Sunday, August 13, 2017

सत्तर वर्षांतील शेतीमागची साडेसाती


दै. म.टा.  रविवार १३ ऑगस्ट २०१७ 


स्वातंत्र्याचा 70 वर्षांचा इतिहास तपासताना शेतीबाबत ठळकपणे जाणवणारी बाब म्हणजे शेतीमागे लावून ठेवलेली साडेसाती. ही साडेसाती अस्मानी (निसर्ग) आणि सुलतानी (सरकारी धोरणे) या दोघांनी मिळून लावली. 

स्वातंत्र्याच्या आनंदाला पहिले  गालबोट फाळणीचे लागले. शेतीच्या दृष्टीने अतिशय समृद्ध धान्याचे कोठार असा पंजाबचा मोठा भाग पाकिस्तानात गेला. म्हणजे स्वातंत्र्य मिळाले तेच मूळी शेतीच्या उरात मोठी जखम करून. 

संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे नि:संशय नायकत्व महात्मा गांधींकडे जाते. महात्मा गांधींचा विचार हा गावांना खेड्यांना केंद्रभागी ठेवून विकासाचा होता. गांधी स्वत:ला अराजकवादी समजत. सरकारी हस्तक्षेप किमान असावा असा आग्रह गांधींचा होता. पण गांधींचे शिष्य पं. जवाहरलाल नेहरू मात्र नियोजनाचे, सरकारीकरणाचे कट्टर पुरस्कर्ते. त्यांचा सगळा कल शहरी उद्योगांकडे म्हणजे गांधी विचारांच्या बरोब्बर विरूद्ध होता. स्वातंत्र्यानंतर लगेच 5 महिन्यात झालेली  महात्मा गांधींची हत्या शेतीकेंद्री, ग्रामकेंद्री विकासाच्या विचाराला मोठा धक्काच होता. 

गांधींच्या हत्येने इतरांपेक्षा कॉंग्रेसवालेच मनोमन खुष झाले असणार कारण गांधींचा नैतिक धाक त्यांच्या सत्तेच्या लालसेच्या आड येत होता. 70 वर्षांनी आता तरी स्पष्टपणे कबुल केले पाहिजे की नेहरूनितीच्या पाठिराख्यांना गांधीविचार हा मोठा अडथळा वाटत होता. तेंव्हा गोडसेंनी गांधींची हत्या करून त्यांचे एक मोठे काम परस्परच करून टाकले. गांधी विचार हा शेतीला पोषक-पुरक होता. गांधीं विचाराची हत्या करून नेहरूंनी समग्र गांधी हत्येचा कार्यक्रम पूर्ण केला. 

शेतजमिनीसंबंधी काळे कायदे : 

भारताला 26 जानेवारी 1950 ला घटना मिळाली. लागलीच तिच्यात पहिली दुरूस्ती केल्या गेली ती 1951 साली.  घटनेत 9 वे परिशिष्ट जोडल्या गेले. जमिनी संबंधी एक दोन नाही तर तब्बल 13 कायद्यांची यादीच यात टाकण्यात आली. पुढे चालून ती 253 पर्यंत गेली. 

शेतीवरचा हा सगळ्यात मोठा घाला स्वातंत्र्याच्या चार वर्षांत आणि घटना लागू झाल्या झाल्या करण्यात आला. यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जमिनीची मालकी शेतकर्‍यांकडून हिरावून घेतली गेली. शेतीचे राष्ट्रीयकरण तर टाळले पण ते परवडले असते अशा पद्धतीनं जमिन धारणा, जमिन संपादन, जमिन अधिग्रहण हे काळे कायदे निर्माण झाले. शिवाय त्यांच्याविरोधात दाद मागण्याचे न्यायालयीन दरवाजेही बंद करण्यात आले.

धान्याची अजागळ सार्वजनिक वितरण व्यवस्था :

स्वातंत्र्यानंतर लगेच पडलेला दुसरा घाला म्हणजे दुसर्‍या महायुद्धकाळात तयार झालेली सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था (रॅशनिंग) तशीच चालू ठेवल्या गेली. रफी अहमद किदवाई हे अन्न मंत्री होते. त्यांनी ही गचाळ शेतीला घातक योजना रद्द करण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्याप्रमाणे सरकारने यातून अंगही काढून घेतले. पण धान्याचा कुठलाची साठा करून ठेवायची गरज नाही या मुर्ख समजूतीमुळे लगेच दोनच वर्षांत सरकार अडचणीत आले. अपुर्‍या पावसाने, दुष्काळाने शेती पिकली नाही. धान्याची चणचण जाणवू लागली. धान्य बाजारपेठेत मोठा कल्लोळ निर्माण झाला. परिणामी तातडीने सगळ्या धान्य बाजारपेठेचेच राष्ट्रीयकरण करण्यात आले. परिणामी अन्नधान्याचे भाव भयानक कमी पातळीवर स्थिर ठेवणारी रॅशनिंग सारखी अजागळ यंत्रणा बळकट बनली. या यंत्रणेतील भ्रष्टाचार तर इतका भयानक आहे की कॅगने अधिकृतरित्या जाहिर केलेल्या आकडेवारीप्रमाणे फुड कार्पोरेशन ऑफ इंडियाकडे गेलेल्या 100 टन धान्यांपैकी केवळ 60 टनच धान्य बाहेर वाटपासाठी उपलब्ध होते. 40 टन धान्य नासाडी, गळती, कुजणे यात नष्ट होवून जाते. 

रॅशनिंगचा विरोधाभास इतका की ज्या गव्हाला केवळ 2 रूपये किलोचा भाव रॅशनवर मिळतो त्या गव्हाला दळायला किलोला किमान 4 रूपये लागतात. कष्ट करून ज्यानं गहू पिकवला त्याचे मोल केवळ 2 रूपये. आणि  केवळ दळला तर त्याचे मिळणार 4 रूपये? हे सगळं या रॅशनिंग व्यवस्थेत आजही चालू आहे. ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’ या म्हणी प्रमाणे शेतकरी दळतोय आणि सगळी व्यवस्था त्याचे फायदे घेत फुकटात पीठ खात आहेत.

धान्य बाजारपेठेच्या गळ्याला नख : 

भारताला स्वातंत्र्य मिळाले पण भारतीय अन्नधान्याची बाजारपेठ मात्र गेल्या सत्तर वर्षांत पारतंत्र्यात गेली. सगळी बाजारपेठ शासनाने विविध नियमांनी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यांनी पूर्णत: अपंग बनली. ही बाजारपेठ शेतकर्‍यांना भाव मिळावा म्हणून तिचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते पण प्रत्यक्षात हीने शेतीमालाचे भाव पाडण्याचे काम केले. अगदी सरकारी अधिकृत धोरण म्हणून शेतीमालाचे भाव पाडले गेले. (माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यापार मंत्री असताना जागतिक करारात हे कबुल केले आहे की भारतात शेतमालाला उणे 72 टक्के इतका भाव दिला जातो.) भारतात भाव मिळत नाही म्हणून आंतर राष्ट्रीय बाजारात विकावे तर तिथेही निर्यातबंदीची कुर्‍हाड चालवून शेतीविकासाचे पाय कापण्यात आले. 

बाकी सर्व उत्पादने विकायला सर्व बाजारपेठा खुल्या ठेवल्या गेल्या. 1991 नंतरच्या जागतिकीकरण पर्वात जागतिक बाजारपेठेत मोठी संधी विविध उत्पादनांना प्राप्त झाली. पण भारतीय शेतमाल मात्र या संधीपासून वंचित राहिला. नव्हे जाणिवपूर्वक ठेवल्या गेल्या. 

अगदी ताजे उदाहरण आहे. शेतकर्‍यांची डाळ जाहिर केल्याप्रमाणे 5050 रूपयांत खरेदी करण्यात सरकारी यंत्रणा अपुरी पडली. नेमके याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डाळीला 10,000 रूपये इतका भाव होता.  तर मग निदान आपली डाळ आपल्याला भाव देता येत नसेल, खरेदी करता येत नसेल तर निर्यात करण्याची परवानगी द्यायला हवी होती. स्वाभाविकच शेतकर्‍याला न्याय भेटला असता. आणि आज जो तुरडाळीचा प्रश्‍न भयानक बनला तसा तो बनला नसता. 

पण शेतीमालाची देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आपणच आपल्या मालासाठी खराब करून टाकली. 

रास्त भावाचे आंदोलन :

70 च्या दशकात भयानक दुष्काळ पडला. खायला अन्न नव्हते. मग आपल्याकडे हरितक्रांतीची योजना आखली गेली. धान्याचे नवनविन संकरित वाण शोधून उत्पादन वाढविले गेले. याचा सकारात्मक परिणाम असा झाला की या गरिब शेतकर्‍यांनी मेहनतीने हरितक्रांतीला प्रतिसाद देत देशाचे धान्य उत्पादन विक्रमी करून दाखवले. परदेशी मिलो सारख्या डुकराला खायला घातल्या जाणार्‍या धान्यावर जगणारा आपला देश स्वाभिमानाने स्वत: पिकवलेले चविष्ट धान्य खावू लागला. ही किमया तंत्रज्ञानाने घडविली. पण शेतकर्‍याच्या वाट्याला काय आले? उत्पादन वाढले पण उत्पन्न वाढत नाही याची जाणिव शेतकर्‍याला झाली. कारण धान्याचे भाव पाडल्या गेले. 

देशाचे पोट भरले पण शेतकरी मात्र उपाशीच राहिला. परिणामी देशभराचा शेतकरी 1980 नंतर सक्रियपणे आंदोलन करत रस्त्यावर उतरला. शरद जोशी सारख्या विचारवंत नेत्याने सगळ्यांच्या लक्षात आणून दिले की आम्ही पिकवलेल्या मालाला उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव मिळत नाही. तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही उत्पादन वाढविले तरी उत्पन्न वाढत नाही. 

शेतीत नविन तंत्रज्ञानाला विरोध :

1991 नंतर तर नविन आधुनिक तंत्रज्ञान शेतीत वापरायचे नाही अशीच जूलमी सुलतानी धोरणं ठरायला लागली. 

