Monday, January 25, 2016

साहित्य कोकिळांचे डि‘पियू’ डि‘पियू’



उरूस, पुण्यनगरी, 25 जानेवारी 2016

वसंंत ऋतूत आंबराईतून कोकिळेचा मधुर असा स्वर उमटतो त्याला कुहू कुहू म्हणतात. हिंदीत हा उच्चार पियू पियू असाही केला जातो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे साहित्याचा वसंत ऋतू. हे संमेलन पुण्याजवळ पिंपरी चिंचवड येथे भरले होते. या संमेलनातून एकच नाद सर्वत्र उमटत होता. तो म्हणजे डि‘पियू’ डि‘पियू. 

डिपियू म्हणजे डि.वाय.पाटील युनिव्हर्सिटी. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी.डि.पाटील यांचे सासरे श्री. डि.वाय.पाटील यांचे हे विद्यापीठ. त्यांनीच हे सगळे संमेलन व्यापून टाकले होते. 
संतोष पद्माकर पवार याची कविता आहे (पचायला जड असे काही शब्द बदलले आहेत.)

लोकांना मुर्ख बनवून 
विजयी झालेल्यांच्या मिरवणुकीत
हजार नालायक नाचले 
तरी हरकत नाही
पण एका विवेकी माणसाचा पाय
थिरकला नाही पाहिजे.

अखिल भारतीय साहित्य संमेलन नावाच्या संपत्तीचे हिडीस प्रदर्शन करणार्‍या प्रचंड मोठ्या जत्रेत कितीतरी प्रतिभावंत भान हरपून नाचत सुटले. पण असा कोणी निपजले नाही  की जो ठणकावून म्हणेल, ‘मला निमंत्रण आपण दिले हरकत नाही. पण अशा संमेलनात मी येणार नाही.’ काही जणांनी परस्परच जाणे टाळले. पण त्यांनीही आपली भूमिका स्पष्टपणे मांडली नाही. ते आपल्या घरातच चुप बसून राहिले. यामुळे घडले काय की सर्वसामान्य रसिकांपर्यंत हा संदेश गेला की थोड्याफार पैशाचे आमिष दाखविले की भले भले साहित्यीकही चळायला लागतात. त्यांची काही फार मोठी पत्रास ठेवण्याची गरज नाही. 

या साहित्य संमेलनात ठळकपणे स्वागताध्यक्षाचे फोटो जिकडे तिकडे झळकत होते. बाकी कोण अध्यक्ष, कोण उद्घाटक, कोण समारोपाचा पाहूणा हे कोणाच्याही समोर ठळकपणे आले नाही. हे संमेलन साहित्य महामंडळाच्या हातून केंव्हाच सुटून गेले. पतंगाची दोरी आमच्या हातात असते असं म्हणणारे महामंडळ. प्रत्यक्षात या महामंडळाच्या हातात दोरीही उरली नाही. पतंग गेला दोरी सुटली केवळ चरखीच यांच्या हाती राहिली. 

गेल्या 20 वर्षांमध्ये संमेलनाचे स्वरूप प्रचंड पालटून गेले. 1995 मध्ये मराठवाड्यात परभणीला अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले होते. गोळा झालेली एकूण रक्कम होती 40 लाख आणि खर्च झाला होता 32 लाख रूपये. उरलेल्या 8 लाखांचा ‘अक्षर प्रतिष्ठा’ नावाचा एक ट्रस्ट स्थापन झाला होता आणि त्यामाध्यमातून दिवाळी अंकाचे प्रकाशन, जिल्हा संमेलनं, सांस्कृतिक कार्यक्रम असे 10 वर्षे चालले. आज संमेलनाचा खर्च 5 कोटीच्या पुढे गेला आहे. पंधरापट किमान खर्च वाढला आहे. मग साधा प्रश्न आहे की 1995 मध्ये मराठी ललित वैचारिक साहित्याच्या (ज्यासाठी हे साहित्य संमेलन भरविले जाते) पुस्तकाची आवृत्ती 1100 निघत होती. ती आज कितीवर आली आहे?  सर्वसाधारणपणे आज मराठी ललित वैचारिक पुस्तकाची आवृत्ती फक्त 300 किंवा 500 ची निघते. म्हणजे एकीकडे संमेलनाचा खर्च प्रचंड वाढला आहे. साहित्यीकांचे मानधनही यावेळेस भरपूर दिल्या गेले. मग पुस्तकांची आवृत्ती का कमी निघते आहे? याचे उत्तर कोण देणार? 

कुसुमाग्रजांच्या एका कवितेत ‘मंदिर सलामत तो मूर्ती पचास’ असा उपहास केलेला आहे. मग आपण तसं म्हणायचं का की संमेलनत सलामत तो पुस्तक पचास? पुस्तकांचा विचार करायचाच कशाला. साहित्यीकांना विचारतोच कोण. संमेलन म्हणजे एक भलामोठा इव्हेंट आहे. त्या निमित्ताने मोठी उलाढाल होते आहे. केटरिंग वाल्यांना धंदा मिळतो आहे. मंडपवाले खुश आहेत. शुटिंग करणार्‍यांची चांदी झाली आहे. हॉटेलवाले उत्साहात आहेत. 

