Tuesday, August 1, 2017

वृषभ सुक्त



उरूस, सा.विवेक, 6 ऑगस्ट  2017

शिकार करून जगणारा माणूस शेती करायला लागला. मारून खाणारा आता पेरून खायला लागला आणि इथूनच मानवी संस्कृतीची सुरवात झाली असे मानण्यात येते. माणसाला पुढे नांगराचा शोध लागला आणि या नांगराला ओढण्यासाठी बैलाचा उपयोग होवू शकतो हे लक्षात आले आणि मानवी संस्कृतीला एक मोठी कलाटणीच मिळाली. कारण मोठ्या प्रमाणात धान्याचे उत्पादन नांगर-बैल-माणूस यांच्या त्रिवेणी संगमातून व्हायला लागले. अन्नासाठी वणवण फिरायची गरज राहिली नाही. खर्‍या अर्थाने इथून मानवी संस्कृती स्थिर झाली. पोटाची आग विझल्यावर कला संगीत इतर बाबी बहरत गेल्या. माणसाला विचार करायला सवड मिळाली. मेंदूची वाढ पोटाची भूक मिटवल्यामुळे सुरू झाली. याला मुख्य कारणीभूत ठरला तो वृषभ म्हणजेच बैल.

अशा बैलाच्या श्रमावरच आपली संस्कृती उभी आहे.  या बैलाच्या पोटी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षातला एक दिवस त्याच्यासाठी राखून ठेवलेला असतो. कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात आषाढ पौर्णिमेला तर मराठवाडा विदर्भात श्रावण अमावस्येला बैल पोळा साजरा केला जातो. 

पाच हजार वर्षांपूर्वीच्या ऋग्वेदात कृषी सुक्त आहे. त्यात गायींचा बैलांचा आदराने उल्लेख आढळतो. विश्वनाथ खैरे यांनी वेदांतील गाणी म्हणून जे पुस्तक प्रसिद्ध केलंय त्यात या कृषी सुक्ताचा मराठी अनुवाद दिला आहे.

कल्याण बैलांचे तसे माणसांचे
कल्याण करो या शेताचे नांगर
कल्याणाच्या गाठी वडींच्या असोत
कल्याणकारक असावा आसूड ॥

कल्याणा आमुच्या नांगरोत फाळ
नांगर्‍ये चालोत बैलांच्या संगती
कल्यण पाऊस बरसो पाण्याने
आम्हीं सुख द्यावे, शेताजी-सीतेने ॥

बैल-नांगर-माणुस हे यांत्रिकीकरणाचे पहिले प्रतिक. निसर्गाचा विनाश न करता माणसाने केलेला पहिला व्यवसाय म्हणजे शेती. गायीचे जे गोडवे ऋग्वेदात गायले जातात त्याला इतर कारणांबरोबरच शेतीसाठी बैल ती देते म्हणूनही तिचं कौतूक शेती करणार्‍या समाजाला राहिलेले आहे. 

रामायणात भूमीकन्या सीता ही शेतीचे प्रतिक मानली गेली आहे. भूमि नांगरताना जनकाला सीता सापडली असे  मानले जाते. गीतरामायणात ग.दि.माडगुळकर हे लिहीतात तसे

आकाशाशी जडले नाते धरती मातेचे
स्वयंवर झाले सीतेचे

हे गाणे केवळ राम-सीतेच्या स्वयंवराचे नाही. धरती आणि आभाळाच्या मिलनातून शेतीला सुरवात झाली. राम सीतेचे स्वयंवर हे त्या कृषी संस्कृतीचे प्रतिक आहे. 

कवि विठ्ठल वाघ यांचा ‘वृषभ सूक्त’ याच नावाचा कविता संग्रह आहे. विलक्षण अशा ‘भूदेव’ शब्दांत विठ्ठल वाघांनी बैलाचे वर्णन केले आहे. 

