Sunday, July 13, 2014

घुमान संमेलनाचे ‘तीर्थावळी’ अभंग


महाराष्ट्र टाईम्स, रविवार १३ जुलै २०१४

संत नामदेवांचे चरित्र मोठे विलक्षण आहे. ज्ञानेश्वरांसोबत त्यांनी एक तीर्थयात्रा केली. पुढे ज्ञानेश्वर व भावंडांच्या समाधीनंतर त्यांना विरक्ती आली. तेंव्हा ते परत तीर्थयात्रेला गेले. सगुण उपासना करणार्‍या नामदेवांनी पंजाबातील घुमान येथे निर्गुण उपासना केली. त्यांच्या नावाने तिथे गुरूद्वारा आहे. त्यांच्या त्या काळातील 61 रचना शीखांच्या गुरूग्रंथसाहिब मध्ये समाविष्ट झाल्या. आपल्या तीर्थयात्रेच्या अनुभवावर नामदेवांनी केलेल्या रचना ‘तीर्थावळी’चे अभंग म्हणून ओळखल्या जातात.  याच घुमान येथे अ.भा.मराठी साहित्य संमेलन घेण्याची घोषणा साहित्य महामंडळाने केली आहे. नामदेवांच्या नावामागे लपणार्‍या महामंडळाचा हेतू शुद्ध नसल्याकारणाने यावर लगेच वाद सुरू झाला आहे. नामदेवाचे इतकेच महत्व महामंडळाला वाटत होते तर त्यांचे गाव असलेले नरसी नामदेव इथे किंवा जवळच्या हिंगोली ह्या जिल्ह्याच्या गावी संमेलन घेण्याचे ठरविले आसते. साहित्य महामंडळाचे हे ‘तीर्थावळी’ अभंग साहित्य क्षेत्रात मोठा रसभंग करीत आहेत. नामदेवांनी म्हटले होते

तीर्थे करोनी नामा पंढरीये आला । जिवलगा भेटला विठोबासी ॥
सद्गदित कंठ वोसंडला नयनी । घातली लोळणी चरणावरी ॥
शिणलो पंढरिराया पाहे कृपादृष्टी । थोर जालो हिंपुटी तुजविण ॥
अज्ञानाचा भाग होता माझे मनी । हिंडविले म्हणोनि देशोदेशी ॥
परि पंढरीचे सुख पाहतां कोटि वाटे । स्वप्नीही परि कोठे न देखेंची ॥
(श्री नामदेव गाथा, साहित्य संस्कृती मंडळ, अभंग क्र. 923)


नामदेवांना सगळी तीर्थयात्रा केल्यावर पंढरीच कशी चांगली आहे हे पटले. मराठी रसिक, प्रकाशक, लेखक यांना घुमानला जायच्या आधीच याची कल्पना आली आहे की हे संमेलन म्हणजे निव्वळ तीर्थयात्रा आहे. त्याचा साहित्याशी काही संबंध नाही. पुस्तक विक्रीशी काही संबंध नाही. नेहमीच्याच रटाळ वक्त्यांच्या भाषणांतून काहीच भेटणार नाही. तिथे जायचे तर तीर्थयात्रा म्हणून आपल्या पैशाने जावे लागेल. आणि तसे असेल तर संमेलनाचे निमित्त कशाला पाहिजे. आपण आपले केंव्हाही जावू. 

संमेलनाचे आयोजन महाराष्ट्राबाहेर जिथे मराठीसाठी काही चळवळ चालू आहे, मराठी माणसांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, मराठी संस्था कार्यरत आहेत तिथे व्हायला हवे. याचा काहीच विचार न करता कोणी एक उद्योगपती महामंडळाच्या दोन सदस्यांची विमानाने घुमान येथे जाण्याची सोय करतो. तिथल्या गुरूद्वार्‍यात फुकट जेवायची रहायची सोय होते. शासनाच्या पैशावर महामंडळाच्या सदस्यांना फुकट तीर्थयात्रा घडते हे पाहून महामंडळाने घुमान येथे संमेलन घेण्याचा निर्णय घेतला. मग यावर आक्षेप येणारच.
संमेलन घुमान येथे कशासाठी? महाराष्ट्रातील रायगड, जालना, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नंदूरबार, बुलढाणा या दहा जिल्ह्यांमध्ये आजतागायत एकही संमेलन झाले नाही. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई व परळी येथे संमेलने झाली पण बीड शहरात संमेलन झाले नाही. तसेच महाराष्ट्राबाहेर गुलबर्गा (कर्नाटक), तंजावर (तामिळनाडू), चेन्नई (तामिळनाडू), बंगळूरू (कर्नाटक), कलकत्ता (पश्चिम बंगाल), लखनौ (उत्तर प्रदेश) या ठिकाणची मराठी मंडळे सक्रिय आहेत. त्या ठिकाणी विविध कार्यक्रम सतत होत असतात. मग महामंडळाला त्याची दखल घेत इथे संमेलन घ्यावे असे का नाही वाटले? आत्तापर्यंत महाराष्ट्राबाहेर अठरा संमेलने झाली आहेत (एकूण 87 संमेलनांपैकी)  त्यामुळे महाराष्ट्राबाहेर संमेलन घ्यायचे याचे फार काही अप्रूप नाही. 

संमेलनाच्या आयोजनाबाबत महामंडळावर गेल्या 10 वर्षांत टिका वाढली आहे. त्याचे साधे कारण म्हणजे साहित्य विश्वात कुठलीही महत्त्वाची भूमिका महामंडळाने निभावली नाही. शिवाय ज्या लोकांना संमेलनासाठी आमंत्रित केले जाते त्यांची वाङ्मयीन कामगिरी संशयास्पद आहेत. जे सभासद घुमानची पाहणी करण्यासाठी विमानाने गेले होते त्यांनी गेल्या सहा महिन्यात प्रकाशित झालेल्या पाच मराठी पुस्तकांची नावे सांगावीत.    

सर्वात आक्षेपाचा मुद्दा म्हणजे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवडणुक. महामंडळाच्या सर्व घटक संस्थांचे मिळून वीस हजार आजीव सभासद आहेत. यांच्यामधून 1075 इतके (प्रमाण 5 टक्के) मतदार आधी निवडले जातात. आणि मग हे निवडलेले महाभाग अध्यक्ष निवडतात. भारतीय घटनेत मतदार निवडण्याची कुठेही तरतूद नाही. मुळात हे लोकशाही विरोधी कृत्य आहे. वारंवार यावर टिका होवूनही महामंडळाने यात बदल केला नाही. फारच लोकशाहीची चाड आसेल तर सर्व आजीव सभासदांना मतदानाचा हक्क द्या. 
दुसरा आक्षेप आहे तो विश्व साहित्याच्या संदर्भात. यावेळी हे संमेलन जोहान्सबर्ग येथे होत आहे. सध्या मोठ्याप्रमाणावर भारतीय अभियंते व तंत्रज्ञ हे दक्षिण अफ्रिकेत नौकरी साठी जात आहेत. त्यामुळे उद्योगपतींनी जोहान्सबर्गसाठी जोर दाखविला असेल हे स्वाभाविक आहे. त्याला महामंडळ बळी पडले असेल हे सहज शक्य आहे. मागचा इतिहास तसाच आहे. विश्व साहित्याचा अध्यक्ष सर्वानुमते निवडला जातो ही चांगलीच गोष्ट आहे. पण या संमेलनासाठी निमंत्रित कोणाला करायचे? संमेलन परदेशात असल्यामुळे प्रवास ही मोठी खर्चिक बाब बनते. जे साहित्यीक आमंत्रित आहेत त्यांनी जावे हे योग्य. पण महामंडळाच्या सभासदांनी शासकीय पैशांनी फुकट दौरे का करावेत? मागच्यावर्षीसारखे त्याला संयोजकांनी नकार दिला तर हे संमेलनही रद्द करणार का? 

गेली दहा अ.भा.साहित्य संमेलने आणि तीन विश्व संमेलने यांच्या कार्यक्रम पत्रिका तपासून पहा. लक्षात असे येते की तीच ती नावे यात निमंत्रित म्हणून आलेली आहेत. आणि महामंडळाच्या सभासदांनी, घटक संस्थांच्या कार्यकारीणीने स्वत:चीच नावे यात वारंवार घुसडली आहेत. 

मराठी प्रकाशक परिषद व राज्य ग्रंथालय संघ या दोन संस्था साहित्य महामंडळाच्या खिजगिनतीतही नाहीत. पूर्वी श्री.पु.भागवत, रा.ज.देशमुख  यांसारखे प्रकाशक हे स्वत: महामंडळावर होते. त्यामुळे प्रकाशक व महामंडळ यांत वितूष्ट यायचे काही कारणच नव्हते. पण गेली दहा वर्षे मात्र हा संघर्ष टोकाला गेला आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन भारताबाहेर नेण्यावरून पहिल्यांदा प्रकाशक व महामंडळ यांच्यात ठिणगी पडली. मग नमते घेत महामंडळाने संमेलन भारतातच भरविले. पण विश्व संमेलनाचे नियोजन घाईघाईने करून प्रकाशकांची कशी जिरवली असा टेंभा मिरवला. शिवाय संमेलनात ग्रंथविक्री हा विषय कायमस्वरूपी दुय्यम ठरवून उपेक्षा केली.

महाराष्ट्रात आज 12 हजार सार्वजनिक ग्रंथालये आहेत. यातील अ वर्ग ब वर्गाची मिळून जवळपास 500 ग्रंथालये अतिशय चांगल्या पद्धतीने आपले काम महाराष्ट्रात सर्वदूर करीत आहेत. मग या ग्रंथालयांना जोडून घेण्याचा विचार आम्ही का नाही केला? साधारणत: पन्नास ते शंभर चांगले वाचक यांच्याशी निगडीत आहेत. अतिशय तुटपूंज्या वेतनावर येथील कर्मचारी काम करीत आहेत. चिपळूण, नाशिक, दादर, ठाणे येथील वाचनालयांनी साहित्य संमेलनाच्या संयोजनाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडून दाखविली आहेत. 

