Thursday, February 12, 2015

समग्र शरद जोशी प्रकल्पाच्या निमित्ताने



शरद जोशींच्या वयाला 3 सप्टेंबर 2011 रोजी 76 वर्षे पूर्ण होऊन 77 वे वर्ष सुरू झाले आहे. त्यांच्या या 76 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला आठवतो आहे तो त्यांच्या पंच्याहत्तरीचा सोहळा आणि त्या निमित्ताने माझ्या प्रकाशनाने हाती घेतलेला व पूर्णत्वास नेलेला समग्र शरद जोशी प्रकल्प.

शरद जोशी त्यांचा वाढदिवस साजरा करीत नाहीत. त्या निमित्त एखादा कार्यक्रम ठेवला तर त्याला नकारच देतात हे माहित होते. त्यांची पुस्तकं मी हळू हळू प्रकाशित करीत होतो. त्यांना पंच्च्याहत्तरावे वर्ष लागते आहे हे लक्षात आल्यावर काय कार्यक्रम आखावा हे माझ्या डोक्यात घोळत होते. प्राचार्य सुरेशचंद्र म्हात्रे सरांनी यावर चांगला मार्ग सांगितला. तिथीप्रमाणे त्यांचा जन्म ऋषीपंचमीचा आहे. ही तारीख 2009 मध्ये होती 24 ऑगस्ट. औरंगाबादला शेतकरी संघटनेच्या कार्यकारीणीच्या निमित्ताने ते येणारच होते. तेंव्हा 24 ला त्यांच्या एखाद्या पुस्तकाचे प्रकाशन ठेवले तर त्याला शरद जोशी नकार देणार नाहीत. मग मी तसा घाट घातला. त्यांची दोन पुस्तके प्रकाशित करण्याची तयारी केली.

शरद जोशींचे ‘स्वातंत्र्य का नासले?’ हे पुस्तक मी 1998 मध्येच प्रकाशित करून माझ्या प्रकाशनाला सुरवात केली होती. पण तेंव्हा मी पूर्णवेळ प्रकाशक म्हणून काम करत नव्हतो. त्यांची याच नावाची लेखमाला पाक्षिक शेतकरी संघटक मध्ये छापून आली तेंव्हा मला नितांत आवडली होती. इतकंच काय माझ्यावर तिचा आजही विलक्षण वैचारिक प्रभाव आहे. याचं पुस्तक करा असा लकडा मी म्हात्रे सरांच्या मागे लावला. म्हात्रे सर मोठे वस्ताद! त्यांनी ‘‘आता तुमच्या सारख्या तरूणांनी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे.’’ म्हणत माझे दात माझ्याच घशात घातले. मला आनंद तर वाटलाच पण ‘‘शरद जोशी परवानगी देतील का?’’ असं मी भीत भीत म्हात्रे सरांनाच विचारलं. सरांनीही परत उलट मलाच ‘‘त्यांनी परवानगी दिली. तू छापतोस का?’’ म्हणत मला परत टोलावलं. आणि अमरावती येथे साजर्‍या झालेल्या जनसंसदेच्या भव्य कार्यक्रमात ते पुस्तक मी माझ्या प्रकाशनाच्या वतीने प्रसिद्ध केलं. सुप्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन यांने त्यासाठी अतिशय सुंदर मृखपृष्ठ करून दिलं होतं.

शेतकरी संघटक मधून प्रसिद्ध झालेले मुक्त अर्थव्यवस्थेविषयक लेख मला अतिशय आवडले होेते. त्याचंही एक चांगलं पुस्तक होऊ शकेल असं मला वाटलं. एव्हाना मी ‘जनशक्ती वाचक चळवळ’ नावानं पुस्तकांचा व्यवसाय पूर्णवेळ सुरू केला होता. मग प्रकाशनालाही तेच नाव ठेवायचं ठरवलं.‘‘खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने’’ या नावाने हे पुस्तक नोव्हेंबर 2003 प्रसिद्ध केलं. सोबत शेतकरी संघटनेतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रे असलेलं माझ्या वडिलांचं (ऍड. अनंत उमरीकर) यांचं ‘वेडेपीर’ हे  पुस्तकही प्रकाशित केलं.