इतकंच कशाला पुस्तकांचे जे प्रदर्शन भरलं होतं ते विक्रेते प्रकाशकही  खुश आहेत. कारण पुस्तकांची उलाढाल प्रचंड झाली. आता कोणती पुस्तके विकली गेली ते विचारू नका. यश कसे मिळवावे, लठ्ठपणा कसा कमी करावा, मधुमेहावर नियंत्रण कसे मिळवाल? माणसं जोडावी कशी? इंटरनेटचा वापर कसा करावा, संगणक शिकण्याची सोपी युक्ती, पुरूषांनी करावयाच्या सोप्या पाककृती,  बाळाची चाहूल अर्थातच आजीबाईचा बटवा, चित्रे रंगवा, ओरिगामी वगैरे वगैरे. 

गेली काही वर्षे संमेलनात जी पुस्तके विकली जातात त्यांचा साहित्याशी काहीही संबंधच उरला नाही. मुळात साहित्य संमेलनाचा आणि साहित्याचाच काही संबंध उरला नाही. परिसंवादात बोलणारे बरेच वक्ते  असे निर्माण झाले आहेत की ते कोणत्याही संमेलनात कुठेही कोणत्याही विषयावर किमान अर्धा घंटा बडबड करू शकतात. 

संमेलनाचा अध्यक्ष, त्याला कुणी  विचारायला तयार नाही. तो काही महत्त्वाचे साहित्यीक विषय मांडतो आहे असंही नाही. तो काही फार मोठा दर्जेदार वाचकप्रिय साहित्यीक आहे असेही नाही. वक्ते काय बोलतात त्याचेही काही कुणाला फारसे महत्त्व शिल्लक नाही. कविसंमेलनातील कवितांच्या आठवणी आजकाल मनात दरवळत नाहीत. साहित्य महामंडळ स्वागताध्यक्षाच्या दावणीला पूर्णपणे बांधलेले आहे हे या संमेलनाने सिद्ध झाले. सर्वसामान्य वाचकांबाबत बोलावे तर आलेल्या कित्येकांना ते कशासाठी आले तेच माहित नसते. केवळ मोठी जत्रा आहे. भरपूर लोक गोळा झाले आहेत. अमिताभ बच्चन, माधुरी दिक्षीत, मकरंद अनासपुरे, आशा भोसले, लता मंगेशकर, शाहरूख खान वगैरे वगैरेसाठी आलो असेच जास्तीत जास्त लोक सांगतिल. ज्या प्रतिभावंत साहित्यीकांसाठी हे संमेलन आहे असं म्हणावं तर त्यांनी केंव्हाच आपले सारे सत्व स्वागताध्यक्षाच्या पायी गहाण ठेवले आहे. मग हे संमेलन हवेच कशाला? 

संमेलनाच्या एकूण खर्चापैकी किती रक्कम साहित्यीकांवर प्रत्यक्ष खर्च झालेली आहे? ठाण्याच्या साहित्य संमेलनात पाच वर्षांपूर्वी एक कोटी बारा लाखांपैकी केवळ साडेचार लाख रूपये साहित्यीकांच्या मानधन व प्रवासखर्चावर झाल्याचे समोर आले होते. या संमेलनातही सगळी मिळून ही रक्कम दहा पंधरा लाखाच्या पुढे जात नाही. मग हे बाकीचे पैसे खर्च झाले कशावर? गाडीखालून चालणार्‍या कुत्र्याला वाटते की आपण गाडी चालवतो. हळू हळू कुत्राच इतका मोठा झाला की गाडीचा बैल त्याच्यापुढे लहानच झाला इतकेच नाही तर तो केविलवाणा झाला. गाडीतली माणसेही हतबल झाली. गाडीवानाने तर केंव्हाच कासरा सोडून दिला. कुत्र्याने शेपटी हलवली की त्या प्रमाणे आपण हलायचे इतकेच आता गाडी-बैल-गाडीवान-गाडीतील माणसं यांच्या हातात उरलं असं दिसतं आहे.

कुसुमाग्रजांचीच विशाखातील एक कविता आहे

नवलाख तळपती दिप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणि करते व्याकुळ केंव्हा
त्या माजघरातील मंद दिव्यांची वात

आजही छोट्या छोट्या गावात पहाटे आलेले वृत्तपत्र एखादा म्हातारा उन्हात बसून डोळे फोडून वाचत बसतो. त्यातील एखादा लेख आवडला तर त्या लेखकाला आवर्जून फोन करून आपली भावना साध्या शब्दांत व्यक्त करतो. आजही शाळेत एखादा पोरगा सुट्टीच्या वेळात डबा खाणं झाल्यावर शाळेच्या भंगार झालेल्या वाचनालयातून एखादे फाटके पुस्तक घेवून वाचत बसतो. आजही एखादी म्हातारी दुपारी खिडकीजवळ बसून पोथी वाचत काहीतरी पुटपुटत राहते. आजही छोट्या गावातील एखादा उमेदीचा कवी आपली नवी कविता उत्साहाने फेसबुकवर टाकतो आणि तथाकथित मोठ्या म्हटल्या जाणार्‍या एखाद्या साहित्यीकाची त्यावर काय प्रतिक्रिया येईल याची वाट पहात बसतो. आजही तालूक्याच्या गावी निवृत्त झालेला एखादा शिक्षक गावच्या वाचनालयात व्याख्यानाचा कार्यक्रम होण्यासाठी धडपड करतो. आलेल्या व्याख्यात्याला प्रेमानं घरी नेवून जेवू खावू घालतो... अशा मंद दिव्यांच्या वाती उजळत आहेत. तेवढीच आशा आहे. बाकी संमेलन नावाचा झगमगाट ज्यांना छान वाटतो त्यांना वाटत राहो. 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