साहित्य संमेलन म्हणजे महामंडळाच्या सदस्यांनी शासकीय पैशावर फुकट केलेली तीर्थयात्रा मौजमजा असे स्वरूप न होता तो माय मराठीचा उत्सव असे स्वरूप द्यायचे असेल तर त्यासाठी मराठी प्रकाशक परिषद व ग्रंथालय संघ यांचाही सहभाग होणे आवश्यक आहे.

यापूढे साहित्य संमेलनाचा अध्यक्ष विश्व संमेलनाप्रमाणेच सर्वानुमते निवडला जावा. संमेलनाचा कालावधी पाच दिवसांचा करण्यात यावा. एक दिवस प्रकाशक परिषदेच्या अधिवेशनासाठी व एक दिवस ग्रंथालय संघाच्या अधिवेशनासाठी राखीव असावा. ग्रंथप्रदर्शनाची जबाबदारी पूर्णत: प्रकाशक परिषदेवर सोपविण्यात यावी. ज्या ठिकाणी हे संमेलन होणार आहे त्या परिसरातील संस्थांना ग्रंथखरेदीसाठी निधी त्याच काळात उपलब्ध होईल हे पाहण्यात यावे. निमंत्रित साहित्यीकांची संख्या मर्यादित ठेवण्यात यावी. ज्या साहित्यीकांला पूर्वी बोलावले आहे त्याला किमान पाच वर्षे परत निमंत्रण देण्यात येवू नये. महामंडळाच्या सदस्यांना स्वत: निमंत्रित म्हणून सहभाग घेता येणार नाही. आणि घ्यायचा असल्यास महामंडळाचा राजीनामा देवून त्यांनी सहभागी व्हावे.

संमेलन कुठे व्हावे यासाठी काही निकष महामंडळाने लावले पाहिजेत. ज्या ठिकाणी सतत पाच वर्षे एखादी साहित्य संस्था काम करीत आहे, एखादे वाचनालय सतत साहित्यीक उपक्रम राबवित आहे, साहित्यप्रेमी कार्यकर्ते त्यासाठी झिजत आहेत तिथे अग्रक्रमाने संमेलन देण्यात यावे. एखाद्या उद्योगपतीच्या/राजकीय नेत्याच्या दबावाखाली येवून संमेलन घेण्याने साहित्याचे भले होण्याची काडीचीही शक्यता नाही. शरद पवारांच्या आई शारदाबाई पवार यांच्या जन्मशताब्दिनिमित्त नाट्य संमेलन घेण्याचा प्रकार याच महाराष्ट्रात घडला आहे.

फार मोठ्या प्रमाणावर तरूण वाचक वर्ग साहित्य संस्थांच्या परिघातून निसटून स्वतंत्रपणे आपली आवड जोपासत आहे. त्यांना जोडून घेण्यात आपणच कमी पडतो आहोत. महाराष्ट्रातील 10 विद्यापीठे, 1 मुक्त विद्यापीठ, 500 सार्वजनिक ग्रंथालये आणि महामंडळाच्या घटक संस्थांखेरीज कार्यरत असलेल्या गावोगावच्या तळमळीने काम करणार्‍या संस्था, साहित्य संस्कृति मंडळ, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, बालभारती या सार्‍यांना जोडून घेणार्‍या दुव्याचे काम महामंडळाने केले तर त्यांना काही भवितव्य आहे. नसता शासकीय पैशावर तीर्थाटन करणारी लाचारांची फौज इतकेच स्वरूप महामंडळाचे राहिल.   

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद, 9422878575  

Tuesday, July 8, 2014

मराठी साहित्य संमेलन उर्फ यात्रा कंपनी

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 8 जुलै 2014 


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाब येथील घुमान या तालुकाही नसलेल्या छोट्या गावी भरणार आहे. संत नामदेवांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमित साहित्य संमेलन म्हणल्यावर बर्‍याचजणांना उत्साहाचे भरते आले. एक मराठी संत सातशे वर्षांपूर्वी दूर पंजाबात जातो तिथे काम करतो. शिख लोक त्याच्या नावाने गुरूद्वारा बांधतात. तिथे संमेलन घेणे किती योग्य. महामंडळाचा केवळ तसाच दृष्टिकोन असला असता तर टिका करायचे काही कारणच नव्हते. पण गेल्या काही वर्षांतला महामंडळाचा कारभार पाहता संमेलनाचा हा ‘मंगलकलश’ नसून शासनाच्या पैशावर यात्रा करणार्‍यांचा ‘तांब्या’च आहे हे वारंवार सिद्ध होते आहे.
दरवर्षी मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्रात घेवून कंटाळलेल्या महामंडळाच्या सदस्यांना भारताबाहेर मराठीचा झेंडा फडकावा असे वाटले. हा झेंडा मराठीचा नसून वैयक्तीक फिरण्याचा होता हे पितळ मागच्यावर्षी उघडे पडले. चौथे विश्व साहित्य संमेलन टोरांटो येथे होणार होते. त्या संमेलनास जे साहित्यीक येणार त्यांच्याबद्दल कोणाच्या मनात काही शंका नव्हत्या. त्यांची सगळी सोय संयोजकांनी केली होती. पण त्यांच्या सोबत महामंडळाच्या सदस्यांना फुकट परदेश वारी करायची होती. त्याला संयोजकांनी आक्षेप घेतला. त्यांचा खर्च कोणी करायचा हा प्रश्न निर्माण झाला. साहित्यीक आणि सोबत महामंडळाचे तीन पदाधिकारी इतक्यांना घेवून जा आणि संमेलन करा असा निर्णय खरे तर महामंडळाने घेणे अपेक्षीत होते. महामंडळाच्या सदस्यांनी संमेलन रद्द झाले तरी चालेल पण आम्हाला फुकट नेलेच पाहिजे असा फुकट पैशांचा ‘नाणेदार’पणा दाखवत संमेलन रद्द केले. त्यावरूनच महामंडळाची मानसिकता कळली होती.
यावर्षी हेच विश्व साहित्य संमेलन जोहान्सबर्ग येथे होणार आहे. मागच्यावर्षीचेच नियोजित अध्यक्ष ना.धो.महानोर त्याचे अध्यक्ष असणार आहेत. आत्तापासूनच या संमेलनाला शासन निधी देणार की नाही हे निश्चित नाही. विश्व संमेलनाचे हे ‘कौतुक’ ओसरले नाही की लगेच अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे ‘माधवी’ नियोजन सुरू झाले आहे. घुमान हे गाव अतिशय छोटे असे गाव आहे. ज्या संत नामदेवांच्या नावाने तिथे गुरूद्वारा आहे, शिख समाजाने तिथे भाविकांची मोठी सोय  करून ठेवली आहे. त्या संत नामदेवांचे जन्मगाव नर्सी नामदेव हिंगोली जिल्ह्यात आहे. नामदेव हे महाराष्ट्रीयन असून त्यांनी मराठीत अभंग रचना केली आहे याचे भान महामंडळाला आहे का? पंजाबात जावून शिख पंथात त्यांचे असलेले महत्त्व शोधता येते मग त्यांच्या गावाला नर्सी नामदेवला किंवा जवळच्या हिंगोलीला आत्तापर्यंत का नाही अ.भा.म.साहित्य संमेलन भरविता आले? याचाच अर्थ नामदेवाचे नाव घेवून आपली तीर्थ यात्रा करण्याचा महामंडळाचा मानस आहे.  परदेशात फुकट दौरा केला की डोळ्यात येतो. त्यापेक्षा भारतातच कुठेतरी लांबवर दौरा करून येवू म्हणजे फारशी टिका होणार नाही. शिवाय नामदेवाचे नाव घेतले की कोणी काही बोलू शकत नाही. 
