Wednesday, January 25, 2017

नक्क्ष लायलपुरी : शब्दांशी ‘लॉयल’ गीतकार





















( गायिका रूना लैला, संंगीतकार जयदेव आणि गीतकार नक्श लायलपुरी)  

बुधवार 25 जानेवारी  2017 


‘आहिस्ता आहिस्ता’ चित्रपटात नक्क्ष लायलपुरी यांची गाणी आहेत. पण सोबतच निदा फाजली यांचीपण आहेत. या चित्रपटातील निदा फाजली यांचे एक गीत ‘कभी किसी को मुक्कमल जहां नही मिलता’ भुपेंद्र यांच्या आवाजात फार सुंदर आहे. यातील काव्य हीच नक्क्ष यांची नियती असेल असे खुद्द त्यांनाही वाटले नसेल. पण तसं घडलं खरं. त्यांना त्यांचं मुक्कमल जग हिंदी गाण्यांच्या प्रांतात भेटलं नाही.

जयदेव हे गुणी संगीतकार पण हम दोनो चा अपवाद वगळता त्यांची गाणी फारशी गाजली नाहीत. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या मान जायिए (1972) मधली नक्क्ष यांची दोन गाणी फार गोड आहेत. किशोर कुमारच्या आवाजातील ‘ये वोही गीत है जिसको मैने धडकन मे बसाया है’ हे गाणे जलाल आगावर चित्रित आहे. पण त्याचा ना आगाला फायदा झाला ना लायलपुरींना. किशोरचे करिअर मात्र बहरत गेले. दुसरे गाणे लताच्या आवाजात आहे. ‘ओ मितवा, बदरा छाये रे, कारे कारे कजरा रे, ओ मितवा अंग लग जा रे’ या शब्दांना चालही अतिशय गोड बांधलेली आहे. पण रेहना सुलतान आणि राकेश पांडे यांच्या सारखे अभिनेत गाण्याचे काय भले करणार? परिणाम सांगायची गरज नाही.

पुढच्याच वर्षी आलेल्या दिल की राहे (1973) मधील मदन मोहनच्या ‘रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे’ लायलपुरी यांचे हे सर्वात उत्तम गाणे. लताच्या आवाजाबद्दल काही बोलायचे कामच नाही. याही सिनेमात रेहाना राकेश हीच जोडी होती.  ‘दर्द मे डुबे हुये नग्मे हजारो है मगर, साज ए दिल टूट गया हो तो सुनाये कैसे’ असा एक सुंदर शेर या गीतात नक्क्ष यांनी लिहीला. पण नक्क्ष यांचे दुर्दैव म्हणजे हे गाणे राजा मेहंद अली किवा राजेंद्र कृष्ण यांचे असावा असाच गैरसमज रसिक करून घेतात. म्हणजे याला मिळणारी दादही नक्क्ष यांच्या पदरात पडत नाही. याच चित्रपटात लताचेच अजून एक गोड गाणे आहे, ‘आपकी बाते कहे या अपना अफसाना कहे, होश मे दोनो नही है किसको दिवाना कहे’. यात सतार, तबला आणि  लताचा आवाज इतक्यावरच गाण्याचा गोडवा पेलला आहे. याच चित्रपटात मन्ना डे आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात एक गाणे आहे, ‘अपने सुरों मे मेरे सुरों को बसा लो, ये गीत अमर हो जाये’. खरं तर नक्क्ष मदन मोहन सारख्या मोठ्या प्रतिभावंत संगीतकारांना हेच म्हणत होते की ‘अपने सुरां मे मेरे गीतों को बसा लो, ये गीत अमर हो जाये’. पण ते कोणी ऐकलं नाही.

सहा वर्षांनी जयदेवच्याच ‘घरोंदा’ (1977) मध्ये ‘मुझे प्यार तुमसे नही है नही है’ हे गीत नक्क्ष यांनी दिले. रूना लैलाचा वेगळा मेटॅलिक आवाज, अमोल पालेकर जरिना वहाब यांना नैसर्गिक ताजा अभिनय असूनही नक्क्ष यांना फायदा झाला नाही. कारण याच चित्रपटातल्या गुलजारच्या ‘दो दिवाने शहर मे’ आणि ‘एक दिवाना इस शहर मे’ या गाण्यांनीच सगळी हवा करून टाकली. अगदी भुपेंद्र आणि रूना लैलाला पण रसिकांच्या मनात मोठी जागा मिळाली. जयदेवची पुसट कारकीर्द परत उजळली. मागे राहिले फक्त नक्क्ष लायलपुरी.

जयदेवचाच एक चित्रपट ‘तुम्हारे लिये’ 1978 मध्ये प्रदर्शीत झाला. संजीव कुमार, विद्या सिन्हा अशी तगडी स्टारकास्ट होती. यातील लताचे ‘तुम्हे देखती हू तो लगता है ऐसे, की जैसे युगों से तुम्हे जानती हू’ फार सुंदर आहे. संन्याशाच्या वेशातील संजीव कुमार आणि विद्यासिन्हा तळ्याच्या काठावर बसून गाणे म्हणत आहेत. आजही हे गाणे कुठे लागले तर ऐकणार्‍याचा पाय जागीच खिळून राहतो. जयदेवशी नक्क्ष यांचे नाते चांगलेच जूळले होते त्याचाच हा पुरावा.

