Tuesday, October 28, 2014

आंदोलनास वर्ष उलटले । रस्त्याचे ना भाग्य पलटले ॥



                         दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 28 ऑक्टोबर 2014 


बरोबर एक वर्षापुर्वीची गोष्ट आहे. रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ते हे न समजल्यामुळे औरंगाबाद शहरातील सामान्य नागरिक वैतागुन शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरले. एकाही राजकीय पक्षाने जनतेच्या गंभीर समस्यांकडे लक्ष दिले नव्हते परिणामी आपणच काही तरी करू म्हणून हे नागरिक रस्ता रोको करण्यासाठी पुढे आले. या आंदोलनास लोकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. पोलिसांनी आंदोलन करणार्‍यांना समज दिली. महानगरपालिकेच्या सबंधित अधिकार्‍यांनी रस्ता चांगला करण्याचे कागदोपत्री आश्वासन दिले. सगळ्यांना वाटले आता रस्ता दुरूस्त होईल. 

आंदोलनाचा खरा धसका घेतला राज्यकर्त्यांनी. त्यांनी पोलिसांवर दबाव वाढवला. दुसर्‍या दिवशी पोलिसांनी आंदोलन करणार्‍या तिघांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावून त्यांच्यावर कार्रवाई करण्याचा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा पुरूषार्थ दाखवला. एरव्ही मोठ-मोठ्या गुन्ह्यांबाबत आणि गुन्हेगारांबाबत लेचीपेची भूमिका स्वीकारणार्‍या पोलिसांनी या सामान्य माणसांवर कार्रवाई करताना मोठाच उत्साह दाखवला. यातील एकाने जामिन नाकारून तुरूंगात जाणे पसंद केले. त्याला तुरूंगात घालून शासनाने स्वत:चीच आब्रू घालवून घेतली. 

स्वातंत्र्याची साठी उलटून गेली आणि अजूनही चांगला रस्ता नागरिकांच्या नशिबी नाही. उलट या मागणीसाठी आंदोलन करणार्‍याला सरकार जेलमध्ये टाकते. यावर इतर सामान्य नागरिकांनी, समाजातील प्रतिष्ठीतांनी, माध्यमांनी सरकारला धारेवर धरले. परिणामी या नागरिकाची बीनशर्त सुटका करावी लागली. निवडणुका तोंडावर होत्या. जनतेला वाटले आता काहीतरी होईल. 

रस्त्यावर उतरून आंदोलन करणे, कायदा हातात घेणे याला काही विचारवंत पत्रकार विरोध करतात. त्यांचे म्हणणे असते कायद्याचे राज्य आहे. तेंव्हा जे काय व्हायचे ते कायद्याच्या मार्गाने व्हावे. हे आंदोलन होण्याच्या 1 महिना आधीच रूपेश जयस्वाल या तरूणाने उच्च न्यायालयात रस्त्याच्या संदर्भात एक जनहित याचिका दाखल केली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लगायच्या आत रस्त्याची कामं सुरू झाली पाहिजेत असा आग्रह याचिकेत करण्यात आला होता. महानगरपालिकेने थातूर मातूर पद्धतीने 13 रस्त्यांची कामं सुरू करू असं आश्वासन त्यावेळी न्यायालयात दिलं. काही रस्त्यांची कामं सुरूही झाली. आज यालाही सात महिने उलटून गेले. एकाही रस्त्याचं काम अद्याप पूर्ण झालं नाही.

मधल्या काळात लोकसभेची निवडणुक झाली. जनतेने दिल्लीतील सरकार बदलून दाखवले. आता विधानसभेचाही निकाल लागला आहे. जे मुंबईत सत्तेत होते त्यांची तर औरंगाबाद शहरात अमानत रक्कमही जप्त झाली. निवडणुकीच्या माध्यमातून शांतपणे सरकार बदलून जनतेने आपली ताकद दाखवून दिली. वैध मार्गाने जनता न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहे तर त्यांना अजून न्याय मिळत नाही. रस्त्यावर उतरत आहे तर त्यांना तुरूंगात घातले जात आहे. इतकं झालं तरी अजूनही ज्या रस्त्यावर आंदोलन झाले तो रस्ता तसाच आहे.

आता करावे तरी काय? आता औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यांची आचारसंहिता केंव्हाही लागू शकते. परत आचारसंहितेचे नाव पुढे करत काहीही न करण्याचा जन्मसिद्ध अधिकार बजावायला सरकार मोकळे.

भर दिवाळीत शहरात कचर्‍याचे मोठ मोठे ढिग साठले होते. कारण काय तर जे स्वच्छता कर्मचारी आहेत ते संपावर गेले होते. त्यांना दिवाळीचा बोनस हवा होता शिवाय सुट्टीच्या दिवशी न केलेल्या कामाचे पैसेही हवे होते. या कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य करत कसा बसा संप मिटवला गेला. आज कुठल्याही शहरात कचर्‍याचे ढिग जिथे साठलेले असतात त्या ठिकाणी काही बायका आणि लहान मुले कचर्‍यात काही तरी वेचत बसलेले आढळतात. हे लोक काय गोळा करत असतात? फेकुन दिलेल्या गोष्टीमध्ये यांना काय मिळतं?