संत नामदेवांच्या अभंगाची सटीप गाथा अजूनही शासनाने, साहित्य महामंडळाने, साहित्य संस्कृती मंडळाने कुणीही काढलेली नाही. सटीप सोडाच जी आहे तीचीही आवृत्ती सध्या उपलब्ध नाही. पण हे काहीच महामंडळाच्या डोळ्यांना दिसत नाही. नामदेवांच्या नावाने संमेलन घेणे मात्र सोपे आहे.
महाराष्ट्राच्या बाहेर बडोदा (आताचे नाव वडोदरा) येथे संमेलन होणे अपेक्षीत होते. तिथे संमेलन झाले असते तर जास्त उचित ठरले असते. महाराष्ट्राच्या बाहेर हैदराबाद, गुलबर्गा, बंगलोर (आता बंगळूरू), ग्वाल्हेर, दिल्ली, मद्रास (आता चेन्नई) अशा कितीतरी ठिकाणी संमेलन होणे गरजेचे होते. याचे कारण म्हणजे या ठिकाणी विविध संस्था/ माणसे मराठीसाठी काम करत आहेत. छोट्या मोठ्या चळवळी चालविल्या जातात. संमेलनाच्या निमित्ताने येथील चळवळींना गती मिळाली असती. येथे संमेलन का होवू शकले नाही? कारण साधे आहे. कोणत्याच उद्योगपतीने महामंडळाच्या दोन सदस्यांना विमानाने या ठिकाणचा दौरा घडवून आणला नाही. बाकी कुठल्याच गावच्या संस्थांनी आयोजनाची ‘सरहद’ गाठण्याची तयारी दाखविली नाही. परिणामी संमेलन घुमान येथे घेणे महामंडळाला भाग पडले. संमेलन स्थळ पाहणीचा दौरा करताना उस्मानाबादला 6 लोक होते. पण घुमानला मात्र दोनच. असे का? ते महामंडळाचा ला(मा)घवी कारभारच जाणो. 
अतिशय छोट्या गावी संमेलन घेतले तर ग्रंथविक्री होणे शक्य नाही म्हणून प्रकाशक नाराज आहेत. ‘प्रकाशक म्हणजे निव्वळ धंदा करणारा प्राणी. त्याची काय इतकी फिकीर करायची’ असा ठोसा(ला) महामंडळाने लगावला आहे. ज्या ठिकाणी संमेलन भरणार आहे तिथे पुस्तके नसतील तर त्याला काय शोभा? यासाठी खरेतर सहा महिने व्यवस्थित नियोजन करावे लागते. त्या त्या भागातील संस्थांना ग्रंथ खरेदीसाठी अनुदान त्या काळात कसे मिळेल हे पहावे लागते. त्या भागातील वाचनालयांचा विश्वास संपादन करून त्यांच्या माध्यमांतून वातावरण निर्मिती करावी लागते. हे काहीच करायला महामंडळ तयार नाही. ग्रंथालय संघ व प्रकाशक परिषद यांची उपेक्षा करून किती दिवस संमेलने यशस्वी होणार आहेत? 
विश्व संमेलन असो की अखिल भारतीय संमेलन की घटक संस्थांची प्रादेशिक संमेलने ही सगळी साचेबद्ध झालेली आहेत. ही सगळी मौज मजा स्वत: गोळा केलेल्या पैशावर चालली असती तर त्यावर फारशी टिका झाली नसती. पण शासनाने दिलेले पैसे, आमदार-खासदार-मंत्री यांच्या पदराआड लपून गोळा केलेली चांदी यांच्या जोरावर ही संमेलने पार पडत आली आहेत म्हणून ही टिका होते आहे. 
महामंडळाचा अध्यक्ष असो, विश्व संमेलनाचा अध्यक्ष असो, प्रादेशिक संमेलनाचा अध्यक्ष असो कधीही निवडणुक होत नाही. पण अखिल भारतीय संमेलनासाठी मात्र निवडणुक होणार म्हणजे होणारच. त्यासाठी काहीही बदल करायची तयारी महामंडळाची नाही. विश्व संमेलन घ्यायचे म्हटले तर घटनेत तरतूद नसतानाही संमेलन घेण्यात येते. त्यासाठी थांबायची तयारी नाही. पण अध्यक्ष निवडीसाठी काही बदल करायला वेळ मिळत नाही. घटक संस्थांचे मिळून जवळपास वीस हजार आजीव सभासद  आहेत. या सगळ्यांतून केवळ एक हजार लोकांना मतदार म्हणून निवडले जाते. आणि हे निवडलेले मतदार अध्यक्ष निवडतात. असा महामंडळाचा लोकशाहीचा अजब कारभार  आहे. 
आजपर्यंत भारतातल्या कुठल्याच संस्थेत निवडणुकीसाठी मतदार निवडायची ‘सोय’ करण्यात आलेली नाही. लोकशाहीच्या मुलभूत हक्काचाच गळा घोटणारी ही सोय लोकशाहीच्या नावाने महामंडळाने खास करून घेतली आहे. एकदा का मतदार  निवडला की मग पुढे काय होणार हे सांगायची काही गरजच नाही.
संमेलनाचा अध्यक्ष सर्वसंमतीने ठरविण्यात यावा. साहित्य महामंडळाचे सर्व सदस्य हे स्वखर्चाने संमेलनास जाणार आहेत हे त्यांनी जाहिर करावे. फक्त अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष या तीघांचाच खर्च संयोजकांनी करावा. शिवाय कुठल्याही साहित्यीकाची, शुल्क भरून येणार्‍या सामान्य रसिकाची जी सोय संयोजक करतील तीच सोय महामंडळाच्या सदस्यांनी स्वीकारावी.महामंडळाचे सदस्य असलेल्यांना निमंत्रित पाहूणे म्हणून एकाही कार्यक्रमात सहभागी होता होणार नाही. कारण ज्यांनी कार्यक्रम ठरविला आहे त्यांनीच स्वत:ला पाहूणा म्हणून आमंत्रित करायचे ही बनवेगिरी यापुढे चालणार नाही. शिवाय ज्या साहित्यीकांना पुर्वी आमंत्रित केले आहे त्यांना परत पाच वर्षे आमंत्रित केले जाणार नाही. संमेलनातील सर्व पाहूण्या साहित्यीकांची संख्या 100 पेक्षा जास्त असणार नाही. परिसंवादात सहभागी होणार्‍यांना लेखी भाषण आणल्याशिवाय सहभागी होता येणार नाही. मराठीच्या प्राध्यापकांना ‘रिफ्रेशर कोर्स’ म्हणून स्वखर्चाने या संमेलनांना हजर राहणे अनिवार्य करण्यात यावे. (एरव्ही अशा उपक्रमांवर विद्यापीठ अनुदान आयोग लाखो रूपये खर्च करतो आहेच) असे केले तरच या संमेलनांबद्दल सामान्य रसिकांना आत्मियता वाटेल. नसता शासनाच्या पैशाने साहित्य महामंडळाने चालविलेली यात्रा कंपनी असेच स्वरूप संमेलनाला येईल. मग ते संमेलन अ.भा. असो की विश्व असो. 
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, July 1, 2014

