Monday, May 28, 2018

साखर आयात । बुद्धी निर्यात ॥


उरूस, सा.विवेक, मे 2018

पाकिस्तानातून साखर आयातीच्या बातम्या माध्यमांत झळकल्या तशा शेतकर्‍यांचा कळवळा असणार्‍यांनी आणि पाकिस्तानचे नाव आले म्हणून देशाभिमान्यांनी बोंब सुरू केली. हे म्हणजे वाळलेले पान पाठिवर पडताच आभाळ पडले म्हणून धावत सुटणार्‍या सश्यासारखेच झाले. फरक इतकाच की तो ससा निदान निरागस तरी होता. हे शेतकर्‍यांचा कळवळा दाखविणारे डामरट ढोंगी आहेत. 

एरव्ही पंजाबात वाघा बॉर्डरवरून साखरेचे ट्रकच्या ट्रक पाकिस्तानातून येतात तेंव्हा कुणी ओरडत नाही. पण ही साखर मुंबई बंदरात उतरली आणि ओरड करणार्‍यांच्या डोळ्यात आली. शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना वगळता कुणीच या मुद्द्यावर वस्तुनिष्ठ खुलासा केला नाही. 

झाले असे की ‘सकुमा एक्सपोर्ट लि.’ या कंपनीने 3 हजार टन साखर पाकिस्तानातून आयात केली. यात गैर काहीच नाही कारण एखादे उत्पादन निर्यात करणार्‍या व्यापारी/कंपनीने जर त्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल आयात केला तर त्याला आयात शुल्कातून सुट मिळते. ही योजना भाजप सरकारने तयार केलेली नाही. ही योजना 2006 साली तत्कालीन मनमोहनसिंग सरकारने तयार केलेली आहे. त्याचा फायदा घेत या कंपनीने साखरेपासून तयार उत्पादने निर्यात करण्यासाठी कच्चा माल म्हणून साखर आयात केली. कारण त्याला ही साखर आपल्या देशापेक्षा पाकिस्तानात स्वस्त मिळाली. 

निर्यात करून चार पैसे देशाला मिळवून देणार्‍या व्यापाराचे आपण कौतुकच केले पाहिजे. शेतकरी संघटनेने अगदी आधीपासून अशी स्पष्ट भूमिका घेतली होती की जर परदेशात एखादा शेतमाल स्वस्त मिळत असेल तर तो खरेदी करून आपल्या देशातील ग्राहकांपर्यंत पोचविणे यात गैर काहीच नाही. उलट याला प्रोत्साहन दिले पाहिजे. असा शेतमाल इथे महागडा तयार करण्यापेक्षा आम्ही त्याचे उत्पादन घेणार नाही. पण कृत्रिमरित्या जास्तीची अनुदाने देवून, बाजारपेठेत अतिरिक्त अन्यायकारक हस्तक्षेप करून महागडा माल स्वस्त करून देशी बाजारपेठेत ओतून देशी शेतकर्‍यांचे कंबरडे मोडणार असाल तर आम्ही विरोध करू.
आज एक विलक्षण अशी परिस्थिती साखरेच्याबाबत निर्माण झाली आहे. देशातील साखर महाग आहे आणि जगभरात साखरेचे भाव पडले आहेत. देशाची गरज दरवर्षीची 250 लाख टन साखरेची आहे. सध्याच 100 लाख टन जास्तीचे उत्पादन झाले आहे (या सगळ्यात 3 हजार टन आकडा किती किरकोळ आहे ते बघा). आणि नेमके सध्याच पेट्रोलचे दर प्रचंड वाढत आहेत. 

सध्या उसाचा पेरा प्रचंड आहे. म्हणजे येत्या हंगामातही जास्तीची साखर तयार होणार आहे. मग उसापासून साखर तयार करण्यापेक्षा इथेनॉलच का करू नये? सध्या पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळले जाते. हे प्रमाण वाढवून 20 टक्के केल्या जावे. उसापासून इथेनॉलचे उत्पादन वाढत गेले तर त्याचा इंधन म्हणून जास्त चांगला किफायतशीर वापर करता येऊ शकेल. शिवाय हे उत्पादन पूर्णत: देशी असल्याने अमुल्य असे परकिय चलन खर्च होणार नाही. 

पण शेतकर्‍यांपेक्षा, सामान्य ग्राहकांपेक्षा सहकारी साखर कारखन्यांचेच हित डोळ्यासमोर ठेवणारे शेतकरी नेते ही बाब समजून घेत नाहीत. किंवा त्यांना समजून उमजून याकडे दुर्लक्ष करत जूनी गबाळी तोट्यात चालणारी सहकारी साखर कारखानदारी जिवंत ठेवायची आहे. कारण साधे आहे जर उसापासून इथेनॉल, वीज किंवा  सरळ आल्कोहलच काढू दिले तर ते व्यवसायिक उत्पादन बनेल जे की आवश्यक वस्तू कायद्यात येत नाही. मग आपली सगळी राजकीय दुकानदारीच बंद पडते. 

मुळात साखर उद्योग नियंत्रणमुक्त करा अशी मुलभूत मागणी शेतकरी संघटनेने सतत केली आहे. आता स्वामिनाथनची विचारशुन्य शिफारस पुढे रेटणारे नविन परिस्थितीत संकटात सापडले आहे. कारण जगभर भाव पडलेले असताना उत्पादन खर्च अधिक 50 टक्केची भाषा करायची कशी? हेच त्यांना समजत नाही. स्वामिनाथन सारख्या शिफारशी निव्वळ केराच्या टोपल्यात फेकण्याच्या लायकीच्या उरल्या आहेत. मूळ मागणी वर म्हटल्याप्रमाणे नियंत्रणमुक्तीची असली पाहिजे. आता ही चांगली संधी चालून आली आहे. उसापासून साखर तयार करण्यापेक्षा इतर उत्पादने कशी होतील याचाच विचार झाला पाहिजे. अगदी उसापासून गूळ पावडर सुद्धा होवू शकते. या उत्पादनाला परदेशात ‘सेंद्रिय’ म्हणून चांगली मागणी आहे. निसर्ग शेतीवाल्या पाळेकरांचे बालीश समर्थक अशा गंभीर विषयात लक्षच घालत नाहीत.  कारण त्यांना ही गुंतागुंत समजतच नाही. उसापासून साखर करण्याऐवजी गुळ पावडर तयार केली (असा कारखाना मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात मुदखेड जवळ सिंधी येथे आहे. त्याचे संपूर्ण उत्पादन रामदेवबाबांच्या पतंजली उद्योगाकडे जाते तसेच बेंगलोर मार्गे निर्यात होते. स्थानिक बाजारात एक कणही गुळ पावडर विकायला शिल्लक नाही.) तर ही एक चांगली व्यापारी खेळी बनू शकते. 

उद्या परिस्थिती बदलली आणि पेट्रोलचे भाव पडले तर उसापासूनपरत साखर जास्त प्रमाणात तयार करण्यात यावी. यासाठी साखर उद्योग नियंत्रणमुक्त करा ही मुलभूत मागणीच योग्य ठरते. कारण इथेनॉलच वापरा असा सरकारी आग्रह धरला आणि उद्या ते परवडेनासे झाले तर काय करणार? 