उस्मानपुर्‍यात कचरा वेचणार्‍या कोंडाबाई नावाच्या महिलेला विचारले, ‘मावशी तुम्ही काय वेचता अहात? याचा तुम्हाला काय फायदा?’ ती बाई म्हणाली, ‘बाबा आम्ही प्लॅस्टिक, कागद, काच, लवा-लोखंड असं काही मिळालं तर ते शोधतो.’ ‘मग त्याचे काय करता?’, ‘हे आम्ही भंगारवाल्या मोहसिनभाईला विकतो.’ ‘तूम्हाला त्याचे किती पैसे मिळतात?’, ‘शंभर दोनशे कसे बसे मिळतात भाऊ.’ मावशी यापेक्षा भिक मागीतली तर काय वाईट? कशाला इतकी मरमर करता? इतक्या घाणीत हात घालता? 

त्या कोंडाबाईने या प्रश्नावर जे उत्तर दिले ते समाजाच्या तोंडात मारणारे होते, ‘भाऊ, भीक मागायचे कशाला सांगतूस. त्याला तरी मेहनत करावी लागतीया. छिनाली केली तर जास्तीचा पैसा फुकटच मिळतो. आमी इज्जतीची रोटी खातो भाऊ. पोटापुरतं भेटलं की बास झालं. पोटाखालचे बेकार धंदे करायची नियत नाही आपली.’ 

एक सामान्य बाई शहरातला कचरा वेचून त्यातून भंगार वेगळं काढते. ते विकून आपलं पोट भरते. तीला कुठलाही बोनस भेटत नाही. तिच्यासाठी कुठलीही योजना काम करत नाही. आज कोंडाबाईसारखी शेकडो बायका आणि मुले कचरा वेचित आहेत. कुणापाशीही भीक न मागता, कुठल्याही अनुदानाची मागणी न करता, कुठलीही सवलत न मागता स्वत: तर जगत आहेतच, आपले कुटूंब पोसत आहेत आणि शिवाय मोठ्या समस्येचा डोंगर उचलण्यासाठी जीवतोडून आपली करंगळी लावत आहेत. 

रस्ता, पाणी, कचरा यांसारख्या समस्या प्रचंड पैसा खर्च करून सुटता सुटत नाहीत. आंदोलन करून सुटत नाहीत. कायदेशीर मार्गाने गेलं तरी लवकर निकाल लागण्याची आशा नाही. अशावेळी जी माणसं आपल्या आपल्या छोट्यामोठ्या क्षमतेने या समस्या सोडविण्यासाठी पुढे येतात त्यांच्या पाठीशी जनतेने उभं राहिलं पाहिजे. 

एखाद्या गावात, वसाहतित, सहनिवासात (अपार्टमेंट) धार्मिक कार्यक्रम होतात, जेवणं घातली जातात त्याला काय सरकारच्या निधीची कोणी वाट पहाते काय? लोक वर्गणी गोळा करतात आणि हे उत्सव होतात. त्याप्रमाणे आता इतर समस्यांसाठी लोकांनी पुढाकार घेवून त्याची सोडवणुक केली पाहिजे. खरं तर यासाठीच लोकशाही व्यवस्था आपण स्विकारली होती. पण राजकीय पक्षशाही आणि त्यांना अनुकूल अशी नोकरशाही  यांनी सामान्यांच्या वाटेचा निधी आपल्या पोळीवर ओढून घेतला. आणि हे सगळं परत मतदानाद्वारे लोकांचा पाठिंबा मिळवून. 
एखाद्या घरात चोरी करायची असेल तर चोर कुत्र्याला एखादे हाडूक टाकतो. पण तूझ्या घरात चोरी करायची परवानगी दे म्हणून घरमालकाला हाडूक दाखवत नाही. इथं निवडणुकीत मतदाराला दिलेली लाच मग ती पैशाच्या स्वरूपात असो, आश्वासनाच्या स्वरूपात असो, जाहिराती करून दाखविलेल्या स्वप्नांच्या स्वरूपात असो  किंवा कुठल्याही अन्य स्वरूपात असो ही लाच म्हणजे प्रत्यक्ष घरमालकालाच दिलेले हाडूक आहे. हे हाडूक चघळत बस आणि आम्ही तूझे घर लुटत असताना शांत बसून रहा. असा हा कावा आहे.

काहीही कुठलीही मदत न घेता आपण आपला कचरा वेचून पोटही भरावे आणि समाजाची समस्या सोडविण्यास हातभारही लावावा अशी कोंडाबाईची साधी भूमिका इतर सामान्य माणसांनी स्विकारली पाहिजे. गेली साठ वर्षे आपल्या समस्या न सोडविणार्‍या आणि स्वत:च समस्या बनलेल्या शासनाला हळू हळू मर्यादित करून टाकलं पाहिजे. आवश्यक तेवढा शासकीय हस्तक्षेप ठेवून बाकीच्या अमरवेलीसारख्या वाढलेल्या आयतखाऊ फांद्या कापून टाकायची वेळ आली आहे. इज्जातीचे खाणारी सामान्य कोंडाबाई डोळ्यासमोर ठेवून आम्हीही गैर मार्गाने काम करणाऱ्या नेत्याला, अधिकाऱ्याला मुकपणे पाठींबा देऊन पापात सहभागी होणे नाकारले पाहिजे.

एका साध्या खड्ड्यासाठी केलेल्या आंदोलनाला वर्ष उलटलं तरी काहीही परिणाम होत नाही. तेंव्हा मोठ मोठी आंदोलन करणे आणि त्यामागे शक्ती खर्च करण्यापेक्षा जास्त डोकं लावून परिणामकारक उपाय शोधले पाहिजेत. 
      