आरक्षणाची हाव की शेतमालाला भाव

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 1 जुलै 2014 

आरक्षण हा विषय सध्या इतका तापला आहे की कुठल्याही बाजूनं बोललं तरी चटका हा बसणारच. या विषयाच्या थोडं खोलात जावून विचार केला पाहिजे. मुळात मराठा आरक्षण मागण्याची गरज का पडली? बहुतांश मराठे हे शेती करतात. ही शेती तोट्याची झाली. त्यामुळे मराठ्यांच्या आर्थिक र्‍हासाला सुरवात झाली. शेती तोट्याची का? तर ती तशी रहावी असाच प्रयत्न सगळ्या सरकारांनी केला. 
शेतीची लुट का झाली याचा इतिहास पाहिला तर हे दुखणं प्राचिन असल्याचे लक्षात येईल. शिकार करून मारून खाणार्‍या आदिमानवाला शेतीचा शोध लागला. मारून खायच्या ऐवजी तो  पेरून खायला लागला. इथून मानवी संस्कृतीला सुरवात झाली. पेरून खायला लागला तेंव्हा अन्नासाठी त्याची वणवण कमी झाली. थोडी उसंत मिळून तो इतर उद्योग करायला मोकळा झाला. काही जणांच्या लक्षात आले धान्य पेरायची झकमारी करण्यापेक्षा हे धान्य तयार करणार्‍यांना थोडा धाकदपटशा दाखवला, इतर चोर दरोडेखोर यांच्यापासून तूझे संरक्षण करतो असे जुजबी आश्वासन दिले की आपले चांगले चालते. म्हणजे ज्याच्या हातात बैल आला त्यानं नांगराच्या फाळानं शेती केली. ज्याच्या हाती घोडा लागला त्यानं त्याच नांगराच्या फाळाची तलवार केली आणि राज्य करायला सुरवात केली. इथून शेतीच्या लुटीची सुरवात झाली. ही लुट करणारा कोणी बाहेरचा नव्हता. आपल्याच गणगोताचा आपलाच भाऊबंद होता. हे दुर्दैव शेतकर्‍याचे पहिल्यापासून राहिले आहे.
युरोपात औद्योगिक क्रांती झाली. त्यांना कच्चा माल हवा होता. मग शेतीची परत लुट झाली. कार्ल मार्क्सने कामगाराच्या शोषणावर उद्योग कसे नफा कमावितात हे सुंदर पद्धतीने मांडले व शंभर वर्षे जगातिल विद्वानांच्या मेंदूवर मोहिनी घातली. पण हे कारखाने उभे राहिले तेंव्हा त्यांनी भांडवल कोठून आणले? कामगारांचे शोषण कारखाना सुरू झाल्यावर होते. पण कारखाना उभा राहताना शेतकर्‍याचे शोषण केल्या गेले हे मात्र सांगायचे मार्क्सने टाळले. कारण ते गैरसोयीचे होते. 
1950 नंतर जगभरातील राष्ट्रे स्वतंत्र व्हायला लागली. मग शासन नावाची जडजंबाळ नोकरशाहीची यंत्रणा उभी राहिली. ही आयतखाऊ यंत्रणा उद्योग आणि शेती यांच्यावर नियंत्रण करण्याच्या नावानं त्यांना लुटायला लागली व आपले पोट भरायला लागली. आपण महाराष्ट्राचा विचार करू. महात्मा फुले म्हणायचे, ‘हे भट कारकून बहुजन समाजाला लुबाडतात. त्याजागी बहुजन कारकून बसले तर समाजाचे भले होईल.’ प्रत्यक्षात झाले असे की जे बहुजन कारकून सरकारात जावून बसले त्यानीही आपल्या बापाचा धोरणाने गळा कापायला मागे पुढे बघितले नाही. महाराष्ट्र स्थापन झाला तेंव्हा सत्ता ब्राह्मणांकडून बहुजनांकडे आली. शासनात काम करणारे जे ब्राह्मण होते त्यांची जागाही गेल्या 50 वर्षांत बहुजन समाजाने घेतली. तरी शेतीचे शोषण संपलेच नाही.
पुरातन काळापासून शेतीचे शोषण चालू आहे. ज्या जाती शेतीवर अवलंबून नव्हत्या त्या ब्राह्मण, दलित, मुस्लिम यांनी 1950 च्या आसपास मोठ्याप्रमाणावर गाव सोडायला सुरवात केली. अंगी थोडेफार कसब असलेला ओबीसी वर्ग जो बलुतेदारी करीत होता त्यांनीही हातपाय हालवत आपला मोर्चा शहराकडे मोठ्या गावांकडे वळवला. ज्यांच्याकडे जमिनी होत्या ते मराठे आणि शेती करणार्‍या माळ्यांसारख्या जाती इतकेच लोक गावाकडे अडकून बसले. शहरात जे गेले त्यांचे भले झाले. गावाकडे जे राहिले ते मागास होत गेले. 
मग गावाकडच्यांना वाटायला लागले अरे हे सारे नौकर्‍यांमुळे झाले. मग या नौकर्‍या आपल्याला कशा मिळतील?  राखीव जागा दलितांनी, ओबीसींनी व्यापल्या, खुल्या जागा ब्राह्मणांनी व्यापल्या मग आपल्याला काय? या मानसिकतेतून शेती बाजूला ठेवून नौकरी केली पाहिजे ही धारणा पक्की झाली.
पण एव्हाना शासकीय नौकर्‍यांचे प्रमाण कमी होऊन गेले होते. आजघडीला सगळ्या भारतभर मिळून केवळ 2 कोटी 75 लाख इतक्याच सरकारी नौकर्‍या आहेत. 120 कोटीच्या देशात हे प्रमाण फक्त अडीच टक्के इतकेच होते. गेल्या वीस वर्षांत महाराष्ट्र सरकारची नौकरी तयार करण्याची गती उणे आहे. म्हणजे जेवढे लोक निवृत्त होतात त्याच्या कमी लोक भरती केले जातात. ज्या नौकर्‍या आहेत त्यांचेही आधिकार मर्यादित झाले आहेत. जसे की बांधकाम खात्यात आता जास्त कामच नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांत पोरेच नाहीत. आणि तिसरे म्हणजे जे काही निर्णय घेतले जातात त्याचे अधिकार मंत्रीपातळीवर केंद्रित राहिले आहेत. म्हणजे थोडक्यात सरकारी नौकरी हा एक खुळखुळा उरला आहे. भुकेने रडणार्‍या मुलाला अन्न देता येत नाही हे लक्षात आल्यावर त्याच्यासमोर खुळखुळा वाजविला जातो. तसाच हा प्रकार आहे.
जर शेतीमालाला भाव मिळू दिला तर मराठा समाजाला कुठल्याच आरक्षणाची गरजच पडली नसती. केवळ 10 टक्के इतक्या जरी शेतीमालाच्या किमती वाढल्या तरी 90 टक्के मराठा समाजाला त्याचा फायदा होऊ शकतो. पण 16 टक्के आरक्षणाचा फायदा मात्र अगदी किरकोळ 0.1 टक्के इतक्याही लोकांना मिळू शकत नाही कारण नौकर्‍याच शिल्लक नाहीत.
सरकारी नौकरी देतो असे कबुल करणे म्हणजे बुडत्या बँकेचा चेक देणे आहे. पण हे समजून घ्यायला कोणी तयार नाही. आज चांगल्या संस्थांमध्ये प्रवेश घ्यायचा तर दलित किंवा इतर मागास कुणीही असो त्यांना खुल्या वर्गाच्या बरोबरीने गुण मिळवावे लागत आहेत. ज्या जागा शासनाने फुकट उपलब्ध करून ठेवल्या आहेत तिथे प्रवेश घ्यायला कोणी तयार नाही. बाबासाहेबांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात दलितांना मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थी मिळत नाही म्हणून परत जाते आहे. खासगी शाळां संस्थांमध्येही फुकट प्रवेश मिळावा म्हणून धडपडणारे ओरडणारे खासगी ट्युशन क्लास साठी सवर्णांच्या बरोबरीने शुल्क मोजत आहेत. 
  नेमके याच काळात कांद्याच्या निर्यात मुल्यात वाढ करण्यात आली. परिणामी आपल्या बाजारपेठेतील कांद्याचे भाव कोसळले. साखरेचे आयात शुल्क वाढले. याचा फायदा उत्तरप्रदेशातील शेतकर्‍यांना होणार. महाराष्ट्रातील नाही.  मराठा आरक्षण जाहिर झाल्यावर फटाके वाजविणार्‍या मराठा संघटना/व्यक्ती यांनी शेतकरी विरोधी निर्णयासाठी राज्यकर्त्यांना फटके का नाही लगावले? शेती करायला मराठा आणि शेतीमालाचा व्यापार मात्र मराठ्याच्या हाती नाही. गायीचे तोंड मराठ्याकडे आणि तिचे सड दुसऱ्याच्या ताब्यात. याबद्दल का नाही कधी आवाज उठविला गेला? का नाही यावर काही उपाय शोधला गेला? शेतमालावर प्रक्रिया करण्याचे छोटे उद्योग का नाही उभारले गेले?    ‘भीक नको हवे घामाचे दाम’ असे म्हणत याच मराठा कुणबी शेतकर्‍यांनी प्रचंड मोठी आर्थिक चळवळ 35 वर्षांपूर्वी उभारली होती. तेच आता आरक्षणाचा कटोरा पुढे करत नौकरीची भीक मागण्यात धन्यता मानत आहेत हे चित्र मोठे लाजिरवाणे आहे.
आग्र्याचा प्रसंग आहे. शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात आपल्या समोर जसवंत सिंहाला पाहून  कडाडतात, ‘ज्याने रणांगणात पाठ दाखविली त्याची जागा आमच्या समोर?’ आणि स्वाभिमानाने ताड ताड पावले टाकत बाहेर निघून जातात. आज काय परिस्थिती आहे? महाराजांचे वंशज काय म्हणणार आता? ‘आम्हाला खुल्या जागेत स्वतंत्रपणे पुढे उभे कशाला करता. ते पहा तिकडे दलित मागास उभे आहेत. त्यांच्या मागे आम्हाला नेऊन उभे करा.’
शाहू महाराजांची जयंती नुकतीच साजरी झाली. त्या महात्म्याने पहिल्यांदा राखीव जागा दलितांना दिल्या. तेंव्हा दलितांना इतर सवर्णांच्या बरोबर आणून समता प्रस्थापित व्हावी असा त्यांचा दृष्टिकोन होता. दलितांना तर आम्ही सवर्णांसोबत आणू शकलो नाही पण उलट सवर्ण मराठ्यांनाच दलितांबरोबर बसवून समता प्रस्थापित करण्याची मर्दुमकी राज्यकर्त्यांनी दाखवली आहे. 
आरक्षण येवो किंवा अजून कुठलेही वैध अवैध संरक्षण मराठा समाजाला मिळो जोपर्यंत शेतीमालाला भाव मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजाचा विकास होण्याची काडीचीही शक्यता नाही. 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, June 24, 2014

काम करी तो पक्का । आयते खाई तो छक्का ॥


                              दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार २४ जून २०१४ 

तृतियपंथीयांवरच्या ‘जयजयकार’  या मराठी चित्रपटाने कलेतून सामाजिक समस्या मांडायचे अवघड काम यशस्वीरित्या पार पाडले आहे. एखाद्या कर्तृत्वहीन माणसाला ‘छक्का’ म्हणून शिवी दिली जाते. बहुतांश तृतियपंथीयांनाही काही न करता भीक मागणे हा आपला हक्कच आहे असे वाटते. या सगळ्याला छेद देणारी मांडणी ‘जयजयकार’ या चित्रपटातून दिग्दर्शक शंतनू रोडे याने केली आहे. कोवळ्या वयातील ‘लाजो’ ला मेजर अखंड बनलेले दिलीप प्रभावळकर अतिशय  सोप्या पद्धतीने त्याची समस्या उलगडून दाखवतात. काम करण्यात काय लाज आहे? जे अपंग आहेत ते आपल्या अवयवाच्या कमकुवतपणाचा कुठे बाऊ करतात. मग तूम्ही कशाला करता? मेजर अखंड यांच्या तोडी जी व्याख्या दिग्दर्शकाने दिली आहे, ‘काम करी तो पक्का। आयते खाई तो छक्का ॥' यातच सारे सार आले आहे.

दिग्दर्शक शंतनू रोडे, मावशीची अफलातून भूमिका करणारा संजय कुलकर्णी सुगांवकर व मेजर अखंड साकारणारे दिलीप प्रभावळकर या तिघांनी हा चित्रपट पेलला आहे. मेजर अखंड यांच्या साथीला पार्वतीची भूमिका साकारणार्‍या सुहिता थत्ते (यदुनाथ थत्ते यांची मुलगी) व मावशीच्या सोबत तीन तृतीयपंथी रंगवणारे लाजो (आकाश शिंदे), राणी (धवल पोकळे), चंपा (भुषण बोरगांवकर) यांनीही अतिशय उत्तम साथ दिली आहे. 
चित्रपटाचे कथानक साधे आहे. रेल्वेत भीक मागणार्‍या तृतियपंथीयांवर चोरीचा आळ त्यांच्यावर येतो. लोक त्यांच्या मागे लागतात. पळत पळत ते एकटे राहणार्‍या मेजर अखंड यांच्या घरात रात्रीच्या आसर्‍यासाठी शिरतात. मग मेजरसाहेबांच्या घरातील अंगठी नाहीशी होणे, ती सापडणे आणि त्या निमित्ताने ‘लाजो’ला मेजरसाहेबांनी घरात आणणे. तिच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे. मग बाकीच्याही तीन तृतियपंथीयांचे पुनर्वसन करणे. गावाचा असलेला विरोध. या सगळ्यातून चित्रपट खुलत जातो. तृतियपंथीयांना आपण माणूस म्हणून समजून घ्यायला पाहिजे हा अतिशय साधा सोपा वाटणारा पण वास्तवात अवघड असा संदेश प्रेक्षकाच्या मनात ठसतो. 