Monday, January 18, 2016

चली चली रे पतंग मेरी चली रे

उरूस, पुण्यनगरी, 18 जानेवारी 2016

निळ्याभोर आभाळात मुक्तपणे उडणारा पतंग स्वातंत्र्याचे आनंदाचे प्रतीक नेहमीच वाटत आलेला आहे. जानेवारी महिन्यात संक्रांतीच्या काळात आभाळात डोलणारे पतंग मनाला उत्साही करतात. गुजरातमध्ये पतंगाचे अतोनात वेड आहे. संक्रांतीचे तीन दिवस (भोगी, संक्रात, कर) अक्षरश: लाखो पतंग आभाळात उडताना अख्ख्या गुजरातमध्ये आढळतात. अहमदाबादला मोठा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव भरतो. 

जुन्या हिंदी चित्रपटात पतंगावरचे एखादे गाणे हमखास असायचे. पतंगावरचे सगळ्यात सुंदर गाणे भाभी (1957)  चित्रपटात आहे. चित्रगुप्त या गुणी पण काहीसा बाजूला राहिलेल्या संगीतकाराचा हा सगळ्यात ‘हिट’ चित्रपट. यातील ‘चल उड जा रे पंछी’ या गाण्यानं मोठी लोकप्रियता मिळवली होती. पतंगाचे हे सुंदर गाणे लता आणि रफीच्या आवाजात आहे. राजेंद्रकृष्ण सारख्या गीतकाराने मोठ्य नजाकतीने हे गाणे लिहीले आहे. 

चली चली रे पतंग मेरी चली रे
चली बादलों के पार
हो के डोर पे सवार
सारी दुनिया ये देख देख जली रे

या गाण्यात एक अतिशय चपखल शब्द राजेंद्रकृष्ण यांनी वापरला आहे. 
रंग मेरे पतंग का धानी
हे ये नील गगन की रानी
याओळी मध्ये धानी हा शब्द आला आहे. ‘धानी’ रंगाला मराठीत जो पर्यायी शब्द आहे तो आहे ‘आनंदी’. बायका साड्यांचा बाबतीत हा शब्द नेहमी वापरतात. आनंदी रंगाची साडी म्हणजे निळ्यातील उजळ छटेची साडी. इंग्रजीत कॉपर सल्फेट ब्लु असा शब्द यासाठी आहे. हा पतंगाचा रंग त्या निळ्या आभाळाचेच प्रतिक आहे. आनंदाचे प्रतिक आहे. असंच राजेंद्रकृष्ण यांना सुचवायचे आहे. हे गाणे जगदीप आणि नंदावर चित्रित आहे. गाण्याचे अतिशय साधे पण लयदार शब्द आणि चित्रगुप्तचे मधुर संगीत अगदी जुळून आले आहे. या एका चित्रपटाने चित्रगुप्तला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. त्यामानाने त्याच्या इतर चित्रपटांना ती लाभली नाही. निळ्या रंगावर बोरकरांनी लिहीताना 
असे नाना गुणी निळे
किती सांगू त्यांचे लळे
त्यांच्यामुळे नित्य नवे 
गडे तूझे माझे डोळे
अशा फारच सुंदर ओळी लिहील्या आहेत. 

दुसरं गाणं प्रत्यक्ष पतंगावरचे नाही. पतंगाचे प्रतिक वापरलेले आहे. रागिणी (1958) या चित्रपटात  किशोर कुमार पद्मिनीवर यांच्यावर हे गाणे चित्रित आहे. आशा भोसले गाण्याचे सुरवात करते
पिया मै हू पतंग तू डोर
मै उडती चारो ओर
मेरा दिल ये जवा
रहे बस मे कहा 
जब छायी घटा घनघोर
आता खरं तर पतंगाचा आणि पावसाळी हवेचा काही संबंध आहे का? पण हिंदी चित्रपट गीतांमध्ये अशा काही प्रश्नांना जागाच नाही. किशोरकुमार आशा भोसलेच्या सुरांना साद घालतो
बांकी अदा नैना मतवाले
चाल नयी अंदाज निराले
प्यार का जादू दिल पर डाले
आंख मिला कर निंद चुरा ले
पतंग राहिला बाजूला आणि प्रीतीचा पतंगच डोलत राहतो

तिसरे गाजलेले गाणे नागिन (1954) चित्रपटातील आहे. हेमंत कुमारच्या संगीतातील बीन या चित्रपटानंतर विलक्षण लोकप्रिय झाली होती. ‘मन डोले मेरा तन डोले’ ने अजूनही रसिक डोलतात. यात हेमंत कुमार लताच्या आवाजात मोठं गोड गाणं आहे
अरी छोड दे सजनीया
छोड दे पतंग मेरी छोड दे
एैसी छोडू ना बलमवा
नैनवा के डोर पहले छोड दे
हे गाणंही राजेंद्रकृष्ण यांनीच लिहीले आहे. रागिणी सारखेच या गाण्यात पतंगाला प्रेमाचे प्रतिक म्हणून वापरले आहे.

