Tuesday, December 19, 2017

साहित्यातील सरळ मनाची ‘देशमुखी’


उरूस, विवेक, 24-31 डिसेंबर 2017

लक्ष्मीकांत देशमुख साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आले आणि त्यांना ओळखणार्‍या बहुतांश लोकांच्या मनात एकच प्रतिक्रिया उमटली, ‘एका साध्या सरळ मनाचा लेखक निवडून आला.’ 

स्वातंत्र्यानंतर कष्ट करून शिकलेल्या एका पिढीचे प्रतिनिधित्व देशमुख करतात. फारशी अनुकूलता नसलेल्या काळात आणि प्रदेशात देशमुखांचा जन्म झाला (जन्म सप्टेंबर 1954, मु.पो. मुरूम, जि. उस्मानाबाद). पण त्याचा बाऊ न करता चिवटपणे अभ्यासाने स्पर्धा परिक्षांच्या मार्गाने प्रशासकीय अधिकार्‍याची नौकरी त्यांनी मिळवली. या नौकरीतही इतर सर्वसाधारण अधिकार्‍यासारखे न वागता आपली वेगळी ओळख निर्माण केली. 

प्रशासकीय किचकट जबाबदार्‍या पेलताना त्यांनी आपल्यातला लेखक मरू दिला नाही तर उलट तो अधिक विकसित होवू दिला. आपल्या अनुभवाचा त्यांनी आपल्या लेखनासाठी उलट उपयोगच करून घेतला. नांदेडच्या नगर परिषदेच्या राजकारणावरची त्यांची कादंबरी ‘अंधेनगरी’ यातून त्याची साक्ष मिळते. केवळ स्थानिक राजकारणच नव्हे तर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आपला अभ्यासही त्यांनी ‘इन्किलाब वि. जिहाद’ सारख्या बृहद कादंबर्‍यांमधून ललित भाषेत मांडला. 

अधिकारी आणि त्यातही परत लेखक मग तर तो आपल्या कोषात अधिकच गुरफटून जातो. इथेही देशमुख अपवाद ठरले. ते परभणीला निवासी उप-जिल्हाधिकारी म्हणून होते त्या काळात परभणीच्या वाङ्मयीत चळवळीत त्यांनी आपले पद, प्रतिष्ठा बाजूला ठेवून अक्षरश: एखाद्या सामान्य कार्यकर्त्यासारखे झोकून दिले. त्यांचे निवासस्थान म्हणजे तेंव्हा सहित्य संस्थेचे अनधिकृत कार्यालयच बनले होते.  67 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करताना, त्याची आखणी करताना आणि विनाविघ्न ते पार पाडताना देशमुखांचे योगदान अतिशय मोलाचे ठरले होते. 

त्यांच्या तीन वाङ्मयीन कलाकृतींचा साहित्यीक दृष्टीने  विचार न करता जरा वेगळा विचार करावा लागेल. पहिली कलाकृती म्हणजे त्यांनी स्त्री भ्रृण हत्ये संदर्भात जे अतिशय मोलाचे काम कोल्हापुरला जिल्हाधिकारी असताना केले त्यावरचा कथा संग्रह ‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी’. स्त्री-भ्रुण हत्येबाबत जनजागृती करण्याचे मोठे काम त्यांनी केले. हे काम सरकारी पातळीवर किंवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या पातळीवर न ठेवता त्याला कलात्मक रूप दिले हे महत्त्वाचे. साहित्याचे प्रयोजन काय आहे यावर निव्वळ पुस्तकी चर्चा करणार्‍यांनी हे उदाहरण लक्षात घ्यायला पाहिजे. 

दुसरा कथा संग्रह आहे ‘पाणी ! पाणी !!’. फार आधीपासून कदाचित शासकीय उच्चपदस्थ म्हणून काम करताना असेल पण त्यांना पाणीप्रश्‍नाची तीव्रता जाणवली होती. तेंव्हा आत्ता इतका पाणीप्रश्‍न तीव्र झालाही नव्हता. टँकर लॉबी अजून महाराष्ट्रात सक्रिय झाली नव्हती. नदिपात्रातून वाळू काढून नेणारे ‘वाळू माफिया’ माजले नव्हते. अशा वेळी काळाची पावले ओळखून त्यांनी ज्या प्रमाणे शासकीय पातळीवर कामही केले त्याच प्रमाणे या समस्येला कलात्मक रूपही दिले आणि सर्वसामान्य वाचकांसमोर ते मांडले. 

तिसरी कलाकृती होती ‘प्रशासननामा’. प्रशासकीय पातळीवर येणार्‍या समस्या, त्यांची उत्तरे, त्यातून सामान्य माणसाला न्याय कसा मिळवून देता येईल याची शोधलेली एक अधिकारी म्हणून उत्तरे. हे सर्व त्यांनी ‘प्रशासननामा’ मध्ये नितळपणे साध्या भाषेत मांडले. 

ज्या प्रमाणे मारूती चितमपल्ली यांनी आपल्या वनखात्यातील नौकरीच्या निमित्ताने पशु-पक्षी-जंगले यांचा अभ्यास-निरीक्षणे ललित भाषेतून रसिकांसमोर मांडली आणि मराठी वाङ्मयाला श्रीमंती प्राप्त करून दिली. त्याच प्रमाणे लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपली प्रशासकीय कारकीर्दीच्या अनुभवांना साहित्यीक रूप देवून एक वेगळा पैलू मराठी साहित्याचा रसिकांसाठी घडवला. 

‘बखर भारतीय प्रशासनाची’ ही लेखमालाच त्यांनी लिहीली होती. पुढे त्याचेच ग्रंथरूप त्याच नावाने सिद्ध झाले. 

महाराष्ट्र शासन राज्य नाट्य स्पर्धा घेत असते. या स्पर्धांमध्ये तीच तीच नाटके येतात असे लक्षात आल्यावर नविन संहिता असल्या तरच प्रवेशिका ग्राह्य धरेल अशी अट घालण्यात आली. तेंव्हा याला प्रतिसाद देत ‘अखेरची रात्र’ सारखे नाटक त्यांनी लिहीलं. तेंव्हा ते हौशी कलाकारांकडून रंगभूमीवर सादरही झाले. त्याला बक्षिसही मिळाली. 

‘इन्किलाब विरूद्ध जिहाद’ सारखी त्यांची अफगाण प्रश्‍नाचा आढावा घेणारी महा-कादंबरी अजूनही समिक्षकांनी फारशी विचारात घेतली नाही. खरं तर अशा महा-कादंबर्‍यांची संख्या मराठीत फारच कमी आहे. त्यातही परत विषय जेंव्हा आंतरराष्ट्रीय असतो तेंव्हा तर अशा कलाकृतीच मराठीत आढळत नाही. या पार्श्वभूमीवर देशमुखांची ही कादंबरी पहायला हवी. 

ज्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत, अध्यक्षाच्या निवडीबाबत, जागतिक संमेलना बाबत आजकाल सतत टिका होत आहे त्याचे अध्यक्षपद देशमुखांना आता मिळाले आहे. तेंव्हा त्यांची ही जबाबदारी आहे की या चळवळीला काही एक वेगळे आयाम ते प्राप्त करून देतील. 

देशमुख स्वत: उत्तम लेखक आहेतच पण शिवाय एक चांगले आयोजक आहेत. प्रशासकीय पातळीवर त्यांनी विविध योजना यशस्वीपणे राबवून दाखवल्या आहेतच. तसेच साहित्य संमेलनांचे नेटके आयोजन करून, त्यातून पैसे वाचवून त्या कायमस्वरूपी निधीतून वाङ्मयीन उपक्रम, दिवाळी अंकाचे प्रकाशन त्यांनी करून दाखवले आहे. हे त्यांचे वेगळेपण आहे. 

मधु मंगेश कर्णिक यांनी केशवसुतांचे स्मारक मालगुंडला उभारून दाखवले त्याच धर्तीवर लक्ष्मीकांत देशमुखांनी बी. रघुनाथ यांचे देखणे सुंदर स्मारक परभणीला उभारून दाखवले. त्यासाठी शासकीय पातळीवरचे अडथळे दूर करणे, निधी मिळवणे ही सगळी कामं जिकीरीनं केली म्हणून तर ते स्मारक उभं राहिलं. 

तेंव्हा आता साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी महाराष्ट्र पातळीवर वाङ_मयीन उपक्रमांमध्ये सुसूत्रता घडवून आणावी. साहित्य महामंडळ म्हणजे मोजक्या लोकांची संकुचित विचारांची टोळी असे स्वरूप होवून बसले आहे. या महामंडळाचा विस्तार होवून त्यात ग्रंथालये, इतर वाङ्मयीन संस्था, प्रकाशक परिषदा यांचा समावेश व्हायला हवा. सामान्य रसिक या संमेलनांपासून दूर जाताना आढळत आहे. मागच्या वषी डोंबिवली सारख्या मराठी माणसांचे आगर असणार्‍या महानगरात संमेलनात केवळ रिकाम्या खुर्च्यांनी गर्दी केली होती. ही नामुष्की टाळायला हवी. 

देशमुखांकडे ही कल्पकता आहे. ते वाङ्मयीन संस्थांना, उपक्रमांना रसिकाभिमूख बनवू शकतात. त्यांनी प्रशासकीय पातळीवर उच्चपदस्थ म्हणून काम केले आहे. तेंव्हा साहित्य संस्था, सार्वजनिक ग्रंथालये, सांस्कृतिक सभागृहे यांचा कारभार सुरळीतपणे चालण्यासाठी जे प्रशासकीय अडथळे येतात ते दूर करण्यासाठी त्यांनी काही ठोस योजना शासनाकडे मांडाव्यात अशी अपेक्षा आहे. उदा. शासन प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथ महोत्सव घेतं पण त्याच्या तारखा चुक निवडल्या जातात तसेच जागाही चुकीची असते. हे सगळं देशमुखांसारखा अनुभवी माणूस समजून घेवून त्यावर उपाय सुचवू शकतो. आणि हे सगळं प्रशासनातून कसे मंजूर करून आणावयाचे हे पण सांगू शकतो. 

शासकीय मर्यादेत काम करताना उद्योजक, व्यापारी, कंत्राटदार यांच्याकडून निधी उपलब्ध करून घेवून उपक्रम चांगला करणे याचाही अनुभव देशमुखांना आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा साहित्य महामंडळाला मिळू शकतो. महाराष्ट्रभर वाङ्मयीन उपक्रम सातत्याने व दर्जेदार रितीने होण्यासाठी काही एक योजना देशमुख आपल्या अनुभवाच्या आधाराने तयार करू शकतात. 

एक वेगळा अध्यक्ष यावेळी साहित्य संमेलनाला मिळाला आहे. केवळ चार दिवसांचे संमेलनच नव्हे तर वर्षभर विविध उपक्रम त्यांच्या कल्पनेतून आखले जावो, राबविले जावो, त्यांचे स्वत:चे लिखाणही बहरत जावो अशा शुभेच्छा! त्यांच्या उपक्रमांमध्ये आमच्यासारख्या रसिकांनी आधिही सक्रिय सहभाग नोंदवला होता. आताही त्यांनी हाक द्यावी, कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या पाठीशी सहज उभी राहिल हा आम्हाला विश्वास आहे. 

           श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

तेराशेच नव्हे तेरा हजार शाळा बंद करण्याची गरज !


उरूस, विवेक,17-23 डिसेंबर 2017

महाराष्ट्र शासनाने 10 पेक्षा कमी विद्यार्थी असणार्‍या 1300 शाळा बंद करण्याचा कठोर निर्णय घेतला त्या बद्दल शासनाने मन:पूर्वक अभिनंदन. खरं तर ही संख्या फारच थोडी आहे. 