खय्यामचा ‘नुरी’ 1979 मध्ये गोड गाणे घेवूनच आला. जां निसार अख्तर यांचे ‘ओऽऽ नुरी आजा रे’ हे गाणे अतिशय गाजले मग स्वाभाविकच यातली नक्क्ष यांची गीतं झाकोळली गेली. खरं तर ‘चोरी चोरी कोई आये’ हे लताच्या आवाजातले गाणे आजही परत परत ऐकावेसे वाटते. अशा भोसलेच्या आवाजातील मुजरा ‘कदर तूने ना जानी, बीत जाये जवानी’ पण अप्रतिमच. ‘चोरी चोरी कोई आये’ची तरी कदर झाली पण ‘कदर तूने’ ची झालीच नाही.

याच वर्षी ‘खानदान’ हा खय्यामचा अजून एक चित्रपट प्रदर्शित झाला. जितेंद्र, सुलक्षणा पंडित, बिंदीया गोस्वामी अशी नट मंडळी यात होती. या चित्रपटानेही यशाची बर्‍यापैकी चव नक्क्ष यांना चाखायला मिळाली. त्यांच्या सोबत दुसरा कोणताच गीताकर नव्हता. स्वाभाविकच सगळे यश त्यांच्याच पदरात पडले. लताच्या आवाजातील बिंदीया गोस्वामीवर चित्रित ‘ये मुलाकात इक बहाना है, प्यार का सिलसिला बढाना है’ आणि सुलक्षणा पंडितच्या आवाजातील ‘माना तेरी नजर मे तेरा प्यार हम नही, कैसे कहे की तेरे तलबगार हम नही’ ही गझल विशेष गाजली. ‘तन को जला के राख बनाया बिछा दिया, लो अब तुम्हारी राह मे दिवार हम नही’ असा एक उत्कट शेर या गझलेत आहे. हेच गाणे परत 1981 मध्ये आहिस्ता आहिस्ता चित्रपटात खय्याम यांनी का वापरले कळत नाही. आहिस्ता आहिस्ता मधील निदा फाजली यांची गाणी गाजली तशी लायलपुरी यांची नाही.

जयदेवबरोबर नक्क्ष यांचे सुर चांगले जूळले होते. ‘आयी तेरी याद’ (1980) या चित्रपटात भुपेंद्रच्या आवाजात  ‘फिर तेरी याद नये दीप जलाने आयी, मेरी दुनियासे अंधेरोको मिटाने आयी’ हे चांगले गाणे दिले आहे. भुपेंद्रच्या गंभीर आवाजाला शोभणारे व्हायोलीनचे सूर गाण्यात वापरले आहे.

राजेश खन्ना, हेमा मालिनी, पुनम धिल्लन अशी तगडी स्टार कास्ट असलेल्या ‘दर्द’ (1981) मध्ये सगळी गाणी नक्क्ष यांचीच होती. याला संगीत अर्थात नक्क्ष यांचे लाडके संगीतकार खय्याम यांचे होते. या चित्रपटाने यशाची एक सुखद झुळूक नक्क्ष यांना अनुभवायला मिळाली. ‘न जाने क्या हुआ, जो तूने छू लिया’ हे लताच्या आवाजातील गाणे याच चित्रपटाचे. हेमा यात दिसलीही आहे अतिशय छान. याचे बोलही अर्थात अप्रतिमच आहेत. आशा आणि किशोरच्या आवाजातील ‘प्यार का दर्द है मिठा मिठा प्यारा प्यारा’ याही गाण्याला चांगली लोकप्रियता लाभली. थोडा म्हातारा वाटणारा राजेश खन्ना आणि तारूण्याने मुसमुसलेली पुनम या गाण्यात आहेत. भुपेंद्रच्या आवाजात एक फार चांगली गझल खय्याम यांनी दिली आहे. ‘अहले दिल यु भी निभा लेते है, दर्द सीने मे छूपा लेते है’. खय्याम यांचे गझलवर किती प्रेम आहे हे याच काळात आलेल्या ‘उमराव जान’ ने सिद्ध केले होतेच. गझलेचा वापर खय्याम मदन मोहन इतका नेमका कुणीच केला नाही. बाकीचे संगीतकार गझलेला गाण्यासारखी वागणूक देतात. हेच गाणे लताच्या आवाजातही आहे. पण भुपेंद्रची मजा त्यात नाही.

याच यशाचा अनुभव परत नक्क्ष यांच्या वाट्याला पुढच्याच वर्षी आला. खय्याम यांनी दिल-ए-नादान या राजेश खन्ना जयाप्रदाच्या चित्रपआत त्यांच्या रचना वापरल्या. लता किशोरच्या आवाजातील ‘चांदनी रात मे एक बार तूझे देखा है’ गाणे बर्‍यापैकी लोकप्रिय झाले. बाकी इतर गाणी विशेष नाहीत.

यानंतर मात्र नक्क्ष यांची गाणी जवळपास नाहीशीच झाली. 1991 मध्ये राज कपुरच्या हिना मध्ये रविंद्र जैन यांनी ‘चिठ्ठीये नी दर्द फिराक बलिये’ या गाण्यासाठी त्यांचे शब्द वापरले. लताच्या आवाजातील हे गाणे श्रवणीय आहे. नाना पाटेकर, रेखा आणि दिप्ती नवल यांचा यात्रा (2007) हा एक वेगळा चित्रपट. यात खय्यामनी तलत अजीज च्या आवाजात ‘साज ए दिल नगमा ए जान’ ही सुंदर गझल दिली आहे.

