Sunday, March 5, 2017

सुफीवर कट्टरपंथी इस्लामचा हल्ला


उरूस, रविवार, 5 मार्च, 2017 (सामना, उत्सव पुरवणी) 

‘‘इस्लाम मधील कट्टरपंथी म्हणजेच सलाफी हे सुफींचा घात करायला टपले आहेत. कारण त्यांना सुफी संगीत, दर्गे नकोच आहेत. दोन धर्मांना जोडणारी प्रेमाचा संदेश देणारी सुफीची भाषा नको आहे.’’ हा आरोप कुणा हिंदूत्वावादी म्हणून समजल्या जणार्‍या नेत्याने केला नाही. ब्रिटीश पत्रकार, इतिहासकार लेखक विल्यम डार्लिंपल याने ही मतं व्यक्त केली आहेत. ही मतं भारतात घडलेल्या कुठल्याही घटनेवर आधारीत नाहीत. पाकिस्तानात 16 फेब्रुवारी रोजी सिंध विभागातील सेहवान येथील लाल शहबाज कलंदर यांच्या दर्ग्यात आत्मघातकी बॉंबस्फोट घडविण्यात आला. त्यात 88 लोक तात्काळ मृत्यूमुखी पडले. जखमींची संख्या 200 पेक्षा जास्त आहे. त्यावर आपली जळजळीत प्रतिक्रिया डार्लिंपल यांनी दिली आहे. 

1656 मधील हा दर्गा सुफी संस्कृतीचे एक जिवंत असे केंद्र आहे. अतिशय सुप्रसिद्ध असे ‘दमा दम मस्त कलंदर’ हे सिंधी भजन याच दर्ग्यातील संत लाल शहबाज कलंदर यांच्यावर रचलेले आहे. 

यापूर्वीही पाकिस्तानात सुफींवर हल्ले झाले आहेत. मागच्याच वर्षी 22 जूनला ‘भर दे झोली मेरी या मोहम्मद’ कव्वाली गाणारे कराचीचे कव्वाल अमजद साबरी यांची हत्या करण्यात आली. तेंव्हाही डार्लिंपल यांनी निषेधाचा आवाज जागतिक पातळीवर उठवला होता. आणि आताही तेच पाकिस्तानातील या हल्ल्याबाबत बोलत आहेत. 

इतर कुणीही आणि विशेषत: भारतातील जे तथाकथित पुरोगामी आहेत, जे की उठता बसता हिंदू मुसलमान एकतेच्या गप्पा करतात, भारतात जे दर्गे आहेत त्यांच्या बाबत उमाळे दाखवतात. या ठिकाणी भरणारे उरूस म्हणजे कसे हिंदू मुसलमान राष्ट्रीय एकतेचे प्रतिक आहेत हे सांगतात. ते काही बोलायला तयार नाही. कट्टरपंथी इस्लामचे अनुयायी आपल्या मुसलमान भावांची क्रुरपणे हत्या करत आहेत. आणि त्याचे कारण म्हणजे ही सुफी संस्कृती. 

लाल शहबाज कलंदर यांचा जो दर्गा आहे ते शैवांचे पवित्र तीर्थक्षेत्र होते. आजही या दर्ग्याचे पुजारी हे हिंदूच आहेत. वारसाहक्काने त्यांच्याकडे या दर्ग्याची पूजा अर्चा चालत आली आहे. या दर्ग्यात शहबाज कलंदर यांच्या मजारीवर हिंदू पद्धतीप्रमाचे मातीचा दिवा (पणती) पेटवला जातो. तिथे ज्योत  सतत तेवत ठेवली जाते. 1970 पर्यंत या दर्ग्यात शिवलिंग होते. चौथ्या शतकातील संस्कृत कवी संत झुले लाल म्हणजेच शहबाज कलंदर.

या दर्ग्यात रोज संध्याकाळी ‘धमाल’ नावाने एक नृत्य सादर केले जाते. मावळत्या सुर्यप्रकाशात सुफी संत, दरवेशी, फकिर हे नृत्य करतात. नेमकी हीच संध्याकाळची वेळ बॉंब हल्ल्यासाठी निवडली गेली. आश्चर्य म्हणजे हल्ल्याच्या  दुसर्‍या दिवशी पहाटे चार वाजल्यापासून परत दर्ग्यातील नियमित पूजा अर्चा सुरू झाली. इतका रक्तपात होवूनही इथे जमलेले सर्व फकिर, भक्त, दरवेशी यांनी दुसर्‍या दिवशी संध्याकाळीही ‘धमाल’ नृत्य सादर करून हल्लेखोरांना सणसणीत चपराक लगावली. 
या नृत्याच्यावेळी जे संगीत सादर होते ते अद्भूत असून त्यामूळे मनाची शुद्धता होते, रोग बरे होतात अशीच भक्तांची समजूत आहे. 16 फेब्रुवारीचा हल्ला याच समजूतीवर घाला घालण्यासाठी करण्यात आला. पण शहबाज कलंदर यांच्या भक्तांनी तो हाणून पाडला. शंभराच्या जवळपास मृत्यू आणि त्याच्या दुप्पट जखमी होवूनही ही परंपरा थांबली नाही. 