म्हणजे मुळात उसापासून जे काय करायचे आहे त्याचा निर्यण उत्पादकाला घेवू द्या. तूम्ही सहकारी साखर कारखानदारीचे गबाळे तोट्यात जाणारे राजकिय कार्यकर्ते पोसण्यासाठी जे जाळे तयार केले आहे ते पहिले बंद करा. सरकारने आवश्यक वस्तू कायदा नावाने जो साखरेचा गळा घोटला आहे तो कायदा पहिले रद्द करा. म्हणजे साखर उद्योग मोकळा श्‍वास घेवू शकेल. जेंव्हा ज्याला किंमत असेल तेंव्हा त्याप्रमाणे त्याचे उत्पादन बाजाराच्या दबावाने होत असते. त्यासाठी दिल्लीत बसून चार दोन मंत्री, पगारखोर सरकारी कर्मचारी यांनी निर्णय घेण्याची गरज नसते. आणि असे घडले तर त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचीही गरज नसते. 

‘ऊस नव्हे काठी आहे, कारखानदारांच्या पाठी आहे’ अशी घोषणा देताना प्रत्यक्ष मात्र सहकारी कारखानदारीच्या सोयीचे निर्यण घेणे म्हणजे शेतकर्‍यांची संघटना चालविणे नव्हे. शेतकरी व ग्राहक यांचे हित खुल्या बाजारात आहे. सरकारी बंदिस्त व्यवस्थेत नाही हे एकदा स्वच्छपणे समजून घेतले पाहिजे. 

जगभरातून कापूस आयात करून त्यापासून धागा बनवून, त्याचे कापड बनवून त्याचे तयार कपडे जगभरात निर्यात करणे हा उद्योग चीनने मोठ्या प्रमाणात केला आहे. याच धर्तीवर जर बाहेर साखर स्वस्त मिळणार असेल तर ती आयात करून त्यापासून पदार्थ तयार करून ते इतर देशांना निर्यात करणे हा व्यवहारिक शहाणपणाच आहे. त्याविरूद्ध बोंब करून आपण आपल्या बुद्धिचे हसे करून घेण्याची गरज नाही. पण हे राजू शेट्टी किंवा राज ठाकरे यांना कोण सांगणार? 

आयात साखरे विरूद्ध ओरड करणार्‍या डाव्यांची तर कमालच आहे. कालपर्यंत हे ऊसवाले शेतकरी म्हणजे बागायतदार बडे शेतकरी प्रचंड पैसेवाले शेतकरी म्हणून टीका करायचे. उसाचे आंदोलन करणारे शरद जोशी म्हणजे बड्या शेतकर्‍यांचेच नेते कसे आहेत म्हणायचे. आता हेच डावे किरकोळ साखर खासगी व्यापार्‍याने आयात केली तर आरडा ओरड करत आहेत. 

बाकी कोरडवाहूचे तर सोडाच पण आपल्याकडे उसाची शेतीपण परवडत नाही हे शेतकरी संघटनेने सगळ्यात पहिल्यांदा स्पष्टपणे सांगितले. पाण्याची असो की बीनपाण्याची, छोटी असो की मोठी, पंजाब असो की कर्नाटक सगळीच शेती तोट्यात आहे हे शरद जोशींनी ठामपणे अभ्यासपूर्ण पद्धतीनं अर्थशास्त्रीय मांडणी करत समोर ठेवलं. ते समजून घेण्याची मानसिकता डाव्यांची नव्हती. डावेच कशाला ज्यांनी आंदोलनाचा श्रीगणेशा शरद जोशी यांच्या मांडीवर बसून केला त्यांना पण हे कळत नाही.

साखरेच्या पडलेल्या भावाने एक सुवर्णसंधी शेतकर्‍यांना लाभली आहे. आता जोर करून सरकारवर दबाव टाकून साखर उद्योग नियंत्रण मुक्त करण्याची मागणी लावून धरायला हवी. पेचात सापडलेल्या सरकार कडून हे करून घेतले तर भविष्यात उसाची शेती समस्येच्या विळख्यातून बाहेर येवू शकते. 

या सेाबतच उसाशिवाय इतर पीकांच्या बाबतीत सरकारी सावत्र धोरणे कशी बदलतील हे पहायला पाहिजे. काहीही करून शेतकरी ऊस का लावतो? कारण त्याला कमी का असेना पण पैसे मिळण्याची हमी आहे. हेच जर इतर पीकांबाबत झाले तर शेतकरी तोट्यातील ऊसशेतीकडे वळणारच नाही. इतर पीकांकडे जाईल. आणि तसं झाले तर आपोआपच उसाचा पेरा कमी होईल. पाण्याचा वापर कमी होईल. पण हे समजण्याची अक्कल शेतकरी नेत्यांना यावी लागेल तरच हे होईल.  

                  श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Friday, May 25, 2018

स्मरण दादासाहेब फाळक्यांचे


उरूस, सा.विवेक, मे 2018

दादासाहेब फाळके यांचे नाव एकदा उच्चारले की परत त्यांच्यासंबंधी काहीही माहिती करून घ्यायची फारशी उत्सुकता मराठी माणसांना नसते. दरवर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने केंद्र सरकार भारतीय चित्रपट सृष्टीत महत्त्वाचे योगदान दिलेल्या एका व्यक्तिमत्वाला पुरस्कार देते. त्या दिवशीच्या बातमीपुरता आपला दादासाहेब फाळक्यांशी संबंध येतो. परत आपण फाळक्यांना विसरून जातो. परेश मोकाशी या नविन पिढीच्या कल्पक दिग्दर्शकाने ‘हरिश्चंद्राची फॅक्ट्ररी’ हा अफलातून चित्रपट फाळक्यांवर काढला आणि फाळक्यांबाबतच्या अनास्थेचा कलंक काही अंशी पुसल्या गेला. गंगाधर महांबरे, बापू वाटवे, इसाक मुजावर यांनी फाळक्यांचे चरित्र ग्रंथबद्ध केले. तेही बर्‍यापैकी वाचल्या गेले आहेत. 

फाळके यांची जयंती 30 एप्रिल ही आहे. आणि पहिला भारतीय चित्रपट प्रदर्शित झाला ती तारीख 3 मे ही आहे. लवकरच फाळक्यांची शतकोत्तर सुवर्णजयंती येते आहे. (फाळके जन्म 30 एप्रिल 1870- मृत्यू 16 फेब्रु 1944) 

‘दादासाहेब फाळके : काळ आणि कर्तृत्व’ या नावाचा मोठ्या आकाराचा 500 पानी ग्रंथ जया दडकरांनी लिहीला. (प्रकाशक मौज, आवृत्ती पहिली 22 डिसेंबर 2010). फाळकेंच्या जयंतीनिमित्त या महत्त्वाच्या ग्रंथाचे स्मरण होते आहे. सिनेप्रेमी, अभ्यासक, चित्ररसिक या सर्वांनी हा ग्रंथ आवर्जून वाचला पाहिजे किमान नजरेखालून घातला पाहिजे. 