जयदेव आणि खय्याम यांच्याशीच नक्क्ष लायलपुरी यांचे सुर जूळले असं दिसून येतं. त्याशिवाय मदन मोहनचा एक अपवाद वगळता त्यांची गीतं इतर संगीतकारांनी वापरली नाहीत. रवी, सपन जगमोहन, रोशन यांच्याकडे त्यांची काही गाणी आहेत. पण ती विशेष नाहीत. हिंदी चित्रपटांतील गाण्यांची एक अडचण अशी आहे की संगीतकारांचे ज्याच्याशी सूर जूळले तेच गीतकार विशेष गाजले. त्यांच्या काव्यात प्रतिभा किती हा दुसरा मुद्दा. नक्क्ष लायलपुरी आपल्या शब्दांशी पूर्ण ‘लॉयल’ होते. पण त्यांना मोठी संधी या क्षेत्रात मिळाली नाही हे वास्तव आहे. जी काही थोडीफार संधी त्यांना मिळाली त्यात त्यांनी जीव ओतला. खय्याम सोबतची गाणी तेवढी गाजली. आजही ती रसिकांच्या लक्षात आहेत.

(नक्क्ष लायलपुरी यांची इतर माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. ती परत इथे दिली नाही. )
  
        श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

 
   

Tuesday, January 24, 2017

बोटांनी छेडीत।अशी एकतारी।लावूनिया उरी।गा तू देवा॥


अक्षरनामा news portal मंगळवार २४ जानेवारी २०१७

संगीताच्या जाणकारांना 'आहत' नाद व 'अनाहत' नाद हे शब्द माहीत असतात, पण सामान्य रसिकांना हे फारसं कळत नाही. कानाला जे ऐकू येतात ते सर्व 'आहत' नाद आणि कानाला ऐकू येत नाहीत किंवा जाणवत नाहीत, पण ज्यांचा अंतश्चक्षू तीक्ष्ण आहे, त्यांना ऐकू येतो तो 'अनाहत' नाद. 
माझ्यासारख्याचा अंतश्चक्षू किती तीक्ष्ण आहे माहीत नाही, पण २१ जानेवारीला औरंगाबादेत शारंगदेव महोत्सवात ज्यांनी ज्यांनी पार्वती बाऊल या गायिकेचं ‘बाऊल संगीत’ ऐकलं, पाहिलं, अनुभवलं असेल, त्यांना एक वेगळीच अनुभूती आली असेल हे निश्चित. या अनुभवाचं वर्णन करणं खरंच अवघड आहे. सर्वसाधारण अनुभव शब्दांत मांडता येतो, पण असाधारण अनुभवासाठी शब्द कुठून आणायचे?
बाऊल संगीत ही फार जुनी परंपरा आहे. जवळपास हजार वर्षांपासून बंगालमध्ये ती प्रचलित आहे. एक गुढवादी पंथ म्हणून या लोकांना ओळखलं जातं. आज या पंथाचे अतिशय थोडे लोक शिल्लक राहिले आहेत. त्यापैकी एक म्हणजे पार्वती बाऊल. (त्यांची माहिती आंतरजालावर उपलब्ध आहे.) 
शारंगदेव महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे वातावरण निर्मिती. १३ व्या शतकात शारंगदेवाने देवगिरी किल्ल्याच्या परिसरात ‘संगीत रत्नाकर’ या ग्रंथाचं लेखन केलं. त्या अनुषंगानं याच परिसरात गेल्या सात वर्षांपासून या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. मंचावर कुठलेही झगझगीत, बटबटीत बॅनर लावले जात नाहीत. पाठीमागच्या काळ्या पडद्याच्या पार्श्वभूमीवर कलाकार आपली कला सादर करतो. प्रकाश व ध्वनी व्यवस्था हेही अतिशय नेमकं व साजेसं असतं. कार्यक्रमाच्या पत्रिका आकर्षक व वेगळ्या पद्धतीनं छापलेल्या असतात. कुठलेही कृत्रिम ध्वनी (इलेक्ट्रॉनिक आवाज) संपूर्ण महोत्सवात वापरले जात नाहीत. महागामीच्या आवारात ठायी ठायी कलात्मकता जाणवत राहते. सकाळच्या भाषण सत्राचा कार्यक्रम महागामीच्या छोट्या बैठक सभागृहात होतो. जिथं बसायचा ओदिशाच्या गवती चटया आंथरलेल्या असतात. स्त्रियांसाठी बाहेर मुद्दाम गजरे उपलब्ध करून दिले जातात. जेणे करून त्यांनी ते केसांवर माळावेत. पुरुषांसाठी बाहेर नक्षीदार वाटीत गंध ठेवलेलं असतं. चंदनाचा वास सर्वत्र दरवळत असतो. 
जिथं संध्याकाळचा कार्यक्रम होतो, त्या रुक्मिणी सभागृहाच्या प्रवेशद्वारावर आकर्षक पणत्या पेटवून सजावट केली असते. फुलांची उधळण तर असतेच. सुंदर पोषाखातील महागामी गुरुकुलाच्या मुली सगळ्यांचे 'नमो नमा:' म्हणून स्वागत करत असतात. जुन्या पोथीचं पान शोभावं असा एक फ्लेक्स प्रवेशद्वारावर लटकलेला असतो. कार्यक्रमाची सुरुवात ‘संगीत रत्नाकर’मधील संस्कृत श्लोकांच्या पठणानं होते. 
यामुळे आधीच रसिक एक वेगळ्या मानसिकतेत पोचलेला असतो. त्यात पार्वती बाऊल यांचं सादरीकरण म्हणजे तर... त्यांचा केशरी पोशाख काळ्या पार्श्वभूमीवर उठून दिसत होता. त्यांचं सादरीकरण म्हणजे एकपात्री प्रयोगच. कमरेला बांधलेला तबला (डुग्गी) डाव्या हातानं त्या वाजवत होत्या. ही डुग्गी म्हणजे छोटा तबला. हा मातीचा बनवलेला असतो. 