या प्रश्‍नाची सुरवात झाली तेंव्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी चे आघाडी शासन सत्तेत होते. 2013 मध्ये जी पटपडताळणी करण्यात आली त्यात 14 हजार इतक्या शाळांमध्ये 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आढळून आली. यातील केवळ 500 शाळा अनुदानित खासगी संस्थांच्या शाळा होत्या. उर्वरी 13 हजार पाचशे शाळा ह्या जिल्हा परिषदेच्या होत्या. 

एक साधा प्रश्‍न निर्माण होतो. की जर विद्यार्थी शाळेत येतच नसतील तर अट्टाहासाने शाळा का चालवायच्या? केवळ शिक्षकांना पगार देता यावे म्हणून हा अटापिटा आहे का? यातून समोर आलेले सत्य अजून जास्त भयानक होतं. ते म्हणजे जवळपास 25 हजार शिक्षकांची जास्तीची भरती शिक्षण विभागात केल्या गेली आहे. या अतिरिक्त शिक्षकांमुळे 1200 कोटी रूपयांचा बोजा महाराष्ट्र शासनाला दरवर्षी पडतो आहे. 

शिक्षण सर्वांना भेटले पाहिजे, गरिबाला शिक्षण भेटले पाहिजे, शिक्षण मोफत व सक्तिचे असले पाहिजे हे सर्व मुद्दे वादाविवाद न करता मतभेद असले तरी मान्य करू. पण याचा अर्थ असा होत नाही की शिक्षणाच्या नावाखाली केवळ शिक्षकांच्याच झोळीत हे पैसे गेले पाहिजेत. सर्व शिक्षक संघटना केवळ त्यांच्या वेतन आयोगाच्या प्रश्‍नावरच आंदोलन करतात. कधीही शिक्षक संघटनांनी शाळांचा दर्जा, शैक्षणिक साहित्य, क्रिडा साहित्य, प्रयोग शाळांचा दर्जा, ग्रंथालयाचा दर्जा याबद्दल आंदोलन केले नाही. 

सध्याच्या घडीला शासकीय पातळीवर ज्या शाळा चालविल्या जातात त्यातील किमान 13 हजार शाळांमध्ये पुरेशी विद्यार्थी संख्या नाही. हजारो शिक्षक अतिरिक्त आहेत. आणि दुसरीकडे विनाअनुदानित म्हणून शाळा काढल्या जातात. त्यात हवी तशी शिक्षक भरती केली जाते. याशिक्षकांना कसलेही मानधन दिले जात नाही. वर परत हेच संस्थाचालक या शिक्षकांना पेटवून देतात की तूम्ही शासना विरोधात आंदोलन करा. आणि तूम्हाला वेतन देण्याचा आग्रह धरा. 

हे नेमके कोणते धोरण आहे? सर्वसामान्य लोकांसाठी म्हणून शासनाने राज्य परिवाहन महामंडळाच्या वतीने वाहतूकीची सोय केली (एस.टी.). ही एस.टी. रिकामी जावू लागली. लोकांनी त्या ऐवजी काळीपिवळीचा दुसरा मार्ग पत्करला. एस.टी. रिकामी आहे म्हणून जर ही सेवा सरकारने उद्या जर बंद केली तर लगेच ओरड सुरू होते की ‘पहा हे शासन गरिबांच्या विरोधात आहे. अशाने बहुजन समाजाने प्रवास करायचा कसा?’
ही समाजवादी पद्धतीची गळाकाढू वृत्ती एकदा नीट समजून घेतली पाहिजे. वरवर पाहता यात गोरगरिबांचा कळवळा आहे असे दिसते. पण प्रत्यक्षात अनुभवास आले आहे की या सगळ्या योजनांमधून व्यवस्थेतील काही लोकांचाच फायदा होतो. गरिबांचा फायदा होतच नाही. 

गरिबांसाठी दवाखाना, गरिबांसाठी वाहतूक व्यवस्था, गरिबांसाठी अन्नधान्य मिळावे म्हणून राशन दुकान, गरिबांसाठी शिक्षण, गरिबांना रोजगार मिळावा म्हणून ग्रामीण रोजगार योजना, गरिबांना न्याय मिळावा म्हणून तंटामुक्ती अभियान, गरिबांच्या वस्त्या स्वच्छ रहाव्या म्हणून गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या सगळ्यांतून काय निष्पन्न झालं?

तर या सगळ्यांतून गरिबांच्या समस्यांशी खेळणारी एक बलदंड अशी नोकरशाही दलालशाही तयार झाली. बघता बघता एन.जी.ओ. चे पीक भारतात बहरले. 1980 च्या नंतर बहुतांश समाजवादी डाव्या चळवळीतील लोकांनी हे एन.जी.ओ. सुरू केले. त्यांना मोठ्याप्रमाणावर अनुदान निधी देण्याचे धोरण इंदिरा गांधी सरकारने आखले. परदेशांतूनही पैसा देणग्यांच्या स्वरूपात यायला लागला. याचा परिणाम असा झाला की ही सगळी मंडळी सक्रिय राजकारणापासून दूर गेली आणि आपआपल्या संस्थांमध्ये मन रमवायला लागली. त्याचं तत्त्वज्ञान करून जगाला सांगायला लागली. यांना ‘जीवन गौरव’, ‘महाराष्ट्र भुषण’ पुरस्कार मिळायला लागले. बघता बघता अशी परिस्थिती निर्माण झाली की एड्स चे रोगी कमी आणि एड्स वर काम करणार्‍या संस्था जास्त. केवळ भारतच नव्हे तर जगभर ही एन.जी.ओ. शैली बहरली.

या लोकांनी शिक्षणात मात्र शिरण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. कारण शिक्षण ही किचकट प्रक्रिया आहे. त्यात मेहनत फार आहे. यांनी शाळा काढल्या. पण लगेच शासनाच्या गळ्यात पडून अनुदानं मिळवली. म्हणजे शाळा खासगी पण त्यांना संपूर्ण अनुदान शासनाचे. डाव्यांनी सर्वांना मोफत व हक्काचे शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे असे मानत सगळी शिक्षण व्यवस्था सरकारच्या झोळीत जाईल अशी व्यवस्था केली. हळू हळू शासनाची मगरमिठी घट्ट होत गेली. नौकर भरती जोपर्यंत या खासगी संस्थांकडे होती तोपर्यंत या शाळांमध्ये डावे समजावादीच कशाला कॉंग्रेसवाल्यांनाही प्रचंड रस होता. किंबहुना मोठ्या शैक्षणिक संस्था म्हणजे शैक्षणिक साम्राज्ये ही कॉंग्रेसवाल्यांचीच आहेत. आणि याला शासनाचे 100 टक्के अनुदान आहे. 

एकीकडे शासनाच्या स्वत:च्या शाळा असताना खासगी संस्थांच्या शाळांना शासनाने अनुदान देण्याची गरजच नव्हती. आणि असे अनुदान द्यायचे तर त्यासाठी विद्यार्थी संख्या किंवा इतर बाबींचे निकष कसोशीने लावायला हवे होते. पणे तळे राखील तो पाणी चाखील या न्यायाने जे सत्तेवर होते त्यांनीच शैक्षणिक संस्था उघडल्या. आणि त्याच संस्थांना अनुदानं मिळाली. परिणामी शासकीय शाळांचे विद्यार्थी या संस्थांकडे वळले. शासकीय शाळा ओस पडू लागल्या. या खासगी संस्थांना 100 टक्के अनुदान मिळायला लागले. यातील शिक्षकांना शासन पगार द्यायला लागले. तेंव्हा अपवाद वगळता सर्वच खासगी संस्थांना हळू हळू कळकट लालफितीचे शासकीय स्वरूप प्राप्त झाले. 

याही शाळांचा दर्जा घसरायला लागला. यातूनही दर्जेदार शिक्षण मिळण्याची हमी कमी झाली. मग विद्यार्थ्यांना खासगी शिकवण्या लावण्याची गरज निर्माण झाली. पैसेवाल्या पालकांनी आपली मुलं खासगी विनाअनुदानित महागड्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांत घातली. बाकीच्यांनी अनुदानित खासगी शाळांत घातली. पण त्यांना किमान शिक्षण मिळावं म्हणून खासगी शिकवणी वर्ग लावले.

आज अशी परिस्थिती आहे की गरिबातला गरिब पालक आपला मुलगा जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठवायला तयार होत नाही. कारण त्याला आपल्या मुलाला तिथे शिक्षण भेटेल याची खात्री वाटत नाही. या पालकाचा विश्वास शासकीय शिक्षण व्यवस्थेवरून उठला म्हणून या शाळा ओस पडल्या आहेत. 

गरिबांची काळजी करणार्‍या समाजवादी विद्वानांनी याचे पहिल्यांदा उत्तर द्यावे. शासनाने शाळा उघडली पण तिथे यायला गरिबच तयार नसतील तर जबरदस्ती ही शाळा का चालवायची? 

ज्या ठिकाणी विद्यार्थी आहेत अशी कुठलीच शाळा अजून तरी शासनाने बंद केली नाही. 

शिक्षण क्षेत्रातील तळमळीचे कार्यकर्ते स्वत: शिक्षक असलेले आणि पाचवा वेतन आयोग बाणेदारपणे नाकारणारे हेरंब कुलकर्णी यांनी यासाठी अतिशय चांगली अशी एज्युकेशन व्हाऊचर योजना शासनापुढे मांडली आहे. 

शासन शिक्षणासाठी विद्यार्थ्यावर जेवढा खर्च करते त्या किंमतीचे व्हाऊचर पालकांना देण्यात यावे. या पालकाला आपल्या मुलाचे शैक्षणिक भवितव्य जिथे उज्ज्वल आहे असे वाटते त्या शाळेत त्याने मुलाला दाखल करावे. त्यासाठी त्याला एक पैसाही खर्च येणार नाही. हे व्हाऊचर त्याने त्या शाळेत जमा करावे. अशा जमा झालेल्या व्हाऊचरवरून या शाळेला शासनाने निधी द्यावा. जेणे करून त्यांना आपली शाळा चालविता येईल.
अनुदान सरळ लाभार्थींच्या खिशात पडले तर त्याची उपयुक्तता जास्त असेल हे विविध अनुभवांवरून सिद्ध झाले आहे. तेंव्हा हीच पद्धत शिक्षणातही अवलंबिता येईल.

यासाठी आधी कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करून ही जबाबदारी शासनाच्या शिरावरून कमी केली जावी. जेणे करून वाया जाणारा हा निधी शिक्षण क्षेत्रातील इतर बाबींवर खर्च करता येईल. 
गॅसची सबसिडी कमी करून ती रक्कम सरळ लाभार्थीच्या खात्यात जमा करण्याची योजना आपण देशपातळीवर राबविली आहे. आता शिक्षण क्षेत्रातही असा उपाय करण्याची गरज आहे.    

           श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, December 17, 2017

'आमादमी...' भन्नाट डेडली कॉकटेल


दैनिक दिव्य मराठी १७ डिसेंबर २०१७ 

चांगली कलाकृती ही नेहमीच समिक्षकांपुढे आव्हान निर्माण करत असते. प्रतिभावंत हा एक कोडं बनून समोर उभा राहतो. आणि ते सोडवताना आपल्याला बौद्धिक कष्ट करावे लागतात.

बब्रूवान रूद्रकंठावार हा सध्याच्या मराठी साहित्यातील असाच एक लेखक आहे. त्याच्या कलाकृतींनी भल्या भल्यांना गेल्या 20 वर्षांत गोंधळात टाकले आहे. याला ग्रामीण म्हणावे का? याला विनोदी म्हणावे का? ही शैली कोणती आहे? ही भाषा नेमकी कोणती म्हणायची?

हिंदीत दुष्यंतकुमार या कवीच्या बाबतीत असा प्रकार घडला होता. ही भाषा हिंदी आहे की उर्दू या विवंचनेत पडलेल्या समिक्षकांना शेवटी साहित्य अकादमी पुरस्कार या लेखकाला देता आलाच नाही. बब्रूवानचे काहीसे तसेच आहे. पण सुदैवाने त्याच्या लिखाणातील उपहासाची धार लक्षात येवून यावर्षीचा शासनाचा विनोदी लेखनासाठी असलेला कोल्हटकर पुरस्कार त्यांच्या ‘आमादमी विदाऊट पार्टी’ या पुस्तकाला घोषित झाला.