ही कथा घेवून हा तरूण दिग्दर्शक बर्‍याच जणांकडे फिरला. पण या कथेत कुणाला फारसा रस दिसला नाही. म्हणून शंतनू रोडे याने स्वत:च हा चित्रपट काढला. चित्रपटात तांत्रिक चुका आहेत, गती अजून वाढवायला हवी, गांव नेमके कुठले आहे ते स्पष्ट होत नाही अशा कितीतरी चुका काढता येतील. पण त्याला काही अर्थ नाही. जो प्रयत्न हा दिग्दर्शक करतो आहे ते समजून घेतले पाहिजे.

तृतियपंथी म्हटले की समोर येणारी व्यक्ती आणि तिची बंबईया हिंदी भाषा हे घट्ट समिकरण डोक्यात येते. इथे शंतनू रोडे याने मावशीसाठी मराठवाडी भाषा, चंपासाठी विदर्भाची भाषा, लाजोची शहरी प्रमाण भाषा तर राणीची साधी हिंदी असा अफलातून प्रयोग केला आहे. अख्खा चित्रपट तृतियपंथीयांवर आहे पण कुठेही तो बिभत्स होणार नाही याची अतोनात काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. 

या सर्वांनी भीक मागणे सोडून आपल्या पायावर उभे रहावे असा प्रयत्न मेजरसाहेब करतात. काही दिवसांतच याला कंटाळून परत आपण भीक मागू असा प्रस्ताव मावशी मांडते. खेळण्याचे दुकान चालविणारी चंपा म्हणते ‘नको मावशी. माझ्या दुकानात कितीतरी छोटी छोटी पोरं येतात. ते मला ताई म्हणतात.’ समाजाशी आपण चांगल्यापद्धतीने जोडल्या जावे ही त्यांची तळमळ दिसून येते. राणी जी नटण्या मुरडण्यात रस घेणारी असते. ती ब्युटी पार्लर चालवायला लागली आहे. ती असे म्हणते, ‘गावातल्या बायकांचा माझ्यावर विश्वास बसला आहे. त्या आता माझ्याकडूनच मेकअप करून घेतात.’ 

‘हरिश्‍चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटात परेश मोकाशी यांनी  फाळकेंच्या व्यक्तिरेखेला मिश्किल रंग देवून चांगला परिणाम साधला होता. तसेच ‘जयजयकार’ या चित्रपटात शंतनू रोडे यांनी मेजर अखंड या भूमिकेला गंमतीदार व्यक्ती बनवून प्रेक्षक खिळवून ठेवला आहे. दिलीप प्रभावळकर यांनी ही भूमिका फारच प्रभावीपणे साकारली आहे. समाजसेवा करणारी व्यक्ती बर्‍याचदा एकारली जाते. मग त्याच्या आजूबाजूची माणसेही करवादतात. आपण काही फार मोठं काम करतो आहोत याचेच दडपण ते इतरांवर सतत आणत राहतात. परिणामी माणसे जवळ यायच्या ऐवजी दूर जातात. पु.ल. देशपांडे म्हणतात ‘मोहाचा त्याग करणे सोपे आहे. पण त्यागाचा मोह आवरणे खरेच कठीण.’ मेजर अखंड ही व्यक्ती जीवनाचा आनंद घेताना आपले दु:ख विसरून इतरांना मदत करू पाहते. यात कुठलीही कृत्रिमता नाही. चारही तृतियपंथीयांच्या मनात सारखी शंका असते या म्हातार्‍याला आपल्यासाठी काही का करावं वाटतं आहे? याचा काय स्वार्थ आहे? मावशी व मेजर यांच्यातील एका प्रसंगातून याचा साधेपणाने उलगडा दिग्दर्शकाने करून वेगळीच उंची गाठली आहे.

‘बस करा हे समाजसेवेचे ढोंग’ या नावाचा एक लेख शरद जोशींनी लिहीला होता. समाजसेवा ही मनातून उगवली पाहिजे. कुठल्याही बाह्य दडपणाखाली ती केली की त्याचा बोजवारा उडतो असा त्याचा आशय होता. या चित्रपटात मेजर अखंड यांच्या घरात तृतियपंथी शिरतात. मुद्दाम तृतियपंथीयांच्या शोधात मेजर निघालेले नाहीत.  

तृतियपंथीयांकडे वासना शमविण्याचे साधन म्हणून समाजाचा दृष्टिकोन दाखविणारा एकच प्रसंग आणि तोही अतिशय संयमाने रंगविला आहे. लाजो हा कोवळा पोरगा रेल्वेत भीक मागताना एका तरूण पोरांच्या टोळक्याच्या तावडीत सापडतो. त्यावेळी मावशीची भूमिका करणार्‍या संजय कुलकर्णी यांनी अप्रतिम बेअरिंग सांभाळत प्रसंग रंगविला आहे. सर्व चित्रपटात तृतियपंथीयांची बाजू संयमाने आणि परिणामकारण पद्धतीने संजय कुलकर्णी यांनी दाखविली आहे. मेजर कडे पहिल्यांदा काम करण्यासाठी लाजो जाणार आहे. त्यासाठी राणी व चंपा तयार नाहीत. पण मावशी तीच्या पाठीशी उभी राहते आणि तीला जाऊ देते. रात्री लाजोला जवळ घेवून झोपणं असो की सर्वांना चुलीवर रांधून खाऊ घालणं असो यातून तृतियपंथीयांना बांधून ठेवणारा धागा हे मावशीचे रूप ठळकपणे समोर येते. तृतियपंथीयांची मावशी म्हणजे हिजड्यांची फौज पदरी बाळगणारी, त्यांचे शोषण करणारी अशी व्यक्तिरेखा आत्तापर्यंत रंगवली गेली आहे.‘जयजयकार’ चित्रपटात पहिल्या दृश्यापासून ते शेवटपर्यंत कुठेही ही व्यक्तीरेखा तशी न होता एक सामान्य माणूस कशी आहे तीलाही भावभावना कशा आहेत, बरोबरच्या इतर तृतियपंथीयांवर तिने मायेची पाखर कशी घातली आहे याचे सुंदर चित्रण यात आले आहे.

एक अतिशय वेगळा प्रयोग साधणार्‍या या चित्रपटाकडे केवळ चित्रपट म्हणून पाहू नये. सहा कैद्यांना घेवून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयोग ‘दो आंखे बारा हाथ’ चित्रपटात व्हि.शांताराम या मराठी माणसाने रंगविला होता. आता शंतनू रोडे या मराठी तरूणाने चार तृतियपंथीयांच्या पुनर्वसनाचा विषय चित्रपटातून मांडला हा एक वेगळाच योगायोग. अभिजीत जोशी या तरूण संगीतकाराने ‘चांदण्या गोंदल्या बाई’ हे एकच गाणे मोठे श्रवणीय बनवले आहे. 

‘काम करी तो पक्का । आयते खाई तो छक्का ॥ही नवी म्हण सार्थक करण्यासाठी हा चित्रपट मराठी प्रेक्षकांनी आवश्य पहावा. नसता ‘मराठी सिनेमा । कुणी पाहिना॥ही वेळ येईल. मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांचे शो प्रेक्षकांअभावी बंद पडत आहेत. नुसते अनुदान देऊन आणि मराठीसाठी ‘खळ खट्ट्याक’ करून काही होणार नाही. चांगल्या चित्रपटांना पदरचे पैसे खर्चून प्रतिसाद द्यायची जबाबदारी आपलीच आहे.    