'पतंग' नावाचा एक चित्रपट 1960 मध्ये आला होता. राजेंद्रकुमार माला सिन्हाच्या यात भूमिका आहे. अंधळ्या मुलीची भूमिका माला सिन्हाने केली आहे. ओमप्रकाशवर चित्रित रफीच्या आवाजातील पतंगावरचे गाणे यात आहे. 
ये दुनिया पतंग
नीत बदले ये रंग
कोई जाने ना 
उडानेवाला कौन है
साध्या गाण्यातून जगण्याचं तत्त्वज्ञान समोर उलगडत गेलं आहे. गाणं फारसं लोकप्रिय झालं नाही. चालही फार काही वेगळी नाही. पण यात पतंगाचे जे रूपक जिवनासाठी वापरले ते मोठे मस्त आहे.
सब अपनी उडाये ये जान न पाये
कब किसकी चढे किसकी कट जाये
ये है किसको पता कब बदले हवा
और डोर इधर से उधर हट जाये
हो वो डोर या कमान
या जमिन आसमान
कोई जाने ना बनाने वाला कौन है
अगदी साध्या शब्दात जगण्याचे तत्त्वज्ञान आले आहे.

हिंदी चित्रपट गाण्यातील माधुर्य 1970 नंतर संपत गेलं. मग बहुतांश सख्येने आलेली गाणी निव्वळ गोंगाट होती. कल्याणजी आनंदजी यांनी ‘5 राइफल्स’  (1974) मध्ये एक गाणं दिलं आहे. ‘प्यार की पतंग डोर जिसके हाथ है, किस्मत भी उसके साथ है, जो ले उडा लो ले उडा’. राजेंद्रकृष्ण यांनीच हे गाणं लिहीलं आहे. पण त्याचे चिज़ करणारे संगीतकार नंतर उरले नाहीत. किशोरकुमार सारखा चांगला आवाज आहे. पण गाणं मात्र कानाला गोड वाटत नाही. 

बाकी काही गाण्यांमध्ये पतंगाचा उल्लेख शम्मा परवाना मधला पतंग म्हणून आहे. स्वतंत्र पतंगावर गाणे नाही.


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, January 11, 2016

शारंगदेव महोत्सव पार्वती दत्ता आणि महागामी

उरूस, पुण्यनगरी, 11 जानेवारी 2016


तेराव्या शतकात काश्मिरमधील संगीत विद्वान शारंगदेव यास देवगिरीच्या यादवांनी सन्मानाने आपल्या दरबारात बोलावून घेतले. त्याला राजाश्रय दिला. याच शारंगदेवाने ‘संगीत रत्नाकर’ या शास्त्रीय संगीतातील पायाभूत ग्रंथाची निर्मिती देवगिरीच्या परिसरात केली. सातशे वर्षानंतर एका नृत्य कलाकाराला या भूमिचे आकर्षण वाटले. तेंव्हा जसे देवगिरीच्या यादवांनी शारंगदेवाला आमंत्रित केले होते तसेच महात्मा गांधी मिशन संस्थेने या नृत्यांगनेला आमंत्रित केले. संस्थेचे आमंत्रण तिने स्विकारले आणि महात्मा गांधी मिशन संस्थेच्या रम्य आवारात ‘महागामी’ या कला अकादमीची स्थापना केली. कलकत्त्यात जन्मलेल्या, भोपाळमध्ये वाढलेल्या, दिल्लीत शिकलेल्या या नृत्यांगनेचे नाव आहे सुश्री पार्वती दत्ता. 

जानेवारी महिना म्हटलं की संक्रांतीचा तिळगुळ आणि निळ्या आभाळात विहरणारे हजारो पतंग सगळ्यांना आठवतात. पण गेल्या सहा वर्षांपासून औरंगाबादकरांना यासोबत अजून एका गोष्टीची आवर्जून आठवण येते. ती म्हणजे महागामीच्या वतीने भरविण्यात येणारा ‘शारंगदेव महोत्सव’. हा महोत्सव सुरू करणे आणि आजपर्यंत ती परंपरा यशस्वीरित्या संपन्न करणे यामागे उभी असलेली नृत्यांगना म्हणजे गुरू पार्वती दत्ता.

मुळच्या कलकत्त्याच्या असलेल्या पार्वती दत्ता आई वडिलांसोबत पुढे भोपाळमध्ये आल्या. उच्च पदावर काम करणार्‍या अभियंता आई वडिलांच्या पोटी जन्मलेली ही मुलगी स्वाभाविकच अभियंताच होईल असे नातेवाईक मित्रमंडळींना वाटायचे. पण नृत्याची असलेली अंगभूत ओढ तिला शांत बसू देईना. भोपाळ शहरापासून दूर औद्योगिक वसाहतीत राहतानाही सांस्कृतीक कार्यक्रमांसाठी शहरात या कुटूंबांच्या नियमित चकरा व्हायच्या. नृत्याशिवाय पुढे काहीच दिसेना तेंव्हा भोपाळ सोडून दिल्लीत जायचा निर्णय त्यांनी स्वबळावर घेतला. जून्या काळातही अभियांत्रिकी पदवी मिळवून मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या त्यांच्या आईने त्यांना पाठबळ दिले. आत्मविश्वास दिला. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणार्‍या त्यांच्या वडिलांना या कलेचे महत्त्व माहित होते. त्यांनी प्रोत्साहन दिले.   