उजव्या हातात या पंथाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असलेली एकतारी. ही एकतारी भोपळ्याचा तुंबा आणि लाकडाची काठी यांपासून बनवली जायची. आता ती लाकूड व बांबूपासून बनवली जाते. त्याची तार ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असते. जो नाद या एकतारीपासून निर्माण होतो, त्याला ‘अनाहत नाद’ असं संबोधलं जातं. अर्थात तो नाद आपल्याला ऐकू येतो, पण त्याची अनुभूती काहीतरी विलक्षण अशी असते. 
पायात नुपूर. आपण सगळ्यांना घुंगरू म्हणूनच ओळखतो. पण त्यांच्या पायात नुपूर होते. त्याचं विश्लेषण त्यांनी दुसऱ्या दिवशीच्या भाषण सत्रात सविस्तर सांगितलं. देवाच्या पायातलं हे आभूषण आहे. मयुराचं तोंड असलेलं नागाच्या आकारातील पोकळ कंकण आणि त्याच्या पोटात धातूचे दाणे!
बंगाली भाषेतल्या भक्तीरचना पार्वती बाऊल आपल्या गोड व काहीशा चिरकणाऱ्या आवाजात सादर करत होत्या. हे सादर करताना एका हातानं डुग्गी, तर दुसऱ्या हातानं एकतारी वाजवत होत्या. नाचताना होणारा नुपुरांचा आवाज, मध्येच गिरकी मारून त्या शांत उभ्या राहत…तेव्हा फक्त एकतारीचा नाद सगळ्या आसमंतात घुमत राही. गायन, वादन, नृत्य व चेहऱ्यावरील उत्कट भावाविष्कारानं साधलं जाणारं नाट्य असा तो अदभुत एकपात्री प्रयोग होता. कुमार गंधर्व यांनी सुरात वाजणाऱ्या तंबोऱ्यांचं महत्त्व अनेकदा आपल्या मुलाखतींमधून सांगितलं आहे. पार्वती बाऊल यांच्या एकतारीच्या सुरांत अशीच काहीतरी जादू होती!
बंगालचे सुप्रसिद्ध सुफी संत लालन साई यांची एक रचना त्यांनी सादर केली. याच लालन साईंवर सुनील गंगोपाध्याय यांनी 'मोनेर मानुष' या नावानं एक कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीवर चित्रपट आला असून त्याला राष्ट्रीय पारितोषिकही मिळालं आहे. (ही कादंबरी मराठीत अनंत उमरीकर यांनी अनुवादित केली आहे.) हे लालन साई स्वत: मोठे बाऊल गायक होते. त्यांनी हजारभर गीतं गायिली आहेत. पार्वती बाऊल त्याच परंपरेतील. लालन साईंची रचना त्यांच्या तोंडून ऐकणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता.
किती वेळात संपवायचा आहे कार्यक्रम, असं त्यांनी दहा वाजून गेल्यावर विचारलं. तेव्हा तुमच्या मनाप्रमाणे गात रहा, असं महोत्सवाच्या आयोजिका सुप्रसिद्ध ओडिसी/कथ्थक नृत्यांगना पार्वती दत्ता यांनी सांगताच पार्वती बाऊल यांनी खास ठेवणीतल्या चिजा काढायला सुरवात केली. 
पार्वती दत्ता यांनी आपल्याला आमंत्रित केलं, मला इथं स्त्री शक्ती जास्त जाणवत आहे असं म्हणून पार्वती बाऊल यांनी काली दुर्गा यांच्यावरची भक्तिरचना सादर केली. त्यांच्या त्या पायापर्यंत लोंबणाऱ्या लांब लांब जटा. गिरकी घेताना त्यांचा तयार होणारा घेर, त्यांच्या आवाजातील भेदून जाणारी आर्तता यातून कालीचं एक रूपच रसिकांच्या डोळ्यांसमोर प्रकट झालं. आर्त वाटणारा आवाज क्षणात महाकालीच्या सर्वशक्तीमान अशा सामर्थ्याचा आविष्कार दाखवून गेला. 
समारोप त्यांनी रास लीलेवरील गीतानं केला. राधा, कृष्ण आणि गोपी यांचे वेगवेगळे आविष्कार दाखवता दाखवता ते सगळेच शेवटी एकरूप कसे होऊन गेले हे व्यक्त करण्याची त्यांची पद्धत फारच विलक्षण होती. एकच व्यक्ती आपल्या समोर राधा आणि कृष्णही उभा करते, त्यांची एकरूपता दाखवते. रास चालू असताना टिपऱ्या चालू आहेत असा एक प्रसंग रंगवायचा होता. मला उत्सुकता होती की, त्या आता नेमकी काय क्लृप्ती वापरतात. हातात तर काठीही नाही. मग टिपऱ्यांचा आवाज कसा निर्माण करायचा? तेव्हा त्यांनी दोन्ही पाय जोडून उंच उडी मारली. हे पाय परत रंगमंचाच्या लाकडी जमिनीवर आदळले, तेव्हा त्यातून टिपऱ्यांचा ध्वनी उमटला. या प्रसंगावर तर टाळ्या वाजवायचंही सुधरलं नाही. त्यांच्या पायातले नुपूर आणि जमिनीवर विशिष्ट पद्धतीनं पाय आपटून टिपऱ्यांचा नाद निर्माण करणारी ही कला कोणत्या श्रेणीची म्हणावी?
आभाळाच्या दिशेनं त्या हात करून तार स्वरात आर्ततेनं देवाला आळवायच्या, तेव्हा असं वाटायचं की, खरंच त्यांना तो तिथं कुठेतरी दिसत असावा. हा स्वर खराच त्याच्यापर्यंत पोचतो आहे. शेवटी शांतपणे त्यांनी सगळी गती थांबवली. सगळ्या हालचाली बंद केल्या. डोळेही बंद केले. उजव्या हातातील एकतारी केवळ वाजत राहिली. ऐकता ऐकता रसिकांना असं वाटत होतं की, आपल्याही शरीरात ही एकतारी वाजत आहे. हा आहत नाद नाही. आता हा ‘अनाहत नाद’ आपल्या आत सुरू झाला आहे. या संगीताची ताकद अशी की, आपल्यालाही तो ऐकू येतो आहे.