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद ९४२२८७८५७५ 

Tuesday, June 17, 2014

अहिल्याबाई होळकरांचा वेगळा पैलू


                              दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 17 जून 2014 


अहिल्याबाई होळकरांची जयंती नुकतीच साजरी झाली. (जन्म 31 मे 1725, मृत्यू 23 ऑगस्ट 1795) बर्‍याच ठिकाणी पिवळे झेंडे नाचवित उत्साहात मिरवणुका निघाल्या. अहिल्याबाईंची साध्वी अहिल्याबाई अशी प्रतिमा तयार करण्यात आली आणि तिच जनमानसात रूजली. ज्याने कोणी पहिल्यांदा डोक्यावर पदर, कपाळावर भस्माचा आडवा पट्टा, डाव्या हातावर शिवलिंग, उजव्या हाताने त्यावर बेलाचे पान वहात धरलेली सावली हे चित्र काढले असेल त्या कलाकाराला याची कल्पनाही नसेल अशा कृतीने एक महान स्त्रीच्या मुत्सद्देगिरीकडे आपण दुर्लक्ष करतो आहोत. 
महात्मा गांधींच्या चळवळीचे वर्णन साध्या शब्दांत ‘दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमतीके संत तूने कर दिया कमाल’ या गाण्यात नेमके केले गेले आहे. पण गांधींच्या दोनशे वर्ष आधी हाती शस्त्र न घेता, धर्माचा चांगल्या अर्थाने वापर करून एक विधवा स्त्री आपला वचक भारतीय राजकारणावर निर्माण करते हे आपण लक्षात घेत नाही. विनया खडपेकर यांनी ‘ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर’ या पुस्तकांत (राजहंस प्रकाशन) अहिल्याबाईंचा मुत्सद्दीपणा अभ्यासपूर्वक मांडला आहे. प्रभावी राजकारणी अशी त्यांची प्रतिमा पहिल्यांदाच उजळून निघाली आहे. 
अहिल्याबाईंचे पहिले पत्र उपलब्ध आहे तेच मुळी त्यांच्यातील करारीपणाचे दर्शन घडविणारे. तेंव्हा त्या गादीवर बसल्याही नव्हत्या. त्यांच्या पतीने खंडेराव होळकरांनी पंढरपुरच्या विठोबाच्या नैवेद्यासाठी वार्षिक पैशाचा करार लावून दिला. त्यासोबत अहिल्याबाईंनी रूक्मिणीसाठी दागिने पाठविले. खंडेराव होळकर लिहीतात  ‘....प्रतिवर्षी श्रीला महानैवेद्य पोहोचता करणे. यास अंतर करू नये हे विनंती.’ पण तेच अहिल्याबाईंची भाषा पहा. रूक्मिणीच्या पूजेचे अधिकार ज्यांच्याकडे आहेत त्या उत्पातांना त्या लिहीतात, ‘... आईचे पायेचा रमझोन सोन्याचा बाळोजी नाटे यांज बरोबर पाठविला आहे. तरी प्रत्यही भोगवीत जाणे. यात अंतर पडिले तर उत्तम नसे. येविशीचा जाबसाल तुम्हास पुसिला जाईल.’ (6 एप्रिल 1750)
जाबसाल पुसण्याची भाषा त्यांच्या अंगातील धमक दाखविते. सासरा, पती, नवरा यांच्या निधनानंतर खचून न जाता अहिल्याबाईंनी समर्थपणे संस्थानच्या कारभाराची धुरा सांभाळली. आपल्याला वारस ठरवून हाती सत्ता भेटेल हे इतके सोपे नाही हे त्या ओळखून होत्या. होळकर घराण्यातील तुकोजी होळकर हे गादीवर बसण्यासाठी उत्सूक होते. पण अहिल्याबाईंनी मोठ्या मुत्सद्दीपणाने पेशव्यांकडे पत्र पाठविले आहे. ‘‘... मी खासगी व दौलत असे दोन्ही अधिकार आजपावेतो चालवून होळकरांचे नाव कायम ठेविले असून. तुकोजीराव होळकर सरकार चाकरीचे उपयोगी समजून त्यांचे नावे वस्त्रे यावीत म्हणून विनंती.’’
तुकोजी होळकर हे सरकारी चाकरी म्हणजे मुलूखगिरी करतील लढाया करतील  पण अधिकार मात्र माझ्याकडे राहिल हे सुचवून त्यांनी पेशव्यांनाही चकित केले आहे. पुढे प्रत्यक्ष तसे वागुन अहिल्याबाईंनी आपला दराराही दाखवून दिला. खरं तर लढाईत खुन खराबा, पैशाची नासडी फार होते आणि निष्पन्न काहीच होत नाही याची जाणिव अहिल्याबाईंना आपल्या सासर्‍यांच्या हाताखाली कारभार करतानाच आली होती. मल्हारराव होळकर यांनी युद्धभूमिवर जे यश मिळविले त्याबरोबर मुलकी कारभारातही त्यांनी यश मिळविले. सामाजिक/धार्मिक प्रश्न सोडविण्यातही ते कुशल होते.  इंदोरच्या खेडापती मारूतीच्या पुजेचा एक बखेडा उत्पन्न झाला होता. मुरादशहा फकीर हे मुस्लिम संत त्या मारूतीची पुजा करत असत. त्यावरून समाजात अस्वस्थता निर्माण झाली. तेंव्हा मल्हारराव होळकरांनी महंत बैरागी रूपदासबाबा यांच्यावर ही पुजेची जबाबदारी दिली. मुरादशहा फकिरास तीन बिघे जमिनीवर (3 हजार स्क्वे.फु) मोठा वाडा उभारून त्याची सोय लावून दिली. हे अहिल्याबाईंनी ध्यानात ठेवले. पुढे त्यांनी धर्मासंबंधी जे धोरण अवलंबिले त्यावरून हे स्पष्ट होते. इंदोरात कामाला येणार्‍या लोकांसाठी ‘सरकारी वाडा असताना तूम्ही इतरत्र मुक्काम करू नये’ अशी सुचनाच मल्हारराव होळकरांनी केलेली होती. कारण कामासाठी येणारे कमाविसदार, मामलेदार, देशमुख, देशपांडे बाहेर राहिले तर दुसर्‍यांशी त्यांची जवळीक होऊन कारस्थाने शिजण्याची शक्यता. त्यापेक्षा ते सरकारी वाड्यात राहिले तर त्यांची जवळीक प्रत्यक्ष मल्हाररावांशीच होणार. हे सारे अहिल्याबाई पहात होत्या. 
अहिल्याबाईंसमोर खरा पेचप्रसंग राघोबादादा पेशव्यांनी निर्माण केला. दत्तकाचे निमित्त पुढे करून राघोबादादांना इंदोरवर हक्क मिळवायचा होता. त्यांच्या वकिलाला बाणेदार उत्तर देत अहिल्याबाईंनी गार केले. ‘कैलासवासी सुभेदारांच्या वारसांतल्या एकाची मी पत्नी आहे आणि दुसर्‍याची माता आहे. दत्तक वारस निवडायचाच तर तो आमचा अधिकार आहे. खुद्द पेशव्यांनीही त्यात ढवळाढवळ करणे नाही.’ आपणांस भेटावयास आलेल्या राघोबादादा पेशव्यांना त्या आपणहून वाजत गाजत हत्तीवरून मिरवत आपल्या सत्तेचे प्रदर्शन करीत निघाल्या.  वाटेत सर्व जनता त्यांना आपली राणी म्हणून मान देत होती. अशा प्रकारे जनतेचे दडपण आणून त्यांनी राघोबादादांना युद्धाशिवाय गार केले. माधवराव पेशव्यांनी अहिल्याबाईंच्या नावे पत्र देऊन त्यांना राज्य चालविण्याचा अधिकार दिला आणि होळकरशाहीच्या वारसाचा प्रश्न मिटवला. 
अहिल्याबाईंची मुत्सद्देगिरी ही की त्यांनी इंदूर सोडले व महेश्वर आपल्या राज्यकारभारासाठी निवडले. कारण महेश्वर ही होळकरांची खासगी जहागिर होती. त्यावेळच्या संकेताप्रमाणे खासगी जहागिरीवर आक्रमण करता येत नव्हते. अगदी खुद्द सातारचे छत्रपती किंवा पेशव्यांचेही हात तिथे पोचू शकत नव्हते. इतिहासात या शहराला मोठे महत्त्व होते. ते स्थानमहात्म्यही अहिल्याबाईंच्या कामा आले. शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांचा गाजलेला वादविवाद याच शहरात झाल्याची अख्यायिका आहे. मंडनमिश्रांच्या पत्नीने या निवाड्यात न्यायाधिशाची भूमिका बजावली होती. त्याच जागी बसून अहिल्याबाईंनी राज्यकारभार पहावा यालाही एक वेगळा अर्थ आहे.
त्या काळातील राजकारणाचीही त्यांची जाण अतिशय बारीक होती. सवाई माधवराव पेशव्यांचे पुण्याला लग्न होते. त्या वेळी तुकोजी होळकर तिथे हजर राहिले. पण महादजी शिंदे मात्र दिल्लीच्या राजकारणाच्या धामधुमीत होते. त्यांनी दिल्लीवर कब्जा याच काळात मिळवला. पुण्याच्या लग्नापेक्षा दिल्लीच्या सिंहासनाचे राजकारण महत्त्वाचे हे अहिल्याबाई जाणून होत्या. ‘तुकोजीबाबा पाटीलबाबांस (महादजी शिंदे) सामील असते तर या यशकीर्तीस पात्र ठरले असते. तिकडे पुण्यास जाऊन काय मेळविले?’ असे उद्गार त्यांनी काढले. 
पुण्याची पेशवाई उताराला लागलेली, दिल्लीच्या बादशाहीचे काही खरे नाही, मराठ्यांची राजधानी सातारा दुबळी झालेली अशा स्थितीत अहिल्याबाईंनी कारभार केला. मठ मंदिरे देवळे नदीवर घाट यांची उभारणी केली तर त्या त्या परिसरात शांतता पसरेल. आणि मुख्य म्हणजे त्या काळातील जनतेच्या मनात आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण होईल परिणामी आपल्याला चांगला राज्यकारभार करणे शक्य होईल. हे त्यांचे अनुमान त्या काळातील दुसर्‍या कुठल्याच राज्यकर्त्याला काढता आले नाही. धर्मभोळेपणापेक्षा समाजाचे अस्तित्व आणि अस्मिता जागविण्याची त्यांची भूमिका होती हे विनया खडपेकर यांचे निरीक्षण फारच नेमके आणि महत्त्वाचे आहे. 
काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार, गंगेवरील मनकर्णिका घाट, परळीच्या वैजनाथ मंदिराचा जीर्णोद्धार, सोमनाथचे मंदिर, वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर, केदारनाथ बद्रीकेदार, उज्जैन, जगन्नाथपुरी येथील पुजेची व्यवस्था अशी कितीतरी ठिकाणांनी अहिल्याबाईंची आठवण जागती ठेवली आहे. 
दुसर्‍या महायुद्धानंतर सर्व जगाला युद्धाची किंमत काय मोजावी लागते हे स्पष्टपणे उमगले. व त्यानंतर जागतिक व्यापार संघटनेची स्थापना (डब्लू.टि.ओ.) झाली. अहिल्याबाईंच्या काळात जागतिक  व्यापार ही संकल्पना नव्हती. पण त्यांनी   लढाईची विनाशकता ओळखली व आयुष्यभर ती  टाळून शांतता प्रस्थापित करत यशस्वी करभार करून दाखवला हे फार महत्त्वाचे.  
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, June 10, 2014

