Wednesday, August 29, 2012

अग्रलेखाची भाषा फिकी पडावी इतका महामंडळाचा कारभार वाईट!

--------------------------------------------------------------
लोकमानस, लोकसत्ता, बुधवार, २९ ऑगस्ट २०१२ 
--------------------------------------------------------------
‘साहित्यिकानाम् न भयं न लज्जा?’ हा अग्रलेख अतिशय जहाल भाषेत आहे असं काही वाचकांना वाटू शकेल. ज्यांचा मराठी साहित्य महामंडळ अथवा त्या त्या प्रदेशातील साहित्य संस्थांशी फारसा संबंध नाही त्यांनाच असं वाटू शकेल. ज्यांचा या संस्थांशी जवळून संबंध आला आहे त्यांना ही भाषा फारच फिकी वाटेल. गेली चार वर्ष  विश्व साहित्य संमेलन भरवण्यात येत आहे. या वर्षी तर संमेलनाची पत्रिकाच जाहीर झाली नाही. कारण मागच्या वर्षी ज्यांना निमंत्रित साहित्यिक म्हणून बोलावलं त्यांच्या वाङ्मयीन गुणवत्तेची लक्तरे माध्यमांनी वेशीवर टांगली. ‘बाजारबुणगे’ अशी विशेषणं त्यांना लावण्यात आली. त्यामुळे या वर्षी कोण जाणार, हे आयोजकांनी गुपितच ठेवले. अजूनही संमेलनाची विधिवत पत्रिका जाहीर झालेली नाही. ज्यांना बोलावलं आहे त्यांना गुपचूप निमंत्रण पाठविण्यात आलं. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची सध्या निवडणूक चालू आहे. त्यात १०७५ मतदार आहेत. याबाबत कोणी काही शंका व्यक्त केली, काही आक्षेप घेतले की लगेच महामंडळाकडून घटनेची ढाल पुढे केली जाते. घटनेतच तरतूद नाही असं तुणतुणं लावलं जातं. मग घटनेतच तरतूद नसलेलं विश्व साहित्य संमेलन संपन्न कसं होतं? एक-दोन नाही तर तीन संमेलनं पार पडली. अजूनही घटनेत तरतूद नाही. म्हणजे याचा अर्थ घटनेचा वापर सोयीसारखा केला जातो. विश्व संमेलन असो की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असो, यात कुणाला निमंत्रित केलं जातं? त्यांचा दर्जा काय? याचं कुठलंच उत्तर देण्यास महामंडळाचे पदाधिकारी तयार नाहीत. कारण महामंडळाच्या घटनेत साहित्यिकांना निमंत्रण देण्याबाबत काहीच लिहिलेलं नसावं कदाचित. 

सगळी संमेलनं राजकीय नेत्यांच्या दावणीला नेऊन या साहित्यिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी बांधली आहेत, हा जो आक्षेप अग्रलेखात घेतला आहे तो खराच आहे. मी आमच्या गावचं उदाहरण देतो. परभणी येथे ६८ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १९९५ मध्ये झालं होतं. त्याचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री रावसाहेब जामकर हे होते. या संमेलनाचा खर्च ३२ लाख रुपये झाला. एकंदर ४० लाख रुपये जमा झाले होते. त्यातील आठ लाख रुपये उरले. या रकमेचा एक धर्मदाय न्यास (ट्रस्ट) ‘अक्षर प्रतिष्ठा’ या नावानं करण्यात आला. मी स्वत: या संस्थेवर कार्यकारिणी सदस्य म्हणून पाच वर्ष  होतो. पाच वर्षांनंतर इंद्रजीत भालेराव, लक्ष्मीकांत देशमुख, देविदास कुलकर्णी व मी अशा चौघांना वगळून नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी ज्या बँकेत हे पैसे ठेवले होते ती परभणी पीपल्स बँक राजकारणी लोकांनी बुडवली. स्वाभाविकच त्यातील पैसेही गेले. राजकीय व्यक्तींच्या गोठय़ात साहित्य चळवळ नेऊन बांधणाऱ्यांनी उत्तर द्यावं, की कुठं गेले हे पैसे? काय फायदा झाला परभणीच्या साहित्य चळवळीला?  

