Saturday, October 29, 2016

फुले विरूद्ध शाहू विरूद्ध आंबेडकर


उरूस, सांजवार्ता, 29 ऑक्टोबर 2016 

पुरोगामी महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणण्याची पद्धत आहे. हे म्हणत असताना यातून लोकहितवादी, आगरकर यांच्यासारखे पुरोगामी ब्राह्मण मात्र जाणीवपूर्वक वगळले गेले. कारण सरळ होते. ही सर्व प्रतिक्रिया वर्षानुवर्षे चालत आलेल्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विरोधातली होती. त्यामुळे ब्राह्मणांच्या विरोधात आम्ही नसून ब्राह्मण्याच्या विरोधात आहोत असे कोणी कितीही सांगितले तरी त्यात व्यक्ती म्हणून ब्राह्मणांचा विरोध व्यक्त होत होताच. 

गांधीहत्येनंतर मोठ्या प्रमाणात ब्राह्मणांनी शहरात स्थलांतर करायला सुरवात केली. कारण ब्राह्मणांच्या विरोधात वातावरण तापले होते. 1960 नंतरच्या काळात वाढत्या औद्योगिकीकरणाने या स्थलांतराला आणखी गती बहाल केली. आणि 1990 च्या जागतिकीकरणा नंतर तर स्थलांतराची प्रक्रिया जवळपास पूर्णच झाली. महाराष्ट्रातील 26 महानगर पालिकांमध्ये सगळे ब्राह्मण स्थलांतरीत झाले आहेत. शिल्लक बरेचसे 226 नगर पालिका असलेल्या गावांमध्ये आढळून येतात. उर्वरीत ग्रामीण महाराष्ट्रात, खेड्यापाड्यात आता ‘पूजे’लाही ब्राह्मण नाही. 1990 नंतर खेड्यात जन्मलेल्या पिढीने त्यांच्या सोबत नांदणारे ब्राह्मणाचे घर गावात बघितलेच नाही. 

पण या पिढीच्या कानावर मात्र  तीच जूनी ब्राह्मण विरोधी भाषा पडत राहिली. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे असे सगळेच विचारवंत सांगत राहिले. 1990 लाच अजून एक घटना घडली. मंडल आयोग लागू झाला. ग्रामीण सत्तेतील एक मोठा वाटा इतर मागास वर्गीय (ओ.बी.सी.) यांच्याकडे गेला. या तरूण पिढीने गावातील सत्तेत मराठा-दलित-ओबीसी हे तीन वर्ग पाहिले. 

शेतीचे अर्थकारण तोट्यात असल्याने हळू हळू मराठ्यांचा कुणब्यांचा माळ्यांचा जे मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत त्यांचा भ्रम निरास होत गेला. शेतकरी आत्महत्या करायला लागला. ओबीसींच्या हातात कारागिरी होती. सेवा व्यवसाय ते हजारो वर्षांपासून चालवत होते. त्यांच्या कारागिरीला गावात फारशी प्रतिष्ठा कधीच नव्हती. शहरात आलं तर बर्‍यापैकी मेहनताना मिळतो. शिवाय जातीवरून कोणी हटकत नाही. प्रतिष्ठेला बाधा आणत नाही. त्यांचाही कल गावगाड्यातून दूर जाण्याकडे झाला. दलित म्हणजे उद्योगी जमात. चामड्याच्या वस्तू तयार करणे, फडे तयार करणे, टोपल्या विणणे शिवाय पूर्वाश्रमीचे महार आणि मांग ही तर कलाकार जमात. आधुनिक काळात कलेला महत्त्व आले. सांस्कृतिक ‘इव्हेंट’ मोठ्या प्रमाणात शहरात साजरे व्हायला लागले. त्यांच्या भोवती मोठे अर्थकारण फिरत राहिले. पण गावात मात्र जूनेच वातावरण राहिले. शहरात राहून साधं बँड पथक चालवले तर बर्‍यापैकी पैसा मिळतो हे दलितांच्या लक्षात आले.

1990 नंतर गावातील मराठा- कुणबी, ओबीसी, दलित हे तीन वर्ग सत्तेत ऐकमेकांच्या विरोधात बळकट होत गेले. इतर कुठला व्यवसाय गावात फुलत फळत नाही. ज्या शेतीवर सर्वकाही चालू आहे ती तर गोत्यात आलेली. मग साचलेल्या पाण्यासारखी खेड्यांची अवस्था होत गेली. याचा परिणाम असा झाला पैसे मिळवून देणारी एकमेव गोष्ट म्हणजे ग्रामपंचायत, छोटी मोठी सरकारी नौकरी, शाळेतील शिक्षकाची नौकरी, शासनाच्या विविध योजना इतकेच गावात उरले. 

कुणालाच धड खायला नाही अशा अवस्थेत एखाद्याच्या हातात नितकोर भाकर असली तर सार्‍यांचे डोळे तिकडेच लागतात. जीने त्याचीही भूक भागणार नाही हे माहित असतांनाही त्यासाठी भांडण मारामार्‍या सुरू होतात. तसे सध्या नितकोर नौकरीच्या तुकड्यासाठीच्या आरक्षणाचे झाले आहे.

9 ऑगस्ट 2016 पर्यंत हा महाराष्ट्र वरवर पहाता फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणवून घेत होता. पण 9 ऑगस्टच्या मराठा ‘क्रांती’ मोर्चा नंतर हे चित्र बदलले. आधी कोपर्डीचे निमित्त पुढे करून मोर्चा निघाला होता. मग ऍट्रासिटीचा विषया पुढे आला. मग आरक्षणाचा विषय पुढे आला. मराठा मोर्चांना उत्तर म्हणून आता बहुजनांचेही मोर्चे सुरू झालेत. 

म्हणजे कालपर्यंत बहुजन म्हणत असताना ब्राह्मण सोडून इतर सर्व असा सोयीस्कर अर्थ लावला जात होता. आता मात्र मराठा सोडून इतर सर्व म्हणजे बहुजन असा अर्थ समोर आला. पहिल्यांदाच मराठा विरूद्ध दलित आणि इतर मागास वर्ग असे चित्र समोर आले.

म्हणजेच आता शाहू महाराजांचे अनुयायी, फुल्यांचे अनुयायी आणि आंबडेकरांचे अनुयायी हे विरूद्ध बाजूला दिसायला लागले.  ऍट्रासिटीचे गुन्हे दाखल होत आहेत  त्यातील बहुतांश गावांमधून होत आहेत. सत्तेच्या पदांसाठी जी भांडणं होत आहेत तीही खेड्यात, छोट्या शहरात आढळून येत आहेत. कारण मोठ्या शहरात राजकारणा शिवाय करायला खुप काही असल्याने लोक याकडे जास्त लक्ष देत नाहीत. राजकीय हस्तक्षेप अतिशय मर्यादित झालेला असतो.

सहकारी बँका, सोसायट्या, पतपेढ्या, कारखाने ही सगळी अजागळ व्यवस्था खेड्यात आढळते. शहरात कुठेही ‘गंगामाई सहकारी मोटार सायकल कारखाना’ आढळत नाही. सहकारी बँकेची गळाठा व्यवस्था शहरात दिसत नाही. फुले शाहू आंबेडकरांचे गोडवे गायचे. सहकाराचे गोडवे गायचे. काळ्या आईचं कौतुक करत शेतीची भलावण करायची हे सगळं खेड्यात आढळून येतं. शहरात मात्र हे काहीच दिसत नाही. साखर कारखान्यांनी कधीपासून उसाचे गाळप सुरू करावे याचा निर्णय साखर आयुक्त घेतात. पण याच साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर करून औषधं बनतात. ती जिवनावश्यक आहेत. त्यांची निर्मिती कशी व्हावी? त्यांच्या किंमती कशा असाव्यात? त्यांची विक्री कशी केली जावी? यासाठी कुठलाही ‘औषध आयुक्त’ शासनाने नेमलेला नसतो. 

डाळींचे भाव वाढले की शासनाचा पारा चढतो. लगेच परदेशातून डाळ आयात करण्याचा निर्णय होतो. पण याच डाळींला पर्याय म्हणून अंडी किंवा मांस खाल्ल्या जाते त्याचे कुठलेच नियंत्रण शासकीय पातळीवर केल्या जात नाही. परिणामी गेल्या कित्येक वर्षांत या वस्तूंचे भाव स्थिर असलेले आणि बाजारातील इतर वस्तूंप्रमाणे त्यांच्या किंमतीत थोडाफार चढ उतार आढळून येतो.

म्हणजे ज्या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेवून सरकारी कार्यक्रम राबविले जातात, सरकारी नौकर्‍यांत राखीव जागा ठेवल्या जातात, सरकारी योजनांची अंमलबजावणी केली जाते तिथे आता शाहू विरूद्ध फुले विरूद्ध आंबेडकर अशी  भांडणं अनुयायांनी सुरू केली आहेत. याच्या उलट शहरी भागात जातीवर आधारीत विचार करायला कुणाला फारसा वेळच नाही. ही व्यवस्था कुणी कितीही टिका करो ती जातीवर आधारीत उरलेली नाही हे सत्य आहे. ती बाजारपेठवादी अर्थकेंद्री होवून गेली आहे. याचा परिणाम असा दिसतो की आपल्या खिशाच्या (जातीच्या नव्हे)  जोरावर हा ग्राहक बाजारपेठेवर दबाव टाकत असतो. 

म्हणजे ज्या भांडवलशाही व्यवस्थेवर टिका करत फुले-शाहू-आंबेडकर अशी पुरोगामी मांडणी विचारवंत करत होते त्यांचा पराभव ग्रामीण भागाने जुन्या सरंजामी व्यवस्थेने केलेला दिसतो आहे. आणि उलट ज्याच्यावर टीका केली त्या शहरी भांडवलशाही बाजारवादी व्यवस्थेने मात्र या भांडणाला थारा दिलेला दिसत नाही. काय म्हणावे या विरोधाभासाला? जगातल्या कामगारांनो एक व्हा म्हणणारे डावे विचारवंत जगातले ग्राहक एक होवून बाजारपेठेवर दबाव टाकू लागले की बावचळून गेले आहे.    
             
                  श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Thursday, October 27, 2016

उसापासून सरळ अल्कोहलच काढू द्या साखर कशाला!



रूमणं, गुरुवार वार 27 ऑक्टोबर 2016  दै. गांवकरी, औरंगाबाद

प्रत्येकवेळी दिवाळी आली की ऊस हा विषय चर्चेत येतो. दिवाळीत गोड पदार्थ खाल्ले जातात म्हणून नव्हे तर हा काळ नेमका उसाच्या आंदोलनाचा काळ आहे. सगळ्यात पहिला आणि अतिशय वेगळा मुद्दा या क्षेत्रात काम करणारे लोक आता मांडत आहे की मुळात ऊस हे खाद्य पीक नसून ते ऊर्जा पीक आहे. मग त्याचा विचार केवळ खायची साखर तयार करण्यासाठी का केला जातो? उसापासून साखर काढल्यावर शिल्लक मळीपासून अल्कोहोल काढले तर त्याचा मोठा फायदा मिळतो. मग उसापासून सरळ अल्कोहलच काढायची परवानगी मिळाली तर उसाच्या भावासाठी आंदोलन करण्याची गरजच पडणार नाही. आजच्या भाषेत विचार केला तर उसाला 6 हजारापेक्षा जास्त भाव मिळेल. पण हे असं होत नाही. कारण हा उद्योग शासनाच्या नियंत्रणात अडकलेला आहे.

शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना वगळता इतर संघटना या प्रश्नावर जूनीच भूमिका घेत आहेत. ‘स्वाभिमानी’ शेतकरी नेते मा. खा.राजु शेट्टी. यांनी शासनाकडे मागणी केली होती महाराष्ट्रात उसाचे गाळप लवकर करण्यात यावे. कारण उशीर झाला तर महाराष्ट्रातला ऊस शेजारच्या कर्नाटकात जाईल. परिणामी आपल्या कारखान्यांना ऊस मिळणार नाही. साखरेचे उत्पादन उशीरा होईल.

किती गंमत आहे. राजू शेट्टी जेंव्हा शेतकर्‍यांचे नेते होते तेंव्हा ते ‘अमूक अमूक भाव मिळाल्या शिवाय कारखाना सुरू होऊ देणार नाही. उसाचे कांडकंही कारखान्यात जावू देणार नाही. ऊस नाही काठी आहे कारखानदारांच्या पाठी आहे’ अशी मांडणी करायचे. त्यांचे अनुयायी रस्त्यावर उतरून ट्रॅक्टर आडवे लावून रास्ता रोको करायचे. एस.टी.बसचे टायर जाळले जायचे. हे सगळे करत असताना कारखान्यांचा गळीत हंगाम लांबत होता. कारखान्यांचे नुकसान होत होते. पण तेंव्हा त्याची कुठलीही काळजी राजू शेट्टी यांना नव्हती.

आता मात्र ते केंद्रात भाजप खासदारांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांचे सहकारी मा. सदाभाऊ खोत राज्यात कृषी खात्याचे राज्यमंत्री आहेत. मग स्वाभाविकच यांची भाषा आता बदलली आहे. ती शेतकर्‍याचे सोडून कारखानदारांचे किंवा शासनाचे हित पाहू लागली आहे.

महाराष्ट्र शासनाने आधी 1 डिसेंबर तारीख जाहिर केली होती. आता ही तारीख बदलून दिवाळी नंतर म्हणजे 5 नोव्हेंबर अशी कबूल केली आहे. आता राजू शेट्टी यांची पंचाईत अशी झाली की जो पर्यंत ते शेतकर्‍यांसाठी काही करत नाहीत तो पर्यंत शेतकरी तरी त्यांच्या पाठीशी कसे उभे राहणार.

आता शेतकर्‍यांचे हित डोळ्यापुढे आहे असा आव आणून त्यांनी घोषणा केली आहे की एफ.आर.पी. (फेअर अँड रिझनेबल प्राईस) पेक्षा जास्त रक्कम आम्हाला मिळाली पाहिजे. नसता कारखाने चालू देणार नाही.

खरं तर आता शिल्लकच काय राहिलं आहे? मुळात महाराष्ट्रात ऊस कमी आहे. जो उसाचा मुख्य पट्टा म्हणून ओळखला जातो त्या कोल्हापुर विभागात 165 लाख मे.टन ऊस सध्या उपलब्ध आहे. (मागील वर्षी हाच आकडा 227 होता) आणि पुणे विभागात केवळ 159 लाख मे.टन ऊस आहे. (मागील वर्षी हाच आकडा 295 होता) म्हणजे या दोन मुख्य विभागातच 198 लाख मे.टनाची कमतरता आहे. बाकी उर्वरीत महाराष्ट्रात मिळून आकडा याच्याही अर्धा म्हणजे 100 लाख मे.टनाचा आहे.

जर हा गाळप हंगाम पूर्वी ठरल्याप्रमाणे 1 डिसेंबरलाच सुरू झाला असता तर त्याचा जास्त फायदा झाला असता. कारण तसाही ऊस जवळपास अर्धाच उपलब्ध आहे. यावेळेस पाऊस चांगला पडला आणि लांबलाही. जोपर्यंत पाऊस थांबून थंडी पडत नाही तो पर्यंत उसात गोडी म्हणजेच साखरेचे प्रमाण वाढत नाही. ही प्रक्रिया या वेळेस लांबली. उसाचे गाळप डिसेंबर मध्ये गेले असते तर जवळपास 1 टक्का इतका साखरेचा उतरा वाढला असता. हा हिशोब करून शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे संजय कोल्हे आणि अजीत नरदे यांनी असे मांडले की जवळपास 250 कोटी जास्तीचे रूपये उशीराच्या गाळप हंगामामुळे शेतकर्‍यांना-साखर उद्योगाला मिळाले असते.

दुसरी गोष्ट म्हणजे कमी उसामुळे तसाही गळीत हंगाम जास्त लांबू शकत नाही. मग आत्ताच घाई कशासाठी?
जर महाराष्ट्रातला ऊस कर्नाटकात जाणार होता तर त्यासाठी दोन गोष्टी करता आल्या असत्या. एक तर कर्नाटक सरकारला सांगून त्यांचाही गाळीत हंगाम लांबवता आला असता. आणि सुरवातीचे पंधरा दिवस उसाला राज्य बंदी लावता आली असती. पण असे काहीच न करता घाई गडबडीने हंगाम चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

किती काळ अशी आंदोलने करीत बसायचे? किती काळ शासनापुढे पदर पसरून हमी भावाची, रास्त भावाची, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची भीक मागायची?

शरद जोशी यांनी 1996 मध्ये महाराष्ट्रात युतीचे सरकार असताना उसाची झोनबंदी उठावी म्हणून औरंगाबादला उपोषण केले होते. त्यात त्यांनी एक मागणी अतिशय स्पष्टपणे केली होती. ती अशी होती की संपूर्ण साखर उद्योग हा नियंत्रणमुक्त झाला पाहिजे. 20 वर्षांपूर्वी केलेली ही मागणी किती द्रष्टेपणाची होती हे आजही पटते.
उसाची तोडणी कधी झाली पाहिजे, उसाचे गाळप कधी झाले पाहिजे, उसापासून साखर काढायची की इथेनॉल काढायचे की ऊर्जा तयार करायची याचा निर्णय घेणारे सरकार कोण?

साखर ही काही जीवनावश्यक गोष्ट नाही. कुठलाही डॉक्टर, शास्त्रज्ञ असे मानत नाही की साखर खाल्ली नाही तर माणूस टाचा घासून मरतो. घरगुती साखरेचे खरेदी प्रमाण एकुण साखरेच्या केवळ 38 टक्के इतके आहे. बाकी सर्व साखर ही उद्योगांसाठी (औषधे, शीतपेयं, आईसक्रिम, मिठाया) वापरली जाते. या उत्पादनांवर शासनाचे कुठलेही नियंत्रण नाही. साखर स्वस्त पाहिजे म्हणणारा शहरी ग्राहकवर्ग कधी आईसक्रिम स्वस्त पाहिजे म्हणून आंदोलन करीत नाही. पेप्सी-कोकाकोला-माझा-स्प्राईट स्वस्त झालेच पाहिजे म्हणून कुणीही रेल्वे रोको केला नाही. औषधं तशा अर्थानं जीवनावश्यक आहेत. पण ही औषधं स्वस्त झाली पाहिजेत म्हणून एस.टी.बसचे टायर जाळले असं आपल्याकडे घडले नाही.

साखर उद्योग नियंत्रण मुक्त केला तर आज जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत ते असे रस्त्यावर उतरताना दिसणार नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साखर संचालनालय नावाची जी अगडबंब शासकीय यंत्रणा आहे जी केवळ गलेलठ्ठ पगार खाण्यासाठीच उभारली आहे ती संपून जाईल. शासनाचे पैसे यातून वाचतील. साामन्य ग्राहकाचे भले होईल आणि शेतकर्‍याचेपण कल्याण होईल.

उसाचे गाळप केल्यावर त्यापासून साखरच निघते असा एक सार्वत्रिक समज आहे. यापेक्षा त्यातून जास्त काय निघते त्याची फारशी कल्पना सामान्य माणसांना नाही. कर्नाटकातील काही साखर कारखाने साखरेच्या भावाइतकी रक्कम उसासाठी शेतकर्‍याला देतात. आणि साखरेसोबत निघणार्‍या उपपदार्थांच्या नफ्यावर कारखाना चालवतात (मळी बगॅस प्रेसमड इत्यादी). यातील मळीपासून अल्कोहोल, स्पिरीट, गॅस इत्यादी तयार होतात. बगॅस पासून कागद तयार होतो. प्रेसमड पासून खत तयार होते.

साखर उद्योग नियंत्रण मुक्त केला तर कारखानदार (जे कळकट सहकारी नसून कार्यक्षम असतील) अशी मागणी करतील तूम्ही ऊस आणून द्या. आम्ही गाळप करतो. त्याची जेवढी साखर निघेल तेवढी तयार करून देतो. तूम्ही तूमची विका. बाकी उपपदार्थ आम्हाला द्या. आम्ही त्याच्यापासून फायदा कमावू.

मग यात गोची अशी आहे की यात नेत्यांना राजकारणाला आंदोलनाला रस्ता रोकोला एस.टी.बस जाळण्याला काही जागाच शिल्लक राहणार नाही. मग असे झाले तर या पुरोगामी फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे कसे होणार?
   
  श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. 9422878575
 
 

Wednesday, October 19, 2016

मराठी साहित्य व्यवहार- समस्या व उपाय


संवाद दिवाळी २०१६ 

साहित्य व्यवहार असा शब्द आपण वापरतो तेंव्हा त्यात साहित्य संस्था, सार्वजनिक ग्रंथालये, प्रकाशन संस्था, लेखक आणि ग्रंथविक्रेते यांचा संबंध येतो. दुसर्‍या बाजूला असतो ज्याच्यासाठी हे सगळं चालू आहे तो वाचक. साहित्याची प्रक्रिया समजून घ्यायची असेल तर तिचा प्रवास लक्षात घ्यायला हवा. सगळ्यात पहिल्यांदा लेखकाच्या मनात वाङ्मयाची निर्मिती होते. ती तो कागदावर उतरवतो आणि तिचा लौकिक प्रवास सुरू होतो. प्रकाशक, मुद्रक, विक्रेता, ग्रंथालये असा प्रवास करीत ही साहित्यकृती सर्वसामान्य वाचकापर्यंत पोचते. पुस्तक वाचून ते वाचकाच्या मनात शिरते. इथे हा प्रवास पूर्ण होतो. म्हणजे ‘साहित्य व्यवहार’ लेखकाच्या मनातून सुरू होतो. तो वाचकाच्या मनापर्यंत जाऊन पूर्ण होतो. यातील मधला प्रवास हा ग्रंथ व्यवहाराचा आहे.  यातील ‘व्यवहाराचा’ विचार केल्यास लेखक आणि वाचक या दोन्ही महत्त्वाच्या घटकांपासून हा ‘व्यवहार’ फार दूर निघून गेला आह. (इथून पुढे लेखात साहित्य आणि ग्रंथ व्यवहार यांना एकत्रित रित्या साहित्य व्यवहार असेच संबोधले आहे)

असं का झालं? याचे कारणही स्पष्ट आहे. जर लेखक आणि वाचक हे दोन महत्त्वाचे घटक या सगळ्याच्या केंद्रभागी राहिले असते तर साहित्य व्यवहार हा निश्‍चितच बदललेला दिसून आला असता. आज हे दोन्ही महत्त्वाचे घटक ‘साहित्य व्यवहाराच्या’ केंद्रभागी नाहीत. त्यातही परत ‘व्यवहाराच्या’ तर मूळीच केंद्रभागी नाहीत. 