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, October 21, 2014

डॉ. प्रकाश बाबा आमटे : चित्रपट नव्हे अनुभूती !


                         दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 21 ऑक्टोबर 2014 

चित्रपटातील प्रसंग आहे. हेमलकसा या आदिवासी भागात मलेरियाची साथ येते. भराभर आदिवासी मृत्यूमुखी पडायला लागतात. एक आदिवासी बाई कडेवर छोटं लेकरू घेवून ‘माझ्या पोराला वाचवा’ म्हणत रडत ओरडत येते. प्रकाश आमटे तिला शांत करतात. तिच्या बाळावर उपचार चालू करतात. पोराला लावायला सलाईन नसते. आता काय करायचे असा विचार करत असताना त्यांचा सहकारी एक सलाईनची बाटली घेवून येतो. ही कुठून आणली? असा प्रश्न विचारताच तो उत्तरतो की ज्या म्हातार्‍याला ही लावली होती तो मेला आहे. आता हीचा त्याला काय उपयोग? 

रात्रभरच्या वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देत तो मुलगा वाचतो. त्याची आई पहाटे म्हणायला लागते, ‘याच्याकडे थोडावेळ लक्ष द्या. मी जरा जावून येते.’ आमट्यांचा सहकारी तिला जाऊ देत नाही. आत्ताच कुठे मुल वाचले आहे. आता तू कुठू निघालीस. पण ती बाई अस्वस्थपणे चुळबुळ करत राहते. शेवटी न राहवून ती प्रकाश आमटेंच्या टेबलापाशी येते. तेही दोन रात्रींपासून न झोपता रूग्णांची सेवा करत थकून गेले असतात. ही बाई भकास डोळ्यांनी उदास स्वरात सांगते, ‘साहेब मला जावून येवू द्या. जरा या लेकराकडे लक्ष ठेवा. माझा नवरा आधीच मेला होता. दोन लेकरं वाचावी म्हणून त्यांना घेवून पळत निघाले. एक लेकरू वाटेतच मेलं. त्याला झाडाखाली ठेवून आले. जनावरांनी खावू नये म्हणून त्याच्यावर काटे कुटे टाकून आले. आता जावून त्याला मातीआड करून येते. तोवर तूमी याकडे लक्ष द्या.’

या प्रसंगावर काय भाष्य करणार? अशाप्रसंगी व्यक्त करायची भाषा अजून जन्माला यायची आहे. आपण चित्रपट पाहतो आहोत, आजूबाजूला इतके लोक बसलेले आहेत हे सारे विसरून आपल्या डोळ्यातून अश्रुच्या  धारा वहायला लागतात. चित्रपट म्हणून या प्रसंगाची काय चिकित्सा करायची ते समीक्षक करो पण एक सामान्य प्रेक्षक मात्र या दृश्याने हादरून जातो. 

डॉ. प्रकाश बाबा आमटे : अ रिअल हिरो’ हा चित्रपट सामान्य प्रेक्षकांना हलवून सोडतो. कुठेही आक्रस्ताळेपणा न करता, आरडा ओरडीची भाषा न वापरता, भडकपणा न करता दिग्दर्शक समृद्धी पोरे हीने ही किमया साधली आहे.

नाना पाटेकर यांच्यावर विचित्रपणाचा, आक्रस्ताळी भाषा वापरण्याचा जो आरोप एरव्ही केला जातो तो पूर्णपणे खोडून काढत आपण कसे उच्च दर्जाचे अभिनेते आहोत हेच त्यांनी सिद्ध केले आहे. याचा उत्तम पुरावा म्हणजे चित्रपटातील एक प्रसंग. आपल्या आईवर अत्याचार करणार्‍या पोलिस अधिकार्‍याचा खुन करून सुड उगवणारा पुरू हा छोटा मुलगा आमटे दांपत्याच्या हाती लागतो. या मुलाला त्याचे आयुष्य या मार्गाने वाया जाईल म्हणून ते समजून सांगतात.  आमटेंच्या घराबाहेर नक्षलवादी येवून बसतात आणि मागणी करतात की हा मुलगा आमच्या ताब्यात द्या. तो आम्हाला जगू देणार नाही. या सगळ्या प्रसंगात नाना पाटेकर केवळ एकच वाक्य बोलतो ‘समझो वा मर गया’. ते नक्षलवादी निघून जातात. पुढे हा मुलगा मोठा होतो, परदेशात मोठ्या नौकरीवर लागतो. हा सगळा प्रसंग नाना पाटेकरने एका वाक्यावर तोलला आहे.
प्रकाश आमटे यांनी हेमलकश्यात उभे केलेले काम त्यांना मॅगेसेस पुरस्कार देवून गेले. तेंव्हा इतर सर्व गोष्टींना फाटा देवून नेमकेपणाने हाच विषय परिणामकारक पद्धतीने समृद्धी पोरे यांनी चित्रपटातून समोर आणला आहे.

आदिवासींसाठी काम करण्यासाठी एनजीओ चालविणे यावर मोठी टिका बर्‍याचदा केली जाते. अशा एनजीओजना मिळणारा मोठा परदेशी निधी या या टिकेचा मुख्य विषय असतो. बर्‍याच एनजीओ बाबत हे खरेही आहे. पण प्रत्यक्षात असे काम किती अवघड आहे. एक तर पुरेसा पैसा मिळत नाहीच, शिवाय सरकारी पातळीवरही अशा कामांची कशी उपेक्षा होते, अडवणूक होते याचे फार चांगले चित्रण चित्रपटात केल्या गेले आहे. 