परळीला गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं होतं. त्या शहरात आता साहित्य परिषदेची शाखा तरी शिल्लक आहे काय? मी मराठवाडा साहित्य परिषदेचा आजीव सभासद आहे. त्यामुळे तिथली मला थोडी माहिती आहे. मराठवाडा साहित्य परिषदेची संमेलनं नजीकच्या काळात कडा (जि. बीड), शिऊर (जि. औरंगाबाद), मुरुड (जि. लातूर), नायगाव (जि. नांदेड), कंधार (जि. नांदेड), उंडणगाव (जि. औरंगाबाद) येथे  झाली. ही संमेलनं राजकीय नेत्यांच्या छत्रछायेखालीच झाली. तेथे साहित्य परिषदेच्या शाखा तरी जिवंत आहेत काय? नायगाव, जि. नांदेड येथे २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी ना. जयंत पाटील संमेलनास हजर होते. २७ च्या रात्री ‘वाजले की बारा’ हा लावणीचा कार्यक्रमही या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर साग्रसंगीत पार पडला. संमेलनाचे आयोजक वसंत चव्हाण नंतर आमदारकीला निवडूनही आहे. मुरुडचे स्वागताध्यक्ष विक्रम काळे हेही शिक्षक मतदारसंघातून (स्वत: शिक्षक नसताना) निवडून आले. उंडणगाव येथील संमेलनाचे स्वागताध्यक्ष तत्कालीन पदवीधर मतदार संघाचे आमदार श्रीकांत जोशी हे होते. संमेलनानंतर तेथील वाङ्मयीन चळवळीसाठी त्यांनी काय योगदान दिलं?

राजकारण्यांचा पदर धरून साहित्य क्षेत्रातील लोकांनी अतिशय लाचारीचं प्रदर्शन घडवलं आहे. यांचा नाद सोडून स्वतंत्रपणे ही व्यासपीठं उभारली पाहिजेत आणि मोठी केली पाहिजेत. 

खरं तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पाच दिवसांचं ठेवून त्यात एक दिवस प्रकाशक परिषदेचं अधिवेशन व एक दिवस ग्रंथालय संघाचं अधिवेशन भरवावं म्हणजे सगळ्यांनाच सोयीस्कर जाईल. यासाठी कुठल्याही बाहेरच्या प्रायोजकाची गरज नाही. दरवर्षी साहित्य संमेलनासाठी जो निधी सरकार देतं त्यातच सर्व आयोजन नेटक्या पद्धतीनं करता येतं. प्रत्यक्ष साहित्य व साहित्यिकांवर होणारा खर्च अतिशय कमी असतो. ठाण्याच्या साहित्य संमेलनात प्रवास खर्च व मानधनावर साडेतीन लाख रुपये खर्च झाले होते, तर फक्त स्मृती चिन्हांचं बिल चार लाखांचं होतं. तेव्हा ही संमेलनं आता असाहित्यिक बनली आहेत. त्यांच्याबद्दल कठोर भूमिका घेतलीच पाहिजे.   

आम्ही परभणी येथे गेल्या दहा वर्षांपासून ‘बी. रघुनाथ महोत्सवा’चं आयोजन कुठल्याही राजकीय व्यक्तींच्या मदतीशिवाय सामान्य रसिकांच्या आश्रयावर करतो आहोत. जागोजागी शुद्ध साहित्यिक हेतूने काम करणाऱ्या अशा संस्था/ व्यक्ती आहेत, त्यांना आपण सगळ्यांनी जमेल तशी मदत केली पाहिजे. संमेलनात जमणाऱ्या या लाचारांच्या फौजांना प्रामाणिकपणे व शुद्ध हेतूनं काम करून उत्तर दिलं पाहिजे.

मी ‘लोकसत्ता’ला अशी विनंती करतो, की अशा महाराष्ट्रभर काम करणाऱ्या साहित्यिक संस्थांची एक बठक आपण अनौपचारिकरीत्या बोलवा. त्यांची एक समन्वयक समिती स्थापन करा. दरवर्षी या संस्थेच्या वतीनं एक साहित्यिक उत्सव आपण भरवून चांगलं उदाहरण दाखवून देऊ. परभणी, औरंगाबाद येथे असा वार्षकि साहित्यिक उत्सव घेण्यास मी स्वत: निमंत्रण देतो. नुसतं बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीनं उत्तर देणं केव्हाही चांगलं. मराठी प्रकाशक परिषद, महाराष्ट्र ग्रंथालय संघ आदी संस्थांचंही सहकार्य यासाठी घेता येईल. 

- श्रीकांत अनंत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.