फार जूना इतिहास न पाहता आपण महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनचा इतिहास बघूत. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्याबरोबर यशवंतराव चव्हाण यांनी नेहरूप्रणित समाजवादी मॉडेल डोळ्यासमोर ठेवत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, राज्य ग्रंथालय संचालनालय आदि संस्थांची स्थापना केली. शासकीय पातळीवर पुस्तकांना पुरस्कार देण्यास सुरवात झाली. पाठ्यपुस्तक मंडळाची स्थापना झाली. वाङ्मय व्यवहारात शासनाचा हस्तक्षेप यशवंतरावांच्या काळात सुरू झाला. तो वाढता वाढता आज इतका होऊन बसला आहे की त्या शिवाय ‘साहित्य व्यवहाराचे’ पानही हालत नाही. म्हणजे ‘साहित्य व्यवहार’ म्हणून जे काही आपण संबोधतो त्यात शासनाचा हस्तक्षेप प्रमाणाच्या बाहेर वाढला हे पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवं. शासन पुस्तकांना पुरस्कार देणार, शासन साहित्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ यांच्या माध्यमातून पुस्तके प्रकाशित करणार, आणि या सगळ्या पुस्तकांची खरेदी परत शासनच सार्वजनिक ग्रंथालयांच्या रूपाने करणार.

राज्य शासनच नाही तर केंद्र शासनही नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी या संस्थांच्या माध्यमांतून पुस्तकांची निर्मिती करणार. म्हणजे एक प्रकाशक म्हणून स्वत: शासनच मोठी भूमिका निभावत आहे. जर शासन पुस्तकं काढणार असेल तर त्याचे हळू हळू काय हाल होत जातील हे सांगायला फार मोठ्या अभ्यासकाची अथवा भविष्यवेत्त्याची गरज आहे असं नाही. परिणामी या सगळ्या संस्थांचा प्रकाशन क्षेत्रावर गंभीर परिणाम होत गेला. शासन पैसे ओतत आहे म्हटल्यावर त्यात सर्वसामान्य वाचकांचा काही संबंध नाही हे सरळच आहे. एखाद्या अधिकार्‍याला/शासनावर प्रभाव टाकणार्‍या व्यक्तीला/ मंडळावरील पदाधिकार्‍यांना वाटले की महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय प्रकाशित व्हायला पाहिजे. तर ते प्रकाशित होणार. त्याची किंमत काय ठेवायची तर फक्त 10 रूपये किंवा 50 रूपये कारण काय तर सर्वसामान्य लोकांपर्यंत ते पोचले पाहिजे. त्यासाठी बाकी कितीही खर्च येवो. मग महात्मा फुलेंच्या संदर्भात पुस्तके प्रकाशित करणार्‍या इतर सर्व प्रकाशकांचे कंबरडे मोडलेच म्हणून समजा. आणि एवढं करूनही हे पुस्तक सर्वसामान्य वाचकांना सतत उपलब्ध असेल याची खात्री नाही. कारण परत हेच की सामान्य वाचकांचा यात काही संबंधच नाही. राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज यांची ग्रामगीता केवळ 10 रूपयाला शासन देणार. आणि प्रत्यक्ष घ्यायला गेले तर त्याची प्रतच शासकीय ग्रंथ भांडारात उपलब्ध नसणार.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र वाङ्मय शासन प्रकाशित करणार. मग आंबेडकरांच्या पुस्तकाचे इतर प्रकाशक डोक्याला हात लावून बसलेच म्हणून समजा. भाजप-सेना सरकार सत्तेवर आले तेंव्हा त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे समग्र वाङ्मय प्रकाशित केले. ते आता उपलब्ध नाही. का तर आता आघाडी सरकार आहे. म्हणजे हे सगळं विशिष्ट राजकीय सोयीने चालू आहे. याचा सर्वसामान्य वाचकांशी काही संबंध नाही. जानेवारी 2017 पासून आंबेडकरांच्या साहित्याचे हक्क खुले होत आहेत. मग अर्थातच शासनाचा यात एकाधिकार राहणार नाही. ज्या पद्धतीने संत वाङ_मयात विविध अधिकारी व्यक्तींनी आपल्या आपल्या अभ्यासाप्रमाणे विविध टीका लिहील्या आहेत. आणि त्या संबंधित वाचक वर्गात लोकप्रियही आहेत. त्यावर कुणाची मक्तेदारी नाही. अगदी शासनाचीही नाही. त्यामुळे वाचकांना उत्कृष्ठ पुस्तक चांगल्या बांधणीसह, किमान किमतीत उपलब्ध होते. हीच बाब स्पर्धा परिक्षकांच्या पुस्तकांची आहे. शासकीय ग्रंथालयांच्या खरेदीसाठी ही पुस्तके छापल्याच जात नाहीत. ती छापली जातात सामान्य वाचकांसाठी. परिणामी त्यांच्या किंमती अतिशय स्पर्धात्मक ठेवाव्या लागतात. वाचक झेरॉक्स करून घेवू नयेत ही भीती असते. यावर मिळणारे कमिशन अतिशय नगण्य असते किंवा मिळतच नाही. विक्रेत्यांनाही या पुस्तकांची खरेदी रोखीने करावी लागते.   

पाठ्यपुस्तकांची एक मोठी बाजारपेठ प्रकाशकांना 1960 पूर्वी उपलब्ध होती. त्याच्या आधारे इतरही पुस्तके प्रकाशित करणे प्रकाशकांना शक्य व्हायचे. शासनाने पुस्तके प्रकाशित करण्याची जबाबदारी स्वत:वर घेतली. परिणामी फार मोठ्या प्रमाणावर प्रकाशकांना व्यवसायाला मुकावं लागले. पाठ्यपुस्तकांची विक्री हाही एक बर्‍यापैकी व्यवसाय विक्रेत्यांच्या हाती होता. पण शासनाने ही पुस्तके फुकट वाटायला सुरवात केली आणि विक्रीची ही यंत्रणाही कोलमडून पडली.

पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतरही पुस्तके बालभारती प्रकाशीत करतं. त्याची तर माहितीही सामान्य वाचकांना होत नाही. साहित्य संस्कृती मंडळाची कित्येक पुस्तके आवृत्त्या संपल्यामुळे बाजारात उपलब्ध नाहीत. ती का नाहीत याची कारणं शासन देत नाही. बरं या पुस्तकांच्या आवृत्त्या संपल्या म्हणजेच त्याचे पैसे शासनाला मिळाले. यात कुठलाच तोटाही शासनाला झाला नाही. मग ही पुस्तके का नाही परत प्रकाशीत झाली? लोकांना स्वस्त चांगले दर्जेदार साहित्य मिळावं असं म्हणत प्रत्यक्षात ते उपलब्धच करून द्यायचं नाही याला काय म्हणावे? साहित्य संस्कृती मंडळ किंवा इतर संबंधीत संस्थांना मिळणारा निधी केवळ बैठका, भत्ते, प्रवास आणि मानधनावरच खर्च होणार असेल तर त्याचा सामान्य वाचकांना काय उपयोग?

शासन स्वत: पुस्तके प्रकाशित करते इतकेच नाही तर इतर प्रकाशकांच्या पुस्तकांच्या खरेदीची दोरीही परत शासनाच्याच हाती आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या आता 12,000 इतकी आहे. या ग्रंथालयांवर जवळपास 100 कोटी रूपये दरवर्षी शासन खर्च करते. ही रक्कम वाटप करण्यासाठी त्याच्याहीपेक्षा जास्त वार्षिक 125 कोटी रूपये याखात्याच्या कर्मचार्‍यांच्या पगारावर खर्च होतात. ही खरेदी काय आणि कशी असावी यावर काही बोलायची सोयच नाही. शासनाने केलेल्या पट-पडताळणीतच हे पितळ उघडे पडले आहे. या विषयावर स्वतंत्र पुस्तकच लिहावे लागेल.

इतर महाविद्यालये आणि शाळा यांच्या ग्रंथालयातील खरेदीच्या माध्यमातूनही जवळपास याच्याही दुप्पट पैसे शासन ग्रंथव्यवहारात ओतत आहे. म्हणजे 300 कोटी रूपये स्वत: शासनच मराठी ग्रंथव्यवहाराच्या खरेदीत ओतत आहे. यात सर्वसामान्य वाचकांचा संबंध येतोच कुठे?

2013 पासून शासकीय पुरस्कारांची रक्कम वाढवून देण्यात आली आहे. पूर्वी जे पुरस्कार 20,000 चे होते ते आता एकदम एक लाखाचे झाले आहे. म्हणजे एकीकडून शासन पुस्तके स्वत: काढत आहे. दुसरीकडून इतर प्रकाशकांच्या पुस्तकांची खरेदीही सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान देऊन करत आहे. आणि आता तिसरीकडून लेखकांना मोठ मोठ्या रकमेचे आमिषही लावत आहे. साधारणत: मराठी पुस्तकाची पृष्ठसंख्या 200 इतकी असते. त्याची किंमत कुठलाची चांगला प्रकाशक 200 रू. इतकी ठेवतो. यासाठी व्यवहारिक कमिशन 40 % इतके मिळते. म्हणजे 1000 प्रतींची आवृत्ती (त्यापेक्षा ती जास्त नसतेच) 1,20,000/- रूपयांत खरेदी करता येते. म्हणजे एक लाखाच्या पुरस्कारात पुस्तकाची आख्खी आवृत्ती खरेदी करता येते. म्हणजे यात परत व्यवहारिक भाषेत बोलायचे झाले तर वाचकाने एक रूपयाचेही पुस्तक खरेदी केले नाही तरी लेखक, प्रकाशक, विक्रेते यांचे काही अडत नाही. स्थानिक पातळीवर देण्यात येणारे इतर पुरस्कार परत वेगळेच. 