बब्रूवान यांचे पहिले पुस्तक ‘पुन्यांदा चबढब’ हे 20 वर्षांपूर्वी प्रकाशीत झाले. त्याही पुस्तकाला शासनाचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या या शैलीतील पहिल्याच पुस्तकावर लिहीताना ज्येष्ठ कवी फ.मुं. शिंदे यांनी इंग्रजी-मराठी अशा या ‘इंग्राम’ शैलीला मानसिक संग्राम असे संबोधले होते. दोस्त आणि बब्रूवान या दोघांतील संवाद असे या लिखाणाचे स्वरूप आहे. विरोधाभास आणि दोलायमानता ही वैशिष्ट्ये फ.मुं.नी अधोरेखीत करून ठेवली होती.

आता या व्यक्तिरेखांनाही जवळपास 21 वर्षे झाली आहेत. मराठीत सातत्याने एखादी व्यक्तीरेखा उपहासातून जिवंत ठेवण्याचे हे पहिलेच उदाहरण ठरावे. काळाप्रमाणे बब्रूवान यांची शैलिही विकसित होत गेलेली किंवा बदलत गेलेली आढळते. वरवरचा शाब्दिक विनोद पकडता पकडता ती हळू हळू खोलवर तत्त्वज्ञानाकडे जाताना आढळते. सुधीर रसाळांसारख्य दिग्गज समिक्षकाने या लिखाणावर बोलताना अतिशय नेमकेपणाने असे लिहीले आहे, ‘.. अशा प्रकारचा चिंतनप्रेरक विनोद मराठीत जवळपास दुसरा नाही.’

पहिल्या पुस्तकानंतर आलेलं ‘बर्ट्रांड रसेल वुईथ देशी फिलॉसॉफी‘. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नाटककार दत्ता भगत यांनी बबरूवानच्या भाषिक प्रयोगाबद्दल फारच नेमकेपणाने निरिक्षण नोंदले आहे. ‘.. या लिखाणात केवळ इंग्रजी शब्द ग्रामीण बोलीशी जोडून जी विसंगती निर्माण होते तेवढाच विनोद नाही. मूळचे जे ओरिजनल आहे ते कुठल्याशा छापात बसवणे हीच नागरीकरणाची प्रक्रिया आहे. अशा नागरीकरणाच्या प्रक्रियेत मूळचे सामर्थ्य कसे संकुचित होते यावरही हा लेखक बोट ठेवतो.’

 नंतरचे ‘टर्र्‍या, डिंग्या आन् गळे‘ हे तिसरे आणि ज्याला पुरस्कार मिळाला ते चौथे. शिवाय एक नाटक याच शैलीत पत्रकारितेवरचं त्यांनी लिहीलं ‘चौथ्या इस्टेटीच्या बैंलाला’ तेही पहिल्याच पुस्तकाच्या वेळेस 1998 ला रंगभूमीवर आलेलं आहे.

या लिखाणाचे तीन वैशिष्ट्ये आहेत. यात बबरू आणि दोस्त अश्या दोन मुख्य व्यक्तिरेखा आहेत आणि त्यांच्या संवादातून हे सगळं लिखाण उलगडत जातं. दोघांच्या बायका आणि पोरं आधून मधून येत राहतात. इतर प्रसंग-ात्कालिन घटना यावरचे भाष्य यात उमटत राहते. बबरू लेखक-पत्रकार आहे तर दोस्त  गल्लीपातळीवरचा छोटा राजकारणी आहे. खरं तर दोघेही सामान्य माणसाचे प्रतिनिधीत्व करतात.

दूसरं वैशिष्ट्य म्हणजे या लिखाणाची शैली. बोली मराठी-प्रमाण मराठी-इंग्रजी अशी एक भन्नाट सरमिसळ बबरूवान करतात. म्हणूनच तर अरूण साधू यांनी या शैलीला ‘अस्सल मराठवाडी ग्रामीण बोली सिन्थेसाईझ्ड वुईथ इंग्लिश.. डेडली कॉकटेल !’ म्हटलं आहे.

तिसरं वैशिष्ट्य म्हणजे या सर्व लेखांचा शेवट ता.क. म्हणजेच ताजा कलम ने होतो. हा ताजा कलम परत एक वेगळाच नमुना आहे. एकीकडून तो विषयाशी संबंधीत असतोच पण दुसरीकडून त्याला एक स्वतंत्र अस्तित्वही आहे. गझलेचा प्रत्येक शेर जसा स्वतंत्र असतो शिवाय तो संपूर्ण कवितेचा एक भाग असतो तसेच. उदा. जातीचं मॅथेमॅटिक्स या लेखात जो ता.क. आला आहे तो असा ‘जातीच्या कार्डाचं मातर अवगड आस्तं. आपण ते घडीघडी स्वॅप करीत र्‍हायलो की, कार्डाचा चुथडा व्हवून जातो, त्यावरले आक्षरं उडायला लागतेत. धागे निघायला लागतेत. मंग बोथट कार्ड कायम रिटर्न येवून रिव्हर्स मारत र्‍हातंय. कानफटात म्होरनं लगावल्यापक्षा रिव्हर्सचा फटका जोरदार आस्तो.’ हे जे वाक्य आहे ते स्वतंत्रपणे जरी वाचलं तरी त्याचा नीट अन्वयार्थ वाचकाला लागू शकतो. इतकी ताकद या ता.क. मध्ये आहे.

बबरूवानला अजून एका गोष्टीचं श्रेय द्यायला पाहिजे. आर. के. लक्ष्मण यांनी ज्या प्रमाणे ‘कॉमन मॅन’ च्या माध्यमातून सर्वकाही मांडण्याचा मोठा प्रतिभावंत खेळ करून दाखवला तसाच बबरूनी पण ‘बबरू’ आणि ‘दोस्त’ या केवळ दोन व्यक्तीरेखांच्या संवादांतून सारं काही उलगडून दाखवलं आहे. बबरूवान यांच्या या व्यक्तीरेखांच्या निवडीची तुलना विख्यात लेखक अरूण साधू यांनी गुरू-शिष्य संवादाशी (सॉक्रेटीस-प्लेटो) किंवा दोन व्यासंगी तत्त्वज्ञांची चर्चा याच्याशी केलेली आहे. खरं तर इतके नेमके विश्लेषण करून साधूंनी बबरूच्या लिखाणाचं एक मोठंच कोडं उलगडून दाखवलं आहे.

वास्तविक या दोन व्यक्तिरेखा म्हणजे तमाशातील आबुराव-गबुराव होण्याची शक्यता फार होती. तमाशातील ग्राम्य विनोदाचा बाज जर याला एकदा चढला असता तर या लिखाणातील अभिजातता कमकुवत ठरली असती. तसेच एकदा का ‘ग्रामीण इनोदी’ म्हणून शिक्का बसला की वाचक-समीक्षकच काय पण लेखकही बहकून जातो. तशी खुप उदाहरणे मराठीत आहेत. ग्रामीण मराठी-इंग्रजी-प्रमाण मराठी-खेडे-शहर या सगळ्यांच्या काठांवरून चालताना एक नेमका तोल त्यांनी सांभाळला.

दूसरं एक वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक राजकीय विषयांची अतिशय बारीक समज बबरूवान यांच्या लिखाणात आढळते.  आम आदमी पार्टी याच नावाच्या लेखात ‘.. दोस्ता आमादमी फिगरमंदी न्हाई, जिगरमंदी मोजावा लागत आस्तोय.’

हे वाक्य 2014 च्या लोकसभा निवडणूकीच्या आधीचं आहे. आणि तेही आम आदमी पक्षानं दिल्लीची निवडणुक जिंकल्यानंतरचे आहे. मग आपल्या लक्षात येतं की लेखकाची सामाजिक राजकीय समज किती बारीक आहे.
एखादा लेखक सतत 21 वर्षे दोन व्यक्तीरेखा घेवून लिहीतो आहे. आपली शैलीबद्ध लिखाणातून कालसापेक्ष घटना प्रसंगांवर लिहीता लिहीता हळूच त्यातून निसटून कालनिरपेक्ष होण्याकडे धाव घेतो आहे हे विस्मयचकित करणारं आहे.

अशा या प्रतिभावंत लेखकाला अजून मोठे पुरस्कार मिळो. केवळ टोपण नाव घेवूनच हे लिखाण केलं गेलं आहे असं नसून प्रस्थापित लेखक म्हणून मिरवण्याच्या भाषणं करण्याच्या स्वत:ची मार्केटिंग करण्याच्या शैलीला नाकारून या लेखकांनं एक वेगळा आदर्श समोर ठेवला आहे. आपण त्याला दाद द्यायलाच हवी.

श्रीकांत उमरीकर
मो. 9422878575







   

Wednesday, December 6, 2017

कापसाचा गुंता सोडवणार कसा?


उरूस, विवेक,10 डिसेंबर  2017

सध्या महाराष्ट्रात कापसावरच्या गुलाबी बोंड आळीने थैमान घातले आहे. यावर बातम्या लिहीताना वर्तमानपत्रांनी माध्यमांनी तर कहरच केला आहे. बी.टी.बियाण्यांविरोधात शेतकर्‍यांचा संताप, बी.टी. ने केला शेतकर्‍यांचा घात अशा तद्दन दिशाभूल करणार्‍या बातम्या पसरवल्या जात आहेत. 

खरं तर बी.टी. हे काही बियाण्याचे नाव नाही. हे तंत्रज्ञानाचे नाव आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून जे बियाणे तयार केले गेले त्या बियाण्याला बोली भाषेत बी.टी.बियाणे असे म्हणतात. कापसात हे बियाणे येण्याचे कारण काय? तर साधारणत: 2002 पर्यंत जे जुन्या पद्धतीचे कापसाचे बियाणे वापरले जात होते त्याचे उत्पादन अतिशय कमी होते. शिवाय पिकात तण वाढते त्याचा निंदणीचा खर्च होत राहतो. सगळ्यात महत्त्वाची अडचण होती ती बोंडअळीची. आधुनिक बी.टी. तंत्रज्ञान युक्त बियाणे वापरले तर उत्पादन वाढते, तण फारसे उगवत नाही आणि बोडअळी त्या कापसाला लागत नाही. असे फायदे होते म्हणून शेतकर्‍यांनी हे बियाणे परवानगी नसताना चोरून वापरायला सुरवात केली. तेंव्हा या विरोधात शासनाने कडक भूमिका घेतली. शेतकर्‍यांच्या शेतातील पर्‍हाट्या उपटून टाकल्या. पंचनामे केले. पण तंत्रज्ञानापुढे सगळ्यांनाच हार पत्करावी लागली. कोंबडा झाकला म्हणून सुर्य उगवायचा रहात नाही. पुढे अधिकृतरित्या हे तंत्रज्ञान भारतात आले. त्यासाठी जास्तीची किंमत शेतकरी मोजायला तयार झाला. 

याचा परिणाम थोड्याच दिवसांत दिसायला लागला. कापसाचे उत्पादन दुपटीने वाढले. एकेकाळी कापसाची आयात करणारा भारत देश जगात कापसाचा पहिल्या क्रमांकाचा निर्यातदार देश बनला. ज्याप्रमाणे हरितक्रांतीनंतर देशात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाले आणि देश स्वयंपूर्ण बनला. परदेशातून गहू आयात करण्याची नामुष्की संपून गेली. तसेच कापसाच्या बाबतीत घडले. बी.टी.तंत्रज्ञानाचा वापर करून कापसाचे उत्पादन वाढले. याचा मोठा फायदा भारतीय शेतकर्‍यांना झाला.