काही अनाथ, जखमी झालेले प्राणी आमटेंच्या लोकबिरादरी प्रकल्पात गोळा होतात. त्यांचे एक अनाथालय आपसुकच तयार होते. त्याची पहाणी करायला आलेला सरकारी अधिकारी मठ्ठ शासकीय व्यवस्थेचा नमुनाच असा दाखवला आहे जे की वास्तव आहे. ज्याला डिअर म्हणजे हरिण हे स्पेलिंगही कसे माहित नसते. ज्याची भाषा कशी अरेरावीची असते हा प्रसंग फार चांगला रंगवला आहे.

आदिवासींसाठी काम करताना अनंत अडचणी येतात तसे आनंदाचे क्षणही येतात. एका जख्ख म्हातारीच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला असतो. ती महिनाभरापासून उपचारासाठी चकरा मारीत असते. पण शहरातून कोणी डॉक्टर तिच्यावर उपचारासाठी येत नाही. आणि तिला बाहेर नेणे शक्य नसते. शेवटी डॉ. प्रकाश आमटे स्वत: नेत्ररोग तज्ज्ञ नसताना तिच्यावर उपचार करण्याचे धाडस करतात. तिचे ऑपरेशन होते. तिच्या डोळ्यावरची पट्टी काढताना सगळे श्वास रोखून पहात राहतात.आणि जेंव्हा ती सुरकूतल्या चेहर्‍याची म्हतारी दृष्टी आल्याच्या आनंदाने आपल्या हातातील लाकडी चमचा उचलून माडिया भाषेत काहीतरी उद्गार काढते तेंव्हा प्रेक्षकही त्या आनंदात सहज सामिल होवून जातात.

आजूबाजूचा निसर्ग आणि त्यात राहणारे अदिवासी यात रमणारे आमटे दांपत्यही निसर्गात मिळून मिसळून जातात. त्यांचे जे घर चित्रपटात दाखवले आहे ते फार सुंदर आणि त्यांच्या निसर्गप्रेमाची साक्ष देणारे आहे. त्यांची मुलंही पुढे यातच रमून जातात. आमटेंच्या नातवाने शाळेत पाळीव प्राणी कोणते असा प्रश्न विचारल्यावर ‘वाघ, सिंह’ असं लिहीलं आणि मास्तरांनी त्याला कसे गुण दिले नाहीत. मग आमटे यांनी शाळेत जावून सांगितलं की खरंच आम्ही हे प्राणी पाळले आहेत असं नव्हे तर ते आमच्या कुटूंबाचाच कसा भाग आहेत. हा प्रसंग मोठा मजेदार उतरला आहे.  

सगळ्या चित्रपटभर प्रकाश आमटेंच्या थटेखोर स्वभावाची छाया पसरली आहे. हे श्रेय अर्थातच नाना पाटेकर यांच्या अभिनयाचे आहे.  मंदा आमटेंचे काम करताना सोनाली कुलकर्णी यांनी आपल्या हसतमुख चेहर्‍याने चांगली साथ दिली आहे. सगळ्या चित्रपटभर सोनाली कुलकर्णीच्या स्वच्छ परिटघडीच्या साड्या मात्र थोड्याशा खटकतात. थंडीत कुडकुडणार्‍या लहान मुलाला पाहून बीनबाह्याची बंडी आणि खाली चड्डी अशा साध्या वेषातच राहण्याचा संकल्प करणार्‍या प्रकाश आमटेंसोबत काम करताना आणि त्यातही वीजही न पोचलेल्या हेमलकश्यात वावरताना मंदाताईंचे कपडेही मळले असतील किंवा त्यांना एक साधेपणा आपोआपच आला असणार. पण ही फार छोटी गोष्ट आहे. आमटे नदीत आंघोळ करताना त्यांच्या बरोबर वाघही आंघोळ करतो. हा वाघ खरा नसून तो ऍनिमेशनने बनवला आहे. हे लक्षात येतं. पण यानं फार काही बिघडत नाही. खरं तर या चित्रपटाकडे चिपटाचे निकष लावून पाहता येणारच नाही. आमटेंच्या जिवनाची सामाजिक बाजू प्रकर्षाने मांडण्याचा काम हा चित्रपट करतो हेच महत्त्वाचे आहे. 

एरवी काही करत नाही म्हणून ज्याच्यावर टिका होते त्या महाराष्ट्र शासनाने या चित्रपटाला करमुक्त करून एक चांगले काम केले आहे. मराठी प्रेक्षकांनी चित्रपटाला मोठी गर्दी करून आपल्या सामाजिक जाणिवांवर शिक्कामोर्तब केले आहे.

चांगले चरित्रात्मक चित्रपट मराठीत फार कमी आहेत. नुकताच जब्बार पटेल यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर आणि चंद्रकात कुलकर्णी यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर  सुमार दर्जाचा चरित्रपट काढून मराठी प्रेक्षकांना  नाराज केले आहे. अतिशय ताकदीच्या या दिग्दर्शकांनी अपेक्षाभंग केला असताना समृद्धी पोरे या नविन तरूणीने एक अतिशय चांगला चरित्रपट द्यावा हा अनपेक्षीत सुखद असा धक्का आहे. चित्रपटात एकच गाणे आहे. लहान मुलांना शिकविण्याचा प्रयास करताना हे गाणे चित्रित झाले आहे. ही खरं म्हणजे एक प्रार्थना आहे. ती चांगली आणि समर्पक अशीच आहे. बाकी चित्रपटात गाण्यांना फारसा वावही नाही. बर्‍याचदा चरित्रपट कंटाळवाणे होत जातात. पण इथे तसं काही दिग्दर्शकिने होवू दिलं नाही. प्रकाश आमटे यांच्या जिवनातील निवडक प्रसंग घेवून चित्रपटाची गती चांगली ठेवली आहे. 