कापसात बी.टी. वाण येण्यासाठी शेतकर्‍यांना झगडावं लागलं. गुजरातेतील शेतकर्‍यांनी चोरून बी.टी.ची लागवड केली. तर त्यांच्या शेतातील पर्‍हाट्या उपटून नेऊन फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा पुरूषार्थ शासनाने दाखवला. इतका शेतकरी विरोध आमच्या नसानसात स्वातंत्र्याच्या 70 वर्षांत भरलेला. 

आता नविन जी.एम. तंत्रज्ञान आलं आहे. परदेशात याचा वापर मोठ्या प्रमाणावर होवू लागला आहे. जी.एम.चा वापर करून मोठ्या प्रमाणात उत्पादनात वाढ होते आहे. शिवाय त्यासाठी लागणारा तणनाशक किटक नाशके यांचा खर्चही लक्षणीय रित्या कमी झाला आहे. 

शेतीत नफा होत नाही परिणामी कुणीही शेतीत गुंतवणुक करायला तयार नाही. स्वाभाविकच शेतीत नविन तंत्रज्ञान यायला तयार नाही. किंवा जे आले आहे त्याची किंमत मोजायला कुणी तयार नाही. 

अशा पद्धतीनं शेतीविरोधी कायदे, अन्नधान्याची सडवलेली बाजारपेठ, तंत्रज्ञानाला विरोध यांची साडेसाती गेल्या सत्तर वर्षांत शेतीमागे लावल्या गेली. परिणामी शेतकर्‍यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात सुरू झाल्या. जागतिकीकरणावर ठेपर ठेवणारे डावे विचारवंत हे विसरतात की शेतीतील पहिली नोंद झालेली आत्महत्या ही 19 मार्च 1986 साहेबराव करपे नावाच्या शेतकर्‍याची होती जी की जागतिकीकरणाच्या 8 वर्षे आधीच झाली होती. उलट जागतिकीकरण पर्वात शेतीला खुला वारा लाभला नाही. शेतमालाची बाजारपेठ स्पर्धेसाठी खुली केली नाही. म्हणून शेतीत समस्या निर्माण झाल्या हे आता आकडेवारींनीही सिद्धच झाले आहे. 

उपाय :

1. शेतीविरोधी कायदे तातडीने बरखास्त करणे
2. शेतमालाची बाजारपेठ संपूर्णत: खुली करून निकोप स्पर्धेला पोषक वातावरण निर्माण करणे
3. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे स्वातंत्र्य शेतीला बहाला करणे
4. सगळ्या शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती तातडीने अंमलात आणणे

भारतीय शेतीमागची साडेसाती या शिवाय संपायची नाही. 

श्रीकांत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ
औरंगाबाद
9422878575

Saturday, August 12, 2017

भारतीय पर्यटनस्थळासाठी परदेशी पाहुण्याची तळमळ


 क भारतीय  म्हणून लाज वाटावी असा प्रसंग आहे. व्हिन्सेंट पासक्लिनी नावाचा 35 वर्षांचा फ्रेंच तरुण महाराष्ट्राच्या आणि विशेषत: औरंगाबाद परिसरातील ऐतिहासक स्थळांच्या प्रेमात पडून गेली 3 वर्षे नियमित भेट द्यायला येतो. इथल्या ऐतिहासिक पर्यटन स्थळांचा अभ्यास करताना त्याला अजिंठा परिसरातील दुर्लक्षित किल्ल्यांची माहिती मिळते. हे किल्ले बघण्यासाठी तो उत्सुक बनतो. गौताळा अभयारण्याला लागून असलेला अंतुरचा किल्ला पाहायचे तो ठरवतो. भारतीय मित्रांना सोबत घेऊन एक चारचाकी वाहन घेऊन निघतो. किल्ल्यापर्यंत जाणारा रस्ता अतिशय खराब. शेवटी तर 4 कि.मी. अंतरावर गाडी अडकतेच. तिथून किल्ल्यावर जायचे कसे? स्थानिक तरुणांना विनंती करून त्यांना मोटारसायकलवर सोडण्यासाठी कसेबसे तयार केले जाते. सोबतच्या मित्रांसोबत व्हिन्सेंट शेवटी अंतुरच्या किल्ल्यावर पोहोचतो. त्या किल्ल्याचे अप्रतिम मजबूत बांधकाम, 800 वर्षांपासून शाबूत भक्कम तटबंदी, पिण्याच्या पाण्यासाठीचे दगडी बांधीव तळे, कुठल्याही खांबाच्या आधाराशिवाय उभे असलेले 30 फूट रुंद आणि 50 फूट लांब असे देखणे सभागृह... हे सगळे पाहून तो चकित होतो. त्याहीपेक्षा या सगळयाबाबत असलेली भारतीयांची अनास्था पाहून तो दु:खी होतो. त्याच्या प्रश्नाने निरुत्तर व्हायला होते, ''व्हाय देअर इज नो बेटर ऍप्रोच रोड? व्हाय यू पीपल नॉट इंटरेस्टेड इन हिस्टरी? व्हॉट्स राँग विथ यू?''
व्हिन्सेंटच्या प्रश्नाला काय उत्तर देणार? इतिहासाचा विषय निघाला की आपण लगेच अस्मितेच्या तलवारी काढतो. पण काही वेळातच लक्षात येते की या तलवारीही निव्वळ बेगडी आहेत. आपण इतिहासाबद्दलही काही करायला तयार नाही.
जगप्रसिध्द अजिंठा लेण्यांच्या परिसरात एक-दोन नाही, तर अंतुर, सुतोंडा, जंजाळा, वेताळवाडी असे चार किल्ले आहेत. आपल्याला फक्त देवगिरीच माहीत असतो. अजिंठा डोंगररांगांत लपलेल्या या किल्ल्यांपर्यंत जायला धड रस्ते नाहीत. या किल्ल्यावरील ऐतिहासिक अवशेषांची अवस्था कठीण आहे. काही वस्तू तर चोरीला गेल्या आहेत. व्हिन्सेंटसारखे परदेशी पर्यटक मोठया उत्सुकतेने येतात, अभ्यास करू पाहतात आणि आपण त्यांना साधी साधनेही उपलब्ध करून देऊ शकत नाही, हे खरे दुर्दैव आहे.
अंतुरच्या किल्ल्यावर फारसी भाषेतील एक शिलालेख आणि एक मोठा दगडी स्तंभ आहे. त्यांचे वाचन अजून झाले की नाही याचीही माहिती नाही. यादवकाळात कुणा मराठा सरदाराने या किल्ल्याची निर्मिती केली, असे म्हणतात. पण त्याबद्दल कुठलाही ठोस पुरावा नाही. किल्ल्यावर दगडी कोरीवकामाचे अप्रतिम नमुने इतस्तत: पसरले आहेत.
उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्या सांध्यावरचा हा सगळा प्रदेश. त्यामुळे या परिसरातील किल्ल्यांना त्या काळात मोठे महत्त्व होते. मोगलांच्या काळात दक्षिणेच्या सुभ्याचे ठिकाण म्हणजे औरंगाबाद. बुऱ्हाणपूर म्हणजे उत्तरेतील शेवटचे मोठे ठिकाण, तर औरंगाबाद म्हणजे दक्षिणेतील पहिले महत्त्वाचे ठिकाण यांच्या दरम्यानचा हा प्रदेश.
अजिंठा परिसरातील किल्ल्यांचे आणखी एक वैशिष्टय आहे. हा सगळा परिसर अतिशय निसर्गसंपन्न आहे. ना.धों. महानोरांसारखे निसर्गकवी या प्रदेशात जन्माला येतात ते उगीच नाही. याच प्रदेशातील सरदार जाधवांसारख्या चित्रकाराला प्रेरणा मिळते ती उगीच नाही. अंतुरच्या किल्ल्याला लागून गौताळा अभयारण्य आहे. तेथील सीता धबधबा अतिशय मोहक आहे. शेकडो फूट दगडी कातळ कापत कापत दरीत झेप घेणारे पाणी निव्वळ नजरबंदी करून पाहणाऱ्याला खिळवून ठेवते. वेरूळ-अजिंठयाची माहिती आहे, पण बाकी स्थळांबाबत ओ की ठो माहीत नाही.
दोन आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक पर्यटनस्थळे जवळ जवळ असलेले संपूर्ण जगातले एकमेव ठिकाण म्हणजे औरंगाबाद. वेरूळ-अजिंठा या दोन्ही ठिकाणांना आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. ही आपली मोठी सांस्कृतिक केंद्रे आहेत. महाराष्ट्राचा विचार करताना आपण औरंगाबादला पर्यटनाची राजधानी म्हणतो. मग या ऐतिहासिक स्थळांपर्यंत पोहोचायला आपण रस्ते का करू शकत नाहीत?
या किल्ल्यांची डागडुजी काही प्रमाणात केली जात आहे. काही ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. पण त्याचबरोबर किल्ल्यांची माहिती असणारे फलक लावले गेले पाहिजेत. औरंगाबादलाच मोठे विद्यापीठ आहे. इथे इतिहास विभाग आहे. त्या विभागाला जबाबदारी देऊन या सगळया ऐतिहासिक स्थळांची माहिती लिहून काढली पाहिजे.
अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी अतिशय सुसज्ज असे पर्यटक माहिती केंद्र उभारले गेले. काही दिवसांतच ते बंद पडले. आकाश धुमणे या आपल्या भारतीय मित्रासोबत व्हिन्सेंट तिथे गेला, तेव्हा ते बंद पाहून त्याला धक्काच बसला. त्याने तशी तक्रार नोंदवली. वीज बील न भरल्याने या केंद्राचा वीजपुरवठा खंडित केला गेला होता, असे हे केंद्र बंद पडण्याचे कारण कळले. आता तो परत सुरळीत करण्यात आला आहे. वेरूळ लेण्यांजवळही असेच पर्यटक माहिती केंद्र आहे. पण पर्यटकांना त्याची माहितीच होत नाही. परिणामी तिथे कुणी जात नाही.
व्हिन्सेंटने मोठया कष्टाने औरंगाबाद परिसराची माहिती गोळा करून ती फ्रेंच भाषेत लिहिली व फ्रेंच पर्यटनाच्या ऑॅनलाइन साइट्सवर द्यायला सुरुवात केली. कारण त्याला आढळले की जी माहिती पूर्वीपासून चालत आलेली आहे, ती अपुरीही आहे, शिवाय चुकीचीही आहे. देवगिरी किल्ल्याच्या अगदी समोर पुरातन 'हमामखाना' आहे. खुलताबादला जर जरी बक्ष दर्ग्याजवळ मलिक अंबरची कबर आहे. पण याची माहितीच नाही. अगदी वर्तमानपत्रेही चुकीची माहितीच प्रमाण मानून बातम्या देतात. औरंगाबाद शहरात असलेला बिबी का मकबरा किंवा दौलताबादला असलेली औरंगजेबाचे गुरू ख्वाजा जैनोद्दिन चिश्ती यांची कबर यांबद्दल चुकीची माहिती मान्यवर इंग्लिश/मराठी दैनिकांत प्रसिध्द झाली. ही माहिती नेटवर उपलब्ध असलेल्या चुकीच्या माहितीच्याच आधारावर दिली गेली होती. व्हिन्सेंटसारख्यांनी वर्तमानपत्रांत पाठपुरावा करून ही माहिती चूक असल्याचे निदर्शनास आणून दिले.
एका परदेशी नागरिकाची ही तळमळ पाहून आपण निदान एक गोष्ट करू शकतो आणि ती म्हणजे त्याच्यासारख्याला होईल तेवढी मदत करणे. त्याला प्रोत्साहन देणे.
संत एकनाथ महाराजांनी 12 वर्षे ज्या जागी तप केले, ती जागा म्हणजे शुलीभंजन. खुलताबादजवळील डोंगरात हे रम्य स्थळ आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, इथे जायला रस्ता खराब आहे म्हणून व्हिन्सेंटसारखा पर्यटक पोहोचू शकला नाही. या डोंगरावर दत्तमंदिर आहे. एकेकाळी बांधलेला रस्ता आता खराब झाला आहे. या ठिकाणच्या आध्यात्मिक परंपरांचा शोध घेण्यासाठी परदेशी पर्यटक मोठया प्रमाणात येऊ पाहत आहेत आणि आपणच त्यांच्या मार्गात अडथळे आणत आहोत.
सर्वप्रथम या परिसराची नीट माहिती गोळा करणे, ती पर्यटकांना कळावी यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करणे, सर्व ऐतिहासिक निसर्गसंपन्न स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी किमान रस्ते तयार करणे हे अतिशय गरजेचे आहे. हे विषय असे आहेत की कुणाला सांगायला जावे, तर सगळयात पहिल्यांदा विचारणाऱ्यालाच सुनावले जाते, ''मग तुम्हीच सांगा काय केलं पाहिजे?'' आता रस्ते खराब आहेत हे काय कुणाला कळत नाही? हे कुणी सांगितले तरच कळणार आहे काय? व्हिन्सेंटला हजारो किलोमीटवरवरून येऊन हे आपल्याला सांगावे लागते, याला काय म्हणावे!
औरंगाबाद परिसरातील ऐतिहासिक निसर्गसंपन्न पर्यटनस्थळांचा विचार केल्यास सगळयात पहिल्यांदा शासनाने या सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी चांगले रस्ते केले पाहिजेत. इतिहासप्रेमी, व्हिन्सेंटसारखे अभ्यासक परदेशी नागरिक, विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी या सगळयांना हाताशी घेऊन या ठिकाणांचे संवर्धन, अभ्यास, माहिती संकलन यासाठी ठोस योजना आखल्या पाहिजेत.
सर्वसामान्य नागरिकांनी अगदी तातडीने अगदी आजपासून करावयाची गोष्ट म्हणजे या ऐतिहासिक स्थळांपाशी गेल्यावर तेथील दगडांवर आपले व आपल्या प्रेयसीचे/प्रियकराचे नाव न लिहिणे आणि या परिसरात कचरा न करणे. इतकी दोन पथ्ये पाळली तरी खूप आहे.
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.
9422878575