शेतकरी संघटना आणि टीमअण्णा


---------------------------------------------------------------
२१ ऑगस्ट २०१२ पाक्षिक शेतकरी संघटक मधील अग्रलेख
---------------------------------------------------------------

शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी दि. 3 सप्टेंबर रोजी वयाची सत्त्याहत्तर वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांनी उभारलेली शेतकरी चळवळ 32 वर्षांची झाली आहे. नुकत्याच झालेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनानिमित्ताने पत्रकारांनी शेतकरी संघटना आणि टीमअण्णा यांची तुलना करून काही विचित्र निष्कर्ष मांडले आहेत. खरे तर शेतकरी चळवळीचे मूल्यमापन करीत असताना शरद जोशींनी मांडलेला शेती संदर्भातला विचार हा महत्त्वाचा मानायला पाहिजे आणि तसा तो मानून काही एक तुलनात्मक अभ्यास इतर चळवळींशी केला पाहिजे; पण माध्यमांमधील उठवळ पत्रकारांना आणि बाष्कळ विचारवंतांना इतका आचपेच कुठला? शेतकरी चळवळीतील शेतकर्‍यांचे प्रश्र्न राहिले बाजूला, अण्णांच्या चळवळीने चर्चेला आणलेला भ्रष्टाचाराचा मुद्दा तो राहिला बाजूला आणि तुलना व्हायला लागली राजकीय भूमिकांची.
कुठल्याही चळवळी या समाजाच्या विशिष्ट गरजेतून तयार झालेल्या असतात. समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला म्हणूनच तर त्या फोफावत असतात किंबहुना समाजाच्या प्रतिसादाशिवाय चळवळ होऊच शकत नाही. त्यामुळे शेतकरी चळवळीला मिळालेला सर्वसामान्य शेतकर्‍यांचा प्रतिसाद असो किंवा गेल्या वर्षभरापासून अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांना सामान्य जनतेने दिलेला प्रतिसाद असो हा उत्स्फूर्त होता हे मान्य करायला पाहिजे. इतकंच काय राम मंदिराच्या प्रश्र्नावरून भाजपाने जी रथयात्रा काढली तिलाही मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनतेने प्रतिसाद दिला होता आणि तोही त्या विषयापुरता आणि त्या काळापुरता उत्स्फूर्तच होता; पण हे समजून न घेता जेव्हा प्रतिसाद कमी झाल्याचे दिसले की लगेच माध्यमांनी अण्णा हजारेंवरती टीकास्त्र सोडायला सुरुवात केली. अण्णांनी राजकीय पक्षाची स्थापना करण्यासंदर्भात काही एक हालचाली सुरू केल्या आणि मग तर मोठाच गहजब झाला. जेव्हा अण्णांच्या या निर्णयाची तुलना शरद जोशींनी स्थापन केलेल्या स्वतंत्र भारत पक्षाशी केल्या गेली आणि निष्कर्ष काढताना आत्मघाताकडे नेणारा मार्ग असा केला गेला हा तर फारच अन्यायकारक आणि बेजबाबदारपणाचा आहे. मुळातच एका विशिष्ट टप्प्यामध्ये चळवळी या राजकारणापासून अलिप्त राहू शकत नाहीत हे आम्हाला मान्यच होत नाही. राजकीय भूमिका ही घ्यावीच लागते. अन्यथा लाठ्या-काठ्या खाणारे, रास्तारोको करणारे, तुरुंगात जाणारे यांनी हालअपेष्टा सहन करायच्या, तोशिष लावून घ्यायची, व्यावहारिक पातळीवरील सर्व फायदे दूर लोटायचे आणि भलत्याच उपटसूंभांनी पाच वर्षांतून एकदाच येऊन सगळी मलई खाऊन जायचं हे नेहमी नेहमी का घडावं? त्यामुळे बर्‍याचदा चळवळींमधून राजकीय पक्ष स्थापन होणे किंवा या चळवळींमुळे राजकीय पक्षांना धक्के बसणे स्वाभाविक आहे. इतकं नाही, चळवळींच्या रेट्यामुळे राजकारणाचा पोत बदलणे, दिशा बदलणे किंबहुना एकूणच राजकीय संस्कृतीत बदल होणे हे घडून आलेले आहे. जयप्रकाश नारायण यांची चळवळ ही नंतर राजकीय पक्षात रूपांतरीत झालीच. विश्वनाथ प्रतापसिंग यांनी जनमोर्चा स्थापन करून चळवळ सुरू केली होती. तिलाही राजकीय यश लाभले. देशभर पसरलेल्या रा. स्व. संघाच्या विस्तारातून राजकीय यश मिळत नाही हे पाहिल्यावर भारतीय जनता पक्षाने रामजन्म भूमीच्या माध्यमातून लोकांच्या भावनेला स्पर्श करणारी जी हाक दिली होती. तिच्यातूनही चळवळच तयार झाली आणि तिचाही परिणाम राजकीय यशामध्ये झाला. चळवळीतून आलेले मुलायम सिंग यादव, लालूप्रसाद यादव ही मंडळी सत्ताकारणात मुख्य भूमिका निभावत आहेत ती कशामुळे? म्हणजेच चळवळी या राजकीय पक्षात रूपांतरीत होऊन राजकीय यश मिळवतात हेही घडत आलेलं आहे.