दुसरा एक मोठा घटक ‘साहित्य व्यवहारा’वर परिणाम करतो  तो म्हणजे जागजागीचे राजकीय नेते. महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात तालूक्यात गावात जा. त्या ठिकाणी जर एखादा साहित्य उत्सव, मेळावा, साहित्य संमेलन, वाङ्मयीन पुरस्कार असं जर काही असेल तर त्याच्या मागे स्थानिक राजकीय नेताच असतो. आणि या नेत्याचा हा जो पैसा साहित्य व्यवहारात येतो तो कुठला असतो? तर परत एकदा शासनाशी संबंधीत गुत्तेदार, दलाल, शासकीय अनुदानीत संस्थांमधील कर्मचारी, सहकारी साखर कारखान्याचे लाभार्थी, स्थानिक सहकारी बँका इत्यादी इत्यादी. 

म्हणजे एक साधे सत्य आपल्या हाती येते. शासनाने प्रत्यक्ष ओतलेला पैसा आणि राजकीय नेत्यांच्या माध्यमातून खर्च झालेला निधी अश्या दुहेरी कात्रीत सर्व ‘साहित्य व्यवहार’ अडकलेला आहे. किंबहुना याचा जवळपास 90 टक्के इतका वाटा साहित्य व्यवहारात आहे. असं असताना सर्वसामान्य वाचकांशी जर या साहित्य व्यवहाराचे नाते शिल्लक राहिले असेल तरच नवल.

आज मराठीत अतिशय चांगल्या लेखकाच्या, चांगल्या खपलेल्या पुस्तकाची आवृत्ती जरी आपण तपासली तरी आपल्या एकूण ‘साहित्य व्यवहाराचे’ दारिद्य्र आपल्या लक्षात येईल.

महाराष्ट्रात ‘अ’ वर्ग ग्रंथालये म्हणता येतील अशांची संख्या 230 आहे. यांच्यातील किमान 100 वाचकांचे एक सर्व्हेक्षण केले आणि काही एक निष्कर्ष काढले असं घडलं का? एका तरी प्रकाशकाच्या हाती ही यादी आहे का? म्हणजे वाचकांशी ‘साहित्य व्यवहाराचे’ काय नाते आहे हे तपासता आले असते. वाचकांना काय हवे आहे? वाचकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? हे तपासण्याचं काम आपण कधी केलं आहे का? असा प्रश्‍न साहित्य व्यवहारातील प्रत्येक घटकाला पडायला पाहिजे. वाचकांचा दबाव साहित्य व्यवहारावर राहिला असता तर आज ज्या प्रकारच्या अनिष्ट प्रवृत्ती यात शिरल्या आहेत त्या शिरल्याच नसत्या. 

महाराष्ट्रातील माध्यमिक शाळांची संख्या महाराष्ट्रात किमान 20000 इतकी आहे. यातील चांगल्या शाळांचा विचार केल्यास 10 टक्के म्हणजे 2000 शाळा भरतील. चांगली ग्रंथालये आणि चांगल्या महाविद्यालयांची संख्या गृहीत धरल्यास तीही 1000 इतकी भरू शकेल. म्हणजे आपल्याकडे किमान 3000 ठिकाणी ग्रंथालयांची अवस्था बर्‍यापैकी आहे. इथे किमान 100 वाचक तरी बर्‍यापैकी म्हणून असू शकतील. या तीस हजार लोकांची मते जाणून घेण्याची काही एक यंत्रणा आपण उभी केली का? तर ती मूळीच केली नाही असे लक्षात येते. म्हणजेच आपल्याला सर्वसामान्य वाचकाशी नाते जोडण्याची काहीही आवश्यकता वाटत नाही. 

आजचा मराठी साहित्य व्यवहार हा पूर्णपणे वाचकांपासून तूटलेला आहे. वाचकांना हवं आहे म्हणून ते पुस्तक प्रकाशक बाजारात आणतो आहे किंवा एखाद्या चांगल्या पुस्तकाला चांगल्या वाचकांपर्यंत पोचवायला मदत करतो आहे अशी उदाहरणं अपवादानेच आहे. बहुतांश ग्रंथव्यहार हा शासकीय यंत्रणेने पोसलेल्या बांडगुळासारखा होऊन बसला आहे. 

यावर उपाय काय?

सगळ्यात पहिल्यांदा या 3000 ग्रंथालयांना केंद्रभागी ठेवून एक व्यवस्था आपल्याला निर्माण करावी लागेल. यातील किमान 30 हजार वाचकांची यादी तयार करणे. या वाचकांसाठी नियमित स्वरूपातील (किमान महिन्यातून एक) उपक्रम घ्यावा लागेल. यासाठी प्रकाशक, प्रकाशकांच्या संस्था, ग्रंथालय संघ, साहित्य परिषदा, स्थानिक वाङ्मयीन संस्था, वाङ्मयीन नियतकालिके या सगळ्यांचे सहकार्य लागेल. शाळा/महाविद्यालये/ग्रंथालये यांच्या सहकार्याने पहिल्यांदा 3000 केंद्र विकसित करणे हे काम करावे लागेल.. 

दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे या ठिकाणी पुस्तके पोचविण्याची व्यवहारिक यंत्रणा उभारणे. आज मराठी साहित्य व्यवहारात सगळ्यात मोठे आव्हान काय आहे तर ग्रंथ विक्रीची महाराष्ट्रभर निर्दोष व्यवहारिक यंत्रणा उभी करणे. एक राजहंस प्रकाशनाचा मर्यादित स्वरूपातील अपवाद वगळात एकाही प्रकाशकाला महाराष्ट्रात विभागीय कार्यालये उभारून ग्रंथ विक्रीला गती देता आलेली नाही. नवनीत प्रकाशनाचे उदाहरण यासाठी समजून घेण्यासारखे आहे. पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त लहान मुलांची गोष्टी/चित्रे/अक्षर ओळख/पाढे अशी कितीतरी पुस्तके त्यांनी तयार केली. आणि यांच्या विक्रीची एक समांतर यंत्रणा पाठ्यपुस्तकांच्या बरोबरीने प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्रपणे उभी केली. त्यासाठी वेगळे विक्री प्रतिनिधी नेमले.

मराठी प्रकाशकांना एकट्या दुकट्याला शक्य नसेल तर काही प्रकाशकांनी एकत्र येवून अशी यंत्रणा उभी करावी लागेल. सगळ्यात पहिल्यांदा विभागीय पातळीवर घावूक विक्री केंद्रं उभारावी लागतील. त्या विभागात कायमस्वरूपी विक्री प्रतिनिधी नेमावे लागतील. म्हणजे महाराष्ट्राच्या महसुल विभागांचा विचार करता मुंबई/पुणे/ठाणे यांच्या बरोबरीने नागपुर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, सोलापुर, कोल्हापुर या ठिकाणी ही केंद्रं उभारली गेली पाहिजेत. काही दिवसांत ज्या ठिकाणी किमान महानगर पालिका आहेत त्या ठिकाणी उपकेंद्र तयार झाली पाहिजेत. पुण्या-मुंबईच्या पट्ट्यातील दहा महानगर पालिकां शिवाय   धुळे, मालेगाव, जळगांव, नगर, अकोला, चंद्रपुर, नांदेड, परभणी, लातुर, सांगली या दहा महानगर पालिकांच्या ठिकाणी ही उपकेंद्र असू शकतात. 

अशा पद्धतीने पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्रात ग्रंथालयांना केंद्रभागी ठेवून 3000 वाचक केंद्र विकसित करणे, त्यानंतर मुंबई-पुण्या व्यतिरिक्त किमान सहा विभागीय विक्रीकेंद्र, दहा उपकेंद्र विकसित करणे विक्री प्रतिनिधी नेमणे हे काम अग्रक्रमाने करावे लागेल.

तिसरे महत्त्वाचे काम हाती घ्यावे लागेल  आणि ते म्हणजे प्रसिद्धी माध्यमांतून पुस्तकांची योग्य ती प्रसिद्धी करणे. जाहिराती देणे आज या व्यवसायाच्या मर्यादित आवाक्यामुऴे प्रकाशकांना शक्य नाही. ज्या काही जाहिराती येतात त्या स्पर्धा परिक्षांची पुस्तके किंवा उपयुक्त पुस्तके यांच्याच. महाराष्ट्रभरच्या सर्व वृत्तपत्रांचा एकत्रित विचार करून त्यांच्या रविवार पुरवण्यांसाठी चांगली पुस्तके निवडून त्यांच्यावर अधिकारी लोकांकडून लेख लिहून घेणे आणि ते या वृत्तपत्रांकडे पोंचविणे ही कामे करावी लागतील. वाङ्मयीन नियतकालिके जी अतिशय कमी आहेत त्यांच्या जास्तीत जास्त प्रती कशा विकल्या जातील हे पहावे लागेल. तसेच दूरदर्शन वाहिन्यांचा उपयोगही या कामासाठी करून घ्यावा लागेल. जागोजागी सांस्कृतिक कार्य करणार्‍या संस्था, नाट्य संस्था, फिल्म क्लब त्यांच्याशी संबंधीत जवळपास बहुतांश वर्ग हा वाचक असतोच. त्यांनाही वाचक केंद्राशी जोडून घ्यावे लागेल. 

चौथे काम करावे लागेल आणि ते म्हणजे गावोगावी पुस्तकांची प्रदर्शने भरविणे. सध्या शासनाच्या वतीने जिल्हा ग्रंथ महोत्सव भरविला जातो. हे काम अर्थातच शासकीय पद्धतीने होत असल्याने त्याचा अपेक्षित परिणाम होताना दिसत नाही. यासाठी सगळ्यात पहिल्यांदा या क्षेत्रातील प्रकाशक, ग्रंथ विक्रेते आणि ग्रंथालय संघ यांना हाताशी धरून आखणी करावी लागेल. नॅशनल बुक ट्रस्ट आणि सहित्य अकादमी या संस्था वर्षभर ग्रंथ प्रदर्शनांसाठी काही एक रक्कम खर्च करतात. तसेच त्यांच्याकडे विविध उपक्रमांसाठीही निधी राखीव असतो. तेंव्हा या संस्था, शासनाचा जिल्हा ग्रंथ प्रदर्शनांसाठी असलेला निधी, साहित्य संस्कृती मंडळाकडे असलेला निधी असा सगळा एकत्रित करून सर्व जिल्ह्यांमधून किमान एक चार दिवसांचा मोठा ग्रंथ महोत्सव अशा रितीने आयोजित करण्यात यावा की जेणे करून त्यात त्या गावाबाहेरील विक्रेत्यांना सहभागी होता यावे. नसता आजवरचा अनुभव असा आहे की अतिशय चुकीच्या तारखांना आणि एकाच वेळी महाराष्ट्रात विविध ठिकाणी हे शासकीय जिल्हा ग्रंथ महोत्सव भरवले जातात. याचा परिणाम असा होतो की विक्रेता त्याच्या सोयीच्या तारखा आणि सोयीची गावं तेवढी निवडतो. आणि इतरांकडे दुर्लक्ष करतो. मग एखाद्या दूरवरच्या गावी महोत्सवात गाळे रिकामे राहतात कारण तिथे स्टॉल लावण्यास कुणी विक्रेता तयारच नसतो. (शालेय मुलांसाठी पुस्तकांची प्रदर्शने भरविणे हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. हे काम अतिशय तातडीने आणि अग्रक्रमाने करावे लागेल.) 