गुरू बिरजू महाराज व गुरू केलुचरण महापात्रा यांच्याकडे गुरूकुल परंपरेने त्यांनी कथ्थक व ओडिसीचे शिक्षण घेतले. शिकत असतानाच्या त्यांच्या लक्षात येत गेले की आधुनिक काळात ज्या पद्धतीनं कलेचे शिक्षण दिल्या-घेतले जाते ते कामाचे नाही. शिष्य म्हणजे मुलासारखा आहे असं समजून गुरूकुल परंपरेत शिकवले तरच नृत्यासारखी कला पुढे नेता येईल. मोठ्या शहरांमध्ये जाण्यापेक्षा कलेचे कुठलेही फारसे वातावरण नसलेल्या गावात काम करणे हे खरे आवाहन असेल असे मानून त्यांनी औरंगाबादहून आलेले महात्मा गांधी मिशन संस्थेचे आमंत्रण स्विकारले.

महागामी गुरूकुलची सुरवात झाली तेंव्हा फक्त 10 विद्यार्थी होते. गेल्या 20 वर्षांत 2000 पेक्षा जास्त शिष्य इथे शिकले. अनुभूती या उपक्रमा अंतर्गत विविध रसिकांसमोर ही नृत्यकला रसग्रहणासाठी सादर केली जाते. जवळपास एक लाखांपेक्षा जास्त रसिकांनी यात आपला सहभाग आत्तापर्यंत नोंदवला आहे. 

केवळ नृत्य शिकविणारी एक संस्था असे स्वरूप न राहता महागामी म्हणजे कला संस्कृतीचे एक केंद्र म्हणून विकसित झाले पाहिजे असा दृष्टीकोन पार्वती दत्ता यांनी सुरातीपासून ठेवला. या परिसरात काम करत असताना या प्रदेशाचे सांस्कृतिक वैभव, येथील परंपरा याचाही शोध त्या घेत गेल्या. औरंबादला आल्यावर त्यांच्या या क्षेत्रातील कितीतरी स्नेह्यांनी त्यांना चिडवायला सुरवात केली की ‘तूम उस औरंगजेब की गांव मे बस चुकी हो जो संगीत के बारे मे क्या जानता था!’ पार्वती दत्ता यांना देवगिरी परिसर आणि त्या परिसरातील वेरूळ अजिंठा लेण्यांमधील कलेने कायमच आकर्षित केले होते. शारंगदेव, गोपाल नायक सारखे महान कलाकार विद्वान याच परिसरात घडले. तेंव्हा परत एकदा या जून्या लोकांच्या रचनांचा अभ्यास झाला पाहिजे. त्यांचे स्मरण झाले पाहिजे याची तीव्र जाणीव पार्वती दत्ता यांना झाली. 

इ.स. 2011 पासून शारंगदेव महोत्सवाची सुरवात झाली. भारतात संगीत विषयक खुप महोत्सव आहेत. पण त्यात कुठेही संगीतावर चर्चा, निबंध प्रस्तूती, संगीत संशोधनासाठी प्रोत्साहन, संगीताचे रसग्रहण हा भाग फारसा येत नाही. शारंगदेव महोत्सवात मात्र आवर्जून यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. दरवर्षी संगीतात महत्त्वाची कामगिरी करणार्‍या एका कलाकाराला ‘शारंगदेव सन्मान’ प्रदान करण्यात येतो. आत्तापर्यंत धृपद गायक उस्ताद झिया फरिदउद्दीन डागर, कथ्थक गुरू पद्मविभुषण पं. बिरजू महाराज, बांसरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया, भरतनाट्यम गुरू पद्मा सुब्रमण्यम, विदुषी कपिला वात्सायन, कथ्थक गुरू कुमुदिनी लाखिया यांना हा सन्मान देवून गौरविण्यात आले आहे.