पण नेमका उलटा प्रचार डाव्या-समाजवादी संघटनांनी सुरू केला. कापसाच्या पट्ट्यात कापसाच्या बियाण्यांचा खर्च वाढला हे कारण पुढे करून त्यामुळेच आत्महत्या वाढल्या असा अप-प्रचार सुरू केला. हे नविन तंत्रज्ञान वापरात आणत असतानाच परदेशी कंपन्यांनी याची किटक-जंतू नाशक प्रतिकार शक्ती काही काळापूरती मर्यादीत आहे हे नमूद केले होते. काही काळांने हे बियाणे अळीला प्रतिकार करू शकत नाही. त्यासाठी नविन बियाणे वापरणे गरजेचे आहे. हे विज्ञानात सतत घडत असते. जूने तंत्रज्ञान कालबाह्य होत जाते. त्यात नविन बदल केले जातात. आणि नविन समस्यांवर मात करण्याची शक्ती त्यात निर्माण केली जाते. याप्रमाणे बी.टी.चे नविन तंत्रज्ञान वापरलेले बियाणे भारतीय शेतकर्‍यांना मिळणे गरजेचे होते. 

या नविन बियाण्यासाठी जास्तीचे पैसे मोजण्याची तयारी असायला हवी. हे तंत्रज्ञान भारतीय कंपन्यांनी तयार केले नव्हते. त्यासाठी ज्या परदेशी कंपनीकडे हे तंत्रज्ञान आहे त्यांच्याकडून हे वापरण्याचे करार भारतीय कंपन्यांनी केले. या करारापोटी स्वामित्वहक्क (रॉयल्टी) म्हणून एका पाकिटामागे 154 रूपये परदेशी कंपनीस देणे या भारतीय कंपन्यांना बंधनकारक होते. काही भारतीय कंपन्यांनी हे नविन बियाणे भारतीय शेतकर्‍यांना विकले पण जमा झालेली रॉयल्टीची रक्कम जास्त आहे अशी सबब पुढे करून परदेशी कंपनीला देण्यास विरोध केला. इतकेच नाही तर आपणच केलेला करार मोडून भारतीय सरकारला मध्यस्थी करण्याची विनंती केली. वास्तविक यात सरकारचा तसा प्रत्यक्ष काहीच संबंध येत नाही. सामान्य शेतकर्‍यांची पिळवणूक होते या नावाखाली यांनी जास्तीचे रॉयल्टीचे पैसे देण्याची खळखळ केली. वास्तविक हे पैसे यांनी शेतकर्‍यांकडून आधीच घेतले होते. 

या वादाचा निर्णय लवकर लागला नाही. याचा परिणाम म्हणजे वैतागून हे नविन तंत्रज्ञान भारतात आणण्याचे आपले धोरण परदेशी कंपनीने रद्दबातल केले. स्वाभाविकच मागच्यावर्षीपासून भारतीय शेतकर्‍याला जून्याच तंत्रज्ञानावर आधारीत देशी कंपन्यांचे बियाणे घेणे भाग पडले. पण हे बियाणे बोंड अळी बाबत प्रतिकारशक्ती गमावून बसले होते. याचे जे काही भयानक परिणाम होणे अपेक्षीत होते ते तसेच घडले. आणि बहुतांश ठिकाणी गुलाबी बोंड अळीने कापसाचे पीक फस्त केले.

शेतकर्‍याला बियाणे महाग मिळते असा बहाणा करत परदेशी कंपन्यांची रॉयल्टी बुडविणार्‍या देशी कंपन्यांनी आख्खा कापूस उत्पादक शेतकरीच बुडवून टाकला. आता ही नुकसान भरपाई कोण देणार? निश्‍चितच ही जबाबदारी पूर्णपणे बियाणे कंपन्यांची आहे. 

पण त्यांनी सध्यातरी यावर मौन बाळगले आहे. इतकेच नाही तर डाव्या संघटनांना हाताशी धरून अपप्रचार चालवला आहे. 

मूळ मुद्दा असा आहे की शेतकरी जेंव्हा शेती करतो आहे आणि आपला माल देशी परदेशी बाजारपेठेत नेवून विकू पाहतो आहे तेंव्हा त्याला हवे ते आधुनिक तंत्रज्ञान हवे की नको? त्याच्या मालाला ज्या ठिकाणी भाव आहे ती बाजारपेठ त्याला मिळू देणार की नाही? 

दुर्दैवाने तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य आणि बाजारपेठेचे स्वातंत्र्य शेतकर्‍यांपासून हिरावून घेतले जात आहे. मागच्या लेखात उल्लेख केला त्या प्रमाणे परदेश सोडा पण देशी बाजारपेठेवरही शेतकर्‍यांना हक्क नाही. महाराष्ट्रापेक्षा गुजरातेत उसाला भाव मिळतो पण शेतकर्‍याला आपला ऊस गुजरातेत किंवा कर्नाटकात नेवू दिला जात नाही. आणि त्याचे भले करावयाचे या नावाने सहकाराचे जाळे त्याचा गळा घोटण्याचे काम करत आहे.

कापूस पिकवणारा शेतकरी जागतिक बाजारपेठेत आपला माल नेवू पहात असेल तर त्याच्या हातात आधुनिक तंत्रज्ञानाचे शस्त्र असणे आवश्यक आहे. शिवाय त्याला माल विकताना बाजारपेठ खुली असणे आवश्यक आहे. पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्रातून कांदा आयात केला जातो आणि देशातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान केले जाते या धोरणाला काय म्हणावे? केवळ काही शहरी ग्राहकांना कांदा जो की जीवनावश्यक वस्तू नाही तो स्वस्त मिळावा म्हणून हा आटापिटा केला जातो. हे अनाकलनीय आहे. 

कापसाच्या प्रश्‍नावर देशी बियाणे कंपन्यांचे बिंग पूर्णपणे उघडे पडले आहे. यांची धोरणं शेतकर्‍यांना आधुनिक चांगले जास्त उत्पादन देणारे बियाणे मिळावे असे नसून परदेशी कंपन्यांचे संशोधन फुकटात आपल्याला मिळावे आणि आपण मात्र त्यावर पैसे कमवावे असे लूटीचे आहे. 

ज्या प्रमाणे सहकारी साखर कारखाने जगावे म्हणून शेतकर्‍यांनी आपला माल स्वस्तात त्यांना विकावा का? तसेच देशी कंपन्या जगाव्या म्हणून शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञान नसलेले जूने पाने बियाणे वापरून बोंड अळीला बळी पडून आपले नुकसान करून आत्महत्या कराव्यात?

भारतात कापसाची फार मोठी परंपरा राहिलेली आहे. भारतीय कापूस-त्याचा धागा-त्यापासून विणलेले वस्त्र ही आपली एकेकाळी जगात स्वतंत्र ओळख असणारी गोष्ट होती. आज कापूस शेतकरी म्हणजे आत्महत्या करणारा शेतकरी अशी प्रतिमा तयार झाली आहे. 

जगभरात हातमागावर विणलेल्या वस्त्रांना जास्तीची किंमत मिळू लागली आहे. या हातमागांची आपल्याकडची अवस्था अतिशय बिकट आहे. हे वीणकर देशोधडी लागले आहेत. म्हणजे एकीकडे कापसाचा शेतकरी मारल्या जातो आहे. दुसरीकडे या कापसाचा धागा करून त्यापासून वस्त्र विणणारे कारागीर धोक्यात आले आहेत. मग नेमका फायदा कुणाला होतो आहे? 

कापसाचा गुंता सोडवायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा जगातील सर्वात उत्तम आधुनिक तंत्रज्ञान युक्त बियाणे शेतकर्‍यांच्या हाती दिले पाहिजे. या कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग आधुनिक स्वरूपात विकसित झाले पाहिजेत. या कापसाचा धागा करून त्याचे वस्त्र तयार करून त्याचा एक विश्‍वसनीय असा भारतीय ‘ब्रँड’ तयार झाला पाहिजे. तरच ‘मेक इन इंडिया’ धोरण खर्‍या शेतकर्‍यांच्या दृष्टीने अर्थाने यशस्वी झाले असे म्हणता येईल.   

           श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Tuesday, November 28, 2017

गुजरातमध्ये उसाला भाव मग महाराष्ट्रात का अभाव?


उरूस, विवेक, 24 नोव्हेंबर 2017

महात्मा गांधी यांना असं विचारण्यात आलं होतं की गरीबी दूर करण्यासाठी काय करता येईल? महात्मा गांधी मोठे चतुर. त्यांना या प्रश्‍नातील खोच नेमकी कळली. गांधी म्हणाले तूम्ही गरीबांच्या छातीवर बसला अहात ते आधी उठा. गरीबी आपोआप दूर होईल. गरीबांसाठी म्हणून जे जे काही केलं जातं त्या सगळ्या उपद्व्यापातून गरीबी वाढत जाते हे कटू सत्य आहे. गांधी हे  अ-सरकारवादी होते. सरकार किमान असावं असा गांधींचा आग्रह. पण गांधींच्या शिष्याने म्हणजे जवाहरलाल नेहरूंनी नेमके उलट केले. प्रचंड सरकारशाही नेहरूंनी तयार केली. त्याचे तोटे आपण सहन करतो आहोत.  

आज हे आठवायचं कारण म्हणजे महाराष्ट्रात निर्माण झालेला उसाचा प्रश्‍न. शासनाने जी एफ.आर.पी. (फेअर ऍण्ड रिजनेबल प्राईस) कबूल केली आहे ती पण सहकारी साखर कारखाने देवू शकत नाहीत. आणि नेमकं याच काळात गुजरात मधील कारखाने थोडी थोडकी नव्हे तर महाराष्ट्रापेक्षा तब्बल हजार ते पंधराशे रूपये जास्त किंमत उसाला देत आहेत. मग साधा प्रश्‍न निर्माण होतो. शेतकर्‍यांचे भले व्हावे म्हणून निर्माण झालेला हा सहकार नावाचा सरकारी देखावा शेतकर्‍यांना चांगली किंमत का देवू शकत नाही? आणि ती जर देवू शकत नसेल तर हे सगळे सहकारी साखर कारखाने चालवायचेच कशाला? 

शरद पवार यांनी असं विधान केलं की जर जास्तीची किंमत उसाला द्यायची तर साखर कारखाने बंद पडतील. खरंच हा प्रश्‍न आहे की का चालवायचे हे कारखाने? शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हितासाठी बंद पडलेलेच चांगले.

जेंव्हा शासन कापसाचा एकाधिकार चालवून खरेदी करत होते त्या प्रत्येक वर्षी कापसाला मिळालेली किंमत जागतिक बाजरपेठेपेक्षा कमीच राहिलेली आहे. जेंव्हा हा एकाधिकार उठला तेंव्हाच शेतकर्‍याला बर्‍यापैकी किंमत मिळायला लागली. दुसरे उदाहरण गहू आणि तांदळाचे आहे. महाराष्ट्रातील विदर्भाचे पाच जिल्हे तांदळाच्या एकाधिकार योजनेखाली येतात. इथे पिकलेला तांदळाचा दाणा न् दाणा सरकार ठराविक हमी भावाने खरेदी करते. तसेच पंजाब व हरियाणा येथे गव्हाच्या बाबतीत घडते. याचा परिणाम काय झाला? कृषी अर्थ तज्ज्ञ अशोक गुलाटी यांनी आकडेवारीसह  सिद्ध केले आहे की तांदूळ आणि गव्हाचे भारतातील एकाधिकार खरेदीचे भाव सतत कमीच राहिले आहेत. अगदी आपले शत्रू राष्ट्र असलेले पाकिस्तान आणि चीन सुद्धा आपल्या भावाच्या दीड ते पावणेदोन पट भाव देत आले आहे. म्हणजे गहू तांदूळ पिकवणार्‍या शेतकर्‍यांनी काय देशद्रोह करून आपले धान्य बाहेर नेवून शत्रू राष्ट्राला विकावे? याच पाकिस्तानातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव कोसळणार आहेत. 