महात्मा बसवेश्वरांचं एक कानडी वचन पं. मल्लिकार्जून मन्सूर गायचे. त्याचा मराठी भावानुवाद असा  -
मस्तक भोपळा।शीरा जणू तारा।दांडी या शरीरा।बनव गा॥
बोटांनी छेडीत।अशी एकतारी।लावूनिया उरी।गा तू देवा॥
पार्वती बाऊल यांच्या एकतारीचा आवाज कानात घुमत असताना अशीच भावना प्रत्येक रसिकांची झाली होती.   

लेखक जनशक्ती वाचक चळवळ (औरंगाबाद) या प्रकाशनसंस्थेचे संचालक आहेत.
shri.umrikar@gmail.com

Thursday, January 19, 2017

भंगार साखर कारखान्यांचे करायचे काय?


रूमणं, गुरूवार 19 जानेवारी 2017  दै. गांवकरी, औरंगाबा

‘विना सहकार नही उद्धार’ ही घोषणा मोठी आकर्षक होती. आपल्या राजकीय नेत्यांना हीचा मोठा मोह पडला. आणि हे आता काळानुसार सिद्धच झाले की सहकारामुळेच या नेत्यांचा ‘उद्धार’ झाला. नसता एकीकडे मोठे मोठे सहकारमहर्षी आणि दुसरीकडे बंद पडलेले साखर कारखाने असे कुरूप चित्र दिसलेच नसते. 

सहकार महर्षी म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे चिरंजीव मा. श्री. बाळासाहेब विखे पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनासोबतच एक बातमी प्रसिद्ध झाले. सगळ्यांचे तिकडे काहीसे दुर्लक्षच झाले. स्वाभाविक आहे. एकूणच सध्या सहकाराकडेच सगळ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. भाकड गायीला कुणी वाली नसतो तशातलाच हा प्रकार आहे. बंद पडलेल्या 11 साखर कारखान्यांच्या ही बातमी आहे. 
महाराष्ट्रातील 11 सहकारी साखर कारखान्यांकडे राज्य सहकारी बँकेचे साडेसातशे कोटी रूपये कर्जापायी थकले आहेत. आता हे पैसे वसूल करायचे कसे? तर हे कारखाने जप्त करून त्यांचा लिलाव करण्यात यावा व त्यातून बॅकेने आपल्या कर्जाची वसुली करावी असा प्रस्ताव समोर आला. त्यानुसार राज्य सहकारी बँकेने रीतसर कारवाई केली. हे कारखाने विक्रीसाठी काढले. त्यांची मालमत्ता विकण्यासाठी अनेकवेळा जाहिराती दिल्या. पण कोणीही पुढे यायला तयार नाही.  

या साखर कारखान्यांकडे जी काही मालमत्ता आहे त्यात भंगार मशिनरी, इमारत या शिवाय जी जमिन आहे तीही थोडी थोडकी नाही. तर ही जमिन दोन हजार दोनशे एकर इतकी प्रचंड आहे. 

हे कारखाने स्थापन होताना शासनाने त्या भागातील शेतकर्‍यांकडून जमिनी बेभाव खरेदी केल्या. तेंव्हा हेच सांगितले गेले होते की तुम्ही जमिनी दिल्याने आपल्या भागाचा विकास होणार आहे. तूमच्या उसाला भाव भेटणार आहे. जगाचे कल्याण होणार आहे. आणि त्या सोबतच तुमचेही कल्याण होणार आहे. आज हा सहकाराचा सगळा डोलारा पूर्णत: कोसळला आहे. कारखाने बुडाले आहेत. पण एकही संचालक बुडालेला कर्जबाजारी झालेला दिसत नाही. एकही छोटा मोठा नेता साखर कारखाना बुडाला म्हणून कंगाल झालेला आढळत नाही. हे काय गौडबंगाल आहे? 

कारखाना चालला तर फायदा नेत्याला होतो. सर्वसामान्य ग्राहकांना साखर स्वस्त भेटते. सहकार विभागातील कर्मचार्‍यांचे पगार चालू राहतात. आणि शेतकरी मात्र आत्महत्या करतो. हा कारखाना बुडाला तरी नेते आनंदात असतात, कर्मचार्‍यांचे पगार चालूच असतात. सर्वसामान्य ग्राहकांना साखर स्वस्त भेटतच राहते. आणि परत एकदा शेतकर्‍यावर आत्महत्या करण्याची पाळी येते. 

ओली पडो की सुकी तोटा मात्र नेहमी शेतकर्‍यालाच हे नेमके कोणते सहकारी तत्व आहे? 

जे कारखाने बंद पडले आहेत त्या कारखान्यांच्या जमिनी मूळ शेतकर्‍याला वापस का केल्या जात नाहीत? ज्या उद्देशासाठी जमिनी अधिग्रहीत केल्या होत्या ते कारण तर आता निघून गेले आहे. या कारखान्यांच्या मालमत्तेचे लिलाव करण्यासाठी कैकवेळा जाहिराती देण्यात आल्या. तरी या जमिनी मालमत्ता यंत्र कोणी घेण्यास तयार नाही. मग या जमिनी मूळ शेतमालकाला देवून का टाकत नाहीत? 