साध्या भाषेत आदिवासींच्या प्रश्‍नांची दाहकता आपल्यासमोर हा चित्रपट मांडतो. नक्षलवाद्यांची समस्या अतिशय त्यांची बाजू न घेता पण त्यांच्या बाजूचा विचार करून इथे मांडली आहे. शासनाने करमुक्त केलेला हा चित्रपट मराठी प्रेक्षकांनी जरूर पहावा.  

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, October 14, 2014

लता गाते शमशाद, गीता, आशा सोबत तेंव्हा...

                       दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 14 ऑक्टोबर 2014 

(राज कपूरच्या  चित्रपटासाठी गीता चा आवाज कधीच वापरला गेला नाही. जिस देश मे गंगा बेह्ती हे या चित्रपटात मात्र गीता चा आवाज होता. त्या प्रसंगी लता गीता आणि राज कपूर असे दुर्मिळ छायाचित्र ....) 


लता मंगेशकर यांचा उल्लेख नुसता लता करण्यात कुणाला लेखकाचा उद्धटपणा दिसू शकेल. पण ही सलगी लता मंगेशकर नावाच्या व्यक्तीसाठी नसून त्या स्वर्गीय सुरांसाठी आहे. जसे की तुकारामाबद्दल आपण बोलतो ते त्या शब्दांशी आपला जिव्हाळा असतो म्हणून. आईच्या नातेवाईकांना नाही का आपण हक्कानं अरे तूरे म्हणतो तसेच या सलगीचे- जिव्हाळ्याचे स्वरूप आहे. 

नुकताच लताचा वाढदिवस होवून गेला. (जन्म 28 सप्टेंबर 1929). लताबद्दल प्रचंड प्रमाणात लिहीलं गेलं आहे. तिच्या आवाजाचे विश्लेषण बर्‍याचजणांनी केलं आहे. हे सगळं करत असताना काही एक दंतकथा खर्‍याखोट्या पसरल्या किंवा पसरवल्या गेल्या. यात एक मुद्दा नेहमी मांडला जातो तो म्हणजे लताने राजकारण करून सोबतच्या गायिकांना कसे पुढे येवू दिले नाही. खरं तर गाणं ही सादरीकरणाची कला आहे. लताच्या समकालीन सर्वच गायिकांचा आवाज आपल्याला ऐकायला उपलब्ध आहे. तेंव्हा दुसर्‍या कोणी काही सांगण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष ऐकून काय ते ठरवू शकतो. 

लताने आपल्या काळात जी गाणी गायिली त्यात या समकालीन गायिकांसोबत गायिलेली गाणीही आहेत. ती ऐकताना लता आणि समकालीन गायिका यांची आपण तूलना सहज करू शकतो. पण अशी तुलना करण्यापेक्षाही यातील काही सुंदर गाणी निवडून त्यांचा आनंद घेणे हे जास्त चांगले. 

हिंदी चित्रपटात पार्श्वगायनाची पद्धत खर्‍या अर्थाने रूजविणारी पहिली मोठी गायिका म्हणजे शमशाद बेगम (जन्म १४ एप्रिल १९१९). त्या काळात नुरजहा, सुरैय्या यांसारख्या अभिनेत्री-गायिका होत्या नुसत्या गायिका नव्हत्या. पुरूषांचेही तसेच सैगल, श्याम सारखे गायक-नट होते. लताच्या आधीपासून शमशाद गात होती आणि पार्श्वगायनास प्रतिष्ठा मिळवून देण्यात तीचा मोठा वाटा होता. लता आणि शमशाद यांचे मिळून जवळपास तीस तरी गाणी आहेत. 

1949 मध्ये शंकर जयकिशनने संगीताचा बाज बदलला. नवीन नायिकासाठी नवीन आवाजांची गरज होती. नर्गिस, वैजयंतीमाला, मधुबाला या नव्या नायिकांना शमशादचा आवाज शोभून दिसत नव्हता. तिथे लता-आशा-गीताचाच आवाज आवश्यक वाटायला लागला. पण शमशादच्या आवाजाला एक विशिष्ट पोत आहे. लोकसंगीतासाठी लागणारा खडा आक्रमक असा हा आवाज त्या  शैलीतील गाण्यात फारच शोभून दिसतो. लता-शमशाद यांचे सर्वोत्तम गाणे मोगल-ए-आजम (1960) मधील ‘तेरी मेहफील मे किस्मत आजमाकर हम भी देखेंगे’ हे आहे. या लोकप्रिय कव्वालीत प्रेमाचे शारिरपातळीवर समर्थन करताना निगार सुलातासाठी शमशाद आणि प्रेमाचे मानसिक पातळीवर समर्थन करताना मधुबालासाठी लता असे आवाज वापरून शकिल बदायुनीच्या शब्दांचे चीज नौशाद यांनी केले आहे. खडा खणखणीत मोकळा आवाज आणि पातळ कोवळा स्वरांची बारीक कलाकुसर करणारा आवाज यांची एक जुगलबंदीच आपल्याला अनुभवायला मिळते. यात कोण मोठे कोण छोटे असं काही आपल्या मनात येतच नाही.

लताची समकालीन दुसरी गायिका गीता दत्त (जन्म 23 नोव्हेंबर 1930). गीता  आणि लता यांनी जवळपास 19 गाणी सोबत गायली आहेत. या दोघींच्या गाण्यातील चार गाणी फारच सुंदर आहेत. पहिले गाणे लडकी चित्रपटातील (1953) मधील आहे. आर सुदर्शन व धानीराम या अपरिचित संगीतकार जोडीने हे गाणे दिले आहे. या चित्रपटातील जास्त गाणी सी. रामचंद्र यांच्या नावावर आहेत. पण त्यांनी मात्र गीताचा आवाज वापरला नाही. ‘मन मोर मचावे शोर घटा घनघोर छायी घिर घिरके’ असे राजेंद्र कृष्ण यांचे गीताचा गोडवा वाढविणारे बोल आहेत. तरूण कोवळ्या वयाची दोन वेण्या घालणारी डोक्याशी रिबीनीचे फुल बांधणारी वैजयंतीमाला हीच्यावर हे गाणे चित्रित झाले आहे.  

लता-गीताचे दुसरे सुंदर गाणे ‘तुफान और दिया’ या चित्रपटातले आहे. वसंत देसाई यांनी लहान बहिण भावांवरती बेतलेले हे गाणे भरत व्यास यांनी लिहिले आहे. याचे शब्दच किती लयबद्ध आहेत-‘मेरी छोटीसी बहन, देखो गहने पहन, ससूराल चली रे बन ठन के’ वसंत देसाई यांनी एका ठिकाणी मुलाखतीत सांगितले की भरत व्यास यांचे शब्द स्वत:च एक चाल घेवून येतात. खरंच भरत व्यास यांच्यासारखा अनुप्रास कुणीच वापरला नाही. 

मदन मोहनने संगीतबद्ध केलेल्या ‘देख कबीरा रोया’ (1957) मधील ‘हम पंछी मस्ताने’ हे मस्तीखोर गाणे लता-गीताच्या आवाजात आहे. शुभा खोटे आणि अमिता यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे. साड्यांचे पदर कमरेला खोचलेले, शुभा खोटे माऊथ ऑर्गन वाजवित आहे, वेण्यांचे शेपटे उडत आहेत, बाजूला समुद्राच्या लाटा खळाळत आहेत आणि इकडे लता-गीताचे सुरही हिंदकळत आहेत. राजेंद्र कृष्ण यांच्या या गीतातील एक ओळ बघा, लता गाते आहे ‘धरती को छोड के पिछे बादल के पार जाना है’ आणि त्याला गीता उत्तर देते ‘चुन चुन के शोख तारोंको एक आशिया बनाना है’. रसिकांच्या मनात या दोघीं स्वरांचा सुंदर आशिया निर्माण करतात. लता-गीताचे सर्वात सुंदर गाणे वसंत देसाई यांच्या ‘गुंज उठी शहनाई’ मध्ये आहे. या गाण्याचे शब्द भरत व्यास यांचे आहेत. ‘आखिया भूल गयी है सोना, दिल पे हुआ है जादू टोना, शहनाईवाले तेरी शहनाई रे कलेजवा को चीर गयी चीर गयी ची ऽऽऽऽ र गयी..’ या शब्दांमध्ये जो खट्याळपणा आहे तो गीता दत्त च्या आवाजात जास्तच उठून दिसतो. गाण्याची सुरवातही गीताच्याच आवाजाने झाली आहे. लताचा आवाज हा गीताच्या खट्याळपणाला पोषक असा आहे. इतरवेळी गीताचा आवाज पोषक भूमिकेत वापरला आहे. इथे उलटे झाले आहे. 

लता-आशा या तर आवाजाची जातकुळी तपासली तरी बहिणी आहेत हे सिद्धच होते. दोन स्त्रीयांच्या आवाज वापरायचे तर त्यातील एक आवाज पुरूषी तत्त्वासारखा वापरायची त्या काळात पद्धत होती. म्हणजे तो थोडा जाडसर, मोकळा, टिपेचा वगैरे असावा. त्याप्रमाणे शमशाद, मुबारक बेगम अगदी गीताचाही वापरला आहे. पण लता किंवा आशा यांचा आवाज असा कधीच कुठल्याच संगीतकाराने पुरूषी तत्त्वाने वापरला नाही. लता आणि गीता यांच्या आवाजातील मोहकता गोडवा खट्याळपणा चपळपणा असं सगळं घेवून तयार झालेलं एक अफलातून मिश्रण म्हणजे आशाचा आवाज. लता-आशा अशी जवळपास साठ गाणी हिंदी चित्रपटांत आहेत. त्यातील सर्वांत सुंदर गाणं म्हणजे उत्सव (1985) मधील ‘मन क्यु बहेका रे बहेका आधी रात को’ हे होय. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी वसंत देव यांच्या शब्दांना जे काही रूप दिलं आहे त्याला तोडच नाही. रेखा आणि अनुराधा पटेल यांनी हे गाणं पडद्यावर साकार केलं आहे. एका कडव्यात रेखा संपूर्ण दागिन्यांसह असते तर सोबत अनुराधा साध्या वेशात आणि पुढच्या कडव्यात अनुराधा संपूर्ण साजशृंगारात तर रेखा साध्या कपड्यांत. तसाच लता आणि आशाचा सूर लागलेला आहे. या गाण्याचे ध्वनीमुद्रणही अप्रतिम झाले आहे. राजन साजन मिश्रा यांचे गाणे म्हणजे कसे तर एक जिथे सोडतो तिथून दुसरा उचलतो. दुसरा जिथपर्यंत आणून सोडता तिथून पहिला पुढचा प्रवास चालू करतो. लता-आशा यांच्या आवाजाचे असेच स्वरूप आहे. गरज आहे तिथे हे आवाज मिसळून जातात, गरज आहे तिथे आपले वेगवेगळे अस्तित्व स्पष्टपणे सिद्ध करतात. 

