Thursday, July 27, 2017

मुलांना काय वाचायला द्यावे ?


उरूस, सा.विवेक, 23 जूलै 2017

शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. मुलांना पाठ्येतर वाचायला काय द्यावे हा प्रश्‍न काही पालक आवर्जून विचारतात.ल.म.कडू यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि कुमारांसाठीच्या वाङ्मयाची चर्चा सुरू झाली.  लहान मुलांचे साहित्य आणि त्यातही विशेषत: कुमार वयीन मुलांचे साहित्य मराठीत फारसे नाही म्हणून टीका करत असताना जे उपलब्ध आहे त्याचे काय? यावर आपण बोलतच नाही.
 
उदा. बालभारतीच्या वतीने गेली 46 वर्षे ‘किशोर’ मासिक चालू आहे. गेली दोन वर्षे औरंगाबादला आम्ही हे मासिक उपलब्ध करून देतो आहोत. एका मोठ्या लेखकाला जेंव्हा याबाबत सांगितले तेंव्हा त्यांची प्रतिक्रिया अशी होती, ‘म्हणजे अजून किशोर चालू आहे? मला वाटले बंद पडले.’ अजून एका चांगल्या लेखकाची बर्‍यापैकी वाचकाची प्रतिक्रिया तर मोठी विचित्र, ‘त्यात काय वाचण्यासारखं. आजकाल दर्जा नाही राहिला त्यांचा.’ आम्ही त्याला खोदून खोदून विचारलं की तूम्ही अशातले किती अंक वाचले आहेत? मग त्याने कबूल केले की अशात त्याने किशोर बघितलेही नाही. वाचायचा तर प्रश्‍नच नाही. 

ज्या किशोर मासिकाचा वर उल्लेख केला त्याची किंमत केवळ 7 रूपये आहे. 52 पानांचा ए 4 आकाराचा संपूर्ण रंगीत मजकूर केवळ 7 रूपयांत उपलब्ध आहे. दर महिन्यात प्रकाशित होतो आहे. मग आपण त्याला किती प्रतिसाद देतो? शासकीय पातळीवर याची जी काही वितरणाची व्यवस्था आहे त्याच्या पलीकडे एक सामान्य वाचक म्हणून आपण काय करतो? 

जर मोठ्या प्रमाणावर या मासिकाचे वाचक वाढले, त्यांच्या प्रतिक्रिया नियमित जायला लागल्या तर याचा दबाव संपादकांवर वाढेल. मग स्वाभाविकच मजकूराच्या बाबतीत एक जागरूकता निर्माण होईल. लहान वाचकांच्या प्रतिक्रिया या मासिकात नियमित अगदी फोटोसह प्रसिद्ध होतात. मग आपण आपल्या घरातील मुलांना हे मासिक वाचायला लावून त्यावरच्या प्रतिक्रिया पाठवायला प्रोत्साहित करतो का? 

‘किशोर’ मासिकच नाही तर बालभारतीच्या वतीने पाठ्येतर वाचनासाठी इतरही काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शिवाजी महाराजांवरचा अतिशय चांगला ‘स्मृतीग्रंथ’ बालभारतीने प्रकाशित केलाय. तो तर केवळ कुमार वाचकांसाठीच नाही तर सर्वांसाठीच उपयुक्त आहे. विशेषत: जेंव्हा शिवचरित्राबद्दल नको ते वाद उपस्थित केले जातात अशावेळी महाराजांबद्दल एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित करण्याचे काम बालभारती करते आणि आपण त्याची योग्य ती दखलही घेत नाही याला काय म्हणायचे? डॉ.आ.ह.साळुंखे, न्या.महादेव गोविंद रानडे, कृष्ण अर्जून केळूस्कर, सर जदूनाथ सरकार, शेजवलकर, बेंद्रे, सेतु माधवराव पगडी, डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. अ.रा.कुलकर्णी, नरहर कुरूंदकर आदी मान्यवरांचे लेख या ग्रंथात आहेत.

इतरही काही अतिशय चांगली पुस्तके बालभारतीने प्रकाशित केली आहेत. 

केवळ बालभारतीच नव्हे तर इतरही प्रकाशकांनी कुमारवयीन मुलांसाठी अतिशय चांगली पुस्तके प्रकाशित केली आहेत. मग ही जी पुस्तके उपलब्ध आहेत ती आपण मुलांपर्यंत का नाही पोचवत? 

ज्योत्स्ना प्रकाशनाने सातत्याने लहान मुलांसाठी पुस्तके प्रकाशित केली आहेत. माधुरी पुरंदरे यांनी तर एखादे व्रत घ्यावे, वसा घ्यावा तसा लहान मुलांसाठीच्या लेखनाचा प्रपंच मांडला आहे. त्यांना यापुर्वी साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित केल्या गेले आहे.