समजा या जमिनी सरकारला शेतकर्‍याला परत करायच्या नाहीत. मग दुसरा एक प्रस्ताव बँकेच्या अधिकार्‍यांनी सरकारला दिला होता. या सगळ्या जमिनी सरकारने ताब्यात घेवून त्या ठिकाणी औद्योगिक वसाहती (एम.आय.डि.सी.) स्थापन कराव्यात. एरवी कुठेही औद्योगिक वसाहत स्थापन करावयाची तर जागा हा सगळ्यात मोठा अडथळा असतो. या जागेच्या कटकटी नको वाटतात म्हणून उद्योजक शासनाच्या गळ्यात पडतात. आम्हाला कसंही करून जमिन मिळवून द्या. मग सरकारलाही बिचार्‍या उद्योजकांची कीव येते. आणि या गरीब भोळ्या कष्टकरी मागास साध्या उद्योजकांसाठी सरकार धनदांडग्या जमिनदार गर्भश्रीमंत शेतकर्‍यांच्या जमिनी त्यांनी देशाच्या विकासासाठी त्याग केला पाहिजे म्हणून त्यांच्याकडून अल्प किमतीत हिसकावून घेते. 
मग हे शेतकरी या जमिन अधिग्रहणाला विरोध करतात. या सगळ्यां गोंधळात न पडता सध्या सरकारकडे ही जवळपास दोनहजार दोनशे एकर जमिन आलेलीच आहे. सरकारने ही जमिन विकसित करावी.  गरीब बिचार्‍या उद्योगपतींनी ही जमिन शासनाकडून खरेदी करावी. जी काही रक्कम येईल त्यातून राज्य सहकारी बँकेचे 750 कोटी रूपये फेडून टाकावे. शिवाय या कारखान्यांची जी काही इतर मालमत्ता असेल ती भंगारमध्ये फुकट या उद्योगपतींना भेटेल. त्याचा जसा जमेल तसा वापर त्यांनी करावा. 

एरवी एखाद्या ठिकाणी शासकीय प्रकल्प येणार म्हटले की सरकारी अधिकारी आणि नेते यांच्याच तोंडाला पाणी सुटते. कारण जमिनीच्या भावाचे होणारे ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे. पण हेच जर अधिग्रहीत केलेली जमिन असेल तर त्यावर प्रकल्प उभा करण्यात कुणालाच रस शिल्लक राहत नाही. 

नागपुरहून मुंबईला आणि पुण्याला जाण्यासाठी म्हणून एक्स्प्रेस हायवे नावाखाली दहा वर्षांपूर्वी एक रस्ता तयार करण्यात आला. सध्या तो अस्तित्वात आहे. काही ठिकाणी काम रखडलं आहे. काही गावांमधून वळण रस्ता होणे गरजेचे आहे. पण या किरकोळ गोष्टी पार पाडल्या तर नागपुरहून मुंबईला आणि पुण्याला जाण्यासाठी म्हणून जवळचा रस्ता तयार होवून शकतो. आणि तो अतिशय कार्यक्षमतेनं वापरात येवू शकतो. पण तसं करण्यात कुणाला काहीच रस नाही. या उलट याच रस्त्याला समांतर असा दुसरा एक रस्ता ‘समृद्धी’ मार्ग नावानं होवू घातला आहे. त्यासाठी जमिनी अधिग्रहीत करण्याची तयारी सुरू झाली आहे. शेतकरी विरोध करत आहेत. मोठ मोठ्या रकमांच्या बोली मनातल्या मनात लावल्या जात आहेत. यामुळे कोणाला किती काम मिळेल, कोणाच्या खिशात किती पैसे जातील याचे मांडे रचले जात आहे. मग एक साधा प्रश्‍न कुणाच्या मनात येत नाही की हेच सगळं सांगून दहा वर्षांपूर्वी जो रस्ता तयार केला होता, जो की आता रखडला आहे त्याचे काय झाले? आणि हा नविन रस्ताही असाच रखडला तर त्याला जबाबदार कोण? हा नवा समृद्धी मार्ग नेमका कुणाला समृद्ध करणार आहे?

जुने प्रकल्प तसेच सडत ठेवायचे आणि नवे सुरु करायचे. आपल्याकडे एक म्हण आहे असलेले वीटवायचे आणि नसलेले भेटवायचे.

जे अकरा कारखाने आज भंगार झाले आहेत त्याची नैतिक जबाबदारी कोणावर आहे? यात शासनाचा पैसा अडकला आहे. शासकीय बँक अडचणीत आलेली आहे. मग ही सगळी भंगार बनलेली संपत्ती कोणत्या सरकारी धोरणाचे अपयश आहे?

खरं तर साखर कारखाने भंगार झाले याला मूळात सरकारचे धोरण कारणीभूत आहे. शेतकर्‍याकडे ऊस असतो तेंव्हा त्याला मातीमोल किंमत असते. त्यापासून साखर तयार होते तिची किंमत कधी फारशी वाढू दिली जात नाही. चाळीस रूपयांच्या पुढे ही साखर गेली की असा आरडा ओरडा होतो की जशी काही जगबुडी होणार आहे. मग शासन तातडीने साखर आयात करण्याचे धोरण ठरवते. ब्राझीलधून कच्ची साखर आणू म्हणून सांगते. हे सगळं करून साखरेचे भाव विशिष्ट किमतीच्या आतच बांधून ठेवले जातात. पण याच साखरेचा वापर करून आईसक्रिम तयार केले तर त्याच्या भावावर कुठलेच बंधन नसते. याच उसाच्या मळीपासून दारू तयार केली तर तिचा भाव काय असावा यावर कुठलेच बंधन नसते. याच साखरेचा वापर करून मिठाई तयार केली जाते. त्या मिठाईच्या भावांवर कुठलेच बंधन घातले जात नाही. 

