Friday, February 9, 2018

‘पेशवाई’ शब्द राजवटीसाठी का वापरला जातो?



गो.स.सरदेसाई हे मोठे इतिहास तज्ज्ञ होते. त्यांनी मुसलमानी रियासत, मराठी रिसायत आणि ब्रिटीश रियासत असे 12 खंड लिहून प्रचंड काम करून ठेवले आहे. आजही त्या तसे काम कुणाला करता आलेले नाही. या ग्रंथांचे पुनर्मुद्रण पॉप्युलर प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.

सरदेसाई यांनी संपूर्ण 8 खंडांत शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी साम्राज्याचा इतिहास मांडला आहे. या सर्व कालखंडाला ‘मराठी रियासत’ असे नाव दिले आहे. कुठेही ‘पेशवाई रियासत’ असे नाव दिलेले नाही. भीमा कोरेगांव प्रकरणानंतर ज्याला ‘पेशवाई’ म्हणून हिणवल्या जात आहे हा कालखंड नेमका कोणता?
पेशवे हे छत्रपतींचे मुख्य प्रधान होते. त्यांची ‘पेशवाई’ नावाची स्वतंत्र अशी राजवट नव्हती. अधिकार मोठ्या प्रमाणात पेशव्यांजवळ केंद्रित झाले होते हे जरी खरे असले तरी शिक्का चालायचा तो छत्रपतींचाच. दिल्लीचे तख्त फोडल्यावर त्यावर पेशवे किंवा शिंदे हे स्वत: जावून बसले नाहीत.

मराठेशाहीचे जे सरदार होते ते सर्व छत्रपतींच्या नावानेच आपला कारभार करायचे. पुढे पेशवे दुबळे झाले तेंव्हा इंदूर सारखे संस्थान आणि अहिल्याबाईंसारखी कर्तबगार स्त्री स्वतंत्र निर्णय घेवून कारभार करत राहीली. पण तिच्या राजवटीला ‘अहिल्याशाही’ असे नाव कुणी दिले नाही. याच प्रमाणे ग्वालेरच्या राजवटीला ‘शिंदेशाही’ किंवा बडोड्याच्या राजवटीला ‘गायकवाडी’ असे संबोधले गेले नाही. शिंदेशाही किंवा गायकवाडी असे उल्लेख स्थानिक संदर्भातच फक्त येतात. संपूर्ण राजवटीसाठी कधीच नाही.

शिवाजी महाराजांच्या आधी शहाजी राजे निजामशाहीत सरदार होते. मलिक अंबर हा निजामशाहीचा वजीर होता. त्यानेच प्रामुख्याने निजामशाही जिवंत ठेवली, वाढवली. औरंगाबाद सारखे उत्तम नगर रचना असलेले शहर 16 व्या शतकात निर्माण केले. गनिमी काव्यासारखी युद्धनिती इथल्या सैनिकांना शिकवली. मोगलांविरूद्ध दक्षिण भारताची अस्मिता जागृत केली. पण असे असले तरी या कालखंडाला ‘मलिकशाही’ म्हणून संबोधले जात नाही. हा कालखंड निजामशाही म्हणूनच संबोधला जातो. इतकेच काय पण मुतूर्जा निजाम या निजामाच्या नातवाला मांडिवर घेवून शहाजी राजांनी स्वतंत्र कारभार करण्यास सुरवात केली. पण त्याही कालखंडाला ‘शहाजीशाही’ असे कुणी संबोधत नाही.

मादण्णा आणि आकण्णा हे दोघे बंधू कुतूबशहाचे वजीर म्हणून कार्यरत होते. शिवाजी महाराजांनी जेंव्हा गोवळकोंड्याला भेट दिली तेंव्हा तो सगळा भेटीचा योग याच बंधूंनी घडवून आणला होता. पुढे शिवाजी महाराज श्रीशैल्यंम च्या देवस्थानला गेले. मराठेशाही आणि कुतूबशाही यांच्यात सलोखा निर्माण करण्यात या मादण्णा आणि अक्कण्णा यांच फार मोठा वाटा मानला जातो. पण या कालखंडाला ‘मादण्णाशाही’ म्हणून संबोधले गेलेले नाही. याला कुतूबशाहीच म्हणतात.