शेतकरी संघटनेचा कार्यक्रम असला की आम्ही पुस्तकांचे गठ्ठे घेऊन विक्रीला बसायचो. सोबत संघटनेचे बिल्ले, संघटनेत लोकप्रिय असलेले कवी इंद्रजीत भालेराव यांचे कवितासंग्रह,  तसेच शेतकरी प्रकाशनाची जुनी पुस्तकंही असायची. शरद जोशींचं सगळंच वाङ्मय प्रकाशित करावं असं मला मनापासून वाटायला लागलं. कार्यकर्ते कार्यक्रमाची वेळी ही भावना वेळोवेळी व्यक्त करायचे. शरद जोशींनी आत्मचरित्रात्मक काही लेख साप्ताहिक ग्यानबा मध्ये लिहीले होते. आपल्या आईचं, बाबुलाल परदेशीचं, शंकरराव वाघांचं अशी काही व्यक्तिचित्रं फार उत्तम लिहीली होती. विद्यार्थ्यांना लिहीलेलं पत्रही ललित साहित्याचा एक उत्तम नमुनाच. हा सगळा मजकूर एकत्र करून त्याचं एक पुस्तक करावं असं ठरवलं. प्रा. इंद्रजित भालेराव यांनी तर या पुस्तकासाठी मागे लकडाच लावला. ‘अंगारमळा’ या नावानं हे पुस्तक त्यांच्या वाढदिवशी 3 सप्टेंबर 2008 ला मी प्रसिद्ध केलं. त्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ठ वाङ्मय निर्मितीचा प्रथम पुरस्कारही मिळाला.

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जे पुस्तक सगळ्यात लोकप्रिय होतं ते शरद जोशींचं ‘शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती’. त्या पुस्तकाचे पुनर्मुद्रणही अंगारमळा नंतर लगेच नोव्हेंबर 2008 मध्ये औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या 11 व्या अधिवेशनात केलं. आत्तापर्यंत त्यांची चार पुस्तकं प्रसिद्ध झाली होती. या पार्श्वभूमीवर पंच्याहत्तरीचा सोहळा घेण्याचं ठरलं. आता त्यांचं जुनं पुस्तक ‘प्रचलित अर्थव्यवस्थेेवर नवा प्रकाश’ (पूर्वी दोन भागात असलेलं) आणि ‘शेतकर्‍यांचा राजा शिवाजी’ यांची तयारी आम्ही केली. शेतकर्‍याचा आसुड शतकाचा मुजरा, शेतकरी कामगार पक्ष एक अवलोकन आणि जातीयवादाचा भस्मासुर या तीन छोट्या पुस्तिका ‘शेतकर्‍यांचा राजा शिवाजी’ मध्येच समाविष्ट केल्या. या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी प्राचार्य रा.रं. बोराडे यांच्या हस्ते शरद जोशींचा सत्कार केला. इंद्रजित भालेराव यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. अतिशय मनोज्ञ असं भाषण शरद जोशींनी या प्रसंगी केलं.

शरद जोशींची एकूण सहा पुस्तकं आतापर्यंत झाली होती. त्यांचं यापूर्वी ग्रंथरूपात प्रकाशित झालेलं सर्व लिखाण आता पुनर्मृमुद्रित झालं. पण शिल्लक लिखाणाचं काय? त्याची वर्गवारी कशी करायची? त्याचं स्वरूप कसं ठेवायचं हाच यक्ष प्रश्‍न होता. औरंगाबादच्या याच कार्यक्रमात महिला आघाडिच्या नेत्या सौ. शैलजा देशपांडे यांनी एक बाड माझ्या हाती दिलं. शरद जोशी यांनी दै. देशोन्नती मध्ये ‘जग बदलणारी पुस्तके’ या नावानं लेखमाला लिहीली होती. त्याचे मुळ लेख असलेलं ते बाड शैलाताईंनी बर्‍याच वर्षांपासून जपून ठेवलं होतं. याचं पुस्तक करा असा त्यांचा प्रेमळ आग्रह. मला ते लेख फारच आवडले. मी आधी ते वाचलेलेच नव्हते. अधाशीसारखं ते बाड मी वाचून काढलं. याच दरम्यान सातारा भुषण पुरस्कार शरद जोशींना जाहिर झाला. त्या कार्यक्रमात 9 जानेवारी 2010 ला हे पुस्तक प्रकाशित होईल असं नियोजन मी केलं. त्याचवेळी इंद्रजित भालेराव यांचे शरद जोशींवरचे आणि त्यांच्या पुस्तकावरचे लेख एकत्र करून ‘मळ्यातील अंगार’ या नावानं पुस्तकही प्रकाशित करण्याचं ठरवलं. विजय कुवळेवकरांच्या हस्ते ही दोन्ही पुस्तके सातार्‍याला त्या कार्यक्रमात प्रकाशित झाली.