शारंगदेव महोत्सवात कितीतरी दुर्मिळ वाद्य, संगीत प्रकार यांचे दर्शन रसिकांना झाले. सुरबहार सारखे वाद्य जे की फारसे प्रचलित नाही, रूद्रवीणा तर ऐकायलाच भेटत नाही. धृपद गायकीही फारशी कानावर पडत नाही. यांचा आवर्जून समावेश या महोत्सवात पार्वती दत्ता यांनी केला आहे. शास्त्रीय नृत्यासोबत कितीतरी लोकनृत्याचे प्रकार भारतात आढळतात. लोकसंगीतानेही आपला देश संपन्न आहे. राजस्थानातील मांगनियार संगीत असो, इम्फाळ मधील पुंग चोलम असो, पुरूलिया जिल्ह्यातील छाऊ नृत्यप्रकार असो यांचाही आस्वाद शास्त्रीय नृत्य, वाद्यासोबत रसिकांना शारंगदेव महोत्सवात घेता आला आहे. यावर्षी पंडवानी गायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या छत्तीसगढच्या पद्मभुषण तिज्जनबाई आपली कला रसिकांसमोर सादर करणार आहेत. 
अनेक मोठमोठ्या कलाकारांनी आपली कला समर्पित भावनेने या महोत्सवात सादर केली आहे. प्रचंड मोठ्या छगमगाटी महोत्सवात हजारो प्रेक्षकांसमोर शास्त्रीय संगीत सादर करताना समाधान भेटत नाही ही खंत अनेक कलाकार जाहिरपणे व्यक्त करत आहेत. अशा कलाकारांसाठी शारंगदेव महोत्सव हे एक आशादायी असे व्यासपीठ निर्माण झाले आहे. महात्मा गांधींच्या नावामुळे या परिसराला एक तात्त्विक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. अमजद अलि सारखा आंतरराष्ट्रीय किर्तीचा सरोदवादक या मंचावर आपली कला सादर करतो तेंव्हा त्याच्याही नकळतपणे त्याच्या सरोदमधून ‘रघुपती राघव राजाराम’ सारखी धुन निघते आणि रसिकही त्यावर डोलायला लागतात. 

‘ऑरा औरंगाबाद’ नावानं एक उपक्रम महागामीने चालविला आहे. परदेशी पर्यटक औरंगाबादला मोठ्या संख्येने येतात. त्यांना या परिसरात वास्तव्य असताना आपल्या कला परांपरांची ओळख व्हावी यासाठी हा उपक्रम आहे. तरूण प्रतिभावंत कलाकार आपली कला या पर्यटकांसाठी सादर करतात. पार्वती दत्ता यांनी याबाबत माहिती देताना मोठी कलात्मक बाब समोर आणली आहे. वेरूळच्या कैलास लेण्यात शिवतांडव मुद्रेतील मुर्ती पाहिल्यावर पर्यटकांना जर परत संध्याकाळी शहरात आल्यावर शिवतांडव नृत्य प्रत्यक्ष पाहिला मिळाले तर त्यांना किती आनंद वाटेल. हे प्रत्यक्ष त्यांनी घडवून आणले आहे. वेरूळ अजिंठा पाहणारे पर्यटक संध्याकाळी महागामी परिसरात त्याच मुद्रा कलेच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवतात. 

लहान मोठी अनेक मुले मुली या परिसरात ओडिसी, कथ्थकचे शिक्षण घेतात. खरं तर शिक्षण घेतात असं म्हणण्यापेक्षा जीवनाकडे कलेच्या दृष्टीने कसे पहावे हे समजून घेतात असं म्हणावे लागेल. 

स्वत: एक आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कथ्थक व ओडिसी नृत्यांगना असलेल्या पार्वती दत्ता यांनी आपले आयुष्यच महागामी साठी समर्पित केले आहे. आपल्या आईसोबत त्या जेंव्हा या परिसरात आल्या तेंव्हा अगदी परिसराची स्वच्छताही आपणच कशी केली हे सांगताना त्यांना कुठे कमीपणा वाटत नाही. गांधीजींच्या तत्त्वाने या संस्थेचे कामकाज आपण कसे चालवतो हे सांगताना त्यांचे डोळे उजळून निघतात. त्यांच्या बोलण्यातला खरेपणा जाणवतो कारण त्यांनी स्वत: खादीचे सुती वस्त्रच नेसलेले आपल्या डोळ्यांना दिसत असतात. त्यांच्या गुरूकुलात स्वच्छता करणार्‍या महिलेची ओळखही त्या ‘मेरी सबसे पुरानी कलिग है !’ अशी करून देतात. जन्माने बंगाली असलेल्या पार्वती दत्ता यांनी विशेष मेहनत करून आपली भाषा बनवली. त्यांची हिंदी भाषा ऐकून मी त्यांना गमतीनं ‘ऐसी हिंदी को हम आयुर्वेदिक हिंदी बोलते है !’ म्हणालो तेंव्हा त्या लहान मुलासारख्या खळखळून हसल्या. त्यांची इंग्रजीही अतिशय डौलदार आहे. चांगला कलाकार हा चांगला प्रशासक असतो असे नाही. पार्वती दत्ता यांच्यात हा दुर्मिळ  योग जुळून आला आहे. 

येत्या 15 ते 17 जानेवारी दरम्यान 6 वा ‘शांरगदेव महोत्सव’ औरंगाबाद येथे संपन्न होत आहे. शारंगदेवाच्या भुमीत सांस्कृतिक बीजांची जी पेरणी पार्वती दत्ता करत आहेत त्याला चांगली फळं येवोत हीच कलेची देवता नटराजाच्या चरणी प्रार्थना.  
     
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, January 3, 2016

‘रंगीला प्यार का राही’ सुबीर सेन काळाच्या पडद्याआड


उरूस, 3 जानेवारी 2016

टांग्यात काळी टोपी घातलेला हास्य अभिनेता मेहमुद आणि साध्या साडीतील शुभा खोटे ही जोडी, पार्श्वभूमीला टांग्याचा ठेका सुरू होतो आणि पुढच्या गाण्यावर सगळं थिएटर नाचत उठतं. 

