्या मतांचे मूल्य ठरविण्यात यावे. कितीही आव आणला तरी साहित्य महामंडळात प्रत्यक्षात लोकशाहीचा पूर्णपणे अभाव आहे. ज्या घटक संस्था त्या-त्या प्रदेशाचे प्रतिनिधित्व करीत होत्या त्या आज पूर्णपणे संदर्भहीन झाल्या आहेत. त्यांच्यात अमूलाग्र बदल करण्याची नितांत आवश्यकता आहे. जर लोकसभा/विधानसभा मतदारसंघांची रचना बदलून निवडणुका घेता येतात तर त्यामानाने हे बदल किरकोळ आहेत. मराठी प्रकाशक परिषद राज्य ग्रंथालय संघ यांना सहभागी करून घेऊन जिल्हा पातळीवर साहित्यिक संस्था बळकट करता येतील. त्यातून पुढे साहित्य महामंडळ तयार होऊ शकेल. हे करण्यासाठी महामंडळाचे पदाधिकारी जोपर्यंत तयार होणार नाहीत तोपर्यंत सही प्रताप होतच राहणार.

Saturday, May 4, 2013

हनी सिंग-बलात्कारी मानसिकतेचा गायक । ‘सखिमंच’वाला ‘लोकमत’ त्याचा प्रयोजक ॥

दै, कृषीवलच्या ‘उरूस’ सदरातील माझा लेख 4 मे 2013

हनी सिंग हा पंजाबी पॉप गायक सध्या फार गाजतो आहे. तरूण-तरूणींमध्ये त्याची लोकप्रियता फार जास्त आहे. गाण्याच्या बाबत नेहमी असं होतं की त्याच्या ठेक्याकडे, सुरांकडे सगळ्यांचे लक्ष जाते पण त्यामानाने शब्दांकडे लक्ष जात नाही. हनी सिंग याच्या गाण्यातून स्त्रीचे दुय्यम स्थान स्पष्टपणे दिसत असते. ब्रेक अप पार्टी सारख्या गाण्यात ही प्रेयसी दुसर्‍यासोबत संसार करते. पोरं वाढवते. नवर्‍याला खाउ पिउ घालते. काही कामधंदा नसल्यामुळे सास-बहूच्या सिरीअल्स टीव्हीवर पहात बसते. त्यावर हनी सिंगचे गाणे लागले की पोरांना सांगते, ‘‘तेंव्हाच याचे ऐकले असते तर हाच तूमचा बाप असला असता’’. वगैरे वगैरे....
निदान अशा गाण्यात स्त्रीला दिलेलं दुय्यम स्थान अस्पष्ट तरी आहे. नविन काही गाण्यांमध्ये तर फारच विकृत पद्धतीनं स्त्रीचं वर्णन केल्या गेलेलं आहे. गाणी अश्लिल आहेत हा तर आक्षेप आहेच. पण आजकाल अश्लिलतेवर फार टिका करण्यातही अर्थ उरलेला नाही कारण इंटरनेटवर सगळंच खुलं झालेलं आहे. अश्लिल चित्रफिती सर्रास उपलब्ध आहेत. लहान मुलंही हे सगळं पहात असतात. त्या पार्श्वभूमीवर हनी सिंगच्या अश्लिल गाण्यावर काय आक्षेप घेणार. आक्षेप आहे तो त्यात स्त्रीवर अत्याचार करण्याची जी मानसिकता वर्णन केली आहे त्यावर आहे.
सोळा सतरा वर्षाच्या मुलीला हा म्हणतो की तूझे आत्तापर्यंत हजारो जणांशी शरिरि संबंध आले असतील. आता थोडा जरी गणिती हिशोब लावला तर हजार जण म्हणजे हजार दिवस. म्हणजे ही मुलगी वयाच्या 13व्या वर्षांपासून शरिर संबंध ठेवते आहे असं हनी सिंगला म्हणायचे आहे की काय? बरं या ‘हजारो’शी यमक जुळवायला पुढचे शब्द आहेत ‘महंगी महेंगी कमरोंमे, बडी कारोंमे, बॉलिवुडके बडे बडे सितारोंने’.