अशा पद्धतीने चौरस आहारासारखे हे चौरस काम करावे लागेल. हे काम तातडीने होणारे नाही. त्यासाठी किमान पाच वर्षांची आखणी करावी लागेल. हे काम शासकीय पातळीवरून होण्याची शक्यता अतिशय कमी. यासाठी शासकीय मदत मिळाली तर आवश्य घ्यावी, शासकीय निधी मिळाला तर आवश्य घ्यावा पण त्यावर अवलंबून राहून चालणार नाही. 

यासाठी जिल्ह्यातील एखादी प्रभावी शैक्षणिक संस्था, त्या प्रदेशातील वाङ्मयीन कार्यकर्ते, ग्रंथालय कार्यकर्ते, ग्रंथ विक्रेते, प्रतिभावंत लेखक या सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. तरच हे काम होऊ शकेल. नसता आपण कितीही वर्षे ‘मराठी साहित्य व्यवहाराचे काय होणार? मराठी पुस्तके खपणार कधी? तरूण मुलं वाचणार कधी?’ अशी चर्चा करत राहूत. निष्पन्न काहीच होणार नाही.    

श्रीकांत अनंत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ,औरंगाबाद
मो. 9422878575,

वेरूळ महोत्सवाची महती । कुणाच्या ट्रॅकवर कुणाचे ओठ हलती ॥



उरूस, 19 ऑक्टोबर 2016 

मध्ये बर्‍याच वर्षांपासून बंद पडलेला वेरूळ महोत्सव एकदाचा या वर्षी पार पडला. पण अशा पद्धतीनं पार पडला की यापेक्षा तो बंद होता हेच चांगले होते असे म्हणायची पाळी आली.

मूळात महाराष्ट्र शासनाचे पर्यटन विकास महामंडळ एकूणच पर्यटनासाठी करते काय हा प्रश्न आहे. शासनाने किमान पायाभूत सोयी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात. इतके प्राथमिक काम केले तरी खुप आहे. पण आजही जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांपर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध नाहीत. त्या ठिकाणी पिण्याचे पाणी, प्रमाणबद्ध नकाशे, माहिती सांगणारे निर्दोष फलक, पर्यटन स्थळांची माहिती देणारे गाईड, त्यांच्या प्रशिक्षणाची चांगली सोय, रेल्वे स्टेशन व बस स्टँडवर माहिती देणारे कक्ष अशा किमान सोयी शासनाने करणे अपेक्षीत आहे. बाकी हॉटेल वगैरे व्यवस्था खासगी व्यवसायीक करू शकतात.

पण ही करायची कामं सोडून शासनाला पर्यटन महोत्सव आयोजित कर, पर्यटन महामंडळाकडून हॉटेल चालव, संगीत महोत्सव आयोजीत कर यांची मोठी हौस आहे. जे काम करायचे ते सोडून इतर कामं करण्यात अधिकार्‍यांना का रस असतो? याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अशा कामांमध्ये बर्‍यापैकी ‘ग्लॅमर’ असते. जगप्रसिद्ध कलाकरांशी सलगी साधता येते. त्यांच्यासोबत आपले, आपल्या कुटूंबाचे फोटो काढून घेता येतात. या कार्यक्रमांना वर्तमानपत्रांमधून, इतर माध्यमांमधून चांगली प्रसिद्धी मिळते. सांस्कृतिक क्षेत्रावर सत्ता गाजवता येते. या निमित्ताने आपली उठबस मोठ्या कलाकारांमध्ये होते.

यासोबतच दुसरे कारण म्हणजे असे महोत्सव हाती असले म्हणजे त्या गावातील एकूणच सांस्कृतिक क्षेत्रावर आपल्याला प्रभाव टाकता येतो. छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी स्थानिक कलाकारांना सरकारची, प्रायोजकांची गरज असते. ते आपल्या दारात आले की हळूच आपली बायको, मुलगी, मेहुणी, मेहुणा कुणाला तरी या क्षेत्रात संधी देण्यासाठी घुसडता येते.

मध्यंतरी वेरूळ महोत्सवात जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त यांच्या बायकांनी पण गाण्यासाठी नृत्यासाठी सहभाग नोंदवला होता. कलाकार म्हणून त्यांचे सादरीकरण अतिशय सुमार होते. पण ती कलाकार पडली अधिकार्‍याची बायको. तिच्या कलेबाबत परखड मत कोण व्यक्त करणार?

दुसरीकडून काही दुय्यम दर्जाच्या कलाकारांनाही या अधिकार्‍यांचे लांगूलचालन करायला आवडते. कारण देशी परदेशी मोठ्या महोत्सवांमध्ये हजेरी लावायची असेल तर दुय्यम दर्जाच्या कलाकारांना वशिला हवाच असतो. त्याशिवाय त्यांना बोलवतेच कोण. याचा परिणाम म्हणजे असे सरकारी महोत्सव कलेच्या दृष्टीने सामान्य किंवा फारसे काहीच न देणारे ठरतात.

या वर्षी औरंगाबादेतील वेरूळ महोत्सवात (आता त्याचे नाव वेरूळ अजिंठा औरंगाबाद आंतरराष्ट्रीय महोत्सव असले तरी मूळात हे नाव वेरूळ महोत्सव असेच होते. आणि हा महोत्सव प्रत्यक्ष वेरूळ इथे कैलास लेणीच्या परिसरातच भरायचा.) अजय-अतूल, अदनान सामी यांना आमंत्रित केले होते. मूळ प्रश्न असा आहे की अशा व्यावसायीक कलाकारांना आमंत्रित करण्याचे काय कारण? या कलाकारांना कोणत्या प्रोत्साहनाची गरज आहे? यांच्यामुळे अभिजात भारतीय संगीताला अशी कोणती चालना मिळाली आहे? यांचे कार्यक्रम इतर मोठ्या इव्हेंट कंपन्या घेतच असतात.

जास्तीत जास्त रसिकांनी यायला पाहिजे. म्हणून अशा लोकप्रिय कलाकारांना आमंत्रित करावे लागते. हे समर्थन अतिशय लंगडे आहे. मुळात जर हा महोत्सव पर्यटनाला चालना देण्यासाठी, भारतीय अभिजात संगीताला चालना मिळण्यासाठी भरविण्याचे उद्दीष्ट आहे तर मग अजय-अतूल आणि अदनान सामी यांच्या बोलावण्याने ते कसे काय साध्य होते? आणि जास्तीत जास्त लोक गोळा करायचे, जास्तीत जास्त तिकीटं विकल्या गेली पाहिजे, खर्च भरून काढता आला पाहिजे असे जर असेल तर हा उठारेटा शासनाने करूच नये. कारण हे करणारे इतर लोक आहेत.

या कलाकारांनी आपली कला ‘लाईव्ह’ सादर करण्याऐवजी साऊंड ट्रॅक वापरून गाणी म्हटल्याचे उघड झाले. यातून कला म्हणून जे काही चालू आहे त्याचेही पितळ उघडे पडले.

या सोबतच अभिजात कलाप्रेमींची नाराजी होवू नये म्हणून वेरूळलाही एक दिवस स्थानिक कलाकारांना बोलावून कार्यक्रम सादर करण्यात आला. शिवाय लोक कलाकारांसाठी सिडकोतील कलाग्रामचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. म्हणजे स्वत: शासनानेच अशी विभागणी मान्य करून टाकली. कैलास लेण्याच्या पायथ्याशी स्थानिक कलाकार अभिजात संगीत सादर करणार. कलाग्राममध्ये लोक कलाकार आपली कला सादर करणार. त्यांच्याकडे कुणी ढूंकूनही पहायलाही तयार नाही. आणि सोनेरी महालच्या कार्यक्रमात अजय-अतूल आणि अदनान सामी भव्य धांगड धिंगा साउंड ट्रॅकवर घालणार. त्याला मात्र झाडून सगळे अधिकारी बायका पोरांसह हजर राहणार. कलेसाठी चळवळ करणार्‍या संस्थाही आवर्जूृन याच ठिकाणी हजार तिकीटं आरक्षीत करून आपण कसे ‘कलेचे सागर’ आहेत हे सिद्ध करणार.

हे असं का होतं? कलाकाराने आपली निष्ठा रसिकांच्या काळजापाशी न ठेवता सरकारी अधिकार्‍यांच्या पायाशी गहाण ठेवणे आणि रसिकांनीही कलेशी प्रतरणा करून झगमगाटाला महत्त्व देणे यातून हे अपघात घडतात.
याच वेरूळ महोत्सवाचा पूर्वरंग म्हणून हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाचा कार्यक्रम 1 ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आला होता. वयाने थकलेल्या चौरसियांना दमदार फुंक मारता येत नव्हती. हात कापत होते. बासरीचे सूर स्वच्छ उमटत नव्हते. त्यांना साथ करणार्‍या विवेक सोनार तरूण कलाकाराने अतिशय ताकदीने वाजविले. तबला वादक रिंपा शिवा या तरूणीनेही आपल्या बोटांची जादू दाखविली. पण कार्यक्रम संपल्यावर सगळ्या अधिकार्‍यांनी, त्यांच्या कुटूंबियांनी हरिप्रसाद चौरसियांसोबत सेल्फी काढण्यासाठी जी गर्दी केली त्यावरूनच या आयोजनाचा हेतू स्वच्छ कळला.

कर्नाटकात रस्त्यावर गाणी म्हणत फिरणारी एक जमात आहे. ही मंडळी कन्नड मराठी भजनं मोठ्या गोड गळ्यानं गातात. कुणाला काहीच न मागता पहाटे दारात उभं राहून गाणं म्हणतात. कुणी काही दिलं तर घेतात. घरात बोलावलं तर आत येवून खाली बसून गातात. नसता दारात उभं राहूनच आपली कला सादर करतात. वेरूळ महोत्सवाचे महागडे तिकीट सरकारी अधिकार्‍यांच्या दबावाने खरेदी करणारे या रस्त्यावरच्या गोड गळ्याच्या गायकांना पैसे देताना हात आखडता घेताना पाहून मला फार वाईट वाटले होते. वेरूळ महोत्सवाचा झगमगाट आणि या कलाकारांचा साधेपणा यांच्यावर 2007 मध्ये लिहीलेली ही कविता. माझा पहिला आक्षेप सामान्य रसिकांवरच आहे.


