Saturday, May 19, 2012

सारूनी उन्हाच्या झळा । फिरूनी ये पावसाळा ।।


--------------------------------------------------------------
२१  मे २०१२ पाक्षिक शेतकरी संघटक मधील अग्रलेख
-------------------------------------------------------------


उन्हाच्या झळांनी महाराष्ट्र तापलेला असताना पावसाच्या मोठ्या सरी सर्वत्र कोसळून गेल्या. होरपळणार्‍या मनाला काहीसा गारवा लाभला. राजकारण्यांकडून दुष्काळाचं खेळणं केलं जातं आणि त्याचा फायदा परत ते स्वत:ची तुमडी भरून घेण्यासाठी करतात हे वारंवार सिद्ध झालं आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर उपाय म्हणून जे पॅकेज दिल्या गेलं. त्यातून फायदा झाला तो फक्त बँकांचा शेतकर्‍याला काहीच भेटलं नाही. इतकंच नाही ज्या सिंचनाच्या नावाखाली महाराष्ट्राचे जाणते राजे कायमस्वरूपी बोलत असतात, त्या सिंचनाच्या भयानक आकडेवारीवरून कटूसत्य बाहेर आले आणि तेही मुख्यमंत्र्यांच्या तोंडूनच त्यावरून हेच सत्य सिद्ध होते की, दुष्काळ योजना या सगळ्यांच्या पॅकेजेसचा फायदा नोकरशाहीला आणि राजकारण्यांनाच होतो. सर्वसामान्य शेतकर्‍याला नाही. गेली शेकडो वर्षे उघड्यावरची शेती आपण करत आलो, ज्या ज्या वेळी निसर्गाने साथ दिली, त्या त्या वेळी सर्वसामान्य शेतकर्‍याचं मन भरून आलं. त्याच्या मनात निसर्गाबद्दल अपार कृतज्ञता भरून राहिली. भरभरून आलेल्या पिकासाठी त्याने मन भरून दानधर्म केला. मंदिरं उभारली. खोट्या खोट्या देवांची पूजा केली आणि हे सगळं तुझ्या कृपेनं लाभलं म्हणून भावना व्यक्त केल्या. याच्या उलट जेव्हा केव्हा निसर्गाची अवकृपा झाली तेव्हा माणूस मुकाट राहिला. आपल्याच नशिबाला दोष देत राहिला. गेल्या जन्मीचं पाप म्हणून त्यानं स्वत:लाच बोल लावला. परत त्याच देवाकडे त्याने गार्‍हाणं मांडलं. निदान पुढचा हंगाम तरी चांगला येऊ दे म्हणून वर्षानुवर्षे आसमानानं पदरी घातलेल्या दानात तो समाधान मानत आला. घडो काहीही त्याने नेहमी स्वत:कडे कमीपणा घेतला आणि निसर्गाला मोठेपणा दिला. त्याच्यापुढे मान तुकवली. शेकडो वर्षांनी आता काळ बदलला असं म्हणायची प्रथा आहे. आताचं युग हे विज्ञान-तंत्रज्ञानाचं युग आहे असं चड्डी सावरता न येणारं शेंबडं पोरही म्हणतं. अस्मानाच्या संकटाला तोंड देऊन बंपर पीक घेण्याचं धाडसही हा शेतकरी करतो आणि जेव्हा त्याने पिकवलेलं मातीमोल भावाने विकावं लागतं, विकत घेतल्या जातं तेव्हा परत त्याच्या मनात प्रश्र्न उरतो. आता काय करायचं? दोष कुणाला द्यायचा? नुकत्याच हाती आलेल्या अहवालानुसार गहू-तांदळाचं फार मोठं पीक बाजारात येत आहे. जुनं धान्य ठेवायला आजही पुरेशी जागा नाही. शासकीय गोदामांमध्ये तर धान्य सडत आहेच; पण जागा न मिळाल्यामुळे अस्मानाखालच्या खुल्या चौथर्‍यांवर सरेआम या धान्याची कुजण्याची आणि सडण्याची मुक्त व्यवस्था करण्यात आली आहे. एकीकडे अस्मानी संकटाला तोंड देऊन नवनवीन बियाणे वापरून तंत्रज्ञान वापरून मोठ्या प्रमाणात धान्य तयार करायचं, कष्ट करून आपण जगाला पोसतो आहोत म्हणजे आपण पोशिंदे आहोत असं स्वत:लाच सांगायचं. हे तयार झालेलं धान्य बाजारात मातीमोल किमतीने विकायचं आणि त्याची खरेदी करून उघड्या चौथर्‍यांवर मांडून परत येणार्‍या पावसात शासनाने त्याची माती होऊ द्यायची. ‘माती असशी मातीत मिळशी’ हे आपलं भारतीय अध्यात्म अशा रीतीने अनुभवायचं. या सगळ्या दुष्ट व्यवस्थेला काय म्हणावे?