जया दडकरांनी चरित्रांच्या मांडणीची एक वेगळी पद्धत मराठीत रूजवली. कवी कादंबरीकार चि.त्र्यं.खानोलकर (आरती प्रभु), प्रकाशक रा.ज.देशमुख, कादंबरीकार वि.स.खांडेकर, कवी बा.सी.मर्ढेकर यांच्या चरित्रातील महत्वाच्या घटनांचा शोध घेत मेहनतीने त्या त्या प्रसंगांच्या तारखा धुंडाळत संबंधीत नातेवाईक मित्र यांच्याशी चर्चा करून ही चरित्रे त्यांनी लिहीली आहेत. हे फार मोलाचे काम दडकरांनी केले आहे. पण त्याची स्वतंत्र अशी दखल घेतल्या गेली नाही. सर्व चरित्रांत खांडेकरांचे चरित्र भरपूर मोठे आहे. त्यानंतर दादासाहेब फाळके यांचे जे चरित्र त्यांनी सिद्ध केले आहे त्याचा आकार आणि आवाका मोठा आहे. 
दडकरांनी या चरित्राची रचना मोठ्या विलक्षण पद्धतीनं केली आहे. चरित्र लिखाणाबाबत सुरवातीला त्यांनीच लिहून ठेवले आहे, ‘.. दादासाहेब फाळक्यांच्या आत्मपर लिखाणाचा वापर करावयाचा, त्याला त्यांच्या कुटुंबीयांच्या, स्नेह्यांच्या आठवणींची जोड द्यायची; आणि दादासाहेबांचं यथार्थ दर्शन घडविण्यासाठी त्या काळाचं भान वाचकांना असायला हवं म्हणून देश-विदेशांतील तत्कालीन ठळक घडामोडींची नोंद करायची, समकालीन चित्रपटांचा परिचय करून द्यायचा.’

दडकरांच्या या वाक्यांमधुनच त्यांच्या लिखाणाचा आवाका आपल्या लक्षात येईल. त्यांनी या चरित्रग्रंथाचे सहा विभाग पाडले आहेत. उपोद्घात (1870-1910), पर्व पहिले (1911-1919), पर्व दुसरे (1920-1930), पर्व तिसरे (1931-1940), उपसंहार (1941-1944). शिवाय 7 परिशिष्टे या ग्रंथाला जोडली आहेत. त्या त्या काळातील देश विदेशांतील घडामोडी नंतर याच काळांतील चित्रपट क्षेत्रांतील घडामोडी आणि दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यातील घडामोडी असे तीन तीन उपविभाग या प्रत्येक कालखंडाचे पाडले आहेत.

पहिला भारतीय चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ 3 मे 1913 ला प्रदर्शित झाला. याच वर्षी रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक जाहिर झाले. हिंदुस्थानातील पहिली दूरध्वनी सेवा सुरू झाली. ब्रिटीश राजवट उलथून टाकण्यासाठी सशस्त्र ‘गदर चळवळ’ची सुरवात झाली. असे कितीतरी संदर्भ त्याच काळातील दडकर नोंदवून ठेवतात. तसेच चित्रपट क्षेत्रांतील 1913 च्या नोंदी करताना ‘अमेरिकेत युनिव्हर्सल कंपनीचा ‘रॉबिन्सन क्रुसो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. अमेरिकन प्रेक्षकांना सर्वात आवडला तो ‘ला रेनी एलिझाबेथ’ हा चित्रपट. फ्रान्स मध्ये एमिल झोलाच्या ‘जेरमिनाल’ कादंबरीवरील चित्रपट आला.’ हे सांगत राहतात.  

फाळक्यांच्या पहिल्या चित्रपटाबाबत ‘केसरी’ च्या 6 मेच्या अंकात ‘मुंबईचे बातमीपत्र’ या सदरात जो मजकूर आला आहे तोही दडकरांची आपल्या पुस्तकांत दिला आहे. ‘..मुुंबईत दाखविले जाणारे बहुतेक चित्रपट (फिल्मस) विलायती असून त्यावरील चित्रेही विलयतीच असतात. परंतु मुंबईत रा. फाळके यांनी हा सर्व प्रकार बदलून येथे चित्रपट तयार केले, इतकेच नव्हे तर चित्रपटांवरील चित्रेही देशी म्हणजे पौराणिक असून सर्वमान्य अशी आहेत. असा एकंदर तीन हजार फूट लांबीचा चित्रपट रा. फाळके यांनी तयार केला असून त्यावर हरिश्चंद्र नाटकांचा सर्व प्रयोग ते करून दाखवितात...’

फाळक्यांच्या शेवटच्या दिवसांबाबत दडकरांनी मोठ्या वस्तुनिष्ठपणे लिहीले आहे पण त्या साध्या शब्दांतूनही त्यांचा गहिवर जाणवतो. दुसर्‍या महायुद्धानंतर चित्रपट निर्मितीवर कमालीची बंधनं आली होती. निर्मात्याला सरकारकडून परवानगी काढावी लागत होती. युद्धातील ब्रिटिशांच्या सहभागाचे समर्थन करणारा एक तरी चित्रपट काढण्याचा फतवाच निघाला होता. फाळक्यांनी चित्रपटाच्या निर्मितीसाठी अर्ज केला. पण त्यांचा अर्ज फेटाळला गेला. हा धक्का त्यांना सहन झाला नाही. परवानगी नाकारणारे पत्र हाती पडल्यावर दोनच दिवसांत 16 फेब्रुवारी 1944 रोजी फाळक्यांचे निधन झाले. 

फाळक्यांच्या निधनाची वार्ता नवाकाळ, मौज साप्ताहिक, द बॉम्बे क्रॉनिकल, द मिरर, फिल्म इंडिया यांनी प्रसिद्ध केली त्याच्या नोंदी दडकरांनी केल्या आहेत.   

चित्रपट सृष्टीला 25 वर्षे पुर्ण झाली म्हणून फाळकेंचा गौरव 1938 मध्ये करण्यात आला. त्या प्रसंगी त्यांनी केलेले भाषण अतिशय चटका लावणारे आहे. शकुंतलेचे उदाहरण देवून फाळके म्हणतात, ‘.. माझी चित्रपटरूपी कन्या तशीच वन्य स्थितीत लहानाची मोठी झाली आहे. आता ती धनकनकसंपन्नांच्या राजवैभवाने वावरत आहे. तिच्या तैनातीत आज चाळीस-पन्नास हजार दास-दासी झुलून राहिल्या आहेत. अशा माझ्या वैभवसंपन्न बाळीला पाहून व तिचा पंचविसाचा वाढदिवस म्हणजे तिची ‘सिल्वर ज्युबिली’ एखाद्या राजालाही लाजवील अशा थाटामाटाने होत आहे हे पाहून, कोणत्या पित्याला धन्य वाटणार नाही..’ पुढे फाळकेंनी जे उद्गार काढले त्याने वाचकाच्या डोळ्यात पाणी येते, ‘.. वैभव किंवा द्रव्य ह्यांची मोहिनी इतकी विलक्षण आहे की त्यांनी पछाडलेल्या लोकांचे डोळे जननी-जनकाला देखील न ओळखण्याइतके कधीकधी धुंद होत असतात! तसेच काहीसे माझ्या सिनेमाकन्येच्या संबंधात झालेले आहे...’

ज्या पद्धतीनं फाळक्यांची उपेक्षा झाली तशीच काहीशी उपेक्षा त्यांच्यावरच्या या ग्रंथाचीपण झाली की काय अशी मला शंका येते. कारण 8 वर्षे होवून गेल्यावरही या ग्रंथांचे संदर्भ फारसे कुणी देताना दिसत नाही. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ग्रंथालयांत याची प्रत असेल का याची मला तरी शंका येते. या विषयावर दडकरांनी बोलण्यासाठी (दडकर तसे भाषणे देण्यासाठी फारसे प्रसिद्ध नाहीत. वयोमानाने ते फारसे फिरतही नाहीत.) कुणी बोलावले असेल का? 