Tuesday, August 1, 2017

वृषभ सुक्त



उरूस, सा.विवेक, 6 ऑगस्ट  2017

शिकार करून जगणारा माणूस शेती करायला लागला. मारून खाणारा आता पेरून खायला लागला आणि इथूनच मानवी संस्कृतीची सुरवात झाली असे मानण्यात येते. माणसाला पुढे नांगराचा शोध लागला आणि या नांगराला ओढण्यासाठी बैलाचा उपयोग होवू शकतो हे लक्षात आले आणि मानवी संस्कृतीला एक मोठी कलाटणीच मिळाली. कारण मोठ्या प्रमाणात धान्याचे उत्पादन नांगर-बैल-माणूस यांच्या त्रिवेणी संगमातून व्हायला लागले. अन्नासाठी वणवण फिरायची गरज राहिली नाही. खर्‍या अर्थाने इथून मानवी संस्कृती स्थिर झाली. पोटाची आग विझल्यावर कला संगीत इतर बाबी बहरत गेल्या. माणसाला विचार करायला सवड मिळाली. मेंदूची वाढ पोटाची भूक मिटवल्यामुळे सुरू झाली. याला मुख्य कारणीभूत ठरला तो वृषभ म्हणजेच बैल.

अशा बैलाच्या श्रमावरच आपली संस्कृती उभी आहे.  या बैलाच्या पोटी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षातला एक दिवस त्याच्यासाठी राखून ठेवलेला असतो. कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात आषाढ पौर्णिमेला तर मराठवाडा विदर्भात श्रावण अमावस्येला बैल पोळा साजरा केला जातो. 

पाच हजार वर्षांपूर्वीच्या ऋग्वेदात कृषी सुक्त आहे. त्यात गायींचा बैलांचा आदराने उल्लेख आढळतो. विश्वनाथ खैरे यांनी वेदांतील गाणी म्हणून जे पुस्तक प्रसिद्ध केलंय त्यात या कृषी सुक्ताचा मराठी अनुवाद दिला आहे.

कल्याण बैलांचे तसे माणसांचे
कल्याण करो या शेताचे नांगर
कल्याणाच्या गाठी वडींच्या असोत
कल्याणकारक असावा आसूड ॥

कल्याणा आमुच्या नांगरोत फाळ
नांगर्‍ये चालोत बैलांच्या संगती
कल्यण पाऊस बरसो पाण्याने
आम्हीं सुख द्यावे, शेताजी-सीतेने ॥

बैल-नांगर-माणुस हे यांत्रिकीकरणाचे पहिले प्रतिक. निसर्गाचा विनाश न करता माणसाने केलेला पहिला व्यवसाय म्हणजे शेती. गायीचे जे गोडवे ऋग्वेदात गायले जातात त्याला इतर कारणांबरोबरच शेतीसाठी बैल ती देते म्हणूनही तिचं कौतूक शेती करणार्‍या समाजाला राहिलेले आहे. 

रामायणात भूमीकन्या सीता ही शेतीचे प्रतिक मानली गेली आहे. भूमि नांगरताना जनकाला सीता सापडली असे  मानले जाते. गीतरामायणात ग.दि.माडगुळकर हे लिहीतात तसे

आकाशाशी जडले नाते धरती मातेचे
स्वयंवर झाले सीतेचे

हे गाणे केवळ राम-सीतेच्या स्वयंवराचे नाही. धरती आणि आभाळाच्या मिलनातून शेतीला सुरवात झाली. राम सीतेचे स्वयंवर हे त्या कृषी संस्कृतीचे प्रतिक आहे. 

कवि विठ्ठल वाघ यांचा ‘वृषभ सूक्त’ याच नावाचा कविता संग्रह आहे. विलक्षण अशा ‘भूदेव’ शब्दांत विठ्ठल वाघांनी बैलाचे वर्णन केले आहे. 

बैल आभाळाची कृपा बैल धरतीचा जप
काळ्या मातीची पुण्याई बैल फळलेले तप
बैल घामाची प्रतिमा बैल श्रमाचे प्रतीक
बैल माझ्या शिवारात काढी हिरवे स्वस्तिक

इतक्या सुंदर पद्धतीनं बैलाची प्रतिमा वाघांनी रंगवली आहे. 


जात्यावरच्या ओव्यांमधूनही बैलापोटी असलेली कृतज्ञता, आस्था प्रकट झाली आहे. शेतात पिकलं ते सगळं बैलांच्या श्रमामुळे याची जाणीव जात्यावरच्या ओव्यात दिसते

पिकलं पिकलं । पिकल्याचं नवल काई । नंदी राबलेत बाई ॥
पिकलं पिकलं । जन बोलत कुठं कुठं । नंदी आलेत गुडघीमेट ॥

पण एका ठिकाणी बैलाची ओवी अतिशय काव्यात्मक झाली आहे. 

काळ्या वावरात बईलाचा घाम जिरे ।
गच्च भरलंय रान कणसाचे तुरे ॥

बईलाच्या घामानं रानात पीक आलं आणि कणसाचे तुरे मोठ्या डौलात शेतात डूलताना दिसत आहेत. 


गायीचे वासरू रानभर हूंदडत असते. त्यामागे फिरणारा बाल गुराखी तोही त्याच्या खेळात हरखून गेला असतो. असे हूंडणारे वासरू जेंव्हा बैल होवू पाहते त्या सोबतच तो बाळ गुराखीही अंगापिंडानं मजबूत असा शेतकरी होवू पाहत असतो. इंद्रजीत भालेराव यांच्या ‘दूर राहिला गाव’ कविता संग्रहात वासराची बैल होण्याची प्रक्रिया फार सुरेख पद्धतीनं आली आहे. 

माझ्या वासराने हुंगुनिया माती
जुवाच्या जोत्याला भिडविली छाती
माझ्या वासराने हुंगले आभाळ
आणि धरणीही कापे चळचळ

गायीच्या पोटी आलेलं वासरू छोटा गुराखी मन लावून सांभाळतो. त्याला मोठं करतो. हे घरचे वासरू शेतात काम करण्याजोगते झाले की त्याला मनापासून आनंद होतो. त्याच्या सोबत हा मोठा झालेला शेतकरीही राबतो. दोघांच्या श्रमाला निसर्गाची विशेषत: पावसाची साथ मिळाली तर घरात लक्ष्मी येते अशी सगळ्या शेतकरी समाजाची श्रद्धा आहे. 