इतकं होऊनही वारंवार सुलतानी संकटांतून हताश झालेला शेतकरी आभाळात ढग आलेले पाहतो. अवकाळी पावसाचे थेंब अत्तरासारखे अंगावर माखून घेतो. मन उल्हासानं भरून घेतो. सगळं बळ एकवटून पेरणीच्या खटाटोपीला लागतो. त्याच्या डोळ्यांत भरलेलं असतं हिरवं स्वप्न. त्याचा आवेश असतो कोलंबससारखा.
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन्‌ आशा
किनारा तुला पामराला (कुसुमाग्रज)
काय म्हणावे या गारूडाला. ना. धों. महानोरांनी दुष्काळी परिस्थितीवर एक मोठी दाहक कविता लिहिली आहे; पण तिची फारशी कुणाला आठवण होत नाही.
पांगलेला पावसाळा वाट भरलेली धुळीने
मोडक्या फांदीस घरटे वाळलेली शुष्क पाने
दूर गेल्या पायवाटा डोंगरांच्या पायथ्याशी
पंख मिटल्या झोपड्यांचे दु:ख कवटाळे उराशी
फाल्गुनाचे पळसओल्या रक्त झडलेल्या फुलांचे
फाटक्या काळ्या भुईला जहर डसलेल्या उन्हाचे
हे जीणे वर्षानुवर्षी काजळी काळी पिकाला
पापण्यांच्या कातळाशी खोल विझला पावसाळा
नुसतं या ओळी जरी वाचल्या तरी गलबलल्यासारखं होतं. शेतीची एक भयाण स्थिती नजरेसमोर येते. या स्थितीशी वर्षानुवर्षे शेतकरी झुंज देत आला आहे; पण असं लिहिणार्‍या महानोरांपेक्षा सगळ्यांना आवडतात आणि सोयीचे वाटतात, लक्षात राहतात
या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतूनी चैतन्य गावे
अशी कोणती पुण्य येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे
हे म्हणणारे महानोरच.
सगळ्यांवरती मात करून वाळून गेलेलं, पिवळं पडलेलं गवतही पावसाच्या एखाद्या शिडकाव्याने हिरवंगार होऊन जातं. सर्वत्र नजरेला भूल पाडणारा हिरवा रंग मोहकपणे पसरतो. आभाळाची निळाई अजूनच झळझळीत होते. बोरकरांसारखा कवीही त्यामुळेच लिहून जातो :
पालवती तुटलेले 
पुन्हा पर्वतांचे पंख
पर्वताचेच नाही तर माणसाच्या मनाचेही तुटलेले पंख या पावसाने पुन्हा पालवतात. पुन्हा आकाशात झेप घेण्याची उभारी धरतात. वर्षानुवर्षे पडणारा हा चकवा नेमका काय आहे? हे कोडं उलगडत नाही. किंबहुना ते उलगडत नाही म्हणूनच जगाचे इतर व्यवहार सुरळीत चालू आहेत. ज्या दिवशी शेतकर्‍याला आपल्या या चकव्याचा उलगडा होईल. त्या दिवशी सरळ रोखठोकपणे तो काहीतरी निर्णय घेईल. हा निर्णय जास्त करून शेती सोडण्याचाच असेल हे निश्र्चित आणि मग शेतकर्‍या तू राजा आहेस म्हणून त्याचं कौतुक करणार्‍यांची त्याच्यासाठी पोवाडे गाणार्‍यांची, त्याच्या कष्टाला, त्याच्या श्रमाला अध्यात्माचा दर्जा देणार्‍यांची मोठी पंचाईत होऊन बसेल.