दडकरांना नसेल फिरता येत पण तरूण सिनेअभ्यासकांना बोलावून यावर बोलते केले गेले का? याचेही उत्तर नकारार्थीच येते. ‘वास्तव रूपवाणी’ या नावाने चित्रपट विषयक एकमेक नियतकालीक प्रभात चित्र मंडळाच्या वतीने काढण्यात येते (संपा. अभिजीत देशपांडे). याची तरी किती जणांना माहिती आहे? 

मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापुर, नागपुर येथे आता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवले जात आहेत. त्यासाठी लाखो रूपयांचा खर्च केला जातो. या महोत्सवांची पैशाची गणितं काय आणि कशी आहेत ते जरा बाजूला ठेवू. पण त्या निमित्ताने मराठीत जी काही चित्रपट विषयक पुस्तके निघाली आहेत त्यांच्यावर एखादे चर्चा सत्र, त्यांचे एखादे छोटे प्रदर्शन असे का नाही आयोजीत केल्या जात? 

सत्यजीत रे यांनी चित्रपट सृष्टीला दिलेले योगदान सगळ्यांना माहित असते. पण त्यांनी फिल्म सोसायट्यांची चळवळ रूजविली वाढीस लावली हे मात्र फारसे कुणाला माहित नसते. श्याम बेनेगल असो किंवा किरण शांताराम असो किंवा आत्ता महाराष्ट्रात यासाठी काम करणारे सतिष जकातदार, सुधीर नांदगांवकर असो यांच्या कामाबाबत किती माहिती चित्रपट रसिकांना असते?
 
मराठीत चित्रपट विषयक लिखाण करणारे मुकेश माचकर, श्रीकांत बोजेवार, धनंजय कुलकर्णी, विजय पाडळकर,   प्रा. अभिजीत देशपंाडे, गणेश मतकरी, अमोल उदगीरकर, जितेंद्र घाटगे, अक्षय शेलार, श्रीकांत ना. कुलकर्णी असे कितीतरी आहेत. त्यांना सर्वांना जोडून घेत चित्रपट विषयक जे काही लिखाण मराठीत झाले आहे त्या बाबत सर्वत्र जागृती चर्चा घडवून आणता येईल. तसेच सध्या फेसबुक-ब्लॉग-ऑनलाईन न्यूज पोर्टल यांच्यावर मोठ्या प्रमाणात चित्रपट विषयक मराठीतून लिहीलं जात आहे. त्याचीही सविस्तर दखल घेता येईल. हे काम फाळकेंच्या 150 व्या जयंती निमित्ताने चित्रपट रसिकांनी पुढाकार घेवून करायला पाहिजे. तीच खरी दादासाहेब फाळके या चित्रपटवेड्या  मराठी माणसाला श्रद्धांजली ठरले.   

                 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Wednesday, May 16, 2018

जागतिक नृत्य दिवस : थोडे स्मरण- भरपूर विस्मरण


उरूस, सा.विवेक, 16 मे 2018

एक अगदी 70 वर्षांची ज्येष्ठ भरत नाट्यम् नृत्यांगना डॉ. जयश्री राजगोपालन षोडशीच्या उत्साहात हजारो वर्षांपूर्वीच्या लेण्यांमधील शिल्पांतून नृत्य मुद्रा कशा प्रकट झाल्या आहेत हे सांगताना सहजच तशा मुद्रा करून दाखवते. पंच्याहत्तरीचे विख्यात सिने दिग्दर्शक पद्मविभुषण अदूर गोपालकृष्णन नृत्यांवरच्या आपल्या माहितीपटाची माहिती देताना आपल्या लहानपणीच्या कला संस्कारांत रमून जातात. नृत्यासाठी प्रकाश योजना कशी आणि किती महत्त्वाची आहे याचे पैलू उलगडून दाखवताना आपले गुरू गौतम भट्टाचार्य यांचे स्मरण करताना संदीप दत्त गहिवरून जातात. कला पत्रकार सुहानी सिंग यांना छोट्या विद्यार्थीनीने प्रश्‍न विचारताच आपण आई उमा डोग्रा यांच्या कडून प्रत्यक्ष कथ्थक शिकलो हे सांगताना त्यांच्या शब्दांत कलेबाबतचा अभिमान झळकत राहतो. कला समिक्षक कुणाल रॉय हे सजगपणे नृत्याच्या पैलूंवर चर्चा करताना माध्यमांनी केलेला अन्याय मांडतात आणि ऐकणार्‍यांच्या काळजाला घरे पडतात. हे सगळे घडवून आणणार्‍या ओडिसी कथ्थक नृत्यांगना पार्वती दत्ता इंग्रजी हिंदी भाषेचे पूल साधत आपल्या शिष्यांना कला रसिकांना अभिरूचीच्या वेगळ्याच पातळीवर घेवून जात असतात. 

ही दृष्ये आहेत 29 एप्रिल या जागतिक नृत्य दिना निमित्त औरंगाबाद येथे महागामी गुरूकुलात झालेल्या चार दिवसीय कार्यक्रमांमधली. 29 एप्रिल हा दिवस जगभरात नृत्य दिवस म्हणून 1982 पासून साजरा केला जातो. बॅले नृत्याचे महान कलाकार जीन जॉर्जेस नोव्हेरे याच्या आठवणीत हा दिवस साजरा केला जातो. 

आपल्याकडे तर नृत्याची परंपरा अगदी शिवाच्या तांडव नृत्यापासून सांगितली जाते. शिवाय जागतिक नृत्य दिवस जो 29 एप्रिल आहे त्या काळाशीही भारतीय संदर्भ जूळून येतो. हा काळ जवळपास वसंत ऋतूचा काळ आहे. आपल्याकडे तसेही वसंत उत्सव साजरा करण्याची परंपरा आहेही.

औरंगाबादेत 21,22,28 व 29 एप्रिल असे चार दिवस हा जागतिक नृत्य दिवस साजरा झाला. केवळ नृत्याचे सादरीकरण इतक्यापुरता हा महोत्सव असला असता तर त्याची फारशी दखल घेण्याचे काही कारण नव्हते. पण या निमित्ताने नृत्याच्या विविध पैलूंवर त्या त्या क्षेत्रातील विद्वान बोलावून चर्चा घडवून आणल्या गेली हे विशेष. 


ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना जयश्री रामगोपालन यांनी जून्या लेण्यांमधील शिल्पांतून ज्या नृत्य मुद्रा प्रकट होतात त्यांचे सप्रयोग स्पष्टीकरण सोप्या भाषेत मांडले. यातून आपल्या नृत्य परंपरेचे भक्कम पुरावेच समोर आले. अगदी आधुनिक काळात शंकराचार्यांनी 1980  मध्ये महाराष्ट्रात सातार्‍याला मंदिर निर्माण करून त्यावर नृत्य मुद्रा कसे आवर्जून कोरून घेतल्या ही माहिती त्यांनी दिली तेंव्हा प्रेक्षकांना सुखद धक्का बसला. कारण हे मंदिर महाराष्ट्रात असून केवळ धार्मिक कर्मकांड करणार्‍या शंकराचार्यांकडून अशी कलाविषयक उत्तम कृती व्हावी हे जरा अनपेक्षीत होतं. पुढे अदूर गोपालकृष्णन यांच्याही विवेचनात नृत्य कलेच्या संगोपनात मंदिरांचा अतिशय मोलाचा वाटा असल्याचे स्पष्ट झाले.