उतरा की जरा
अपार्टमेंटी मनोर्‍यातून खाली

निमंत्रणाविना
प्रयोजकांच्या झगमगीत व्यासपीठाविना
रस्त्यावर उभं राहून
गाणार्‍याचा सच्चा सूर 
पडला नाही का तूमच्या कानावर
कानातले संस्कृती रक्षणाचे बोळे
काढून फेका की बाहेर

घाला नं खिशात हात
का फक्त शासकीय अधिकार्‍यांनी माजवलेल्या
‘महोत्सवी अय्याशी’लाच
सलाम करतात तूमच्या नोटा

तूमच्या श्रीमंत खिशातली
दरिद्री रक्कम
डोळे झाकून लावतो तो भाळी
हळूच सरकतो पुढच्या दारी

का बावचळलात असे
मी कुठं तूम्हाला म्हणालो
सांस्कृतिक भिक़ारी

रसिकांनी सांस्कृतिक व्यासपीठं आपल्या हिंमतीवर चालवली पाहिजेत. कलाकारांनी त्यांना सर्वतोपरी मदत करून कलेचा विकास घडवून आणला पाहिजे. समाजाची एकूणच कलाविषयक अभिरूची उंचावली पाहिजे. सरकारला रस्ते वीज पाणी कचरा या मुलभूत समस्यांवर काम करू द्या.
           
                  श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    
   

Wednesday, October 12, 2016

विनाअनुदानित शिक्षक शेतकर्‍यांचीच मुलंं!


रूमणं, बुधवार 12 ऑक्टोबर 2016  दै. गांवकरी, औरंगाबाद

विषय मराठा मोर्च्याचा असो की विनाअनुदानित शिक्षकांचा तो सरळ जावून भिडतो शेतकंर्‍यांच्या प्रश्नाला. याच्या मूळाशी जे सत्य सापडते ते म्हणजे शेतीचे तोट्यात असणे. किंवा ही शेती तोट्यातच रहावी हे सरकारी धोरण. 

4 ऑक्टोबरला औरंगाबादला मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीवर विविध पक्ष संघटनांनी विविध विषयांवर मोर्चे काढले. काहींनी नुसतीच निवेदने दिली. यात एक मोर्चा विना अनुदानित शिक्षकांचाही होत. गेली पंधरा वर्षे विना वेतन काम करणार्‍या या शिक्षकांची वेदना सरकारला समजावी म्हणून हा मोर्चा होता.

मोर्चा पुढे हिंसक झाला, त्यांनी केलेल्या दगडफेकीत एका पोलिसाचा मृत्यू झाला. लाठ्ठीहल्ला व दगडफेकीत जवळपास 200 पोलिस व शिक्षक जखमी झाले. यावर बरीच उलट सुलट चर्चा झाली.

हळू हळू यातून एक विदारक सत्य समोर येते आहे. ही मागणी करणारे जवळपास सगळेच शिक्षक हे ग्रामीण भागातले होते. या सगळ्याच संस्था ग्रामीण भागातल्या होत्या. जे शिक्षक विनावेतन वेठबिगारासारखे राबविले गेले ती सगळीच शेतकर्‍याची मुलंं होती. प्रसंगी जमिनी विकून संस्थाचालकांना पैसे देवून यांनी नौकर्‍या मिळवल्या. यांना अनुदान मिळण्याचे खोटे आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात जेंव्हा हाती काहीच पडत नाहीये हे पाहून यांची अस्वस्थता वाढत गेली. 

कायम स्वरूपि विनाअनुदानीत शाळा काय फक्त खेड्यांमध्येच आहेत का? या शाळा शहरात देखील आहेत. या शाळा केवळ इंग्रजी माध्यमांच्याच आहेत का? तर तेही खरे नाही. मराठी माध्यमांच्या शाळाही शहरात आहेत. मग शहरातील विनाअनुदानित शिक्षक या मोर्चात का नाही आले? 

याचे साधे सरळ सोपे कारण म्हणजे ते विनावेतन काम करत नाहीत. मग यांना पगार कोण देतो? या कायम स्वरूपी विनाअनुदानीत शाळांमध्ये ज्या पालकांनी आपली मुलं दाखल केली आहेत त्यांना या गोष्टीची कल्पना असल्याने ते या शिक्षकांना बर्‍यापैकी पगार मिळावा इतके शुल्क जमा करतात. शहरातील संस्थाही आपल्या कर्मचार्‍यांना शिक्षकांना याची स्पष्ट कल्पना देतात की या शाळेला कुठलेही अनुदान नाही. करीता विद्यार्थ्यांचे जे शुल्क जमा होईल त्यावरच पगार होतील. ही व्यवस्था शिक्षक, पालक, संस्थाचालक यांनी नीट समजून घेतली आहे.  त्याप्रमाणे या कायम स्वरूपी विनाअनुदानीत शाळांचा कारभार शहरांमध्ये चालू आहे.

खेड्यांमध्ये नेमकी परिस्थिती उलटी आहे. येथील पालक जास्त पैसे खर्च करू शकत नाहीत असा एक समज पसरला आहे किवा पसरविला गेला आहे. तो काही प्रमाणात खरा आहे कारण परत तेच शेती तोट्यात आहे. मग या विद्यार्थ्यांसाठी शाळा काढली तर पैसे कोण देणार? अनुदानीत शाळा तर मिळणं बंद झालं. कारण काय तर शासनाने आधीच शाळा काढून ठेवली आहे. तिथेच मुले पुरेशी नाहीत. मग करायचे काय? तर सध्या कायम विनाअनुदानित मिळत आहे ना. तर घेवून टाका. या भावनेतून खेड्यांमध्ये कायमस्वरूपी विनाअनुदानित शाळा उदयाला आल्या.

म्हणजे या शाळांना सुरूवात करतानाच हे माहित होते की आपल्याला अनुदान मिळणार नाही. या अशा शाळांमध्ये नौकरी करणार्‍यांनाही याची कल्पना होती. पण त्यांनी विचार केला पुढे मागे थोडेफार अनुदान मिळाले तरी हरकत नाही. आपली शेती आहेच. त्याला जोडधंदा म्हणून शिक्षकाची नौकरी करत राहू. 

या सगळ्या 15 वर्षांच्या काळात शेतीचीही अवस्था वाईट होत गेली. आणि शाळेला तर अनुदान नाहीच. मग हे शिक्षक मोठ्या त्वेषाने आंदोलनात उतरले. पुढे काय झाले तो इतिहास आहे तो परत इथे मी उगाळत नाही. 

एक अतिशय साधा बालिश वाटावा असा प्रश्न आहे. आपल्याला न भेटणार्‍या अनुदानासाठी त्वेषाने आंदोलन करणार्‍या, प्रसंगी पोलिसांवर दगडफेकही करणार्‍या या शेतकर्‍यांच्या मुलांंना शेतीच्या प्रश्नासाठी रस्त्यावर यावे का वाटत नाही?

आपल्या बापावर झालेला अन्याय दूर झाला तर आपल्याला ही अशी अनुदानाची भीक मागायची गरजच पडणार नाही. एकदा का कॅन्सरची गाठ निघाली की बाकी गोळ्या औषधं घेत बसण्याची गरजच नाही. मग हे विदारक सत्य माहित असताना काय म्हणून अनुदान मिळावे अशा भीकमाग्या आंदोलनांना जोर येतो? 

शेतकरी चळवळीने एक घोषणा मोठी लोकप्रिय केली होती. ‘भीक नको हवे घामाचे दाम!’ मग ही शेतकर्‍यांची मुलंं याच्या नेमकी उलट घोषणा का देत आहेत. ‘आम्हाला हवी अनुदानाची भीक’

बहुतांश ठिकाणी विनाअनुदानितचा विषय हा कोरडवाहू शेतीशी निगडीत आहे. या शेतीतून बाहेर पडणार्‍या मालाला पुरेसा भाव मिळू नये अशीच यंत्रणा आपण उभी केली. तसेच या शेतीची उत्पादकता वाढू नये असेच प्रयत्न झाले. विविध कारणांनी कोरडवाहू शेतीची उत्पादकता कुंठीत राहिली. या शेतीला सिंचनाच्या किमान सोयी मिळाल्या नाहीत. परिणामी कापुस, डाळी, सोयाबीन, तेलबिया या उत्पादनांमध्ये पुढे असलेला प्रदेश भाव मिळायची वेळ आली की सगळ्यात मागे राहतो. या ठिकाणी दुसरा कोणताच रोजगार उपलब्ध नसतो. परिणामी ही सगळी तरूण पिढी मजबूरीत विनाअनुदानित मध्ये का होईना मिळाली तर नौकरी करू अशी आशा बाळगतात.

या नेमक्या मानसिकतेचा फायदा संस्थाचालकांनी उलचलला. आणि मोठ्या प्रमाणात कायम स्वरूपी विना अनुदानित शाळा ग्रामीण भागात सुरू झाल्या. आणि आता नेमक्या याच शिक्षकांचा प्रश्न गंभीर झाला आहे. 

शेतकर्‍याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे तर मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात पैसा खेळेल. या शेतमालावर किमान प्रक्रिया करण्याचे लघु उद्योग जागोजागी उभे राहिले पाहिजे. म्हणजे आज जे बेकारांचे तांडे विनाअनुदानित शाळांमध्ये नौकरी करत आहेत त्यांना चांगला रोजगार गावातच उपलब्ध होईल. हा जो शेतमाल आहे त्याची वाहतूक करणे, त्याचा व्यापार करणे यात मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. म्हणजे ग्रामीण भागातील उद्योजकतेला कल्पकतेला व्यापारी वृत्तीला चालना मिळेल. 

सध्या सगळीकडे पाऊस जोरदार झाला आहे. परिणामी रब्बीचे पीक चांगले येण्याची आशा आहे. अशावेळी सर्वत्र उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे. मग या उसावर प्रक्रिया करून कच्ची साखर तयार करण्याचे उद्योग का नाही उभे रहात? काय म्हणून सगळा उस उचलला की नेऊन मोठ्या साखर कारखान्यांत दिला असे केले जाते? 

एकीकडे शेतकरी शासनाने आपल्या उरावरून उठावे म्हणून चळवळ करत आहेत. आणि दुसरीकडे शेतकर्‍यांची मुलंं शासनाने आपल्याला पोसावे म्हणून गळे काढत आहेत. हा विरोधाभास आहे. मुलत: शेतकरी हा लाचार कधीच नव्हता. तो अत्यंत स्वाभिमानी आहे. तो जगाचा पोशिंदा आहे. त्याच्या पोरांची अशी भीकमागे आंदोलने करायला लावून दिशाभूल केली जाते आहे. शहरात जागोजागी ज्या खासगी शिकवण्या चालविल्या जातात त्यात मोठ्या प्रमाणात बहुजन समाजच आहे. 