शेतकर्‍याच्या शेतात माल असतो तोपर्यंत त्यावर सगळी बंधनं लादली जातात. एकदा का हा माल थोडीफार प्रक्रिया करून एक उत्पादन म्हणून बाजारात आला की मग त्याला सगळे आकाश खुले असते. ही या उद्योगातील खरी गोची आहे. हीच शेतीची खरी समस्या आहे. कारखानेच काय पण आता शेतकरीच भंगार बनला आहे. नव्हे भंगार बनविला गेला आहे. आणि आत्महत्या करून या शेतकर्‍यानेच आपल्या तोंडावर सवाल फेकला आहे, ‘बोला आमच्या भंगार आयुष्याची काय किंमत करणार? बोला काय बोली लावता ते.’  
  
  श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. 9422878575

नोटाबंदीत शेतीला संधी


रूमणं, गुरूवार 5 जानेवारी 2017  दै. गांवकरी, औरंगाबाद

आठ नाव्हेंबरला नोटबंदी जाहिर झाली आणि ग्रामीण भागात हाहाकार उडाला. शेतकर्‍यांची अडचण झाली ही तर खरीच गोष्ट आहे. आधीचे शेतीचे हाल आणि त्यात वर हा दुष्काळात तेरावा महिना. शेतमालाची दुर्दशा सुरू झाली. मोठ्या प्रमाणात ओरड व्हायला लागली. सहकारी बँकांचा गळा शासनाने आवळला.

काही दिवसांनंतर मात्र एक विचित्रच गोष्ट समोर आली. ही ओरड करण्यात शेतकर्‍यांपेक्षा शेतमालाचा व्यापार करणारे आणि ग्रामीण भागातील नेतेच जास्त संख्येने दिसून यायला लागले. आपले दु:ख आवरून शेतकरी चकित होऊन गेला. त्याला कळेना आपल्यासाठी आपल्यापेक्षाही मोठ्याने गळा काढणारे हे कोण? आणि कशासाठी यांना इतके दु:ख झाले आहे? एका मोठ्या वृत्तपत्राच्या मालक-संपादकाच्या वडिलांचे निधन झाले. त्या प्रसंगी एका उपसंपादकाने इतक्या मोठ्याने गळा काढला की त्या मालक-संपादकालाच त्याला आवरावे लागले. तसाच हा प्रकार घडतो आहे.

काय कारण आहे याचे? शेतकरी अडचणीत आहे कारण त्याला हातावरती वापरायला सुट्टे पैसे मिळत नाहीत. त्याच्या नोटा बदलून मिळत नाहीत. त्याच्या मालाला किंमत कमी मिळते आहे.त्याची अडचण खरीच आहे.
पण शेतकर्‍यांच्या नावाने गळा काढणार्‍या व्यापार्‍यांचे नेत्यांचे खरे दु:ख या निमित्ताने समोर येते आहे. आणि हीच शेतकर्‍यांना संधी आहे. शेतमालाचा बहुतांश व्यवहार आत्तापर्यंत रोखीनेच केला जात होता. शेतकर्‍यांकडून जमा केलेले कराचे पैसेही कृषी उत्पन्न बाजार समित्या किंवा व्यापारी सरकार कडे जमा करत नव्हते. म्हणजे शेतकर्‍यांकडून धान्य खरेदी केली. त्याला सर्व कपाती करून पैसे दिले. एखाद्या कागदावर काहीतरी आकडेमोड करून दिली. पण या सगळ्यांची कार्यालयीन पातळीवर नोंद केली जात नव्हती. 
कृषी उत्पन्न बाजार समितीवर कॅगचा जो अहवाल आहे त्यात गंभीर आरोप असा गेला आहे की जवळपास 60 टक्के व्यवहार हे कागदोपत्री नोंदवलेच गेले नव्हते किंवा झालेल्या उलाढालीपेक्षा कमी रकमेचे नोंदवले गेले होते. याचा परिणाम म्हणजे सरकारला अपेक्षीत आणि योग्य तेवढा महसुल मिळालाच नाही. हे सगळे पैसे अधिकारी व्यापारी नेते यांनी मिळून खाऊन टाकले. ही रक्कम थोडी थोडी नसून हजारो कोटींचा हा घोटाळा आहे. 

जागजागो शेतमालाच्या व्यवहाराबाबत हेच घडलेले आहे. शेतकरी गरीब आहे, अशिक्षीत आहे याचा असा फायदा या वर्गाने घेतला.

यात हमाल मापाड्यांच्या संघटना आणि त्यांचे नेतेही आहेत. हमाली तोलाईचे जे पैसे कापून घेतल्या गेले. जो माल प्रत्यक्ष मोजलाच गेला नाही, प्रत्यक्ष पाठीवरून वाहून आणला नाही त्याचेही पैसे शेतकर्‍यांकडून कापून घेतले. आणि या सगळ्यांनी मिळून आपसात खाऊन टाकले. 

वेफर्स बनवणार्‍या एका मोठ्या व्यापारी कंपनीने शेतकर्‍यांकडून माल सरळ आपल्या कारखान्यात नेला. त्याची मोजणी, त्याची प्रत्यक्ष किंमत, त्याची बिलं याची कुठलीच सत्य माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीला दिली नाही. त्यांनी जो आकडा सांगितला तो बाजार समितीने मान्य केला. त्यांनी सांगितली तेवढीच उलाढाल खरी समजून त्यावर ठराविक कर आकारला. आणि या सगळ्यासाठी मोठी रक्कम अधिकारी, व्यापारी, नेते, हमाल मापाडी संघटनेचे पदाधिकारी यांना वाटून टाकली.