जागतिक किर्तीचे प्रकाश योजनाकार संदीप दत्त यांचे अनुभव विस्मयचकित करणारे होते. आधुनिक काळात प्रकाश योजनेचा वापर करून नृत्याच्या हावभावांना कसा उठाव देता येतो हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवले. आदल्याच दिवशी अष्टप्रहर हा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम या महोत्सवात सादर झाला होता. या कार्यक्रमास संदीप दत्त यांची प्रकाश योजना लाभली होती. पहाटेच्या रागांसाठी आल्लाददायक उजळ प्रकाश योजना, दुपारच्या रागांसाठी तीव्र प्रकाश, संध्याकाळच्या रागांसाठी काळोखाची छाया दर्शविणारी हुरहुर लावणारी, रात्रीच्या पहिल्या प्रहराची फिकी निळसर छटा असलेली, उशीराच्या प्रहराची गदड निळ्या रंगाची अशा कितीतरी छटा त्यांनी दाखवल्या होत्या. प्रकाश योजनेत एलईडी दिव्यांचा प्रकाश कसा नृत्याला हानीकारक आहे हे बारकावे त्यांनी सप्रमाण दाखवले. 

सुहानी सिंग या कला पत्रकार म्हणून परिचित आहेत. त्यांनी नृत्यविषयक कार्यक्रमांचे वार्तांकन करताना येणार्‍या अडचणी आणि आव्हाने यांची सविस्तर चर्चा केली. केवळ पारंपरिक नृत्यच नव्हे तर आधुनिक प्रकारच्या नृत्यांचीही एक पत्रकार म्हणून कशी दखल घ्यावी लागते हेही त्यांनी विषद केले. ज्येष्ठ कलाकारांशी वागताना किती काळजी घ्यावी लागते. त्यांच्याकडून माहिती काढून घेताना स्वत:चे असलेले या विषयातील ज्ञान कसे उपयोगी पडते हेही त्यांनी सांगितले.


पद्मविभुषण अदूर गोपालकृष्णन यांचे दोन माहितीपट या महोत्सवात दाखविले गेले. महान कथकली कलाकार कलामंडलम गोपी यांच्यावरचा माहितीपट अतिशय महत्त्वाचा आहे. कथकली कलाकारांना चेहर्‍याची रंगरंगोटी (मेक अप) करण्यासाठी अक्षरश: चार चार तास लागतात. त्यांची पूर्व तयारीच कित्येक तास चालते. गोपी यांच्यावरील हा माहितीपट करण्यासाठी अदूरजींनी अतिशय मेहनत घेतली. इतकेच नाही तर या कलेचे पावित्र्य चित्रिकरण काळातही जपले जाईल याकडे कटाक्ष ठेवला. एक कलाकार एकदा मद्यपान करून आलेला लक्षात आल्यावर त्यांनी त्या संपूर्ण दिवसाचे चित्रिकरण स्थगित ठेवले. त्या कलाकाराला आपली चुक कळल्यावर परत कुणी तसे वागले नाही. 

दुसरा माहितीपट मोहिनीअट्टम या नृत्यप्रकारावर बेतलेला आहे. माहिनीअट्टमच्या चार मान्यवर गुरू आणि त्यांच्या शिष्या असा हा माहितीपट आहे. हे नृत्य मंदिरात जसे सादर केले जाते तसेच चित्रिकरण अदूरजींनी केले आहे. विशेष म्हणजे हे माहितीपट मल्याळम भाषेतच आहेत. आपल्याकडे मातृभाषेत काही करायचे म्हणजे आपण दुय्यम दर्जाचे समजतो. पण अदूरजींसारखी माणसे आपल्या मातृभाषेत आपल्या संस्कृतीत आपल्या कलाप्रकारांतूनच आपली कलाकृती निर्माण करतात आणि त्याला जागतिक मान्यता मिळवून देतात. हे मराठी माणसांनी लक्षात घेण्यासारखे आहे. 

अरूण खोपकर यांनी भरत नाट्यम नृत्यांगना लीला सॅमसंन यांच्यावर केलेला माहितीपट तसेच कुमार सोहनी यांचा सुप्रसिद्ध ओडिसी नर्तक गुरू पद्मविभुषण केलुचरण महापात्रा यांच्यावरील माहितीपटही या महोत्सवात दाखविण्यात आले. 


चर्चा-माहितीपट या सोबतच नृत्य सादरीकरणाचे दोन सुंदर प्रयोग महागामी गुरूकुलाने रसिकांसमोर ठेवले. अष्टटप्रहर या नावाने कथ्थकचे सुंदर सादरीकरण पार्वती दत्ता आणि त्यांच्या शिष्यांनी केले. तसेच ओडिसी नृत्याचेही उत्कल क्रांती नावाने सादरीकरण झाले. ओडिसी नृत्याच्या सादरीकरणात ओडिशाच्या पारंपरिक मर्दलम म्हणजेच पखावज (मृदंग) सोबत सादर होणारा नृत्य प्रकार सादर झाला. ओडिसी नृत्यात पल्लवी हा नृत्यप्रकार म्हणजे शुद्ध कला समजली जाते. त्याचे सादरीकरण करताना तरूण नृत्यांगना त्यातील भाव समजून नृत्य करत होते हे विशेष. अन्यथा नृत्य म्हणजे केवळ यांत्रिक कवायत ठरू शकते. त्यातून रसिकांना आनंद मिळणे शक्य नाही. 

पार्वती दत्ता यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मराठी संतांच्या रचनांचाही अंतर्भाव या सादरीकरणात केला. ज्ञानेश्वरांची रचना ‘चंद्र तेथे चंद्रिका । शंभु तेथे अंबिका । संत तेथे विवेका। असणे  की जे’ ओडिसी नर्तनात प्रत्यक्ष समोर येणे ही एक वेगळीच अनुभूती होती.   चांगली कला नेहमीच प्रदेशाचे भाषेचे काळाचे बंधन ओलांडून पुढे जाते हे खरे आहे.  

चार दिवस जी चर्चा मोठ्या विद्वानांकडून रसिकांनी ऐकली त्याचा अनुभव कथ्थक व ओडिसी नृत्याच्या सादरीकरणातून रसिकांना घेता आला. 

जागतिक नृत्य दिवसा निमित्त जागजागी असे कार्यक्रम व्हायला हवेत. पण तसे फारसे घडलेले दिसत नाही. माध्यमांनीही अशा कार्यक्रमांना पुरेशी प्रसिद्धी दिलेली दिसत नाही. बहुतांश सामान्य रसिक नृत्य साक्षर नसल्याने त्यांना आपल्याकडच्या नृत्य प्रकारांकडे खेचून आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत.

केवळ शास्त्रीयच नव्हे तर लोकनृत्यांचीही मोठी परंपरा आपल्याकडे आहे. त्यांचेही जतन होणे गरजेचे आहे. जागतिक नृत्य दिवसाच्या निमित्ताने हा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. शालेय पातळीवर आता स्नेहसंमेलने मोठ्या थाटात उत्साहात बर्‍यापैकी खर्च करून साजरी केली जातात. त्यासाठी बाहेरून मोठी बिदागी देवून कोरिओग्राफर नृत्य शिक्षक बोलावले जातात. यापेक्षा शालेय अथवा महाविद्यालयीन पातळीवर नियमित स्वरूपात नृत्याचे शिक्षण दिले जावे. जेणे करून विद्यार्थ्यांची कलाविषयक जाणिव प्रगल्भ होत जाईल.   
     