हीच वेळ आता साखरेवर आली आहे. शेतकर्‍यांची काळजी करायची म्हणून, शेतकर्‍याचे हित डोळ्यासमोर ठेवायचे म्हणून सरकार सहकारी साखर कारखानदारी चा खेळ खेळते. प्रत्यक्षात हा खेळ शेतकर्‍याच्या जीवावर उठतो. 

याचा अर्थच असा होतो की साखरेचा हा सहकारी खेळ काही विशिष्ट वर्गाला साखर स्वस्त मिळावी म्हणून खेळला जातो. याचा सामान्य शेतकर्‍यांच्या हिताशी काही एक संबंध नाही. 

आपण सगळी आकडेवारी बाजूला ठेवू. गरीबांसाठी म्हणून गहू, तांदूळ, साखर यांच्या किंमती स्वस्त राहिल्या पाहिजेत असं डावे विचारवंत घसा ताणून ताणून सांगतात. त्यांचे आपण क्षणभर खरेही मानू. नेहरूंच्या समाजवादी धोरणाचा शेतीचे शोषण हा पायाच राहिला आहे. जनतेला पोटभर खायला मिळावं म्हणून शेतीचे शोषण केले हेही मान्य करू.  

आता रेशनच्या दुकानावरून जो गहू स्वस्त भेटला तो सामान्य गोर गरीब माणसाने घरी आणला. तो हा गहू काय तसाच खातो? या गव्हाचे पीठ करावे लागते. दोन रूपये किलोच्या गव्हाला दळायला चार रूपये किलो दर द्यावा लागतो. मग हे समाजवादी विद्वान गिरण्यांचे दळणाचे दर कमी करा असे आंदोलन का नाही करत? असाच प्रश्‍न साखरेचा आहे. साखरेचे दर साधारणत: 30 वर्षांत केवळ 5 पट वाढले आहे. याच्या नेमके उलट पेढ्याचे दर किती वाढले? आयस्क्रिमचे दर किती वाढले? चहाचे दर किती वाढले? सरासरी असे लक्षात येते की या सगळ्या दरात किमान 12 ते 14 पट वाढ झाली आहे.

म्हणजे शेतकर्‍यांकडून घेतांना जो ऊस स्वस्त  भाव पाडून खरेदी केला जातो. त्याची साखर बनली की त्या किंमतीवर नियंत्रण ठेवले जाते. पण त्याची मिठाई बनली, त्याच्या मळीची दारू बनली, त्याच्या पासून औषधी तयार झाली की त्याचे भाव गगनाला भिडतात. तेंव्हा मात्र कुणालाही गरीबांची फिकीर नसते. आपल्याकडची दारू बहुतांश मळीपासून तयार केली जाते. मला सांगा असं एकतरी आंदांलन कुणी छेडलं आहे का दारूच्या किंमती स्थिर ठेवल्या पाहिजेत? दारूला उत्पादन खर्चावर आधारीत हमी भाव मिळालाच पाहिजे? 

उसापासून साखर तयार करायचा कारखाना सहकारी असतो. मग दुसरा प्रश्‍न असा तयार होतो. या कारखान्यात तयार झालेली मळी- तिच्यापासून तयार होणारी दारू. तिचा कारखाना का नाही सहकारी? या साखरेचा उपयोग करून औषधी तयार करतात. दारूचे जावू द्या. ही औषधी तर जिवनावश्यक आहे ना. मग औषधी तयार करण्याचा कारखाना का नाही सहकारी? सहकार का फक्त शेतकर्‍याच्याच हिताचा आहे? इतर समाजाच्या हिताचा का नाही? 

इंधन ही मोठी जागतिक समस्या आहे. सतत आपल्याला आयात केलेल्या खनिज तेलावर अवलंबून रहावं लागतं. मग उसापासून तयार होणारे इथेनॉल मोठ्या प्रमाणात वापरण्याचे धोरण का नाही ठरवले जात? केवळ ऊसच नव्हे तर इतरही बायोमास जे शेतात तयार होते त्यापासून इथेनॉल तयार करता येवू शकते. याचा वापर करून आपले खनिज तेलावरचे अवलंबित्व कमी करता येवू शकेल. किंवा केवळ इथेनॉल असाच विचार न करता या उसापासून वीज निर्मिती करता येवू शकेल. पण हे सगळे बाजूला ठेवून केवळ साखरच तयार करायची. ती साखर केवळ सहकारी साखर कारखान्यांतच तयार करायची, तिच्यावर शासनाने नियंत्रण ठेवायचे हे नेमके काय धोरण आहे? 

साखर उद्योग नियंत्रण मुक्त करा अशी मूलभूत मागणी शेतकरी नेेते शरद जोशी यांनी आजपासून 25 वर्षे पूर्वी केली होती. साखर सरकारच्या नियंत्रणात आहे तोपर्यंत शेतकर्‍याचे नुकसान होतच राहणार आहे. जर शेतकर्‍याचे भले करायचे असेल तर साखर उद्योग तातडीने नियंत्रण मुक्त केला पाहिजे. 

सरकारला गोर गरिबांची जी काळजी वाटते, त्यासाठी आवश्यक तेवढा साखरेचा साठा शासनाने स्वत:जवळ करून ठेवावा. तो गोरगरिबांना वाटावा. एक काळ महाराष्ट्रात असा होता की गोर गरीबच काय पण मध्यमवर्ग सुद्धा रेशनवर साखर खरेदी करत असे. कारण त्याला खुल्या बाजारात साखर मिळत नव्हती. आता तयार साखरेचा बाजार खुला झाला आणि या लोकांनी रेशनवरून साखर खरेदी बंद केली. आज कुणीही रेशनवर साखर खरेदी करत नाही. 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जोखडातून कांदा-बटाटा-फळे-भाजीपाला यांची मुक्तता शासनाने केली आहे. हळू हळू त्याची चांगली फळे पहायला भेटत आहेत. डाळीच्या निर्यातीवर असलेले निर्बंध हटवले आहेत. तेलबियांच्या आयातीवर जास्तीची ड्युटी लावली आहे. याच मालिकेत आता साखरेवरील निर्बंध शासनाने उठवले पाहिजेत. 

दर वर्षी दिवाळी झाली की ऊस आंदोलनाची नौटंकी करणे म्हणजे काही व्यावसायीक शेतकरी नेत्यांचा धंदा होवून बसला आहे. आमच्या आंदोलनाने दोनशे आणि शंभर रूपये जास्तीचे मिळाले असे नाक वर करून सांगणारे हे शेजारच्या राज्यापेक्षा हजार ते पंधराशे कमीच भेटत आहेत हे मात्र विसरतात. 

तेंव्हा तातडीने साखर उद्योग नियंत्रण मुक्त करा अशीच मागणी शेतकर्‍यांच्या आणि सामान्य माणसांच्या हितासाठी केल्या गेली पाहिजे.  
    
           श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Wednesday, October 25, 2017

रस से भरी तेरी आवाज गिरीजा देवी


उरूस बुधवार 25 ऑक्टोबर 2017

बनारस घराण्याच्या ठूमरी गायिका गिरीजा देवी यांचे वृद्धापकाळाने 24 ऑक्टोबर रोजी निधन झाले. ठुमरीची साम्राज्ञी निवर्तली.

12 वर्षांपूर्वी मुुबईला षण्मुखानंद सभागृहात पंचम निषाद संस्थेच्या शशी व्यास यांनी एक अप्रतिम योग घडवून आणला होता. गानसरस्वती किशोरी आमोणकर, ठुमरी सम्राज्ञी गिरीजा देवी, गानहिरा परवीन सुलताना या तिघींना एक मंचावर आणले होते. पहिल्यांदा मंचावर आल्या परवीन सुलताना. त्या अप्रतिम गाऊन गेल्या. दुसर्‍यांदा मंचावर आल्या गिरीजा देवी. त्यावेळी त्या पंच्च्याहत्तरीत होत्या. फिक्या पिवळ्या रंगाची बनारसी त्या नेसल्या होत्या. शुभ्र केसाची भलीमोठी वेणी खांद्यावरून पुढे ओढून घेतली. कसलाही विलंब न करता आवाज लावला. एका सेकंदात त्यांचा आवाज असा काही लागला की सभागृहाने पहिल्याच सूराला कडाडून टाळी दिली. अतिशय रसरशीत असं ते गाणं. त्यांच्यासोबत त्यांची शिष्या मागे बसून गात होती. एका जागी तिने इतकी सुंदर हरकत घेतली की रसिकांनी तिलाही प्रचंड टाळ्या वाजवून मनसोक्त दाद दिली. गिरीजा देवींनी गाणं क्षणभर  थांबवलं, ‘हमारी बेटीको आपने तालिया दी.. एक गुरू के लिये और क्या चाहिये की लोग उनके शिष्योंको उनके सामने नवाजे... इन्ही के जरिये हमारे घरानेकी ये गायकी आगे जायेगी..’ लोकांनी परत टाळ्या वाजवल्या.

ठुमरी सारख्या गानप्रकाराला दुय्यम समजल्या जातं. स्वातंत्र्योत्तर काळात या ठुमरीला सिद्धेश्वरी देवींपासून बेगम अख्तर, निर्मला देवी, लक्ष्मी शंकर, शुभा गुर्टू, गिरीजा देवी यांनी मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. संगीत तज्ज्ञ अशोक दा. रानडे यांनी आपल्या पुस्तकात एक प्रसंग नमुद करून ठेवला आहे. केसरबाई मुंबईला एका कार्यक्रमात ठुमरी गात होत्या.  त्या सभागृहात सिद्धेश्वरींचे  आगमन झाले. लगेच केसर बाईंनी आपलं गाणं थांबवलं. सिद्धेश्वरी म्हणाल्या "क्यू बंद किया? आच्छा तो चल राहा था."   पण केसरबाई जे बोलल्या ते फार महत्त्वाचे होते. ‘ठुमरी की तालिम पाती तो सर पे बैठ के गाती.’ मला ठुमरीची तालिम भेटली नाही म्हणून गात नाही असं सांगत केसरबाईंनी सिद्धेश्वरींच्या ठुमरीचा गौरवच केला.

‘रस के भरे तोरे नैन’ ही गिरीजा देवींची अतिशय गाजलेली भैरवी ठुमरी. सत्याग्रह (२०१३) चित्रपटात ही ठुमरी वापरली आहे. त्यांच्या आयुष्याची भैरवी झाली आहे.. आज  त्यांना श्रद्धांजली वाहताना ‘रस से भरी तोरी अवाजा..’ अशीच भावना दाटून आली आहे.. गिरीजा देवींना विनम्र श्रद्धांजली.

(रस के भरे तोरे नैन या ठुमरीची link)

https://www.youtube.com/watch?v=HJS6Em8y3VU

Wednesday, October 18, 2017

हे शारदासुता ! तेंव्हा कुठे गेला होता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धर्म?


 उरूस बुधवार 18 ऑक्टोबर 2017 

महाभारत युद्धातील  सतराव्या दिवसाचा प्रसंग आहे. कौरवांचा सेनापती कर्ण, त्याच्या रथाचे चाक चिखलात रूतून बसले आहे. हे चाक तो काढत असताना अर्जून त्याच्यावर शस्त्र उचलतो. ते पाहून कर्ण, ‘हा क्षत्रियाचा धर्म नाही’ असे म्हणत आक्षेप घेतो. तेंव्हा कृष्ण इतिहासातील विविध प्रसंगांचे दाखले देवून कर्ण कसा अधर्माने वागला हे सिद्ध करतो आणि कर्णाला विचारतो, ‘राधासुता, तेंव्हा कुठे गेला होता तूझा धर्म?’