त्यांनी संपादीत केलेली  ‘वाचू आनंदे’ या नावाने चार पुस्तके अतिशय देखण्या स्वरूपात प्रकाशित झाली. या पुस्तकांमध्ये चित्रांचाही समावेश होता. त्यांना आम्ही एकदा विचारले की ‘हे इतके महत्त्वाचे काम आहे तर मग ही सगळी चित्रे त्यांच्या मूळ रूपात म्हणजे बहुरंगीत का नाही छापल्या गेली?’ त्यांनी अडचणींचा जो पाढा वाचला त्याने आम्हाला धक्काच बसला. मराठीत मुलांच्या वाचनासाठी अतिशय महत्त्वाचा असा प्रकल्प प्रकाशित होतो. आणि आपण त्यासाठी किमान निधी उभा करू शकत नाहीत? 8 वी पर्यंतच्या मुलांना अभ्यासक्रमाची पुस्तके मोफत वाटली जातात. ज्या पालकांची खरेदी करायची क्षमता आहे त्यालाही ही पुस्तके गरज नसताना फुकट मिळतात. मग अशावेळी या पालकांनीही आपले हे वाचलेले पैसे मोठ्या मनाने ‘वाचू आनंदे’ सारख्या प्रकल्पांवर खर्च करून याला हातभार का लावू नये? 

नवनित प्रकाशनाने कुमारांपेक्षा लहान गटासाठी गोष्टींची पुस्तके बहुरंगी स्वरूपात अतिशय देखणी अशी प्रकाशित केली आहेत. ही पुस्तके विक्रीसाठी प्रत्येक जिल्ह्यात पाठ्यपुस्तकांच्या विक्रीसारखी यंत्रणा उभी केली आहे. त्यासाठी वेगळे विक्री प्रतिनिधी नेमले आहेत. मग हे सगळं इतर प्रकाशकांनी का करू नये? आणि या पुस्तकांना पालकांनी का प्रतिसाद देवू नये? 

मराठीत विंदा करंदीकर, इंदिरा संत, मंगेश पाडगांवकर, शांता शेळके, बाबा भांड, अनिल अवचट अलिकडच्या काळातले उदाहरण म्हणजे कवी दासू वैद्य, कविता महाजन, रेणु पाचपोर यांसारख्या प्रौढ लिखाण करणार्‍या साहित्यिकांनी आवर्जून लहान मुलांसाठी लिहीले आहे. 

भा.रा.भागवत सारख्यांनी तर कुमारवयीन मुलांसाठी जे आणि जेवढे लिहून ठेवले ते अजूनही कुणाला जमलेले नाही. त्यांचा फास्टर फेणे आजही त्या पिढीच्या मनावर अधिराज्य गाजवतो. दिलीप प्रभावळकरांनी नेटाने ‘बोक्या सातबंडे’ ची दहा पुस्तके लिहीली. वीणा गवाणकरांचे ‘एक होता कार्व्हर’ संस्कारक्षम कुमारवयीन मुलांना आजही भावून जाते. ल.म.कडू, राजीव तांबे, राजा मंगळवेढेकर अशासारख्यांनी  नेटाने मुलांसाठी लिहीले. 

आता छपाईचे तंत्र सोपे झाले आहे. बहुरंगी छपाई उत्तम दर्जाची करता येते. इंद्रजित भालेराव यांचे ‘गावाकडं’ हे बालकवितांचे पुस्तक याचे उत्तम उदाहरण आहे. प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन यांच्या चित्राने हे पुस्तक सजले आहे. 

नॅशनल बुक ट्रस्ट जी पुस्तके आहेत ती मजकूरापेक्षाही त्यांच्या चित्रांनी फार महत्त्वाची आहेत. मुलांमध्ये चित्रांचा संस्कार घडविण्यासाठी ही पुस्तके उत्तम आहेत. ही प्रकाशन संस्था शासकीयच  आहे.

जयंत नारळीकरांसारख्या मोठ्या विज्ञान लेखकाने कुमारवयीन मुलांसाठी आवर्जून लिहीले आहे. साहित्य अकादमी या अजून एका शासकिय प्रकाशन संस्थेने नारळीकरांचे बालसाहित्य प्रकाशित केले आहे. ते पण आपण अजून नीटपणे मुलांपर्यंत पोचवू शकलेलो नाही. 