मै रंगीला प्यार का राही 
दूर मेरी मंझिल 
शौक नजर का तीर तूने मारा
दिल हुआ घायील.
तेरे लिये ही संभाल के रखा था
प्यार भरा ये दिल
तेरे इशारोंपे चलता रहेगा
ओ मेरे कातिल

हे गाजलेलं गाणं होतं 1959 च्या ‘छोटी बहन’ या चित्रपटातील हसरत जयपुरीने लिहीलेले. लताचा आवाज सगळ्यांच्याच ओळखीचा आणि आवडता होता. पण सोबतचा नवखा आवाज जो आजही रसिकांच्या कानात आहे, जो आवाज हेमंतकुमार सारखा वाटायचा पण हेमंतकुमारचा नव्हता. तो होता सुबीर सेन या बंगाली गायकाचा. कलकत्यात मंगळवार 29 डिसेंबर 2015 सुबीर सेनचे वयाच्या 81 व्या वर्षी कॅन्सरने निधन झाले.
अतिशय मोजकी पण लक्षात राहणारी गाणी हे सुबीर सेनचे वैशिष्ट्य. 1950 ते 1980 या काळात त्याची गाणी बंगालीत खुप गाजली. त्यामानाने त्याला हिंदीत फार थोडी गाणी मिळाली. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हेमंतकुमारशी मिळता जुळता त्याचा आवाज. त्यामुळे त्याची वेगळी छाप हिंदी चित्रपट सृष्टीत पडू शकली नाही.

’कठपुतली’ (1957) हा शंकर जयकिशन चा राज कपुर प्रॉडक्शन शिवायचा एक गाजलेला चित्रपट. या चित्रपटात सुबीर सेनचे गाणे ‘मंझिल वोही है प्यार की, राही बदल गये, सपनोंके महफिल मे हम तूम रहे’ आहे. पियानोवर बसलेला बलराज साहनी आणि सहज सोप्या हालचालींतून नृत्यविभ्रम करणारी वैजयंतीमला. सुबीर सेनेचे एकट्याचे त्याच्या हिंदी गाण्याच्या कारकीर्दीतील हे सगळ्यात सुंदर गाणे. त्यानंतर वर उल्लेखिलेले त्याचे लता सोबतचे सगळ्यात सुंदर गाणे ‘मै रंगीला प्यार का राही’. 

1959 मध्ये अर्धांगिनी नावाचा एक मीनाकुमारी राजकुमार यांचा चित्रपट आला होता. त्याला वसंत देसाईचे संगीत होते.  ‘झनक झनक पायल बाजे’ मध्ये लता-हेमंत च्या आवाजात नैन से नैन नाही मिलावो’ हे गाणे वसंत देसाई यांनी दिले होते. त्याच गाण्याची छाया वाटणारे अर्धांगिनी मध्ये सुबीर सेन आणि लताच्या आवाजात ‘प्यार मे मिलना सनम’ हे गोड गाणे त्यांनी दिले आहे. 

पुढे 1960 मध्ये मोहिंदर ने महलों के ख्वाब मध्ये राजा मेहंदी अली खान च्या ‘गर तूम बुरा ना मानो’ या गाण्याला गोड चाल बांधली आहे. ठोकळा प्रदीप कुमार आणि खट्याळ मधुबाला साठी सुबीर सेन आणि आशा भोसलेचा आवाज आहे. 

देव आनंद वहिदा रहमानच्या ‘रूप की रानी चोरों का राजा’ मध्येही सुबीर सेनचा आवाज आहे. शंकर जयकिशनचे हे धार्मिक गाणे गंगेच्या काठावर चित्रित आहे. ‘आ जा रे आ जा रे आजा नैन दुलारे’ हे गाणे सुबीर सेन शिवाय आशाच्या आवाजातही आहे. गंगेत स्नान करून पुण्य मिळते या भावनेने आलेले भाविक, त्यांच्या गंगास्नानाच्या पार्श्वभूमीवर सुबीर सेनचा भारदस्त पण भावून आवाज उठून दिसतो. शंकर जयकिशनने याला संगीतही वेगळे दिले आहे.

राजेंद्रकुमार वैजयंतीमाला यांचा ‘आस का पंछी’ हा चित्रपट 1961 मध्ये आला. शंकर जयकिशनचे संगीत या चित्रपटाला होते. या चित्रपटाचे शिर्षक गीतच मुळी सुबीर सेनच्या आवाजात आहे. एनसीसी कॅडेटच्या वेशातील राजेंद्रकुमार हातातील कबुतर हवेत सोडून सायकलवर बसून हसरत जयपुरीचे शब्द आणि सुबीर सेनचा आवाज घोळवत निघाला आहे. मागे मोकळे आभाळ आणि त्यात उडणारे पक्षी. 
दिल मेरा एक आस का पंछी 
उडता है उंची गगन पर 
पहुंचेगा एक दिन कभी तो 
चांद की उजली जमीन पर 
(पुढे 1969 मध्ये माणसाने चंद्रावर पहिले पाऊल टाकले). याच चित्रपटात ‘धिरे चलाओ जरा’ हे लतासोबतचे सुबीर सेनचे गाणेही छान आहे. 