पुढे कुतूबशाही मोगलांनी बुडवल्यानंतर मीर कमरूद्दीन यांस मोगलांनी दक्षिणेचा सुभेदार बनवले. मोगलांच्या दुफळीचा फायदा घेत त्याने स्वत:ची स्वतंत्र राजवट स्थापन केली. त्याला ‘असफजाही’ राजवट असे संबोधल्या गेले.  पण कमरूद्दीन जेंव्हा मोगलांची चाकरी करत होता त्या काळाला ‘असफजाही’ म्हणत नाहीत.

कमरूद्दीनने स्वत:ला ‘निजाम’ ही पदवी धारण केल्या मुळे बर्‍याचदा या कालखंडाला ‘निजामी’ राजवट असेही बोली भाषेत संबोधले जाते.

या प्रमाणे पेशव्यांनी पुण्यात कुठल्याही स्वतंत्र राज्याची स्थापना केली नाही. कुठल्याही नविन पेशव्याची नेमणुक ही सातार्‍याच्या छत्रपतींच्या आदेशानेच होत होती.

आजही सातारची गादी, कोल्हापुरची गादी इतकेच काय पण मराठेशाहीचे सरदार म्हणविल्या गेलेले होळकर, गायकवाड, पवार या संस्थानच्या गाद्या आहेत. त्यांचे त्यांचे वंशज गादीवर आहेत. त्यांच्या त्यांच्या प्रचंड प्रमाणातल्या जायदादी आहेत. पण पेशव्यांची कुठलीही गादी नाही. पेशव्यांची कुठेही डोळ्यात भरावी अशी स्थावर जंगम मालमत्ता नाही. असे असतानाही ‘पेशवाई’ या नावानं उपहास का केला जातो?

मराठेशाहीच्या अतिशय बिकट अशा कालखंडात संभाजीपुत्र शाहू यांना मोगलांच्या कैदेतून सोडवून सातारा येथे छत्रपती म्हणून प्रस्थापित करण्याचे काम पेशव्यांनी केले. सामान्य जनतेच्या मनात असलेले छत्रपतींचे स्थान प्रत्यक्षात गादी वाचवून बळकट केले. आजही सातार्‍यात छत्रपतींचे वंशज आहेत. छत्रपतींची गादी आहे. कोल्हापुरलाही राजाराम महाराजांची गादी आहे. आजही मराठी माणूस या गाद्यांना मुजरा करतो.

पेशवाई म्हणून हिणवत असताना फुले काळातील ब्राह्मणेतर चळवळीचा संदर्भ दिला जातो. जो आता पूर्णत: गैरलागू झाला आहे. आताची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. ज्या गावगाड्यांत जाती जातींचे संघर्ष तीव्र होते, आजही काही प्रमाणात का होईना संघर्ष आहेत त्या गावगाड्यांतून ब्राह्मणसमाज स्थलांतरीत झाला आहे.
आज महाराष्ट्राचा जर विचार केला तर तालूक्याचे गांव अथवा नगर पालिकेचे  गांव वगळ्यास इतर ठिकाणी ब्राह्मण औषधालाही सापडत नाही. ज्या शहरी व्यवस्थेत ब्राह्मण स्थलांतरीत झाले आहेत तेथील समस्या जातींवर आधारीत नसून त्या नागरिकीकरणाच्या नविन काळातल्या अशा वेगळ्यात आहेत. तेथे इच्छा असो अगर नसो जातीला तुलनेने दुय्यम स्थान आपोआपच प्राप्त झाले आहे.