Saturday, May 5, 2012

अबब! पवार साहेब काय बोललात हे...


--------------------------------------------------------------
६ मे २०१२ पाक्षिक शेतकरी संघटक मधील अग्रलेख
-------------------------------------------------------------

महाराष्ट्राच्या राजकारणाची ज्यांना नसन्‌नस माहीत आहे, थोरल्या साहेबांनंतरचे (यशवंतराव चव्हाण) जे थोरले साहेब आहेत (त्यांच्या नंतरचे धाकटे साहेब आपल्या टगेगिरीच्या कर्तृत्वानं दादा म्हणून घेतात.) जाणते राजे, प्रतिभापती (महाराष्ट्रातल्या भल्या भल्या प्रतिभावंतांचं पानही (पत्ता) ज्यांच्याशिवाय हलत नाही किंवा ज्यांच्याशिवाय या प्रतिभावंतांना कोणी ‘पत’ही देत नाहीत), जगाला वेड लावणार्‍या क्रिकेटला ज्यांनी वेडं केलं असे कायमस्वरूपी पंतप्रधान पदाच्या प्रतिक्षेतील शूरवीर माननीय शरदचंद्रजी पवार साहेब पुण्यात एका कार्यक्रमात बोलले. हे जाणते राजे असं म्हणाले की, गेली 45 वर्षे ऊस आणि साखरेसाठी मी काम केलं; पण ऊस आणि साखरवाले परवा माझ्या दारात येऊन बसले आणि तेव्हापासून मी असं ठरवलं की, यापुढे ऊस आणि साखरेसाठी शब्द खर्च करणार नाही. अरे बाप रे, काय घडले हे? जुन्या नाटकांच्या भाषेत बोलायचे तर मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना? सूर्य पश्र्चिमेला तर उगवला नाही ना?’ पवार साहेब आणि साखर यांचा संबंध नाही म्हणजे काय? सहकाराचं एवढं मोठं साम्राज्य म्हणजे कारखाने नाही म्हणत आम्ही; या कारखान्यांचे जे मालक आहेत त्यांच्या जीवावर उभारलेलं साम्राज्य म्हणजेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे मालक म्हणजे पवार साहेब आणि तेच असं म्हणतात की, मी आता साखरेसाठी शब्द टाकणार नाही. काय हे?
बरं कार्यक्रम कुठला तर ब्राझील आणि भारताच्या साखर उद्योगाची तुलना करणार्‍या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ. पवार साहेबांच्या मांडीला मांडी लावून सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जे की सध्या कॉंग्रेसमध्ये आहेत. हे यासाठी सांगायचं की युतीच्या काळात ते अपक्ष होते आणि मंत्रीही होते. तर ते असो. याच कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी सहकार मजबूत करण्याची गरज व्यक्त केली म्हणजेच सहकारी कारखान्यांचे मालक मजबूत करा, म्हणजेच पर्यायाने पक्ष मजबूत करा आणि पवार साहेब तर म्हणतायत, मी साखरेसाठी शब्द टाकणार नाही. आता काय करा?