यातला आक्षेपार्ह भाग लक्षात घ्या. दिल्ली आणि भारतभरच्या महिलांवरील अत्याचारासंदर्भात असं निदर्शनास आले आहे की हे अत्याचार अलिशान गाड्यांमध्ये झाले आहेत. परिणामी या गाड्यांच्या काचा पारदर्शकच असाव्यात, त्यांना आतील काही दिसू नसे अशा गडद फिल्म लावू नयेत असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आणि हनी सिंग मोठ्या गाड्यांमधील शरिर संबंधांचे वर्णन मिटक्या मारत करतो आहे. महेंगी महेंगी कमरोंमे म्हणजे पंचतारांकित हॉटेलांमध्ये. यावरही परत आक्षेप आहे. विजय मल्या सारख्या उद्योगपतींनी आपल्या मोठ्या कंपन्या बुडवल्या व पैसे अय्याशी सारखे नग्न पोरींच्या कॅलेंडरवर, आयपीएल मध्ये नाचणार्‍या चिअर गर्ल्सवर आणि पंचतारांकित हॉटेलांवर उडवले असा आरोपच वित्तीय संस्थांनी लावला आहे. बॉलिवुडके बडे बडे सितारोंमे यावर काय बोलणार? बॉलिवुडचं चारित्र्य शेंबड्या पोरांनाही माहित असतं. हनी सिंग या सगळ्याचं समर्थन आपल्या गाण्यातून करतो आहे.
शरिर संबंध झाल्यानंतर ‘तूझको जूतोंसे मारू’ अशी भावना या गाण्यांमधून येते आहे. परत दिल्लीच्या अत्याचारांचा संदर्भ इथे आहे. ज्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले त्यांच्यावर नुस्ता बलात्कारच झाला असे नाही तर त्यांच्यावर शारिरीक अत्याचार केले गेले. या सगळ्या विकृतींचे चविष्ट वर्णन हनी सिंगच्या गाण्यातून येते याला काय म्हणायचं?
माणसाच्या संस्कृतिचा विकास मारून खाण्यापासून (शिकार) पेरून खाण्यापर्यंत (शेती) झाला. या संस्कृतीचा कळस म्हणजे माणसाला कला अवगत झाली. म्हणजे आहार निद्रा भय मैथून या भावनांवर नियंत्रण मिळवून माणूस जनावराचा ‘माणूस’ झाला आणि त्याचा सर्वोच्च पुरावा म्हणजे कला. आणि याच कलेचा आधार घेवून परत हनी सिंग सारखा गायक हजारो वर्षे मागे जावून माणसाला परत पशुच्या पातळीवर नेउन त्याचं समर्थन करतो आहे.
याच हनी सिंग याच्या गाण्याचा कार्यक्रम मोठा गाजावाजा करून ‘लोकमत’ वृत्तपत्रसमुहाने औरंगाबादच्या गरवारे स्टेडियम वर ठेवला होता. हा तर मोठाच विरोधाभास झाला. इकडे महिलांसाठी ‘सखीमंच’ सारखे उपक्रम चालवायचे आणि दुसरीकडे बलात्कारी मानसिकतेच्या हनी सिंगचे कार्यक्रम ठेवायचे. याला काय म्हणावं? या वृत्तपत्र समुहाचे प्रमुख विजय दर्डा हे कॉंग्रेसचे खासदार आहेत. त्यांचे बंधु राजेंद्र दर्डा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जबाबदार मंत्री आहेत. विजय दर्डा यांच्या पत्नी ज्योत्स्ना दर्डा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांनी ‘सखीमंच’ च्या माध्यमातून स्त्रीयांसाठी केलेल्या कामाचा उल्लेख बर्‍याच मान्यवरांनी आणि ‘लोकमत’च्या लाभार्थी विद्वानांनी केला. पण या कुणालाही असा प्रश्न पडला नाही की नुकतंच बलात्कारी मानसिकतेच्या हनी सिंगचा कार्यक्रम याच लोकमत समुहाने आयोजित केला होता. त्याची मोठी जाहिरात महिनोंन महिने शहरात झळकत होती.
हा विषय फक्त हनी सिंगपाशीच थांबत नाही. आता तर इंटरनेटवर हनी सिंगपासून प्रेरणा घेवून अशा गाण्यांची लाटच आली आहे. अगदी उघडपणे ‘मै हू बलात्कारी’ सारखी गाणी येत आहेत.