कट्टरपंथी ‘सलाफी’ ज्यांनी हा हल्ला घडवून आणला ते समाजाला तोडण्याचे काम करत आहेत असा स्पष्ट आरोपच विल्यम डार्लिंपल यांनी केला आहे. सलाफी विचाराचे लोक सुफी पंथाला कडाडून विरोध करतात. ही परंपरा इस्लामच्या विरोधातील आहे. ही नष्ट केली पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी सुफी संदर्भातील चित्रे, संगीत, साहित्य, दर्गा असेल त्या त्या ठिकाणांवर हल्ले करण्याची निती त्यांनी अवलंबिली आहे.

इस्लाममध्ये सुफी बद्दल ही अढी का निर्माण झाली? त्याचे महत्वाचे कारण म्हणजे सुफी तत्त्वज्ञानावर असलेला उपनिषदांचा आणि बौद्ध मतांचा प्रभाव. डॉ. मुहम्मद आझम यांनी आपल्या ‘सूफी तत्त्वज्ञान : स्वरूप आणि चिंतन’ (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) ग्रंथात या विषयाबाबत सविस्तर विवेचन केले आहे. त्यांनी काढलेला निष्कर्ष असा आहे, ‘सूफींच्या परम उद्दिष्टांसंबंधी धारणेस बौद्धांच्या निर्वाण आणि उपनिषदांच्या मोक्ष या धारणेशी जोडले जाऊ शकते आणि याची शक्यता अधिक आहे की या दोहोंचा प्रभाव या दृष्टिकोणानातून सूफींवर पडलेला असावा.’

डॉ. आझम यांनी बृहदारण्योकोपनिषद (4/5/15), छांदोग्योपनिषद (6/8), मुंडकोपनिषद (3/1/1), कठोपनिषद (1/2/18) अशा कित्येक श्‍लोकांची उदाहरणे देवून सूफीवर भारतीय तत्त्वज्ञानाचा कसा प्रभाव होता हे विविध विचारवंतांच्या मतांचा आधार घेत दाखवून दिले आहे. 

सूफी तत्त्वज्ञानाचा विरोध मांडणीतून समजू शकतो. पण प्रत्यक्ष हत्या करणे, तीर्थस्थळे उद्ध्वस्त करणे ही कुठली संस्कृती? सूफी जे चार प्रमुख संप्रदाय आहेत ते सर्व आपले आदी गुरू म्हणून प्रेषित मुहम्मदसाहेब यांनाचा मानतात. हे चार प्रमुख संप्रदाय म्हणजे 1. चिश्ती 2. कादरी 3. सुहरवर्दी 4. नक्शबंदी. 

अजमेरचा जो अतिशय प्रसिद्ध दर्गा आहे तो चिश्ती संप्रदायाचा आहे. त्या परंपरेतील ख्वाजा मोईनोद्दीनी चिश्ती हे 17 वे संत. त्याच परंपरेत दिल्लीचे हजरत निजामोद्दीन औलिया येतात. खुलताबाद येथील औरंगजेबाचे गुरू ख्वाजा जैनोद्दीन चिश्ती हे पण याच परंपरेतील आहेत. आगर्‍याचे संत सलिमोद्दीन चिश्ती पण याच परंपरेतील आहेत. (औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध शाहनूर मिया दर्गा हा सुफी मधील कादरी संप्रदायाचा आहे.)

मुळात गुरू करणे ही भारतीय परंपरा. इस्लाममध्ये सुफी शिवाय कुठल्याच संप्रदायात गुरू आढळत नाहीत. एकमेव सर्वशक्तिमान अल्लाशिवाय कुणालाच मानायचे नाही असा एक अतिरेकी वेडेपणा कट्टरपंथियांमध्ये आहे. याचा कडेलोट होवून आता प्रत्यक्ष हमलेच सुरू झाले आहेत. 

बामियानाच्या बुद्धमूर्ती याच कट्टरपंथियांनी रॉकेट लावून पाडल्या होत्या. जगभरचे विचारवंत हा कट्टरपंथीयांचा कठोर शब्दांत निषेध करत आहेत. आणि आपल्याकडचे तथाकथित पुरोगामी मात्र बोटचेपी भूमिका घेत चुपचाप बसून आहेत.
  
    श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, 9422878575

No comments:

Post a Comment