कवी विठ्ठल वाघ हे चित्रकारही आहेत. आपल्या कित्येक मित्रांच्या घरात बांगड्यांच्या तुकड्यांतून त्यांनी भिंतीवर चित्रं साकारली आहेत. त्यांनी काढलेल्या मोराइतकाच त्यांचा बैलही प्रसिद्ध आहे. 
हाच बैल जेंव्हा म्हातारा होतो तेंव्हा त्याचा अंत जवळ आला की शेतकर्‍याला अतिशय दु:ख होते. विठ्ठल वाघांनी शेतकर्‍याच्या मृत्यूवर ज्या ओळी लिहील्या आहेत त्या अप्रतिम आहेत. बैलावर इतकं काही लिहील्या गेलंय पण बैलाचा मृत्यू मात्र फारच थोड्या ठिकाणी उमटला आहे. 

बैल गेला तेंव्हा किती रडरडली दमणी
ओले पडद्यात डोळे किती पुसायचे कोणी
झाले वावर हळवे अन आखर व्याकूळ
कृष्णा वाचून गाईचं गेलं मौनात गोकुळ
गेला जीवाचा पोशिंदा अशी माऊलीच गत
पापण्यात उचंबळे तिच्या डोळ्यातली मोट
कुंकु पुसलं मातीचं अन् टिचले बिल्वर
जिथं हरवलं बीज गर्भी कुठले अंकुर ? 

श्रीकांत उमरीकर, जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Thursday, July 27, 2017

मुलांना काय वाचायला द्यावे ?


उरूस, सा.विवेक, 23 जूलै 2017

शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. मुलांना पाठ्येतर वाचायला काय द्यावे हा प्रश्‍न काही पालक आवर्जून विचारतात.ल.म.कडू यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि कुमारांसाठीच्या वाङ्मयाची चर्चा सुरू झाली.  लहान मुलांचे साहित्य आणि त्यातही विशेषत: कुमार वयीन मुलांचे साहित्य मराठीत फारसे नाही म्हणून टीका करत असताना जे उपलब्ध आहे त्याचे काय? यावर आपण बोलतच नाही.
 
उदा. बालभारतीच्या वतीने गेली 46 वर्षे ‘किशोर’ मासिक चालू आहे. गेली दोन वर्षे औरंगाबादला आम्ही हे मासिक उपलब्ध करून देतो आहोत. एका मोठ्या लेखकाला जेंव्हा याबाबत सांगितले तेंव्हा त्यांची प्रतिक्रिया अशी होती, ‘म्हणजे अजून किशोर चालू आहे? मला वाटले बंद पडले.’ अजून एका चांगल्या लेखकाची बर्‍यापैकी वाचकाची प्रतिक्रिया तर मोठी विचित्र, ‘त्यात काय वाचण्यासारखं. आजकाल दर्जा नाही राहिला त्यांचा.’ आम्ही त्याला खोदून खोदून विचारलं की तूम्ही अशातले किती अंक वाचले आहेत? मग त्याने कबूल केले की अशात त्याने किशोर बघितलेही नाही. वाचायचा तर प्रश्‍नच नाही. 

ज्या किशोर मासिकाचा वर उल्लेख केला त्याची किंमत केवळ 7 रूपये आहे. 52 पानांचा ए 4 आकाराचा संपूर्ण रंगीत मजकूर केवळ 7 रूपयांत उपलब्ध आहे. दर महिन्यात प्रकाशित होतो आहे. मग आपण त्याला किती प्रतिसाद देतो? शासकीय पातळीवर याची जी काही वितरणाची व्यवस्था आहे त्याच्या पलीकडे एक सामान्य वाचक म्हणून आपण काय करतो? 

जर मोठ्या प्रमाणावर या मासिकाचे वाचक वाढले, त्यांच्या प्रतिक्रिया नियमित जायला लागल्या तर याचा दबाव संपादकांवर वाढेल. मग स्वाभाविकच मजकूराच्या बाबतीत एक जागरूकता निर्माण होईल. लहान वाचकांच्या प्रतिक्रिया या मासिकात नियमित अगदी फोटोसह प्रसिद्ध होतात. मग आपण आपल्या घरातील मुलांना हे मासिक वाचायला लावून त्यावरच्या प्रतिक्रिया पाठवायला प्रोत्साहित करतो का? 

‘किशोर’ मासिकच नाही तर बालभारतीच्या वतीने पाठ्येतर वाचनासाठी इतरही काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शिवाजी महाराजांवरचा अतिशय चांगला ‘स्मृतीग्रंथ’ बालभारतीने प्रकाशित केलाय. तो तर केवळ कुमार वाचकांसाठीच नाही तर सर्वांसाठीच उपयुक्त आहे. विशेषत: जेंव्हा शिवचरित्राबद्दल नको ते वाद उपस्थित केले जातात अशावेळी महाराजांबद्दल एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित करण्याचे काम बालभारती करते आणि आपण त्याची योग्य ती दखलही घेत नाही याला काय म्हणायचे? डॉ.आ.ह.साळुंखे, न्या.महादेव गोविंद रानडे, कृष्ण अर्जून केळूस्कर, सर जदूनाथ सरकार, शेजवलकर, बेंद्रे, सेतु माधवराव पगडी, डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. अ.रा.कुलकर्णी, नरहर कुरूंदकर आदी मान्यवरांचे लेख या ग्रंथात आहेत.

इतरही काही अतिशय चांगली पुस्तके बालभारतीने प्रकाशित केली आहेत. 

केवळ बालभारतीच नव्हे तर इतरही प्रकाशकांनी कुमारवयीन मुलांसाठी अतिशय चांगली पुस्तके प्रकाशित केली आहेत. मग ही जी पुस्तके उपलब्ध आहेत ती आपण मुलांपर्यंत का नाही पोचवत? 

ज्योत्स्ना प्रकाशनाने सातत्याने लहान मुलांसाठी पुस्तके प्रकाशित केली आहेत. माधुरी पुरंदरे यांनी तर एखादे व्रत घ्यावे, वसा घ्यावा तसा लहान मुलांसाठीच्या लेखनाचा प्रपंच मांडला आहे. त्यांना यापुर्वी साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित केल्या गेले आहे.

त्यांनी संपादीत केलेली  ‘वाचू आनंदे’ या नावाने चार पुस्तके अतिशय देखण्या स्वरूपात प्रकाशित झाली. या पुस्तकांमध्ये चित्रांचाही समावेश होता. त्यांना आम्ही एकदा विचारले की ‘हे इतके महत्त्वाचे काम आहे तर मग ही सगळी चित्रे त्यांच्या मूळ रूपात म्हणजे बहुरंगीत का नाही छापल्या गेली?’ त्यांनी अडचणींचा जो पाढा वाचला त्याने आम्हाला धक्काच बसला. मराठीत मुलांच्या वाचनासाठी अतिशय महत्त्वाचा असा प्रकल्प प्रकाशित होतो. आणि आपण त्यासाठी किमान निधी उभा करू शकत नाहीत? 8 वी पर्यंतच्या मुलांना अभ्यासक्रमाची पुस्तके मोफत वाटली जातात. ज्या पालकांची खरेदी करायची क्षमता आहे त्यालाही ही पुस्तके गरज नसताना फुकट मिळतात. मग अशावेळी या पालकांनीही आपले हे वाचलेले पैसे मोठ्या मनाने ‘वाचू आनंदे’ सारख्या प्रकल्पांवर खर्च करून याला हातभार का लावू नये? 

नवनित प्रकाशनाने कुमारांपेक्षा लहान गटासाठी गोष्टींची पुस्तके बहुरंगी स्वरूपात अतिशय देखणी अशी प्रकाशित केली आहेत. ही पुस्तके विक्रीसाठी प्रत्येक जिल्ह्यात पाठ्यपुस्तकांच्या विक्रीसारखी यंत्रणा उभी केली आहे. त्यासाठी वेगळे विक्री प्रतिनिधी नेमले आहेत. मग हे सगळं इतर प्रकाशकांनी का करू नये? आणि या पुस्तकांना पालकांनी का प्रतिसाद देवू नये? 

मराठीत विंदा करंदीकर, इंदिरा संत, मंगेश पाडगांवकर, शांता शेळके, बाबा भांड, अनिल अवचट अलिकडच्या काळातले उदाहरण म्हणजे कवी दासू वैद्य, कविता महाजन, रेणु पाचपोर यांसारख्या प्रौढ लिखाण करणार्‍या साहित्यिकांनी आवर्जून लहान मुलांसाठी लिहीले आहे. 

भा.रा.भागवत सारख्यांनी तर कुमारवयीन मुलांसाठी जे आणि जेवढे लिहून ठेवले ते अजूनही कुणाला जमलेले नाही. त्यांचा फास्टर फेणे आजही त्या पिढीच्या मनावर अधिराज्य गाजवतो. दिलीप प्रभावळकरांनी नेटाने ‘बोक्या सातबंडे’ ची दहा पुस्तके लिहीली. वीणा गवाणकरांचे ‘एक होता कार्व्हर’ संस्कारक्षम कुमारवयीन मुलांना आजही भावून जाते. ल.म.कडू, राजीव तांबे, राजा मंगळवेढेकर अशासारख्यांनी  नेटाने मुलांसाठी लिहीले. 

आता छपाईचे तंत्र सोपे झाले आहे. बहुरंगी छपाई उत्तम दर्जाची करता येते. इंद्रजित भालेराव यांचे ‘गावाकडं’ हे बालकवितांचे पुस्तक याचे उत्तम उदाहरण आहे. प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन यांच्या चित्राने हे पुस्तक सजले आहे. 

नॅशनल बुक ट्रस्ट जी पुस्तके आहेत ती मजकूरापेक्षाही त्यांच्या चित्रांनी फार महत्त्वाची आहेत. मुलांमध्ये चित्रांचा संस्कार घडविण्यासाठी ही पुस्तके उत्तम आहेत. ही प्रकाशन संस्था शासकीयच  आहे.