आताचा प्रसंग आहे कलियुगातील. 2014 च्या निवडणुकीचे महायुद्ध होवून केंद्रात लोकशाही मार्गाने भाजपचे सरकार  सत्तारूढ झाले आहे. समाजमाध्यमावर (सोशल मिडीया) काही तरूणांनी (यात आशिष मेटे सारखे सरळ सरळ राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते असलेले तरूणही आहेत) मोदींवर-भाजप संघावर जहरी टीका केली. त्यांच्या विरोधात पोलिसांनी कार्रवाई करण्याचे संकेत दिले (प्रत्यक्षात कार्रवाई अजून झालीच नाही) म्हणजे नोटीसा पाठवल्या. लगेच या तरूणांच्या पाठीशी आपण आहोत हे दर्शविण्यासाठी जाणते राजे मा. शरद पवार यांनी या तरूणांची एक बैठक मुंबईत बोलावली. आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने असल्याचे ठामपणे शरद पवारांनी या तरूणांना सांगितले. शिवाय या तरूणांना कायदेशीर लढाईसाठी सर्व मदत करण्याचे आश्वासनही दिले.

ज्या सोशल मिडीयावर या तरूणांनी ही गलिच्छ शब्दांतील निंदानालस्ती केली होती त्याच सोशल मिडीयावर या तरूणांनी मा. शरद पवार यांच्या पाठिंब्याची टिमकीही जोरात वाजवायला सुरवात केली.

काय गंमत आहे पहा. प्रसंग आहे जून 1975 चा.  अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ज्या तरूणांच्या पाठिशी शरद पवार ठामपणे उभे राहिले नेमक्या या तरूणांच्या वयाचेच तेंव्हा शरद पवार होते. शरद पवारांचे वय होते केवळ 33 वर्षे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला  धोका नव्हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सरळ सरळ खुनच केला गेला होता. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी  यांनी देशात आणिबाणी लादली होती. तेंव्हा मा. शरद पवार कुठे होते? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने होते का अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून करणार्‍यांच्या टोळीत होते? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून झाला त्या रक्ताचे डाग यांच्या स्वच्छ कपड्यांवर उडाले की नाही?

शरद पवार तेंव्हा कॉंग्रेसमध्येच सत्तेत होते. आणिबाणीच्या संपूर्ण कालखंडात हजारोंनी कार्यकर्त्यांना तुरूंगात डांबल्या गेले. पवारांनी तेंव्हा चकार शब्दही काढला नाही. की सत्ताही सोडली नाही. महाराष्ट्रात आणिबाणीचा विरोध मोठ्या जोरकसपणे झाला. शरद पवार ज्या साहित्यीक कलावंत विचारवंत यांच्या पाठिशी सतत असल्याचा भास निर्माण करतात त्या सर्वांनी आणिबाणीचा विरोध केला होता. दुर्गा भागवत, नरहर कुरूंदकर आणीबाणी विरोधी  जाहिर भाषणं देत फिरत होते. अनंत भालेराव यांच्यासारखे लढवय्ये संपादक पत्रकारितेचे भिष्मपितामह तुरूंगात होते. वर्तमानपत्रांतून अग्रलेखाची जागा कोरी सोडून दिली जात होती. विनय हर्डीकरांसारखे पत्रकार लेखक केवळ तुरूंगात गेले असे नाही तर त्यांनी यावर ‘जनांचा प्रवाहो चालला’ हे सविस्तर पुस्तकच लिहून काढले. या पुस्तकाला  जाहिर झालेला पुरस्कार शासनाने रद्द केला. तेंव्हा शरद पवार सत्तेतच होते. त्यांनी काय भूमिका घेतली?  लोकांनी वर्गणी करून या पुस्तकाचा गौरव केला. पुढेही शरद पवारांसारख्यांनी कशी भूमिका घेतली यावर ‘जन ठायी ठायी तुंबला’ या आपल्या दुसर्‍या पुस्तकांतही सविस्तर लिहीले.

शरद पवार यांनी आणिबाणी नंतर तर कळसच केला. इंदिरा कॉंग्रेसचा पराभव होवून दिल्लीत जनता पक्ष सत्तेत आला.  महाराष्ट्रात काही सत्ताबदल झाला नाही. इंदिरा गांधींचा गट व वसंतदादांचा गट या दोन कॉंग्रेसच्या गटांनीच मिळून सत्ता राखली. शरद पवारांनी आणिबाणी विरोधात आंदोलन करणार्‍या जनता पक्षाच्या 95 आमदारांच्या पाठिंब्यावर आणि आणिबाणीच्या बाजूनं असणार्‍या सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाच्या 35 आमदारांना  सोबतील घेवून  सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री पद पटकावले. म्हणजे आणिबाणीत हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खुन करणार्‍यांच्या टोळीत सामील झाले. आणि आणिबाणीनंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांचा पाठिंबा घेवून मुख्यमंत्री झाले. अभिव्यक्ती  स्वातंत्र्याचे काहीही होवो पवारांनी आपल्या ‘सत्तावर्ती’ राजकारणारचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ ही ढोलकी दोन्ही बाजूने पवार वाजवत होते. विरोध करणार्‍यांसोबतही आणि पाठिंबा देणार्‍यांसोबतही.

मोदी लोकशाही मार्गाने निवडून आले आहेत. त्यांचा विरोध लोकशाही मार्गानेच करता येवू शकतो. किंवा तो तसाच केला पाहिजे. उद्या मोदी हुकूमशाहीच्या मार्गाने गेले तर त्यांनाही कडव्या विरोधाला तोंड द्यावेच लागेल. आत्ता पंजाबातील  गुरूदासपूरची लोकसभेची पोटनिवडणूक आणि  महाराष्ट्रात  नांदेडमध्ये महानगरपालिकेची निवडणुक कॉंग्रेसने लोकशाही मार्गानेच जिंकली आहे. पवारांचा पक्ष तिथे सपशेल पराभूत झाला. सोबतच ग्रामपंचायतीची निवडणुक झाली. त्यातही पवारांच्या राष्ट्रवादीला  विशेष यश मिळवता आले नाही. पवारांनी आपला पक्ष लोकशाही मार्गाने सत्तेत आणावा. त्यांना कुणीही रोकले नाही.

पवार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने असल्याचा दाखला त्यांनी कृतीतून द्यावा. ज्या भाषेत सोशल मिडीयावर या तरूणांनी मोदी-भाजपवर टिका केली आहे तशी भाषा पवारांच्या विरोधात इतर तरूणांनी वापरली तर पवारांच्या पक्षाचे कार्यकर्ते त्या तरूणांशी कसा व्यवहार करतील?

स्वत: पवारांनी निवडणुकांत राजू शेट्टी यांची जात काढली होती, ‘अर्ध्या चड्डीची’ भाषा केली होती, पेशवाईचा उल्लेख केला होता हे कोणते अभिव्यक्ती स्वातंत्र्य? हे पण पवारांनी देशातील जनतेला जाहिरपणे सांगावे.

पवारांच्या 50 वर्षांच्या सांसदिय कारकिर्दीतील जेमतेम 10 वर्षे सोडल्यास 40 वर्षे ते सत्तेत राहिले आहेत. केवळ राज्यच नव्हे तर केंद्रिय मंत्रीमंडळात महत्त्वाची खाती त्यांनी भूषविली आहेत ते पवार मुठभर तरूणांच्या सोशल मिडीयावरील पोस्टच्या प्रकरणात स्वत: लक्ष घालतात हे कशाचे लक्षण आहे? हे काम तर सुप्रियाताई, धनंजय मुंडे किंवा त्यांचा पक्षाच्या कुणाही तरूण/विद्यार्थी नेत्याला करता आले असते.

बरं इकडे या तरूणांच्या पाठिशी उभे राहिल्याचा देखावा आणि तिकडे पंतप्रधान मोदींना बारामतीत पायघड्या हे नेमके काय धोरण आहे? इकडे पवार तरूणांची बैठक घेतात आणि तिकडे अजीतदादा नितीन गडकरींच्या दिल्लीतील ‘वाड्यावर’ जातात ही राष्ट्रवादीची नेमकी कोणती अभिव्यक्ती आहे? 

महाराष्ट्रातील विधानसभेचे निकाल पुरते लागायच्या आतच पवारांनी भाजप सरकारला  न मागताही बाहेरून बिनशर्त पाठिंबा जाहिर केला होता.  मग आता हा बिनशर्त पाठिंबा न सांगता तातडीने परत का नाही घेतल्या जात?

भारतभर डाव्या चळवळीतील लेखकांनी पुरस्कार वापसीचे आंदोलन छेडले होते. मग पवारांनी त्यांच्या सुरात सुर मिसळून आपला पद्मविभुषण पुरस्कार का नाही वापस केला?

म्हणजे जेंव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत, असहिष्णुतेबाबत भाजप सरकार विरोधी आंदोलन भरात होते, लेखक पुरस्कार वापस करत होते, कन्हैय्याकुमार सारखे विद्यार्थी ‘आझादी’च्या घोषणा देत होते, रोहित वेमुलासारखे विद्यार्थी आत्महत्या करत होते. शेतकरी तर लाखोंच्या संख्येने आत्महत्या करतच आहेत. नोटाबंदी मग नंतर जी.एस.टी. ने सगळे हैराण आहेत असे चित्र सगळे विरोधी पक्षाचे लोक डाव्या चळवळीतील लोक रंगवत असताना पवार काय करत होते? ते राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत ‘पद्मविभुषण’ पुरस्कार स्विकारत होते.

सरकारच्या विरोधात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने जेंव्हा पवार तरूणांच्या पाठिशी उभे असल्याचे चित्र जाणिवपूर्वक रंगविल्या जाते आणि त्याच वेळी त्याचवेळी स्वत: पवार याच सरकारकडून पद्मविभुषण पुरस्कार स्विकारतात...   म्हणूनच विचारावे वाटते, ‘हे शारदासुता ! तेंव्हा कुठे गेला होता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धर्म?’ 
 
        श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

 
   

Thursday, October 5, 2017

लेखकाच्या स्मृतीत सांस्कृतिक सोहळे


उरूस, विवेक, 24 सप्टेंबर 2017

काळ अतिशय प्रतिकूल असा स्वातंत्र्यापूर्वीचा, जात्यांध-सरंजामदारी निजामी राजवटीचा. एक लेखक अतिशय हलाखीच्या स्थितीत हैदराबाद या राजधानीच्या गावापासून मैलो दूर परभणी सारख्या तेंव्हाच्या खेडेवजा शहरात राहून वाङ्मय निर्मिती करतो. एक दोन नाही तर तब्बल सात कादंबर्‍या, पाच कथा संग्रह, सव्वाशे कविता इतकी निर्मिती अवघ्या 40 वर्षांच्या आयुष्यात करतो. ओढग्रस्तीत त्याची तब्येत खालावत जाते. शेवटी नोकरीच्या ठिकाणीच 7 सप्टेंबर 1953 ला हृदय बंद पडून त्याचा करूण देहांत होतो. तो दिवस असतो पोळ्याचा. अमावस्येचा. 

बरोबर पन्नास वर्षांनी 7 सप्टेंबर 2002 साली अमावस्याच असते. या लेखकाच्या स्मृतीत एक कोटी रूपये खर्च करून भव्य स्मारक उभारल्या जाते. ग्रेस सारख्या प्रतिभावंत कविच्या हस्ते त्या स्मारकाचे उद्घाटन होते. 
कविवर्य बोरकरांनी असं लिहून ठेवलं होतं

मी विझल्यावर त्या जागेवर
नित्याच्या जनरितीप्रमाणे
विस्मरणाची थंड काजळी
उठेल थडगे केविलवाणे

मी विझल्यावर त्या जागेवर
पण कोण्या अवसेच्या रात्री
धुळीत विखुरल्या कविता माझ्या
धरतील चंद्र फुलांची छत्री

ओळी लिहिल्या बोरकारांनी. पण अगदी शब्दश: त्या खर्‍या ठरल्या या लेखकाच्या बाबतीत. अमावस्येलाच या कविच्या कवितांनी त्याच्या साहित्यानेच त्याच्यावर चंद्र फुलाची छत्री धरली. त्याचे सुंदर स्मारक साकार झाले. या कविचे नाव आहे बी. रघुनाथ. 