शेतकर्‍यांसाठी चळवळ करणारे सगळेच असं म्हणतात. पवार साहेबांच्या शब्दांमुळे साखर उद्योगाचे हे हाल झाले म्हणजे आता पवार साहेब जर साखरेत लक्ष घालणार नसतील (त्यांच्या बोलण्याचा सरळ अर्थ काढण्याचा वेडेपणा केला तर...) तर साखर उद्योगाचं आता होणार काय? पुढे बोलताना पवार साहेब असं म्हणाले, ‘बाजरी आणि ज्वारी पिकवणार्‍या छोट्या शेतकर्‍यांसाठी आंदोलन का करत नाही?’ त्यांचा रोख कुणाकडे होता हे महाराष्ट्रातल्या शेंबड्या पोरालासुद्धा कळतं. कॉंग्रेसी नेत्यांच्या चिथावणीवरून माननीय खासदार राजू शेट्टी उठले आणि पदयात्रा घेऊन बारामतीत धडकले. ही ठसठस आजही पवार साहेब विसरायला तयार नाहीत. या पदयात्रेच्या रस्त्यामध्ये हर्षवर्धन पाटलांचंही गाव होतं; पण मात्र कुठलेही आंदोलन राजू शेट्टींनी केले नाही. हेही साहेबांच्या ठसठशीचं कारण. त्याही आधीचं कारण जरा वेगळंच आहे. 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण महाराष्ट्रातल्या पवार साहेबांच्या गडामध्ये प्रचंड पडझड झाली. कोल्हापूरला सदाशिवराव मंडलिक, इचलकरंजीला राजू शेट्टी, सांगलीला प्रतीक पाटील असे खासदार निवडून आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नामोनिशाण राहिले नाही. या भागांमध्ये कॉंग्रेसवाल्यांनी जे पोस्टर्स लावले होते त्यावर प्रतीक पाटलांचा फोटो आणि खाली राजू शेट्टी आणि सदाशिवराव मंडलिकांचे फोटो आणि वाक्य होतं, एकावर दोन फ्री. ही जी एकावर दोन फ्रीची स्कीम होती त्यामध्ये राष्ट्रवादीचा कचरा झाला. ती ठसठस अजूनही साहेबांच्या मनात असावी. या सगळ्या पार्श्र्वभूमीवर साहेब परवा बोलले. बरं दुसरी एक भानगड लगेचच उत्पन्न झाली- या मागे ज्यांचा हात होता ते पतंगराव कदम त्यांची कॉंग्रेस पक्षात घुसमट होते आहे, त्यांनी योग्य ती दिशा धरून कृती करावी, असं एक विधान साहेबांनी केलं आणि अपेक्षेप्रमाणे पूर्ण गोंधळ उडवून दिला. आता उद्या पतंगराव राष्ट्रवादीमध्ये आले तर मग आर. आर. पाटील, जयंत पाटील कंपनीचं कसं? यात पुन्हा एक भानगड म्हणजे पतंगराव कदमांच्या दिवट्या चिरंजीवांनी युवक कॉंग्रेसची निवडणूक जिंकल्यावर आपल्या पंखांत प्रचंड शक्ती आल्याचा आव आणत एक विधान राष्ट्रवादीबद्दल ठोकून दिलं. राष्ट्रवादी कॉंग्रेसने घड्याळ हे चिन्ह बदलून खंजीर हे चिन्ह घ्यावं, कारण धोका देणे ही राष्ट्रवादीची वृत्ती आहे. आणि त्याच दिवट्या चिरंजीवांच्या वडलांना पवार साहेब खुणा करून आपल्याकडे बोलवत आहेत. सांगा पवार साहेब, तुमच्या बोलण्याचे काय अर्थ काढायचे. गेली 45 वर्षे तुम्ही साखरेसाठी शब्द टाकलात. साखरेचं काय झालं सांगायची गरज नाही. तुमचेच अनुयायी असलेले धाकल्या साहेबांचे जवळचे नातेवाईक असलेले उस्मानाबाद नरेश, उस्मानाबादचे सम्राट, उस्मानाबादचे भाग्यविधाते माननीय खासदार पद्मसिंह पाटील यांच्याच गावात शेतकर्‍यांनी उभा ऊस पेटवून दिला ही आताची घटना आहे. पवार साहेब तुमच्याच वृत्तपत्रात या बातम्या सक्काळी सक्काळी उभ्या महाराष्ट्राने वाचल्या आणि महाराष्ट्र आडवा झाला. हे सगळं नुकतंच घडलंय आणि तुम्ही सांगताहात साखरेबद्दल मी आता शब्दही टाकणार नाही.
