Tuesday, March 13, 2018

पोटनिवडणुक निकाला आधीच लिहून ठेवतो..



आपल्याकडे निकाल जसे लागतील त्याप्रमाणे मत प्रदर्शन करणार्‍या विद्वानांचे  प्रमाण प्रचंड वाढलं आहे. हे लोक बर्‍याचदा वस्तुस्थिती काय आहे याकडे लक्षच देत नाहीत. आता उद्या पोटनिवडणुकीची मतमोजणी होत आहे. यातील उत्तरप्रदेशचे उदाहरण मोठं मासलेवाईक आहे.

गोरखपुर आणि फूलपूर  हे दोन्ही मतदारसंघ भाजपकडे होते. येागी आदित्यनाथ आणि केशवप्रसाद मौर्य यांनी राजिनामा दिल्याने इथे पोटनिवडणुक होत आहे. आता जर इथे भाजपच जिंकला तर निश्‍चितच पुरोगामी म्हणणार त्यांच्या जागा होत्या त्यांनीच जिंकल्या. मग या निवडणुकीत मिळालेली मते मोजली जातील. याची तुलना आधी मिळालेल्या मतांशी केली जाईल आणि भाजपचा हा खरा तर पराभवच कसा आहे हे आग्रहाने सांगितले जाईल.

दुसरी शक्यता आहे की उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचा उमेदवार विजयी होईल. असे झाले तर काही विचारायची सोयच नाही. मग अगदी भारतभर मोदींचा प्रभाव कसा संपला. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. असली कर्कश ओरड सुरू होईल. समाजवादी पक्ष म्हणजे कसा बहुजनांचा तारणहार आहे. मायावती यांनी पाठिंबा दिल्याने अखिलेश मायावती यांचे एकत्र छायाचित्र माध्यमांमधून झळकेल. मायावती त्यांच्या चिरपरिचीत अशा आवाजात ‘एक दलित की बेटी को इन मनुवादीयोंने अपमानित किया था. आजकी इस चुनाव ने इसका बदला लिया है. अब दिल्ली दूर नही.’ वगैरे वगैरे सुरू होईल..

हीच परिस्थिती बिहारची. निदान बिहार मध्ये कॉंग्रेस ने आर जे डी ला पाठींबा तरी दिला आहे

पण आश्चर्य म्हणजे या तीनही ठिकाणी कॉंग्रेस कुठे आहे याची कुणी चर्चाच करत नाही. कॉंग्रेसचा विजय तर सोडाच पण त्यांची दखलच कुणी घेतली नाही. इकडे भाजप विरोधी आघाडी तयार करण्यासाठी महाराष्ट्रात शरद पवारांसारखे जाणते राजे राहूल गांधींच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचा कसा योग्य पर्याय आहे हे सांगत आहेत. आणि दुसरीकडे भारतभर भाजप सोबतच कॉंग्रेसलाही दूर ठेवले पाहिजे यावर ममता-मायावती-अखिलेश-लालू- चंद्रशेखर राव- एम.के.स्टालिन-केजरीवाल- नविन पटनायक-देवेगौडा यांची एकी होताना दिसत आहे.
उद्याच्या पोटनिवडणुकीचे निकाल काहीही लागो कॉंग्रेसला भाजपेतर विरोधी पक्षांनीच बेदखल केल्याचे दिसत आहे. पुरोगामी आघाडी उघडायचीच असेल तर कॉंग्रेस कशाला पाहिजे आहे? हीच कॉंग्रेस आहे की जिला विरोध करून आपण  राजकीय पक्ष म्हणून उभे राहिलो. भाजप तर आत्ता आत्ता तयार झालेली ताकद आहे. तिच्या सेाबतच या कॉंग्रेसलाही विरोध केला पाहिजे. भाजप-कॉंग्रेस मिळून 50 टक्के मते होतात. पण उरलेली 50 टक्के इतकी प्रचंड मते तर आपल्याकडे आहेत ना. असा विश्वास या कॉंग्रेस-भाजपेतर विरोधी पक्षांना दिसतो आहे.
राजकीय अभ्यासकांनी याची नोंद घ्यावी. 2019 च्या निवडणुकीत कॉंग्रेस-भाजतेतर तिसरी आघाडी उभी राहण्याची शक्यता जास्त आहे. यात सगळ्यात जास्त नुकसान कॉंग्रेसचेच होईल. भाजपाची-संघाची भिती दाखवत आपल्या पोळीवर तुप पाडून घेण्याची कॉंग्रेसची निती आता इतर पुरोगामी पक्ष किती चालू देतील याची शंकाच आहे.

हे मुद्दाम उद्याच्या निकालाच्या आधीच लिहून ठेवतो. 

No comments:

Post a Comment