जयंत नारळीकरांसारख्या मोठ्या विज्ञान लेखकाने कुमारवयीन मुलांसाठी आवर्जून लिहीले आहे. साहित्य अकादमी या अजून एका शासकिय प्रकाशन संस्थेने नारळीकरांचे बालसाहित्य प्रकाशित केले आहे. ते पण आपण अजून नीटपणे मुलांपर्यंत पोचवू शकलेलो नाही. 

चंपक, चांदोबा, इंद्रजाल कॉमिक्स, वॉल्ट डिस्नेचे ‘विचित्र वाडी’, चाचा चौधरी ही सगळी चित्रमय मासिके कॉमिक्स कालबाह्य झाली हा एक भ्रम आपण करून घेतला आहे. आजही दर्जेदार चित्रांचे पुस्तक मुलांसमोर ठेवा मुलं गुंगून जातात की नाही ते बघा. अजूनही माधुरी पुरंदरे यांचे व्हॅन गॉगचे चरित्र तूमच्या 14 वर्षांच्या चित्रात गोडी असणार्‍या मुलाच्या हातात पडू द्या बघा तो रात्रभर जागून वाचतो की नाही, परिकथाच काय पण जी.ए.नी अनुवादीत केलेली ‘शेव्हिंग ऑफ शॅगपट’ ही कादंबरी द्या मुलीच्या हातात. बघा ती दोन दिवस त्यात पागल होते की नाही. राम पटवर्धनांनी मार्जोरी रोलिंग्जचा केलेला अनुवाद ‘पाडस’ कसा दीर्घ प्रभाव टाकतो मुलांवर ते त्यांच्या हाता देवून अनुभवा. कुमारवयीन मुलांच्या हातात प्रकाश नारायण संतांची ‘लंपन’ मालिकेतील चारही पुस्तके ठेवून बघा ती ‘मॅड’ होतात की नाही. इतकं कशाला श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या ‘डोह’ मधील मुलगा-बाप संबंधातील हळवे अनुबंध कुठल्याही कुमारवयीन मुलाला भारून टाकतात.    

कुमारवयीन मुलांसाठी नविन पुस्तके यायला हवी यात काही वादच नाही. पण आधी जी पुस्तके आहेत ती तरी सर्वत्र पोचायला हवी. आणि मुलांसाठी आग्रहाने ही पुस्तके का पोचवायची तर हीच मुलं भविष्यातले चांगले वाचक आहेत. आत्ता जे प्रौढ आहेत त्यांना वाचनाबद्दल कितीही सांगितले तरी फार परिणाम पडेल ही शक्यता नाही.       
  

श्रीकांत उमरीकर, जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Thursday, July 20, 2017

योगेंद्र यादव यांचा खोटारडेपणा



काळ कसा सुड उगवतो बघा. महागाईच्या विरोधात आंदोलने करण्यात हयात घालविलेल्या समाजवादी नेत्यांना शेतमालाच्या भावासाठी पेटलेल्या आंदोलनात आपलीही पोळी भाजून घ्यावी म्हणून उतरायची वेळ आली आहे.

मंदसौर पासून सुरू झालेली किसान यात्रा दिल्लीत पोचणार आहे. योगेंद्र यादव आपल्या ‘स्वराज इंडिया’ च्यावतीने यात सामिल झाले आहेत. आपल्या लेखात (लोकसत्ता दि. 13 जूलै) या संदर्भात अतिशय धादांत खोटी मांडणी योगेंद्र यादव यांनी केली आहे.  

यादव लिहीतात ‘...एकीकडे भारत विरुद्ध इंडियाचा नारा दिला जात होता, तर दुसरीकडे जमीनदार विरुद्ध शेतमजूर असा लढा होता. नवीन शेतकरी आंदोलनात हा द्वैतवाद संपला आहे.’ 

अहो यादव हा द्वैतवाद होता कुणाच्या मनात? तुम्हा समाजवाद्यांनीच साम्यवाद्यांच्या सुरात सुर मिसळत छोटा शेतकरी विरूद्ध बडा शेतकरी असा वाद रंगवला होता. शेतकरी विरूद्ध शेतमजूर असा भेद मांडला होता. कोरडवाहू विरूद्ध बागायदार असे चित्र उभे केले होते. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शरद जोशी यांनी अगदी आधी 1980 पासून ‘शेतकरी तितूका एक एक’ अशीच मांडणी केली होती. अगदी शेतमजूर हाही अल्पभूधारक शेतकरीच असतो.  कधीकाळी तोही शेतकरीच होता त्यामुळे यांच्यात भेद नाही हीच आग्रही मांडणी केली होती.

इतकेच नाही तर ‘इंडिया विरूद्ध भारत’ हे म्हणत असताना सरकारी पातळीवर जी धोरणं आहेत तिच्यात हा भेद आहे अशी ती मांडणी आहे. इंडियातील नागरिक विरूद्ध भारतातील नागरिक अशी नाही. इंडियात म्हणजे शहरातही झोपडपट्टीत भारत आहे आणि भारतात म्हणजेच ग्रामीण भागात सरकारी कर्मचार्‍यांच्या रूपाने किंवा इतर शासकीय येाजनांच्या लाभार्थींच्या रूपाने इंडिया आहेच अशी मांडणी होती. 

‘...महिला शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यांनीही आता जोर धरला आहे.’ हे वाक्य तर खोटारडेपणाचा कळसच झाले. 1986 ला चांदवड (जि. नाशिक) येथे शेतकरी संघटनेने प्रचंड शेतकरी महिला अधिवेशन भरवून दाखवले. जगात आजतागायत इतक्या महिला कधीच कुठेच गोळा झाल्या नव्हत्या. शेतकर्‍याची बायको म्हणजे गुलामाची गुलाम ही मांडणी पहिल्यांदा शेतकरी संघटनेने केली. पुढे लक्ष्मी मुक्तीचे मोठे आंदोलन उभारल्या गेले. लाखो शेतकर्‍यांनी आपली शेतजमीन बायकोच्या नावावर तेंव्हा करून दिली. 31 वर्षांपूर्वी हे चालू होते तेंव्हा योगेंद्र यादव काय करत होते? त्यांच्या सोबतच्या समाजवादी महिलानेत्या शेतकरी महिला आघाडीच्या मंचावर स्थानापन्न झाल्या होत्या. आणि यादव म्हणताहेत महिला शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यानी आता जोर धरला आहे. 

तिसरा जो सगळ्यात विरोधाभासाचा मुद्दा आहे स्वामिनाथन आयोगाचा. या निमित्ताने सरकारी हस्तक्षेपाचा उंट शेतकर्‍याच्या तंबूत घुसविण्याचा सरकारचा आणि यादवांसगट सगळ्याच समाजवाद्यांचा डाव्यांचा प्रयत्न चालू आहे. 

शेतकरी संघटनेने सुरवातीपासून सरकारी हस्तक्षेपाचा कडाडून विरोध केला आहे. जेंव्हा बंदिस्त व्यवस्था होती तेंव्हा शेतकरी आंदोलनाने उत्पादन खर्चावर रास्त भाव मागितला होता. 1991 च्या डंकेल प्रस्तावाच्या स्वीकारानंतर हमी भाव ही संकल्पना मागे पडली व जागतिक पातळीवर बाजार खुला होताना दिसला. तेंव्हा शेतकरी आंदोलनाने काळाबरोर कुस बदलत शेतीमालाला बाजाराचे स्वातंत्र्य हवे असे मांडले. कुस आता नाही 25 वर्षांपूर्वीच बदलली आहे. 

2000 साला नंतर कापसात बी.टी. कॉटन यावे म्हणून शेतकरी संघटना आग्रही होती. त्या निमित्ताने शेतकर्‍यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य शेतकरी संघटनेने मागितले. तेंव्हाही परत काळानुरूप आंदोलनाने कुस बदलली. 

या सगळ्या बदलाच्या वेळी योगेंद्र यादव आणि आज त्यांच्या बरोबर असलेले डावे समाजवादी साथी काय करत होते? ते या सगळ्याला विरोध करत होते. 

एक साधी तूर खरेदी करायची तर सरकारी यंत्रणेचे डोळे पांढरे पडले. मग सगळा शेतमाल सरकारी हमी भावाने खरेदी करायचे म्हटले तर काय होईल? सगळी सरकारी यंत्रणा कोलमडून पडेल.

असल्या शेखचिल्ली मांगण्या शेतकरी संघटनेने कधीही केल्या नाहीत. तुम्हाला आमच्या तुरीला भाव देता येत नसेल तर निर्यात खुली करा आम्ही बाहेर आमची तुर विकून पैसे कमवू. तूमच्या खरेदीची लाचारी नको अशीच शेतकरी संघटनेची भूमिका राहिलेली आहे. 

असाच मुद्दा कर्जमाफीचा. कर्जमाफी या शब्दालाच शेतकरी संघटनेचा कडाडून विरोध आहे. आम्ही काय गुन्हा केला आहे म्हणून आम्हाला माफी दिली जात आहे? शेतकर्‍यावरील कर्ज हे सरकारी धोरणाचे पाप आहे. तेंव्हा सरकारने जी आत्तापर्यंत शेतकर्‍याची भावात लूट केली आहे तिच्यातून सरकारनेच मुक्ती मिळवावी. म्हणून कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती आम्ही मागतो आहोत. आणि ही कर्जमुक्तीही केवळ सरकारी कर्जाची नसून खासगी कर्जापासूनही हवी. आणि ही मागणी 20 वर्षांपासून असताना योगेंद्र यादव जणू काही यांना कालच नव्याने ही कल्पना सुचली असे मांडत आहेत. 

6 जूलैपासून मंदसौर येथून शेतकरी आंदेालनाचा नवा अध्याय सुरू झाला असे अतिशय धादांत खोटे विधान यादव करत आहेत. वास्तविक ते जे काही मांडत आहेत ते सगळे आधीच मांडून झाले आहे. यादव यात नव्याने आले आहेत इतकेच. आपण दुपारी 12 वाजता उठायचे आणि ‘.. बघा बघा सुर्य उजाडला आहे’ असे म्हणायचे असा हा प्रकार आहे.  

शेतकरी आंदोलनाने तूम्हाला जाग नव्हती तेंव्हाच कुस बदलली आहे. 