ज्वारी आणि बाजरीच्या शेतकर्‍यांबद्दलची भाषा तुमच्या तोंडून बाहेर पडली आणि सगळेच अवाक्‌ झाले. एरवी ज्वारी, बाजरी, मक्यापासून मद्यनिर्मिती करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मागणी होत होती, त्याला खोडते घालण्याचं काम तुम्हीच केलंत आणि जे परवाने दिले तेही राजकीय पार्श्र्वभूमीच्या लोकांनाच. मग सांगा ना पवार साहेब, ज्वारी, बाजरीसाठी कोण आणि काय आंदोलन करणार? साहेब तुमचं आता वय झालं, असं तुम्हीच सांगत फिरता. लोकसभेची निवडणूक लढवायची नाही, असंही तुम्हीच म्हणत फिरता मग तुम्हीच करा ना आंदोलन. असंही तुम्ही शेतकर्‍यांसाठी मे महिन्यात आंदोलन करण्याचं घोषीत केलंच आहे. फार चांगली गोष्ट आहे. जो मंत्री शेतीविषयक धोरणं ठरवतो, ज्याच्या धोरणांनी लाखो शेतकरी आत्महत्या करतात, करोडो शेतकरी आत्महत्येच्या कड्यावर उभे राहतात, करोडो शेतकरी हलाखीचे जीवन जगतात आणि तोच आता म्हणतो आहे- शेतकर्‍यांसाठी आंदोलन करायचं. क्या बात है! एक उर्दु शेर आहे :
क्या खूब रंग बदल दिया है इन्किलाब ने गुलिस्तॉं का
फूल मुरझा गए और कॉंटो में बहार आ गयी
असंच काहीतरी घडताना दिसत आहे. आता राज्यकर्तेच आंदोलन करणार म्हणे! करो बापडे! आमच्या त्यांना शुभेच्छा. पण पवार साहेब हे तुम्ही खरंच बोललात ना? नाहीतर उद्या परत तुम्हीच सांगायचे, मी असं बोललोच नाही!

चळवळी आणि पत्रकारिता


--------------------------------------------------------------------
२१ एप्रिल २०१२ पाक्षिक शेतकरी संघटक मधील अग्रलेख
--------------------------------------------------------------------

शेतकरी संघटक पाक्षिकाचा 28वा वर्धापन दिन औरंगाबाद येथे 6 एप्रिल रोजी साजरा झाला. या कार्यक्रमात साप्ताहिक साधनाचे कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ यांनी फार महत्त्वाचे मुद्दे रसिकांसमोर ठेवले. इतर विवेचन करत असतानाच चळवळीची पार्श्र्वभूमी असलेली नियतकालिके वर्तमानपत्रे मात्र बंद पडलेली अथवा खुरटलेली दिसतात, यावर त्यांनी परखडपणे विश्लेषण केले आणि त्यात व्यावसायिक पातळीवरती या नियतकालिकांचं कमी पडणं स्पष्ट केलं. ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एकीकडे बाजारू म्हणून ज्या संस्कृतीला हिणवलं जातं त्या सगळ्या आस्थापना आपला ग्राहकवर्ग कोण आहे हे शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. त्यांचे नंबर मिळवणे, त्यांच्याशी सतत संपर्क करून आपलं उत्पादन त्यांच्यापर्यंत पोहोचविणे, त्यांना खरेदी करण्यास भाग पाडणं यासाठी मोठ्या योजना आखल्या जातात. विशेष प्रयत्न केले जातात. इतकंच नाही, तर मार्केटींग विषयातील