भगवान रघुनाथ कुलकर्णी हे त्या लेखकाचे मूळ नाव.  निजामी राजवटीत तेलगू पद्धतीप्रमाणे त्यांनी लेखक म्हणून टोपण नाव स्विकारले ‘बी. रघुनाथ’.

या लेखकाच्या नावाने परभणीत स्मारक उभारल्या गेले आहे. त्यांच्या स्मृतीत एक सभागृह त्यांच्या मृत्यूनंतर लगेच 1956 ला भर गावात उभारण्यात आले होते. नंतर 2002 मध्ये नविन स्मारक पुतळ्यासह उभारण्यात आले. इतकेच नाही तर गेली 15 वर्षे त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सप्टेंबर महिन्यात चार दिवसांचा ‘बी. रघुनाथ महोत्सव’ भरविला जातो.  बी. रघुनाथांच्या नावाने मोठे महाविद्यालय परभणी शहरातच सुरू करण्यात आले आहे. 

औरंगाबादला गेली 28 वर्षे ‘बी. रघुनाथ स्मृती संध्येचे’ आयोजन करण्यात येते. त्यांच्या नावाने एक मोठा वाङ्मयीन पुरस्कार देण्यात येतो. या वर्षी हा पुरस्कार प्रा. नितीन रिंढे यांच्या ‘लिळा पुस्तकांच्या’ या पुस्तकाला प्रख्यात नाटककार अजित दळवी यांच्या हस्ते देण्यात आला आहे. 

एखाद्या लेखकाचे स्मारक उभारणे आणि त्याच्या स्मृतीत असे सोहळे साजरे करणे हे महाराष्ट्रात फार दूर्मिळ आहे. केशवसुतांचे मालगुंडला देखणे स्मारक उभे आहे.  पु.ल.देशपांडे यांच्या नावाने एक अकादमी मुंबईला स्थापन करण्यात आली आहे. पु.लं.चा पुतळाही रविंद्र नाट्य मंदिराच्या परिसरात आहे. कुसूमाग्रजांच्या स्मृती नाशिककर सतत जागवत असतात. कुसूमाग्रज प्रतिष्ठानने मोठे कामही उभे केले आहे. नांदेडला प्रा. नरहर कुरूंदकरांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. जळगांवला ‘काव्य रत्नावली’ चौक उभारून कविंची स्मृती जागविली गेली आहे. हे ठळक अपवाद वगळले तर लेखकाची स्मृती जपण्याचे प्रयत्न फारसे होताना दिसत नाहीत. उलट विखारी जातीय भूमिका घेत लेखकांचे पुतळेच उखडून टाकण्याची मात्र उदाहरणे आहेत. 

साहित्य संमेलनांची मोठी परंपरा महाराष्ट्रात असताना लेखकांची मात्र उपेक्षा कशामुळे केली जाते? 

 सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाच्या लेखकाच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व साहित्याचे पुनर्मुद्रण झाले पाहिजे. जे लिखाण प्रसिद्ध झाले नसेल ते प्रकाशात आले पाहिजे.  दूसरं महत्त्वाचे काम म्हणजे त्या लेखकाच्या महत्त्वाच्या कलाकृतींवर आधारीत विविध कार्यक्रमांचे सादरीकरण. रविंद्रनाथ टागोरांवर आजही बंगालात विविध कार्यक्रम सातत्याने घेतले जातात. रविंद्र संगीताचे सादरीकरण आजही तरूण कलाकार मोठ्या उत्साहने करतात.
पण मराठीत हे होताना दिसत नाही. आधुनिक काळातील लेखक तर नंतरची बाब आहे. पण ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास, चोखा मेळा, महदंबा, सोयराबाई, मुक्ताबाई, जनाबाई यांच्या समग्र लिखाणाची अर्थासह स्पष्टीकरण देणारी सटीप आवृत्ती आहे का?

अण्णाभाऊंचे पुतळे जातिय राजकारणाच्या सोयीसाठी गावोगाव उभारलेले दिसतात. पण त्याचा साहित्य प्रेमाशी काडीचाही संबंध आढळून येत नाही. 

एक अतिशय साधी योजना आखता येवू शकते. त्या त्या परिसरातील दिवंगत साहित्यीकाच्या स्मारकासाठी त्या  त्या परिसरातील ‘अ’ दर्जाच्या ग्रंथालयाला विशिष्ठ निधी देवून त्यांना- पुतळा उभारणे, पुस्तके प्रकाशीत करणे, स्मृती सोहळे साजरे करणे - यासाठी प्र्रोत्साहित केल्या जावू शकते. महाराष्ट्रात 235 जिल्हा ‘अ’ दर्जाची शासनमान्य ग्रंथालये आहेत. यांना नियमित अनुदानही दिले जाते. सर्व ग्रंथालयांना स्वत:ची छोटी मोठी इमारत आहे, सभागृह आहे, पुतळाच उभारायचा असेल तर जागाही उपलब्ध होवू शकते. काही ठिकाणी नगर पालिका महानगरपालिकेची खुली जागा ग्रंथालयांला लागून असेल तर तीपण पुतळ्यासाठी उपलब्ध होवू शकते. काही लेखकांचे नातेवाईक जे की आर्थिक दुष्ट्या सुस्थितीत असतील ते देणगीही देवू शकतात. (औरंगाबादला पत्रकार अनंत भालेराव यांच्या कुटूंबियांनी त्यांचा पुतळा साहित्य परिषदेला देणगी दाखल दिलेला आहे.) 

काही शैक्षणिक संस्थाही यासाठी पुढाकर घेवू शकतात. नांदेडला असा पुढाकार नरहर कुरूंदकर स्मारकासाठी तेथील शैक्षणिक संस्थेने घेतलाही आहे. 

प्रत्येक वेळी शासनाची मदत पाहिजे, अनुदान पाहिजे असेही नाही. गावोगावी विविध उत्सव दणक्यात साजरे होतच असतात. अगदी खेड्यागावातही हरिनाम सप्ताह, भागवत सप्ताह होतात. त्यावर प्रचंड खर्चही होतो. मग काही ठिकाणी अशा संस्थांनी पुढाकार घेवून हेच सोहळे त्या त्या भागातील प्रतिभावंतांच्या स्मृतीत साजरे केले तर कुठे बिघडले? 

हे का करायचे? तर हे प्रतिभावंत काळाच्या पुढचे पहात असतात. ज्यांची प्रतिभा काळावर टिकते त्यांची दखल आपण घ्यायलाच हवी. बी. रघुनाथ यांनी 1945 मध्ये असं लिहीलं होतं

राऊळी जमतो भावूक मेळा
गुरवाचा गांजावर डोळा
त्यातही डोळे किती निराळे
भक्त कुणा समजावे
आज कुणाला गावे

संन्याश्याच्या छाटीत चोळी
मुमुक्षु  फिरतो गल्ली बोळी
विविधरंगी या शुका-बकातील 
नितळ कसे निवडावे
आज कुणाला गावे

आज जिकडे तिकडे सामान्य भक्तांची दिशाभूल करणार्‍या बाबा/बुवा/बापुंचा विषय चर्चेत आहे. आणि सत्तर वर्षांपूर्वी एक कवि नेमकं हेच टिपून ठेवतो हे त्याच्या प्रतिभेचे मोठेपण नाही का?

बी. रघुनाथांच्या स्मृतीत सामान्य रसिक एकत्र येवून सोहळा साजरा करतात हे जास्त महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच हा उत्सव टिकून आहे. त्यात औपचारिकता नसून उत्स्फुर्तता आहे. 

आषाढीला महाराष्ट्राभरातून विविध संतांच्या नावाने दिंड्या निघतात. आणि त्या सगळ्या मग आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरला जमा होतात. या प्रमाणेच विविध साहित्यीकांच्या नावाने महाराष्ट्रभर वर्षभर सोहळे साजरे व्हावेत. आणि या सगळ्यांची ‘वाङ्मयीन एकादशी’ साहित्य संमेलनाच्या रूपात साजरी व्हावी.  
 
          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, September 19, 2017

ललीमावशी गेली......



(लेख श्रीकृष्णचा माझ्या मोठ्या भावाचा, कविता माझी)
 
ललीता कमलाकरराव  भंडारी, माझ्या आईची मावशी काल (१८ सप्टेंबर) वयाच्या ८२ व्या वर्षी गेली. असामान्य कर्तुत्वाची स्त्री होती ती. आजोबा लवकर गेले. त्यांच्या माघारी हिने दोन मुली आणि एक मुलगा वाढवले, शिकवले, मोठे केले. तिची नातवंडे, सुना, नातसुना, जावाई, लेक, लेकी सगळे उच्चशिक्षित उच्च पदस्थ आहेत. 

ती छोट्या खेड्यात ग्रामसेविका होती. अंधूक होत होत तीची दृष्टी गेली. तेव्हा मामा, मावशी शिकत होते. हिने न डगमगता तशाही परिस्थितीमधे नोकरी चालूच ठेवली. ईतर कर्मचारी रिपोर्ट्स वाचायचे. ते हिला पाठ असायचे. स्वतःच्या कामाचे अहवाल ती म्हणून दाखवायची. तिच्या गावात झालेल्या अधिकार्‍यांच्या बैठकित तिने कोण कुठे बसले आहे याची चौकशी करून रिकाम्या खुर्चीत जावून बसली आणि तिला विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत बैठकिचे काम पार पडले. तिला दिसत नाही अशी शंकाही कुणाला आली नाही!

ती दिसत नसले तरी सगळा स्वैपाक करायची. तिच्या हातून कधी तिखट मिठ कमी जास्त झाले नाही ना कधी सांडलवंड झाली ना दुध उतू गेले.

मी तीच्या घरी गेलो की तीच्या बाजूला न बोलता बसून रहायचो. ती विचारायची कोण आहे म्हणून. मी उत्तर देत नसे. ती चाचपडून पहायची. माझा हात सापडला की तो हातात घेवून स्पर्शावरून ओळखायची. जाड झालास, बारीक झालास म्हणायची. निघताना हातात पैसे ठेवायची. मला मुले झाली तरीही. 'अगं मी काय लहान आहे का आता?' असं म्हटलं तर म्हणायची माझ्यापेक्षा मोठा झालास? तीने कधिच मला शिरा न खाउ घालता वापस पाठवले नाही! 

अद्वितिय जिद्द तिच्या अंगी होती. त्या जिद्दीमुळेच ती ईथवर आली. तीचे पाठांतर, तीची स्वच्छता, काय काय सांगू? स्वतःच्या शारिरिक मर्यांदांवर मात करून संपन्न, समृध्द, समाधानी जिणे जगली ती.

गेली अनेक महिने ती अंथरूणावर होती. समज नव्हती. नूसता श्वास चालू होता. बाकी त्रास असा नव्हता काही. मामालाच ओळखायची शेवटी शेवटी. दिवाळीत तीच्या घरी गेलो तर तीच्या खोलीत गेलोही नव्हतो. त्या करारी जिद्दी आज्जीला अंथरूणावर गोळा होवून पडलेलं पहावत नव्हतं. तिचे आयुष्य केंव्हाच संपले असावे. केवळ जिद्दीपोटी ती जगत होती. मला खात्री आहे शेवटी आसपास घोटाळणार्‍या यमाची दया येवून तीने जगण्याची जिद्द सोडली असावी. आणि मगच त्याला तीचे प्राण ताब्यात घेता आले असतील.
त्या असामान्य आज्जीला तीच्या जिद्दीला कोटी कोटी प्रणाम


तू अष्टभुजा

परिस्थितीचा कठीण  कातळ फोडून तू
सळसळत्या उर्मीचा 
जगण्याचा जिवंत झरा शोधून काढलास बाई
आयुष्याच्या  छोट्या छोट्या लढाईत 
आम्ही हतबल होवून बसतो
सगळी शस्त्र बोथट झाली
असं मानतो
अन् तू तर काहीच हाती नसताना
अक्राळ विक्राळ काळाशी
दोन हात करत गेलीस

तूझे दोन आणि तूझ्या तीन लेकरांचे सहा हात
तू अष्टभुजा बनून 
समस्येच्या  महिषासुराचा वध केलास बाई
 
शंकर तर निघून गेला होता अर्ध्यातूनच
तू महाकाली बनून पचवलेस सगळे विष
आणि हसत राहिलीस 
बोळक्या झालेल्या चेहर्‍याने
निरागसपणे

बये तूझी ही चिवट झुंजणारी वृती
दे थोडी थोडी 
आम्हा नातवंडांमध्ये वाटून

आता घटस्थापनेला 
तूझाच बनवून चांदीचा टाक
पूजा करावी म्हणतो आहे..