शेतकरी चळवळीने राजकीय पक्षाचा प्रयोग अचानक केलेला नाही. शेतकरी संघटनेच्या सटाणा येथे झालेल्या पहिल्या अधिवेशनात 1982 सालीच सर्व राजकीय पर्याय खुले असल्याच ठराव मान्य केला होता. इतकंच नव्हे 1984, 1989 या दोन्ही लोकसभेच्या निवडणुका तसेच 1985 व 1990 या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका यात सक्रीय भूमिका घेतली होती. 1990 साली शेतकरी संघटनेचे पाच कार्यकर्ते जनता दलाच्या चिन्हावरती महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडूनही आले होते. त्याच वेळी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील एकत्रित कॉंग्रेसचे बहुमत हुकले होते. तेव्हापासून आजपर्यंत एकाही पक्षाला किंवा आघाडीला महाराष्ट्राच्या विधानसभेत बहुमत मिळवता आलेले नाही. शरद जोशींनी 1994 ला स्थापन केलेला स्वतंत्र भारत पक्ष हा जर आत्मघाताकडे नेणारा मार्ग असेल तर 1978 पासून उलटसुलट उड्या मारून विविध आघाड्या करूनही आपल्या पक्षाला किंवा कॉंग्रेसला एकदाही बहुमत मिळवू न देणारे शरद पवार यांचा मार्ग राजकीय चातुर्याचा आहे असं मानायचं का? गेल्या तीस वर्षांमध्ये भारतात स्वत:च्या जीवावर बहुमत मिळवण्याची ताकद एकाही राजकीय पक्षात शिल्लक नाही आणि याचं श्रेय निश्र्चितच चळवळींना द्यावं लागेल. आज अण्णा हजारेंची तुलना शरद जोशींशी करणारे हे विसरतात की शेतकरी संघटनेला एक भक्कम असा वैचारिक पाया आहे. इतकंच नव्हे तर राजकीय अपयशाचा कुठलाही परिणाम शेतकरी चळवळीवरती होऊ शकलेला नाही. आज वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षीही शरद जोशी परकीय गुंतवणुकीबाबत (एफडीआय) अतिशय ठाम अशी भूमिका घेतात. ही भूमिका बांधावर उभ्या असलेल्या त्यांच्या शेतकरी अनुयायाला अतिशय सुयोग्यपणे समजते आणि तोही ही मागणी जोर लावून करताना दिसतो. असं अण्णा हजारेंच्या बाबतीत घडलेलं नाही. गेल्या 32 वर्षांच्या काळात एक मोठी वैचारिक घुसळण शेतीप्रश्र्नावरती शरद जोशींनी घडवून आणली. ती इतकी परिणामकारक होती, अगदी या वेळेसच्या 15 ऑगस्टच्या भाषणातही शेतकर्‍यांच्या कर्जाचा प्रश्र्न अर्थतज्ज्ञ असलेल्या पंतप्रधानांना उपस्थित करावा लागला आणि शेतकरी संघटनेची भूमिका जाहीररीत्या मान्य करावी लागली. हे अण्णा हजारेंच्या बाबतीत घडलेलं नाही. काळाचा वेध घेणारा कुठलाही विचार अजूनही अण्णांनी मांडलेला नाही. अण्णांच्या मांडणीमध्ये वैचारिक पातळीवर कुठलीही सुसूत्रता नाही, अण्णांचं बोलणं, अण्णांचा विचार त्यांच्या तथाकथित कार्यकर्त्याला कळत असेल अशीही शक्यता नाही. अशा परिस्थितीत अण्णांची तुलना शरद जोशींशी करणे आणि टीमअण्णा व शेतकरी संघटनेला एकाच पारड्यात तोलणे हे शरद जोशींवर आणि शेतकरी संघटनेवर अन्याय करणारे आहे.
शरद जोशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वैचारिक पातळीवरील चळवळींचा गांभीर्याने विचार देशातील पत्रकार, विचारवंत आणि राजकीय नेत्यांनी करावा ही किमान अपेक्षा!

पाऊस पडला पुढे काय?


---------------------------------------------------------------
६ ऑगस्ट २०१२ पाक्षिक शेतकरी संघटक मधील अग्रलेख
---------------------------------------------------------------


मान्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने सर्वत्र दुष्काळाची स्थिती निर्माण झाली होती. गेल्या आठवड्यात पडत असलेल्या आश्वासक पावसाने आशादायी वातावरण तयार झाले आहे. धरणांच्या पाणी साठ्यातही वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश भागात पडलेल्या भीज पावसाने चार्‍याची समस्या सुटण्यास मदत होईल. जनावरांच्या दुष्काळी छावण्यांची गरज कमी होईल. यामुळे एक दिलासा शेतीव्यवसायाला निश्र्चितच आहे. चांगला पाऊस पडत असल्यामुळे त्या धुंदीत पुढच्या एका भयाण समस्येकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केलेले दिसते आहे. या वर्षी धरणांचे पाणीसाठे मृत साठ्यापर्यंत पोहोचले आणि त्याचा परिणाम शहराच्या पाणीकपातीत झाला. यावर लगेच जिकडे तिकडे ओरड झाली. समजा या वर्षी पुरेसा पाऊस झाला आणि धरणं सगळी भरली. तरीपण एक समस्या उद्भवणार आहे. ती म्हणजे मागचा अनुभव ध्यानात ठेवून पुढील वर्षी धरणातील पाणीसाठ्यांच्या नियोजनात काही बदल करावा लागेल. पिण्यासाठी आणि त्यातही विशेषकरून शहरातील लोकांना व उद्योगांना पाणी मिळावं म्हणून हे नियोजन केलं जाईल हे आताच स्पष्ट झालं आहे. दरवर्षी 15 जुलैपर्यंत पुरेल इतकं पाणी धरणामध्ये राखीव ठेवलं जातं आणि शिल्लक पाणी हे शेतीला दिलं जातं. यावर्षीचा बसलेला फटका लक्षात घेता आता हे नियोजन किमान 15 ऑगस्टपर्यंत केलं जाईल असं दिसतं आहे. याचा परिणाम म्हणजे रब्बीच्या हंगामासाठी धरणातून कमी पाणी पिकांना दिलं जाईल. म्हणजेच पावसाने दिलेली ओढ ही या दुसर्‍या मार्गानेही शेतीच्या मूळावर येईल. रब्बीच्या हंगामाला मोठ्या पेरणीचा हंगाम म्हणतात. या हंगामाला पाणी कमी मिळालं तर स्वाभाविकच अन्नधान्याची तूट संभवेल म्हणजे परत एकदा अन्नधान्याच्या काहीशा महागाईला तोंड द्यावं लागेल. पुढच्या वर्षीपासून सार्वत्रिक निवडणुकांचे वारे वाहायला लागतील. मार्च 2013 च्या अर्थसंकल्पात कुठलाही कडक निर्णय होऊ शकत नाही. साहजिकच शेतीबाबतही काहीही भलं होण्याची शक्यता नाही. संघटीत शहरी मध्यमवर्गीय मतदाराला दुखवण्याची कुठलीही हिंमत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार दाखवणं शक्य नाही. म्हणजे परत एकदा शेती आणि शेतकर्‍याचं मरण अटळ आहे.
सध्या जे जे जलसिंचन प्रकल्प धरणांचे मोठे प्रकल्प रखडलेले आहेत. त्याबाबत कुठलेही ठाम धोरण केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो त्यांना आखता आले नाही. हजारो कोटी खर्च करून महाराष्ट्राच्या सिंचन क्षमतेत एक टक्काही वाढ झालेली नाही. हे सरकारनेच कबूल केलेले आहे. कुठल्याही प्रकल्पांना विरोध करणार्‍या पर्यावरणवाद्यांचे डोळे आता तरी उघडावेत अशी किमान अपेक्षा. इतके पैसे खर्च होऊनही जुलै संपत आला तरी टँकरनी पिण्याचे पाणी पुरवावे लागते या दुर्दैवाला काय म्हणावे? शहरांमध्ये जून-जुलैच्या महिन्यात पाणी कपात करण्यात आली तर मोठी ओरड झाली; पण ग्रामीण भागात तर वर्षाचे 6 महिने पाणी टंचाईला तोंड द्यावी लागते आहे. जिथे पिण्याच्याच पाण्याची बोंब आहे तिथे शेतीसाठी पाणी याबाबत काय बोलणार? एकदा धरणं भरली की, आरडाओरड करणार्‍यांची तोंडं गप्प होऊन जातात. सगळी मोठी-छोटी धरणं म्हणजे शहरं आणि त्यांना लागून असलेले उद्योग यांच्यासाठीच्या