दै. लोकमतमध्ये ‘अन्वयार्थ’ या नावानं शरद जोशींनी लेखमाला चालविली होती. 1992-94 तसेच इ.स. 2000-01 या काळातील हे लेख प्रसिद्ध झाले होते. त्याचं पुस्तक आधी करा असं स्वत: जोशींनीच सुचवलं. मी त्या दृष्टिनं काम चालू केलं होतं. मध्यंतरीच्या काळात आपल्या खासदारकीच्या निधीतून त्यांनी परभणीच्या गणेश वाचनालय या संस्थेस 10 लाख रूपये दिले होते. त्या निधीतून बांधण्यात आलेल्या सभागृहाचं काम पूर्ण होत आलं होतं. त्याच्या उद्घाटनासाठी शरद जोशींनी यावं असा संस्थाचालकांना वाटत होतं. पण शरद जोशी परभणीच्या कार्यकर्त्यांवर काही कारणानं नाराज होते. ते काही परभणीला यायला तयार नव्हते. माझ्या वडिलांनी मला पुस्तक प्रकाशनाचं निमित्त करून त्यांना बोलावू असं सुचवलं. ‘अंगारमळा’ पुस्तकाला शासनाचा पुरस्कार मिळाला त्या समारंभासाठी शरद जोशी जाणार नव्हते. मी तो पुरस्कार, रकमेचा धनादेश, स्मृतिचिन्ह सगळं त्यांना द्यायला अंबेठाणला गेलो. त्यांचा मुड चांगला बघून हळूच परभणीला यायचं पिल्लू सोडून दिलं. ‘अन्वयार्थ’ चं प्रकाशन असेल तर येतो अशी त्यांनी अट घातली. मी हो म्हणून तारिखही ठरवून टाकली. मला परत औरंगाबादला आल्यावर लक्षात आलं की मजकूर फारच मोठा झालेला आहे. इतका मजकूर एका पुस्तकात मावणं शक्य नाही. तेंव्हा दोन खंड करावे लागतील. पण आता माघार घेणं शक्य नाही. मग अन्वयार्थ-1 आणि अन्वयार्थ-2 अशी दोन पुस्तकं (382 व 320 पृष्ठांची) तयार झाली.

या सगळ्यातून शरद जोशींचा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होण्याच्या हालचाली शेतकरी संघटना, त्यांचे हितचिंतक सगळ्याकडून सुरू झाल्या. त्याला बघता बघता गती आली. 6 जुनला औरंगाबाद येथे साहित्य मेळावा, 2 ऑक्टोबरला रावेरीला महिला मेळावा आणि 10 नोव्हेंबरला शेगाव येथे शेतकरी महामेळावा असा कार्यक्रमाचा तपशिलही अंतिम ठरला.  ही बैठक परभणीला गणेश वाचनालयाच्या त्याच सभागृहात संपन्न झाली. त्या बैठकीनंतर माझ्या मात्र पोटात गोळा उठला. कारण मला याच कालावधीत उरलेलं लिखाण प्रकाशित करावयाचं होतं. आणि लेखांची फाईल तर अवाढव्य झाली ेाती. 1990 पर्यंतचं त्यांचं लिखाण सुरेशचंद्र म्हात्रे यांनी ग्रंथबद्ध केलं होतं. त्याचं पुनर्मुद्रण ‘शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती’, ‘प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश’ आणि ‘शेतकर्‍यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख’ या तीन पुस्तकातून आम्ही पूर्ण केलं होतं.

लेखांची अवाढव्य कात्रणं लावता लावता त्यांच्या भाषणांचा एक विभाग वेगळा होऊ शकतो असं लक्षात आलं. खुल्या अधिवेशनातील, विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीतील, सभांमधील ही भाषणं होती. मग त्यांना एकत्रित केलं. पुस्तकाला नावही ‘माझ्या शेतकरी भावांना मायबहिणींनो’ असं समर्पक दिलं. कारण हेच संबोधन शरद जोशी नेहमी वापरतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर चांदवडच्या ऐतिहासिक अधिवेशनातील भाषण करतानाचा शरद जोशींचा फोटो जशाच तसा वापरला. आणि अक्षरंही कवीमित्र दासू वैद्य याच्या हस्ताक्षरात करून घेतली. या पुस्तका सोबतच विजय परूळकरांचे शरद जोशींवरचे गाजलेलं पुस्तक ‘योद्धा शेतकरी’ची आवृत्तीही प्रकाशित केली.

शरद जोशींनी शेतकरी आंदोलनविषयक जे लिखाण केलं होतं त्याचं संकलन ‘बळीचे राज्य येणार आहे’ या नावानं केलं. भारत आणि इंडिया ही मांडणी शरद जोशींनी पहिल्यांदा केली आणि रूजवली. शेतकरी आंदोलन विषयक लिखाणाशिवाय जे लिखाण होतं त्याचं संकलन ‘‘भारता’साठी’ याच नावानं कर असं महापारेषणमधील माझा अभियंता मित्र शशांक जेवळीकर याने सुचवलं.अर्थ संकल्पावर दरवर्षी एक लेख ते जरूर लिहायचे. त्या संकलनास ‘अर्थ तो सांगतो पुन्हा’ हे नाव दिलं. मिलिंद बोकिल यांनी विनोबा भावेंच्या पुस्तकाला ‘ज्ञान ते सांगतो पुन्हा’ हे नाव दिलं होतं. त्यावरून मला हे नाव सुचलं. राजकीय लेखांचं संकलन करताना त्याला काय नाव द्यावं हे कळत नव्हतं. त्यांच्या लेखात ‘पोशिंद्यांची लोकशाही’ हा शब्द सापडला. आणि तेच नाव मला योग्य वाटलं.