शेतकरी स्वामिनाथन आयोगाला कडाडून विरोध करतो आहे. आम्हाला भाव देणारे तुम्ही कोण? तूम्ही आमच्या मार्गात येवू नका. आत्ता टमाट्याचे भाव वाढले आहेत. मग यावर यादव काय भूमिका घेणार? ऊसाचा प्रश्‍न या वर्षी गंभीर होणार आहे कारण उसाचे क्षेत्र जास्तीचे आहे. योगेंद्र यादव तूमच्या सोबतच्या राजू शेट्टींना विचारा काय भूमिका घेणार ते. साखर उद्योग नियंत्रणमुक्त करा ही मागणी ते जेंव्हा शेतकरी संघटनेत रांगत होते तेंव्हा पासून घेतलेली आहे. त्यांना आता ती मंजूर आहे का? तेंव्हा त्यांनी हाताची मुठ वळून शपथ घेतली होती.

यादव तुमच्या सेाबतच्या मेधाताई पाटकरांना विचारा नर्मदा सरोवराचे पाणी गुजरातच्या शेतकर्‍यांना मिळाले त्याला तुम्ही खोडता घातला होता. ती भूमिका आता बदलली आहे का?

योगेंद्र यादव, राजू शेट्टी, मेधा पाटकर यांच्यासारखी मंडळीच कुस बदलून काहीतरी बरळत आहेत. शेतकरी आंदोलनाने वेळोवेळी काळाप्रमाणे योग्य तिथे कुस बदलली आहे. आणि आता ज्या मागण्या घेवून शेतकरी उभा आहे त्या खालील प्रमाणे आहेत. 

1. शेतकर्‍याला बाजारपेठेचे स्वातंत्र्य हवे.
2. शेतकर्‍यााला तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य हवे. 
3. शेतमालाच्या जागतिक व्यापारविषयक धोरणात सातत्य व पारदर्शकता हवी. बाहेर भाव जास्त असताना लादल्या जाणार्‍या अन्यायकारक बंदीला आम्ही कडाडून विरोध करतो. 
4. शेतमालाच्या प्रक्रियेवरील सर्व बंधने उठली पाहिजेत.
5. शेतीविरोधी सर्व कायदे तातडीने रद्द झाले पाहिजेत. 

यातील तूम्हाला काय मंजूर आहे सांगा योगेंद्र यादव? का या सगळ्या स्वतंत्रतावादी मागण्या सोडून तूम्ही शेतकरी आंदोलनाला समाजवादी अंगरखा घालण्याचा अट्टाहास चालू ठेवणार आहात? 

Wednesday, July 19, 2017

संमेलन अध्यक्ष : निवडणूकीने की नियुक्तीने ?


उरूस, सा.विवेक, 23 जूलै 2017

साहित्य संमेलनाचे पडघम वाजायला सुरवात झाली आहे. या वेळेस पहिल्यांदाच संमेलन अध्यक्षाची निवड कशी असावी याबाबत साहित्य महामंडळाने आपल्या बैठकीत गांभिर्याने चर्चा सुरू केली आहे. अजून निर्णय झाला नाही. बैठक सध्यातरी स्थागित आहे. 

सामान्य रसिकांना कित्येक वर्षांपासून पडलेला प्रश्‍न आहे की या संमेलनाचा अध्यक्ष निवडला कसा जातो? त्यासाठी कोण मतदान करते?

महामंडळाच्या मुख्य चार घटक संस्था आहेत. मुंबई साहित्य संघ-मुंबई, महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणे, मराठवाडा साहित्य परिषद-औरंगाबाद आणि विदर्भ साहित्य संघ-नागपुर. या घटक संस्थांना प्रत्येकी काही मते दिलेली आहेत (सध्या ती संख्या 175 आहे). महाराष्ट्राच्या बाहेर बडोदा, गोवा, गुलबर्गा, हैदराबाद येथील साहित्य संस्थांना प्रत्येकी 50 मते दिली आहेत. माजी अध्यक्षांना मतदानाचा अधिकार आहे. असे सगळे मिळून जेमतेम हजार लोकांना मतदानाचा अधिकार प्राप्त आहे. हे मतदार कोण तर त्या त्या घटक संस्थेच्या कार्यकारिणीने निवडलेले लोक. त्याला कसलाही निकष नाही. हे लोक मिळून 12 कोटी मराठी भाषिकांच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडतात. 

यात बदल व्हावा अशी मागणी फार वर्षांपासून विविध स्तरांतून सतत मांडली गेली आहे. सध्याच्या अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेमुळे अतिशय सुमार दर्जाची माणसे अध्यक्ष म्हणून निवडून येत आहेत. अध्यक्षीय भाषणांचा दर्जाही खालावत चालला आहे.  

सर्व घटक संस्थांची साहित्य संमेलने होतात. त्याच्या अध्यक्षपदासाठी निवडणुक होत नाही. विश्व साहित्य संमेलनाचा अध्यक्षही निवडून येत नाही. इतकंच काय ज्या महामंडळाद्वारे हा कारभार चालतो तेथेही लोकशाहीला फाटा दिला आहे. चारही घटक संस्थांनी प्रत्येकी तिन तिन वर्षे अध्यक्षपद व महामंडळाचे कार्यालय वाटून घेतले आहे. तेथेही निवडणूक होत नाही. महाराष्ट्राच्या बाहेरच्या संस्थांना केवळ उपाध्यक्ष पदासारखे नामधारी पद दिले जाते पण महामंडळाचे अध्यक्षपद कधीही दिले जात नाही. 

म्हणजे एकीकडे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणुक म्हटलं की ‘लोकशाही आहे आपण ती नाही कशी म्हणणार?’ असला तोरा मिरवणारे महामंडळ इतर वेळी हीच निवडणुकीची लोकशाही गुंडाळून ठेवते.

या वेळी अजून एक चर्चा महामंंडळाच्या बैठकीत झाली. तो विषय होता साहित्य विषयक काम करणार्‍या इतर काही संस्थांना महामंडळाचे सदस्यत्व द्यायचे की नाही? उदा. कोकणात मधु मंगेश कर्णिक यांनी ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ स्थापून गेली 20 वर्षे सातत्याने संमेलने घेतली आहेत. मोठे उपक्रम राबविले आहेत. कोल्हापुरला ‘दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद’ काम करते आहे. यांना अजूनही साहित्य महामंडळाने आपल्या सभासद संस्था म्हणून मान्यता दिली नाही. ही नेमकी मागणी काय आहे? 

झालं असं की पुण्यात जेंव्हा साहित्य परिषद सुरू झाली तेंव्हा तिचे कार्यक्षेत्र तेंव्हाचा संपूर्ण महाराष्ट्र असे होते. त्यात विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश नव्हते. विदर्भ जेंव्हा महाराष्ट्रात सामिल झाला तेंव्हा त्या प्रदेशात आधिच ‘विदर्भ साहित्य संघ’ ही संस्था कार्यरत होती. मराठवाडा सामिल झाला तेंव्हा हैदराबाद येथून काम करणारी ‘मराठवाडा साहित्य परिषद’ ही संस्था कार्यरत होती. मुंबई शहरापुरता वेगळा ‘मुंबई साहित्य संघ’ होता. 
अखिल भारतीय साहित्य महामंडळ तयार करण्यासाठी या चारही संस्था एकत्र आल्या. पण यामध्ये एक असमतोल होता याचा कुणीही विचारच तेंव्हा केला नाही. प्रत्येकाची आजीव सभासद संख्या वेगवेगळी होती. प्रत्येकाचे कार्यक्षेत्र वेगवेगळे होते. केवळ मुंबई महानगरापुरती ‘मुंबई साहित्य संघ’ ही संस्था. तिच्यात ठाण्याचाही समावेश नाही. विदर्भ, मराठवाडा या स्पष्टच नावाप्रमाणे त्या त्या प्रदेशापुरत्या साहित्य संस्था. नेमकी अडचण आहे ती पुण्याच्या महाराष्ट्र( साहित्य परिषदेबाबत. कारण तिचे कार्यक्षेत्र अवाढव्य आहे. 

साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडताना नेमकी हीच बाब अडचणीची ठरते. आणि अन्याय होतो आहे ही जी भावना आहे तिचा उगम इथेच आहे. मुंबई महानगरातल्या लोकांना 175 मते आहेत. विदर्भाच्या 11 जिल्ह्यांना मिळून 175 मते आहेत. मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यांना मिळून 175 मते आहेत. तर कोकणासह पश्चिम, उत्तर महाराष्ट्र अशा अवाढव्य पसरलेल्या (15 जिल्हे) महाराष्ट्र साहित्य परिषदेलाही केवळ 175 च मते आहेत. 
महाराष्ट्रात सध्या 27 महानगरपालिका आहेत. त्यातील केवळ एक महानगरपालिका (मुंबई) मुंबई साहित्य संघाच्या कार्याक्षेत्रात येते. विदर्भाच्या कार्यक्षेत्रात 4 महानगर पालिका येतात. मराठवाड्याच्या कार्यक्षेत्रातही 4 महानगर पालिका येतात. पण पुण्याचा विचार केला तर तब्बल 18 महानगर पालिका येतात. 

तेंव्हा पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभाजन-त्रिभाजन झाल्याशिवाय हा प्रश्‍न सुटणार नाही. म्हणजे सध्याच्या परिस्थितीत अध्यक्षाची निवड त्यातल्या त्यात निर्दोषपणे करावयाची असल्यास उत्तर महाराष्ट्र साहित्य परिषद (नाशिक, धुळे, जळगांव, नंदूरबार जिल्हे- 4 महानगर पालिका), दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद (सांगली, सातारा, कोल्हापुर, सोलापुर, नगर जिल्हे- 4 महानगर पालिका) व सध्या अस्तित्वात असलेली साहित्य परिषद केवळ पुणे जिल्हया पुरती (किंवा त्यात सलगचा नगर जिल्हा जोडण्यात यावा) तसेच कोकणासाठी सध्या अस्तित्वात असलेली कोकण मराठी साहित्य परिषद इतक्या संस्था तयार कराव्या लागतील. 

यासाठी पुण्याची तयारी नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे गोची आहे पुण्याच्या परिषदेच्या कार्यक्षेत्राची आणि पुण्याचीच परिषदेची मंडळी आपल्या अधिकारात कपात करायला तयार नाहीत. 