तज्ज्ञ याचा वेगळा विचार करतात आणि त्याप्रमाणे धोरणं अमलात आणली जातात. आपला ग्राहक वर्ग टिकवून ठेवण्यासाठी नवीन व्यवस्थेला मोठा आटापीटा करावा लागतो. याच्या नेमकं उलट चळवळीची पार्श्र्वभूमी असलेल्यांना एक फायदा असा मिळतो, एक विशिष्ट वर्ग त्यांच्याशी कायमच बांधलेला असतो. त्याची सहानुभूती नेहमीच चळवळीला मिळत असते. प्रत्यक्ष सक्रीय असलेले किंवा नसलेले सगळेच लोक शक्य होईल ती मदत करण्यास अनुकूल असतातही. विशेषत: जेव्हा आपण नियतकालिकांचा विचार करतो तेव्हा अशा नियतकालिकाला एक हक्काचा वाचक वर्ग लाभलेला असतो. आता प्रश्र्न असा आहे, या हक्काच्या वाचक वर्गापर्यंत सातत्याने पोहोचणे त्यांच्याशी संपर्क ठेवणे, त्यांच्या इच्छा आकांक्षा जाणून घेणे आणि त्याचे प्रतिबिंब आपल्या अंकामध्ये उमटू देणे हे का होत नाही. हे घडताना दिसत नाही, हे तर खरंच आहे. ज्यांना आपण व्यावसायीक माध्यमं म्हणून हिणवतो त्यांचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आढळतो. गावोगावी अगदी खेड्यापाड्यातसुद्धा वितरणाची एक यंत्रणा या माध्यमांनी उभी केलेली असते. ज्या ठिकाणी संपर्काची साधनंसुद्धा नाहीत. त्या ठिकाणी कोकाकोलासारखं शीतपेय किंवा साखळीसमुहातील एखाद्या वृत्तपत्राचा अंक मात्र सहज उपलब्ध असतो. हे काय गौडबंगाल आहे. याचाच अर्थ असा की, माणसाच्या मूलभूत प्रेरणा दाबून टाकण्याचंच काम चळवळी करतात की काय?
अंगारमळा या आत्मचरित्रात्मक लेखसंग्रहात शरद जोशी यांनी ‘बस करा हे समाजसेवेचे ढोंग!’ हा एक अप्रतिम लेख लिहिलेला आहे. त्यामध्ये सामाजिक उपक्रमाची कठोरपणे चिकित्सा केली आहे. अंतर्नाद दिवाळी अंकात हा लेख आल्यावर मोठी चर्चा झडली होती. त्याचीच इथे आठवण होते आहे. विनोद शिरसाठ जेव्हा चळवळीची पार्श्र्वभूमी असलेल्या नियतकालिकांकडून किमान व्यावसायिक कौशल्याची अपेक्षा ठेवतात. त्यामागे त्यांची भूमिका काहीशी अशीच असावी.
आज जग ज्या व्यवस्थेतून जात आहे. त्या व्यवस्थेमध्ये ‘बाजार’ ही एक फार महत्त्वाची गोष्ट म्हणून पुढे येते आहे. खरे तर शेतीमधील उत्पादन करायला ज्यावेळेस माणसाने सुरुवात केली. तिथूनच बाजार सुरू झाला असं म्हणावं लागेल. कारण, एका दाण्याचे हजार दाणे होण्याचा चमत्कार शेतीत घडला होता. हे तयार झालेलं अन्न जेव्हा शिल्लक राहायला लागलं तेव्हा ते दुसर्‍याला देऊन त्याच्याकडून आपल्याला गरजेची गोष्ट मिळवावी ही प्रेरणा माणसाला झाली आणि बाजार अस्तित्वात आला. आज ज्याला बाजारवादी अर्थव्यवस्था म्हणून डावे लोक हिणवतात तेव्हा ते सपशेल विसरून जातात की, बाजाराच्या ‘स्वार्थ’ या प्रेरणेनेच आजपर्यंतचा आर्थिक विकास घडून आला आहे.