बैल आभाळाची कृपा बैल धरतीचा जप
काळ्या मातीची पुण्याई बैल फळलेले तप
बैल घामाची प्रतिमा बैल श्रमाचे प्रतीक
बैल माझ्या शिवारात काढी हिरवे स्वस्तिक

इतक्या सुंदर पद्धतीनं बैलाची प्रतिमा वाघांनी रंगवली आहे. 


जात्यावरच्या ओव्यांमधूनही बैलापोटी असलेली कृतज्ञता, आस्था प्रकट झाली आहे. शेतात पिकलं ते सगळं बैलांच्या श्रमामुळे याची जाणीव जात्यावरच्या ओव्यात दिसते

पिकलं पिकलं । पिकल्याचं नवल काई । नंदी राबलेत बाई ॥
पिकलं पिकलं । जन बोलत कुठं कुठं । नंदी आलेत गुडघीमेट ॥

पण एका ठिकाणी बैलाची ओवी अतिशय काव्यात्मक झाली आहे. 

काळ्या वावरात बईलाचा घाम जिरे ।
गच्च भरलंय रान कणसाचे तुरे ॥

बईलाच्या घामानं रानात पीक आलं आणि कणसाचे तुरे मोठ्या डौलात शेतात डूलताना दिसत आहेत. 


गायीचे वासरू रानभर हूंदडत असते. त्यामागे फिरणारा बाल गुराखी तोही त्याच्या खेळात हरखून गेला असतो. असे हूंडणारे वासरू जेंव्हा बैल होवू पाहते त्या सोबतच तो बाळ गुराखीही अंगापिंडानं मजबूत असा शेतकरी होवू पाहत असतो. इंद्रजीत भालेराव यांच्या ‘दूर राहिला गाव’ कविता संग्रहात वासराची बैल होण्याची प्रक्रिया फार सुरेख पद्धतीनं आली आहे. 

माझ्या वासराने हुंगुनिया माती
जुवाच्या जोत्याला भिडविली छाती
माझ्या वासराने हुंगले आभाळ
आणि धरणीही कापे चळचळ

गायीच्या पोटी आलेलं वासरू छोटा गुराखी मन लावून सांभाळतो. त्याला मोठं करतो. हे घरचे वासरू शेतात काम करण्याजोगते झाले की त्याला मनापासून आनंद होतो. त्याच्या सोबत हा मोठा झालेला शेतकरीही राबतो. दोघांच्या श्रमाला निसर्गाची विशेषत: पावसाची साथ मिळाली तर घरात लक्ष्मी येते अशी सगळ्या शेतकरी समाजाची श्रद्धा आहे. 

कवी विठ्ठल वाघ हे चित्रकारही आहेत. आपल्या कित्येक मित्रांच्या घरात बांगड्यांच्या तुकड्यांतून त्यांनी भिंतीवर चित्रं साकारली आहेत. त्यांनी काढलेल्या मोराइतकाच त्यांचा बैलही प्रसिद्ध आहे. 
हाच बैल जेंव्हा म्हातारा होतो तेंव्हा त्याचा अंत जवळ आला की शेतकर्‍याला अतिशय दु:ख होते. विठ्ठल वाघांनी शेतकर्‍याच्या मृत्यूवर ज्या ओळी लिहील्या आहेत त्या अप्रतिम आहेत. बैलावर इतकं काही लिहील्या गेलंय पण बैलाचा मृत्यू मात्र फारच थोड्या ठिकाणी उमटला आहे. 

बैल गेला तेंव्हा किती रडरडली दमणी
ओले पडद्यात डोळे किती पुसायचे कोणी
झाले वावर हळवे अन आखर व्याकूळ
कृष्णा वाचून गाईचं गेलं मौनात गोकुळ
गेला जीवाचा पोशिंदा अशी माऊलीच गत
पापण्यात उचंबळे तिच्या डोळ्यातली मोट
कुंकु पुसलं मातीचं अन् टिचले बिल्वर
जिथं हरवलं बीज गर्भी कुठले अंकुर ? 

श्रीकांत उमरीकर, जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

1 comment: