Friday, September 21, 2012

विठ्ठलाच्या पेक्षा । बडव्यांना भाव । बुडविला गाव । साहित्याचा ।।

------------------------------------------------------------
दि. ६ सप्टेंबर २०१२ दैनिक महाराष्ट्र टाइम्स मधील लेख...
------------------------------------------------------------

विश्व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकारी मिलिंद जोशी यांनी लेख लिहिला होता. त्या लेखातील प्रतिपादनाचा प्रतिवाद करणारा हा लेख... 

प्रा. मिलिंद जोशी यांनी विश्वसाहित्य संमेलनाच्या निमित्ताने लिहिलेला महाराष्ट्र टाइम्स मधील लेख वाचला. मूळ विषय बाजूला ठेवून इतर बाबींची उठवळ चर्चा त्यांनी केली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे असं समजून चालू की आयोजक संस्थेने सगळ्यांचा खर्च देण्याचे मान्य केले. सर्व पदाधिकारी सर्व निमंत्रित पाहुण्यांसह टोरांटोला गेले. संमेलन पार पडले. आक्षेप हा आहे की सरकारी पैशावर १८ फुकट्यांनी जावे काआणि तेही तीन संमेलनांना हे फुकटे आधी जाऊन आले आहेत. साहित्य महामंडळाचे पदाधिकारी अतिशय कष्ट घेतात वेळ खर्च करतात मराठीसाठी काम करतात असा दावा जोशी यांचा आहे. गेल्या तीन विश्र्व साहित्य साहित्य संमेलनात महामंडळाचे पदाधिकारी म्हणून जे कार्यकर्ते गेले त्यांची यादी जाहीर करावी. जे निःस्वार्थ काम करतात असा दावा जोशी यांनी केला आहे ते कधीपासून पदाधिकारी आहेत गेली दहा-वीस वर्षे एखादा कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून काम करतो आहे तो एखाद्या निवडणुकीत पडला आणि त्याच्या विरोधात दुसराच कार्यकर्ता निवडून आला. ज्याने आत्तापर्यंत साहित्य संस्थांच्या कामात कधीच सहभाग घेतला नाही कारण तो कार्यकारिणीत आतापर्यंत नव्हता. आणि महामंडळाने विश्वसंमेलन घेण्याचे ठरविले. नियमाप्रमाणे महामंडळाचा पदाधिकारी म्हणून या कार्यकर्त्याचे नाव यादीत आले. तो शासनाच्या पैशातून वारी करून आला. याला जबाबदार कोण या कार्यकर्त्यानं आजतागायत फारसं काम केलंच नव्हतं. जो नुकताच निवडून आला त्याला लगेच या विश्व साहित्य संमेलनाची लॉटरी लागली. उलट ज्या कार्यकर्त्यांनी कामं केली त्यांची संधी घटक संस्थांनी राजकारणामुळे हिरावून घेतली. अशी कितीतरी नावं महामंडळाच्या यादीत आहेत. त्यांचे करायचे काय आज महामंडळाच्या कार्यकारिणीत वाङ्मयीन कर्तृत्व असणारं मोठं नाव कोणतं उषा तांबे उज्ज्वला मेहंदळे गुरूनाथ दळवी शोभा उबगडे किसन पाटील महेश एदलाबादकर माधवी वैद्य मिलींद जोशी के. एस. अतकरे कौतुकराव ठाले पाटील दादा गोरे कपूर वासनिकभालचंद्र शिंदे विद्या देवधर यांच्या एका तरी पुस्तकाचे नाव सामान्य मराठी वाचकांना सांगता येईल का किंवा या सदस्यांना तरी परस्परांच्या पुस्तकांची नावे माहीत आहेत का 

साहित्यिक पुढे येत नाहीत मग इतर कार्यकर्ते पुढे येऊन निस्वार्थीपणे काम करत असतील मराठीच्या प्रेमापोटी कष्ट करत असतील तर काय बिघडले ?' असा युक्तिवाद केला जातो. अपवाद म्हणून असे कार्यकर्ते असतील तर कोणी काही म्हणणार नाही. पण इथे १८ पैकी एकही नाव साहित्यिक म्हणून परिचयाचे नसेल तर जी विश्व संमेलने झाली त्यातील सर्व पाहुण्यांची यादी महामंडळाने प्रकाशित करावी. जी भाषणे केली गेली ज्या कविता वाचल्या गेल्या त्यांचा तपशील द्यावा. उभा महाराष्ट्र त्याची चिरफाड केल्याशिवाय राहणार नाही. 

जी नावं गेल्यावर्षी जाहीर झाली त्यांच्या वाङ्मयीन दर्जाची चिरफाड माध्यमांनी तेव्हा केली होती. या विश्व संमेलनाबाबत करार झाल्याचे जोशी सांगतात. मग या संमेलनाची कार्यक्रमपत्रिका इतक्या दिवसांत जाहीर का केली नाही जोशी हे (कै.) गं. ना. जोगळेकर यांच्या तालमीत तयार झाले. अर्धशतकाची परंपरा असलेल्या महामंडळाच्या प्रतिष्ठेची त्यांना काळजी आहे मग महामंडळाचे नियतकालिक कधी वेळेवर निघत नाही याची खंत का वाटत नाही टोरांटोवारी हुकली की महामंडळाची प्रतिष्ठा धोक्यात येते मग महाबळेश्र्वर येथे आनंद यादवांचे अध्यक्षपद हुकले तेव्हा मात्र ती येत नाही संमेलनाला अध्यक्ष नसताना महामंडळाने ते संमेलन घेतले. संमेलनाचे अध्यक्षपद महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने कौतिकराव ठाले पाटील यांनीच तेव्हा भूषविले. हे संमेलन तेव्हा महामंडळाला अनधिकृत वाटले नाही. मग ना. धों. महानोर किंवा महामंडळाचे पदाधिकारी नाही आले तरी टोरांटो संमेलनास अनधिकृत का म्हणायचे 

आनंद यादव यांच्याशिवाय महाबळेश्वय येथील संमेलन अधिकृत मात्र आता महानोर यांच्याशिवाय टोरांटोचे संमेलन अनधिकृत. हा कुठला न्याय जुन्या काळी विठ्ठलाच्या ऐवजी बडव्यांनाच मोठा भाव आला होता. त्याच धर्तीवर लेखकांपेक्षा महामंडळाच्या बडव्यांना भाव आला आहे. ज्या ठिकाणी हे फुकटे पदाधिकारी असतील ते संमेलन अधिकृत. इतर सगळं अनधिकृत असा हा खाक्या आहे.नामदेव तुकाराम ज्ञानेश्र्वर एकनाथांच्या काळात साहित्य महामंडळ नव्हते म्हणूनच साहित्य किंवा विश्व संमेलनाचे अध्यक्षपद एकाही संताला लाभले नाही. आज संत तुकाराम असते तर त्यांनी हाच अभंग लिहिला असता... 

साहित्य निर्मितो । ते ते सारे व्यर्थ । प्राप्त झाला अर्थ । महामंडळी ।। 
विठ्ठलाच्या पेक्षा । बडव्यांना भाव । बुडविला गाव । साहित्याचा ।। 
पुस्तक लिहितो । पुस्तक वाचतो । चर्चाही करितो । तो एक मूर्ख ।। 
ग्रंथ मिरवितो । विदेशी फिरतो । झूल पांघरतो । कार्यकर्ता ।। 
रत्नजडित हा । साहित्य गाभारा । त्यात ना अक्षरा । स्थान काही ।। 
मर्सिडिज मध्ये । लेखक फिरती । साहित्य निर्मिती । चर्चा नको ।। 
तुका म्हणे आता । कार्यकर्ता थोर । लिहिणे हे घोर । पापकर्म ।।