मुबारक बेगम सोबत लताचे एकच गाणे आहे. बारादरी (1955) चित्रपटात शौकत देहलवी नाशाद या संगीतकाराने या दोघींचा आवाज वापरला आहे. पण हे गाणे फार काही विशेष नाही. सुमन कल्याणपुर आणि लता यांचेही एकच गाणे आहे. चांद चित्रपटात (1959) हेमंतकुमार यांच्या संगीताने नटलेले हे एक नृत्य गीत आहे. सारख्या वेशातील दोन नर्तिकांवर हे गाणे चित्रित केले आहे. लताच्या आवाजाची छायाच सुमन कल्याणपूर आहे हे जणू संगीतकाराला सुचवायचे आहे. हे गाणेही फारसे विशेष नाही. ममता (1966) मध्ये रोशन ने लता-सुमन-रफी असे एक सुंदर गाणे ‘रहे ना रहे हम’ गावून घेतले आहे. पण यातही लताच्या आवाजात हे गाणे स्वतंत्र आहे. तर सुमन-रफी असे द्वंदगीत आहे. कदाचित त्या काळी लता रफी सोबत गात नसल्यामुळे अशी तडजोड करण्यात आली असावी. प्रत्यक्षात लता व सुमन एकसाथ असे या गाण्याचे स्वरूप नाही. 

लताच्या 85 व्या वाढदिवशी तिच्या जून्या गाण्यांचा धांडोळा घेणे फारच आनंददायी आहे. प्रत्यक्षात हिंदी चित्रपट संगीतातील राजकारण जे असायचे ते असो, रसिकांच्या कानात मात्र सुरांचे माप सर्वच कलाकारांनी भरभरून टाकलं आहे. 1949 ते 1965 हा काळ हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ. या काळातील सर्वात प्रभावी आवाज लताचा आणि सर्वात प्रभावी संगीत शंकर जयकिशनचे होते हे दर्जा आणि संख्या दोन्हीच्या पातळीवर खरे आहे.  
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
तेरे मेहफिल मे, अखिया भूल गायी हे सोना, मन क्यू बेहाका या तीन गाण्याची link.....
http://www.hindigeetmala.net/song/teri_mahafil_men_kismat_aazamaa.htm
http://www.hindigeetmala.net/song/akhiyan_bhul_gayee_hain_sona.htm
http://www.hindigeetmala.net/song/man_kyon_bahakaa_re_bahakaa.htm

Tuesday, October 7, 2014

बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात


                    दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 7 ऑक्टोबर 2014 

औरंगाबाद शहरातील प्रसंग आहे. कवी वा.रा.कांत यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम सादर करीत असताना ‘बगळ्यांची माळ फुले’ हे गाणे मरावाड्यातील सुरेल गायक संजय जोशी यांनी गायला सुरवात केली आणि रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कांतांना जावून 23 वर्षे उलटून गेली.  6 ऑक्टोबर 1913 हा कांतांचा जन्मदिवस. आज कांत असते तर ते 101 वर्षांचे असते. कांतांच्या कविता त्यांच्या 9 कवितासंग्रहातून मराठी वाचकांच्या समोर आहेत. पण त्यांची आठवण रसिकांना सारखी येत राहते ती ‘त्या तरूतळी विसरले गीत’, ‘आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको’, ‘सखी शेजारणी तू हसत रहा’, ‘राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहिले’ आणि अर्थातच ‘बगळ्यांची माळ फुले’ सारख्या गीतांमुळे.

नांदेडात जन्मलेल्या कांतांनी निजामी राजवटीत शेतकी खात्यात साधा कारकून म्हणून आपल्या नौकरीची सुरवात केली. पुढे आकाशवाणीच्या मराठी विभागात हैदराबाद व नंतर औरंगाबाद येथे काम करण्याची संधी त्यांना मिळाली. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून कांत निवृत्त झाले. ही झाली त्यांची साधी व्यवहारीक माहिती. पण साहित्याच्या क्षेत्रात कविता, अनुवाद, नाट्य-काव्य अशी किमान 18 पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. शासनाचे पुरस्कार, साहित्य संस्कृती मंडळाची गौरव वृत्ती, साहित्य-कवी संमेलनाची अध्यक्षपदे असे कितीतरी सन्मान कांतांच्या वाट्याला आले. सतत लिहीत राहिलेल्या या कविने एका ठिकाणी मोठं विलक्षण लिहून ठेवलं आहे. 