           श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Monday, May 14, 2018

कर्नाटक : स्पष्ट बहुमताचीच शक्यता जास्त




मतदानपूर्व आणि मतदानोत्तर सर्व चाचण्या त्रिशंकु विधानसभेची भाकितं करत असताना ‘कुठल्यातरी एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल’ हे विधान धाडसाचे वाटू शकेल. पण शांतपणे विचार केला आणि कर्नाटकातील 2004 पासूनची राजकीय परिस्थिती डोळ्या खालून घातली तर हे पटू शकेल.

2004 साली पहिल्यांदा कर्नाटकाच्या इतिहासात त्रिशंकु विधानसभा अस्तित्वात आली होती. 79 जागा जिंकत भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. त्या खालोखाल कॉंग्रेसला 65 जागा मिळाल्या होत्या. आणि देवेगौडांच्या जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाला 58 जागा होत्या. सर्वात मोठापक्ष म्हणून खरं तर भाजपला सरकार बनविण्यासाठी संधी मिळायला पाहिजे होती. पण तसं घडलं नाही. तेंव्हा मोदी नावाचे कुठलेही वादळ देशात नव्हते. पण भाजपला हिंदुत्ववादी म्हणत देवेगौडांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिला. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार एस.एम.कृष्णा चालणार नाही अशी अट घालत धरमसिंग यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला. केंद्रातील आपले सरकार कॉंग्रेसने पाडले होते हे राजकीय स्वार्थापुढे देवेगौडा सोयीस्कर रित्या विसरले

पण ही तडजोड टिकली नाही. आपल्या मुलाला मुख्यमंत्री करायचेच हा चंग बांधलेल्या देवेगौडा यांनी कॉंग्रेसचा पाठिंबा काढून घेतला. भाजपशी संधान साधत उर्वरीत काळात मुख्यमंत्रीपद अर्धा अर्धा काळ (20-20 महिने) वाटून घेत सरकार बनविले. कुमारस्वामी यांची 20 महिन्याची कारकिर्द संपली तरी त्यांनी राजीनामा दिलाच नाही. परिणामी भाजपने पाठिंबा काढून घेतला. मग आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली. शेवटी राष्ट्रपती राजवट आली. परत तडजोड करत येदूरप्पा यांना पाठिंबा देण्यास कुमारस्वामी तयार झाले. 2007 मध्ये येदुरप्पा मुख्यमंत्री झाले पण या सरकारचा पाठिंबा निर्लज्जपणे देवेगौडा यांनी काढून घेतला. विधानसभा बरखास्त करून परत निवडणूका घ्याव्या लागल्या.

याचा फटका मतदारांनी 2008 च्या निवडणुकीत देवेगौडांच्या पक्षाला दिला. त्यांच्या जागा घटून 28 झाल्या. भाजपा 110 जागा मिळवत बहुमताच्या जवळ गेला. कॉंग्रेसला 80 जागा मिळाल्या पण मतं भाजपापेक्षाही दीड टक्का जास्त होती.

येदूरप्पांचा भ्रष्टाचार त्यांना भोवला. त्यांना तुरूंगात जावे लागले. पुढे त्यांनी भाजपातून बाहेर पडून वेगळा पक्ष काढला.

भाजपातल्या फाटाफुटीची किंमत त्यांना 2013 मध्ये मोजावी लागली. कॉंग्रेस जीचा मतदानाचा टक्का भक्कम होता तिने 120 जागा मिळवत स्पष्ट बहुमताचे सरकार स्थापन केले. देवेगौडांच्या पक्षाला आणि भाजपला सारख्याच म्हणजे 40 जागा मिळाल्या.

पाठिंबा देणे काढणे असला पोरखेळ केल्यामुळे देवेगौडा यांच्या पक्षाने विश्वासार्हता गमावली आहे.  आज त्यांचा जातीवर आधारीत आणि भाजप-कॉंग्रेसपासून नाराज असलेला मतदार इतकाच हक्काचा आहे. बाकी राज्यभर या पक्षाला फारसा जनाधार नाही.

आज सर्व चाचण्या या पक्षाला त्याच्या मर्यादेपेक्षा जास्त किंमत देत आहेत हे स्वत:ला सोयीचे जावे म्हणून. भाजप विरोधकांना भाजपची मतं घटण्यासाठी आणि कॉंग्रेस विरोधकांना सिद्धरामय्यांचे अपयश दाखविण्यासाठी म्हणून देवेगौडा यांचा पक्ष विश्लेषण करताना एक सोय होवून बसली आहे. असल्या ‘शिखंडी’ आडून हे सगळे तज्ज्ञ अभ्यासक भीष्माचार्य आडाखे बांधत आहेत.

प्रत्यक्षात मतदारांनी संदिग्धता दूर ठेवणेच पसंद केलेले आढळून येईल. 1984 नंतर पहिल्यांदाच केंद्रातही एका पक्षाच्या स्पष्ट बहुमताचे सरकार भारतीय मतदारांनी स्थापन केले आहे. उत्तर प्रदेशात असाच खेळ 2007 पर्यंत चालू होता. पण नंतर मतदारांनी प्रथम मायावतींचा बसप, मुलायम यांचा सप आणि आता भाजप यांना स्पष्ट बहुमताचा जनादेश दिला आहे. महाराष्ट्र आणि बिहार ही दोनच मोठी राज्यं सध्या एक पक्षीय स्पष्ट बहुमत नसताना राज्यकारभार करत आहेत. एरव्ही भारतभर (छोट्या राज्यांचा अपवाद वगळता. तिथले राजकारण अगदी दोन चार आमदार इकडून तिकडे गेले तरी बदलते. पण त्यांची एकूण संख्यात्मक ताकद अतिशय क्षीण आहे.) स्पष्ट बहुमत असलेली एकपक्षीय राजवट आहे.

कर्नाटकात लोक प्रादेशिक पक्षांच्या पोरखेळाला फार पाठिंबा देतील असे दिसत नाही. कॉंग्रेस किंवा भाजप यांना काठावरचे का असेना पण स्पष्ट बहुमत उद्या मिळेल आणि सगळे व्यवसायिक चाचण्यावाले तोंडघाशी पडलेले दिसून येतील. कारण हे मतदारासाठी या चाचण्या करत नसून व्यावसायिक पद्धतीनं कुणाच्या तरी इशार्‍यानं चाचण्या करून हवे ते निष्कर्ष काढत आहेत.     

श्रीकांत उमरीकर
मो. 9422878575
   
     

Thursday, May 10, 2018

कश्मिरी संगीतानं महाराष्ट्र दिन साजरा


उरूस, सा.विवेक, 13-19 मे 2018

देवगिरी किल्ल्याच्या जवळ तळ्याच्या पायथ्याशी हिरण्य हुरडा पर्यटन केंद्र आहे. त्याच्या हिरवळीवर दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संगीताचा कार्यक्रम साजरा होतो. यावर्षी आयोजिक मेधा पाध्ये- सुनीत  आठल्ये या कलाप्रेमी जोडप्याने कश्मिरी कलावंतांना आमंत्रित केले होते. हे कुणी फारसे लोकप्रियता लाभलेले आंतरराष्ट्रीय कलाकार नव्हते. तर होते लोककलाकार. त्यांना कश्मिरी भाषेशिवाय इतर कुठली भाषाही फार सफाईने बोलता येत नव्हती. त्यांच्या वादनाविषयी काही माहिती सांगा म्हटलं तर त्यांनी लाजून ‘इससे अच्छा हमको और बजानेको बोलो’ अशी भावना व्यक्त केली. 