‘पाडस’वाले पटवर्धन गेले

                         दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 10 जून 2014 

राम पटवर्धन हे मराठीतील ज्येष्ठ संपादक. मराठी साहित्य विश्वात सर्वात जास्त चर्चिल्या गेलेल्या  ‘सत्यकथा’ मासिकाचे संपादक म्हणून राम पटवर्धन सर्वांना परिचित होते. वृद्धापकाळाने 86 व्या वर्षी मंगळवार 3 जून रोजी त्यांचे निधन झाले. एका तरूण मुलाने विचारले, ‘‘संपादक म्हणजे ते काय करत होते?’’ संपादक म्हणून नेमके काय काम करावे लागते हे समजावून सांगायची वेळ आता आली आहे. वर्तमानपत्राचा संपादक म्हणजे काय हे थोड्याफार जणांना माहित असते पण वाङ्मयिन नियतकालिके, प्रकाशन गृहे यांत संपादकाची भूमिका काय हे माहित नसते.
लेखक लिहीतो तेंव्हा त्या मजकुरातील सुसंगती, लेखनातील वैचारिक सामाजिक भूमिका, काळाचे संदर्भ, व्यक्तिरेखा अशा कितीतरी बाबी तपासाव्या लागतात. या गोष्टी लेखकाला शक्य होतातच असे नाही. कथा, कादंबरी सारख्या मोठ्या गद्य लिखाणात तर वरील बाबी तपासणे फार गरजेचे असते. अशावेळी प्रकाशनगृहांना संपादकाची गरज पडते. काहीवेळा एखाद्या विषयावर पुस्तक लिहून घ्यायचा असेल तर संपादकाची भूमिका फारच महत्त्वाची बनते.
राम पटवर्धन हे अव्वल दर्जाचे संपादक होते. 1987 मध्ये ते निवृत्त झाल्यानंरही संपादनाची कामे करीत होते. अगदी अलिकडच्या काळातील ‘आश्रम नावाचे घर’ हे अचला जोशी यांचे पुस्तक त्यांनी संपादित केले होते. आजही ते पुस्तक वाचताना अचला जोशी यांच्या प्रतिभेच्या जोडीलाच पटवर्धनांच्या संपादकीय गुणांचीही आपल्याला जाणीव होते.
संपादनाचे काम स्पष्टपणे समोर दिसत नाही. त्याचे योग्य ते श्रेय मिळत नाही. त्यामुळे कितीतरी पुस्तकांची कामे करूनही त्याचे पुरेसे श्रेय पटवर्धनांना मिळाले नाही हे सत्य आहे. पण एक मोठं काम त्यांच्या हातून घडले आणि आजही त्यांच्या प्रतिभेचा, बुद्धिमत्तेचा पुरावा म्हणून ते आपल्यासमोर आहे.
मार्जोरी किनन रॉलिंग्ज या अमेरिकन लेखिकेच्या ‘द इयरलिंग’ कादंबरीचा अनुवाद पटवर्धनांची ‘पाडस’ या नावाने केला आहे. मराठीतील उत्कृष्ठ अनुवादाचा नमुना म्हणून हे पुस्तक मराठी वाचकांसाठी आज उपलब्ध आहे. 
मूळ पुस्तक ज्यांनी वाचले असेल त्यांनी परत हा अनुवादही वाचुन पहावा. मराठीत असे फार थोडे अनुवादक आहेत की ज्यांना मूळ पुस्तकाइतकीच उंची अनुवादातही गाठता आली. जी.ए.कुलकर्णी यांनी अनुवाद केलेली कॉनराड रिश्टर यांची पुस्तके (रान, शिवार, गाव, रानातील प्रकाश), श्रीकांत लागुंनी जॉर्ज ऑरवेलच्या ‘ऍनिमल फॉर्म’चा केलेला संक्षिप्त अनुवाद, भारती पांडे यांनी पर्ल बक च्या ‘द गुड अर्थ’ चा ‘काळी’ नावाने केलेला अनुवाद, उमा कुलकर्णी यांनी एस.एल.भैरप्पा यांच्या पुस्तकांचे केलेले अनुवाद (पर्व, तंतू, दाटू, वंशवृक्ष, आवरण) अशी फार थोडी उदाहरणे मराठीत आहेत. 
‘पाडस’ ही अमेरिकेच्या फ्लॉरिडा राज्यातील जंगलात राहणार्‍या बॅक्स्टर कुटूंबाची कथा आहे. जंगल साफ करून तिथे शेती करत जगण्याचा संघर्ष करणारे हे कुटूंब. निसर्गाशी, हिंस्त्र प्राण्यांशी संघर्ष करायचा शिवाय त्यांच्याशी मैत्रीही ठेवायची अशी तारेवरची कसरत त्यांना करावी लागते. आई, वडिल आणि बारा वर्षांचा लहान मुलगा ज्योडी असे हे छोटेसे कुटूंब. निरागस विश्वात वावरणार्‍या ज्योडीला हरणाचे एक गोंडस पाडस मिळते. त्याला त्याचा अतोनात लळा लागतो. पण हे पाडस जेंव्हा मोठे होते आणि शेती उद्ध्वस्त करायला लागते तेंव्हा त्याच्याशी असलेला लळा तोडून त्याला शिस्त लावण्याचा आग्रह ज्योडीचा बाप पेनी धरतो. अखेरीस जेंव्हा शेतातील धान्य उद्ध्वस्त करणार्‍या पाडसाला पेनी गोळी घालतो तेंव्हा चिडून ज्योडी घर सोडून निघून जातो. भटकत असताना त्याला जीवनाच्या संघर्षाची खरी जाणीव होते. भूक म्हणजे काय हे त्याला कळते. रानावनात भटकणार्‍या छोट्याशा ज्योडीची मानसिकता रंगवताना मूळ मजकुराचा जो अनुवाद पटवर्धनांनी लिहीला आहे तो फारच अफलातून आहे, ‘‘भूक म्हणजे काय ते आपल्याला माहीत आहे अशी त्याची कल्पना होती. त्याला ठाऊक असलेली भूक ही काहीशी सुखाची जाणीव होती. आता त्याला कळलं की ती केवळ अन्न खाण्याची इच्छा होती. उलट ही भूक अगदीच वेगळी होती. ही फार भयानक होती. ही त्याला अख्खा तोंडात टाकू शकत होती आणि हिची नखं त्याच्या मर्मापर्यंत पोचत होती.’’
भूकच माणसाला खाऊन टाकते असं लिहून पटवर्धनांनी फारच नेमकेपणाने शेतीच्या सुरवातीच्या काळातील  माणसाच्या मन:स्थितीचे वर्णन केले आहे. बरं हे वर्णन करताना मूळ लेखिकेने किंवा अनुवाद करताना पटवर्धनांनी कुठेही आक्रस्ताळी अशी डावी भूमिका मांडलेली नाही. निसर्गाशी अन्नाचा संघर्ष करताना त्यातील स्वाभाविकताच या कादंबरीत सर्वत्र आढळून येते. हे एक फार मोठे बलस्थान या कादंबरीचे आहे. पटवर्धनांनीही ते ओळखून त्या पद्धतीने शब्द वापरले आहेत हे फार महत्त्वाचे. 
घरातून पळून गेलेला ज्योडी जगण्याचा अस्सल अनुभव घेऊन परत येतो. परत आलेल्या ज्योडीला त्याचा बाप पेनी जवळ घेतो. त्याच्या थंड पडलेल्या हातांना चोळीत राहतो. पेनीची गरम आसवं त्याच्या हातावर पडतात. जीवनाचे तत्त्वज्ञान अतिशय सोप्या भाषेत पेनी पोराला समजावून सांगतो. ‘‘माणसांच्या दुनियेत काय चालतं ते पाहिलं आहेस तू. नीचपणा, दुष्टपणा करणारी माणसं तुला माहित आहेत. मृत्यूच्या युक्त्याप्रयुक्त्या तू पाहिल्या आहेस. भूक आणि उपासमार म्हणजे काय ते तुला कळलं आहे. जीवन सुंदर आणि सोपं असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. जीवन सुंदर आहे पोरा, फार सुंदर आहे. पण ते सोपं मात्र नाही.’’
घरची शेतीवाडी सांभाळायचं आश्वासन ज्योडी आपल्या बापाला देतो आणि ही कादंबरी संपते. राम पटवर्धनांची जी भाषा वापरली आहे ती पाहता पात्रांची नावं सोडली तर ही कादंबरी आपल्याच प्रदेशातील जंगलं तोडून शेती करू पाहणार्‍या आपल्या पूर्वजांचीच आहे असं वाटत राहतं. 
बंगालीत विभुतिभुषण बंदोपाध्याय यांची ‘आरण्यक’ ही कादंबरी जंगल हटवून शेतीसाठी जमिन तयार करणे या विषयावरच आहे. आपल्या प्रदेशातील एक फार अप्रतिम प्रसंग इतिहासातील आहे. पुण्याच्या परिसरातील उजाड झालेली जमिन सोन्याचा फाळ लावून शिवाजी महाराजांनी नांगरली. आजूबाजूचा जास्तीत जास्त प्रदेश शेतीखाली येईल हे पाहिले. शेती करणार्‍यांनी नांगराचे लोखंड वितळवून तलवारी केल्याआणि राज्य स्थापन केले असा आपला इतिहास आहे. सैनिक लढाईतून परतून परत शेती करत. शिवाजी महाराजांचे राज्य म्हणजे शेतीच्या संघर्षाची अन्नाच्या संघर्षाची गाथा आहे हे आपण विसरतो. मिर्झा राज्यांशी झालेला तह जून महिन्यातील मृग नक्षत्र लागण्याच्या काळातला आहे. राज्यातील शेती वाचावी म्हणून महाराजांनी तह केला. यावर मराठी प्रतिभावंतांनी लेखन व्हायला पाहिजे.
पटवर्धनांच्या माघारी  शिल्लक राहणारे काम म्हणजे पाडस ही कादंबरी. कलावंत साहित्यीकांच्या स्मारकांची हेळसांड आपण खुप केलेली आहे आणि करतही आहोत. मोठमोठ्या लेखकांच्या स्मारकांची पुतळ्यांची वाट आम्ही लावली आहे. तिथे राम पटवर्धनांसाठी कोणी काही करेल याची शक्यता फारच कमी आहे. बोरकरांनी लिहून ठेवले होते
मी विझल्यावर त्या जागेवर
पण कोण्या अवसेच्या रात्री
धुळीत विखुरल्या कविता माझ्या
धरतील चंद्रफुलांची छत्री
त्या प्रमाणेच ‘पाडस’ सारखा अनुवाद राम पटवर्धनांच्या समाधीवर चंद्रफुलांची छत्री धरून मराठी वाचकांच्या कायम स्मरणात राहिल. पटवर्धन कायम स्मरणात राहतील ते ‘पाडस’वाले पटवर्धन म्हणूनच.  