गाते कोण मनात कळेना 
गाते कोण मनात ॥
जरी शतावधि कविता लिहिल्या
शंभरदा वाचिल्या गाइल्या
शब्द कुणाचा सूर कुणाचा 
अजूनी मला अज्ञात ॥
अभिमानाने कधी दाटता
रचिले मी हे गाणे - म्हणतां
गीतच रचिते नित्य तुला रे - 
फुटे शब्द हृदयांत ॥
मावळते शब्द, मौज प्रकाशन, पृ. 58)

कलेच्या प्रांतातील एक शाश्वत सत्यच कांतांनी लिहून ठेवलंय. आपण कला निर्माण करतो असे नाही तर कलाच आपल्याला कलाकार म्हणून घडवित असते. कलेविषयी एक जाणिव कायम त्यांच्या मनात ताजी असायची. मावळते शब्द या आपल्या शेवटच्या काव्यसंग्रहात त्यांनी सुरवातीला ऋग्वेदातील एक ऋचेचा (ऋग्वेद, 2-28-5) भावार्थ दिला आहे.
 
मी विणितो गाणे तंतु नको रे तोडू
सम येण्याआधी ताल नको रे सोडू

कुठल्याही कलाकाराची परमेश्वराचरणी हीच प्रार्थना असते की मी विणित असलेल्या गाण्याचे धागे तुटू देऊ नकोस. सम येण्याआधी म्हणजेच परिपूर्तता होण्याआधीच हा जो ताल जुळून आला आहे तो सोडायला लावू नकोस. 

कांतांचे आयुष्य तसे परिपूर्ण होते. 78 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. (मृत्यू 8 सप्टेंबर 1991) त्यांचे कवितासंग्रह मौजेसारख्या मान्यवर प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केले. वसंतराव देशपांडे, अरूण दाते, सुधीर फडके सारख्यांनी त्यांच्या गीतांना स्वर दिला. यशवंत देव, श्रीनिवास खळे यांच्यासारखे प्रतिभावंत संगीतकार त्यांना लाभले.

कुठलाही प्रतिभावंत निसर्गाच्या अद्भूत सौंदर्याने हरखून जातो. कांतही याला अपवाद नाहीत. पन्नास वर्षांपूर्वी लिहीलेली ही कविता आजही किती ताजी टवटवीत वाटते. 

सरी श्रावणाच्या येती
शेला पाण्याचा उडतो
पंखा उन्हाचा मधून
थोडा थोडा उमलतो

चिंब भिजून कर्दळ
लाल फुलांनी पेटते
ओल्या आगीत फुलांच्या
शीळ साळुंकी पेरते

मग कलत्या उन्हांत
होते आभाळाचे गाणे
जेथे संपून उरते
उभ्या जन्माचे या देणे  
(मावळते शब्द, मौज प्रकाशन, पृ. 33)

आभाळाचे गाणे झाल्याचा अनुभव आपलं काळीज कलाकाराचं असेल तरच येतो. बा.भ.बोरकर, पांडगांवर, महानोर यांच्यासारख्यांनी मराठीत खुप समृद्ध अशी निसर्ग अनुभवाची कविता लिहीली आहे. कांतांची ही कविता याच समृद्ध परंपरेतली आहे.

अनुवादाचे फार मोठे काम कांतांनी केले. त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. यशपाल शर्मा यांची  ‘मनुष्याची रूपं’  ही हिंदी कादंबरी, मौलना अब्दूल हलीम शर्र यांची उर्दू कादंबरी ‘कालचे लखनौ’, रफिक झकेरिया यांची इंग्रजी कादंबरी ‘सुलतान रझिया’, राजेंद्रसिंह बेदी यांची कादंबरी ‘एक चादर मैलीसी’असे महत्त्वाचे अनुवाद कांतांनी मराठीत केले. मिर्जा गालिबवरच्या हैदर यांच्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवादही त्यांनी मोठ्या रसाळतेने केला. गालिबच्या बर्‍याच कविता त्यांनी मराठीत आणल्या. नाट्यकाव्य हा एक अतिशय दुर्लक्षित काव्यप्रकार कांतांनी मोठ्या ताकदीने हाताळला. पंचेविसच्या जवळपास नाट्यकाव्य त्यांनी लिहीली. मराठीत इतकी नाट्यकाव्य कुणाच्याच नावावर नाहीत.

आज कांतांच्या माघारी आपल्या हातात आहे ती त्यांची कविता, गाणी, नाट्यकाव्य आणि त्यांचे अनुवाद. कुठल्याही कलाकाराला आपण आपल्या कलेच्या रूपाने रसिकांच्या स्मरणात राहू याचा विश्वास असतो. कांतांनीही आपल्या दोनुली या कवितासंग्रहात ‘अस्तित्व’ नावाने छोटेसे चिंतन या संदर्भात लिहून ठेवले आहे. ते मोठे समर्पक आहे. 

साठविता डोळा । सूर्यनारायण ।
उडावे हे प्राण । अचचित ॥
जळात उन्हात । पाखरांच्या माळा ।
बिंबाचा सोहळा । प्रतिबिंबी ॥
सहज गळावे । देहाचे या भान ।
पिकलेले पान । तळ्यामध्ये ॥
बिंबतात झाडे । तीरीची पाण्यात ।
तसे कवितेत । नांदो आम्ही ॥
(दोनुली, मौज प्रकाशन, पृ. 16)

त्यांच्या कवितेत कांत अजूनही नांदत आहेत. कांतांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या समग्र कविता एकत्रित प्रकाशीत होण्याचा संकल्प करण्यात आला होता. हे पुस्तक लवकरच प्रकाशीत होते आहे. 6 ऑक्टोबर या कांतांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे हे छोटेसे स्मरण. 
बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात ।
अजूनही कांत तूम्ही आमच्या स्मरणात । 
 
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575