शंकर जयकिशनशी सुबीर सेनचे सुर चांगलेच जुळले होते. पुढे 1964 मध्ये ‘अपने हुऐ पराये’ या चित्रपटात ‘गगन के चंदा न पुछ मुझको’ हे लता सोबतचे गोड गाणे सुबीर सेनचे शंकर जयकिशनने दिले आहे. मनोज कुमारच्या अगदी सुरवातीच्या चित्रपटांपैकी हा चित्रपट. 

शंकर जयकिशन शिवाय इतरही संगीतकारांनी सुबीर सेनचा आवाज वापरला. दत्तराम वाडकरने ‘जबसे तूम्हे देखा है’ (1963) सुबीर सेन सुमन कल्याणुरच्या आवाजात ‘चांद तले झुम झुम थिरक रही है घुंगरवालीया’ हे ठेकेदार गाणे दिले आहे. ठेकेदार यासाठी की दत्तराम त्याच्या तबल्याच्या बेहतरीन ठेक्यासाठी प्रसिद्ध होता. ठोकळा प्रदीप कुमार आणि नटखट गीताबाली वर हे गाणे चित्रीत आहे. कराचीचा सिंधी संगीतकार बुलो सी रानी यानेही सुबीर सेनचा आवाज आपल्या अनारबाला (1961) मध्ये ‘बहारे लुटा के’ या गाण्यात सुमन कल्याणपुर सोबत वापरला आहे.

‘हसता हुआ नुरानी चेहरा’ या गाजलेल्या गाण्यात लता सोबत जो आवाज होता तो कमल बारोट हीचा. कल्याणजी आनंदजी हे आधी कल्याणजी वीरजी शहा नावाने एकटेच संगीत द्यायचे. त्यांनी कमल बारोट आणि सुबीर सेन यांना घेवून ‘ओ तेरा क्या कहना’ (1959) चित्रपटात एक गाणे दिले आहे. मेहमुदवरचे हे गाणे ‘दिल लेके जाते हो कहा’ बर्‍यापैकी गाजले होते. 

हिंदी चित्रपटांत एक काळी गाण्याची अतिशय निकोप अशी स्पर्धा होती. त्यामुळे हेमंत कुमार सारखा आवाज म्हणून असलेल्या सुबीर सेनला खुद्द हेमंत कुमार यांनीच आपल्या चित्रपटात गायल्या लावल्याची दुर्मिळ घटनाही घडली आहे. लता, आशा, सुमन या त्यावेळच्या महत्त्वाच्या गायिकांसोबत गाणे गाणार्‍या सुबीर सेनच्या वाट्याला गीता दत्त सोबतही गाणे गायची संधी मिळाली आहे. ‘गोरी तोरे नटखट नैना, वार करे छूप जाये’ या सुबीर सेनच्या ओळींना ‘सैंय्या तेरे रसभरे बैना, सारी सारी रात जगाये’ असं सुंदर उत्तर गीता दत्त देते. शैलेंद्रच्या शब्दांना दोघांनीही अतिशय योग्य न्याय दिला आहे. 

बॉयफ्रेंड (1961) सं. शंकर जयकिशन, मासुम (1960)सं. रॉबीन बॅनर्जी, पासपोर्ट (1961) सं.कल्याणजी आनंदजी, जादू महल (1962) सं. बुलो सी रानी, रूप सुंदरी (1964) सं. सरदार मलिक. असे काही मोजके चित्रपट सुबीर सेनला मिळाले. पण त्याची छाप पडू शकली नाही. नंतर तो जास्त करून बंगाली संगीताकडेच वळला. त्याची बंगाली गाणी बरीच लोकप्रियही झाली. मोठ्या गायकांची छाप पडून त्या प्रभावाखाली येवून गाण्याची पद्धत हिंदीत आहे. सैगलच्या प्रभावात किशोर कुमार मुकेश होते याची साक्ष त्यांची सुरवातीची गाणी देतात. मोहम्मद रफी जी.एम. दुर्रानीच्या प्रभावात गायचा. लतावर नुरजहांचा प्रभाव होता. लताच्या आवाजाची छाया सुमन कल्याणपुरवर होती. रफीच्या छायेत तर महेंद्र कपुर, शब्बीर कुमार असे बरेच गायक होते. ज्यांना या प्रभावातून आपला वेगळा सुर गवसला ते टिकले. ज्यांना गवसला नाही ते काळाच्या ओघात लुप्त झाले. 

हेमंत कुमार गेल्यानंतर धर्मवीर भारती यांनी लिहीलं होतं ‘शोर और सुर मे येही फर्क होता है. शोर खत्म हो जाता है. और सुर खो जाता है. हेमंत कुमार का सुर आज खो गया.’ हेमंत कुमारची छाया असणारा सुबीर सेन आपल्यातून निघून गेला. त्याच्याही बाबतीत हेच म्हणावे लागेल. सुबीर कुमार का सुर आज खो गया. 
स्वर्गात बसून सुबीर सेन हेमंत कुमार समोर बसून गीता दत्त सोबत त्यांचेत गाणेख ‘गोरी तेरे नटखट नैना’ गात असेल.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575