संतुर, सारंगी, रबाब आणि मटका असे चार वाद्य वाजविणारे हे चार कलाकार. ही सगळी वाद्यही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. संतूर तर केवळ आणि केवळ कश्मिरचेच वाद्य आहे. शिवकुमार शर्मा यांनी या संतुरला जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांनी या वाद्याला ज्या प्रमाणे शास्त्रीय वाद्य म्हणून मान्यता मिळवून दिली त्याचप्रमाणे कश्मिरी लोक संगीतातील काही धून वाजवून त्याही संगीताला लोकप्रियता मिळवून दिली. ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा तर त्यांचा प्रसिद्ध अल्बम आहेच. पण शिवाय इतरही काही अल्बम आहेत. 

कश्मिरी संगीत मुळ स्वरूपात सादर करणारे हे लोककलाकर. त्यांच्या वादनाने महाराष्ट्रीय श्रोत्यांना थक्क करून टाकले. दाक्षिणात्य संगीतात घटम चा उपयोग तालासाठी केला जातो. या कश्मिरी कलाकारांच्या संचात मटका वादक आहेत. हा मटका विशेष कलाकुसर केलेला आणि वेगळ्या पद्धतीचा असतो. त्याच्या वादनात ठेक्यासोबत मटक्याच्या उघड्या तोंडावर हाताने आघात करून एक वेगळाच घुमार निर्माण केला जातो. त्याने या संगीताची मजा अजूनच वाढते.  हा मटका कश्मिरी शालीसारख्या कलाकुसरीने नटलेला असतो. सारंगीवरही अशी कलाकुसर आढळून येते.  

रबाब हे अफागाणी वाद्य. हिंदी चित्रपटांतील कितीतरी गाण्यात अफगाणी संस्कृतीचा कलेचा स्वाद रसिकांना देण्यासाठी या वाद्याचा उपयोग केल्या गेला आहे. (अलिफ लैला मालिकेचे संगीत, यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी सारखी लोकप्रिय गाणी, काबुलीवाला चित्रपटाच्या संगीतात सलिल चौधरी यांनी केलेला रबाबचा वापर रसिकांच्या कानात अजूनही रेंगाळतो). पण हे कश्मिरी कलाकार जे रबाब वाजवितात ते जरासे वेगळे आहे. त्याला काही जास्तीच्या तारा लावून एक वेगळाच कश्मिरी रंग या कलाकारांनी भरला आहे. 

सारंगी हे तसे उत्तर भारतात लोकप्रिय वाद्य. साथीचे वाद्य म्हणून हे जास्त ओळखले जाते. कोठ्यावरचे वाद्य किंवा मुजरा गाण्यांसाठी साथीचे वाद्य अशी याची जास्त ओळख आहे. पण कश्मिरच्या कलाकारांची सारंगी जरा वेगळी आहे. ती एक तर कलाकुसर असलेली आहेच. पण शिवाय तिच्या तारांची लांबी नेहमीच्या सारंगीपेक्षा जास्त आहे. परिणामी तिचा आवाज वेगळा उमटतो. केवळ करूणच नव्हे तर इतर रस व्यक्त करण्यासाठी पण सारंगीचा वापर हे कलाकार करून घेतात. 

या कश्मिरी कलाकारांच्या वादनाची शैली मोठी मोहक आहे. रबाब किंवा सारंगी वाला एक चाल इतरांसाठी देतो. त्या अनुषंगाने संतूरचे स्वर उमटत राहतात. सारंगी पार्श्वभूमीवर स्वरांचा पडदा धरून ठेवते आणि त्यावर इतरांचे सूर काही सांगितिक चित्र रेखाटत जातात असा विलक्षण अनुभव हे संगीत ऐकत असताना येत राहतो. 

सुरवातील ज्याला आपण मंगलाचरण असे म्हणतो त्या प्रमाणे एक धुन ते कुठेही गेले तर वाजवत राहतात. मग त्यानंतर विविध प्रसंगी वाजविण्यात येणार्‍या धून सादर केल्या जातात. जसे की लग्न समारंभ, प्रियकारानं प्रेयसीची केलेली आळवणी किंवा परदेशी प्रियकराच्या दु:खात होरपळत गेलेल्या प्रेयसीची आर्त वेदना, निसर्गात सर्वत्र फुलं फुललेली असताना होणारी आनंदाची भावना, बर्फाळ दिवस संपून ऊन पडून लख्ख दिवस उजाडतो तो आनंद अशा कितीतरी भावना या लोकधूनांमधून व्यक्त केल्या जातात.

हे कलाकार वागायलाही अतिशय साधे असे आहेत. त्यांंच्या संगीतावर बोलायलाही ते तयार होत नाहीत. प्रियकराची भावना व्यक्त करणारी धून समजावून सांगताना संतूर वादक उमरचे गाल गुलाबी होवून गेले होते. अधीच कश्मिरी  माणसांचा रंग गोरा गुलाबी. 

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम साजरा झाला हे पण एक वैशिष्ट्य. ज्या कश्मिरमधून हे कलाकार देवगिरीच्या जवळ आले त्याबाबत एक सुंदर माहिती लक्ष्मीकांत धोंेड यांनी या कार्यक्रमात सांगितली. आठशे वर्षांपूर्वी कश्मिरातून एक कुटूंब देवगिरीच्या यादवांच्या दरबारात आले. त्या कुटूंबातच पुढे महान संगीत तज्ज्ञ शारंगदेवाचा जन्म झाला. ज्याने ‘संगीत रत्नाकर’ या संगीतातील अद्वितीय ग्रंथाची निर्मिती याच परिसरात केली. आजही हा ग्रंथ संगीत क्षेत्रात प्रमाण मानला जातो. लिपीबद्ध शास्त्रीय स्वरूपातील संगीताला आपल्याकडे ‘मार्गी’ संगीत असे संबोधले जाते. तर याच्या शिवाय जे मौखिक परंपरेत चालत आले आहे, ज्याचे नियम कायदे अजून कुणी कागदावर मांडू शकलेले नाही अशा संगीताला ‘देशी’ समजले जाते. खरे तर देशीतूनच मार्गी विकसित होत जाते. आठशे वर्षांपूर्वी आलेल्या शारंगदेवाने इथे येवून ग्रंथ रचना करत मार्गी संगीताचा पाया रचला. तर आज त्याचा पाठलाग करत हे लोककलाकार ‘देशी’ परंपरेतील त्याच प्रदेशातील संगीत इथे येवून सादर करत आहेत. 

एक विलक्षण अशी गोष्ट म्हणून अभ्यासकांना न सापडलेल्या कितीतरी सांगितीक बाबींचा खुलासा या लोककलाकारांच्या संगीतातून होतो. 

आपल्याकडे तसेही वसंतोत्सव साजरा करण्याची परंपरा आहेच. महाराष्ट्र दिन वसंतातच येतो. तेंव्हा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने काही एक वेगळे संगीत ऐकविण्याची संयोजकांची धडपड विलक्षणच म्हणावी लागेल. या पूर्वीही वीणेसारखे दूर्मिळ वाद्य, जलतरंग सारखे फारसे परिचित नसलेले वाद्य या कार्यक्रमात सादर झाले आहे. 