चांदवडचं महिला अधिवेशन ही एक प्रचंडच मोठी ऐतिहासिक घटना. त्यावेळी ‘चांदवडची शिदोरी’ नावानं एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली होती. त्याचं लिखाण इतर महिला कार्यकर्त्यांच्या मदतीनं शरद जोशींनीच केलं होतं. त्या नंतरचे या प्रश्नावरचे लेख एकत्र करून त्याच नावानं हे पुस्तक रावेरीच्या महिला मेळाव्यात सिद्ध केलं.

10 नोव्हेंबरला शेगाव येथे शरद जोशींच्या अमृत महोत्सवानिमित्त शेतकरी महामेळावा आयोजिला होता. शरद जोशी येतात का नाही ही शंका सगळ्यांनाच होती. पण ते हजर राहिले. त्यांनी सत्कार स्वीकारला नाही. पण वयोवृद्ध शेतकर्‍याच्या हस्ते मानपत्र स्विकारले. तरूण कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रकल्पातील शेवटची दोन पुस्तके ‘पोशिंद्यांची लोकशाही’ व ‘भारता’साठी प्रकाशित करण्यात आली. लाखो शेतकर्‍यांच्या उपस्थितीत ही पुस्तके प्रकाशित झाली. मी स्वत: मंचावर कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत होतो. आपण योजिलेला प्रकल्प पुर्ण झालेला पाहताना मला भरून आलं. बोलणंच सुचेना. वाटलं आपल्याला माईक सोडून बाजूला व्हावं लागतं की काय. पण काहीसं कठोरपणे स्वत:ला आवरलं. आणि कार्यक्रम पुढे चालू केला.

माझ्यावर शेतकरी संघटनेच्या आंदोलन, सभांपेक्षा, शरद जोशींच्या भाषणांपेक्षा त्यांच्या लिखाणानं विलक्षण प्रभाव पाडला आहे. माझ्या वयाच्या 14 व्या वर्षी माझ्या घरात ‘शेतकरी संघटक’ हे पाक्षिक यायला लागले. तेंव्हापासून मी शरद जोशींच्या लिखाणाने पागल झालो. प्रत्यक्षात त्यांचं भाषण दहा वर्षांनी मी ऐकलं. दहा वर्षांनी प्रत्यक्ष सभांना जायला लागलो.

राष्ट्रिय कृषी निती नावानं एक छोटी पुस्तिका शरद जोशींनी लिहीली होती. व्हि.पी.सिंहांच्या काळातील कृषि समितीचा तो अहवाल होतो. त्यानंतर वाजपेयी सरकारच्या काळातील कृषि कार्यदलाचाही एक अहवाल आहे. या दोन्हीचं पुस्तक मराठीत करणं शिल्लक आहे.

शेतकरी संघटना : आठवणी, आस्था, अपेक्षा आणि आक्षेप नावाचं एक पुस्तक सध्या मी संपादित करतो आहे. शरद जोशींवर-शेतकरी संघटनेवर विविध मान्यवरांनी, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेलं लिखाण या निमित्तानं संपादित करून ते पुस्तक रूपानं आणण्याची योजना आहे. सदा डुंबरे व राजू परूळेकर यांनी घेतलेल्या शरद जोशींच्या मुलाखतींचाही यात समावेश आहे. चतुरंग प्रतिष्ठानने शरद जोशींना जीवनगौरव पुरस्कार जाहिर केला आहे. त्या सोहळ्यात या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा मानस आहे. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. द.ना.धनागरे, विजय कुवळेकर, मिलिंद मुरूगकर, दत्तप्रसाद दाभोळकर, सतिष कामत, भानू काळे, विद्युत भागवत, हेरंब कुलकर्णी, कथाकार आसाराम लोमटे या मान्यवरांचे लेख यात आहेत. चंद्रकांत वानखेडे, तुकाराम निरगुडे, अमर हबीब, राजीव बसर्गेकर, रमेश चिल्ले, बाबुलाल परदेशी या कार्यकर्त्यांनी सांगितलेल्या आठवणी यात घेतल्या आहेत.

शरद जोशींच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांचं समग्र साहित्य अभ्यासकांसाठी उपलब्ध असतांना एकच अपेक्षा आहे की या साहित्याचा किमान अभ्यास न करता कुणी या चळवळीवर टीका करू नये.



No comments:

Post a Comment