चंपक, चांदोबा, इंद्रजाल कॉमिक्स, वॉल्ट डिस्नेचे ‘विचित्र वाडी’, चाचा चौधरी ही सगळी चित्रमय मासिके कॉमिक्स कालबाह्य झाली हा एक भ्रम आपण करून घेतला आहे. आजही दर्जेदार चित्रांचे पुस्तक मुलांसमोर ठेवा मुलं गुंगून जातात की नाही ते बघा. अजूनही माधुरी पुरंदरे यांचे व्हॅन गॉगचे चरित्र तूमच्या 14 वर्षांच्या चित्रात गोडी असणार्‍या मुलाच्या हातात पडू द्या बघा तो रात्रभर जागून वाचतो की नाही, परिकथाच काय पण जी.ए.नी अनुवादीत केलेली ‘शेव्हिंग ऑफ शॅगपट’ ही कादंबरी द्या मुलीच्या हातात. बघा ती दोन दिवस त्यात पागल होते की नाही. राम पटवर्धनांनी मार्जोरी रोलिंग्जचा केलेला अनुवाद ‘पाडस’ कसा दीर्घ प्रभाव टाकतो मुलांवर ते त्यांच्या हाता देवून अनुभवा. कुमारवयीन मुलांच्या हातात प्रकाश नारायण संतांची ‘लंपन’ मालिकेतील चारही पुस्तके ठेवून बघा ती ‘मॅड’ होतात की नाही. इतकं कशाला श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या ‘डोह’ मधील मुलगा-बाप संबंधातील हळवे अनुबंध कुठल्याही कुमारवयीन मुलाला भारून टाकतात.    

कुमारवयीन मुलांसाठी नविन पुस्तके यायला हवी यात काही वादच नाही. पण आधी जी पुस्तके आहेत ती तरी सर्वत्र पोचायला हवी. आणि मुलांसाठी आग्रहाने ही पुस्तके का पोचवायची तर हीच मुलं भविष्यातले चांगले वाचक आहेत. आत्ता जे प्रौढ आहेत त्यांना वाचनाबद्दल कितीही सांगितले तरी फार परिणाम पडेल ही शक्यता नाही.       
  

श्रीकांत उमरीकर, जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

6 comments:

  1. सर्व वेबसाईट चाळून पहिली। कुठेही मासिकाच्या वर्गणीची माहिती दिली नाही। कसे करायचे?

    ReplyDelete
    Replies
    1. हीच तर अडचण आहे.. म्हणून आम्ही स्वत: हे अंक एकत्र मागवतो.. आणि शाळांमधून वितरीत करतो...

      Delete
  2. कुमारांसाठी लेखन करणारे लेखक पुढे येत नाहीत.पालकवर्गही वाचनासाठी आग्रही दिसत नाहीत.प्रस्तुत लेखात साने गुरूजींच्या 'गोड गोष्टीं'चा समावेश असायला हवा होता.म.रा.पा.नि.व अ.सं.मंडळाने 'गोष्ट स्वातंञ्यलढ्याची'हे ग.प्र.प्रधानांचे एक सुंदर पुस्तक बालमिञांसाठी प्रकाशित केले आहे याचाही उल्लेख असायला हवा होता.

    ReplyDelete
    Replies
    1. अहो बरीच पुस्तके आहेत.. जागेची मर्यादा असल्याने जास्त लिहू शकलो नाही..

      Delete
  3. आपल्या लेखनात तळमळ आहे. पण गांभीर्याने घेतले जात नाही. बालवाङ्मय मुलांपर्यंत पोहचत नाही.

    ReplyDelete
  4. कर्ज! कर्ज !! कर्ज !!!
    आपण एक प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त खाजगी कर्ज कंपनी शोधत आहात जो संपूर्ण आयुष्यासाठी कर्ज प्रदान करतो. आम्ही सर्व प्रकारचे कर्जे अतिशय वेगवान आणि सोप्या पद्धतीने, वैयक्तिक कर्ज, कार कर्ज, तारण कर्ज, विद्यार्थी कर्ज, व्यवसाय कर्ज, गुंतवणूक कर्ज, कर्ज एकत्रीकरण आणि बरेच काही देत आहोत. बँका आणि इतर वित्तीय संस्थांनी आपल्याला नाकारले आहे का? आपल्याला एकत्रीकरण कर्ज किंवा तारण गरजेची आहे का? आपल्या सर्व आर्थिक समस्यांना भूतकाळातील एक गोष्ट बनवण्यासाठी आम्ही येथे आहोत असे आणखी दिसत नाही. आम्ही 2% च्या दराने आर्थिक सहाय्य आवश्यक असलेल्या व्यक्तींसाठी आणि कंपन्यांना निधी देतो. आवश्यक सामाजिक सुरक्षा क्रमांक आवश्यक नाही क्रेडिट तपासणी आवश्यक, 100% हमी. मी तुम्हाला या माध्यमाचा उपयोग करून सांगू इच्छितो की आम्ही विश्वसनीय आणि सहायक मदत देतो आणि आम्हाला तुम्हाला कर्ज देण्यास आनंदच होईल.
    मग आम्हाला एक ईमेल पाठवा: (victoriaemmanuelloan@gmail.com) कर्जाकरता अर्ज करण्यासाठी

    ReplyDelete