पाण्याच्या टाक्या बनल्या आहेत, हा आरोप वारंवार शेतकरी चळवळीने केला होता. शेतकर्‍यांच्याच पोटी जन्माला आलेले राज्यकर्ते मात्र या आरोपाकडे कानाडोळा करत राहिले. याचाच परिणाम म्हणजे शहरांमधल्या स्थलांतराचा वेग वाढीला लागला. रस्ते, पाणी, वीज यांची अवस्था छोट्या गावांमधून भयाण झाली आहे. पावसाच्या या अनियमित वर्तनातून काही एक शहाणपण घेऊन योग्य नियोजनाची गरज होती. पण दुर्दैवाने त्याबाबत कुठलीही हालचाल सध्या शासकीय पातळीवर दिसत नाही. महाराष्ट्राचा विचार केला तर सिंचनाचे सर्व प्रकल्प तातडीने पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. हे सर्व प्रकल्प पावसाळ्यापूर्वीच झाले असते, तर किमान या अनियमित पावसाची साठवण तरी योग्य रीतीने करता आली असती. याचाच परिणाम म्हणजे पाणी टंचाईला तोंड देण्याची तयारी झाली असती, पण ते तसं झालं नाही. अजूनही जे प्रकल्प जुनेच आहेत त्यांच्या लाभक्षेत्रात थोडाफार पाऊस पडला की सगळै हुश्श करतात. चॅनेलवाल्यांना भरलेल्या धरणाचे फोटो दाखविण्याची ऊर्मी येते. आधीचं कोरडं धरण आणि आता भरलेलं धरण हे चित्र दाखवताना आपण प्रेक्षकांना विचार करण्यापासून परावृत्त करतो आहोत, याचीही जाण त्यांना उरत नाही. सप्टेंबर महिन्यात किंवा ऑक्टोबर महिन्यात सगळी धरणं भरून वाहिली की आपण दिवाळी आनंदाने साजरी करायला हरकत नाही, या भ्रमात राहतो. पण हे कुणाला कळत नाही. ही स्थिती मागच्याही वर्षी होती. तेव्हाही धरणं पूर्ण भरली होती. मग फेब्रुवारीपासून जुलैपर्यंत पाण्याचे हंडे घेऊन बायका का वणवण फिरत होत्या. आताही हे हंडे भरलेले दिसले तरी परत फेब्रुवारीमध्ये ही स्थिती येणार आहे, त्यासाठी आज काहीही नियोजन केल्या गेलं नाही. गेल्या वर्षीपेक्षा पाणी साठवायची क्षमता एका टक्क्यानीही वाढलेली नाही आणि इकडे पाण्याचा शहरी वापर तसेच उद्योगांचा वापर हा वाढतच चालला आहे. मग आहे त्याच साठवण क्षमतेवरती पुढचा उन्हाळा आपण कसा निभवणार आहोत. पावसाचं पाणी साठवण्याच्या बालीश आणि छोट्या छोट्या योजनांचं कौतुक जो तो सांगत राहतो; पण नैसर्गिक साठवणुकीच्या जुन्या विहिरी, आड, बारव यांच्या पुनर्भरणाचा कसलाही विचार शासनाच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, स्वयंसेवी संस्थांच्या डोक्यात येत नाही. मोठमोठ्या शहरांना शेकडो किलोमीटर दूरवरून उपसा करून पाणी नेणे एवढेच आम्ही कर्तव्य समजत आलो आहोत; पण दूरदूरवर पसरलेल्या छोट्या छोट्या खेड्यांना पिण्यासाठी पाणी पुरवण्याची कसलीच आणि कुठलीच योजना धडपणे कार्यान्वित करता आलेली नाही. शुद्ध तर सोडाच; पण साधं तरी पाणी गावापर्यंत पोहोचवता आलेलं नाही. सुप्रसिद्ध हिंदी कवी दुष्यंतकुमार यांच्या ओळी आहेत :
कहॉं तो तय था चरागा हरेक घर के लिए
यहॉं चिराग मय्यसर नहीं शहर के लिए
प्रत्येक घरात एक दिवा लावू असं स्वप्न लोकनेत्यांनी आम्हाला दाखवलं होतं; पण घरात सोडा गावातही एक दिवा आम्हाला लावता आलेला नाही, त्याच पद्धतीने घरोघरी नळ देणं तर दूरच; पण गावासाठी म्हणून पुरेसं पाणी देणारी पाण्याची टाकी आम्ही कार्यान्वित करू शकलेलो नाही. इथून पुढे पाच महिने सगळे आनंदात मश्गूल असतील. पावसाने हिरव्या झालेल्या डोंगरदर्‍यांची छायाचित्रे सर्वत्र झळकत राहतील; पण फेब्रुवारीपासून परत एकदा रिकामे हंडे डोईला घेऊन वणवण करण्याची स्थिती येईल, या भीतीचा गोळा गावोगावच्या बायाबापड्यांच्या पोटात उठतो आहे. शेतकर्‍याने तर विचारच करून द्यायचा सोडून द्यावा. अशी परिस्थिती सगळ्यांनी मिळून आली आहे.