सध्या ज्या चार घटक संस्था आहेत त्यांची संख्या वाढून सात झाली तर महामंडळाचे अध्यक्षपद फिरून येण्यास जास्त वेळ लागेल. परिणामी आपली हुकूमत त्यावर राहणार नाही. असा हा सगळा कुणी कबूल करणार नसलेला साहित्यबाह्य मुद्दा आहे.

हे टाळण्यासाठी महामंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय घेवून अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिकांस बहाल करण्यात यावे असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यावर अजूनतरी एकमत झाले नाही. 

इंदिरा संत, विंदा करंदीकर, विजय तेंडूलकर, चि.वि.जोशी, भालचंद्र नेमाडे, बा.भ.बोरकर, मंगेश पाडगांवकर अशी कितीतरी अव्वल दर्जाची साहित्यिक मंडळी अध्यक्ष बनू शकली नाही. 

आता तर ज्याला ही सगळी यंत्रणा यशस्वीपणे हाताळता येते, ‘म्यानेजमेंट’ नीट जमते तोच उभा राहतो. इतर त्या फंदातच पडत नाहीत. अध्यक्षपदासाठी कुणाला उभे करायचे त्या प्रमाणे त्याला अनुकूल लोकांना मतदार करण्यात येते, त्याला अनुकूल ठिकाण साहित्य संमेलनासाठी निवडण्यात येते म्हणजे स्वागत समितीची मते एकगठ्ठा आपल्या ताब्यात येतात. 

या सगळ्या खेळात अव्वल दर्जाचा लेखक आणि खरा रसिक दोघेही भाग घेत नाहीत. मग सुमार दर्जाची माणसे अध्यक्ष म्हणून निवडून येतात आणि आता तर रसिकांनी संमेलनाकडे पाठ फिरवून आपला निषेध स्पष्टपणे नोंदवायला सुरवातही केली आहे. डोंबिवली संमेलनाचा पुरता बोजवारा उडण्याचे कारण हेच. 

असंच चालू राहिले तर ‘मोले घातले रडाया नाही आसु नाही माया’ अशी स्थिती होईल. संमेलन आयोजित होईल, कुणीतरी अध्यक्षपदी निवडून येईल. समोर चार रसिकही असणार नाहीत. एक उपचार म्हणून सगळं उरकले जाईल. 

हे व्हायचे नसेल तर महामंडळाची सध्याची जी कार्यपद्धती-जी रचना आहे त्यात अमुलाग्र बदल करावे लागतील. रसिकाभिमुख निर्णय घेवून ते समंजसपणे चिकाटीने राबवावे लागतील. प्रकाशक, ग्रंथ विक्रेते, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते, गावोगावच्या छोट्यामोठ्या साहित्य-सांस्कृतिक काम करणार्‍या संस्था यांना सगळ्यांना जोडणारा दुवा म्हणून काम करावे लागेल. तर हा साहित्य गंगेचा प्रवाह विशाल होत जाईल. नसता ती गटार गंगाच बनत जाईल यात काही वाद नाही.      

श्रीकांत उमरीकर, जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Tuesday, July 18, 2017

डॉ. लोहिया : कॉंग्रेस विरोधी राजकारणाचा जनक


"समर्थ भारत" स्वप्न - विचार - कृती  (साप्ताहिक विवेक हीरक महोत्सवी विशेष ग्रंथ) 

बरोबर 50 वर्षांपूर्वी सर्वंकष सत्ता भोगणार्‍या कॉंग्रेसचा पराभव करता येऊ शकतो, त्यासाठी आपसातले मतभेद मिटवून एकत्र येणं शक्य आहे अशी मांडणी एका लोकनेत्याने केली होती. आणि महत्त्वाच्या 9 राज्यांमध्ये कॉंग्रेसचा पराभव करून संयुक्त विधायक दलाची सरकारं  स्थापूनही दाखवली होती. दुर्दैवाने या लोकनेत्याचे लगेच निधन झाले आणि कॉंग्रेस विरोधाचे राजकारण बारगळले. त्याच्या शिष्यांनी आपल्या गुरूची शिकवण लक्षात ठेवली नाही. पण त्यांचे शिष्य नसलेल्या, त्या विचार परंपरेतील नसलेल्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कॉंग्रेसचा निर्णायक पराभव करून दाखवला. आधी लोकसभा 2014 मध्ये आणि नंतर 2017 मधील उत्तर प्रदेशातील विधानसभेत. जवळपास 50 वर्षांनी घडलेली ही घटना म्हणजे त्या नेत्याच्या कॉंग्रेसविरोधी राजकारणाला वाहिलेली आदरांजलीच म्हणावी लागेल. त्या महान लोकनेत्याचे नाव होते डॉ. राम मनोहर लोहिया.

चरित्र :

लोहियांच जन्म 23 मार्च 1910 चा. लोहियांचे वडिल कॉंग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात तुरूंगवासही भोगला. लोहिया तरूणपणी शिक्षणासाठी जर्मनीत गेले आणि तेथेच त्यांच्यावर समाजवादाचे संस्कार झाले. लोहियांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कोरडेपणाने कधीच समाजवादाची शिकवण अंगिकारली नाही. भारतीय परंपरा अतिशय डोळसपणे समजून घेवून, भारतीय दर्शनांचा अभ्यास करून, भारतीय मानसिकतेची जाण ठेवूनच त्यांची समाजवाद आपल्या देशात रूजवायचा प्रयत्न केला. साहजिकच बाकिच्या समाजवाद्यांपेक्षा लोहिया नेहमीच वेगळे आणि लक्षणीय वाटत राहिले. 

लोहियांनी ‘मीठ कर व सत्याग्रह’ या विषयावर जर्मनीत प्रबंध लिहून हुम्बोल्ट विद्यापीठात सादर केला. अर्थशास्त्राची डॉक्टरेट त्यांना मिळाली व ते भारतात 1933 मध्ये परतले. 

भारतात तेंव्हा कॉंग्रेस सोशालिस्ट पार्टिच्या स्थापनेच्या हालचाली आचार्य नरेंद्र देव यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाल्या होत्या. अगदी सुरवातीपासूनच लोहिया त्यात सहभागी झाले. कलकत्याहून प्रकाशित होणार्‍या ‘कॉंग्रेस सोशलिस्ट’ या मुखपत्राचे ते संपादक राहिले. अगदी सुरूवातीपासून लोहियांनी आपल्या समाजवादी साथींसमोर दोन धोके अधोरेखित करून ठेवले होते.  एक म्हणजे खुद्द कॉंग्रेस. नेहरूंच्या समाजवादी भूलाव्याला लोहिया कधीच बळी पडले नाहीत. त्यांनी आपला बिगरकॉंग्रेसवाद नेहमीच धगधगता ठेवला. आणि दुसरा धोका म्हणजे कम्युनिस्ट. जयप्रकाश नारायण यांनी कम्युनिस्टांना पक्षात घेतले ही फार मोठी चुक होती अशीच त्यांची आधीपासून धारणा होती. लोहियांसारखीच टीका अच्युतराव पटवर्धन, मिनू मसानी, अशोक मेहता आदींनीही केली होती. 

दुसर्‍या महायुद्धात युद्ध विरोधी भूमिका घेत आपण तिसरी आघाडी उघडावी अशी जोरदार मागणी लोहियांनी महात्माजींकडे केली. इतकेच नाही तर याच काळात ब्रिटीशांविरूद्धही लढा उभारण्याचा लकडा गांधीमागे लावला. पुढे 1942 च्या चले जाव लढ्यात त्यांनी हिरीरीने सहभाग नोंदवला. 

लोहियांचा गांधींवर प्रचंड विश्वास होता. गांधी आहेत तोपर्यंत कॉंग्रेसमध्ये समाजवादी विचारांना, त्या विचारांच्या लोकांना न्याय भेटेल असे त्यांना वाटत होते. पण गांधी हत्येनंतर चित्र पूर्णपणे पलटल्याचे त्यांना जाणवले. नेहरूंची सत्तालालसा लक्षात यायला लागली. पुढे 1948 ला नाशिकच्या संमेलनात समाजवादी पक्ष कॉंग्रेसमधून बाहेरच पडला. पुढे नेहरूंनी तटस्थ राष्ट्रांची जी आघाडी आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडली ती खरे तर लोहियांची संकल्पना. लोहिया दुसर्‍या महायुद्धाच्या आधीपासूनच युद्ध विरोधी तिसर्‍या आघाडीचे हिरीरीने समर्थन करत आले होते. 

लोहियांचे वेगळेपण आणि द्रष्टेपण हे की 1949 लाच पाटण्याच्या आधिवेशनात समाजवादी पक्ष कॉंग्रेसचा पुरक पक्ष आहे का सक्षम विरोधी पक्ष आहे असे विचारून कडव्या विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याची गरज त्यांनी आग्रहानी मांडली.

1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत समाजवादी पक्षाला मोठे अपयश पचवावे लागले. पण तरीही लोहियांनी आपल्या विचारांचा पाया हलू दिला नाही. पराभवानंतर भरलेल्या अधिवेशनात समाजवादी विचारांचे नवदर्शन त्यांनी कार्यकर्त्यांना घडवले. कम्युनिझम व भांडवलशाही दोघांनाही आपला विरोध असल्याचे स्पष्ट प्रतिपादन केले. 

नेहरूंनी 1955 मध्ये आवाडी येथे कॉंग्रेस अधिवेशनात समाजवादी धर्तीचा समाज निर्माण करण्याचा ठराव मंजूर करून घेतला. पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कसलीही हालचाल केली नाही. यामुळे समाजवाद्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात फुट पडली. नेहरूंच्या समाजवादाच्या कृत्रिम प्रेमात अशोक मेहता सारखे अडकले. जयप्रकाश नारायण मऊ पडले. याचा परिणाम एकच झाला की लोहियांना बाहेर पडून दुसरा पक्षच स्थापन करावा लागला. 1956 ला हैदराबाद येथे नविन पक्षाचे पहिले अधिवेशन झाले. तेंव्हा अध्यक्ष म्हणून लोहियांची निवड करण्यात आली.