विनोद शिरसाठांचीच मांडणी पुढे न्यायची तर असं म्हणावं लागेल, चळवळीची म्हणून जी नियतकालिकं आहेत. त्यांनी डोळसपणे आपला जो वाचक वर्ग आहे, त्यांच्या आशा आकांक्षांसाठी काही एक प्रयत्न करणे जरूरीचे आहे. जर हे प्रयत्न योग्य दिशेने झाले, तर त्याचा उपयोग जसा त्या नियतकालिकांना होईल, तसाच बाजारालाही होईल. उदाहरणार्थ शेतकरी संघटक या पाक्षिकाच्या सर्व वाचकांनी कापूस निर्यातीसंदर्भात आपली मतं ठामपणे आणि ठोस पद्धतीने व्यक्त केली, तर त्याचा एक दबाव धोरण ठरविणार्‍यांवरती येईल, परिणामी या वर्गाच्या विरोधी धोरणं आखली जायची शक्यता कमी होईल. म्हणजे परत एकदा चळवळींचाच; पण वेगळ्या बाजूने विचार करायची गरज यातून स्पष्ट होत जाईल. कायमस्वरूपी रस्त्यावर उतरणे, मोर्चे काढणे, रेल्वे रोकणे, बंद पुकारणे या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य ठरत नाही. असा दबाव पूर्वी शासनावरती यायचा; पण तो आता येत नाही. त्यामुळे जर का नियतकालिकांच्या माध्यमातून (इथे विषय नियतकालिकांचा आहे म्हणून आम्ही त्या मर्यादीत अर्थाने म्हणतो आहोत) आपली मत-मतांतरे व्यक्त केली पाहिजेत. आज इतरही साधने लोकांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रभावी ठरत आहेत. उदाहरणार्थ इंटरनेट, फेसबुक इत्यादी. मुंबईच्या झोपडपट्‌ट्यांचं एक छायाचित्र नुकतंच एका मोठ्या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलं. बहुतांश झोपडपट्‌ट्यांच्या छतांवर महागडे डीश अँटेना आढळून आले. याचा अर्थच असा, टीव्ही चॅनेल्स ही फक्त तथाकथित संपन्न लोकांची मक्तेदारी राहिली नसून झोपडपट्टीतला माणूसही त्याचा ग्राहक आहे. याचाच परिणाम म्हणजे या माध्यमातून सामान्य माणसाच्या आशाआकांक्षेचं चित्र व्यक्त होत जातं. ग्रामीण भागातील समस्यांवर मोठ्या प्रमाणात मराठी चित्रपट येत आहेत, याचं साधं कारण तेच आहे. ग्रामीण भागातील शेतकरी वर्गातला एक वर्ग जो नोकरदार बनला, चार पैसे कमावू लागला, तालुक्याच्या गावी घर करून राहू लागला, ज्याची नाळ अजूनही ग्रामीण भागाशीच जुळलेली आहे, स्वाभाविकच अशा प्रेक्षकांसाठी ग्रामीण पार्श्वभूमी असलेले आणि त्यांच्या समस्यांचं चित्रण करणारे चित्रपट जवळचे वाटणारच. ग्रामीण म्हणविल्या जाणारे साहित्य मोठ्या प्रमाणात गेल्या दोन दशकांत लिहिल्या वाचल्या गेलं, त्याला कारणीभूतही ग्रामीण भागातील तयार झालेला नवमध्यमवर्ग हाच आहे.
चळवळींचा विचार करत असताना साचेबद्ध पद्धतीने चळवळी न करता नव्या परिभाषेतून त्यांना बोलावे लागेल आणि या चळवळींना भाषा देण्याचं काम हे नियतकालिकांना करावं लागेल.