हा सगळा व्यवहार रोखीनं असल्यामुळे जे काही आकडे या लोकांनी कागदोपत्री दाखवले तेच खरे माननण्याशिवाय काही गत्यंतर नाही. आता इथूनच यांचे खरे दु:ख सुरू होते. नोटबंदीनंतर कॅशलेस ऑनलाईन व्यवहार करण्याचा दबाव शासकीय पातळीवरून सुरू झाला आहे. जर ऑनलाईन हे सगळे व्यवहार करायचे तर खरे आकडे दाखवावे लागतील. आणि इथेच खरी मेख आहे.

शेतकर्‍याला लुटण्याचे एक मोठे साधन म्हणजे रोख व्यवहार. जर हे व्यवहार बंद पडले/त्यांचे प्रमाण कमी झाले/त्यात पारदर्शकता आली तर बुडवाबुडवीचा उद्योग करणार कसा? शेतकर्‍याच्या नावाने मोठ्याने गळा काढण्याचे हे खरे कारण आहे.

शेतकर्‍याचा व्यवहार नोंदणीकृत नसल्याने शेतकर्‍याची प्रत्यक्ष पत बाजारात किती याचे मुल्यमापन करणेही वित्तसंस्थांना अवघड होवून बसले होते. परिणामी शेतकर्‍यांना कर्ज मिळण्यासाठी प्रचंड अडचणी येतात. 1971 मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. तेंव्हा असे सांगण्यात आले होते की हे सर्व ग्रामीण भागातील जनतेसाठी आहे. कारण खासगी बँकवाले छोट्या गावात पोचतच नाहीत. हे सत्य होते पण अर्धसत्यच होते. ग्रामीण भागात शेतमालाच्या विक्रीत नफा दिसला असता तर खासगी बँकांही पोचल्याच असत्या. खासगी सावकाराच्या डोक्यावर खापर फोडून तेंव्हा सगळे गप्प झाले. पण प्रत्यक्षात असे घडले की राष्ट्रीयकरण करूनही या बँका ग्रामीण भागात पोचल्याच नाहीत. आज एटीएमच्या नावाने गळे काढणारे हे लक्षात घेत नाहीत की ग्रामीण भागात एटीएम फारसे नाहीतच. बँका आणि एटीएमचे जाळे शहरातच वाढत गेले. मग याचा फायदा शहरी नोकरदार मध्यमवर्ग आणि शहरी व्यापारी यांनीच घेतला. ग्रामीण भागात केवळ अजागळ स्वरूपातील सहकारी बँक शिल्लक राहिली. 

साधा प्रश्‍न आहे जर ही सहकारी चळवळ शेतकर्‍यांच्या सामान्यांच्या दीन दलितांच्या दुबळ्यांच्या हिताची होती तर ती शहरात का नाही? राष्ट्रीय बँकांच्या शाखा ग्रामीण भागात आणि सहकारी बँकांच्या शाखा शहरात असे का नाही? शहरातल्या दीनदुबळ्यांचा तरी फायदा झाला असता. खरे कारण हे आहे की या सहकारी बँका म्हणजे राजकीय कार्यकर्त्यांचे कुरण म्हणून पोसल्या गेल्या. त्याचा फायदा फक्त राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या चेल्या चपाट्यांनीच करून घेतल्या. या सगळ्या बँकाही या नोटाबंदीत अडचणीत सापडल्या आहेत. त्यांतील कित्येकांचे गैरव्यवहार उघडकीस आले आहेत. इतरांचे येत आहेत. 

आता या नोटाबंदीनंतर शेतकर्‍यांना एक आयती संधी चालून येते आहे. मोबाईल आल्यावर शेतकर्‍यांच्या शहरातील तालुक्याच्या गावातील फुकटच्या खेपा वाचल्या. संबंधीत अधिकारी जागेवर आहे की नाही हे आता एक फोन करून विचारता येते. तो असला तरच जावून आपल्या कामाची तड लावून धरता येते. नसता आधी गावापासून रस्त्याच्या नाक्यावर जावून बसा. तिथून मिळेल ते वाहन गाठून तालूक्याला जा. इतकी तंगडेतोड करून परदमोड करून त्या कार्यालयात गेल्यावर कळायचे की साहेब दौर्‍यावर गेले आहेत. दोन दिवस येणार नाही. परत टल्ले खात हताश मनाने रिकाम्या खिश्याने गावाकडं परत या. 

ऑनलाईन व्यवहाराचा एक मोठा फायदा म्हणजे या सगळ्याची किमान योग्य ती नोंद होईल. शेतकर्‍याने किती माल विकला, किती उलाढाल झाली याची नेमकी आकडेवारी समोर येईल. ही आकडेवारी पाहून वित्तसंस्था त्या शेतकर्‍याची पत ओळखू शकतील आणि त्याला आवश्यक तो कर्जपुरवठा, आर्थिक मदत यासाठीचे मार्ग खुले होतील. 

आज शेतकरी अडचणीत नक्कीच आहे. काही दिवसांत चलनाचा तुटवडा संपुष्टात येईलही. पण या निमित्ताने जर बहुतांश शेतमाल व्यापार ऑनलाईन झाला तर त्याचा भविष्यात मोठा फायदा शेतकर्‍यांना होईल. 
शेतकर्‍यांच्या नावानं स्वत:ची तुंबडी भरून घेणार्‍यांच्या पोटावर पाय आल्यानं ही सगळी ओरड चालू झाली आहे. शेतमालाचा व्यापार ऑनलाईन होण्याने हे सगळे मधले ‘ऑफलाईन’ होणार आहेत ही पोटदुखी आहे.     

     
 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. 9422878575