मला खात्री आहे
तू पावशील नक्की...

- श्रीकांत उमरीकर 

Sunday, September 17, 2017

ना टिळकांचा ना रंगारींचा! गणेशोत्सव फक्त बुंगारींचा !


उरूस, विवेक, 17 सप्टेंबर 2017

सार्वाजनिक गणेश उत्सव कुणी सुरू केला? टिळकांनी का भाऊ रंगारींनी? असा एक क्षुल्लक  वाद उकरून काढण्यात आला. तांत्रिकदृष्ट्या तो भाऊ रंगारींनी सुरू केला हे जरी मान्य केले तरी त्याचा प्रचार आणि प्रसार टिळकांमुळेच झाला यात चर्चा/वाद करण्याचे काही कारणच नाही. 

ज्ञानेश्वरांच्यापेक्षा नामदेव वयाने मोठे होते. ज्ञानेश्वरांचे गुरू असलेले निवृत्तीनाथ तर त्यांचे थोरले बंधुच होते. ज्ञानेश्वरांच्याही आधी मुकूंदराजांनी ‘विवेकसिंधू’ ग्रंथ लिहीला. असे असले तरी सर्वांनी वारकरी संप्रदायाचे आद्यत्व आणि मोठेपण ज्ञानेश्वरांनाच बहाल केलेले आढळते. त्यामुळे गणेश उत्सवाचे श्रेय जास्त टिळकांनाच जाते. पण आज जे स्वरूप सार्वजनिक गणेश उत्सवाला आले आहे ते पाहता टिळक म्हणाले असते आमचे चुकलेच.

हा महोत्सव पूर्णत: राजकीय नेत्यांनी कब्ज्यात घेतला आहे. 1990 पर्यंत सार्वजनिक गणेश उत्सवाचे स्वरूप वेगळे होते. प्रचंड मोठे गणपती, त्यांच्यासमोर दिमाखदार मांडव, रोषणाई, खर्चिक आकर्षक देखावे असला प्रकार नव्हता.  या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जायचे. शालेय पातळीवर विविध स्पर्धा व्हायच्या. व्याख्यानं, गाण्याचे कार्यक्रम असायचे. बर्‍याच ठिकाणी या निमित्ताने नाटकं व्हायची. एरव्ही ज्या गावात नाटक पहायला मिळायचे नाही त्या गावात गणपतीच्या काळात होणारे नाटक ही पर्वणी असायची. काही मोठे गायक नेमके याच काळात सर्वसामान्य रसिकांना ऐकायला मिळायचे. 

गल्लीच्या पातळीवरील कलाकारांना आपली कला दाखवायला संधी याच व्यासपिठांवर मिळायची. 

1990 नंतर दोन गोष्टीत बदल झाला. कॉंग्रेसची एकाधिकारशाही संपून विविध पक्षांना छोटे मोठे सत्तेचे तुकडे अनुभवायला मिळू लागले. परिणामी विविध स्तरातील विविध गटांतील लोकांची महत्त्वाकांक्षा जागृत झाली. त्यांना सार्वजनिक गणेश मंडळाचे सर्वव्यापी स्वरूप खुणावायला लागले. 

1990 नंतर जागतिक पातळीवर व्यापार खुला होण्यासोबत भारतात आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी गुंतवणूक वाढवायला सुरूवात केली. या मोठ्या कंपन्या जाहिरात म्हणून गणेश उत्सवांना प्रायोजकत्व द्यायला तयार व्हायला लागल्या. परिणामी कालपर्यंत सर्वसामान्यांच्या जेमतेम वर्गणीवर चालणार्‍या गणेश मंडळांना जास्तीचा पैसा मिळायला लागला. 

चित्रपटांमध्ये 1991 नंतर कार्पोरेट पातळीवर भांडवल यायला लागले. याचा परिणाम म्हणजे करमणुक उद्योग हा लॉटरी/मटक्या सारखा नशिबाचा खेळ न राहता हक्काची गुंतवणूक आणि हक्काचे उत्पन्न असा उद्योग म्हणून वाढत गेला. याचा परिणाम असा झाला की कलाकारांना स्थिर उत्पन्न सुरू झाले. मग या कलाकारांचे भाव प्रचंड वाढत गेले. असे कलाकार गणेश उत्सवात बोलवायचे म्हणजे खर्च मोठ्या प्रमाणात करणे सुरू झाले. असे कलाकार आले की गर्दी गोळा होते हे पाहून प्रायोजकही हात सैल सोडवायला लागले. 

गर्दी गोळा होते म्हणून राजकीय नेत्यांचा रस वाढत गेला. त्यांची पकड घट्ट होत गेली. 

बघता बघता समाज प्रबोधनाचा स्वातंत्र्यपूर्व काळातील उद्देश मागे पडला. स्वातंत्र्योत्तर काळातील माफक करमणुक, स्थानिक कलाकारांना संधी, मान्यवर कलाकारांची कला ऐकण्याची पाहण्याची संधी हे सगळे मागे पडले. आता गणेश उत्सव मोठा ‘इव्हेंट’ बनत गेला. 

‘लालबागचा राजा’ गणपतीचे प्रस्थ तर इतके वाढले की त्याच्या दर्शनाचा ‘व्हि.आय.पी.’ पास मिळावा म्हणून आमदार खासदार मंत्र्यांपर्यंतची शिफारस लागू लागली. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोक येवू लागले. त्यातून इतरही काही विकृती तयार झाल्या. याच काळात पुणे-मुंबई सारख्या शहरात वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून यायला लागला. 

गणेश उत्सवात रस्त्यावर मांडव टाकून रस्ता अडवणे, मोठ्या आवाजात डिजे लावून धांगडधिंगा घालणे, विसर्जनाची मिरवणून म्हणजे तर धिंगाण्याला अधिकृत परवानगीच असे स्वरूप सध्या आले आहे. कार्यकर्ते सांभाळायचे तर हे सगळं करावेच लागते असं राजकीय नेते सर्रास सांगतात. औरंगाबादला तर खा. चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांमधून उघडपणे गणपतीच्या मूर्तीसमोर कार्यकर्त्यांना पत्ते-जुगार खेळू देण्याचे समर्थन केलं आहे. 

गणेश उत्सवाचा एक विचित्रच परिणाम टिव्ही मालिकांमधून पहायला भेटत आहे. जसे की हिंदी चित्रपटात एकेकाळी ‘सरसों का साग, मक्केदी रोटी, गाजर का हलवा’ म्हणजे राष्ट्रीय पदार्थ असावेत अशी वर्णनं असायची. जसे काही भारतातील लोक केवळ इतकेच खातात. तसे आता गणेश उत्सवाच्या काळात प्रत्येक मालिकांमधून गणपतीची पूजा, आरती, मोदक यांचा मारा सुरू झालेला आढळून येतो. जसे की मराठी माणूस म्हणजे गणेश उत्सवच केवळ. 

नुकतेच जिकडे तिकडे गाजणारे वरूण धवन या हिंदी अभिनेत्याचे गाणे तर कमाल आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, परेशान करे मुझे छोरिया’ आता हे काय बोल झाले? नशिब ऍनिमेशन केलेला गणपती वरूण धवन सोबत नाचताना दाखवला नाही.

 काय विरोधाभास आहे पहा. महाराष्ट्रभर गणपतीच्या नावाने दहा दिवस रस्त्यावर सांस्कृतिक गोंधळ घातला जातोय. लाखो करोडो रूपयांची वर्गणी/खंडणी गोळा होते आहे. आणि नेमके याच्या काही दिवसच आधी सुमीत राघवन सारख्या अभिनेत्याने नाट्यगृहांची अवस्था कशी वाईट झाली याची चित्रफित काढून सर्वत्र फिरवली होती. म्हणजे रस्त्यावर सांस्कृतिक गोंधळासाठी आम्ही दौलतजादा उधळत आहोत आणि आमची रंगमंदिरं मात्र निधी अभावी मोडक्या तुटक्या अवस्थेत हलाखीचे जिणे जगत आहेत. 

आता लगेच नवरात्रात सर्वत्र दांडिया/गरबा असाच रस्त्यावर खेळला जाईल. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतील. नोटाबंदीचे सगळे दडपण आता संपले आहे. तेंव्हा नविन कोर्‍या करकरीत नोटा बाहेर येतील. 200 ची नविन नोटही आता बाजारात येते आहे. 

नवरात्र संपल्यावर आपल्या लक्षात येईल की नाट्यगृहांची अवस्था तशीच बिकट आहे. नगर पालिका, महानगरपालिका, राज्य सरकारचे सांस्कृतिक खाते यांच्या नावाने माणसे बोटे मोडताना दिसतील. पण ते हे कबूल करणार नाहीत की गणेश उत्सव किंवा नवरात्रात जी उधळपट्टी झाली ती यांच्याच खिशातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष झाली होती. हाच सगळा पैसा सलग 2 वर्षे महाराष्ट्रभरच्या रसिकांनी नाट्यगृहांच्या दूरूस्तीसाठी द्यायचे ठरवले तर सांस्कृतिक क्षेत्रात भरिव अशी कामगिरी ठरू शकेल. 

महाराष्ट्रभरच्या कलाकारांसाठी ही नाट्यगृहं अतिशय महत्वाची आहेत. गणपती व नवरात्रीचे 20 दिवसच नाही तर वर्षभर सांस्कृतिक उपक्रम इथे चालविता येऊ शकतात. रस्त्यावर तात्पुरता मंच उभारणे, ध्वनी-प्रकाश व्यवस्था यांची सोय करणे, खुर्च्या मांडणे यापेक्षा कायमस्वरूपी अशी व्यवस्था कलेच्या विकासासाठी नेहमीच पोषक असते. 

टिळकांच्या काळातला गणेश उत्सव विविध संस्थांना जन्म देणारा ठरला. पुणेच काय पण महाराष्ट्रभर विविध संस्था या निमित्ताने उभ्या राहिल्या. मी ज्या गावात लहानाचा मोठा झालो ते परभणी गाव आणि संपूर्ण मराठवाडा 1948 पर्यंत निजामी (निजामशाही नाही) राजवटीत होते. या गावच्या कार्यकर्त्यांनी लोकमान्य टिळकांची इ.स. 1900 मध्ये लातूर येथे भेट घेतली. त्यांना टिळकांनी राजकिय सामाजिक कार्य करण्यासाठी गणेश उत्सवाच्या काळात वाचनालयाची स्थापना करण्याचा सल्ला दिला. 1901 मध्ये ‘गणेश वाचनालय’ याच नावाने हे वाचनालय तेंव्हा स्थापन झाले. आज 117 वर्षांचे हे ग्रंथालय शहराचे सांस्कृतिक भुषण म्हणून कार्यरत आहे. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. 

याच्या उलट आत्ताचे गणेश उत्सव पाहता अशा काही कायमस्वरूपी संस्था, सभागृहे, उपक्रम चालताना दिसतात का? म्हणूनच वैतागून म्हणावेसे वाटते की हा गणेश उत्सव ना टिळकांचा, ना रंगारींचा.. हा उरला फक्त बुंगारींचा!! 

  
          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575