1962 च्या लोकसभा निवडणुकीत लोहिया पं. नेहरूंच्या विरोधात उभे राहिले. अर्थात लोहियांचा पराभव झाला पण त्यांनी कॉंग्रेसला आणि विशेषत: नेहरूंना विरोध करता येवू शकतो हे आपल्या कृतीने सिद्ध केले. याच वर्षी चीनने भारतावर आक्रमण केले आणि नेहरूंनी उभ्या केलेल्या वैचारिक भूलाव्याचा डोलारा कोसळला. पुढे 1963 च्या पोटनिवडणुकीत लोहिया निवडून आले आणि लोकसभेत पोंचले. त्यांच्या पहिल्याच भाषणाने नेहरू हादरले. नेहरूंना जाणीव झाली असणार की आपण जो समाजवाद मांडतो आहोत तो नकली आहे. खरा समाजवाद तर लोहिया मांडत आहेत. 

1964 च्या नेहरूंच्या मृत्यूनंतर शास्त्रींची अल्प राजवट संपून इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या आणि घराणेशाहीचा एक विकृत नमूना समोर आला. लोहिया जो कॉंग्रेस विरोध स्पष्टपणे मांडत होते त्याला एक प्रकारे या घटनेने पाठिंबाच मिळाला. लोहियाच काळावर खरे ठरले. पुढे 50 वर्षांनी आज जेंव्हा राहूल  गांधींच्या निर्नायकी कारभारामूळे कॉंग्रेस लयाला चालली आहे याची बीजं इंदिरा गांधींच्या राजकारणातच आहेत.

1967 च्या निवडणुकीत लोहिया कनौज मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. त्यांच्या बोलण्याला इंदिरा गांधी वचकून असत. त्या फारशा बोलतच नसत. म्हणून त्यांना लोहियां ‘गुंगी गुडिया’ म्हणत.  याच निवडणुकांत 9 राज्यांमध्ये कॉंग्रेसचा पराभव करत संयुक्त विधायक दलाची सरकारनं स्थापन झाली. दुर्दैवाने यानंतर लगेच लोहियांचे निधन झाले (12 ऑक्टोबर 1967) आणि कॉंग्रेसतर राजकारणातील एक सशक्त हस्ती काळाच्या पडद्याआड गेली.

विचार : 

लोहियांनी भारताबाबत अतिशय स्पष्टपणे स्वतंत्र प्रतिभेने विचार मांडले आहेत. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात लोहिया जर्मनीत होते. त्यांना आंतरराष्ट्रीय परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. परराष्ट्र संबंधात त्यांचा अभ्यास दांडगा होता. मार्क्सवाद आमच्या देशात चालणार नाही. हे लोहियांनी सुरवातीपासूनच मांडले आहे. नेहरू ज्या पद्धतीनं समाजवादी धोरणं मांडत आहेत त्याच्याही मर्यादा लोहियांनी सुरवातीपासूनच स्पष्ट केल्या होत्या.

भारतासारख्या मागास राष्ट्रासाठी अल्पप्रमाण यंत्रांच्या वापराचा विचार ते मांडत होते. युरोप-अमेरिकेच्या अगदी उलट हा विचार होता. मनुष्यबळाचा जास्तीत जास्त बुद्धिमत्तापूर्ण उपयोग करत अल्पप्रमाण यंत्राचा वापर असा तो विचार होता.

मार्क्सवादातील हुकूमशाही ही अतिशय वाईट गोष्ट आहे असे त्यांनी नोंदवले आहे. मार्क्सवाद हे आशियाई देशांविरूद्धचे हत्यारच आहे या महत्त्वपूर्ण निष्कर्षाची नोंदही लोहियांनी घेतली होती.

मार्क्सवादाची चिकित्सा करतानाच लोहियांनी त्यांना प्रिय असलेल्या गांधीवादाचीही चिकित्सा केली आहे. गांधीवाद देशात अपुरा सिद्ध झाला आहे. ‘आज देशात जे काही चालले आहे, तो गांधीवाद नाही, तर गांधीवाद आणि मार्क्सवाद यांचे एक प्रकारचे निकृष्ट प्रतीचे पेय आहे.’ असं लोहिया म्हणतात. 

लोहिया स्वत:ला उदारमतवादी म्हणत. गांधींच्या तत्त्वातील अहिंसा त्यांना प्रिय होती. ‘अहिंसा माझा जवळपास ध्रुवतारा राहिला आहे.’ असं त्यांनी लिहून ठेवलंय. 

महात्मा गांधी आणि अणू बॉंम्ब यांबाबत लिहिताना लोहिया म्हणतात, ‘महात्मा गांधी आणि अणुबॉंब या दोनच आपल्या शतकातील मौलिक गोष्टी आहे आणि हे शतक संपण्यापूर्वी यांपैकी एक दुसरीचा पराभव करील.’ 

लेहियांना भारतीय परंपरांचे विलक्षण आकर्षण होते. त्यांनी राम कृष्ण आणि शिव यांच्यावर फार सुरेख लिहिले आहे. लोहिया लिहितात, ‘हे भारतमाते, आम्हाला शिवाची बुद्धी दे, कृष्णाचे हृदय दे आणि रामाचा एकवचनीपणा व कर्मशक्ती दे. असीमित बुद्धी, उन्मुक्त हृदय आणि मर्यादायुक्त जीवन यांनी आमचे सृजन कर!’

पुराणाकालीन भारतावर चिंतन करताना त्यांनी अनेक पैलू समोर आणले आहेत. पण त्याहीपेेक्षा हजार वर्षांतील भारताच्या बाबतीत त्यांची जी निरिक्षणे मांडली आहेत ती जास्त मार्मिक आणि महत्त्वाची आहेत. त्यातून लोहियांची भारताच्या प्रश्‍नांबाबतची जाण किती सखोल आहे हे लक्षात येते.  

लोहियांचे हे विचार फार महत्त्वाचे आहेत. ‘खोटे समाधान बाळगणार्‍या मुसलमानांना किंवा यातनांचे मूळ कशात आहे, हे न जाणणार्‍या हिंदूंना दीर्घकाळपर्यंत शासनसंस्थेच्या अभावाची जाण आली नाही. गेल्या दहा शतकांहूनही अधिक काळ हिंदूस्थानचा इतिहास ज्यांनी आत्मसात केला ते जाणातत, की शासनसंस्था ही जवळ जवळ भौतिक गरज आहे. इतर सर्व गोष्टी दुय्यम दर्जाच्या आहेत. अगदी माणूस आणि मानवतादेखील. मध्यवर्ती शासन संस्थेच्या अभावामुळे हिंदुस्थानात माणसे नव्हे तर उंदरांची पैदास झाली. माणसांतील गुलामी वृत्तीच्या किंवा लोभी वृत्तीच्या व्यक्तिवादाची दुर्गंधी झाकण्यासाठीचे, सर्वोच्च मानवता हे एक अमूर्त आवरण होते. अजूनही लोक धोका पत्करण्यास तयार नाहीत. ते आपल्या शासनसंस्थेसाठी प्रणांची बाजी लावायला तयार नाहीत. शासनव्यवस्था ज्यांनी दीर्घकाळ अनुभवली अशा लोकांजवळ रग आणि सर्व प्रकारच्या सुरक्षिततेसाठी सुप्त शक्ती असते.’ आज प्रबळ केंद्र सरकार हा विषय समोर येतो आहे त्या पार्श्वभूमीवर लोहियांचे हे विचार तपासून पाहण्यासारखे आहेत. 

लोहिया फाळणीच्या कट्टर विरोधी होते. ‘अंग्रेजी हटाव’ सारखे धोरण त्यांनी हिरीरीने मांडले. भारतातील तीर्थक्षेत्रे एकतेची प्रतिकं आहेत असंही लोहिय मानायचे.  त्यांचे हे विविध पैलू असलेले बंडखोर विचार झापडबंद समाजवादी पठडीतही बसणं मुश्किल होतं. आपले विचार आपल्या काळातही बर्‍याच जणांना पचू शकत नाहीत हे त्यांना जाणवत होते.

लोहियांनी समग्र मानवजातीचा विचार आपल्या भारतीय समाजवादी चौकटीत केला हे विशेष. लोहिया लिहितात

‘.... युरोपिय देशात अत्युच्च समाजिक समता आढळत असली तरी तेथील मनुष्य जीवन आज चिंता, मानसिक ओढाताण व एकप्रकारची शून्यमनस्कता यांनी ग्रस्त झाले आहे. अध्यात्मिक समतेच्या अभावी व ताणावाच्या ओझ्यामुळे आधुनिक संस्कृती युरोपात विव्हळत आहे, कोलमडत आहे. पाश्‍चिमात्य माणसाचे मन शांत नाही. स्वत:साठी घर शोधीत तो घराबाहेर भटकत आहे.

माणसाचा हा वनवास आणि स्वत:लाच हरवून बसण्याची भावना यांचा अंत करणे हाच समाजवादाच्या प्रदीर्घ यात्रेचा उद्देश आहे. आज सर्वत्र व आपल्या देशातही या यात्रेला नवी दिशा मिळवून द्यावी अशी समाजवाद्यांकडून अपेक्षा केली जात आहे. मानवी पूर्णत शोधण्याच्या परंपरेशी केवळ इमान राखता यावे म्हणून नव्हे तर ती परंपरा जिवंत राहवी यासाठी समाजवादाला अशी नवी दिशा देणे आवश्यक आहे....’ (लोहिया विचार दर्शन, पृ. 87) 

जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर त्यातून बाहेर पडून जनसंघाने ‘भारतीय जनता पक्ष’ची निर्मिती केली. त्याच्या सुरवातीच्या उद्दीष्टांतच ‘गांधीवादी समाजवादा’ची विचारसरणी अंगिकारल्याचे अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते. कदाचित त्यांच्या डोळ्यांसमोर लोहियांचेच विचार असावेत.

आज कॉंग्रेसचा निर्णायक राजकीय पराभव करून मोंदींनी लोहियांचे एक स्वप्न पूर्ण केले आहे. आता त्यांच्या विचार सरणीला अनुसरून पावले उचलून कॉंग्रेसेतर इतर राजकीय पक्षांनी बाकी स्वप्न पूर्ण करावे. त्यांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी वर्षा निमित्त हीच लोहियांना खरी श्रद्धांजली ठरेल.   

         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575