Tuesday, August 7, 2012

निसर्गशेतीचे फसवे अध्यात्म

-----------------------------------------------------
६ जुलै २०१२ पाक्षिक शेतकरी संघटक मधील अग्रलेख
-----------------------------------------------------




राजमान्य राजश्री, तमाम हिंदी चित्रपट प्रेक्षकांचे लाडके, आधुनिक भारतातील महान समाज सुधारक मा. आमीर खान यांनी आपल्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात अन्नधान्याबाबत बर्‍याच गोष्टी सत्य वाटाव्या अशा रेटून सांगितल्या. परिणामी, टीव्ही बघणे हीच सामाजिक जबाबदारी मानणारे तमाम आळशी, सुस्त टीव्ही प्रेक्षक यांनाही तेच खरे वाटू लागले आहे. आपल्याकडे प्रचलित असलेला दुसरा एक शब्द आहे निसर्ग शेती. म्हणजे नैसर्गिकरीत्या पिकलेले अन्न खायचे. याची भलामण करणार्‍यांच्या हे लक्षातच येत नाही, शेती हीच मूळात निसर्गाच्या विरुद्ध मानवाने केलेली सगळ्यांत मोठी कृती होय. शेतीचा इतिहास किमान 10,000 वर्षांचा आहे. कितीतरी वर्षांच्या अनुभवानंतर शेती प्रक्रियेमध्ये आणि पिकांमध्ये बदल होत गेला. निसर्गात जे उपलब्ध आहे, त्याच्यावरच अवलंबून राहिलो असतो, तर आज जी प्रगती दिसते आहे ती दिसली नसती. शेतीचा शोध लागण्याआधी लाखो वर्षांपासून मानवाचं अस्तित्व या पृथ्वीतलावर होतं; पण त्याला प्रगती साधता आली नाही. एका आदीम अवस्थेमध्येच लाखो वर्षे माणूस राहिला. शेती करायला लागल्यापासून एक नवीन विकासाचा मार्ग माणसाला सापडला. त्या दिशेने केलेल्या प्रवासातून आजचं जग आपल्यासमोर दिसतं आहे. हे सगळं माहीत असताना परत एकदा निसर्गशेती खरी, नैसर्गिकरीत्या पिकवलेले पदार्थ चांगले, रसायनं म्हणजे एकदम वाईट हे अध्यात्मिक गारूड का पसरवलं जात आहे?
आमीर खानचा कार्यक्रम बघत असताना प्रेक्षकांना हेही कळत नाही ते खात असलेल्या आंब्याच्या फोडीही रासायनिकरीत्या पिकवलेल्या आहेत. आज माणूस वापरत असलेली अन्नधान्य ही रासायनिकदृष्ट्या पिकवलेली आहेत आणि तरीही बोलताना मात्र नैसर्गिकरीत्या पिकवलेल्यांचा बोलबाला पसरवला जातो. या ढोंगाचे कारण काय?
भारतीय इतिहासात अशा ढोंगाची परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे. एकीकडे भौतिक जग हे नश्वर आहे असं म्हणायचं आणि दुसरीकडे धर्माच्या नावाखाली मोठमोठी देवळं उभारायची, त्या ठिकाणी संपत्ती गोळा करायची आणि त्या अधिकारावरून सर्वसामान्य जनतेचं शोषण करायचं. प्रत्येक वेळी भोगाला दुय्यम समजायचं, देहधर्मांना क्षुल्लक मानायचं, स्वाभाविक वासनांकडे दुर्लक्ष करायचं आणि दुसरीकडे सगळ्या भोगवादी वृत्तींना आपलंसं करायचं हे एक ढोंग आपल्याकडे दिसून येतं. त्याचाच हा आधुनिक अवतार. निसर्गत: पिकवलेल्या पिकाची फॅशन शहरी किंवा शेतीपासून तुटलेल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. स्वत: कृत्रिम धागे वापरायचे, त्यांच्या किफायतशीर किमती, त्यांचा टिकाऊपणा याचा उपयोग करून घ्यायचा आणि बोलताना मात्र सुती कपड्यांचे महत्त्व सांगायचे. मुंबईचे एक प्रसिद्ध कवी आम्हाला तावातावाने दहा वर्षांपूर्वी एकदा बीटी कॉटनच्या वापरामुळे शेतकरी कसं देशाचं नुकसान करतो आहे, हे सांगत होते. त्याचे वेगवेगळे दाखले देत होते. आपल्याकडचे देशी बियाणे किती चांगले आहे आणि त्याचाच कापूस कसा चांगला असतो हेपण सांगत होते. तेव्हा त्यांना कसलाही प्रतिवाद न करता आम्ही शांतपणे इतकाच मुद्दा मांडला