स्त्रीभृ्रणहत्या आणि त्यानंतरचे महिलांवरील भयानक अत्याचार यांनी वातावरण दुषित झालेलं असताना संगीताच्या माध्यमातून या सगळ्या विकृतीला चालना देण्याचं काम अशी गाणी करत आहेत. आणि बरेच तरूण या गाण्यांना प्रतिसाद देत आहेत. यातील सगळ्यात भयानक बाब म्हणजे मुलांसोबतच मुलीही मोठ्या प्रमाणात हनी सिंग यांच्या चाहत्या आहेत. औरंगाबादच्या कार्यक्रमात बर्‍यापैकी संख्येने तरूण मुली उपस्थित होत्या हे समजल्यावर माझ्यासारख्याला धक्काच पोंचला. एरव्ही महिला संघटना अशा घटनांसंदर्भात फार जागरूकता दाखवतात. मग त्यांनी हनी सिंगच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या मुलींबाबत काय धोरण स्विकारले? का जे शाब्दिक बलात्कार हनी सिंग आपल्या गाण्यातून करतो आहे त्याला त्यांची संमती आहे. काय समजायचं काय?
1 मे रोजी महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिन होता. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला 53 वर्षे पुर्ण झाली. या वर्षांत आम्ही पंजाबी हनी सिंगला बोलवून त्याच्या विकृत गाण्याचे कार्यक्रम महाराष्ट्रात करतो आहोत, त्याला ‘लोकमत’ सारखा सगळ्यात मोठा म्हणवून घेणारा वृत्तपत्र समुह प्रयोजकत्व देतो आहे ही कोणती मानसिकता आहे?
हनी सिंगच्या अश्लिल गाण्यातील शरिराची भाषा ही जागतिक भाषा असते तीला प्रदेशाचे बंधन नसते असले ‘उदात्त’ विचार लोकमतच्या धोरण ठरविणार्‍यांनी केले की काय?
5 मे 1911 रोजी महाराष्ट्रातील एक तरूण तेंव्हाच्या अखंड भारतातील पंजाबात जातो. लाहोर मध्ये ‘गांधर्व महाविद्यालया’ची स्थापना करतो. ‘हिंदूस्थानी संगीता’च्या शिक्षणाची गंगोत्री म्हणजे हे गांधर्व महाविद्यालय. त्या तरूणाचे नाव पं. विष्णू दिगंबर पलूस्कर. सगळ्या भारतभर फिरून संगीताचा अभ्यास करून दुसरा एक महाराष्ट्रीय तरूण ‘हिंदुस्थानी गायन पद्धती’ या प्रचंड ग्रंथाचे लेखन करतो. त्याचे नाव पं. विष्णू नारायण भातखंडे.
1 मेला संयुक्त महाराष्ट्राचा वर्धापन दिन साजरा होत असताना, मराठी वृत्तपत्र सृष्टीत नं.1 चे बिरूद मिरवणारा ‘लोकमत’ याच पंजाबमधील बलात्कारी मानसिकतेच्या गायकाचे कार्यक्रम आयोजित करतो आहे. ज्यांच्या सांगितीक पुण्याईवर उभं राहून हा हिडीसपणा करतो आहोत आणि प्रचंड प्रमाणात पैसा कमावतो आहोत त्या पलूस्कर भातखंडेचे नाव तरी हनी सिंगला माहित असेल का? हनी सिंग तर सोडा, तो तर पंजाबी आहे, स्वत:ला महाराष्ट्रीय म्हणवून घेणार्‍या ‘दर्डा’ बंधूंना तरी असं वाटलं का गांधर्व महाविद्यालयाच्या 112 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आपण काही कार्यक्रम साजरा करावा?
शंभर वर्षांपूर्वी मराठी माणूस पंजाबात जावून संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. आणि 100 वर्षांनंतर पंजाबी माणूस भरपूर मानधन घेवून महाराष्ट्रात येवून याच संगीताच्या आडून बलात्कारी मानसिकता महाराष्ट्राला दाखवतो.
दिलीपकुमारच्या चित्रपटातील गाणे आहे, महम्मद रफीने गायलेले
रामचंद्र कह गये सिया से ।ऐसा कलयुग आयेगा।
हंस चुनेगा दाना दुनका । कौव्वा मोती खायेगा॥
सगळ्या जागरूक नागरिकांनी, संघटनांनी हनी सिंग यांच्या गाण्यावर बहिष्कार टाकावा, तसेच त्यांना प्रयोजकत्व देणार्‍या ‘लोकमत’लाही लोकांचे मत नेमके कशाच्यामागे आहे हे दाखवून आपली कलाविषयक जाण प्रगल्भ असल्याचा पुरावा द्यावा.

श्रीकांत उमरीकर, मो. 9422878575.