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, June 3, 2014

वेदांतील पर्जन्यसूक्त : एक कविता मुक्त ।


                              दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 3 जून 2014 

वातावरणात असह्य उकाडा असतो. जिवाची तगमग तगमग होत असते. काय करावे सुधरत नाही. बोरकरांच्या कवितेत एक ओळ येते तसे काहीसे सर्वत्र वातावरण असते

जिथल्या तेथे पंख मिटूनीया
निमूट सारी घरे पाखरे
राख माखुनी पडून आहे
लूत लागले सुणे बिचारे


यात सुणे म्हणजे कुत्रे पण हा शब्द असा आला आहे की तो जिणे असावा असे वाटते. आणि असे लूत लागले जिणे पडून आहे. काय करावे म्हणजे ही स्थिती पालटेल? मर्ढेकर लिहीतात त्याप्रमाणे हे सारे पालटेल फक्त आणि फक्त पाऊस पडू लागल्यावरच.

शिरेल तेव्हा शिरो बिचारे
हवेत असल्या पाउस-पाते
जगास तोवर वैशाखाच्या
मृगाविनाही मृगजळ चढते !


पावसाची वाट सगळे पहात आहेत. आदिम काळापासून पावसाची वाट माणूस पहात आहे. आज इतकी परिस्थिती बदलली. विज्ञानाने नवे नवे शोध लावले. वातावरणातील तापमानाला विरोध करीत ऐसी शोधून काढला. पण पावसाची वाट पाहण्याची जी तीव्रता आहे ती मात्र कमी झालीच नाही. 

पावसाचे महत्त्व माणसाला होतेच पण ते केंव्हा जास्त वाटायला लागले? शेतीचा शोध लागला आणि पाऊस मानवी संस्कृतीचा एक अविभाज्य घटक बनला. भारतासारख्या देशात आजही बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. सिंचन घोटाळ्यातील आकडेवारी बाजूला ठेवली तरी एक विदारक सत्य आजही समोर आहे. आणि ते म्हणजे शेतीला पाणी पुरविण्याची वेगळी व्यवस्था आम्ही करू शकलेलो नाही. त्यामुळे एक वाकप्रचार आपल्याकडे आलेला आहे, ‘अस्मानी आणि सुलतानी’. लहरी पाऊस आणि सुलतानी म्हणजे शासनव्यवस्था ह्या दोन्ही बेभरवश्याच्या आहेत.

जूनच्या पहिल्या आठवड्यात मृगाच्या पावसाची मोठ्या आशेने शेतकरी वाट पहातो. मृगाआधी रोहिणी नक्षत्रात पावसाच्या सरी कोसळतात. त्यावरची जात्यावरची ओवी मोठी सुरेख आहे

मृगाआधी पाऊस । पडतो रोहिणीचा ॥
भावाआधी पाळणा । हलतो बहिणीचा ॥


मांगाच्या बाण्यामध्येही मृगाच्या पावसानंतर शेतकर्‍याची कशी लगबग सुरू होते. पेरणीची मोठी धांदल उडते याचे वर्णन आले आहे. 

सुताराच्या नेहावर एक नवल घडले
समरत सोईर्‍याने सोनं मोडून चाडं केलं


इंद्रजीत भालेराव यांनी जात्यावरच्या ओव्यांचे संपादन केले आहे. त्यात पावसाच्या-पेरणीच्या ज्याओव्या आलेल्याआहेत त्या आपली पारंपरिक मानसिकता स्पष्ट दाखवतात. परभणी परिसरातील या ओव्या असल्यामुळे तसे संदर्भही आले आहेत.

पाण्या बाई पावसाचं 
आभाळ आलंय मोडा
आभाळ आलंय मोडा
तिफनीचे नंदी सोडा

पड पड रे पावसा
व्हवू दे रे वल्ली माती
बईलाच्या चार्‍यासटी
कुणबी आले काकूळती

पाण्याबाई पावसाचं 
आभाळ आलंय कोट
सख्या परभणी गाठ
माल आडतीत लोट


जात्यावरच्या ओव्या किंवा आधुनिक मराठी कविता असो या सगळ्यात पावसाचे, त्याची वाट पाहण्याचे जे काही वर्णन आले आहे त्या सगळ्याचा धागा पार वेदकाळात जाऊन पोंचतो. ऋग्वेदात 1028 सूक्ते आहेत. विश्वनाथ खैरे यांनी यातील  पंधरा निसर्गवर्णनपर सूक्तांचा मराठीत सुंदर असा अनुवाद केला आहे. ‘वेदांतील गाणी’ या नावाने हे छोटे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. वीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली या पुस्तकाची अजून पहिलीच आवृत्ती चालू आहे. वाचन संस्कृतिवर भरमसाठ बडबड करणार्‍यांनी ही वस्तुस्थिती समजून घ्यावी. वेदांचा प्रचार मौखिक पंरपरेत झाला. लेखी स्वरूपात वेद अगदी अलिकडच्या काळात आले. त्यांचा सविस्तर शास्त्रार्थ सायणाचार्यांनी पहिल्यांदा मांडला ज्याच्या आधारावर इतर विद्वानांनी वेदांतील मंत्रांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. सायणाचार्य हे तेराव्या शतकातील विजयनगरच्या राजाचे  प्रधान होते. सायणाचार्यांच्या भाष्याचा आधार खैरेनी घेतला. आपल्या लोकसाहित्यात ज्या चालिरीती, परंपरा यांचा निर्देश आलेला आहे. त्यालामिळत्या जूळत्या वेदांतील सुक्तांचा त्यांनी अनुवाद केला. 

पर्जन्यसूक्त ही एक मुक्त अशी कविता आहे. पावसाने सारी समृद्धी येते. या पावसात औषधी वनस्पती वाढतात. पोटासाठी अन्न मिळते. निसर्गाचे चक्र या पावसामुळेच गतिमान आहे अशी भावना या सूक्तात आहे.

पावसाच्या थोर देवा मंत्र गावे
नमन करावे आणि सेवाभावे
बैल डरकत यावा तसा येतो
पाण्याने औषधी बीजे वाढवीतो

सुसाटती वारे वीजा कडाडती
झरता हे आकाश औषधी वाढती
भूमी सारे जग पोसाया समर्था
पावसाचा देव पाणी तिला देतो


दहा कडव्यांच्या या छोट्या प्रार्थनेत धो धो वाहणार्‍या पावसाला आता थांब आणि पुढे कोरड्या प्रदेशात जा अशी विनंती करण्यात आली आहे. खाण्यासाठी अन्न आणि पिण्यासाठी पाणी देणार्‍या पावसाचे मोठ्या तृप्त मनाने आभार मानले आहेत.

धो धो धो आलास ओढून घे धारा
कोरड्या देशांना जाई तू पुढारा
खाण्यापिण्या झाले मोप अन्नपाणी
वाहिली तुला ही आभाराची गाणी 


वेदांचा काळ जवळपास पाच हजार वर्षांपूर्वीचा मानल्या जातो. वादाखातर तो थोडा कमी जरी केला तरी किमान तीन हजार वर्षांपूर्वीचे हे साहित्य आहे यात वादच नाही. वेद, उपनिषदे यांच्यावर आधुनिक काळातील विद्वान टिका करतात. त्यांना सोवळ्यात बांधून आधुनिक काळात वैचारिक अस्पृश्यता बाळगतात. असं करण्यानं या वाङ्मयातील किमान सौंदर्यालाही आपण मुकतो हे त्यांच्या लक्षात येत नाही.

शंकराचार्यांच्या नर्मदाअष्टकांत असं वर्णन आहे

अलक्ष्य लक्ष किन्नरामरासुरादि पूजितं ।
सुलक्ष्य नीर तीर धीर पक्षि लक्षमकूजितम् ।
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ॥


दृष्टिला न दिसणार्‍या लक्षावधी किन्नर, देव दैत्य यांनी तूझ्या पायाची पूजा केली आहे. तूझ्या काठावर धीर धरून राहणारे लक्षावधी पक्षी आपल्या मंजूळ आवाजाने तूझा काठ रम्य करीत आहेत. अशा नर्मदे तूझ्या मी पाया पडतो. या वर्णनात कुठे काय देव देवता सोवळे ओवळे असे धर्माचे अवडंबर आले आहे? पण आपण ते समजून घेत नाही. 

पावसाची चातकासारखी वाट पाहण्याची आजची आपली मनोवृत्ती वेदकालीन आपल्या पूर्वजांसारखीच आहे. आजही आपल्यावर आपल्या पूर्वजांइतकी निसर्गाची जबरदस्त मोहिनी आहे हेच खरे.    

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575