होता. ‘बीटी कापूस हा निदान शेतकर्‍याच्या जीवनमरणाचा प्रश्र्न आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रविरोधी काम केलं असं मान्य करूयात; पण पेप्सी आणि कोकाकोला या तर काही जीवनावश्यक गोष्टी नाहीत. मुंबईतलं तर सोडाच, तुमच्या चेंबूरमधलंही सोडा, तुमच्या कॉलनीतलं - अपार्टमेंटमधलं सोडा, तुमच्या स्वत:च्या घरातला पेप्सी आणि कोकाकोला बंद करून दाखवा आणि मग माझ्याशी या विषयावर गप्पा करा. बाष्कळ गोष्टींवर चर्चा करायला आम्हाला वेळ नाही.’ आधुनिकीकरणाचे सगळे फायदे उचललेला समाज अन्नधान्याच्या बाबतीत मात्र मागास विचार का करतो आहे? 1960 ला हरित क्रांती झाली नसती तर भूकेने लोक मेले असते हे सगळ्यांना माहीत आहे. रसायनांचा वापर ही गोष्ट आक्षेपार्ह नसून त्या संदर्भातलं तारतम्य काय आहे हे बघायला पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाने अन्नधान्य जास्त प्रमाणात पिकवल्या जाणे हे तर आवश्यक आहेच; पण त्याचे जे आणि जसे काही दुष्परिणाम होत असतील ते तपासून त्यावर बंदी घालणे किंवा अशा गोष्टींना प्रोत्साहन देणारे किंवा त्याचा वापर करणार्‍यांना शासन करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे, त्याबाबतीत काहीच घडत नाही. प्रत्यक्षात रसायनांचा वापर केलेलं खूप मोठ्या प्रमाणातलं अन्नधान्य, फळफळावळ आम्ही वापरतो, त्याचा दुष्परिणाम घडतो आहे, असं सरसकट चित्र गेल्या 50 वर्षांत कुठेही दिसलं नाही. काही ठिकाणी अतिरिक्त कीटकनाशके, रसायनांचा वापर केल्यामुळे गैरप्रकार घडले असतील; पण याचा अर्थ असा निघत नाही की, हा वापरच चूक आहे. विज्ञानाची दिशा ही विकासाकडे प्रगतीकडेच असते. काळाची चक्रे परत फिरवून मागे जाता येत नाही. हे ध्यानात घ्यायला हवे.
निसर्गशेतीचं अध्यात्मिक गारूड उभं करण्यात लोकांचे वेगळे असे स्वार्थ आहेत. आज मोठ्या प्रमाणात छोट्या गावांचं किंवा शेतीचं शोषण करून शहरी व्यवस्था उभी राहिली आहे. याचे दुष्परिणाम सगळ्यांना जाणवायला लागले आहेत. मग या अपराधी भावनेतून स्वत:चा दोष लपवण्यासाठी शेतीतल्या विविध गोष्टींबाबत मोठ्याप्रमाणात ओरड हाच वर्ग करत राहतो.  उद्योगक्षेत्राला दोन वर्षांपूर्वी साडेचार लाख कोटींची करमाफी देण्यात आली होती; पण त्याबाबत चकार शब्द न बोलता शेतीक्षेत्राला दिल्या गेलेल्या 80 हजार कोटी कर्जमुक्तीची ओरड झाली. शासनाला नियमित स्वरूपात करोडो रुपयांनी डुबवणारा शहरी वर्ग शेतकर्‍याला इन्कम टॅक्स नाही म्हणून बोंब मारतो, त्यामधली मेख हीच आहे. शेती असो की आधुनिक जगातील आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा कितीतरी गोष्टी असो, यांच्या स्वागताची उदार भूमिका आपण घेतली पाहिजे. नवनवे बदल स्वीकारण्याची एक फार मोठी अशी भारतीय परंपरा आहे. आपला एकमेव देश असा आहे, की ज्याने विविध आक्रमणं पचवून स्वत:ची अस्मिता विविधतेसह टिकवून ठेवली. हे सगळं माहीत असताना परत एकदा जुन्या कर्मठ विचारांनी आधुनिकतेला विरोध करायचा, या मानसिकतेला काय म्हणावे?
आमीर खानचा कार्यक्रम ज्यांनी ज्यांनी पाहिला असेल ते जवळपास सगळे दूरदर्शनसंच त्यातील तंत्रज्ञान हे सगळं आधुनिक विज्ञानाचीच देणगी होय असं असतानाही शेतीमध्ये काही आधुनिक गोष्टी येत असतील तर त्याबाबत नकारात्मक दृष्टीकोन का ठेवायचा? बीटीचं युग संपलं आता जीएम युग येऊ घातलं आहे. खुल्या मनाने त्याचं स्वागत करूया.