विनाअनुदानित शिक्षकांनी आता पहिल्यांदा त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या संस्थाचालकांविरूद्ध आंदोलन करून आपले पैसे वसुल केले पाहिजेत. मग ज्या संस्थांवर ते नौकरी करतात त्या संस्था पूर्णत: ताब्यात घेतल्या पाहिजेत. सगळ्या पालकांना विश्वासात घेवून त्यांच्याकडून त्यांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी शुल्क देणे आवश्यक आहे हे पटवून दिले पाहिजे. आणि त्या शुल्कावर आपल्या संस्थेचा कारभार चालवून समोर आदर्श दाखवून दिला पाहिजे.  ग्रामीण भागातील पालक आज मोठ्या प्रमाणावर आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे म्हणून खर्च करत आहेत. पोराला शहरात ठेवतात. पुढे त्याला स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करता यावा म्हणून खोली करून देतात. त्याला ‘स्टडी’ लावून देतात. हा सगळा खर्च ग्रामीण भागातील शिक्षकांनी वाचवला पाहिजे. त्यांनीच पालकांना त्यांच्या पोराच्या अभ्यासाची हमी द्यावी. पालकांचाही यात फायदा आहे. जे काम शहरात जास्त पैशात होते तेच काम गावातच कमी पैशात होवू शकते. या सगळ्या विनाअनुदानित शाळा पालकांच्या पैशावर चालणारी विद्यामंदिरे म्हणून विकसित व्हावीत.  हाच ऐकमेव मार्ग आहे हा प्रश्न सुटण्याचा.     

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. 9422878575

Monday, October 10, 2016

शेंदूर फासलेले ओबडधोबड मुखवटे देवी म्हणून का पुजायचे?

  
उरूस, 10 ऑक्टोबर 2016 

सध्या नवरात्र जोरात आहे. जिकडे तिकडे देवीच्या मंदिरांमध्ये आणि परिसरात धूम आहे. या काळात आवर्जून कुठे कुठे देवी आहे ती मंदिरे शोधून त्यांचे फोटो वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केले जातात. बहुतांशवेळा दगडाला शेंदूर फासलेला असतो आणि त्याला महालक्ष्मी, अंबा, महाकाली असे काहीतरी नाव दिले जाते. या सगळ्यां ठिकाणांच्या कथा साधारणत: सारख्यात असतात. देवीचा कुणी भक्त (ही महिला का नाही कुणास ठाऊक. नेहमी पुरूषच असतो.) तिच्या मंदिरात नियमित जात असतो. मग कालांतराने त्याला वयपरत्वे जाणे होत नाही. मग तो देवीला विनंती करतो. देवी त्याच्यावर प्रसन्न होवून तूझ्याच गावी मी येते असं सांगते. पण अट असते की त्याने मागे वळून पहायचे नाही. हा भक्त मागे वळून पहातोच. आजतागायत एकही अशी कथा हाती लागली नाही की या भक्ताने देवीने सांगितलेले सर्व नियम पाळले. मग देवी अंतर्धान पावते. तिथे जो दगड असतो त्यालाच शेंदूर फासून देवी समजले जाते. मग त्याची पूजा केली जाते वगैरे वगैरे. 

देवीचा तांदळा (फक्त मुखवटा) का पूजला जातो याच्या काही साधार कथा पुराणात आहेत. त्यांच्यात मी पडत नाही. हा तांदळा बर्‍याच ठिकाणी अतिशय सुबक सुंदर आहेही. अशांबाबत स्वतंत्रपणे लिहीता येईल.

पण मुद्दा आहे की जागोजागी जे शेंदूर फासलेले ओबडधोबड मुखवटे आहेत त्यांना अजूनही तशाच स्वरूपात का पुजल्या जाते आहे? का नाही असा निर्णय झाला की हा शेंदूर खरवडून काढू. आत काय मूर्ती आहे ते शोधून काढून. नसेल तर चांगली मूर्ती आणून बसवू. स्वातंत्र्यापूर्वी परकीयांची राजवट होती. त्यातील मूर्तीपूजेच्या विरोधातील राजवटींच्या भितीखाली जर असा काही प्रकार घडला असेल तर त्याचा आता पुनर्विचार करायचा का नाही? काय म्हणून जून्या गोष्टी उगाळत बसायचे? 

केवळ मुखवट्याची पूजा करणे हे एकवेळ समजता येईल. पण नुसताच ओबडधोबड शेंदूर फासलेला दगड काय म्हणून पुजायचा? मराठवाड्यात जालना जिल्ह्यात अंबडला मत्स्योदरी देवीचे मंदिर आहे. मला बरेच दिवस असे वाटत होते की ही एकच देवी आहे. प्रत्यक्षात मंदिरात गेल्यावर कळले की एक नसून या तीन देवता आहेत. बरे एक साधा बालीश प्रश्न यातील महाकाली कोणती, महासरस्वरती कोणती आणि महालक्ष्मी कोणती? कारण सगळ्याच सारख्यात ओबडधोबड आहेत.
 
असं काही बोललं की लगेच भक्तांच्या भावना दुखावल्या जातील म्हणून कुणी काही बोलतच नाही. अंबाजोगाईला योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. इथेही मूर्ती वगैरे काहीच नाही. केवळ देवीच्या नावाखाली एक भलामोठा शेंदूर फासलेला दगड ठेवलेला आहे. त्याला चांदीचे डोळे बसवलेले आहेत. आता यात नेमके काय सौंदर्य आहे ते मला आजतागायत कळाले नाही. माहूरला रेणुका माता आहे. इथेही केवळ मुखवटा आहे. कुणीही सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने पाहून सांगावं या मुखवट्याचे डोळे, नाक, तोंड हे कोणत्या प्रमाणात आहेत? आणि हे जे काही पुराण काळापासून चालू आहे ते तसेच का ठेवले जाते आहे? निदान यात बदल करून चांगला सुंदर मुखवटा का बसवला जात नाही.

मूळात ज्याला हिंदू/वैदिक संस्कृती म्हणून गौरविले जाते ती कधीच स्थितीवादी नव्हती. ती सतत बदलत राहिलेली आहे. जूने आहे तेच कवटाळून बसणे हा हिंदू म्हणविल्या जाणारा जीवन पद्धतीचा गुणधर्म नाही. कितीतरी गोष्टी बदलत बदलत आत्ता आपल्याला जे दिसते आहे तिथपर्यंत आल्या आहेत. मांसाहार हा या वैदिक धर्मात सर्रास होत होता. हळू हळू शेतीचा प्रदेश वाढत गेला. धान्याची उपलब्धता जास्त जास्त होत गेली. तस तसा शाकाहाराचा टक्क़ा वाढत गेला.

याच शाकाहाराला धर्म-परंपरेचा गोंडस साज चढवून आज त्याचा प्रचार केला जातो आहे. वेदात मूर्तीपूजा नाही. पण आज मूर्तीपूजा मोठ्या प्रमाणात केली जाते आहे. जे देव देवता आपण आज पुजतो त्यांची नावंही वेदांत नाहीत. 

इतके कशाला हा महाराष्ट्र ज्या विठ्ठलाची पुजा करतो तो विठ्ठलही फार पुराणकालीन देव नाही. वारकरी संप्रदायाने गेल्या 700 वर्षांत जे बदल आणले ते आधी कुठे होते? गुरू करायचा नाही, सोवळे ओवळे न पाळता केवळ धुतवस्त्र नेसायचे, प्रत्येकाने प्रत्येकाच्या पाया पडायचे, गळ्यात तुळशीची माळ घालायची, शाकाहाराचे पालन करायचे, महिन्यातील दोन एकादशींना उपवास करायचा, वर्षातून निदान एक वेळ पंढरीची यात्रा करायची (या चार यात्रा आहेत आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैती. नसता पंढरपुर म्हटलं की आषाढीची यात्राच फक्त डोळ्यासमोर येते).

हे सगळे धार्मिक बदल आपण स्विकारलेच ना? तेंव्हा आपला धर्म कुठे आड आला होता? यासाठी काय कुणी विरोध केला? का काही दंगल उसळली? 

जागोजागी मंदिरांचे निर्णाद्धार केल्या गेले. खुद्दा शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर तुळजा भवानीची स्थापना केली. तेंव्हा काही दगडाला शेंदूर नाही फासला. चांगली सुरेख काळ्या पाषाणातील देवीची मूर्तीच स्थापन केली. 

या दगडी ओबड धोबड मुखवट्यांमध्येही एक दुष्टावा आहे. केवळ ग्रामीण भागातच हे मोठ्या प्रमाणात आढळतात. नव्याने शहरात जी देवीची मंदिरे होत आहेत तेथील मुखवटे सुबक आहेत. त्यांना सोन्या चांदीची आभुषणे आहेत. मंदिरांचा परिसर स्वच्छ आढळतो. या मंदिरात नियमितपणे पुजा पाठ करणार्‍यांची व्यवस्थित सोय केली जाते. याच्या नेमके उलट खेड्यांतील जूनी देवीची मंदिरं आढळतात. मंदिर म्हणून फार काही भव्य चिरेबंदी बांधकाम आढळतच नाही. जूनं मंदिर म्हणायला आपण म्हणतो पण त्यात कुठेही पुरातन भारतीय स्थापत्य शैली म्हणून काही आढळत नाही. 

अशी मंदिरं महादेवाची आहेत. देवीची जी मोठी मोजकी मंदिरं आहेत तेथील स्थापत्य अप्रतिम आहे. तुळजापुर किंवा कोल्हापुर येथील मंदिरं अप्रतिम आहेत. पण माहुर किंवा वणी येथील मंदिरांमध्ये स्थापत्य शैलीचे सौंदर्य म्हणून काहीही नाही. खरं तर या परिसराचा जिर्णोद्धार व्हावा म्हणून का प्रयत्न केला जात नाही?

केवळ दगडाला फासलेला शेंदूरच नाही तर सगळा परिसरच भक्तीचा ओबड धोबड शेंदूर फासलेला का जाणवतो? का नाही नव्या पद्धतीनं ही देवीची ठिकाणं सुंदर करावयाची? 

ज्या काही दंतकथा आहेत त्या देवीच्या मुर्तीबाबत किंवा मुखवट्याबाबत असतात. पण देवीचे मंदिर कसे असावे याचाही काही दृष्टांत देवी देवून ठेवते का? हा सगळा परिसर स्वच्छ, सुंदर, शिल्पांनी मढलेला, जिथे येताच भक्तीभाव दाटून यावा असा का केला जात नाही?

आधुनिक काळात माणसाला हे जे ताणतणाव आहेत ते सहन करण्यासाठी उबदार कुटूंबव्यवस्था हवी त्याचप्रमाणे धार्मिक स्थळंही हवी असतात असे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. एकीकडे आपण कितीही बुद्धीवादी म्हणवून घेवो. दुसरीकडे मनाला आधार म्हणून बहुतांशजणांना मंदिरात गेलेलं चांगलं वाटतं ही वस्तुस्थिती आहे. जून्या काळी ज्या मंदिरांची रचना केलेली आहे ती अतिशय अप्रतिम आहे. स्थापत्याच्या दृष्टीने तर ही मंदिर अवर्णनीय आहेत. 