निसर्गात संगीत ऐकणे हा पण एक विलक्षण अनुभव आहे. पौर्णिमा आदल्याच दिवशी होवून गेली होती. त्यामुळे स्वच्छ आभाळात हसणारा पूर्ण चंद्र, वसंतातील सुगंधीत हवा आणि कानावर पडणारे कश्मिरी संगीत याचा एक वेगळाच अनुभव रसिकांना येत होता. या परिसरात लिंबाची झाडं खुप मोठ्या प्रमाणात आहेत. लिंबाच्या माहोराचा एक मादक सुगंध वसंतात अनुभवायला येतो. 

बहाव्याची पिवळीजर्द झुंबरासारखी फुलं याच काळात फुलतात. गुल्मोहराची लाल मोहिनी याच काळात पसरायला सुरवात झाली असते. थोडसं आधी पळसाच्या रंगांनी होळीच्या दरम्यान कमाल करून टाकलेली असते. या वातावरणात संगीत-नृत्य यांचे महोत्सव साजरे होणं खरंच संयुक्तिक आहे. जागतिक नृत्य दिवसही 29 एप्रिलला असतो. त्या निमित्ताने काही आयोजन विविध ठिकाणी केलं जातं. 

1 मे हा जागतिक कामगार दिवस आहे. दिवसभर श्रमणारे लोक संध्याकाळी एकत्र जमून नाच गाणी म्हणतात अशी आपल्याकडे परंपरा आहे. खरं तर लोकसंगीत हे कष्टकर्‍यांनीच जिवापाड जपले आहे. तेंव्हा या कामगारांनी जपलेले हे लोकसंगीत आता वेगळ्या स्वरूपात सादर होणे आवश्यक आहे. जगभरात लोककलांना मोठ्या आस्थेने जपले जाते. जगभरचे पर्यटक विविध ठिकाणच्या लोककला महोत्सवांना आवर्जून हजर राहतात. हे आपल्याकडे होणे गरजेचे आहे.  शासकीय पातळीवरून होणार्‍या प्रचंड खर्चिक कोरड्या महोत्सवांपेक्षा असे छोटे उपक्रम खुप चांगले आहेत.  

देवगिरीच्या परिसरात पळस, लिंब, गुलमोहर, बहावा ही झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. तेंव्हा हा नृत्य संगीतासोबत रंगाचाही उत्सव होवून जातो. अजिंठ्याच्या रूपाने चित्रांची एक मोठी परंपरा या परिसरात होती याचा जागतिक पातळीवरचा पुरावाच उपलब्ध आहे. वेरूळचे जगप्रसिद्ध कैलास लेणंही एकेकाळी केवळ दगडाचे नसून संपूर्ण रंगीत होते. तेंव्हा असा संगीत-नृत्य- रंग महोत्सव मोठ्या प्रामाणात होणे आवश्यक आहे. 23 एप्रिल शेक्सपिअर दिवस आहे. तेंव्हा नाट्याचीही जोड याला देता येईल.  

(1 ते रोजी सादर झालेल्या कश्मिरी संगीताच्या कार्यक्रमात हे कलाकार सहभागी होते- गुलाम मोहम्मद लोन (रबाब), जहूर अहमद भट (सारंगी), उमर माजीद (संतूर), गुलजार अहमद गाश्रु (मटका).  याच कार्यक्रमात सुस्मिरता डावळकर चे सुमधुर  शास्त्रीय संगीत सदर झाले.) 
           श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Friday, May 4, 2018

...हो मी रस्त्यावर बाटल्या वेचत फिरतो आहे



औरंगाबाद शहरात कचर्‍याचा प्रश्‍न पेटला आहे. या विषयाच्या विविध पैलूंवर आम्ही आंदोलक कार्यकर्ते विचार व प्रत्यक्ष कृती करतो आहोत. कचरा वेचणार्‍या दलित महिलांशी संवाद साधला. त्यांच्या गरजा ओळखून त्यांना आर्थिक मदत केली. त्यांच्याकडून कचरा विकत घेणार्‍या दुकानदारांशी संपर्क साधला. या कचरावाल्यांकडच्या प्लास्टिक पासून दाणे बनविणार्‍या उद्योगांशी संपर्क केला. ही सगळी यंत्रणा गतिमान व्हावी म्हणून उद्योजकांच्या संघटनांशी संवाद साधला.

ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या उद्योजकांशी संपर्क करून त्यांच्या कारखान्याला प्रत्यक्ष भेट दिली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सरकारी अधिकारी काम करत असतात पण आपणच त्यांना समजून घेत नाहीत असा आरोप नेहमी केला जातो. म्हणून राज्याच्या सचिव पातळीवर असलेल्या सर्वोच्च अधिकार्‍यांपासून अगदी उपायुक्तापर्यंत तसेच अगदी प्रभाग अधिकार्‍यांपर्यंत संपर्क साधून चर्चा केली. प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी उन्हातान्हाची पर्वा न करता फिरलो.

लॉयन्स रोटरी क्लब सारख्या संस्था सामाजिक कार्य करतात असा समज आहे म्हणून त्या संस्थांच्या पदाधिकार्‍यांना लेखी स्वरूपात या कामात मदत करा असे आवाहनही केले.

सामान्य नागरिकांना सहभागी करून घेतले पाहिजे. स्वत: स्वच्छता केली पाहिजे असे जेंव्हा काही शहाण्या माणसांनी सुचविले त्या प्रमाणे स्वत:च्या प्रभागत दर रविवारी आयोजीत केलेल्या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवून प्रत्यक्ष स्वच्छता मोहिम 4 महिने राबविली.

आता एकच काम राहिले होते आणि ते म्हणजे रस्त्यावर प्रत्यक्ष कचरा वेचणे. सगळा कचरा तर शक्य नाही शिवाय त्यासाठी पूर्णवेळ काम करणेही शक्य नाही. म्हणून त्यातल्या त्यात व्यवहार्य पर्याय निवडला. घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर या रस्त्यावर जाता येता ज्या रिकाम्या काचेच्या बाटल्या, पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या दिसतील त्या गोळा करायच्या. त्या प्रमाणे 17 मार्च च्या ‘गार्बेज वॉक’ नंतर रोज अशा बाटल्या गाडीला लावलेल्या पोत्यात गोळा करतो आहे. धान्याची 30 किलोची एक गोणी एका चकरेत सहज भरावी इतक्या बाटल्या सध्या रस्त्यावर मिळत आहेत.

औरंगाबाद शहरातील सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती आपल्या समर्थ नगर ते ज्योती नगर या माझ्या रेाजच्या जाण्या येण्याच्या मार्गावर जर आपण रिकाम्या बाटल्या जमा करून ठेवल्या तर मी जाता येता त्या घेवून जाण्यास तयार आहे. कृपया आपल्या घरातील आजूबाजूच्या परिसरातील रिकाम्या बाटल्या गोळा करून ठेवा. तूमच्या माझ्या सोयीने मी त्या नेईल.

ताराबाई म्हस्के ही कचरावेचक महिला माझ्या घरून सकाळी या बाटल्या नियमित स्वरूपात घेवून जाते. चर्चा खुप झाली. आणि पुढेही करत राहूत. आंदोलन तर चालू आहेच. पण मी माझ्याकडून ही कृती करतो आहे. कृपया तूमच्याकडच्या रिकाम्या बाटल्या देवून माझ्या या अभियानास सहकार्य करा. शहर स्वच्छ ठेवा ! 

श्रीकांत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. 431 001.
मो. 9422878575