म्हणजे ज्या ब्राह्मणी वर्चस्वावर आजही पुरोगामी नेते विचारवंत टिका करत राहतात त्या गावगाड्यात ब्राह्मण शिल्लकच नाही. आणि जिथे ते मोठ्या संख्येने एकवटलेले आहेत तेथिल समस्या या जून्या पद्धतीच्या जातींवर आधारलेल्या व्यवस्थेसारख्या नाहीत.

मग हे समजून घेणार की नाही? शहरातील ब्राह्मण आज ज्याला पुरोगामी म्हणता येईल अशी विचारसरणी अवलंबणारेच जास्त संख्येने आहेत. मग परत त्याच्या समोर ‘मनुस्मृती’, ‘पेशवाई’ ही तुणतूणी का वाजवली जातात?

आज मनुस्मृती प्रमाणे आचरण कुठे शिल्लक आहे? मुळात ‘पेशवाई’ म्हणजे काय हे स्पष्ट झाले पाहिजे. पेशव्यांनी संपूर्णत: कारभार छत्रपतींना स्वामी मानूनच केला. मग छत्रपतींची कारकीर्द ही मनुस्मृती प्रमाणे होती असे मानावयाचे का?  उत्तर पेशवाईच्या काळात दलितांवर अत्याचार झाले हे पूर्णत: खरे आहे. पण त्यासाठी संपूर्ण ब्राह्मण जातीलाच दोष देत बसणे यातून काय साध्य होणार आहे?

स्वत: ब्राह्मणांचे तर काही नुकसान होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण त्यांनी गावगाड्याच्या जून्या व्यवस्थेतून केंव्हाच अंग काढून घेतले आहे. जे सतत ही भाषा वापरतात त्यांची मानसिकता आता विकृत होत जाताना दिसत आहे.  मनुस्मृती पेशवाई चा घोष जेंव्हा नविन पिढी ऐकते आणि ती शोधू पहाते की असा ब्राह्मण आपल्या आजूबाजूला कुठे आहे? तर त्यांना तो जवळपास आढळतच नाही. ‘भ भटजीचा’ असे फक्त जून्या बाराखडीच्या पुस्तकातच होते. आता तसा भटजी लग्न समारंभ आणि काही धार्मिक सोहळे सोडले तर कुठेच दिसत नाही. (मुळात भटपण करणे ही ब्राह्मणांच्या जातीतील केवळ एका अल्पसंख्य पोटजातीचे काम आहे. सगळ्या ब्राह्मणांना पुजा सांगण्याचा आणि दक्षिणा मागण्याचा अधिकार नाही. हे बर्‍याच जणांना माहित नाही. अगदी आत्ता आत्तापर्यंत पुजा सांगणार्‍या ब्राह्मणांसोबत इतर ब्राह्मण बेटी व्यवहार करत नव्हते.तीच स्थिती मरणोत्तर विधी करणारे ब्राह्मण. हे विधी करण्याचा हक्क सर्व ब्राह्मणांना नाही.)  आजच्या तरुणाला सोबतच्या ब्राह्मण मित्रांच्या गळ्यात न जानवे असते ना ते मांसाहाराला नाही म्हणतात ना त्यांची भाषा वेगळी असते. मग या तरूण मुलांना हे उलगडत नाही की ही टीका नेमकी कुणावर केली जात आहे?

(या लेखावर टीका करणार्‍यांना कडक सुचना. माझे मित्र आणि माझ्या मुलांचे मित्र मैत्रिणी इतर जातींचे मोठ्या प्रमाणावर आहेत. शिवाय माझ्या नातेवाईकांमध्ये 22 विवाह आंतर जातिय -आंतर धर्मिय- आंतर देशिय झालेले आहेत. तेंव्हा जीभ वाट्टेल तशी उचलून टाळ्याला लावताना विचार करावा.)




  

1 comment:

  1. उत्तर पेशवाईत दलितांना छळले गेले होते, गळ्यात मडके बांधले गेले होते, पाठीवर झाडू अडकवून फिरावे लागत होते ही सत्यकथा नाही,तर कपोलकल्पित कथा आहे. असे काही घडले नव्हते.

    ReplyDelete