नेमका मध्ययुगीन कालखंड असा आहे की ज्या काळात कळाहीन मंदिरं स्थापन झाली. याचे खापर कुणावरही ठेवा पण हे घडलं हे मात्र खरं आहे. 

जूना सगळा काळ आपण मागे सोडून देवू. त्याची फारशी चर्चा करूनही काही घडणार नाही. सध्या नवरात्र चालू आहे म्हणून मी देवीच्या मंदिरांबाबत लिहीतोय. पण हे सर्वच मंदिरांबाबत खरं आहे. मुर्तीला हात लावणे म्हणजे भावनेला दुखावणे कुणाला वाटत असेल तर निदान मंदिराचा परिसर तरी भव्य, सुंदर, स्वच्छ, प्रसन्न राहिल याचा विचार करावा. त्याला काय हरकत आहे?    
    
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Monday, October 3, 2016

युवा प्रतिभेचा आविष्कार ‘प्रतिभा संगम’

उरूस, पुण्यनगरी, 3 ऑक्टोबर 2016 

आता महाराष्ट्रात चांगला पाऊस पडत आहे पण दुष्काळाच्या आठवणी मात्र जातच नाहीत. एक कवी लिहीतो

माळावर हाडकांच्या ढिगावर
टपून बसलेला असतो दूष्काळ
चॅनेलवाल्यांच्या कॅमेर्‍या सारखा
काही वेगळी बातमी मिळते का 
ते पाहण्यासाठी

काळ दूष्काळ घाबरतात फक्त
मानवतेने मदत करणार्‍या माणूसकीला
धान्य-चारा पाठवणार्‍या हातांला
आणि झाड लावून जगवणार्‍या माणसाला

काळ आणि दूष्काळ घाबरतात फक्त
श्रमदानाने बांधलेल्या बंधार्‍याला
दानपेटीतील धन देणार्‍या ईश्वराला
आणि दूष्काळातही 
तडफडत जगणार्‍या जिद्दीला..

ही कविता जेंव्हा मंचावरून सादर होते तेंव्हा उपस्थितांकडून प्रचंड टाळ्यांचा प्रतिसाद मिळतो. ही घटना कुठल्याही प्रस्थापित कविंच्या कविसंमेलनातील नाही. ही कविता सादर करणारा कवी कुणी प्रस्थापित मोठा कवी नाही. सातार्‍याच्या उन्मेष पाटील या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची ही कविता आहे. आणि या कवितेला दाद देण्यासाठी महाराष्ट्राच्या 19 जिल्ह्यांतून 500 त्याच्याच वयाचे  विद्यार्थी साहित्यीक गोळा झालेले असतात. ही घटना आहे 23,24,25 सप्टेंबरला नाशिक येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने  भरविलेल्या ‘प्रतिभा संगम’ या विद्यार्थ्यांच्या साहित्य संमेलनातील.

1996 साली ज्ञानेश्वरीला सातशे वर्षे पूर्ण झाली म्हणून विद्यार्थ्यांसाठी  एक साहित्य संमेलन घेण्याचे विद्यार्थी परिषदेने ठरविले. तेंव्हापासून आजतागायत ही साहित्य संमेलने भरविली जात आहेत. नाशिकला संपन्न झाले ते 15 वे साहित्य संमेलन होते. प्रतिष्ठीत नामांकित साहित्यीकांना पाहूणा म्हणून बोलविले जाते. त्यांच्या मुलाखती, त्यांची भाषणे, परिसंवाद, चर्चा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगले वाङ्मयीन सकस खाद्य दिले जाते. 

या संमेलनांचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अयोजित केल्या जाणार्‍या गट चर्चा. वीस पंचेवीस विद्यार्थी साहित्यीकांचा एक गट करून एका मान्यवर साहित्यीकाकडे सोपविला जातो. आपला लेख, कविता त्या विद्यार्थ्याने तेथे वाचून दाखवायचा असतो. सर्वांच्या लेखनावर सविस्तर चर्चा होते. मान्यवर साहित्यीक अनौपचारिक रित्या त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्या साहित्यातील बलस्थाने व मर्यादा समजावून सांगतात. गट छोटा असल्याने प्रत्येकाशी बोलणे शक्य होते. विद्यार्थीही आपली मतं मोकळेपणाने मांडू शकतात. आपल्या बालीश वाटणार्‍या शंकाही विचारू शकतात. 

या गटश: चर्चांमधून जे कवी आहेत त्यांतील चांगल्या कवींची एक यादी तयार केली जाते. निमंत्रित कविंसोबत या विद्यार्थी कवींना  कविता म्हणायची संधी दिली जाते. या कविसंमलनाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व मान्यवर मंचासमोर बसतात. आणि विद्यार्थी कवी मंचावर विराजमान असतात. ज्या विद्यार्थ्यांनी वैचारिक लेखनात सहभाग नोंदवला असतो त्यांतील तीन विद्यार्थी निवडून त्यांना मान्यवर पाहूण्यांसह मंचावर बसविले जाते. उपस्थित विद्यार्थी त्यांना विविध प्रश्न त्या विषयावर विचारतात. 
ज्या विद्यार्थ्याला बक्षिस मिळते तो विद्यार्थी पुढच्या संमेलनात वाङ्मयीन कार्यकर्ता म्हणून आयोजनात मदत करतो.  इतकेच नाही तर जे विद्यार्थी या संमेलनात चमकले ते आता मान्यवर कवी म्हणून आमंत्रित केले जातात. या वर्षी कवी संमेलनाचे संचालन करणारा संदिप जगताप जो आता महाविद्यालयात प्राध्यापक आहे आणि मान्यवर तरूण कवि म्हणून महाराष्ट्रात त्याचा लौकिक आहे तो पूर्वीचा काव्यस्पर्धेचा विजेता होता. पूर्वीचे विजेते सागर संजय जाधव, दत्ता सोनवणे, विजय सुतार हे या वर्षी मान्यवर कवी म्हणून कविता सादर करीत होते.

प्रतिभा संगम मधून लेखक म्हणून पुढे आलेले कित्येक जण आज मराठी साहित्यात आपले नाव कमावून आहेत. कादंबरीकार कवी बालाजी इंगळे, कवी अनुवादकार प्रा. पृथ्वीराज तौर, कवी केशव खटींग, साम टिव्हीत सध्या कार्यरत असणारा दुर्गेश सोनार, निकिता भागवत, किशोर मासिकाचा कार्यकारी संपादक असलेला किरण केंद्रे, भुषण राक्षे, नामदेव कोळी, ललित अधाने अशी कितीतरी नावे आहेत.

संपूर्ण तीन दिवस ज्या परिसरात हे संमेलन आयोजित केले जाते त्याचे एक पावित्र्य जपण्याचा सगळेच मन:पूर्वक प्रयत्न करतात. पाचशे महाविद्यालयीन मुलं मुली जिथे अहोरात्र एकत्र आहेत तिथे गडबड गैरप्रकार होण्याची खुप शक्यता असते. पण असले काही आजतागायत या संमेलनांमध्ये घडले नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हे एक निव्वळ संमेलन नसून हा एक महत्त्वाचा वाङ्मयीन संस्कार आहे. संमेलनाचे संस्थापक आणि अजूनही आपल्या करड्या नजरेने सर्व काही न्याहाळणारे प्राचार्य नरेंद्र पाठक यांना याचे मोठे श्रेय जाते. त्यांना नुकतेच राष्ट्रपतींनी उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार देवून गौरविले आहे.

संमेलनाच्या परिसराचे पावित्र्य याबाबत एक घडलेला प्रसंग मोठा लक्षणीय आहे. एका ज्येष्ठ कवीला संमेलनासाठी आमंत्रण होते. ते इतर मान्यवरांसोबत त्या परिसरात वावरत असताना आपल्या दूसर्‍या मान्यवर कवी मित्राला हळूच बाजूला घेवून म्हणाले, ‘मित्रा जरा बाहेर जावून येवू.’ दूरवर जावून त्यांनी एक पानटपरी शोधली. सिगारेट घेतली आणि  खुलासा केला, ‘मित्रा मला सिगारेटची तलफ येते. पण इथे कसा ओढणार? यांनी वातावरण इतकं पवित्र राखलं आहे. आपण कशाला त्याला गालबोट लावा.’

दूसर्‍या एका मान्यवर कवींचा किस्सा याच्या नेमका उलटा आहे. सर्व मान्यवर कवी संमेलन स्थळी गोळा झाले पण हे महाशय आलेच नाही. दूसर्‍या दिवशी त्याचा खुलासा झाला. या मान्यवर कवी महाशयांना कवितेची नशा चढायच्या आधी दूसर्‍या ‘नशेची’ सवय होती. प्रतिभा संगमचे संयोजक तसे या बाबत अतिशय खमके. त्यांनी आमंत्रित कवीला तसेच वापस पाठवणे पसंद केले. पण त्याला काव्यरसाच्या ‘नशेत’ आपल्या मंचावर चढू दिले नाही. 

विद्यापीठाच्या पातळीवर युवक महोत्सव घेतला जातो. पण स्वतंत्रपणे विद्यार्थी प्रतिभेला वाव देण्यासाठी साहित्य संमेलनाचे आयोजन मात्र कुठेच करण्यात येत नाही. त्यासाठी विद्यार्थी परिषद चिवटपणे गेली 20 वर्षे हे काम करत आहे यासाठी त्यांना धन्यवाद द्यायला हवे. 

या कार्यक्रमाच्या आयोजना दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने अजून बर्‍याच गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. विद्यार्थी साहित्यीकांमधील प्रतिभा शोधून त्यांना आधी विभागीय किंवा विद्यापीठीय पातळीवर निवडाल्या गेले पाहिजे. मग अशा निवडक विद्यार्थ्यांना राज्य पातळीवर एकत्र केले जावे. सरधोपट सगळेच बरे वाईट लिहीणारे एकत्र गोळा करून तसा फार फायदा होता नाही.

दूसरी सगळ्यात मोठी अडचण वाचनाच्या बाबत आहे. मूळात या तरूण लेखकांनी चांगले वाचन केले पाहिजे. त्यासाठी महाविद्यालयीन पातळीवर वाचक मंच सारखे उपक्रम राबविले जायला हवे. निवडक 100 पुस्तकांची यादी करून ही पुस्तके या लिहीणार्‍या वाचणार्‍या प्रतिभावंत मुलांपर्यंत पोचवायला हवी. अनौपचारिक रित्या ही सगळी मुलं स्थानिक पताळीवर अशा साहित्यीक आयोजनांमध्ये जोडून घ्यायला हवी. मग अशांची मिळून राज्याच्या पातळीवर एक मोठी चळवळ वाढीस लागेल.

पक्षीय मतभेद बाजूला सारून या संमेलनाला मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या श्रीमती निलीमाताई पवार यांनी उदार आश्रय दिला, स्वागताध्यक्षपद स्विकारलं आणि यशस्वीरित्या निभावलं याचीही दखल घेतली पाहिजे. 
     
          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575